Skip to main content

वांझोटा...

वांझोटा...

Published on मंगळवार, 13/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
बोंबला, तिच्यायला माझी बायको बायको म्हणुन जिला जीव लावला, दहा वर्षे जे तिला सोसावं लागलं ते सोसायला मदत केली, बोललो असेन एक दोन वेळा मी सुद्धा चिडुन, पण म्हणुन असं पदरचं दुखः इंटरनेटवर मांडावं, ह्या देशात कायदा आहे म्हणे की, बलात्कार झालेल्या बाईचं नाव डायरेक्ट लिहित नाहीत, मग हे कसं काय चालतं. हा काय बलात्कार नाही का, म्हणजे जे नटरंग मध्ये दाखवलं तसं झालं तरच पुरुषावर बलात्कार होतो का, बायकांची मनं जळतात, करपतात, उध्वस्त होतात आणि पुरुषाच्य मनाला काय नवी पालवी फुटते, पालीला शेपटी फुटते तशी ? हे जहरी बोल अन कुजक्या नजरा फक्त बायकांसाठी राखीव आहेत काय, त्यांना बोलवत नसतील बारश्याला अन हळदी कुंकुवाला, तसं मी गेल्यावर पण ऑफिसातले सगळे चालु असणारा पोरांच्या अ‍ॅडमिशनचा विषय एका शब्दात बदलतातच की, तेवढंच कशाला शेजारचा चोच्या, लग्न होईपर्यंत का नंतर सुद्धा बायको माहेरी गेली की माझ्याकडुन स***भी अन *च्या* च्या पिडिएफ घेउन जायचा अन आता बायकोची टेस्ट पॉझिटिव्ह आली की साला बोलायचं पण टाळतो माझ्याशी. जसं काय अन्याय ही बायकांची मक्तेदारी असल्यासारखंच बोलतात सगळेजण, बाहेरचे बोलतात ते इनडायरेक्ट ,पण जेंव्हा सख्ख्या भावानं मदतीची तयारी दाखवली तेंव्हा मला काय गुदगुल्या झाल्या असतील असं वाटतंय काय ? नाकाखाली मिशा आहेत तर डोळ्यातुन पाणी नाही आलं पाहिजे, असं शिकवणारे अण्णा असते ना, तर त्यांना सुद्धा या न उमटणा-या शिक्यासारख्या मिशांचा भिकारचोट पणा दाखवुन दिला असता, पण ते गेले म्हणुन एका वर्षात लग्न करायचं म्हणुन समोर आलेल्या दुस-याच पोरीला हो म्हणुन बसलो , पुढं हे असं काही होईल याची काय जाण होती. पहिली चार वर्षे, नोकरी पक्की नाही, शहरातला खर्च परवडत नाही, म्हणुन मारुन नेली, मग नंतर तर आमचंच काय तरी चुकतंय असं वाटायला लागलं, शास्त्रीय ते अशास्त्रीय सगळी पुस्तकं वाचुन झाली, तेवढ्यासाठी घरी पिसि घेउन रात्र रात्र भर नेट धुंडाळुन झालं, जेवढ्या रात्री पोर होण्यासाठी जागवल्या असतील त्यापेक्षा जास्त ह्यात गेल्या, नंतर आईच इथं येउन राहिली मग तर काय सगळाच आनंद होता, दर महिन्याला तारखेवर लक्ष ठेवुनच राहायची , आधीच बायकोला ते दिवस वाईट जायचे त्यात आधी रडगाणं मग बायकोचं सुरु. मग वैदु, आयुर्वेद, गव्हांकुराचा रस अन कसचं काय सुरु केले, घरच्या विझत चाललेल्या दिव्याचा धुर बिल्डिंगमध्ये पसरला होता, आणि मग हे प्रकरण जास्तच पेटलं. हिच्या डोक्यात काय म्हणे तर आपण मुल