मेणबत्त्यां​चा उजेड

चारुवाक जनातलं, मनातलं
लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील वक्तव्य अश्या विषयांवर रूढ मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करताना मी नेहेमी दहा वेळा विचार करतो. आजकाल या यादीमध्ये अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाची भर पडली आहे. आजकाल IAC आणि मेणबत्ती मोर्चे ही 'in' आहे ...म्हणजे सध्याचा ट्रेंड आहे. कार्यालयात मला एकाने विचारले की तुमच्या इथे candle march झालं का? मी हो म्हणालो. आजकाल रोज कुणी ना कुणी मार्च काढते आहे. मग तू गेला होतास का? माझ्या 'नाही' या उत्तरावर एक उपेक्षित कटाक्ष टाकून तो निघून गेला. gtalk वर अण्णांना पाठींबा देणारी caption टाकणे, टोप्या आणि बनियन घालणे आणि मेणबत्ती मोर्चाला जाणे एवढी सोपी ही लढाई आहे असे मला खरेच वाटत नाही. मला सांगा लोकपाल बसवून माझे कुठले प्रश्न सुटणार आहेत ? प्रत्येक सरकारी कार्यालयात दुनियाभरची कागदपत्रे जमा करावी लागतात . ती कमी होणार आहेत ? म्हाडाच्या लॉटरी मध्ये जे झोल होणार ते थांबणार आहेत? रस्त्याच्या कडेने उभ्या ट्रक ना जी चिरीमिरी द्यावी लागते ती थांबणार आहे ? थोडक्यात सांगायचे तर रोजच्या जीवनात जो भ्रष्टाचार दिसतो आहे तो कमी करायचा असेल तर आपल्या कृतीची गरज आहे. त्यासाठी अण्णांचे उपोषण सुरु होण्याची कधीच गरज नव्हती. सरकारी कार्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. इतक्या मोठ्या देशात जर सुसूत्रता ठेवायची असेल तर कुणा व्यक्तीच्या लहरीवर कारभार ठेवणे चालणार नाही म्हणजे व्यक्ती निरपेक्ष नियम हवे. अनेक प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यासाठी विविध नियम उपनियम निर्माण करणे भाग आहे. मुळात इंग्रजांचे हे नियम असल्याने भारतीयांवारचा अविश्वास हाच या नियमांचा पाया होता . त्या मुळे प्रत्येक ठिकाणी ढीगभर कागदपत्रे पुरावा म्हणून मागणे हा सरकारी अधिकार्यांचा हक्क बनला आहे. या सगळ्या यम नियमांच्या जन्जालातून सुटका हवी म्हणून आपण सरळ साम, दाम वापरतो. आणि वर परत भ्रष्टाचाराची ओरड करतो. अनिलकुमार लखिना म्हणून एक जिल्हाधिकारी होते. बहुतेक नगर जिल्ह्यात त्यांनी हा प्रयोग केला. सरकारी कार्यालयाबाहेर फळ्यावर माहिती देणे अशी सोप्पी वाटणारी गोष्ट त्यांनी चालू केली. कार्यालयात कामाच्या फ्लो प्रमाणे रचना करणे असे उपाय करून त्यांनी कामाचा निपटारा कसा होईल याचा विचार केला...सरकारने काय केले? त्यांचे कौतुक केले , लखिना pattern आम्ही राबवणार म्हणून डांगोरा पिटला. आणि इतर अनेक योजना प्रमाणे ही पण योजना कागदावर साजरी केली गेली. लोकांना सहज माहिती देणे, त्यांच्या अर्जाची काय अवस्था आहे ? कुणाच्या टेबल वर फाईल आहे ? तिचा निर्णय होण्यात काही अडचण आहे का? अशा सध्या सोप्या प्रश्नांची माहिती देण्या इतकी पारदर्शकता जरी आपण आणू शकलो तरी भ्रष्टाचाराला बराच आळा बसू शकेल. खर्चाचा ताळेबंद , ऑडीट रिपोर्ट , स्थायी समितीचे निर्णय अशा गोष्टी आपण लोकांसमोर ठेवण्याची प्रथा चालू केली तरी कुणाला भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करताना लाज वाटेल, पहिल्या महिन्यात वाट लागलेल्या फ्लाय ओवर चे दुरुस्ती पुनः त्याच बिल्डर कडे देताना दोन वेळा विचार करावा लागेल. खरी गरज आहे नियम सोपे करण्याची , त्याची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून सरकारवर दबाव आणण्याची, प्रशासनात पारदर्शकता आणण्याची. कोरडी आश्वासने देण्यापेक्षा काही कृतिशीलता दाखवण्याची. ही सगळी कामे सरकारनेच कार्याची का? लोकांनी फक्त मोर्चे काढले म्हणजे झाले का? मेणबत्त्या जाळल्या की पडला उजेड? जनतेची काय जबाबदारी आहे ? आपला समाज पण विरोधाभासांनी भरलेला आहे. श्रावण पाळणारा भाविक माणूस आपला गुत्ता श्रावणात बंद करत नाही. वेगवेगळ्या मंदिरात लाखो रुपयांचा चढावा चढवणारे लोक तो पैसा जमा करताना किती विधी निषेध बाळगतात ? आंदोलनाच्या बाजूने मी फार बोलत नाहीये म्हणून माझ्यावर नाराज असलेला माझा मित्र नंतर पासपोर्ट काढण्यासाठी एजंटला भेटायला गेला. आता त्या एजंट ला देणार असलेले पैसे हा भ्रष्टाचाराला हातभार नाही का? मला अश्विनी आणि सलील च्या पासपोर्ट साठी चार वेळा वरळीला जावे लागले. पण असा वेळ 'वाया' घालवण्या पेक्षा एजंट सोप्पा नाही का? शिवाय एजंट ला पैसे दिले की आपण भ्रष्टाचाराला हातभार न लावल्याचे समाधान मिळते ते वेगळेच . अरे काय हा ढोंगीपणा ! वागण्या बोलण्यातली एकवाक्यता , integrity ,आपण हरवून बसलो आहोत. हेच कारण आहे हा " भ्रष्ट आचार " समाजात मुरण्याचे. कलमाडी , राजा, कानिमोली यांना लोकपाल बघून घेतील. पण चिरीमिर देताना आपणच आपले लोकपाल व्हायचे आहे. सद-असद विवेक बुद्धीला थोडे जागे ठेवायचे आहे. हे सगळे मोर्चे निघत आहेत मुख्यतः सुशिक्षित वस्त्यांमधून . या वस्त्यांमधून मतदानाचे प्रमाण किती ? आख्या मुंबईतले प्रमाण ३५-४० टक्के इतकेच आहे. आणि मला खात्री आहे की यात मुख्य भाग झोपडपट्ट्या मधून राहणाऱ्या श्रमजीवी लोकांचाच आहे. स्वतः मतदानाच्या दिवशी औटींगला जाणार्या लोकांनी पुढच्या वेळी निदान मतदान केले तरी या मेणबत्त्या कामी लागल्या असे म्हणता येईल. चारुवा॑क http://charuwaq.blogspot.com/
वर्गीकरण
लेखनप्रकार

