मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रांतितीर्थ

प्रचेतस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
स्वदेशहिताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोट्यावधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. -- दामोदर हरी चापेकर २२ जून १८९७, बरोबर ११४ वर्षांपुर्वी याच दिवशी प्लेगच्या साथीमध्ये जनतेवर अनन्वित अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड याचा क्रांतीवीर चापेकर बंधूंनी - दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण हरी चापेकर यांनी गणेशखिंडीनजीक वध केला. या दोघांना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. यथावकाश त्यांनाही अटक झाली. दामोदर हरी चापेकरांना १८ एप्रिल १८९८, वासुदेव हरी चापेकर यांना ८ मे १८९९, बाळकृष्ण हरी चापेकर यांना १२ मे १८९९ व महादेव विनायक रानडे यांना १० मे १८९९ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. मातृभूमीसाठी बलिदान केलेल्या व विस्मृतीत जात असलेल्या ह्या महान क्रांतीकारकांना मानाचा मुजरा. सोबत आहेत चिंचवड येथील चापेकर यांच्या वाड्याची काही छायाचित्रे. क्रांतीवीर चापेकर यांचा वाडा वाड्याचा अंतर्भाग चापेकरांच्या देवघरातील उजव्या सोंडेचा गणपती क्रांतीवीर चापेकर बंधू चापेकरांची फाशी निश्चित केल्याचे येरवडा तुरूंगाधिकार्‍याचे पत्र येरवडा तुरुंगातील चापेकर बंधू आणि रानडे यांना ठेवलेल्या कोठड्या येरवडा तुरुंगातील चापेकर बंधू आणि रानडे यांच्या बलिदानाचे स्थान चापेकरांनी न्यायालयात उच्चारलेले वाक्य महान क्रांतीकारक

वाचने 12658 वाचनखूण प्रतिक्रिया 39

सुनील 22/06/2011 - 14:55
प्लेगच्या साथीमध्ये जनतेवर अनन्वित अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी ह्यावर जरा अधिक माहिती द्यावी. जसे की, रँडने प्लेग आटोक्यात आणण्यासाठी नक्की काय काय केले? त्याची गरज होती काय? त्याशिवाय प्लेग आटोक्यात येऊ शकला नसता काय? रँडच्या उपाययोजनांनंतर प्लेग आटोक्यात आला काय?

In reply to by सुनील

प्रचेतस 22/06/2011 - 20:10
लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसणे, देवघरात जाणे, स्त्रियांशी असभ्य वर्तन करणे, हीन वागणूक देणे, लोकांना त्यांच्या घरातून बाहेर हिसकावून त्यांची घरे त्यांच्या डोळ्यांदेखत जाळणे, घरातील सोन्याचांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू लूटणे असले हिडीस प्रकार रँड व त्याच्या पोलीसांनी सुरु केले, रोगापेक्षा इलाज भयंकर झाला. वास्तविक प्लेग हटवण्यासाठी इतर क्रूर प्रकारांची जरूरी नव्हतीच. पण या भयंकर इलाजांनी प्लेग आटोक्यात आला हे नक्कीच, पण प्लेगने होणार नाहीत इतके अत्याचार मात्र जनतेवर झाले.