दत्तक घेउ, आपलं नसलं तरी काय झालं, त्याला आपलं करु, लहान ५-८ महिन्याचं असलं की त्याला काही कळत नसतं, त्याला एवढं प्रेम देउ की त्याला जन्मभर बाकी कुणाची आठवणच नको यायला. थेरी बरी वाटली, पण प्रात्याक्षिक कितीतरी जास्त अवघड असतं, तसं हे सगळीकडंच असते, करण्यापेक्षा बोलणं जास्त सोपं असतं, जेंव्हा एकदोन अनाथाश्रमात गेलो, तेंव्हा पहिल्यांदा तर आमच्यावरच संशय घेतला, मग आर्थिक परिस्थिती चांगली आहे सिद्ध करा, सामाजिक परिस्थिती चांगली आहे सिद्ध करा, बायकोच्या डोक्यावर मुल नसण्यानं परिणाम झालेला नाही, तिची मानसिक स्थिती बिघडलेली नाही ह्याचं प्रमाणपत्र आणा, एवढ्या भानगडी की आम्ही जन्माला येउन कुणाला जन्माला घालु शकत नाही हा या जगातला सग़ळ्यात मोठा गुन्हा आहे असं वाटायला लागलंय, त्यात पुन्हा हिचं, आपलं नसलं तरी काय झालं त्याला आपलं करु, असा कंटाळा आलाय ना याचा. अरे जे पोर या जगात आलं ते कुणाच्या तरी नादानपणातुन आलंय की कुणाच्या तरी पापातुन की कुणाच्या भीतीतुन काय माहीत, आणि ते सोडलंय का ह्याची काय माहिती आपल्याला ? अशा सोडलेल्या पोरांचं काय होतं ते महाभारतानं कर्णाच्या रुपात दाखवुन दिलेलंच आहे, आणि त्याची अवस्था तो अभेद्य कवच कुंडलांसहित जन्मला तेंव्हाची, आम्हाला जे मिळेल, त्याला अनाथाश्रमाच्या लोकांनी पल्स पोलिओ तरी दिलंय का नाही कुणास ठाउक. असंच एक लेकरु, ते आपण घरी आणायचं, त्याला आपलं म्हणायचं, आपलं पोर म्हणजे काय फक्त आपलं रक्त मांस नसतं, तर आपले संस्कार, आपली बुद्धी, आपल्या भावना घेउनच जन्माला येतं ते. उगा आवडलं म्हणुन पोर घरात आणायला काय ते कुत्र्याचं पिलु आहे, आणलं, दुध पाजलं, फिरायला नेलं, बस म्हणलं की बसतंय, भुंक म्हणलं की भुंकतंय. आता आपलं मायेचं लेकरु असावं असं मला पण वाटतंय, मला बाबा म्हणावं, त्याच्या चिमुकल्या हातात बोटं दिल्यावर झोपेत असुन पण त्यानं ती घट्ट धरावीत, त्याचा हात हातात धरुन गालावर फिरवावा आणि मग बायकोनं ओरडावं, 'दाढी टोचंल त्याला रडेल ते ' , दुध पाजुन झाल्यावर कडेवर घेउन ढेकर काढली की आपलंच पोट भरल्यासारखं वाटावं, कधी 'गुणी बा़ळ तर कधी ' निज आता' म्हणत त्याला झोपवावं, असं मला पण वाटतं, आणि असं होत नाहीये म्हणुन रडु पण येतं, पण नाकाखालच्या मिशा आड येतात.. त्या सलीलच्या दमलेल्या बाबाला कहाणी सांगायला एक परी आहे, इथं आम्ही नुसतंच दमतोय आणि घरी येउन पाठीकडं पाठ करुन झोपतोय. पण पुन्हा एखादा दिवस माझी इच्छा उफाळुन येते बाप होण्याची तर कधी बायकोची आईपणाची स्वप्नं जागं करतात, मग कुस बदलली जाते पण उजवली जात नाही अजुन.. ---------------------

