मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पैसा

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
श्वासात अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास; श्वासाने सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास? स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारलाये आणि स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोधारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आचरणात आणता येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळते पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे. तर पहिली गोष्ट - स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित! कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्‍या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील! मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं. हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात: एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता. दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते. तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता! चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते. पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही. इथे मला अजून एक गैरसमज दूर करावासा वाटतो, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते! मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं! माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!

वाचने 39571 वाचनखूण प्रतिक्रिया 107

श्रीरंग_जोशी Fri, 06/22/2012 - 11:58
अर्थशास्त्राचे ज्ञान व तुमचे जीवनाचे सरळ सोपे असे तत्त्वज्ञान यांची सांगड घालून परिणामकारकरीत्या संदेश देणारा लेख. संग्रही जपून ठेवावा अन इतरांनाही दुव्याद्वारे पाठवावा असा...

सहज Fri, 06/22/2012 - 12:22
>मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आता फायनान्शियल प्लॅनर्स म्हणणार की ही अध्यात्मीक, लाईफ कोच वाल्या लोकांनी सोडून दिलेली अफवा आहे.. कॉलिंग सदानंद ठाकूर साहेब!! कॉलिंग सदानंद ठाकूर साहेब वर लेखात असे शक्य नाही हा जो मुद्दा आला आहे त्याच्याशी असहमत इतकेच नोंदवायला हा प्रतिसाद. याउप्पर जगद्गुरू क्षीरसागरसाहेब यांचा प्रतिवाद आम्हाला जमणे नाही. तेवढे ग्रह नशीबात नाहीत.

In reply to by सहज

आहो, अध्यात्म म्हणजे सगळं सोपं कसं होईल, मजेचं कसं होईल ते सांगणारं शास्त्र, जीवन आणि अध्यात्म अशी अजिबात फारकत नाही, तुम्ही ते वेगळं करु नका. माझं केवळ नशिब की दोन्ही गोष्टी लाभल्यात नाही तर कुणी एक शब्द ऐकून घेतला नसता! या लेखातला विचार ही अध्यात्मिक अफवा नाही, वर्षानुवर्ष असं जगून त्या अनुभवातनं लिहिलय आणि त्याला अध्यात्मिक बॅकग्राऊंड देखील आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूनी बिनधास्त राहा आणि जे लिहिलय ते संपूर्ण आत्मसात करा. नुसतं वाचायला इतकी मजा येते तर जगायला काय सॉलिड मजा येत असेल याची कल्पना करा, तुम्ही फक्त मनावर घ्यायचा अवकाश आहे.

मृत्युन्जय Fri, 06/22/2012 - 12:23
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता हे पण वाचा. थोडेफार तुम्ही म्हणता तेच आहे. http://www.odditycentral.com/news/woman-hasnt-used-money-in-15-years.html

In reply to by मृत्युन्जय

तुमचं आकलन सारांशानं इथे लिहिलत तर बरं होईल. तसं ही आता या विषयावर वाचायच काहीही राहिलं नाही म्हणून तर लिहितो!

चौकटराजा Fri, 06/22/2012 - 12:58
मानव जात काही दशलक्ष वर्ष या ग्रहावर आहे. तेंव्हा पैसा नव्हता पण सत्तेची कल्पना त्यावेळेपासून अस्तित्वात आहे. पैसा म्हणजे सत्ता मिळविणे. काही प्रमाणात वस्तू मिळविणे.आपण अधिकात अधिक स्वावलंबी झालो तर सत्तेची गरज उरत नाही. उदा. चाललो तर रिक्शावाल्यावर सत्ता गाजविण्याची सक्ती येत नाही. तसे वस्तू उपभोग कमी केला तर पुन्हा पैशाची गरज कमी होते. उदा. शीळ वाजवून गाणे म्हणता येत असेल तर बासरी विकत घ्यावी लागत नाही. पण संगीताचा आस्वाद घेण्यात अडचण येत नाही. पूर्वीचे लोक चांदण्या रात्री अंगणात बसून चकाट्या पिटत. त्याला किती पैसे खर्च होत बरे ?

In reply to by चौकटराजा

पूर्वापार असलेल्या काँप्लेक्समुळे आहे. जो पैश्यापुढे झुकतो त्याला ती सत्ता वाटते, ज्याला काँप्लेक्स आहे त्याला ती पॉवर वाटते. असा विचार सोडा, पैसा फक्त युटिलिटी आहे. संपूर्ण स्वावलंबी कुणीच होऊ शकणार नाही कारण अस्तित्वच परस्परावलंबी आहे. जो रिक्षावला मला इतक्या गर्दीतून एका ठिकाणहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचवतो त्याचाशी मी नेहमी गप्पा मारत प्रवास करतो आणि कधीही सुट्ट्या पैशासाठी हुज्जत घालत नाही, ७६ झाले तर सरळ ८० देतो आणि उतरताना त्याचे न चुकता आभार मानतो, मला त्याचेच माझ्यावर उपकार वाटतात. पैश्यानं माझ्यापेक्षा कमी असलेल्यां विषयी सहानुभूती आहे त्यामुळे माझ्यापेक्षा कित्येक पट श्रीमंत असलेल्यां बरोबर वावरतांना त्यांचा पैसा मला जाणवत देखील नाही आणि त्यांनाही माझ्या बरोबर मजा येते! पैसा असेल तर वापरा नसेल तर नाराज होऊ नका, बुद्धी पैश्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहे, वेगळा पर्याय निवडा. पैश्यावर स्वतःला कधीही तोलू नका कारण तशी वस्तुस्थिती नाही, तुमचं असणं पैश्यावर अवलंबून नाही ती फार रहस्यमय आणि मौलिक घटना आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकटराजा Fri, 06/22/2012 - 14:17
तरीही जास्तीत जास्त माणूस काय करू शकतो ? तर जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. माणसांच्या एकमेकांवरील अबलंबनातून पैसा वा सत्ता या कल्पना उदयास आल्यायत. आपण विचार करतो त्याला या दोन्ही चीजा लागत नाहीत. स्वप्ने पहातो त्याला या दोन्ही गोष्टी लागत नाहीत. पण अशी पूर्ण स्वावलंबनाची स्थिति अप्राप्य म्हणजेच मोक्ष असावा बहुदा .

In reply to by चौकटराजा

पूर्वीचे लोक चांदण्या रात्री अंगणात बसून चकाट्या पिटत. त्याला किती पैसे खर्च होत बरे ?
मिपावरच्या काही सदस्यांनी आता तरी शहाणे व्हावे आणि आंतरजालाला आपल्याला त्रासातून मुक्त करावे अशी भाबडी अपेक्षा.

सुधीर Fri, 06/22/2012 - 13:15
तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. पैसा हा नक्की दुय्यम आहे; आणि "स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा" असं मलाही वाटत नाही. पण.... आपल्याला "नेमकं" काय हवय हे कळणं जास्त महत्त्वाच आहे आणि ते मिळविण्यासाठी अर्थाजन वा अर्थाची तरतुद करणं हे ओघाने आलंच. त्यासाठी "आर्थिक साक्षर" असणंही तितकंच महत्त्वाच आहे असं मला वाटतं. निदान भविष्यात येणार्‍या संभाव्य आर्थिक गरजा-जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी आजच सजग राहून आराखडा (फायनान्शिअल प्लान) आखला पाहिजे. माझ्या मते श्रीमंत माणूस तोच, जो आपल्या "मर्यादीत" आर्थिक गरजा ओळखून त्याची योग्य ती तरतूद करतो.

In reply to by सुधीर

चौकटराजा Fri, 06/22/2012 - 14:22
पण.... आपल्याला "नेमकं" काय हवय हे कळणं जास्त महत्त्वाच आहे सुखाने जगण्याचा सर्वोतम उपाय म्हणजे काय हवे व काय नसले तरी चालेल याची पक्की यादी तयार असणे. माझेच उदा. असे की मला प्रवास हवा फोर व्हीलर मालकीची नसली तरी चालेल. मी सयकलवरून चक्कर मारून आलो तरी मला प्रवासाचा आनंद मिळू शकतो.

मराठमोळा Fri, 06/22/2012 - 13:27
फिलॉसॉफी, कंसेप्ट्स आणि प्रॅक्टीकॅलिटी यांची सांगड घालणं सामान्य विचारसरणीच्या माणसाला तितकं सोपं नाही. आपण आजच्यापेक्षा भविष्याचा विचार जास्त करतो हे खरंच आहे पण त्यामागे कारण पण तसंच आहे. पुढे जाण्याची इच्छा, जगाच्या शर्यतीत आपण मागे राहु नये अशी ईच्छा. आजचा दिवस पार पडणार आहे हे माहित आहे पण पुढचं काय? हा प्रश्न सतत माणसाला भेडसावत असतो. तुम्ही म्हणता ते विचार पाश्चात्य/विकसित देशातल्या लोकांसाटी फिट्ट बसतात कारण तिथे नागरीकांना नोकरी गेली, अपंगत्व आले, मुले झाली, रिटायर झाले तरी सरकार पैसे देतं, जबाबदार्‍या त्या मानाने फारच कमी असतात. हा विचार कुठेतरी मनातल्या मनात दिलासा देत असतो, मग आपोआपच माणूस धाडसी होतो आणि पैसे जमवून उद्याची चिंता करण्याची त्याला गरज वाटत नाही. आपल्याकडे याउलट परिस्थिती आहे. घर घेणे, आयुष्यभर त्याचं कर्ज फेडणे, मुलांचे शिक्षण, लग्न या जबाबदार्‍या माणसाला घाबरट आणि चिंतातूर बनवतात, मग तो पैसे साठवणे, उद्याची चिंता करणे असे प्रकार करत बसतो. कारण उद्या नोकरी गेली, अपंगत्व आले तर खरा आधार म्हणून असं त्याच्याकडे काहीच नसतं.

नितिन थत्ते Fri, 06/22/2012 - 13:59
नीटसं कळलं नाही. पण कुठेतरी पुढचा विचार करू नका असा काहीसा संदेश वाटला. पैसा ही कल्पना खरी नाही. संपत्ती ही कल्पना खरी आहे. पैसा हे संपत्तीचे रिप्रेझेन्टशन आहे. संपत्तीची (संपत्ती साठवण्याची) प्रेरणा संपली की आनंदात जगता येईल अशी सूचना असेल तर ती चुकीची आहे. संपत्ती (उपयुक्त वस्तू) साठवणे हा (कॉम्प्लेक्स) सजीवांच्या नैसर्गिक प्रेरणेचा भाग आहे. जी प्रेरणा मुंग्यांपासून झाडांपर्यंत सर्वांना असते. माझी समजूत चूक असेल तर सांगावे. इथे वॉरन बफे यांचे वाक्य आठवते "Money is not everything. But make sure you have plenty of it before you say this nonsense".

