(पैसा सोडून बोल.. हा धागा नुकताच वाचला. तिथे प्रतिसाद फारच लांबलचक झाला असता म्हणून हा स्वतंत्र धागा)
.................................................................................................................................
आयुष्यात पुष्कळदा आपल्याला मनस्ताप देणारे अनुभव येतात. विशेषतः आपण विश्वास टाकून मित्र म्हणवणार्यांना रक्कम उसनी देतो, पुस्तके वाचायला देतो, वस्तू वापरायला देतो आणि ते त्याची किंमत ठेवत नाहीत. देणे खुशाल बुडवतात, पुस्तके लंपास करतात, वस्तू मोडतोड करुन परत देतात. आपलेच पैसे आपल्याला वारंवार मागायला लावतात. सबबी सांगतात. जे भीडस्त असतात ते ' गंगार्पणमस्तु' म्हणून त्या रकमेवर पाणी सोडतात. जे खमके असतात ते देणेकर्याचा पिच्छा पुरवतात. ज्यांच्या अंगात रग असते ते रक्कम मिळवण्यासाठी दमदाटीपासून हाणामार्यांपर्यंत मार्ग अवलंबतात.
जेव्हा आपला घामाचा पैसा कुणीतरी विश्वासघात करुन बुडवते तेव्हा स्वाभाविकपणे प्रत्येकाचे विचार असेच असतात, 'आता कानाला खडा. कुणाला उसने पैसे देणे नाही आणि कुणाकडून उसने घेणे नाही. विश्वास गेला पानपतावर. चांगुलपणा गेला खड्ड्यात. चहा प्या, चालू पडा, पैसे मागू नका. भिकारड्या! पुढच्या खेपेस उभा राहून दाखव दारात. इ. इ.' यानंतर आपण खरंच कानाला खडा लावतो. पैसे मागणार्या प्रत्येकाकडे तिरस्काराने बघू लागतो. 'मला जरा थोडी नड होती' इतके प्रास्ताविक करणार्यापासून काही सबब सांगून दूर पळतो. यात चुकीचे काहीच नाही. साधे आपले पुस्तक वाचायला गेले तर परत येत नाही मग रकमेचे तर सोडून द्या.
पैसा सोडून बोल.. हा धागा आणि मिपाकरांच्या त्यावरील स्वाभाविक प्रतिक्रिया वाचून मला वाटले, की माझ्या मनातला एक अंतर्संघर्ष इथे मांडावा. पुस्तके लंपास होणे, किरकोळ हातउसन्या दिलेल्या रकमा बुडणे, अगदी समाधानपूर्वक काम करुन दिले तरी पैसे देण्याच्या वेळी काही क्लायंटनी फोन टाळणे, रक्कम बुडवणे हे अगदी आजही माझ्याबाबत सुरु असते. दरवेळी मी कानाला खडा लावतो आणि मान वळताच तो खडा पडून जातो. मी शहाणा झालेलो नाही. हिंदी चित्रपटात जसा संवाद असतो, की ' भले १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये', तसे मी घोकत असतो, 'भले १०० जणांनी माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला तरी चालेल, पण एका जेन्युईन गरजूला माझ्याकडून हिडीसफिडीस करण्याची वेळ आणू नकोस देवा!' असा वेडेपणा मी जाणूनबुजून का करतो, याच्या उत्तर शोधायला लागले तर ज्या घटना आठवतात त्या तुमच्यापुढे मांडू इच्छितो.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पत्नीने मला नवा मोबाईल भेट दिला होता. त्या काळात मोबाईल ही नाविन्याची गोष्ट होती. कॉल रेट आतापेक्षा जास्त होते आणि मोबाईलवर बोलणार्याकडे लोक कुतुहलाने बघत. पण लवकरच या मोबाईलमुळे माझ्या डोक्याला ताप व्हायला लागला. प्रत्येकजण मोबाईल बघायला मागायचा आणि कुतुहलापोटी कॉलपण करुन बघायचा. त्यामुळे मी कानाला खडा लावला. 'अरे माझा मोबाईल म्हणजे काय फुकट फोन वाटला का?' मी रोखठोकपणे सांगू लागलो, 'सॉरी! फोन मागू नका.' असाच एकदा गावाला चाललो होतो. बसमध्ये बसताना पत्नीचा फोन आला, 'काय रे? मिळाली का बस?' वगैरे... संभाषण संपल्यावर शेजारी घाम पुसत उभ्या असलेल्या एका बाईने मला तत्परतेने विचारले, 'तुमच्या मोबाईलवरुन एक फोन केला तर चालेल का?' मीही तत्परतेने 'सॉरी' म्हटले. तेवढ्यात मागच्या सीटवरच्या एकाने आपला मोबाईल काढला आणि त्या बाईला म्हणाला, 'घ्या ताई. यावरुन फोन करा. नंबर लावता येतो का मी लाऊन देऊ?' त्या बाईने सांगितलेला नंबर त्याने प्रेस केला आणि मोबाईल तिच्या हातात दिला. त्यावर ती बाई एकच वाक्य बोलली, ' अरे दादा! अप्पांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. मी बसमध्ये बसलीय. तू लगेच निघ.' मी सुन्न झालो. तिने एक साधीशी मदत मागायला आणि मी नाही म्हणायला एक गाठ पडली होती. मी ओशाळलो. पण आता काही करता येत नव्हते. मी बसमधून खाली उतरलो आणि उभ्या असलेल्या त्या बाईला माझी जागा रिकामी करुन दिली. तेवढीच क्षमापना.