याद्या 6948
प्रतिक्रिया 47
वेदना मस्त मांडलीय. उलट मला तर वाटतं अख्खा मानववंशच वांझोटा झाला पाहिजे. काय ती लग्न करतात, काय ती पोरं काढतात.. आणि वरुन या सगळ्यांना काही म्हणजे काहीही माहीती नाही हे सगळं कशासाठी करायचं आहे ते.. एकच उत्तर, सगळे तेच करतात आणि हे असंच होत आलंय.. अरे होत आलं असेल, किमान एकानं तरी विचारलंय का कधी लग्न करुन अनोळखी बाईसोबत का रहायचं, त्यांचं काय होणार हे माहित नसूनही पोरं का पैदा करायची? काहीही माहिती नसून अंधारात उड्या घ्यायच्या आणि मग हाच संसार आहे, देव फार वाइट आहे असं बोलत रहायचं.

नादखुळा....मस्त जमलीये...सविस्तर प्रतिसाद देण्यात येईल !
नाकाखाली मिशा आहेत तर डोळ्यातुन पाणी नाही आलं पाहिजे
जाम आवडण्यात आले आहे ! - मालोजी

काय लिहीलं आहेत हो तुम्ही? खतरनाक, जबरदस्त, मनाला भिडणारं,नाण्याची दुसरी/दुखरी आणि दुर्लक्षीत बाजू दाखविणारं. अजुन काय प्रतिसाद द्यावा कळत नाही. आपणास सादर प्रणाम. अमृत

निशब्द....अजून काय बोलावं...

मस्तच.... दन्डवत.... सलाम...

अशी उदाहरणे माहित आहेत. 'अपत्याविना स्त्री अधुरी' वगैरे वाक्प्रचार गुळगुळीत झालेत. पुरुषाच्या बाजूला वाचा फोडलीत. भावना पोचल्या. अर्थात दत्तकाबद्दल वेगळा दृष्टिकोन हवा असे वाटले. निवेदकाने पुस्तक आणि नेट धुंडाळले पण डॉक्टरकडे जाणे राहिले. हल्ली बरेच वैद्यकीय उपचार आणि उपाय निघालेत.

ही म्हण सार्थ ठरवली ह्या लेखातून दोन बाजू असतात ही म्हण सार्थ ठरवली ह्या लेखातून. "षंड आहात तुम्ही" हे वाक्य अनेक बायका पुरुषांना ते जरी बाप असले तरी त्यांनी एखादी गोष्ट बायकोच्या मनासारखी केली नाही तर त्यांना सुनावला जातो

In reply to by निनाद मुक्काम …

"षंड आहात तुम्ही" हे वाक्य अनेक बायका पुरुषांना ते जरी बाप असले तरी त्यांनी एखादी गोष्ट बायकोच्या मनासारखी केली नाही तर त्यांना सुनावला जातो
नाय हो निनादराव नाय... बायकोच्या मनासारखी गोष्ट केली नाही तर इतर बरंच काही बोलतात किंवा बोलणं थांबवतात.. पण "षंढ आहात तुम्ही" इतकं तीव्र नाही हो बोलत बायका आपल्या पुरुषांना अजून एवढ्या कारणावरुन निदान भारतात तरी... (हां.. अनेक वर्षं मनासारखी गोष्ट न केल्यास म्हणतीलही.. तो 'विषय' वेगळा.. )

In reply to by निनाद मुक्काम …

..."षंड आहात तुम्ही" हे वाक्य अनेक बायका पुरुषांना ते जरी बाप असले तरी.......
फक्त पुरुषांनाच? अहो, एका दमात, सव्वाशे कोटी लोकांना बायकांचं षंढ म्हणून झालं आहे. आहात कुठे? Where are you? :) बाकी हर्षदराव, लिखाण मात्र एकदम फक्कड बर का!

नाकाखाली मिशा आहेत तर डोळ्यातुन पाणी नाही आलं पाहिजे, हे वाक्य आवडलं. विषय छान मांडलात.

मग कुस बदलली जाते पण उजवली जात नाही अजुन..> सही रे सही. हसता हसता , आंतर्मुख करणारे "सकस" लेखन.