25 टिप्पण्या 4,071 दृश्ये

Comments

इरसाल नवीन

तुमचे म्हणणे पटले.पण कुठूनतरी सुरुवात व्हायला हवीच ना ? अहो पण फणसाचे काटे किंवा अननसाचे काटे टोचतात म्हणून कोणी ते खायचे थांबतो का ?

धन्या नवीन

सुंदर आणि कळकळीने लिहिलेला लेख. ओळ अन ओळ मनाला पटली. आशा आहे, मेणबत्ती पेटवून देश बदलू पाहणारी नेट पीढी यातून काही बोध घेईल. खरं तर आज आम्हाला "विनाशाय च दुष्कृताम" म्हणत "भ्रष्ट" सरकारला मारणारा लोकपाल श्रीकॄष्ण नकोय. आम्हाला हवा आहे "जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो" म्हणत भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यांना, भ्रष्टाचाराला खत पाणी घालणार्‍या आम्हा नागरीकांना जागे करणारा ज्ञानदेव...

चेतन सुभाष गुगळे नवीन

चार्वाकांच्या प्रस्तुत लेखातील सर्व मतांशी सहमत आहे. पूर्वीच्या काळी आपले प्रांजळ मत निर्भीडपणे मांडणारा (मग भलेही ते बहुमताविरुद्ध असोत) चार्वाक नावाचा एक विचारवंत होऊन गेला होता, त्याची आठवण झाली. त्यामुळेच तुमचाही चार्वाक असाच उल्लेख करतोय. तुमच्या नावाचा अपभ्रंश करण्याचा हेतू नाही. तुमच्या विचारांचे कौतुकच आहे.

मराठी_माणूस नवीन

लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील ..... कलमाडीचे निर्दोष असणे ह्या वर दहा वेळा विचार करावा लागावा हे एक आश्चर्यच आहे. हे म्हणजे "प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून मत व्यक्त करता येत नाही" असा राजकीय पवित्रा घेण्यासारखे आहे . किंबहुना बहुसंख्य सर्व सामान्य माणसाचे मत तो दोषी आहे ह्या बाबतीत दुमत असु शकेल असे वाटत नाही.

lakhu risbud नवीन

एक ग्राफिटी वाचली होती"निराशावादी माणूस कसा ओळखावा ?जो एकेरी वाहतूक असणारा रस्ता सुद्धा डावी उजवी बाजू बघून पार करतो तो".चारू वाक यांचे असेच काहीतरी झालेले दिसते ,अहो या आंदोलनाच्या निमित्ताने जी वैचारिक घुसळण झाली,लोकप्रतिनिधींना लोकांचा आवाज जाणवला,आपल्याला जाब विचारणारे कोणीतरी आहे याचा दबाव निर्माण झाला हे कमी आहे का?आणि तुम्ही कोणत्या जगात राहता हे माहित नाही पण आमच्या भागात सगळ्या वर्गाचे लोक या आंदोलनात,मोर्च्यात सहभागी झाले होते.सुरवात तर झाली आहे हे बघा ना,का जन्माला आलेला एक दिवस मारणार आहे म्हणून त्याच्या जन्माचा उत्सव करायचा सोडून सुतकाची तयारी का सुरु करताय?