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट Fri, 06/22/2012 - 14:25
कुंदन सध्या प्यारीस येथे आहेत असे कळते. नुकताच त्यांनी ग्रीसचा दौरा केला आणि युरो वाचवला. नंतर ते अमेरिकेत जाणार असून डॉलर इंडेक्स कसा चढता राहिल हे पाहून नंतर दोन दिवस मुंबईत मार्गदर्शन करणार आहेत. निमंत्रितांसाठी असलेल्या मर्यादीत पाससाठी खवमधे मागणी नोंदवावी.

प्रभाकर पेठकर Fri, 06/22/2012 - 14:21
'पैसा ही आयुष्यातील अत्यंत दुय्यम वस्तू आहे.' फक्त, वरील विधान करण्या पूर्वी तो तुमच्या गाठीशी भरपूर असला पाहिजे. पैसा दुय्यम आहे हे मला पटले पण ते माझ्या कुटुंबाला, दुकानदाराला, कापड विक्रेत्याला, शिंप्याला, चष्मेवाल्याला, केमिस्टला, चांभाराला, डॉक्टरला, हॉस्पिटलला आणि शेवटी स्मशानातील लाकडे देणार्‍याला/विद्युत वाहिनीवाल्याला पटविले पाहिजे. उद्या व्यवसाय बंद करून मोकळ्या वेळेचा निवांत आनंद घेईन म्हणतो. 'गरज' आणि 'हव्यास' ह्यातील फरक ओळखून गरजेपुरता पैसा कमवावा/साठवावा. कुठल्याही गोष्टीचा 'हव्यास' वाईट. पाटा-वरवंटा गरीबाची, मिक्सर मध्यमवर्गीयांची तर फूड प्रोसेसर श्रीमंतांची गरज असू शकते. घराला, वाहनाला वातानुकुलन यंत्रणा ही एखाद्या स्थळी श्रीमंतांचे चोचले असू शकतात तर आखातासारख्या उष्ण प्रदेशात, जिथे उष्णतामान ५५ अंशाच्याही वर जाऊ शकते, ती सर्वसामान्यांची गरज आहे. प्रत्येक स्थल, काल आणि आर्थिक परिस्थितीनुसार 'गरजां'चे रुप बदलते. रिक्षावाल्याला टाळून पायी जाता येईल पण किती अंतर? तसेच, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे करण्यासाठी वाहनाची गरज लागणारच लागणार. मुंबईत राहणारा माणूस स्वयंपाकासाठी गॅसवाल्यावर अवलंबून राहणार नाही म्हणाला तर रोज सकाळी खांद्यावर कुर्‍हाड टाकून लाकडे तोडायला २५-३० किलोमिटर चालत जावे लागेल जंगल शोधायला आणि तेवढेच अंतर पुन्हा पायी परतायचे? मला तरी अशक्य होईल हे जीवन. १५-२० वर्षांपूर्वी 'जगायला' जेवढा पैसा लागायचा त्याच्या कितीतरीपट जास्त पैसा आज 'जगायला' लागतो, त्याहून कितीतरी जास्त नजीकच्या भविष्यात लागणार आहे. जगण्यासाठी कमवायचे तर जेंव्हा कमविण्याची शारीरिक क्षमता उरणार नाही आणि तरीही जीवन चालूच राहणार आहे तेंव्हा काय करायचे? जसजसे शरीर 'वृद्ध' होत जाईल तसतसे खाण्यावरील खर्च कमी झाला तरी डॉक्टरांचा/औषधांचा खर्च भरपूर वाढणार आहे. लहानसहान गोष्टींसाठी मुलांसमोर उभं राहायचे/ हात पसरायचे दिवस गेले. आता, स्वतःच्या म्हातारपणाची सोय आत्ताच, सशक्त वयातच करायची असते. त्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कराविच लागणार तरच कमाईचे साधन आणि शारीरिक ताकद नसताना 'रेव्हेन्यू' चालू राहिल...... हे फक्त जगण्यासाठी.

In reply to by प्रभाकर पेठकर

आणि तेवढ्यात पेठकरांचा हा प्रतिसाद आला. वॉरन बफे म्हणतो "Money is not everything. But make sure you have plenty of it before you say this nonsense". तुम्ही कोणताही विचार घ्या आणि मंथन सुरु करा तुम्हाला काळजी वाटलीच म्हणून समजा! प्रत्येक क्षणी (पुन्हा नमूद करतो प्रत्येक क्षणी ) तुम्हाला दोनच पर्याय आहेत एक, विचार करणं किंवा दोन जगणं. तुम्ही कितीही थोर विचार करा तो बफेचा असू द्या की पेठकरांचा, तुम्ही दुय्यम व्हाल आणि विचार प्रार्थमिक होईल. मी तुम्हाला सांगतो की श्वास महत्त्वाचा आहे आणि तो पैश्यावर अवलंबून नाही पण पैश्याचा विचार किंवा कोणताही विचार एकच काम करतो ते म्हणजे तुमच्या श्वासाची लय बिघडवणं! इथे फक्त एकच क्षण गॅरेंटेड आहे आणि तो म्हणजे चालू क्षण, हा आत्तचा क्षण, आता तुम्ही वॉरेनचं ऐकलत तर तुमच्या मनात येणार Do I have plenty of money? आता प्लेंटी म्हणजे नक्की किती हे वॉरेनला सांगता येत नाही पण मी सांगतो, Just to meet the situation on hand! and that too if it requires money! If it doesn't require money Warren's saying doesn't matter at all. आणि पेठकरांना तेच सांगतो, आपण उद्या वृद्ध होऊ या काळजीनं आजच निराश व्हाल, मग तुमच्याकडे पैसा कितीही असो तो तुम्हाला नेहमी कमी वाटेल.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रभाकर पेठकर Fri, 06/22/2012 - 19:48
तुम्हाला दोनच पर्याय आहेत एक, विचार करणं किंवा दोन जगणं. कुठलीही गोष्ट (अगदी आयुष्य जगणेही) विचार करून करावी असे पूर्वज/ज्येष्ठ सांगत आले आहेत. ते ही विचार करायचे आणि ८०-९० पर्यंत 'जगले'. त्यामुळे विचार करून जगणे हा तिसरा पर्याय अनुभवातून आलेला आहे. तो सदैव असणारच. तुमच्या वरील विधानातून 'सर्व विचारवंत अल्पायुषी होते आणि सगळे दिर्घायुषी विचारच करायचे नाहीत' असा अर्थ निघतो, तो मला मान्य नाही. श्वास महत्त्वाचा आहे आणि तो पैश्यावर अवलंबून नाही. हॉस्पिटलात आपल्या प्रिय माणसाला किंवा स्वतःला वैद्यकिय उपचार हवे असतात तेंव्हा हे तत्त्वज्ज्ञान त्यांना सांगून पाहा तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला ते हॉस्पिटलात भरती करून आवश्यक वैद्यकिय उपचार देतात का. तिथे पैसाच लागतो. आपण उद्या वृद्ध होऊ या काळजीनं आजच निराश व्हाल. काळजी कोण करतय? आणि निराश?? हॅ: अज्जिबात नाही. आजही मजा करतो आहे आणि वृद्धापकाळीही नैराश्य न येता काळजी विरहित जगण्याची सोय करून ठेवतो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Sat, 06/23/2012 - 00:10
पैसा दुय्यम आहे हे मला पटले पण ते माझ्या कुटुंबाला, दुकानदाराला, कापड विक्रेत्याला, शिंप्याला, चष्मेवाल्याला, केमिस्टला, चांभाराला, डॉक्टरला, हॉस्पिटलला आणि शेवटी स्मशानातील लाकडे देणार्‍याला/विद्युत वाहिनीवाल्याला पटविले पाहिजे. उद्या व्यवसाय बंद करून मोकळ्या वेळेचा निवांत आनंद घेईन म्हणतो. वल्ला! पेठकरमियां क्या बात है!!! :) "पैसा खुदा तो नही है लेकिन खुदाकसम, खुदासे कम भी तो नही...." -एक जाणकार राजकारणी

आहे म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. पहिली गोष्ट, मी या लेखातून चंगळवाद मांडत नाहीये, मी खरं तर एकच महत्त्वाचा मुद्दा मांडतोय की पैसा निर्जीव आहे आणि आपण सजीव आहोत, आपण प्रथम आहोत आणि पैसा नंतर आहे, आपल्यामुळे पैसा सार्थक आहे. दुसरी गोष्ट, आज मधे जगणं नेहमी उद्याचं जगणं आनंदी करत कारण उद्या हा निव्वळ अ‍ॅटीट्यूड आहे, उद्या हा विचार आहे त्याला वास्तविकता नाही. उद्याचा विचार भीती निर्माण करतो, आहे ते उपभोगू देत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे या विचारांमागे कमालीचं अध्यात्म आहे (पण ते आता इथे मांडत नाही) त्यामुळे ही विचारसरणी पाश्चिमात्यांसारखी उथळ आणि एकांगी नाही. मी स्वतः कौटुंबिक जीवन जगतो आणि सहा जणांची जवाबदारी घेऊन घर चालवतो, तरीही जगण्यात कमालीचा स्वछंद आहे. विचार काय आहे, मन काय आहे, काल आहे किंवा नाही, मृत्यू काय आहे, आनंद म्हणजे काय, आपण नक्की कोण आहोत या सर्वांवर समग्र विचारांती हे लेखन आहे आणि सुदैवानं याला अत्यंत भक्कम अशी रोजच्या जगण्याची जोड आहे कारण पैसा हा मी आरपार आभ्यासलेला विषय आहे. माझं म्हणण इतकच आहे की या विषयावर विवादात जगातल्या कुणालाही मी पराभूत करिन पण त्याचा काही उपयोग नाही, अत्यंत मनस्वीतेनं हा लेख अशासाठी इथे पोस्ट केलाय की तुमचं जगणं आनंदाच व्हावं. उदाहरणार्थ, नितिननं संपत्ती , पैसा आणि साठवण्याची प्रेरणा असा विचार मांडलाय पण तो मी `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' मधे क्लिअर केलाय. प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही लेख पुन्हापुन्हा शांतपणे वाचा आणि आचरणात आणा, माझा एक पैश्याचा स्वार्थ नाहीये, तुमचं आयुष्य बदलेल याची मी ग्वाही देतो.