In reply to by प्रचेतस

शैलेन्द्र 22/06/2011 - 21:28
"पण या भयंकर इलाजांनी प्लेग आटोक्यात आला हे नक्कीच, पण प्लेगने होणार नाहीत इतके अत्याचार मात्र जनतेवर झाले." प्लेग आटोक्यात आला तो या भयंकर इलाजांपेक्षाही ज्याला "आयसोलेशन" म्हणतात त्याने.. गोची ही होती की सुक्ष्मजीवशास्त्राची माहीतीच समाजाला नव्हती. लोकांचे प्रबोधन करुन मग त्यांचे सहकार्य मिळवावे इतकी इच्छाशक्ती, संयम, वेळ ब्रिटीश सरकारकडे नव्हता. लोकांचे जीव महामारीपासुन वाचवण्याची त्यांची धडपड अनेक इतेद्देशीय राज्यकर्त्यांपेक्षा कदाचीत जास्त प्रामाणीक असेल, पण भारतीय मानसीकतेला ती झेपली नाही. "लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसणे, देवघरात जाणे," बरीच लोक, घर सोडुन जाणे टाळण्यासाठी लपुन बसायची.. महीला वर्ग तर सर्रास.. त्यावेळी महिला पोलीस नव्हत्या, शिवाशीवीच्या अतीरेकी कल्पना होत्या. त्यामुळे हा संघर्ष झाला असावा. "घरातील सोन्याचांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू लूटणे " या प्रकारात आपले स्वकीय लोकही मागे नसावेत अस समजायला बरीच जागा आहे चापेकर बंधुंच्या हौतात्म्याबद्दल मला अतिव आदर आहे, पण त्याच वेळी एक राज्यकर्ते म्हणुन ब्रिटीशांपुढे फार पर्याय होते असे मला वाटत नाही.

In reply to by शैलेन्द्र

नितिन थत्ते 22/06/2011 - 22:29
लोकांचे जीव महामारीपासुन वाचवण्याची त्यांची धडपड अनेक इतेद्देशीय राज्यकर्त्यांपेक्षा कदाचीत जास्त प्रामाणीक असेल, पण भारतीय मानसीकतेला ती झेपली नाही. "लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसणे, देवघरात जाणे," बरीच लोक, घर सोडुन जाणे टाळण्यासाठी लपुन बसायची.. महीला वर्ग तर सर्रास.. त्यावेळी महिला पोलीस नव्हत्या, शिवाशीवीच्या अतीरेकी कल्पना होत्या. त्यामुळे हा संघर्ष झाला असावा.
हा दुवा रोचक आहे.

In reply to by नितिन थत्ते

सुनील 24/06/2011 - 14:50
यादी रोचक आहेच. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला लिहिलेल्या पत्राची आठवण झाली. स्वयंपाक घर आणि देव घरात प्रवेश करतेवेळीच्या सुचना विशेष भावल्या. अर्थात, ह्या सुचनांची अंमलबजावणी कशी झाली हेही पहावे लागेल. यावरून एक प्रश्न पडतो. १८९६ च्या प्लेगची साथ ही काही भारतातील पहिली साथ नसावी, तत्पुर्वीही अशा अनेक साथी येऊन गेल्या असतील ज्यात हजारो-लाखो लोक म्रुत्यूमुखी पडले असतील. तेव्हा तत्कालीन राज्यकर्त्यांनी नक्की काय केले? किंबहुना, रोगाची साथ थांबवणे/आटोक्यात आणणे ही राजकर्त्यांची जबाबदारी आहे, हे तरी तत्कालीन समाजात समजले जात होते किंवा नाही? प्लेगची साथ आटोक्यात आणण्याविषयीच्या ब्रिटिशांच्या हेतू बद्दल शंका घेता येत नाही. अंमलबजावणी मात्र थोडी कडक झाली असावी.