पण वरती यशवंत कुलकर्णी म्हणतात तसं किंवा हलचल मधला परेश रावल म्हणतो तसं, "तुम्ही कुठल्या डायनोसोरची शेवटची औलाद आहात की निपुत्रिक मेलात तर सगळं जग हळहळेल?" दत्तक घ्यायचे नाही? त्या बाळाच्या जन्माबद्दल साशंक आहात? नका घेऊ दत्तक मग. जरी दोघं-दोघं याचा कंटाळा येतो असं वाटत असेल तर जरा आजूबाजूलाही पहा. आपखुशीनं एकलेपण स्वीकारलेले जीव एकटेच स्वतःच्या आवडीनिवडी जोपासत आहेत. अशा वेळॅस किमान तुमच्याकडे साथ द्यायला जोडीदार तर आहे असा सकारात्मक विचार का केला जात नाही? दत्तकाचीच दुसरी बाजू म्हणूनः ठरवून दत्तक मुली घेतलेली काही उदाहरणं पाहण्यात आहेत. अगदी माझ्या कलीगने मुलगी दत्तक घ्यायचे ठरवल्यानंतर त्यासाठी काय काय द्रविडी प्राणायाम करावे लागतात हे जवळून पाहिलंय. दत्तक मुलीसाठी तिने ३ वर्षे नोकरीसुद्धा सोडली होती. आज ती तिच्या मुलीसोबत (अर्थात नवरा आधीपासून संसारात आहे म्हणून फक्त मुलीसोबत म्हटलंय) खुश आहे, आणि कुठल्याही नेहमीच्या आईसारखी भेटली की मुलीचं कौतुक सांगत असते. तेव्हा दत्तकाबद्दल इतकंही नकारात्मक व्हायला नको. वंध्यत्वावर उपचार आहेत पण त्यांचा अतिरेकही होऊ नये. मला तपशीलांत जायचं नाही, पण या अतिउपचारांनी झालेला अपमृत्यू पाहिल्यानंतर हा विषय पाहिला की ती आठवते. न राहवून हे सगळं जीवावर बेतण्याइतकं अति होतंय हे तिला किंवा तिच्या नवर्‍याला का उमजलं नसावं असं सतत वाटत राहातं. राहता राहिला प्रश्न दुसर्‍या बाजूचा. सगळ्यांच्याच मते आपण आंतरजालावर रिकाम्या चर्चा करणारे लोक आपल्या समाजाच्या अगदी काही टक्क्यांत येतो. त्यामुळे मी काय विचार करतो/ते आणि समाजात काय प्रत्यक्षात घडतं हे वेगळं असू शकतं. जितक्या सहजतेने मुलीला "लग्न कधी/न्यूज कधी/काय हे अजून काहीच नाही?" हे विचारलं जातं, तितक्या सहजतेने मुलाला घरात आणि घराबाहेर विचारलं जात नाही. उदाहरण द्यायचंच तर यात अगदी गावच्या गल्लीतल्या काकूंपासून मुंबईतल्या सोसायटीतल्या मोठ्या पदावर काम करणार्‍या बाई ते आंतरजालावरचे लोक सगळेच येतात*. कारण अर्थातच पुरूषप्रधान संस्कृती. रागारागात मुलगा ताटावरून उठून गेला तर आई पुढचे चार दिवस त्याला दबून राहते. तो प्रश्नाचं उत्तर न देता उठून गेला तरी चालतं, हे मुलींच्या बाबतीत सगळ्याच घरात घडेल असं नाही. त्यातही स्त्रिया भोचक असतात, हो असतातच. पुरूष बोलून दाखवत नाहीत पण मग सणासमारंभाच्या वेळी जनांत झालेला अपमान त्या बाईच्या मनात फार काळ सलत राहतो. म्हणून हा प्रश्न बाईपणाशी निगडित म्हणून जास्त चर्चिला जातो. हा प्रकार एक बाजू-दुसरी बाजू म्हणून न पाहता आपण वेगळा दृष्टीकोन कधी घेणार आहोत? मुळात अंधत्व्,पंगुत्व असतं तसंच हे वंध्यत्व असतं. मग ते नैसर्गिक असो वा अपघाताने आलेलं. अंधत्व-पंगुत्वावर उपचार केले जातात तसेच याही आजारावर केले जावेत. पण कुणी आंधळं-पांगळं आहे म्हणून त्याचा टोमणे मारून आपण जीव नकोसा करत नाही, उलट काळजी घेतो. त्यातही समोरच्याला आपली सहानुभूती न टोचावी अशी शक्य तितकी काळजी घेतो. मग या बाबतीत असे का? किमान प्रत्येकाने आपल्यापासून सुरूवात केली तर काही वर्षांनी का होईना दोन्ही बाजू एक होतील. *लग्न झाल्यापासून माझ्या नवर्‍याला प्रत्यक्ष जीवन ते आंतरजाल अजून कुणी माझ्या समोरतरी प्रश्न विचारला नाहीय, पण मला मात्र सगळ्यांनी -अगदी खव- मध्ये सुद्धा विचारून झालंय. मी बिचारी नाही, पण जेव्हा आम्हाला बाजू नाही का? असं म्हणता, तेव्हा हे उदाहरण देखील पहाच पहा!!