गवि Fri, 06/22/2012 - 15:38
तात्विक भाष्य सुंदरच आहे. त्यातला विचार अतिशय महत्वाचा आहे. पण प्रत्यक्षात हे असं वागणं बर्‍याच पॅरेडॉक्सेसना जन्म देणारं असेल असं दिसतं. तुम्ही स्वतः हे आचरणात आणत असाल याविषयी पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या व्यवसायामुळे "पैसा" या गोष्टीचा एंड टू एंड अभ्यासही तुमचा कधीचाच घडलेला आहे हेही कळतंय. पण कोणतीही घटना / गरज / स्थिती ही फक्त "आज", "आत्ताच्या क्षणी" इतक्या लहान प्रमाणात नसते. उदा. अचानक कुटुंबातल्या व्यक्तीवर कोसळलेला भयानक आजार आणि त्याने व्यापलेले आयुष्यातले सहा महिने.. पैकी ३ महिने त्या व्यक्तीने आयसीयूत छत बघत आजचा क्षण जगलेले..आणि अन्य नातेवाईकांनी आयसीयूबाहेर वाट पहात काढलेले.. वन डे अ‍ॅट अ टाईम करत. पण हॉस्पिटलचं बिल आजचा क्षण + आजचा दुसरा क्षण + आजचा तिसरा क्षण असं करत क्युम्युलेटिव्ह वाढतं. आज द्यायला नाही जमलं की उद्या ते दोन दिवसांचं बनून येतं. तिथे हॉस्पिटल असं नाही म्हणत की फक्त आजच्या या क्षणाचं बिल द्या. आपण कालच आजचा (त्यावेळच्या उद्याचा) विचार करुन विमा उतरवलेला असला तर त्याची लिमिट संपेपर्यंत ठीक असतं मग आपण उसने घेतो कर्ज काढतो ते "उद्या" 'परवा' असे दीर्घ मुदतीत परत करायचे असतात. उद्याचा विचार न करता आजच्या क्षणात जगावं हा विचार उमदा आहे आणि अगदी शक्य तेव्हा आचरणात आणावाच.. पण प्रत्यक्षात बर्‍याच सिच्युएशन्समधे त्याला फक्त एक सुंदर थियरी इतकाच अर्थ उरतो हेही कटू सत्य आहे. पैशाचा भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा त्रास / ताण कोणी करुन घेत नाही संजयसर, तो होतो. आपण प्राथमिक, पैसा दुय्यम.. मग आपण दुय्यम पैसा प्राथमिक असं काही कोणी आधी थिअरी ठरवून मग प्रॅक्टिकल करत नसतो.. ते त्या त्या क्षणी टाळता येत नाही हेच खरं. आता मी तुम्हाला काय सांगावं आणखी..? मला तर असं वाटतं की ज्या वेळी मनाला जे वाटायचं असेल ते वाटू द्यावं.. पैशाची काळजी? ठीकाय.. भविष्याची चिंता..? ठीकाय..वाटू दे तेच्यायला.. गो थ्रू इट.. बाहेर आलात की आनंद.. नाही आलात तर मरा.. जे वाटतंय ते बळंच टाळून एखादी थियरी डोक्यात घुसवत जगायचं त्यात काही मजा नाही.. आत निवांत तरच बाहेर निवांत..

In reply to by गवि

नितिन थत्ते Fri, 06/22/2012 - 16:05
गविंशी सहमत आहे. मागे इतरत्र एका चर्चेत निवृत्तीच्या वेळी किती रुपये असायला हवेत असा हिशेब मांडला गेला होता. तसे अडीच कोटी न जमवता निवृत्तीनंतर सुखात/आनंदात प्रत्येक क्षण जगण्याचा काही उपाय असला तर या संजयजींनी या धाग्यावर मार्गदर्शन करावे. पूर्वी ६०-७०च्या दशकात हिप्पी लोकांची एक चळवळ होऊन गेली. त्यांचाही विचार असाच काहीसा (आज आणि आत्ता मध्ये जगा) होता. ती चळवळ का फोफावली नाही याचा विचार करायला हवा.

In reply to by नितिन थत्ते

मला काळजी वाटत नाही (अर्थात अडीच कोटी वगैरे नाहीयेत) पण निवृत्त काय जगेल असं आयुष्य आता जगतोय! निवृती नंतर असतं काय जगायला? पेठकरांना सांगीतलं तेच तुम्हाला सांगतोय उगीच निवृती, विकलांगता, मृत्यू, अत्यंसंस्कार, मग पत्नीचा चरितार्थ, मग तिची विकलांगता... आहो हे संपणारं नाही. आणि मी हिप्पी नाही हो, फुल्ल संसारी आहे, तुम्ही उत्तरं मनापासून वाचत नाही त्यामुळे असं होतं!

In reply to by गवि

आणि आत निवांत होण्यासाठीच तर लिहिलय! आयुष्य हे वरुन तसं दिसत असलं तरी वास्तविकात क्युम्युलेशन नाहीये, स्मृतीमुळे तसा भास होतो. एखादा पेशंट तीन महिने आयसीयूमधे आहे असं आपण म्हणतो तेव्हा ते आता या क्षणी असतं, मागचे दिवस स्मृतीत असतात आणि पुढची काळजी (कितीही योग्य वाटली तरी) कल्पना असते. या क्षणी तुम्ही काय करणारा हाच नेहमी प्रश्न असतो, तो प्रसंग या क्षणी कसा हाताळता यावर सगळं अवलंबून असतं, पैसे असोत की नसोत. म्हणून तर सांगतोय पैसा दुय्यम आहे, तुम्ही प्रथम आहात, प्रत्येक वेळी याचच विस्मरण होतं, आणि जितकं विस्मरण तितकी काळजी. >जे वाटतंय ते बळंच टाळून एखादी थियरी डोक्यात घुसवत जगायचं त्यात काही मजा नाही.. = ही थिअरी नाही, पैश्याची ओढ सार्‍या जगाला आहे, पैसा मिळणार नाही म्हटलं तर कुणी सकाळी बिछान्यातनं उठायला देखील तयार होणार नाही! काय वाटतं? मी तुम्हाला वास्तविकता सांगतोय पण जग बहुदा प्रश्नात इतकं गुंतलय की त्यांना प्रश्नाचा विसर पडलाय, जे चाललय ते बरोबरच आहे असं वाटतय!

शुचि Fri, 06/22/2012 - 17:46
उत्तम विषय. फारच मस्त विषय. आता हापीसातून लेख आणि सर्वांच्या प्रतिक्रिया निवांतपणे वाचीन म्हणते. मग यावर माझे काही विचार मांडेन, प्रश्न विचारेन. इतका "सेक्सी" ( ;) ) विषय चर्चेस घेतल्याबद्दल अभिनंदन.

तिमा Fri, 06/22/2012 - 17:57
कुटुंबनियोजनाला विरोध करणार्‍या, जुन्या पिढीतल्या एका नातेवाईकांकडून एक प्रतिवाद ऐकला होता. 'चोच आहे तिथे दाणा आहे'. वरील विचारसरणी मला त्याच प्रकारची वाटते आहे. पैशामागे धावू नये, गरजा कमी असाव्यात हे सर्व ठीक आहे. पण अलिकडील काही वर्षांत माफक दैनंदिन जगण्यासाठीही जास्त पैसा लागतो आहे. अशा वेळेला तुमचे आयुष्य किती आहे हे नक्की माहित नसताना, कोणालाही उद्याची चिंता वाटणारच. वर गविंनी लिहिल्याप्रमाणे, असाध्य व्याधींमुळे (त्यावरील इलाजांमुळे) एखाद्या कुटुंबावर इतके मोठे आर्थिक संकट कोसळते तेंव्हा, चंगळ न करता काटकसरीने जमवलेला पैसाच त्याच्या मदतीला असतो.

In reply to by तिमा

पैशामागे धावू नये, गरजा कमी असाव्यात वगैरे म्हटलं नाहीये. तुम्ही पुन्हा शंतपणे वाचा : `उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत' ही टॅग लाईन आहे

पैसा Fri, 06/22/2012 - 18:17
मला वाटलं माझ्यासाठी लेख लिहिलाय की काय! पण असो. लेख चांगला आहे. आणि विचार करण्याची ही पण एक पद्धत आहे. आपल्या जागी ती बरोबर आहे. तसं अचानक येणार्‍या संकटांसाठी काही तरतूद हवी हेही बरोबर आहे. मला वाटतं, क्षीरसागर साहेब "पैसे जमवू नका" असं म्हणत नाहीयेत तर "सदैव त्याबद्दलची काळजी करत बसू नका" असं म्हणत आहेत. प्रत्येकाने आपल्याला किती पैसे पुरेसे आहेत हे ठरवावं आणि तेवढे मिळाले की मनसोक्त जगावं. इतकं सोपं आहे हे!

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Fri, 06/22/2012 - 20:00
प्रत्येकाने आपल्याला किती पैसे पुरेसे आहेत हे ठरवावं आणि तेवढे मिळाले की मनसोक्त जगावं. इतकं सोपं आहे हे! अगदी सत्य वचन. आणि तेवढे नाही मिळाले तर जे मिळताहेत, गाठीशी आहेत त्यावर समाधानी असावं. तेच तर करतोय. मग हे फुकाचं, पचनी न पडणार तत्त्वज्ज्ञान, कशाकरीता?

शुचि Sat, 06/23/2012 - 00:00
माझी एक मैत्रिण (रूममेट) आहे - शनी उच्चीचा आहे (तूळेचा), सूर्य उच्चीचा आहे (मेषेचा), मंगळ स्वराशीत (मेषेत) पण मला वाटतं शनीने शिस्त शिकवली आहे. इतकी टाईट्-फीस्टेड (जपून खर्च करणारी) आहे की बास ती पै न पै साठवून नक्की कोट्याधीश होणार. अन्य बाबतीत देखील ती खूप काटेकोर आहे. मला अशा लोकांचे खूप कौतुक वाटते. आता ती आयुष्य उपभोगते का? तर वेल, कदाचित रूढार्थाने नाही. आम्ही जेव्हा बाहेरचं घट्ट दही विकत आणतो तेव्हा ती घरी फुळकवणी, पांचट दही बनवून खाते. (घरचं दही चांगलं बनत असेल. इथे तिचं बनत नाही.त्यावर चर्चा नको.)हा झाला लहान प्रसंग असे अनेक प्रसंग आहेत. आम्ही पट्टदिशी एसी लावतो तर ती लावत नाही वगैरे वगैरे. पण मला खात्री आहे तिचा वृद्धापकाळ सोन्याचा जाणार. जावो. तिचा हक्क आहे. ______________________________________________ पैशाविषयी एक अत्यंतिक सुरेख पुस्तक वाचले होते "द सोल ऑफ मनी" ज्यात लेखिकेने म्हटले आहे की - money इज लाईक water or blood: flowing it can purify, cleanse, create growth and nourish versus becoming stagnant and toxic to those withholding or hoarding it. मला ते पटते. पैसा हा आयुष्यात पाण्यासारखाच वहाता येतो/रहातो. पण पाण्याचा साठादेखील आपण करतो जो दुष्काळात उपयोगी पडतो. थोडा विचार केला तर पाणी , ओलावा= पैसा हे समीकरण खूप खूप पटून जाते.