In reply to by सुनील

विकास 24/06/2011 - 19:14
प्लेगची साथ आटोक्यात आणण्याविषयीच्या ब्रिटिशांच्या हेतू बद्दल शंका घेता येत नाही. त्या हेतूंसंदर्भात आणि अंमलबजावणीच्या संदर्भात (पण होण्याआधी) टिळकांनी पाठींबा दिला होता. पण नंतर जेंव्हा स्पेशल ऑफिसर म्हणून रँडला पाठवले तेंव्हा सगळे बदलले. अंमलबजावणी मात्र थोडी कडक झाली असावी. रँड चे नाव आधीच फार चांगले नव्हते. त्यात त्याने येथे बदली झाल्यावर म्युनिसिपल कौन्सिलमधील "नेटीव्ह जेंटलमेन्स" वर टिका करत त्यांना बाजूला सारत त्याच्या व्यतिरीक्त एक (गोरा) लष्करी अधिकारी आणि एक (गोरा) डॉक्टर यांची कमिटी तयार केली आणि कडक आदेश देत ब्रिटीश सैनिकांना घरतपासणीस पाठवले. त्यातही अजून एक महत्वाचा भाग असा होता की त्याने जे काही हे उपाय म्हणून करायचे ठरवले होते, ते त्याने आधी मुंबईला पण केले होते पण त्याचा परीणाम हवा तसा झाला नव्हता. त्यामुळे टिळकांचा त्याला देखील आक्षेप होता की याचे (रँडचे) उपाय आणि पद्धती ह्यांचा उपयोग झालेला नसताना परत तसेच का करायचे? अर्थात रँड हा अरेरावी करणाराच ऑफिसर असल्याने त्याने काही नेटीव्ह पुढार्‍यांचे ऐकले नाही. त्यामुळेच टिळकांनी "Her Majesty the Queen, the Secretary of State and his Council, should not have issued the orders for practising tyranny upon the people of India without any special advantage to be gained. ...[T]he government should not have entrusted the exeution of this order to a suspicious, sullen and tyrannical officer like Rand" असे म्हणले होते. अजून एक न ऐकलेले/वाचलेले प्रकरण ह्याच पुस्तकात (खाली संदर्भ आहे) वाचायला मिळाले. त्याप्रमाणे गोपाळ कृष्ण गोखले हे देखील रँडच्या या पद्धतीवर नाराज होते. त्यांनी ब्रिटनच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांशी बोलताना कडक टिका केली: "...British soldiers "let loose on the town" of Pune were ignorant of Indians' language, customs, and sentiments and his informants reliably reported the rape of two women, one of whom committed suicide rather than live with shame." पुढे ते असे देखील म्हणाले की दोन बायकांवर अतिप्रसंग झाले आणि त्यातील एकीने आत्महत्या केली. पण त्यांना हे सिद्ध करता आले नाही त्यामुळे त्यांना या वाक्याबद्दल माफी मागावी लागली. मात्र या दोन घटनांवरून एक दिसते की रँडच्या वर्तनासंदर्भात जहाल-मवाळ दोघेही नाराज होते आणि त्यांची टिका परखड आणि जाहीर होती. संदर्भः Plague ports: the global urban impact of bubonic plague,1894-1901, by Echenberg, Myron J. (पृ. ६६-६८) (गुगल बुक्सवर हा चॅप्टर वाचता येऊ शकतो).

In reply to by शैलेन्द्र

अलख निरंजन 22/06/2011 - 22:31
चापेकर बंधुंच्या हौतात्म्याबद्दल मला अतिव आदर आहे, पण त्याच वेळी एक राज्यकर्ते म्हणुन ब्रिटीशांपुढे फार पर्याय होते असे मला वाटत नाही. शैलेंद्र ह्यांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. त्याअनुषंगाने आणखी काही मुद्दे १. चापेकर की चाफेकर? मी अनेक पुस्तकांमधे चाफेकर असे वाचले आहे. चापेकर हा चाफेकरचा इंग्रजांनी केलेला अपभ्रंश आहे का? २. चाफेकर बंधूना सैन्यात भरती व्हायचे होते पण त्यांचा अर्ज तत्कालीन सिमला सरकारने डावलल्याने त्यांचा इंग्रजांवर रोष होता असे त्यावेळच्या वर्तमानपत्रांमधे छापुन आले होते. ते खरे आहे काय? ३. चाफेकरांचे फोटोतले जे वाक्य आहे त्याचा नेमका अर्थ काय? जे इंग्रजांच्या विरोधात मारले गेले नाहीत ते सगळेच दोषी म्हणजे काय? सगळेच क्रांतिकारी काही इंग्रजांकडून मारले गेले नाहीत. ते सर्व दोषीच का? ३. क्रांतिकारकांप्रती अतीव आदर दाखवणार्‍यांनी (वल्ली धरुन) 'क्रांतितीर्थ' हा शब्दही अशुद्ध लिहिला आहे. ह्याला काय म्हणावे? ü

In reply to by अलख निरंजन

शैलेन्द्र 22/06/2011 - 22:48
"क्रांतिकारकांप्रती अतीव आदर दाखवणार्‍यांनी (वल्ली धरुन) 'क्रांतितीर्थ' हा शब्दही अशुद्ध लिहिला आहे. ह्याला काय म्हणावे? ü" अशुद्ध लिहिलाय तर अशुद्धलेखन म्हणुया हो फार तर, अजुन काय म्हणनार? भावनाओंको समजो ना दादा..

