दिर्घकथा : जलजीवा (भाग- ६)

निमिष सोनार जनातलं, मनातलं
पावसाच्या थेंबापासून तयार होणार्‍या त्या स्त्रीचा चेहेरा तयार झालयानंतर मानेपासूनचा खालचा भाग हळूहळू तयार होत होता. मग त्या स्त्रीची पूर्ण आकृती तयार झाली. एक अद्भुत सुंदर स्त्री. यापेक्षा सुंदर स्त्री या भूतालावर असूच शकत नाही, असे वाटण्याइतकी सुंदर आकृती तेथे तयार होत होती. तीचे डोळे अजूनपर्यंत बंद होते. ती पाठमोरी होती. तीने डोळे उघडले आणि अमेयकडे बघितले. तीच् ती! त्या दिवशी भेटलेली. अमेय उठून उभा राहीला आणि त्या अद्भुत दृश्याकडे पाहू लागला. डोळ्याची पापणी न लवता तो समोर बघत होता. त्याला आठवले : "मागच्या वेळेस ती स्त्री त्याला जेव्हा प्रथम भेटली होती तेव्हा ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात असताना काही वेळ त्याला कसा गेला ते कळलेच नाही, जवळपास एखाद्या संमोहनासारख्या अवस्थेत तो होता आणि त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर नंतर पाण्याने पूर्ण ओला झालेला होता आणि ती मात्र तेथे नव्हती" अ‍ॅनाचा कॉल आल्याने वा़जणारा मोबाईल उत्तर न मिळाल्याने थोड्यावेळाने वाजणे बंद झाला. एव्हाना ते तळ्यातले वर डोके काढणारे बुडबुडे जास्त वेळा वर खाली व्हायला लागले, ते आता पूर्ण वर आले आणि पाण्यात पूर्ण उभे राहीले होते आणि आता तळ्यातल्या अंधारात उभे होते सात पाणी-सदृश्य मानव! चमकणारे डोळे असणार्‍या पाणीयुक्त मानवाकृती. ते सात पाणी-मानव होते किंवा जलजीवा. ते सातही जलजीवा एकमेकांकडे पाहून हसत होते. मग ते त्या स्त्रीकडे पाहून ओळखीचे हसले. एक जलजीवा म्हणाला: "मागच्या वेळेस आपण चुकलो आता चुकणार नाही." दुसरा जलजीवा म्हणाला: "इथपर्यंत येणे काही साधी गोष्ट नाही. किती वर्षे निघून गेलीत, तेव्हा आपण येथेपर्यंत आणि या साध्यापर्यंत पोचलो आहोत. पण आपल्यासाठी काळ, वेळ गौण आहे. काळ-वेळाच्या सीमारेषेंचे बंधन आपण कधीच तोडले आहे. आता लवकरच आपल्याला विविध ठीकाणी सावजांच्या शोधात जायचे आहे. आपण निवडलेले ते अनेक सावज." तिसरा जलजीवा म्हणाला: "आता वेळ आली आहे. सगळ्या दुनियेला आता कळेल लवकरच. आम्ही कोण आहोत ते!" ते जलजीवा एकमेकांशी बोलू लागले. नमातुआ जोराजोरात किलकिल करू लागला. तेथे मग पाच सहा नामातुआ पक्षी आले. त्या जलजीवांनी त्या पक्ष्यांवर हल्ला चढवला. तळ्यातले पाणी स्वयंस्फूर्तीने तळ्यातून वर जावून त्या पक्ष्यांच्या अवती भवती घोंगावू लागले. त्त्या पक्ष्यांच्या नाकातोंडात घुसू लागले. ते पक्षी जीवाच्या आकांताने ओरडू लागले आणि तेथून पळून गेले. एक जंगल. मध्यवर्ती ठिकाणातले तळे. संध्याकाळ. पाऊस पडतोय. अंधारलेल्या त्या तळ्यात उद्भवलेले सात जलजीवा आणि एक स्त्री जलजीवा. त्यांच्या मधोमध सापडलेला अमेय. मागच्या वेळेस तो आला होता तेव्हा फक्त तीच तेथे होती. ते तळयातले सातजण तो प्रथमच पाहात होता. ती स्त्री-जलजीवा त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत होती. अमेय ला हे दृश्य पाहून भोवळ आली. भोवळ येता येता त्याने एक नांव त्या सगळ्या जलजीवांच्या तोंडून पुसटसे ऐकले. ते नांव त्याने या आधी नक्की ऐकले होते असे त्याला वाटत होते.. पण काही समजण्याच्या आतच तो कोसळला. पण अंगात त्राण होते. तो उठून पळायला लागला. ते तळ्यातले पाणी जलजीवांच्या रुपाने आपोआप वर उडाले आणि अमेयच्या मागे मागे येवू लागले. ते पाणी अमेयच्या शरीराला वेढा घालू लागले. तो जीवाच्या आकांताने पळू लागला. पाणी पायापासून त्याच्या शरीराला वेढा घालत घालत कमरेपर्यंत येत होते. *** "व्ह्याय अमेय नॉट पिकींग अप फोन?" अ‍ॅना विचार करत