धन्या नवीन

In reply to by lakhu risbud

अहो या आंदोलनाच्या निमित्ताने जी वैचारिक घुसळण झाली,लोकप्रतिनिधींना लोकांचा आवाज जाणवला,आपल्याला जाब विचारणारे कोणीतरी आहे याचा दबाव निर्माण झाला हे कमी आहे का ?
वैचारिक घुसळण झाली, दबाव निर्माण झाला हे सगळं ठीक आहे. पण पुढे काय? या सार्‍याने परिस्थितीत फरक पडणार आहे का? भ्रष्टाचार अगदी समूळ नाहीसा झाला नाही तर काही प्रमाणात तरी कमी होणार आहे का? हे सगळं सोडा. जे लोकपाल बिल पास व्हावं म्हणून हे आंदोलन सुरु आहे ते लोकपाल बिल तरी पास होईल याची खात्री तुम्ही देऊ शकता का? हे मेणबत्त्या पेटवणं एक फॅड आहे. ना याने सरकारी कार्यालयांमधील बाबू आपली कामे करुन घेण्यासाठी वजन मागणे थांबवणार आहोत ना आपण ते देणं थांबवणार आहोत. आणि मायबाप सरकारही इतकं चलाख आहे निवडणूकीचा दिवस हा बहूतेक वेळा विकांताला जोडून ठेवतो. मग आम्हीही फेसबुक, जीमेलवर स्टेटस टाकून "लाँग विकेंड" ला जातो. मतदान कोण करतं तर कोंबडी आणि दारू दिली की खुष होणारी झोपडपट्टयांमधील जनता... साला दुपारी मारे हिंजवडीच्या आयटी पार्कात अगदी कंपन्यांच्या बुलेटीन बोर्डांवर मेसेजेस टाकून दिड दोन हजार लोकं जमवायची, नेहमी अधाशी असलेले मिडीयावाले बोलवायचे, आम्ही सपोर्ट करतो म्हणत मिरवून घ्यायचे... आणि संध्याकाळी बालगंधर्वजवळ वाहतूक पोलिसाने सिग्नल तोडला म्हणून पकडला की सुमडीत त्याच्या हातावर वीस रुपये टेकवून अ‍ॅक्सलरेटरवरचा पाय अजून जोरात दाबायचा...
आणि तुम्ही कोणत्या जगात राहता हे माहित नाही पण आमच्या भागात सगळ्या वर्गाचे लोक या आंदोलनात,मोर्च्यात सहभागी झाले होते.
अगदी अगदी. हे असं काही केलं म्हणजे देशासाठी फार मोठं योगदान केलं असं मानून आपणच आपली पाठ थोपटून घेतोय.
सुरवात तर झाली आहे हे बघा ना,का जन्माला आलेला एक दिवस मारणार आहे म्हणून त्याच्या जन्माचा उत्सव करायचा सोडून सुतकाची तयारी का सुरु करताय?
ही उपमा पुन्हा एकदा तुम्हीच वाचून पाहा. ती अस्थानी आहे हे तुमचं तुम्हालाच कळेल.