In reply to by शैलेन्द्र

आनंदयात्री 22/06/2011 - 22:56
>>अशुद्ध लिहिलाय तर अशुद्धलेखन म्हणुया हो फार तर, अजुन काय म्हणनार? भावनाओंको समजो ना दादा.. अहं, असे नसते म्हणायचे !! >>"क्रांतिकारकांप्रती अतीव आदर दाखवणार्‍यांनी (वल्ली धरुन) 'क्रांतितीर्थ' हा शब्दही अशुद्ध लिहिला आहे. ह्याला काय म्हणावे? काय म्हणावे !! बरं बरं .. चुकलं हां... अन हो .. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरकां !!

In reply to by शैलेन्द्र

अलख निरंजन 22/06/2011 - 23:04
अशुद्ध लिहिलाय तर अशुद्धलेखन म्हणुया हो फार तर, अजुन काय म्हणनार? भावनाओंको समजो ना दादा.. अहो साहेब ते तर आहेच. "सब चलता है! भावनाओंको समझो" ह्यावरंच तर अख्खा देश चालला आहे. पण मग उगाच हेच लोक क्रांतिकारक, त्यांचे बलिदान, आपण कसे षंढ ह्यावर टिपे गाळतात तेव्हा किमान क्रांति हा शब्द शुद्ध लिहा असे सुचवासे वाटते इतकेच.

In reply to by अलख निरंजन

शैलेन्द्र 23/06/2011 - 08:30
"पण मग उगाच हेच लोक क्रांतिकारक, त्यांचे बलिदान, आपण कसे षंढ ह्यावर टिपे गाळतात" ष्ट्रांग आब्जेक्षन... हेच लोक कशाला.. आपण सारेच कधीतरी टीपे गाळतोच.. शुद्धलेखन व ही सवय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाकी शुद्धलेखनाच म्हणाल तर माझ्यासारख्या काही लोकांची ती मर्यादा आहे, तथाकथीत "अचुक व शुद्ध" लिहिण्याची कुवत, ज्ञान मुळातच नाही व त्याकडे फार लक्ष देण्याची मानसीकताही नाही.

In reply to by शैलेन्द्र

सूड 23/06/2011 - 19:34
@ अलखनिरंजन बा द वे 'क्रांतिकारकांप्रति' की 'क्रांतिकारकांप्रती' हो ?? प्रती म्हणजे नग ना ? नाही म्हणजे चुकत असेल तर सांगा ब्वॉ.

नारयन लेले 22/06/2011 - 15:05
आठ्वण ठेवुन सु॑दर लेख लिहल्या बद्दल आभिन॑दन. " गेलेते दिवस उरल्या नुसत्या आठ्वणी " येवढेच, कारण स्वार्थी आजच्या राजकारणी लोकाना या आशा क्रांतीकारकांची आठ्वण येत नाही. आशा क्रांतीकारकांची आठ्वण काढुन त्याना का॑ही मते मिळत नाहीत. पर॑र्तु आशाच क्रांतीकारकांन मुळेच आपण स्वत॑त्र झालो हे भारतियानि विसरता कामानये. चाफेकरांना आणि सर्वच क्रांतीकारकांना माझे विनम्र आभिवादन. विनित

प्यारे१ 22/06/2011 - 15:05
छान माहिती वल्ली. क्रांतिकारकांना आदरांजली. अवांतरः भारताला स्वातंत्र्य नक्की कुणामुळे मिळालं हा प्रश्ण अनुत्तरीतच राहतोय का?