In reply to by मस्त कलंदर

गावच्या गल्लीतल्या काकूंपासून मुंबईतल्या सोसायटीतल्या मोठ्या पदावर काम करणार्‍या बाई ते आंतरजालावरचे लोक सगळेच येतात
त्यातही स्त्रिया भोचक असतात, हो असतातच
सणासमारंभाच्या वेळी जनांत झालेला अपमान त्या बाईच्या मनात फार काळ सलत राहतो
उद्बोधक वाक्ये आहेत. जनरल प्रतिसादाशी सहमत. @५० फक्त. लेख आवडला आहे. जे सांगायचेय ते कळले आहे.

In reply to by मस्त कलंदर

म के जिंकलस!!! तुझ्या वाक्यावाक्याशी सहमत. एखादी नविनच लग्न झालेली साधी जरी आजारी पडली... तरी ... अरे वा!!! काही न्युज आहे की काय!.. अशी फाल्तु टीप्पणी होतेच.

भारतात अनेक पुरुषांचा कौटुंबिक कामगिरीत नाकर्ते पणाचा कडेकोट झाला. किंवा सात्विक संतापाने हे उद्गार घरो घरी अगदी सर्रास नाही पण सुनवले जातात. उदा "शंडा सारखे बसून काय राहिलात" किंवा षंड आहात तुम्ही तुमच्याकडून काहीही होणार नाही. मतितार्थ कुठल्याही पुरुषाला हिणवण्यासाठी भारतात हा शब्द जालीम आहे व काही महिला वर्गाला ह्याची जाणीव आहे. कितीतरी वेळा पुरुष सुद्धा पुरुषाला उद्देशून हाच शब्द बोलतो.

दुसरी बाजू अगदी रोखठोकपणे मांडली आहे. दत्तक घेण्याबाबतचे विचार मात्र चुकीचे वाटले.
अरे जे पोर या जगात आलं ते कुणाच्या तरी नादानपणातुन आलंय की कुणाच्या तरी पापातुन की कुणाच्या भीतीतुन काय माहीत, आणि ते सोडलंय का ह्याची काय माहिती आपल्याला ? अशा सोडलेल्या पोरांचं काय होतं ते महाभारतानं कर्णाच्या रुपात दाखवुन दिलेलंच आहे, आणि त्याची अवस्था तो अभेद्य कवच कुंडलांसहित जन्मला तेंव्हाची, आम्हाला जे मिळेल, त्याला अनाथाश्रमाच्या लोकांनी पल्स पोलिओ तरी दिलंय का नाही कुणास ठाउक. असंच एक लेकरु, ते आपण घरी आणायचं, त्याला आपलं म्हणायचं, आपलं पोर म्हणजे काय फक्त आपलं रक्त मांस नसतं, तर आपले संस्कार, आपली बुद्धी, आपल्या भावना घेउनच जन्माला येतं ते. उगा आवडलं म्हणुन पोर घरात आणायला काय ते कुत्र्याचं पिलु आहे, आणलं, दुध पाजलं, फिरायला नेलं, बस म्हणलं की बसतंय, भुंक म्हणलं की भुंकतंय.
दत्तक घेण्याबाबत कुणाची अशी मते असतील तर त्यांनी दत्तक घेण्याचा विचारही करु नये. आधीच रस्त्यावर आलेलं आयुष्य (आपल्या स्वार्थासाठी) घर देण्याच्या नावाखाली पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्यात काय अर्थ आहे.