lakhu risbud नवीन

In reply to by धन्या

हे मेणबत्त्या पेटवणं एक फॅड आहे. ना याने सरकारी कार्यालयांमधील बाबू आपली कामे करुन घेण्यासाठी वजन मागणे थांबवणार आहोत ना आपण ते देणं थांबवणार आहोत. आणि मायबाप सरकारही इतकं चलाख आहे निवडणूकीचा दिवस हा बहूतेक वेळा विकांताला जोडून ठेवतो. मग आम्हीही फेसबुक, जीमेलवर स्टेटस टाकून "लाँग विकेंड" ला जातो. मतदान कोण करतं तर कोंबडी आणि दारू दिली की खुष होणारी झोपडपट्टयांमधील जनता... हे sweeping statement होतंय असा तुम्हाला नाही वाटत का? अगदी अगदी. हे असं काही केलं म्हणजे देशासाठी फार मोठं योगदान केलं असं मानून आपणच आपली पाठ थोपटून घेतोय. तुम्ही जे म्हणताय कि मेणबत्त्या पेटविणे एक फॅड आहे ते काही अंशी खरही आहे,त्या मेणबत्त्या पेटविण्यासाठी लोक आपल्या घरातून खाली उतरले हे महत्वाचे नाही का ?.पुढच्या निवडणुकीसाठी हि लोकं सुट्ट्या घेऊन फिरायला जाण्या ऐवजी मतदान करतील अशी अशा तरी आहे. ही उपमा पुन्हा एकदा तुम्हीच वाचून पाहा. ती अस्थानी आहे हे तुमचं तुम्हालाच कळेल. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मैताची तयारी का सुरु करताय असे पाहिजे. या आंदोलनाला समर्थन देण्याचा समर्थ पर्याय तुम्ही सुचवा, आपण तो अमलात आणण्याचा प्रयत्न करू. एक कथा आहे एका समुद्रकिनाऱ्यावर जोराच्या भरतीमुळे पाण्यातील मासे पाण्याच्या बाहेर फेकले जात होते,हजारो लाखो मासे.एक माणूस तिथे येतो आणि समोर दिसणाऱ्या प्रत्येक माशाला परत पाण्यात फेकून देतो.तिथून जाणारा दुसरा माणूस त्याला विचारतो "तू हे का करतो आहेस?इथे हजारो मासे आहेत,तू अशा किती माशांना आत फेकणार आहेस? आणि त्याने काय फरक पडणार आहे?" त्यावर तो पहिला माणूस उत्तरतो "त्या माशाला फरक पडतो,हे माझ्यासाठी महत्वाचे आहे." असे कितीतरी मासे आपल्या आजूबाजूला आहेत,भ्रष्ट कारभारामुळे दाखले वेळेत न मिळ्याल्याने शिक्षण सोडणारे अनेक जण आहेत,त्याला या आंदोलनामुळे फरक पडला हे महत्वाचे.( दाखले वेळेत न मिळने हि एक वानगी,अशी असंख्य उदाहरणे असतील.)

धन्या नवीन

In reply to by lakhu risbud

याही प्रतिसादाला उत्तर देणार होतो. परंतू मैताची तयारी का सुरु करताय असे पाहिजे वाचून लक्षात आलं की काही उपयोग नाही त्याचा. तुमचं मासे आत टाकणं चालू दया.

चेतन सुभाष गुगळे नवीन

In reply to by lakhu risbud

एक ग्राफिटी वाचली होती"निराशावादी माणूस कसा ओळखावा ?जो एकेरी वाहतूक असणारा रस्ता सुद्धा डावी उजवी बाजू बघून पार करतो तो" >> हे जर खरं मानलं तर पुण्यातले रस्ते सुरक्षितपणे पार करण्यासाठी सर्व पादचार्‍यांना निराशावादीच व्हावं लागेल. तुम्हाला रस्ता एकेरी वाहतूकीचा आहे असं फलकावरून दिसत असलं तरी प्रत्यक्षात ते तसं असेलच असं नाही, अनेक जण चूकीच्या दिशेने वाहन हाकीत असतात. त्यांचा वेगही बराच असतो व अशांनी घडविलेल्या अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. इतकं होऊन ही अशा वाहनचालकांना झालेल्या शिक्षेचं प्रमाण कमीच आहे. मध्यंतरी एका हृदयविकारतज्ज्ञाच्या कन्येने चूकीच्या दिशेनं वाहन चालवून अनेक वाहनांना (ज्यात एक पोलीस वाहनही होतं) धडक दिली, काही पादचार्‍यांनाही जखमी केलं. तरीही ती दुसर्‍या दिवशी जामिनावर सुटली. अर्थात ज्याप्रमाणे एकेरी वाहतूकीतही दुसरीकडून वाहन येण्याची शक्यता विचारात घेऊन काळजी घ्यायला हवी (व्यावहारिक अनुभवावरून) त्याचप्रमाणे चांगल्या उद्देशाने काढलेल्या आंदोलनात देखील दुष्प्रवृत्ती शिरकाव करून आपला स्वार्थ साधण्याची शक्यताही ध्यानात घ्यायला हवी. तुमच्या लेखातील बाकी मुद्यांचा धनाजीराव वाकडे यांनी प्रतिवाद केला असल्याने व मी त्याबाबत सहमत असल्याने पुन्हा त्यात वेळ घालवित नाही.

चिरोटा नवीन

वर म्हंटल्याप्रमाणे कुठून तरी सुरुवात करणे चांगले नाही का? संसदेने गेल्या ६० वर्षात अनेक बिले पास केली अस्तील्.त्या सर्वांचा १००% फायदा झाला का? कुठलाही बदल हा incremental असतो. आपल्याकडे central vigilance commision/Anti corruption Beuro आहे पण त्या संस्था तेवढ्या प्रभावी नाहीत. मग जनलोकपाल असायला काय हरकत आहे? अवांतर- पासपोर्ट एजंट म्हण़जे भ्रष्टाचारास प्रोत्साहन हे कसे? सरकारकडे हे एजंट रजिस्टर असतात. मतदानाच्या दिवशी मुंबईकर सहलीला जात असतील.पण संपूर्ण भारतात तसे होत नाही. मुंबईवरून सगळ्या भारताविषयी अनुमान काढणे योग्य वाटत नाही.