गणेशा Fri, 06/22/2012 - 20:14
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत
माझे जगणे असेच आहे, तुम्ही वरती जेव्हडे लिहिले आहे ते तंतोतंत नसले तरी बर्याचांशी मला लागु होतेय म्हणुन बोलतो. आयुष्य भारीच वाटते.. पण माझ्या मागे माझे घरचे आहेत, वडिल अजुन कमावतात म्हणुन मला झळ पोहचलेली नाहिये जास्त. पण अश्या स्वभावामुळे घरच्यांचे बरेच बोलणे खावे लागते .. दूसरी गोष्ट अशी की काही लोन पण डोक्यावर आहे. प्लस पॉइंट असा आहे की, १८००० सॅलरी असताना रेसेशन चालु असताना २६ लाखाचे घर घेतले. ( लोन १२ लाख आहे पण ते फिटेल. अगदीच काही नाहि झाले तरी जुने घर आहे ते विकता येइलच) सध्याच्या २६ लाखाच्या घराची किंमत ३ वर्षात ७५००० झाली आहे. भारी वाटते. आनंद आहे. बिंधास्त स्वभाव आहे, पण घरी वडिलांचा पगार आहे म्हनुन खरी काळजी नाही. लग्न झाले.. १ महिना आधी पैसे नव्हते.. आले .. स्त्रोत अनंत असतात .. काळजी नव्हतीच.. पैसे आनखिन २ महिन्यात फिटतायेत. गाडी बुक केली, ऑलरेडी लोन चालु आहे, तरी घेतोय, आपोआप जुळेल सारे असे वाटते आहे. पहिला पगार १००० होता, तेंव्हा पहिल्या पगारात ८००० चा मोबाईल घेतला होता. ( बाकी पैसे घरच्यांचे) कंपणी चेंज केली, पहिला पगार १६००० रुपये. घरचे पॅशन गाडी घेवून देणार होते, मी अपाची घेतली ( पैसे घरच्यांचेच) माझा असाच स्वभाव आहे पण मागे घरचे भक्कम आहेत म्हणुन सर्व ठिक आहे, नाहि तर सारे अवघड आहे, १० लाख रोख घरच्यांनी दिले नसते तर २६ लाखाचे घर घेणे जमलेच नसते. परंतु स्वभाव असा असल्यावर आनंदी जगता येते हे मान्य .. पण सर्व कुटुंबाला बरोबर घेवुन आनंदी जगता आले पाहिजे असे वाटते, आणि तेच सध्या शिकत आहे... म्हणजे आनंद उपभोगणे आणि आनंद देणे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत हे मला पटले आहे.. खुप दिवस आनंद उपभोगण्यात घालवली आहेत, आता कुटुंबाला आनंद देण्याकडे कल वाटतो आहे.. कदाचीत मी प्रत्येक क्षणी सुखी नसेन पण प्रत्येक क्षण समाधानाने जगत असेन. आनंद हा समाधानाशी बांधला पाहिजे असे वाटते ,निवांत जगण्यात, जास्त काळजी न करता माणुस कदाचीत दु:खी होणार नाहि पण तो आनंदमयी जगत असेल असे वाटत नाही, कारण निवांतपणातुन/बिंधास्तपणातुन कायम आनंद झिरपत नाही. समाधान ही एकच गोष्ट अशी आहे जी सुखाची व्याख्याच बदलवुन टाकते. 'संत लोक समाधानी होते, तर राजे लोक सुखी होते ' या उदाहरणातुन वरची गोष्ट कळेल असे वाटते. नोट : बाकी कामामुळे धाग्याखालचे रिप्लाय न वाचताच रिप्लाय दिला आहे, त्यामुळॅ असे मत वरती कोणी मांडले आहे का ते पाहिले नाही. वेळ मिळताच सारे रिप्लाय वाचीन. बाकी धागा आवडला हे.वे.सां.न.ला.

In reply to by गणेशा

प्रभाकर पेठकर Fri, 06/22/2012 - 20:18
सध्याच्या २६ लाखाच्या घराची किंमत ३ वर्षात ७५००० झाली आहे. एवढी उतरली? कुठे घेतलयं घर?

अर्धवटराव Sat, 06/23/2012 - 05:16
आपण ज्याला पैसा म्हणतो तो इतर काहि नसुन रिसोर्सेस आणि सर्व्हिसेस ची इक्विवॅलंट गॅरॅण्टी आहे. सोपं उदाहरण घेऊ ... एक मनुष्य दिवस भरात ६ पोळ्या खातो. हि त्याची त्याला जाणवणारी गरज आहे. त्याला चॅलेंज नाहि. म्हणजे वर्षभरात जवळपास २२००. जर एका पोळीची वार्षीक सरासरी किंमत १ रु. घेतली तर त्या माणसाला वर्षभराकरता २२०० रु लागतील. नथींग जास्त, नो कमी. आता त्याच्याजवळ रोज ७ रु येण्याची शाश्वती असेल, म्हणजे ६ पोळ्या (+ १ रु...ऐश करो) तर तो श्रीमंत आणि सुखी. हे गणित ज्याला जमलं तो पैश्याच्या टेन्शनमधुन सुटला... अगदी सदेह वैकुंठप्राप्ती. थोडक्यात काय, तर आपलं शरीर - मन - बुद्धी - विवेक...आपल्याला किती भुक आहे याची खात्रीने कल्पना देते. टेक दॅट कॉल प्रामाणिकपणे, अ‍ॅण्ड मेक अरेंजमेण्ट्स. प्रामाणिकपणाच्या इक्विव्हॅलण्ट सुख पदरात पाडुन घ्या. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चौकटराजा Sat, 06/23/2012 - 11:43
आमचे हेच म्हणणे आहे की सारे सापेक्ष आहे. माझी गरज व माझी कमाई त्यात कमाई वरचढ झाली की मी श्रीमंत . गरज वरचढ झाली की मी गरीब . द आफ्रिकेने वन डे मधे ४३४ धावा करून शेवटच्या ओव्हर मधे ऑस्टेलियाला " गरीब" करून टाकले. गरजे पेक्शा त्यांची कमाई जास्त झाली. सबब द. आफ्रिका श्रीमंत ठरले.

श्वास ही सर्वात रहस्यमय घटना आहे. अठरा कोटी किलोमिटरवर सूर्यप्रकाशमान आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, या अनंत अवकाशात पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरतेय आणि तो मार्ग असंख्य ग्रह-तार्‍यातून अनाकलनीय पद्धतीनं निर्माण झालाय. पृथ्वी का फिरतेय, सूर्य का प्रकाशमान आहे, दोघातलं योग्य अंतर कसं राखलं गेलय आणि हे केवळ लक्षावधी वर्ष चालूये म्हणून ते असंच चालू राहिल अशी समजूत व्यर्थ आहे. पृथ्वी आसाशी कललीये म्हणून ऋतू आहेत, समुद्र आपली मर्यादा राखून आहेत म्हणून पाऊस आहे, पाऊस आहे म्हणून वृक्ष आहेत, आपला उत्छ्वास आहे म्हणून त्यांचा श्वास आहे आणि त्यांचा उत्छ्वास आपला श्वास आहे. अस्तित्वात परस्परावलंबित्व आहे आणि ते इतकं कमालीचं गुंतागुंतीचय की एखादा घटक जरी बिघडला तरी सगळ्या अस्तित्वातली परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स एका क्षणात बदलतील. माणसाची मजा अशीये की हे सगळं त्यानं इतकं अध्याहृत धरलय की माहिती असून सुद्धा ते विस्मृतीत गेलय, ज्या श्वासाच्या एका धाग्यावर त्याच्या सर्व कल्पनांचे महाल आहेत त्याची जाणीव त्याला बहुदा शेवटच्या श्वासाला होत असावी! त्याला वाटतय पैश्यामुळे जग चाललय. बुद्धाची सारी विपश्यना केवळ या गोष्टीवर आधारित आहे, जस्ट वन थिंग, श्वासाची दखल घेणं! ज्या क्षणी एखाद्याला श्वास चालूये हा अस्तित्वाचा काय उपकार आहे ते समजतं त्या क्षणी त्याच्या जीवनाच्या सार्‍या प्रायॉरिटीज बदलतात, तो त्याच्या मूळातच असलेल्या अस्तित्वाच्या एकरुपतेतून अस्तित्वाशी सुसंगत जगायला लागतो. जगण्याची दिशा त्याला अस्तित्वाशी साधलेल्या संवादातून, जाणीवेतून मिळते, तो काँटॅक्ट पॉइंट होतो; पुढे काय होईल, आता काय फिल्डींग लावू हा विचार व्यर्थ होतो. ज्यांना हे पटेल त्यांच्या आयुष्याची दिशा बदलेल, ज्यांना पटणार नाही त्यांच काय नेहमीसारखं चालू आहेच.

In reply to by संजय क्षीरसागर

मराठमोळा Sat, 06/23/2012 - 08:52
>>ज्यांना हे पटेल त्यांच्या आयुष्याची दिशा बदलेल, ज्यांना पटणार नाही त्यांच काय नेहमीसारखं चालू आहेच. मी एकदा ईस्कॉन मधे गेलो होतो, तिथे मला ईस्कॉनचा सदस्य होण्यासाठी पटवायला लागले. मला त्यांचे विचार पटले नाहीत, उलट मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यांना देता आली नाहीत. नंतर म्हणाले की तु जे जगतोय्स ते आयुष्य नाही, आम्ही जगतो ते आयुष्य आहे.. ओशो अनुयायी पण बाहेरच्यांना कदाचित असंच म्हणत असतील तुमच्या वरील वाक्यावरुन असंच काहीसं वाटलं. सर्वात पहिले म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते कुणाला पटत नाहीये हा गैरसमज दूर करा. क्लीयर द परसेप्शन. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटतय की तुम्ही जे करताय तेच बरोबर आहे आणि बाकीचे अज्ञानी आहेत. तुम्ही जीवन जगताय आणि बाकीचे आयुष्य काढताहेत/ ढकलताहेत हाही गैरसमज दूर करा.. प्रत्येकाला स्वतःचे विचार आहेत, स्वतंत्र अस्तित्त्व आहे. विचार करायचं सामर्थ्य आहे. तुम्ही तुमचे विचार मांडलेत, तुमचं काम झालं, ईतरांचे विचारही समजून घ्या. स्वतःला ईतरांच्या जागी ठेवून बघा. असो..