लेख आवडला नाही. त्यातले विचार तुमचे आहेत की नाही माहित नाही पण ते अजिबातच आवडले नाहीत. दत्तकाबद्दल वंशशुद्धीच्या मार्गाने जाणारे विचार खूपच चुकीचे वाटले. माया करायला हक्काचं मूल असावं वगैरे वाटणं ठीक आहे. पण ते तसं नसेल तर त्यावर मात करून अथवा त्या वेदनेवर मात करून जगणं हाच खरा पुरूषार्थ, नाही का? राहता राहिला दत्तकाचा प्रश्न. आजकाल तर माझ्या माहितीत अशी किती तरी कुटुंबं आहेत ज्यांना स्वतःचं एक मूल असूनही अजून एक मूल, शक्यतो मुलगीच, दत्तक घ्यायची इच्छा आहे. माझ्या नात्यात दत्तक घेतलेली मुलं आहेत. त्यातली बरीच मुलं तर आज स्वतः आईबाप बनले आहेत. त्यांना, त्यांच्या जोडीदारांना, सासरच्यांना हा दत्तक असण्याचा इतिहास माहित आहे. अगदी नॉर्मल आयुष्य जगत आहेत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिकाशी सहमत माझ्या परिचयातील काहीजणानी अगदी जाणीवपूर्वक दत्तक घेतलय त्यात कुठेही हतबलता जाणवत नाही काही जणांनी दुसऱ्‍या मुलाचा विचार करताना स्वत प्रजननक्षम असूनही मूल दत्तक घेतलय ती मुल आणि ती कुटुंब ऐकमेकांत दुधात साखर मिसळावी अशी ऐकरुप झालीत आणि या दत्तक मुलांमधे मुलीचा भरणा जास्त आहे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अगदी खरय बिपिनदा. आपले मिपाकर आणि ग्राफिटिकार.. 'आपला अभिजीत' म्हणजेच अभिजीत पेंढारकर यांनी, स्वतःला एक मुलगी असताना, एक मुलगा दत्तक घेतला आहे. आणि त्याबद्दलचा लेख इथे मिपावर प्रकाशीतही केला आहे. मागे शोध घेतल्यास मिळू शकेल.

तुमच्या नायकाला स्वतःच्या रक्त-मासाचा गोळा हवाय आणि तो त्यात अपयशी ठरतोय म्हणून त्याच्या मनाची घालमेल समाजतीये .पण म्हणून दत्तक मुलांविषयी जे तुम्ही लिहिलंय ते पटत नाही. तेवढ सोडलत तर लेख उत्तम.

लोक्स आजकाल विडंबने देखील शिरियस घ्यायला लागलेले बघून अंमळ मौज वाटली. बाकी चालु द्या...

लेख आवडला नाही... पुरुषाला निश्चितच त्रास होतोच मुल नसण्याचा (होत नाही असं कुठे न कोण म्हणलय देव जाणे)... पण कदाचित बाई इतका नाही.. कारणं मानसिक, शाररिक, सामजिक... सगळीच आहेत.. बाई जेवढी मात्रुत्वासाठी आसुसलेली असते (तिच्या शाररिक जडण्-घडणी मुळे) तेवढा पुरुष नसतो... आणि हळदी-कुंकु, बारसं अशा ठिकाणी अर्थातच स्त्रिया हे सगळं जास्त भोगतात.. पुरुषाना नक्कीच हा त्रास नाहीये.. तुमच्या लेखातुन उगाच पुरुष कस बिचारा बिचारा आहे असा सुर लावलाय... उदा:
त्याचा हात हातात धरुन गालावर फिरवावा आणि मग बायकोनं ओरडावं, 'दाढी टोचंल त्याला रडेल ते '
जेव्हा बाळाचे बाबा घरी येतात आणि ते मस्त नाचतं "बाबा बाबा " करत तेव्हा कधी तुम्ही बायकोच्या चेहर्यावरचे कौतुकाचे , अभिमानाचे भाव पाहिले आहेत का?? आपला मुलगा आपल्या "ह्यांच्या"वर गेलाय ह्याचा त्यांना मनातुन किती आनंद असतो माहितिये का?? बर्‍याचदा बायका दोष आपल्यात नसुन नवर्‍यात आहे हे माहीती असुनही स्वतःवर खापर फोडुन घेताना दिसतात.. असं नवर्‍याना करताना फारसं पाहिलेलं नाही.. उपचार पण आधी बाईचे सुरु करतात बर्‍याच ठिकाणी... माझ्यामते त्रास दोघांनाही होत असतो आणि त्याची जाणीव दोघांनाही असते.. दुनिया गयी भाड मे... आणि दत्तक मुलाविषयिचे विचार तर अगदीच न पटण्यासारखे आहेत...

