Skip to main content

दत्तजयंतीच्या निमित्ताने...

लेखक अवलिया यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही. ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. कथा ठळक टाईपात असुन त्यावरचे माझे निरुपण नेहमीच्या ठशात आहे याची नोंद घ्यावी. एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. कोणताही मनुष्य देवभक्ति ज्या अनेक हेतुंनी करत असतो त्यात देवाचे दर्शन, देवाची माहिती त्याचप्रमाणे मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती, कुठे द्वेष भावनेवर आधारीत कुणाचे वाईट व्हावे ही इच्छा तर कुठे सगळ्यांचे चांगले व्हावे ही इच्छा असते. मनातील अनेक भावनांचा विचार करता मनुष्य ज्या काही विविध इच्छा मनात बाळगतो त्या सर्वांचे प्रतिबिंब देव भक्ति या भावनेच्या आविष्कारात आढळते. परंतु वरकरणी मनुष्य मला देवदर्शनाचीच आस आहे, बाकी ऐहिक सुखाची लालसा अजिबात नाही असेच दाखवत गुरुला मार्ग विचारतो. गुरु अशा विविध पद्धतीच्या साधकांना चांगला ओळखुन असल्याने त्यांच्यातले योग्य साधक कोणते हे परिक्षेने ठरवतो. याकथेत सुद्धा हे रुपकाच्या माध्यमातुन सुचवले आहे. गुरुकडे शरण आलेल्यांकडे हौशे, गवसे, नवसे असतात. त्यातले नक्की कसे कोण आहेत हे काही काळ गेल्यावर समजते. गुरु सर्व साधकांना, शिष्यांना परमेश्वरापाशी भाव दृढ करा असे सांगतात. स्वतः त्यांच्याबरोबर असतात. विविध दृष्टांत आणि कथांच्या सहाय्याने मुल तत्वज्ञानाचा उपदेश देतात. कित्येक शिष्य अशा प्रसंगी आपण गुरुला विचारले काय आणि गुरु सांगतो काय या विचाराने गडबडून जातात. देव आपल्याला शक्ती देईल, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल या आशेने आपण आलो पण इथे गुरुने ही तर वेगळीच पोपटपंची लावली असा अनेक शिष्यांचा ग्रह होतो आणि ते शिष्य अशा गुरुला सोडून जातात. मात्र खरा गुरु त्यांचे सुद्धा भलेच होवो असाच आशीर्वाद देतो. कसे घडते हे आता आपण रुपककथेत पाहू. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले. गुरु शिष्याला या विश्वाचे रहस्य, जीव कोण, ईश्वर कोण आहे हे सांगणार आहे. पण त्याची तयारी आहे का हे पण पाहिले पाहिजे. केवळ काही ऐहिक वस्तुंच्या लालसेने देवाची भक्ती करणारा शिष्य यथार्थ स्वरुप समजुन घेण्यास पात्र नसतोच पण त्याला स्वस्वरुप सांगून काही उपयोग नसतो. म्हणून गुरु त्याला मायेचे स्वरुप समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. कधी कैवल्याद्वैताच्या मायावादाच्या सहाय्याने किंवा कधी सांख्ययोगाच्या सहाय्याने गुरु समजावुन सांगतो. गारुड्याचे रुपक वापरुन गुरु मूळ पुरुष गारुडी असुन त्याची पत्नी ही प्रकृती आहे असे रुपक मांडतो. पंच ज्ञानेंद्रिये म्हणजे कोंबड्याचे रुपच. कधी कोंबडा पाहीला आहे... दिसेल त्या कोंबडीशी संग करत सतत खाणे, हिंडणे यातच वेळ घालवणारा. पण दुसरा कोंबडा तिथे येताच भांडण करणारा. मनुष्याची पंचेद्रिये विषयांचा भोग घेण्यासाठी अशीच सदैव आतुर असतात. त्यात आडकाठी आली की भडकतात. अजुन हवे अजुन हवे हा सतत घोष चालू असते. कधीही तृप्त न होणारी इंद्रिये अगदी त्या कोंबड्याप्रमाणेच असतात. माणसाचे मन मोठे विचित्र असते. मी केले मी करेन या अहंभावनेने सदैव ग्रासलेले मन अतिशय अहंकारी आणि उद्दाम असते. कर्तृत्वाचा डांगोरा पिटतांना मूळ स्वभावाशी फारकत घेत मी माझे यात मनुष्य अगदी बोकडाप्रमाणे वर्तन करतो. आपल्याच