होती. तीच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. ते सांगायला तीने त्याला फोन केला होता. "कुठे गेला असेल तो? आणखी थोड्यावेळाने ट्राय करून बघते." असे म्हणून ती कार मध्ये बसली आणि तीच्या आईला जेथे अ‍ॅडमीट केले होते त्या हॉस्पीटल मध्ये ती जायला निघाली. आई बेशुद्धावस्थेत होती. तीला अचानक भोवळ आली होती. त्यानंतर तीला दवाखान्यात अ‍ॅडमीट केले होते. संध्याकाळी तीने पुन्हा अमेयला कॉल केला पण कुणी उचलत नव्हतं. *** संध्याकाळी सहा वाजता काकूंना चिंतेत पाहून अशोकराव म्हणाले, "काय ग? काय झाले? अहो अमेयचा नंबर लागत नाही आणि तुम्हाला फोन करत होते तर तुमचा नंबय सतत बिझी येतोय. " अशोकराव - " काय? म्हणजे अजून अमेय घरी आला नाही? मी तर त्याला फोन केला होता, पावसाचं लवकर निघण्यासाठी... अजून आला कसा नाही?" तेवढ्यात अशोकरावांच्या मोबाईलवर कॉल आला. मुंबईहून. अरविंद म्हणजे अमेयचे वडील यांचा. अरविंद- "अमेय ला कॉल केला तो उचलत नाही म्हणून तुम्हाला केला. कुठे आहे तो?" अशोक - "अरे मी आता बाहेरून येतोय. अमेय अजून आला नाही. मी ही त्याला लवकर निघून येण्यास सांगितले होते, पण अजूनपर्यंत तो आला नाही. मी जातोय त्याला आता बघायला. माझ्या सोबत काही जणांना घेवून जातो" अरविंद- "काय? मला वाटते तो आज एकटा होता. त्याची टीम उद्या येणार होती. त्याचा मित्र जितिन? तो नाही का गेला त्याचेबरोबर आज?" अशोक - "तसा काही धोका नाही आहे तेथे, पण ... मी आता जातो आणि कळवतो. तू निश्चिंत रहा." अशोकराव त्यांची मोटारसायकल घेवून जंगला कडे निघाले. "अगं! मी येतो. असेल कुठेतरी. कदाचीत तो रस्त्याने परत यत असेल आणि मोबाईल कुठे विसरला असेल. मी बघतो." असे म्हणत आणि रेनेकोट अंगावर चढवत त्यांनी आपली मोटारसायकल सुरु केली. त्यांनी सोबत टॉर्च घेतला होता. तो जार्वार पर्वताच्या पायथ्याशी गेला असेल याची त्यांना कल्पना होती. पाऊस थोडा थोडा पडत होताच. त्यांनी शेतातला गडी धोंडू याला ही सोबत घेतले होते. गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता. संध्याकाळचे सहा वाजले होते. नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव आला. मग वर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आला आणि मग ते शर्वरी जंगल होते. स्थानिक लोकवस्ती होती. त्यांच्या झोपड्यांत अंधुक प्रकाश येत होता अन मग पुढे सुना कच्चा रस्ता. कच्च्या रस्त्यावर पावसात गाडीचा प्रकाशझोत पडत होता. नामातुआ जोरात ओरडत यांच्या गाडीच्या मागे येत होता. एव्हाना जितिनलाही ही खबर काकूंकडून कळली आणि तोही अशोकरावांच्या गाडी मागोमाग मोटारसायकलवरून आला. *** दिल्ली आणि मुंबईहून आलेली टीम आसंद जवळच्या एका शहरातल्या हॉटेलमध्ये सात वाजता येवून थांबली होती. त्यात त्रीशा आणि भार्गवी दोन्ही होत्या. त्यांनी आल्यावर सेटल झाल्यावर अमेयला कॉल केला. पलीकडून अमेयचा फोन उचलला गेला. (क्रमश:)
वर्गीकरण
लेखनप्रकार

7 टिप्पण्या 3,987 दृश्ये

Comments

नन्दादीप नवीन

लवकर टाका पुढचा भाग.....हा पण भाग मस्त...उत्कंठावर्धक..

निमिष सोनार नवीन

आतापर्यंतचे सगळे भाग एकत्र वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट देवू शकता: http://nimishnsonar.blogspot.com/ किंवा मिसळपावच्या लिंक्स खाली देत आहे- दिर्घकथा : जलजीवा (भाग- 1) http://www.misalpav.com/node/16118 दिर्घकथा : जलजीवा (भाग- 2) http://www.misalpav.com/node/16147 दिर्घकथा : जलजीवा (भाग- 3) http://www.misalpav.com/node/16163 दिर्घकथा : जलजीवा (भाग- 4) http://www.misalpav.com/node/16189 दिर्घकथा : जलजीवा (भाग- 5) http://www.misalpav.com/node/16200