नगरीनिरंजन नवीन

काहीही न करणारा मध्यमवर्ग आज किमान मेणबत्त्या लावायला लागला हे ही नसे थोडके. यातूनच आपल्या शक्तीची आणि कर्तव्यांची जाणीव होत जाईल अशी आशा वाटते. म्हणूनच हे आंदोलन झाले ते चांगलेच झाले पण त्याचा अपेक्षित दूरगामी परिणाम झाला आहे की नाही ते काळच ठरवेल. आपण अनुमान काढायची घाई करू नये.

तिमा नवीन

प्रत्येक गोष्टीला अनेक बाजु असतात. तुम्ही लिहिलेले काही मुद्दे पटले (आधी स्वतः सुधारले पाहिजे वगैरे). तरीही लेख संपूर्णपणे पटला नाही. रिसबुड यांनी म्हटल्याप्रमाणे लोकांच्या आवाजाची शासनाला दखल घ्यावी लागली ही सुरवात आहे. रस्त्यावरची वाहने, जाळण्यापेक्षा मेणबत्त्या जाळलेल्या निरुपद्रवी आहेत. या लोकांनी इतर राजकीय पक्ष करतात तसे जनतेला वेठीला धरले नव्हते. कुठलाही सामान्य माणूस नाईलाज झाल्याशिवाय लांच देत नाही. अडवणुक झाल्याने व वारंवार रजा घेणे शक्य नसणे, व्यवस्थेशी भांडण्यासाठी वेळ व पैसा नसणे या अन्य कारणांनी तो नाईलाजाने लांच देतो. तक्रार करुनही लांच घेणार्‍याला शिक्षा होत नाही कारण त्यांना कुणाची भीतिच राहिलेली नाही अशी परिस्थिती या देशात झाली आहे. बाय द वे, लता आणि आशा यांचे गाणे यावर तुमची रुढीविरुध्द काय मते आहेत ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

नितिन थत्ते नवीन

>>कुठलाही सामान्य माणूस नाईलाज झाल्याशिवाय लांच देत नाही. अडवणुक झाल्याने व वारंवार रजा घेणे शक्य नसणे, व्यवस्थेशी भांडण्यासाठी वेळ व पैसा नसणे या अन्य कारणांनी तो नाईलाजाने लांच देतो. इथे जरा शंका आहे. पुष्कळ वेळा लाच द्यायला लागेल असे गृहीत धरून (conjecture) स्वतःहून एजंट गाठण्याची प्रवृत्ती असते. समजा १०० लायसन्स दिली जातात. सुरुवातीच्या काळात ५ धनाढ्य लोकच वेळ खर्च व्हायला नको म्हणून ओळखी लावून किंवा पैसे चारून लवकर काम करून घेतात. त्याच बरोबर ५ सामान्य लोकांना त्रास होतो. त्या ५ पैकी २ हे कागदपत्रे बरोबर नाहीत, किंवा अन्य कारणाने चकरा मारण्याचे धनी होतात आणि ३ जण हे जेन्युइनली नाडले जातात. बाकी ९० लोकांचे काम सुरळीत होते. हे ५ त्रास झालेले लोक समाजात आपले अनुभव सांगतात-वाचकांची पत्रे वगैरे. (९० लोक अनुभव सांगत नाहीत कारण सुरळीत काम झाले ही सांगण्यासारखी गोष्ट नसतेच-तसे होणे अपेक्षितच असते). त्याचबरोबर वरच्या ५ धनिकांच्या संपर्कातले आणखी ५ धनिक पुढील वेळी काम करून घेण्यासाठी पैसे ऑफर करतात. अशा रीतीने ही संख्या वरच्या बाजूने वाढत जाते. मग अधिकार्‍यांना या गोष्टींची सवय होते आणि आधी जी ९० कामे सुरळीत होत असत त्या सगळ्यातच त्यांची अपेक्षा निर्माण होते. मुद्दा हा की वरच्या बाजूचे स्वतःहून लाच देणारे लोक असतात म्हणून खालच्या बाजूचे लोक नाडले जातात. १०० रु किलो भाव मान्य असलेले भरपूर/पुरेसे लोक असतात म्हणून तूरडाळीचे भाव १०० रु होतात. अन्यथा नाही.