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव Sat, 06/23/2012 - 09:20
जीवन सध्या ज्याकाहि स्वरुपात चाललय ते कसं इम्प्लिमेंट झालय याला तसही काहि महत्व नाहि. सूर्य, पृथ्वी, वातावरण, बहुपेशीय जीव, शरिरातील श्वसन, चयापचय इ. संस्था... हे जर असं नसतं तर इतर दुसर्‍या कुठल्या पद्धतीत असतं. पृथ्वीवर जो पहिला माय्क्रोओर्गॅनिझम उल्कापाताने आला, वा इथेच तयार झाला तो श्वास घेत नव्हता. आजही समुद्र तळातील जीव श्वास घेत नाहि. श्वसन हि केवळ उर्जेच्या ज्वलनासाठी ऑक्सीजन सप्लाय करणारी व्यवस्था आहे बस्स. त्यात रहस्यमय असं काहि नाहि. उद्या जर विद्युतचुंबकीय बलाने लोह धातुचे विघटन होऊन उर्जा वहन करणारे जीव सापडले तर आश्चर्य वाटायला नको. मग अश्या जीवांना बुद्धाचे तत्वज्ञान कधिच उमजणार नाहि.. ते त्यांच्या कामाचेच नाहि. हा सृष्टीचा उपद्व्याप असाच निरंतर चालु राहिल, वा मानववंश असाच अगणीत काळासाठी पृथ्वीवर वावरेल अश्या भ्रमात कोणि नाहि. लाखो वर्षे पृथ्वीवर राज्य करणारे डायनासोर जर ५० वर्षात आपले अस्तित्व गमाऊन बसले तर मानव का नाहि... पृथ्वीवर एखादा ग्रह आदळेल आणि इथलं जीवन नष्ट होईल कि नाहि हा प्रश्नच नाहि.. ते केंव्हा होईल हाच काय प्रश्न. थोडक्यात काय, तर जीवनाची क्षणभंगुरता माणुस जन्मल्यापासुन आपल्या खिश्यात घेऊन फिरतो. त्यात काहि रहस्य वगैरे नाहि. रहस्य असेलच तर हे कि अक्षय, अखंड, निराकार वगैरे जे जीवन आहे त्याने कुठल्याही क्षणभंगुर देहाच्या माध्यमातुन प्रगटच का व्हावे? जर ते तसं झालय तर त्या सत्याचा स्विकार का करु नये? कुठल्यातरी देहाच्या माध्यमातुन जर संवेदना, चेतना आवर्तने घेतेय , आणि ते देखील स्वतःच्या मर्जीने... तर त्याच माध्यमातुन तिला का स्विकारु नये? राहिला प्रश्न पैश्याचा... तर त्याला कितपत महत्व द्यावे यासाठी आपल्या गरजेची समज असली म्हणजे पुरे. पोट भरेपर्यंत अन्नाच्या क्वांटिटीचे महत्व. त्यानंतर शांतपणे तृप्त होऊन विडा चघळायचा. सो सिंपल. पैशाची कारण मिमांसा इथेच संपते.

विजुभाऊ Sat, 06/23/2012 - 11:26
पैसा काय किंवा श्वास काय दोन्ही नश्वर. हॉस्पिटल मध्ये दाखल करुन घेतले नाही म्हणून फारसे काही बिघडत नाही. कदाचित त्यामुळे वेदनायमय जगणे लवकर आटोपेल. मेले तरी फारसे बिघडत नाही ( खरेतर काहीच बिघडत नाही). आपण जगायलाच हवे हातरी अट्टाहास कशाला. ( हे विधान सरकॅस्टिक किंवा अतीखरे .अशा कोणत्याही अर्थाने घेतले तरी चालेल)

मी जगतो तेच बरोबर असा रोख नाहीये, लिहिण्याच्या शैलीमुळे तसं वाटत असावं, जगण्याचा एक वेगळा अँगल सांगून पाहतोय. आणि मजा म्हणजे तो कल्पनाविलास नाहीये, पराकोटीच्या श्रीमंतांबरोबर (ज्यांच्या पुढल्या पिढीलाही पैश्यासाठी काही करायची गरज नाही) उठबस असतांना, मनात कोणतीही इर्ष्या न ठेवता, त्यांचे आर्थिक व्यवहार अत्यंत जवळून पाहून, त्यांच्याशी हार्दिक संवाद साधल्यावर, त्यांना ही जे मंजूर आहे पण साधता येत नाहीये ते सांगतोय. विरोधी विचारांचा समावेश त्यात झालाय त्यामुळे त्या विचारसरणीला मी समजावून घेतलं नाहीये असं नाही. ज्यांना पटत नाहीये त्यांना पटावं हा उद्देश नाहीये, ज्यांना पटलय त्यांना साहस लाभावं म्हणून लिहिलय. आता पुन्हा मी स्वतः फकिर नाही की फकिरी शिकवत नाही, पैसा काय चिज आहे याचा पुरेपूर अंदाज आहे आणि वाचकांच्या आर्थिक परिस्थितीचाही अंदाज आहे, त्यामुळे ज्यांना जमवायची इच्छा आहे अश्यांना जमावं म्हणून हा प्रपंच आहे. अध्यात्मात आजवर असं घडलं नाहीये, एकतर एकांगी विचार केला गेलाय किंवा मग इतकी ऐयाशी केली गेलीये की सामान्याला स्वच्छंद अप्राप्य भासतोय पण वास्तविकात तो आपल्या प्रत्येकाला गवसू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

नाना चेंगट Sat, 06/23/2012 - 11:38
पैसा तो खुदा नही मगर खुदासे कम नही ! शिकले सवरलेले लोकं म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते ! आपण पुराणमतवादी, त्यात वयाने लहान असल्याचे नुकतेच सर्टीफिकेट मिळाले आहे :) आम्हाला पृथ्वी पैशाभोवतीच फिरतांनाच आजवर दिसली आहे. पोट जेव्हा भरलेले असते तेव्हा तत्वज्ञान सुचते असे आमचे प्रामाणिक मत आहे. कुणीही असो त्याला पैशाशिवाय जगणे अवघड आहे. कुणी स्वत:च्या पैशावर जगतो कुणी दुसर्‍याच्या ! पैशाशिवाय जगायचे तर वैदिक ( ;) ) काळात जावे लागेल. ते शक्य आज दिसत नाही. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. आपण आज काय आहे ते पाहू. आज पैसा लागतो. आणि तो पुरेसा लागतो. पुरेसा म्हणजे किती हे प्रत्येकाचे अनुमान वेगळे. ना बाप बडा ना भय्या !! सबसे बडा रुपय्या !!! असो.

In reply to by नाना चेंगट

>पोट जेव्हा भरलेले असते तेव्हा तत्वज्ञान सुचते असे आमचे प्रामाणिक मत आहे = येस, पोट भरलेल्या लोकांशीच बोलतोय याची पुरेपूर खात्रीये!

In reply to by नाना चेंगट

कवितानागेश Sat, 06/23/2012 - 12:49
कुणी स्वत:च्या पैशावर जगतो कुणी दुसर्‍याच्या !>> एकदम ढळढळीत वैदिक... आपले ते हे,.. वैश्विक सत्य! :) मला असं वाटते की खरं तर आधीच पैसा भरपूर असावा. मग तो कसा महत्त्वाचा नाही हे नीट कळते. तोपर्यंत कळतच नाही. असो. पैशाचे सोंग आणण्याबद्दल कुणी मर्गदर्शन करेल काय? :P

निश Sat, 06/23/2012 - 12:15
संजय साहेब, मुळात आपण भुतकाळ लक्षात ठेऊन भविष्यकाळाच नियोजन आज मधे करत असतो. आता हे बघा पैसा महत्वाचा नसता तर तुम्ही आंतरजालावर लिहित झालाच नसता कारण आंतरजाल चालु ठेवण्यासाठि पण पैसाच लागतो. आज मध्ये जगण्याच्या हव्यासापायीच युरोप, अमेरीकेत वित्तिय संकट आली आहेत. तिथे भविष्यकालीन तरतुदींचा फारसा विचार केला गेला नव्हता हे आज उघड सत्य आहे. तशीच काहीशी आपल्या कडे दशा आहे. आज मध्ये जगण्याच्या नादात सरकारने भविष्यकालिन येणार्‍या वित्तिय संकटांमधुन बाहेर पडण्यासाठि तरतुद करण्यात फारस लक्ष दिल नाही व त्याचा परिणाम आजचि भिषण महागाई. त्यामुळे उद्याचा विचार हा करावाच लागणार आणि त्याच मुळे आज मध्ये जगताना पैशाचा विचार न करता मनसोक्त आनंदी जगण कठिण आहे.

In reply to by निश

कालचं स्मरण करतो. मी पैसा महत्त्वाचा नाहीये आणि मिळवू नका असं कधीही म्हटलेलं नाही, तो दुसर्‍या स्थानावर आहे, तुम्ही प्रथम आहात इतकंच सांगतोय. पैसा मानवी कल्पना आहे, तो निव्वळ कन्विनियंस आहे, तुम्ही सार्थ आहात आणि ही इतकी उघड गोष्ट आहे की यावर विवाद कसा होईल? तुम्ही पैश्यामागे ओढले जाऊ नका, ती तुमच्या जगण्याची महत्त्वाची दिशा होऊ देऊ नका. आनंद ही दिशा करा कारण अस्तित्वाला पैसा काय आहे ते माहिती नाही, ते आनंदाच्या दिशेकडे उन्मुख आहे, स्वच्छंद हा त्याचा स्वभाव आहे. आणि स्वच्छंद म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही, ते फक्त प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असल्यासारखं जगणं आहे.

निश Sat, 06/23/2012 - 13:37
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत मान्य पण.. मुळात ज्याना हे सांसारीक पाश आहेत ती लोक उत्कट पणे स्वच्छंदपणे नाही जगु शकत. त्यातही एखाद्यावेळी पुरुष जगु शकतीलही, तसे ते जगत असतीलही पण घरातील स्त्रि असे आयुष्य नाही जगु शकणार. आपला समाज त्याना तस जगुच देणार नाही. पैसा कीती महत्वाचा असतो ते हॉस्पिटल मध्ये उपचाराविना पडुन असलेल्या लोकाना विचार त्याना विचारल तर ते सांगतिल पैसाच महत्वाचा कारण पैशाच मोल त्याना कळलेल असत. पैसा असेलच तर प्राण वाचणार असतो. श्वास टिकणार असतो. प्रत्येक युगाची एक गरज असते ह्या युगाची गरज पैसा हाच आहे. पैसा किती महत्वाचा ते पैशा अभावी लग्न मोडलेल्या मुलींच्या आईवडिलाना विचारा ते सांगतिल पैशाच मोल. तुम्ही रिक्षावाल्याच उदाहरण दिल आहेत वर एका प्रतिसादात तोच रिक्षावाला तुमच्याकडे पैशे आहेत म्हणुन तुम्हाला रिक्षात बसवतो आहे हे विसरु नका. वर पेठकर सर म्हणाले तसे ए़खाच्याची गरज ती कदाचीत दुसर्‍याची चैन असु शकेल.