हा ओशाळलेपणाचा बोळा नंतर अनेक वर्षांनी निघाला. भिडे पुलाजवळ नदीकाठच्या रस्त्यावर एकदा वेगात येणार्या एका तरुणाने आमच्यापुढे स्कूटीवर असलेल्या एका आजोबांना धडक दिली. ते ज्येष्ठ नागरिक खाली पडले. किरकोळ खरचटले, पण मुका मार लागल्याने त्यांना पाय हलवता येत नव्हता. मी त्यांच्याजवळ जाताच ते म्हणाले, 'मी ठीक आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे का?' मी त्यांना तो दिला. त्यांनी घरी फोन केला. मुलाला बोलावले. डॉक्टरांकडे जाताना मला 'धन्यवाद' म्हणाले. याखेपेस मला थोडे बरे वाटले. पूर्वी मनात रुतून बसलेली बोच कुठेतरी देवापर्यंत पोचली असावी बहुतेक.
आणखी एका खेपेस मी कानाला खडा लावला होता. कामाच्या ठिकाणी एका शिपायाने 'घरच्या अडचणीमुळे मुलाची शाळेची फी भरता येत नाही' असे सांगितले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते चिमणे लेकरु तरळले आणि मी त्याला फीची रक्कम दिली. पुढे त्या माणसाला दारुचा नाद असल्याचे आणि तो नव्या माणसाकडून अशाच सबबी सांगून पैसे घेत असल्याचे कळले. खूप वाईट वाटले. मी निर्धार केला, 'आता कुण्णाला म्हणून पैसे द्यायचे नाहीत.' पण दोनच वर्षांपूर्वी घडलेल्या एका सत्य प्रसंगामुळे माझ्या कानाचा खडा पडून गेला.
आटपाट नगर होतं आणि त्यात एक गरीब ब्राह्मण होता, अशा कहाण्यांवर आज अनेक लोक तुटून पडतात. 'ब्राह्मण आणि गरीब? अहो चांगला सुखवस्तू आहे की हा समाज. त्यांना कसली आलीय मदतीची गरज?' असे उपरोधाने म्हणतात. पण आजच्या काळातील एका गरीब ब्राह्मण कुटूंबावर ओढवलेला प्रसंग मला बरेच काही शिकवून गेला. पुणे जिल्ह्यातील एका गावात हे चौकोनी ब्राह्मण कुटूंब राहते. ते दरिद्री नाही, पण गरीब या श्रेणीत मोडणारे. कर्ता पुरुष सामान्य नोकरी करणारा. घरात पत्नी, शिकणारा तरुण मुलगा व मुलगी. विशीची ही मुलगी एकदा इमारतीतून जिन्यावरुन येताना तिला चक्कर आली आणि दुर्दैवाने ती इमारतीच्या बाहेर दोन मजले उंचीवरुन पडली. कमरेतून जवळजवळ पंगू झाली. पुण्यात एका रुग्णालयाने तिच्यावर मल्टीपल सर्जरी कराव्या लागतील आणि उपचारांचा खर्च पाच लाख रुपये येईल, असे सांगितले. एकतर संसार, दोन्ही मुलांची शिक्षणे आणि हा शस्त्रक्रियेचा न पेलवणारा खर्च. त्यांनी रुग्णालयाला विनंती केली. तेथील डॉक्टरांनी मदतीच्या भावनेतून सर्व खर्च काटछाट करुन अखेर किमान साडेतीन लाख रुपये तरी उभे करावे लागतील, असे सांगितले. आता हे पैसेही ते वडील कसे उभे करणार होते? त्यांनी कसेबसे लाखभर रुपये जमवले होते. ही घटना माझ्या नातलगांनी मला सांगितली. मला वाटले, की कितीतरी सेवाभावी संस्था, संघटना, विश्वस्तनिधी असतात. तिला मदत मिळून जाईल. किमान ब्राह्मण समाजातील लोक तरी आपल्यातील गरीबाच्या मदतीला धावतील. मग मी आणि आमच्या चार परिचितांनी प्रत्येकी पाच हजार रुपये अशी पंचवीस हजार रुपये रक्कम दिली व त्यांना सांगितले, की तुम्ही असेच मदतीचे आवाहन करा. काम होऊन जाईल. इथून सुरु झाली अनुभवांची मालिका.