हुप्प्या नवीन

लाच घेणारा आणि देणारा सारखेच दोषी असतात असे मला वाटत नाही. खालील उदाहरणे बघा १. एखाद्याला प्रोजेक्ट करता परदेशी जायचे आहे. पासपोर्ट बनवायचा आहे वा संपलेला पासपोर्ट पुनरुज्जिवित करायचा आहे. आता हा माणूस नियमाप्रमाणे लढायचे केवळ मी स्वतः जाऊन लायनीत उभे राहून योग्य ती नियमित फी भरूनच तो मिळवणार असे म्हणाला आणि त्याकरता प्रसंगी कोर्टात जायची तयारी ठेवली तर त्याची ठरलेली प्रोजेक्ट डेडलाईन संपणार. दुसरा कुणीतरी ती संधी पटकावेल. उलट पासपोर्टचे अधिकारी वरची मलई मिळत नसल्यामुळे आणि सर्व खाचाखोचा माहित असल्यामुळे ह्या माणसाच्या कागदपत्रातील त्रुटी मोठ्या भिंगाने शोधून काढणार आणि त्याला हेलपाटे मारायला लावणार. आता हा माणूस सुस्थितीतला असला आणि कुठेतरी कच खाऊन एजंटच्या मार्फत काम करायचा निर्णय घेतला तर ह्या प्रसंगी दोघांचा दोष सारखा कसे म्हणता येईल? २. एखादा माणूस नोकरीकरता मुंबईतून बंगलोरला गेला. त्याला आपले वाहन तिकडे न्यायचे आहे. त्याकरता तिकडे रजिस्ट्रेशन करायचे आहे. हा एक सामान्य माणसाकरता कर्मकठिण प्रश्न आहे. योग्य ते हात ओले केले नाही तर हे होणे दुरापास्त आहे. आता नव्या नोकरीत रुळलेले नसल्यामुळे रजा वगैरे मिळणे अवघड, नवा परिसर, नवी भाषा सगळेच परके. आता हा माणूस नियमावर बोट ठेवून सिस्टिमशी झुंजेल अशी अपेक्षा कशी करायची? यंत्रणेवर अंकुश नसेल तर नाईलाजाने त्याला लाच देऊनच काम करुन घ्यावे लागेल नाहीतर हातची नोकरी जाईल. उलट आर टी ऑ च्या लोकांचे उत्तम रॅकेट आहे, त्यांना त्यांच्या कामातील बारकावे, नियम उपनियम सगळे माहित. अडवणूक कशी करावी आणि काम सुरळित कसे करावे ह्यात ते वाकबगार. इथे दोघांचा सारखाच दोष आहे म्हणणे अन्यायकारक आहे. ३. एखादा शेतकरी (अगदी सधन आहे असे समजू) आपल्या जमिनीच्या कामाकरता ५०-१०० किमी वरील जिल्ह्याच्या जागी आला आहे. जमिनीचे व्यवहार संपवून आपल्या शेतीच्या कामाकडे वळायची घाई असणारा. ह्याची अडवणूक करून त्याला हेलपाटे मारायला लावणारे अधिकारी आणि नाईलाजाने लाच देऊन काम करुन घेणारा शेतकरी सारखेच दोषी म्हणायचे का? मला नाही वाटत.

चिरोटा नवीन

In reply to by हुप्प्या

सहमत. सगळी जबाबदारी लोकांवर ढकलायची व्रूत्ती काहींमध्ये दिसते.ज्यांच्या हातात अधिकार आहेत त्या व्यक्ती स्वच्छ असतील तर देणार्‍यांचे काही एक चालु शकत नाही. FIR नोंदवताना तर अनेक वेळा पोलिस पैसे मागतात. अशावेळी काय करायचे?

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by हुप्प्या

१. एखाद्याला प्रोजेक्ट करता परदेशी जायचे आहे. पासपोर्ट बनवायचा आहे वा संपलेला पासपोर्ट पुनरुज्जिवित करायचा आहे. आता हा माणूस नियमाप्रमाणे लढायचे केवळ मी स्वतः जाऊन लायनीत उभे राहून योग्य ती नियमित फी भरूनच तो मिळवणार असे म्हणाला आणि त्याकरता प्रसंगी कोर्टात जायची तयारी ठेवली तर त्याची ठरलेली प्रोजेक्ट डेडलाईन संपणार. दुसरा कुणीतरी ती संधी पटकावेल. उलट पासपोर्टचे अधिकारी वरची मलई मिळत नसल्यामुळे आणि सर्व खाचाखोचा माहित असल्यामुळे ह्या माणसाच्या कागदपत्रातील त्रुटी मोठ्या भिंगाने शोधून काढणार आणि त्याला हेलपाटे मारायला लावणार. आता हा माणूस सुस्थितीतला असला आणि कुठेतरी कच खाऊन एजंटच्या मार्फत काम करायचा निर्णय घेतला तर ह्या प्रसंगी दोघांचा दोष सारखा कसे म्हणता येईल? ह्या केसमधे लाच देणारा सकृतदर्शनी दोषी नाही; तो दोषी कधी होतो माहीत आहे! नंतर त्याच्या मित्राला ज्याला पासपोर्ट काढण्यासाठी भरपूर वेळ असतो; त्याला सांगतो कशाला डोक्याची मंडई करतो मी तुला एजंटचा नंबर देतो त्याला १५०० रु दे आणि घे पासपोर्ट काढून. वस्तुतः या माणसाने पासपोर्ट काढलेला असल्याने त्याच्याकडे कोणकोणती कागदपत्रे लागतात याची पूर्ण माहीती नक्कीच असते. पण त्याला कष्ट घ्यायचे नसतात. तिथे सामान्य माणसाचा भ्रष्टाचार चालू होतो.