In reply to by अलख निरंजन

आत्मशून्य 23/06/2011 - 08:11
साहेब, खरो़खर आनंद झाला आपली प्रतीक्रीया वाचून... नाहीतर आजकालच्या तूमच्या माझ्या सारख्या तरूणांना कूठे आला रस आणी वेळ आपला इतिहास आणी क्रांतीकारकांचे विचार ऐकायला/ समजून घ्यायला ? असो, आपण वाक्य वाचलत ना ? समजा असं गृहीत धरलं की ते डोक्यावरून गेलं तरी त्यामूळे काही तरी विचार तूमच्या मनात निर्माण झालेच असतील ? ते इथे लिहा जर "इंटप्रीटेशन" चूकत असेल तर माझ्या कूवतीनूसार आपली मदत करेन... माझ्या कूवतीपलीकडे माझी पोच नाही इतकच इथ नमूद करून आपल्या विचारांना इथ मोकळे करा असे निवदन करतो... धन्यवाद. अवांतर :- माझ्या अशूध्द लेखनाबद्दल जसा मला माज नाही तसच लाजही नाही तेव्हां तेव्हड्या गोश्टींवर फक्त घसरू नका...

चापेकर वाडा/ शाळेच्या (सध्याचे नाव क्रांतीतीर्थ) मागेच आमचा वाडा होता. वाड्यातल्या बहुतेकांची प्राथमिक पर्यंतची शिक्षणे ह्याच शाळेत झाली. वाड्यात प्रवेश केला की लगेच चापेकरांची बंदुकधारी प्रतिमा लक्ष वेधुन घेत असे. टिमवीच्या संस्क्रुतच्या परिक्षा कधी कधी ह्याच वाड्यात होत. वाड्याच्या मागच्या अंगणात एक तालीम सुद्धा होती जी शाळा सुटल्यावर भरत असे. एक विहिर सुधा होती. गमतीचा भाग म्हणजे वाड्याच्या भिंतीवर आघाडा बर्याच प्रमाणात होता आणि श्रावणातले आईचे एक ठरलेले काम करून द्यायचे असायचे ते म्हणजे भिंतीवरचा आघाडा काढून आणणे. तुमच्या ह्या लेखाने एकदम सर्व आठवणी जाग्या झाल्या. वाड्यातल्या त्या मंतरलेल्या दिवसांबद्द्ल एकदा सवडीने लिहिन.

आनंदयात्री 22/06/2011 - 18:52
उत्तम छायचित्रे. चापेकर वाड्याची सफर घडवलीस. धन्यवाद. क्रांतीतीर्थ चापेकरांना विनम्र अभिवादन.

गणेशा 22/06/2011 - 20:27
चापेकर बंधुंना आदरांजली.. वल्लीचे विशेष आभार. सकाल पासुन १० दा तरी रिप्लाय साठी ट्राय करतोय. अवांतर : त्या न्यायालयात उच्चारलेल्या वाक्याखाली तरी 'चापेकर' असा बरोबर उल्लेख निट हवा होता..

सर्वसाक्षी 22/06/2011 - 22:59
त्या तेजस्वी भावंडांना विनम्र मानवंदना. औचित्यपूर्ण लेखनाबद्दल व चित्रांबद्दल आभार.

हेम 23/06/2011 - 11:09
चाफेकर बंधूंना वंदन. २२ जून १८९७ हा चित्रपट लहानपणी पाहिलाय, त्याचे चित्रण याच वाड्यांत झाले होते कांय???

चित्रगुप्त 21/09/2023 - 13:57
दामोदर चापेकरांच्या कवितांवरील लेखाच्या निमित्ताने हा लेख आज वाचायला मिळाला. सगळे फोटो उत्तम आहेत. वाड्याच्या दर्शनी भिंतीच्या लाल विटा मूळच्याच आहेत किंवा कसे ? अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 21/09/2023 - 14:06
विटा अलीकडच्या आहेत, वाड्याचा बर्‍यापैकी जीर्णोद्धार झालाय. मागच्याच आठवड्यात राज्यपाल महोदय वाड्यात येऊन गेले.