In reply to by पिलीयन रायडर

माफ करा पण निदान अपत्यहीन दांपत्या मध्ये दुजाभाव करणे योग्य नाही. किंबहुना पुरुषांना त्यांचे पुरुषत्व नसल्याची जाणीव जेवढी एखाद्या महिलेला वांझ म्हणून असते तेवढीच असते. आपल्या समाजात कर्तुत्व हीन पुरुषाला षंड म्हणण्याच्या प्रघात आहे. कारण पुरुषाला सगळ्यात जास्त वर्मी घाव घालणारा हा शब्द आहे. आणी सदर विडंबन एवढे उत्कृष्ट झाले आहे व त्याच्या विषयाच्या संवेदनशीलतेने अनेक जण येथे पोटतिडकीने प्रतिसाद लिहित आहेत. जरा हलके घ्यावे.

इथे आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या. माझं मत, कथा म्हणून उत्तम जमलीय. दत्तकाबद्दल विचार चुकीचे वाटतात असं अनेकानी लिहिलंय, पण ते कथेतल्या पात्राचे विचार आहेत. लेखकाचे स्वतःचे विचार असतीलच असं नाही. एक लेखक खूप तर्‍हेच्या कथा लिहितो, तेव्हा त्या त्या पात्राच्या अंतरंगाचा ठाव घेतो, एखादं पात्र कसं असेल याचा खूप विचार करून लिहितो. त्याच्या स्वतःच्या आयुष्यात तो तसा वागत असेल असं नेहमीच सांगता येणार नाही. हा लेख नाही. कथा म्हणून या कृतीकडे सर्वानी पाहिलं तर बरं. पूजाच्या कथेचं थेट विडंबन नाही, पण त्याच कथेतल्या दुसर्‍या पात्राचे विचार म्हणून चांगलं जमलंय असंच मी म्हणेन.

In reply to by पैसा

सहमत. मीसुद्धा हे त्या पात्राचे विचार समजूनच वाचलंय. मला एक कथा म्हणून लिखाण उत्तम वाटलं. विडंबन आहे असं तर अजिबात वाटलं नाही. अजून थोडं लिहायचा विचार होता यावर पण आवरतं घेतो. काही प्रतिसाद वाचून सहज वाटून गेलं, की कारलं कडूच असतं ते पिकल्यानंतर तरी गोड होईल अशी अपेक्षा ठेवणारा मूर्ख असतो.

In reply to by सूड

काही प्रतिसाद वाचून सहज वाटून गेलं, की कारलं कडूच असतं ते पिकल्यानंतर तरी गोड होईल अशी अपेक्षा ठेवणारा मूर्ख असतो.
क लिवलय !! क लिवलय !!! अगदी मनातले बोललास रे. हल्ली कमी लिहितोस पण मस्त लिहितोस. एका वाक्यात अचूक उत्तरे टाईपचे :-) बाकी हर्षद भौंचा लेख झक्कास !! काही वाक्ये खासच..

In reply to by पैसा

पण ते कथेतल्या पात्राचे विचार आहेत. लेखकाचे स्वतःचे विचार असतीलच असं नाही.
अगदी अगदी.. अन्यथा, अगाथा ख्रिस्ती आदि लोक थंड रक्ताचे खुनी.. अन इतर बरेच लेखक मनोविकृत म्हणावे लागतील..

वास्तववादी लिखाण आहे. हे अगदी असेच्या असे दत्तकाबद्दलचे विचार मी 'रिअल लाईफ'मध्ये ऐकले आहेत. 'रीप्रोडक्टिव्ह सिस्टम' चे विकार इतर सर्व विकारांप्रमाणेच 'निरोगी' द्रुष्टीने अजूनही पाहिले जात नाहीत.

निवेदकाचं बेअरिंग छान जमलंय. व्यथा मांडताना येणारा अगतिक भाव, वैतागलेपण चांगलं उतरलं आहे. असह्य झाल्यावर मनातलं भडाभडा ओकल्यासारखं वाटतं. त्यानेच हे पात्र जिवंत होतं. इतकं जिवंत वाटतं, की लोकांनी हे विचार बरोबर की चूक अशी चर्चा केली आहे.

अप्रतिम लिहलंय. 'त्याच्या' मनातील भावना अगदी सही सही कागदावर उतरवल्यात. त्याचबरोबर दत्तक मुलाच्या बाबतीतले मकिचे विचारही पटतात.

संयत, काहिसं भेदक आणि बरचसं mature लिखाण. ५० ल १०० वेळा सलाम.