नितिन थत्ते नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>तो दोषी कधी होतो माहीत आहे! नंतर त्याच्या मित्राला ज्याला पासपोर्ट काढण्यासाठी भरपूर वेळ असतो; त्याला सांगतो कशाला डोक्याची मंडई करतो मी तुला एजंटचा नंबर देतो त्याला १५०० रु दे आणि घे पासपोर्ट काढून. बुल्स आय.

गवि नवीन

In reply to by नितिन थत्ते

ग्रेट लॉजिक.. म्हणजेचः लाच देणे कधी योग्य याचे निकष असे सब्जेक्टिव्ह असायला हरकत नाही. लाच देणे / भ्रष्टाचार योग्य केव्हा ठरतो तर "डोक्याची मंडई" (मनस्ताप) टाळण्यासाठी केला तर नव्हे, तर त्यातून अल्टिमेटली मिळणारे फळ / लाभ (याठिकाणी परदेशी प्रकल्प) असा मजबूत असेल तेव्हा. बाकी इथेच पक्षी भारतात राहून पासपोर्टसाठी खेटे मारायला रिकामटेकडे पडलेल्यांनी कशाला गाठायचे एजंटला? असेच का? निदान प्रथमदर्शनी वाटतंय. अहो. लाच न देण्याने होणारा कालापव्यय किती त्रासदायक असावा आणि वाचणारा वेळ कोणाचा असला की तो किती मूल्यवान हे आपण कसं ठरवू शकतो? अर्ज केलेल्या "सगळ्यांचीच" कामं "डोक्याची मंडई" न होता सरळसोट आणि लवकर व्हावीत याकडे किती दुर्लक्ष करायचं?

रामपुरी नवीन

In reply to by गवि

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे "९० लोकांची कामे सुरळीत झाली" (तशी होत नाहीतच पण समजू) यात समाधान का मानायचं? १०० पैकी १०० लोकांची कामं सुरळीत होण्याची अपेक्षा बाळगण्यात काय गैर आहे?

५० फक्त नवीन

प्रश्न जर ह्या,म्हणजे अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आणि त्याच्या परिणामांचा असेल तर, तो परिणाम शुन्य आहे. संसद हि सार्वभौम आहे या तत्वाचा विसर पडुन किंवा सोयिस्करपणे विसरुन हे आंदोलन उभे केले गेले. जे नंतर केले गेले, आपल्या आपल्या खासदाराच्या घरी जा आणि त्याला घेराव घाला हा मार्ग योग्य होता, त्यासाठी लागणारी व्यवस्था पण लिमिटेड होती, पण या पातळीवर हे आंदोलन टिमअप्ण्णा नेउ शकली नाही हे या आंदोलनाचे सगळ्यात मोठे अपयश आहे, कारण देशातल्या ५४३ मतदारसंघातल्या लोकांना एवढा वेळ नव्हता, जे रिकामे होते त्यांना विंटरेस्ट होता मेणबत्त्य घेउन फिरण्यात आणि एखाद्या टिव्हीवाल्याने एखादा बाईट घेतला तर भले या मध्ये. जे काम करणारे होते ते कामं करत होते आणि या आंदोलकांमुळे होणा-या रस्त्यांवरच्या कोंडिला शिव्या घालत होते. जरी सगळे खासदार दिल्लित असले तरी त्यांच्या गावात घरी कोणी तरी असणारच होतं, एकट्या अण्णांनि तिथं बसुन गफ्फा मारण्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघात जर माणसं त्या त्या खासदाराच्या घरासमोर गेट बंद करुन उपोषणाला बसली असती तर हे विधेयक मंजुर होण्याचा चान्स जास्त होता, पणं हे झालं नाहि कारण लोकांना लोकल लेव्हलला त्यांची कामं सरकारी असतील किंवा खाजगी, करुन घ्यायला खासदाराची मदत घ्यावी लागते. विशेषतः दक्षिण भारतातल्या राज्यांचा या आंदोलनात फारसा नसलेला सहभाग हि खटकणारी गोष्ट नाही का, फक्त चार पाच मोठी शहरं म्हणजे देश होत नाही. यापेक्षा जे आहेत त्या नियमांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर बराच मोठा बदल होउ शकेल. शेवटी अण्णा हजारेंना विलासराव देशमुखांचं ऐकावं लागलं ह्यातच सगळं आलं, काय आहे, राष्ट्रिय नेत्यांना लोकल लफड्यांची माहिती नसते जास्त त्यामु़ळं अण्णा त्यांचं ऐकायच्या बाहेर होते पण आपला गाववाला ज्याला आपण गावात काय काय उद्योग केले आहेत याची माहिति आहे, त्याला काय फिरवणार होते अण्णा. एक थेअरी अशी आहे की, ज्या सावंत कमिशनचा रिपोर्ट बदलण्यासाठी मांडवलि करुन तुम्हि पण निर्दोष आम्हि पण निर्दोष या कंडिशनवर सगळ्यांना मोकळं सोडलं, वेळ आलीच तर त्या मंत्र्याची आहुती देण्याची तयारी कांग्रेसने केली होती.