In reply to by निश

आता आहे का कुणी धारातिर्थी? तुम्ही प्रसंग बघा, जवळचे पैसे बघा आणि घाला मेळ, बस इतकंच. नसतील पैसे तर पर्याय शोधा कारण तुम्ही कितीही जमवले तरी ऐनवेळी ते पुरेसे असतीलच असं नाही आणि आता आहेत ते सुद्धा उद्याच्या काळजीनं आपण मनसोक्त वापरतोय कुठे ? शिल्लक पैसा फक्त दिलासा आहे मग ते कुणाकडे कितीयेत यानं काय फरक पडतो? मी उधळा म्हणत नाहीये पण एक गोष्ट लक्षात घ्या, एका अर्थानं न वापरलेला पैसा व्यर्थ आहे. असो, अजून थोडं सांगायचं तर अस्तित्वाची मर्जी आपल्याकडे असलेल्या पैश्यापेक्षा कधीही जास्त पॉवरफुल आहे आणि प्रत्येक घटना समग्र अस्तित्वाच्या सर्व घटकांचा वर्तमानात घडलेला परिणाम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

निश Sat, 06/23/2012 - 15:14
संजय क्षीरसागर साहेब , परत तेच नाही चाललय. तुम्हाला माझा मुद्दा कळलाच नाही आहे. तुमच मत हे सांगायला ऐकायला बर वाटत पण जेव्हा पोटाला भ्रांत पडते तेव्हा हे जगणच ओझ वाटु लागत. मुळात हे अस वागल पाहीजे ते तस वागल पाहीजे हे सांगण बरोबर आहे पण तस वागण महा कठीण आहे. कारण तस करण बर्‍याच वेळा दुसर्‍याला त्रासदायक असु शकत. देहाचे भोग हे सुटत नाहीत कधीच.एक करुन बघा ह्या पावसात एकदम भारि पावसात छत्री न घेता बाहेर पडा खिशात एक मोबाईल फोन व १०० रुपयाची नोट असु द्या. बघा काय होत ते पावसात भिजण्याचा आनंद लुटण्याऐवजी तुम्ही भिजणार्‍या १०० रुपयाच्या नोटेची व मोबाईल फोनची काळजी करत बसाल. करुनच हे बघा ह्या पावसात.

गोंधळी Sat, 06/23/2012 - 15:49
पैश्यांच्या मागे लागत नाही म्हणुनच मराठी माणुस श्रीमंतां मधे व उद्योगांमधे मागे आहे. असे वाटत नाही का? जास्त पैसा कमवणे हा गुन्हा आहे का? तुम्ही टिपीकल मराठी माणसा सारखे बोलत आहात. च्यामारी तो काल्चा धोनी आमच्या सचिनच्या पुढे गेला.खुप जळ्जळ झाली.

निशसर, मी सेलफोन वापरत नाही आणि पाऊस आला तर कोणीही प्रथम नोटांची काळजी घेईल पण मुद्दा तो नाहीये. तुम्हाला आणि गोंधळींना उपयोगी होईल असा एक जोक सांगतो. एकदा एक हार्टपेशंट डॉक्टरकडे जाऊन येतो आणि अत्यंत खिन्न होऊन बायकोला सांगतो : `डॉक हॅज आस्क्ड मी टू जॉग अँड किप वेट अंडर कंट्रोल, ही गेव्ह युजूअल डाएट टिप्स अँड ऑल दॅट इज ओके, बट वन थींग इज वेरी डिसापॉइंटींग फॉर यू' `वॉट इज दॅट?' बायको विचारते `ही हॅज आस्क्ड मी टू रिड्यूस आवर सेक्स लाईफ टू हाफ' `वीच हाफ डिअर, ...थींकींग ऑर टॉकिंग?' असय ते! विषयाचं चिंतन आणि मनन कमालीच्या बाहेर आहे पण तीनशे पासष्ठ दिवसातला लिटरल डूइंग पार्ट काढला तर तो चोवीस तास भरेल की नाही शंकाय. जस्ट सी फॉर योरसेल्फ, शुचिच्या `तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते, ची द्विशतकाकडे वाटचाल चालूये! आणि तीच कथा पैश्याचीये, पैशामागे दुनिया इतकीये आणि पुढे लागणार्‍या पैशाच्या इतक्या बेफाम कल्पना आहेत की बोलता सोय नाही पण रोजच्याला लागणारा पैसा अत्यंत माफक आहे आणि आपण इंटरनेटवर आहोत याचा अर्थच त्याची सोय झालेली आहे. मी एका शब्दानं पैसे कमावू नका म्हटलं नाहीये, फक्त ती जीवनाची मुख्य दिशा होऊ देऊ नका आणि स्वतःला पैश्यावर तोलू नका इतकंच सांगतोय, त्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. जस्ट गिव अप ऑल ऑफ दॅट थींकींग ऑर टॉकिंग पार्ट ऑफ मनी, दॅट इज ऑल!

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब Sun, 06/24/2012 - 00:29
कैच्या कै! माझ्या पाहण्यात तरी २४/७ पैशाचा विचार करणारे लोकं अजुन आलेले नाहीत. ते तुम्हीच तुमच्या मनाने ठरवलंत असं दिसतंय. लोकं आयुष्य छान व्यतित करतात. ज्यांना आवड आहे ते भटकतात, खातात, पितात, वाचतात, चांगल्या दर्जाचे सिनेमे पाहतात. इ. ज्यांना दोनवेळच्या खायची भ्रांत आहे ते पैशाचा विचार करणारंच! तुम्ही उगाच जगाची चिंता करणे सोडा हा एक फुकट सल्ला.

In reply to by संजय क्षीरसागर

गोंधळी Sun, 06/24/2012 - 14:39
माझ्या मते ८०% मराठी माणसे तुम्ही सांगत आहात त्याप्रमाणेच जगत आहेत.(चाकोरीबध्द जीवन) मग तुम्ही सांगत आहात त्यात नवीन काय आहे.? मी मराठी.

In reply to by संजय क्षीरसागर

निश Mon, 06/25/2012 - 18:49
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत बरोबर असल तरी प्रत्यक्ष्य आचरणात आणण कठीण आहे. मी मागे म्ह्टल तस ज्याला प्रपंच आहे तो अस आनंदी ताणरहीत आयुष्य नाही जगु शकत. तुम्ही तस जगतही असाल पण प्रत्येकाला तस जगण नाही झेपणार ही वस्तुस्थिती आहे. कारण माणसाची गरज बदलत्या कालानुरुप बदलत गेली आहे. जेव्हा पैसा हा वापरात फार कमी होता तेव्हा माणसही त्याच्या मागे कमी लागत होती. (BARTER SYSTEM). आता जेव्हा माणसाची गरजा वाढल्या तस पैशाला महत्व आल. जे संत हल्ली च्या काळात जगायच कस , माया मोह सोडा अस सांगतात तेच हल्लीचे संत पैशाच्या मागे लागले आहेत हे ही त्रिवार सत्य आहे. लोकाना पैसा दुय्यम मानुन आनंदात जगायला सांगणारे हे हल्लीचे संत पैसा असला तरच भक्ताला बोध देतात हे खरच आहे. पैसा दुय्यम मानुन चालणारच नाही कारण आज ह्याच पैश्यावर दानी लो़कांकडून समाजाची चांगली सेवा घडते आहे. मी आ़जही म्हणतोय ह्या युगाची गरज ही पैसाच आहे. त्यामुळे मनुष्य पैसा दुय्यम मानुन निखळ जगायचा आनंद घेउच शकणार नाही. आणि पैश्याच्या मागे लागुनही निखळ आनंदाने जगता येतच की त्याच पैश्याने जेव्हा अडलेल्या माणसाला मदत करता येते व जेव्हा त्या अडलेल्या माणसाच्या चेहर्‍यावर आनंद बघुन जगता येतच की.

योगप्रभू Sun, 06/24/2012 - 03:30
संजय, तुम्ही छान आणि बरोबर लिहिलंय. मथितार्थाचा खोलवर विचार केला तर ते नक्कीच पटण्यासारखे आहे. जर तुम्ही स्पष्ट शब्दात सांगताय, की 'मी एका शब्दानं पैसे कमावू नका म्हटलं नाहीये, फक्त ती जीवनाची मुख्य दिशा होऊ देऊ नका आणि स्वतःला पैश्यावर तोलू नका इतकंच सांगतोय, त्यातनं काहीही निष्पन्न होत नाही' आणि तरीही ते काहींना पटणारे नसेल तर समजावत बसू नका कारण हा थोडासा अनुभूतीचा भाग आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात हा टप्पा येतोच, असे नाही. कदाचित अनेकजण पैसा हे एकमेव ध्येय मानून जीवनभर त्याच्यामागे पळत राहातात. थोडेसे वेगळे उदाहरण - समजा हजारो भक्तगण कुण्या बाबा/बुवा/बापूंच्या मागे मुक्ती/मनःशांतीसाठी धावताहेत आणि त्यांना एखादा शहाणा माणूस सांगू लागला, की 'मित्रांनो! तुकाराम महाराज सांगून गेलेत, की 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण' एक मनाचा तळ विवेकाच्या आधारावर खोल खरवडलात तर तुम्हाला कुणा व्यक्तीकडून मुक्तीची अपेक्षाच उरणार नाही, तरीही भक्तगण त्या व्यक्तीलाच कवटाळून बसतात. तसेच काहीसे पैशाबाबत होते. पैसा खुदा नही, लेकिन खुदासे कम भी नही, हा गलका वाढत जातो. 'पैसा हे साध्य नसून साधन आहे', हे सत्य बाजूलाच पडते. तुम्ही अत्यंत सुंदर असे भारतीय तत्त्वज्ञान पुन्हा मांडत आहात. पैसा मिळवायला आपल्या संतांनी कधीच विरोध केलेला नाही. एकट्या शंकराचार्यांनी मात्र आपल्या चर्पटपंजरीमध्ये 'अर्थमनर्थ भावयनित्यं, नास्तितेषः सुखलेश सत्यम' या वचनात 'पैसा हा सर्व अनर्थाचे मूळ' असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. नामभक्तीत लीन झालेले आणि संसारही विसरलेले तुकाराम महाराज सर्वसामान्यांना एक महान अर्थशास्त्रीय सत्य सांगून गेले. 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी' तेच समर्थ रामदासांबद्दल. स्वतः प्रपंचापासून पळून गेलेला हा माणूस संसारी लोकांना सांगतो 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' आणि 'आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थविवेका' असेच मूलगामी विवेचन अधिक येऊ देत.

५० फक्त Sun, 06/24/2012 - 09:31
चांगला विषय, मुळ लेख सुद्धा चांगला अन प्रतिसाद, प्रतिवाद देखील. पैसा महत्वाचाच, पण आपल्या लोकांपेक्षा जास्त नाही, हे एकच सत्य स्विकारुन सध्या जगतो आहे किंवा जगण्याचा प्रयत्न करतो आहे, जास्तीत जास्त कधीपर्यंत जगायचं ठरवलेलं आहेच त्यामुळं हा आटापिटा किंवा कधी कधी नाटक कधीपर्यंत चालु ठेवायचं आहे हे माहित आहे त्यामुळं काळजीचा एक बराच मोठा भाग कमी झालेला आहे. तरी देखील काळजी संपत नाही, संपलेली नाही पण ती पैशामुळं आहे किंवा पैशामुळं संपेल अशी नाही, आणि हे समजतं देखील आहे पण जसं परीक्षेला बसल्यावर पुस्तकातली काही वाक्यं दिसतात अन नंतरची दिसतच नाहीत होतं तसं होतं.