मुलीचे वडील त्या भागातील राजकीय नेत्याला भेटले. त्याने स्वतः मदत करायचे टाळले आणि वर काही देवस्थानांच्या ट्रस्टकडे जाण्यास सांगितले. मुंबईच्या एका देवस्थानाने तातडीने दहा हजार रुपये पाठवून दिले. बाकीकडून नकार आला. ब्राह्मण समाजातील पोटजातींच्या संघटनांचा अनुभव असाच संमिश्र होता. एका संघटनेने आपल्या मुंबईतील कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज पाठवायला सांगितले. त्यांच्याकडूनही दहा हजार रुपये मदत आली. ब्राह्मणांच्या दुसर्या पोटजातीच्या संघटनेचा अनुभव सरकारी कार्यालयाप्रमाणे होता. त्यांनी मुलगी कोणत्या ब्राह्मण पोटजातीची आहे, हे विचारले आणि 'आमच्या घटनेत स्वशाखीयांखेरीज इतरांना मदत देण्याची तरतूद नाही. क्षमस्व' असे रोखठोक सांगितले. मुलीचा भाऊ म्हणाला, 'अहो शाखा कोणतीही असो. आज एका गरीब ब्राह्मण मुलीला पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे. तुम्ही नियमांना अपवाद करु शकत नाही का?' त्यावर संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, ' सॉरी. माझा नाईलाज आहे.' व्यक्तीगत पातळीवर अनेकांपर्यंत मदतीचे आवाहन पोचवले. गंमत म्हणजे कोणत्यातरी आपत्तीच्या वेळी पेपरमध्ये आपले नाव छापून यावे म्हणून मदत देणारे लोक सगळे ऐकून घेत. काहीजण म्हणत, ' असे पैसे मागून अनेकांनी आम्हाला फसवले आहे. आता आम्ही कानाला खडा लावला आहे.' हे असे अनुभव घेऊन उद्विग्न झालेल्या मुलीच्या वडिलांनी मदत मिळण्याची आशा सोडून दिली.
पण सगळ्याच लोकांनी मनाची दारे बंद केलेली नसतात. कधीकधी 'जिसका कोई नही उसका खुदा है यारो' हे सत्य ठरते. माझ्या नातलगांनी हा प्रसंग बोलता बोलता एका माहिती तंत्रज्ञान कंपनीतील मित्राला सांगितला. त्याने कंपनीचे मालक असलेल्या उद्योगपतींच्या सामाजिक विश्वस्त निधीकडे एक अर्ज करण्यास सांगितले. ट्रस्टच्या लोकांनी मुलीवरच्या शस्त्रक्रियेचे गांभीर्य आणि रुग्णालयाचा अहवाल तपासला आणि शस्त्रक्रियेचा सर्व खर्च धनादेशाने एकरकमी सुपूर्द केला. मुलीचे वडील प्रारंभी जमा केलेली रक्कम ज्याची त्याला द्यायला निघाले होते, पण आम्ही सुचवले, की पुढच्या औषधोपचाराच्या व फिजिओथेरपीसाठी त्यांनी ती रक्कम वापरावी. आता ती मुलगी हळूहळू बरी होत आहे.
हे सगळे मी इतक्या विस्ताराने एवढ्यासाठी सांगितले, की मित्रांनो! समाजात जसे चोरटे-भामटे असतात तसेच डोळ्यात मदतीची आर्त हाक घेऊन तुमच्यापुढे येणारे लोकही असतात. प्रत्येकवेळी मागणारा अभिनय करत असतोच असे नाही. पूर्वीच्या काही अनुभवांवरुन एकदम मनाची दारे बंद करु नका. माणसे वाचायला शिका. जरा खोलवर जाऊन तपास केलात तर कुणाच्या डोळ्यात लालसा आहे आणि कुणाला खरोखर मदत हवी आहे, हे तुम्हाला उमजेलच.
***
वाचन संख्या
5958
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
योगप्रभू साहेब, अतिशय अप्रतिम अप्रतिम लेख..
सुंदर लेख
अत्यंत सहमत.. काहीजण मुद्दाम
In reply to सुंदर लेख by स्पा
सहमत!
In reply to अत्यंत सहमत.. काहीजण मुद्दाम by गवि
विचार करायला लावणारा सुंदर
लेख अन त्यातुन दिलेला संदेश
अत्यंत हृदयस्पर्शी..
In reply to लेख अन त्यातुन दिलेला संदेश by पियुशा
अगदी सत्य अन उद्बोधक
ओ
In reply to अगदी सत्य अन उद्बोधक by सस्नेह
मना बेटा, उद्या आपल्यावर वेळ
In reply to ओ by मन१
अहो
In reply to मना बेटा, उद्या आपल्यावर वेळ by सस्नेह
सहमत...
डोळे उघडवणारा
उत्तम!
अत्यंत योग्य मत....
In reply to उत्तम! by संजय क्षीरसागर
मला व्यक्तिशः दोन्ही लेख पटले
असे लेख वाचले की मिपाकर
सुंदर लेख!
डोळे उघडवणारा लेख आवडला.
दोन्ही लेख वाचुन एवढंच म्हणेन
लेखन आवडले.
साद
लेख उत्तम पण्....
अगदी योग्य बाजू
लेख चांगला आहे. आवडला. आणि
आवडला
आणि
In reply to आवडला by नितिन थत्ते