धन्या नवीन

In reply to by ५० फक्त

जे रिकामे होते त्यांना विंटरेस्ट होता मेणबत्त्य घेउन फिरण्यात आणि एखाद्या टिव्हीवाल्याने एखादा बाईट घेतला तर भले या मध्ये. जे काम करणारे होते ते कामं करत होते आणि या आंदोलकांमुळे होणा-या रस्त्यांवरच्या कोंडिला शिव्या घालत होते.
प्रचंड सहमत आहे. एरव्ही जयंत्या, मयंत्या, वाढदीवसाच्या निमित्ताने लोक चौकाचौकात फ्लेक्सवर चमकून घेतात. यावेळी अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा आहे म्हणून चमकून घेतलं.

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by ५० फक्त

ज्याला स्वतःला भ्रष्टाचार करावयाचा आहे किंवा स्वतःच्या फायद्यासाठी भ्रष्टाचार हवा आहे त्याना हे आंदोलनाचे यश खटकणार ते आंदोलकाना हजारो उपदेश करणार हे ठीकच आहे. त्यामुळे आपला प्रतिसाद वाचून काहीही वेगळे वाटले नाही. इथल्या चर्चेमुळे आपला असाच काहीतरी प्रतिसाद येईल हे अपेक्षित होते. असो. जर कोणाला सदर आंदोलनाची व्याप्ती ४-५ मोठी शहरे इतकीच वाटत असेल तर तो गोड गैरसमज आहे इतकेच म्हणेन. ४-५ महानगरे प्रत्येक राज्यातली असे म्हणायचे असेल तर ठीक. पण फक्त पुणे जिल्ह्यातच छोट्या छोट्या अनेक गावातून लोकांनी काढलेल्या मोर्चांचे फोटो पेपर मधे पाहीले होते त्यामुळे हे तुमचे मत फारसे मनावर घ्यावेसे वाट्ले नाही. असो. शेवटी घाशीराम कोतवालाचा बोध हाच आहे की "जनता भ्रष्ट असते तेव्हाच सत्ता भ्रष्ट असते"

हुप्प्या नवीन

केवळ ग्राम्य शिवराळ वाटणारे शब्दप्रयोग केले (पक्षी: डोक्याची मंडई इ.) म्हणून इथे त्या माणसाला दोषी ठरवता येईल का? मला नाही वाटत. एखाद्याने पासपोर्ट रीतसर मिळवायला आठवडा दोन आठवडे प्रयत्न केले आणि डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर निमूट मूग गिळून एजंटला पैसे चारून आपले काम करुन घेतले तर तो आपल्या मित्राला काय सल्ला देईल? खरोखरच मित्राचे भले करायचे असेल तर तो त्याला एजंटचा पत्ता आणि अटी सांगून त्याचे आठवडा दोन आठवड्याचे हेलपाटे वाचवेल. आणि त्याचा अनुभव बघता त्याचा सल्ला चुकीचा कसा म्हणता येईल? एका सामान्य माणसाला जो केवळ परिस्थितीमुळे कुठल्याशा सरकारी ऑफिसात आपले काम करुन घ्यायला आला आहे अशा माणसाची अडवणूक होते आहे, त्याला सरकारी बाबू नडत आहेत असे दिसल्यावर त्याला भारतात नक्की काय पर्याय आहेत? कोर्टात जाणे? कुण्या आमदार, खासदार्,मंत्र्याचे पाय धरणे का कुठल्या गावगुंडाला सुपारी देणे? मला वाटते एजंटला लाच देणे हाच व्यवहार्य पर्याय शिल्लक रहातो.

हुप्प्या नवीन

लोकसत्तेतले हे पान वाचा. सामान्य लोकांना कुठल्या कुठल्या प्रसंगी लाच द्यावी लागली http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=179131:2011-08-27-17-54-32&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 हे अनुभव वाचून ह्या लाचा खाणारे आणि त्या खिलवणारे सारखेच दोषी आहेत असे मला तरी म्हणवत नाही. लोकांच्या असहायतेचा फायदा घेणारे सरकारी अधिकारी जास्त दोषी आहेत.