प्रथम शिल्पाचे आभार मानतो कारण, >माझ्या पाहण्यात तरी २४/७ पैशाचा विचार करणारे लोकं अजुन आलेले नाहीत. ते तुम्हीच तुमच्या मनाने ठरवलंत असं दिसतंय. या वाक्यामुळे वस्तुस्थिती आणि लेखाचा उद्देश पुन्हा मांडायची संधी मिळालीये. ओशोंचं एक विधान क्वोट करतो पण त्यापूर्वी सांगतो की ज्याज्या वेळी मी ओशो क्वोट करिन त्यात्या वेळी फक्त त्या आणि त्याच विधानापुरती चर्चा व्हावी. मी त्यांच्या इतर विधानांशी सहमत असीन असं नाही आणि त्यांच्या व्यक्तीगत जीवनाला किंवा इतर काँट्रावर्सिजसाठी मला वेठीला धरु नये. ओशोंनी म्हटलय `यू आर युजींग योर लाइफ जस्ट टू टर्न टाईम इन्टू मनी' आपल्या दिवसाच्या चोवीस तासांपैकी अत्यंत प्राईम असा आठ तासांचा वेळ आपण पैसे मिळवण्यात घालवतो आणि उरलेले जागेपणीचे तास त्या आठतासांच भान ठेवून घालवतो. आयुष्याचा सगळ्यात उमेदीचा काळ अशा प्रकारे गेल्यावर एकूण मनसोक्त जगायला मिळालेले तास संपूर्ण आयुष्याच्या तुलनेत अत्यंत नगण्य ठरतात. या दृष्टीनं मी म्हटलय की आपल्या आयुष्याची मुख्य दिशा स्वच्छंद नाही तर पैसा असते. शिल्पानं म्हटलय > `ते तुम्हीच तुमच्या मनाने ठरवलंत असं दिसतंय', नाही ती वस्तुस्थिती आहे. पुढे तीनं म्हटलय >ज्यांना आवड आहे ते भटकतात, खातात, पितात, वाचतात, चांगल्या दर्जाचे सिनेमे पाहतात. इ. = स्वच्छंदचा अर्थ स्वतःच्या मर्जीनं जगणं, प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असल्यासारखं जगणं आहे. फावल्या वेळात भटकणं, कधी तरी मनसोक्त खाणं-पीणं, सिनेमा-नाटक बघणं, झोपण्यापूर्वी टीवी बघणं किंवा वाचन करणं आणि वर्षातून दोन वेळा रजा घेऊन सहली करणं नाही, ते तुमच्या `दिवसाचं काँपोझिशन' बदलणं आहे . तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा अ‍ॅटिट्यूड बदलणं आहे. स्वच्छंद हे साहस आहे (पुन्हा सांगतो मी देखील पैसे मिळवतो आणि प्रसंगाच तारतम्य बघूनच जगतो, तुम्हाला पैसे मिळवू नका असं सांगत नाहीये) पण आनंद ही जीवनाची मुख्य दिशा आहे. पैसा का आनंद हा सवाल ज्याज्या वेळी आलाय त्या वेळी आनंदाला पहिलं स्थान दिलय आणि तरीही कधीही नुकसानीतला सौदा झाला नाहीये ( आणि हे एक सीए म्हणतोय!) हे सांगायला हा लेख लिहिलाय

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब Mon, 06/25/2012 - 01:00
मला समजलंय ते असं (फक्त वरचा प्रतिसाद गृहीत धरुन) : लोकं आनंदाने जगत नाही. कधीमधी स्वच्छंद जगतात. - दिवसाचं काँपोझिशन बदलणं. अहो, पण प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या वेगळी असते. एखाद्याला जर हायकींग करण्यात आनंद असेल तर तो वेळात वेळ काढुन करणारच...नव्हे करतात. तसंच इतर बाबतीत सुद्धा. एखाद्या जवळ नसेल पैसा, पण ती व्यक्तीसुद्धा स्वतःला - कुटुंबाला आनंददायक काहीतरी करतंच असणार की. तुम्ही म्हणताय तसं आनंदाला मुख्य स्थान देउन जगणारे आहेतच...अन जे स्वत: पैसा पैसा करत जगतात त्यांना बाकी कशालाच वेळ मिळत नाही. बाकी उगाच डोकं भंजाळुन घ्यायचं नाही कारण माझं आनंदात चाललंय...म्हणुन रजा. तरी तुमचे प्रतिसाद वाचायला आवडतील. जर अगदी वाटलंच तर लिहेन.

In reply to by शिल्पा ब

इतकीच आनंदाला मुख्य स्थान देण्याची व्याख्या आहे. >बाकी उगाच डोकं भंजाळुन घ्यायचं नाही कारण माझं आनंदात चाललंय...म्हणुन रजा. = धन्यवाद!

प्रभाकर पेठकर Mon, 06/25/2012 - 01:15
'ह्या विषयावर बरेच चर्वितचरण झाले आहे आणि आता हा धागा वाचनमात्र करावा' असे ज्यांना ज्यांना वाटते आहे त्यांनी त्यांनी हात वर करावा....

In reply to by संजय क्षीरसागर

प्रभाकर पेठकर Mon, 06/25/2012 - 09:21
आपण नोंद घेतलीत हे काय कमीये वरील चर्चा प्रस्तावातून, प्रतिसादांमधून काय नोंदी घ्यायच्या त्या मी घेतल्याच आहेत. नेहमीच घेत असतो. मुद्दे संपल्यावर आपण वैयक्तीक शेरे बाजीवर उतरला आहात. ह्यावरूनही एक नवी नोंद घेतली आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

या आपल्या व्यक्तिगत प्रतिसादापासून सुरुवात आहे आणि नंतरचे सर्व प्रतिसाद हे त्या अनुषंगानं आलेले उपप्रतिसाद आहेत. मला वैयक्तिक शेरेबाजीत स्वारस्य नाही पण माझ्याकडे प्रत्येक प्रतिसादाचं उत्तर आहे आणि मी अत्यंत सामान्य माणूस आहे तथाकथित अध्यात्मिक संत वगैरे नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रभाकर पेठकर Mon, 06/25/2012 - 12:05
'हा धागा वाचनमात्र करावा' असे मी संपादक मंडळास कळविलेले नाही. माझ्या प्रतिसादातील आपणास सोयिस्कर असा अर्धवट भाग आपण उद्घृत करीत आहात. माझा संपूर्ण प्रतिसाद, 'ह्या विषयावर बरेच चर्वितचरण झाले आहे आणि आता हा धागा वाचनमात्र करावा' असे ज्यांना ज्यांना वाटते आहे त्यांनी त्यांनी हात वर करावा....' असा आहे. त्यात मी, माझे जे मत बनले आहे (बरेच चर्वितचरण) तेच इतरांचेही बनले आहे का? ह्यावर त्यांची मते मागविली आहेत. त्यात व्यक्तिगत काय आहे? हे धाग्यासंबंधी आहे, हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. आणि तो धागाही 'उडवून टाकवा' असे मी मत प्रदर्शन केले नाही. उलट, तो 'वाचनमात्र' ठेऊन आपले अमुल्य मार्गदर्शन सर्व मिपाकारांच्या नजरेसमोर राहावे हा उदात्त विचारच मांडला आहे. त्यावर, 'प्रतिसाद देऊन झाले असतील तर पोस्टवर न येणं हा सोपा पर्याय निवडावा' हा अनाहूत सल्ला आपण व्यक्तीशः मला दिलेला आहे. तो सर्व सदस्यांसाठी नाही. कारण शीर्षकात 'विथ ड्यू रिस्पेक्ट सर' अशा दांभिक शब्दयोजनेतून तो एका व्यक्तिला, 'मला' दिलेला आहे. तरीही राग्/अवमान न मानता काय सांगता................धन्यवाद. (वरील उपदेशाची सर्वानींच नोंद घ्यावी ही विनंती). ह्या माझ्या उपप्रतिसादात आपला 'वैयक्तिक सल्ला' मी 'सार्वजनिक' केला आहे. तरीही पुन्हा 'आपण नोंद घेतलीत हे काय कमीये' असे म्हणत आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात. वारंवार वैयक्तिक पातळीवर उतरून पुन्हा वर 'मला वैयक्तिक शेरेबाजीत स्वारस्य नाही' असेही विधान करता. कलीयुग कलीयुग म्हणतात ते हेच असावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

आणि अजूनही तो आदर आहेच. जिथे चर्चा व्यर्थ आणि निरर्थक होते, सदस्यात व्यक्तीगत शेरेबाजी होऊन चांगल्या पोस्टची वाट लागण्याची शक्यता निर्माण होते तिथेच ती पोस्ट वाचनमात्र केली जाते हे मला सांगायला लागू नये. ही पोस्ट निस्सारित होणं अशक्य आहे तस्मात आपण तशी विनंती करुन उपयोग नाही पोस्टवर अजून अत्यंत विधायक प्रतिसाद येतायत आणि विचारणा होतेय यात तिचं महत्त्व अधोरेखित आहे माझ्या दृष्टीनं प्रत्येक युग सुवर्णयुग आहे आणि ते माझ्या चाहत्यांसाठीही व्हावं या प्रामाणिक इच्छेनं लिहितोय.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Mon, 06/25/2012 - 14:29
>>माझ्या दृष्टीनं प्रत्येक युग सुवर्णयुग आहे आणि ते माझ्या चाहत्यांसाठीही व्हावं या प्रामाणिक इच्छेनं लिहितोय. हे कोण लोक ब्वॉ?

In reply to by बॅटमॅन

किंवा इतर जरी कलियुग आहे असं म्हणत असले तरी आपण आपलं आयुष्य बदलू शकतो असा विश्वास असणारे सर्व.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रभाकर पेठकर Mon, 06/25/2012 - 15:06
वयाचा मान राखण्याचा प्रश्न येतोच कोठे? मुद्यांना धरून बोला म्हणजे झाले. आणि तसेही वयाचा मान राखताना आपल्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीस (तुम्ही म्हणता म्हणून) आपण लहान असताना (तुम्ही सुचविता आहात म्हणून) काय सुचविता आहात? मिपावर वावरायचा सोपा पर्याय? तुमचे शब्द आणि भावना ह्यात जमिन्-अस्मानाचा फरक आहे. जिथे चर्चा व्यर्थ आणि निरर्थक होते, सदस्यात व्यक्तीगत शेरेबाजी होऊन चांगल्या पोस्टची वाट लागण्याची शक्यता निर्माण होते तिथेच ती पोस्ट वाचनमात्र केली जाते हे मला सांगायला लागू नये. जिथे मुद्दे संपतात आणि शाब्दिक कोलांट्या उड्या सुरु होतात तिथेही धागा वाचनमात्र करावा अन्यथा इतर सदस्यांचा मुल्यवान वेळ वाया जातो. ही पोस्ट निस्सारित होणं अशक्य आहे तस्मात आपण तशी विनंती करुन उपयोग नाही माझे प्रतिसाद पुन्हा वाचा. मी अशी कोणालाही विनंती केलेली नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

>इतर सदस्यांचा मुल्यवान वेळ वाया जातो. = ज्याचा मूल्यवान वेळ वाया जात असेल तो पोस्टकडे दुर्लक्ष करतो आणि इतरांचा वेळ मी घेतोय असं अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्सना वाटेल तेव्हा ते सदस्यांचा सल्ला मागणार नाहीत. वयाचा मान राखावा असं माझं मत आहे कारण शब्दांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची आहे आणि लेखनापुरतं बोलायच झालं तर मी माझ्या सर्व लेखनाची जवाबदारी घेऊन प्रतिसाद देतो आहेच

वीणा३ Mon, 06/25/2012 - 04:11
तुम्ही वरती एका प्रतिसादात म्हटलंय १. प्रत्येक रात्र शनिवार आणि हरेक दिवस रविवार असल्यासारखं जगणं आहे. - थोडीशी असहमत. मला असं वाटत कि सोमवार ते शुक्रवार कामाला जायला लागतं म्हणून शनिवार रविवार मजेचे वाटतात. मी काही वैयक्तिक कारणामुळे नोकरी सोडली. सोडल्यावर खरोखर रोजच रविवार होता. १ महिना मजा आली, नंतर खूपच कंटाळा आला. मला वाटतं कि पैसा हे एक खूपच चांगलं ध्येय (motivation ) आहे, ज्याने तुमच्या आयुष्याला दिशा मिळते. तुम्हाला जर थ्री idiots movie सारखा संदेश द्यायचा असेल कि पैशाच्या मागे लागू नका आपल्या आवडीचं (स्वछंदी जगणं) काम करत राहा म्हंजे पैसे मिळतीलच तर ठीक आहे. पण कामच करू नका (शनिवार-रविवार) आणि पैशाचा विचार पण करू नका तर जरा विचित्र वाटतंय.

In reply to by वीणा३

वीणा, प्रथम चर्चेला पूर्णतः नवीन परिमाण दिल्याबद्दल आभार. स्वातंत्र्य मिळवणं एक वेळ सोपय पण उपभोगणं दुष्पुर आहे. ज्यांच्याकडे पुरेशी सधनता आहे त्यांना स्वच्छंद नकोय असं नाही, त्यांच्याकडे जीव रमवण्याचे पर्यायच नाहीत. आपल्या स्वच्छंद जगण्याच्या बहुतेक कल्पना परावलंबी आहेत कारण स्वावलंबी होण्यातच आयुष्याचा इतका मोठा वेळ गेलाय की स्वतःला त्या दिशेनं डिवेलप करता आलेलं नाहीये. सहलीला गेलो तर आपल्याला पोहता येत नाही, टेबलटेनिस टेबल असतं पण आपल्याला खेळता येत नाही, कराओके विथ हायटेक साऊंड सिस्टम असते पण गाता येत नाही, तिथे सिंथेसायजर असला तर वाजवता येत नाही, देखणी योगा प्लेस असते, एकसोएक गॅजेटस असतात पण आपल्याला योगात रस नसतो, आपण ट्रेडमिलवर घामाघूम होऊ स्तोवर धावायला उत्सुक नसतो, आपण रुममधे येतो आणि टीवी लावतो किंवा मग घरनं आणलेलं पुस्तक वाचायला काढतो आणि मग पुन्हा हुरुप येण्यासाठी इकडेतिकडे फोन करायला लागतो. आपण कुठेही गेलो तरी तेच असतो त्यामुळे इथलेच कार्यक्रम तिथे राबवतो. तुम्ही महिन्यात कंटाळलात याला दोन कारणं आहेत, तुमच्याकडे स्वतःला रमवायला स्वावलंबी असं काही नसेल आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकांगी पर्याय निवडला, कामाचा पर्याय बाद केलात. मी दिवस रविवार करा म्हणतो म्हणजे सकाळी उठून कार्योन्मुख होऊ नका, सॉलिड उत्साह असेल आणि संधी असेल तर बॉसला रितसर फोन करुन, कुणाची खरंच गैरसोय होत नाही हे बघून, मनसोक्त औटींगला जा. प्रत्येक दिवस सप्राइज ठेवा, आयुष्याच रुटीन होऊ देऊ नका, एकच दिवस पुन्हापुन्हा जगू नका. एक साहस तुम्हाला देतो, स्वच्छंद जगण्यानं काम टाळण्याची सवय लागत नाही उलट त्या आनंदातून निर्माण झालेल्या उत्साहामुळे काम सहज वाटतं, मजेत होतं. आणि रात्र शनिवार करा म्हणजे भोगाल तेव्हा मनसोक्त भोगा, उद्याची चिंता करु नका कारण उद्या कधी येत नाही.

गवि Mon, 06/25/2012 - 12:11
सर्व उलटसुलट चर्चा पाहून आणि पुन्हापुन्हा चारपाचवेळा मूळ धागा वाचून मला जे मनात येतंय ते लिहितो: संजय यांचा मुद्दा तात्विक आहे आणि त्यात निश्चित तथ्य आहे. पण मांडणीमुळे आणि वाचकांच्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हजमुळे त्याला वेगळे फाटे फुटताहेत. नेमकं कुठे आम्ही वाचक गोंधळतोय ते शोधायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की "पैसा दुय्यम आणि तुम्ही (आपण स्वतः) प्रथम" हा साधा सोपा सरळ मुद्दा यात आहे आणि तो तितकाच आहे. मात्र, त्याची मांडणी करताना जे जनरलायझेशन झालंय ते कंपन्यांच्या मॅनेजमेंट प्रशिक्षणातल्यासारखं झालंय. म्हणजे काय तर एसी क्लासरुममधे बसून तत्व पटतंय पण आपल्या कार्यालयातला कोणताही सिनारिओ प्रत्यक्षात (प्रॅक्टिकल) त्यामधे बसवून बघता येत नाहीये. उत्तम थिअरी मांडणीमधे उदाहरणं घेता आली तर फार चांगलं असतं पण इथे तसं करता येत नाहीये. ही मर्यादा लेखनाची की वाचकाची हे मला सांगता येणार नाही पण लेखकाचा मूळ मुद्दा खरोखर उत्तम आहे म्हणून हे काथ्या कुटणं. मी संजय यांनी दिलेल्या त्या चार गोष्टी घेतो आणि त्या उदाहरणांमधे बसवण्याचा प्रयत्न करतो. मग कदाचित गोंधळ लक्षात येईल आणि संजय यांच्या मनात वाचकांची गोची शिरकाव करु शकेल.
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात: एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.
उदाहरण घेऊन तत्वाचा कसा उपयोग होईल ते पाहण्याचा प्रयत्न : समजा माझा आजच पगार झाला. मी संध्याकाळी नेहमीची खरेदी करायला मॉलमधे गेलो. मला पीएसथ्री गेमिंग सिस्टीम दिसली. मी पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो. ती २३००० ची आहे आणि नंतर त्याचा प्रत्येक गेम २ ते ३ हजारचा आहे असं समजलं. आता साक्षात्कारपूर्व स्थितीत मी मन मारुन म्हणा किंवा आणि काही म्हणा.. तो पीएसथ्री घेतला नसता. इथेही पैसा आणि प्रसंग एकदम समोरासमोर आले होते. मी गरीब नव्हतो. त्याक्षणी माझ्या खात्यात २३००० हून जास्त रक्कम होती. पण मी "नाही" असा निर्णय घेतला. माझ्याकडचे पैसे कमी होतील आणि पुढे हवे तेव्हा ते शिल्लक नसतील अशा "पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती" या पद्धतीने मी ते खर्च केले नाहीत. बहुतांश सामान्य लोक हेच करत असतील. आता अशा स्थितीत साक्षात्कारानंतरच्या स्थितीत (साक्षात्कार हा शब्द अतिशयोक्त नाही) मनुष्याने कसं वागावं? पी एसथ्री घेऊन टाकावा ? आज या क्षणात आनंद मिळाला ना?कल को मारो गोली.? असं का आणि काही? केवळ स्पष्टता येण्यासाठी प्रश्नरूपात विचारतोय. विरोध म्हणून नव्हे.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.
पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहणं आणि आधार म्हणून पाहणं या काही विरुद्धार्थी गोष्टी नव्हेत. "उपयोगी वस्तू" ही कोणत्या क्षणी "गरजेत" रुपांतरित होईल हे सांगता येत नाही. उदा. अन्न या प्रकाराकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहिलं किंवा गरजेची वस्तू किंवा आधार म्हणून पाहिलं तरी त्यावर आपण अवलंबून नाही असं म्हणणं धाडसाचंच आहे. पैशावर अवलंबून न राहणे ही गोष्ट समाजात राहणार्‍या कोणाला शक्य आहे असं वाटत नाही. मग अशा वेळी ती संपण्याची नाहीशी होण्याची रास्त भीती किंवा कमी पडण्याची काळजी ही नाण्याची दुसरी बाजू आपोआपच बनणार. एकच बाजू असलेलं नाणं सामान्य माणूस वापरु शकत नाही. त्यामुळे तो इथेही गोंधळात पडतो.
तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!
पैसा समोर असलेल्या कारणासाठी "योग्य प्रकारे वापरणं" यातल्या "योग्य प्रकारे" या निकषात फारच जनरलायझेशन आहे. योग्य काय ते ठरवताना अपरिहार्यपणे त्याचे "परिणाम" पहावे लागतात. परिणाम या शब्दातच "भविष्यकाळ" आहे. म्हणजे निव्वळ आजच्या दिवसाचा विचार करुन असेही आपण पैशाच्या "योग्य" विनिमयाचे निर्णय घेऊन शकत नाही. वस्तुनिष्ठ निर्णय म्हणजे काय? किंमत आणि परिणामांचा /पुढे मिळणार्‍या लाभाचा (रिटर्नचा) विचार करुन घेतलेला निर्णय? म्हणजे पुन्हा संपूर्ण सव्यापसव्यानंतर आपली जुनी भविष्यकालीन "चिंता"च पुढे आली की..!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.
हा मुद्दा एक तत्व म्हणून पटण्यासारखाच आहे पण तो पटवून घेण्यात एक वाक्य उगीच कन्फ्युजन वाढवतं आहे.. "पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहो" असं शाब्दिक दृष्ट्या योग्य असलं तरी पैसा की एक "कल्पना"नाही. ते एक माध्यम जरुर आहे पण कल्पना नाही...कल्पना या शब्दात एक "अस्तित्वात नसलेली" असा अर्थ आहे. "कर्ज", "करार","नोकरी" याही संकल्पनाच आहेत पण त्या "वस्तुस्थिती" नाहीत असं म्हणता येत नाही. मी वस्तुस्थिती आहे तसाच पैसा ही देखील वस्तुस्थिती असलेली संकल्पना आहे. बाकी वाक्यांबाबतही अशा रितीने कसं (वाचकाचं) कन्फ्युजन होतंय ते दाखवता येईल. पण मला वाटतं चांगल्या मुद्द्याला फाटे फुटण्याचं मूळ शोधण्याचा मी प्रयत्न केलाय.