मस्तीत मश्गुल, संपूर्ण रस्ता स्वत:च्याच बापाच्या मालकीचा आहे हा उद्दाम पणा अंगी बाळगत, उग्र दर्प सोडत बोकड रस्त्याने जातांना बघा म्हणजे तुम्हाला पटेल नक्की काय म्हणायचे आहे ते ! पाच मूले म्हणजे पंचतत्वे. ज्यांच्या सहाय्याने हे विश्व आकाराला आले आहे ते स्थुल आणि सुक्ष्मपंच तत्वे. हल्या हे प्रपंचाचे प्रतिक असुन त्यावर लादलेल्या गोण्या म्हणजे मनुष्याच्या इच्छा आकांक्षाची असलेली गोळाबेरीज. त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले. गुरु त्याच्याकडे आलेल्या शिष्याला जगाचे स्वरुप रुपकाच्या माध्यमातुन सांगत आहेत. मूळ पुरुष जेव्हा प्रकृतीच्या सहाय्याने स्थुल आणि सूक्ष्म पंचतत्वाच्या सहाय्याने शरीररुपाने जगात येतो तेव्हा पंचेद्रियांच्या आणि मनाच्या कचाट्यात सापडून त्याचा ठिकाणी कामना जागृत होते. भुक लागली या वाक्याने मला हे हवे, मला ते हवे ही मनुष्याच्या मनात जागृत होणारी सुप्त इच्छा जी पुढे विचार बनुन कृतीला प्रेरणा देते ती जागृत होते असे सांगतो. तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली. जेव्हा मनुष्य आपली इच्छापुर्ती व्हावी म्हणुन धडपडू लागतो तेव्हा विषयांचा भोग घेता घेता त्याला त्यातच गोडी वाटु लागते. भोग संपता संपत नाहीत आणि इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक इच्छा पूर्ण होते न होते तोच दूसरी इच्छा आ वासून उभी रहाते. अक्राळ विक्राळ असा इच्छेचा हा पगडा जणू समस्त प्राणीजगतावर अनादी अनंत काळापासून आहे. इच्छा पूर्ण झाली असे वाटुन सुख वाटते तोच दुसरी इच्छा पूर्ण नाही म्हणुन दु:ख वाटु लागते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तो पहिलीचे सूख संपते आणि त्यातले दु:ख समोर येते. एक धरावे तर दुसरे सुटते. अक्षरशः जीवाचे रान करावे आणि हातात शून्य यावे अशी अवस्था होत जाते. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचे तर जे तरुण आहेत, ज्यांच्या डोळ्यासमोर भव्य दिव्य स्वप्ने आहेत त्यांना हे लक्षात येणार नाही, पण ज्यांनी चार पावसाळे पाहिले आहेत त्यांना कळेल मला काय म्हणायचे आहे ते. हीच माया. सगळ्यांना जखडून टाकणारी पण त्याचवेळी कर्म करण्यास प्रवृत्त करणारी माया ती हीच. तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले. अशा प्रकारे गुरु जगाचे स्वरुप सांगतात पण देवभक्ती, गुरुभक्ती केवळ ऐहिक लालसे पोटी आणि काही तरी लाभ व्हावा याच हेतुपोटी करणारे भक्त अशा गुरुला काही कामाचा नाही असे समजुन सोडून जातात. पळून जातात. त्यांना देवाला भेटायचे नसते. देवाचे यथार्थ स्वरुप त्यांना जाणून घ्यायचे नसते. त्यांना हवे असते फक्त इंद्रियांना सुखावणारे सुख. त्याचसाठी ते देवाची भक्ती करत असतात. खरोखर जगात असेच कितीतरी भक्त असतात देवा मला हे दे, देवा मला ते दे असे म्हणत त्याच्याजवळ याचना करणारे. पण देवा मला तु भेटच अशी आर्त विनवणी करणारे किती दुर्मिळ असतात हे आपण जाणतोच. समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे. समर्थांच्या रुपाने एका खर्‍या भक्ताची, ज्ञानी मनुष्याची आपल्याला ओळख पटते. मायेचे यथार्थ स्वरुप जाणुन सृष्टीतील मिथ्यात्व जाणून लपलेल्या सत्य तत्वाची ओळख अशा भक्ताला पटते. आणि मग मागे लपलेले तत्व त्याला कुणी ब्रह्म म्हणते, कूणी ईश्वर म्हणते, कूणी देव तर कुणी अल्लाह म्हणते ते समोर येते. नव्हे ते काय आहे हे जाणले जाते. समजणे आणि जाणणे ह्या खूप भिन्न गोष्टी आहेत. असा भक्त परमदयाळू असतो, त्याला असे वाटते मला जे समजले, मी जे जाणले ते इतर लोकांना कळावे. भले त्यांच्या इच्छा, आकांक्षा ऐहिक जगातील असु द्या पण त्यांना हे परम तत्व जाणवावे, आकळावे. पण जोपर्यंत मन बाह्य विषयात गुंतले आहे तोपर्यंत हे तत्व जाणवणार नाही. केवळ दिव्यातील तेल संपले म्हणुन जशी ज्योत शांत झाली तसेच केवळ मनातील भावनांना खतपाणी न घालुन संयम केला मन शांत होते. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत मूलतत्व समजणे अतिशय अवघड आहे. अशक्य आहे.
***
संत एकनाथ दत्ताचे स्वरुप सांगतात. हा दत्त म्हणजे सत्व, रज, तम या त्रिगुणांनी युक्त, निर्माता ब्रह्मदेव, रक्षण कर्ता विष्णू आणि लयकर्ता शिव यांचे एकत्रित रुप आहे. हा संपूर्ण विश्वाचा नियंता, राजा असून ह्याच्यापाशी अज्ञान अजिबात नाही. असे म्हटले जाते की ते अद्वितीय, अनादी अनंत चैतन्य म्हणजेच विश्वाचे सत चित् आनंद स्वरुप कसे आहे हे विचारले की श्रूती केवळ हे नाही हे नाही असे नकारार्थी उत्तर देते कारण ते कसे आहे याचे वर्णन करण्यास मानवी वाणी असमर्थ आहे. तेव्हा मानवी वाणीतुन उगम पावलेली श्रुती हे नाही हे नाही असेच सांगते. पण याच्यापाशी असे अज्ञान नाही इतकेच काय याचे स्वरुप कसे आहे हे देव, मुनी, योगी यांना ध्यान वा समाधीतुन सुद्धा कळत नाही. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥ बाह्य विश्वात आणि आंतर विश्वात तुच केवळ आहेस. पण मी अभागी आहे मला हे समजत नाही, उमजत नाही. विचारांचे सुक्ष्म स्वरुप मनात उगम पावते आणि तिथेच त्याच्यापासुन निरस्त होत मूल स्वरुपाची ओळख न पटल्याने जन्म मरणाच्या फेर्‍यात अडकुन जातो. अज्ञान हेच जन्ममरणाचे कारण आहे. विवेकाने ज्ञान प्राप्ती झाली की जन्म मरणापासुन मुक्ती मिळते. पण हा विवेक सहजसाध्य नाही. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी न कळे ही मात पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥ असा दत्त अचानक माझ्या समोर आला आहे. निर्गुण निराकार परब्रह्म मला सगुण रुपाने समोर दिसल्याबरोबर माझ्या मनाच्या सर्व शंका फिटल्या. त्याने प्रसन्न होऊन मला आशीर्वाद दिला आणि माझा जन्ममरणाचा फेरा संपवला. ज्ञानाने, विवेकाने ते निर्गुण निराकार ब्रह्म माझ्या डोळ्यासमोर साकार झाले. आता कुठला जन्म कुठला मृत्यु ! अनादी मी अनंत मी ! दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥ मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥ असे हे सर्व घडले ते केवळ त्या गुरुदेव दत्तामुळे. चला त्याची आरती करु त्याला ओवाळु ! आपल्या सर्व प्रपंच्याच्या चिंता त्याच्यामुळे हलक्या होतील, लयाला जातील यात संशय नाही. जय देव जय देव जय गुरुदत्ता श्री गुरुदत्ता , आरति ओवाळिता हरली भवचिन्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! श्री गुरुदेव दत्त !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19840
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

जबरदस्त रे नाना ___/\___ अतिशय सुरेख. हा लेख वाचतानाच आज सकाळीच सकाळ मध्ये आलेल्या श्री. बालाजी तांबे ह्यांच्या दत्तगुरुंवरील लेखाची आठवण झालीच झाली.

श्री गुरुदेव दत्त! मस्त लिहलय निरूपण!!

फार उत्कृष्ट लिहिले आहे. भले शाब्बास. पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥ "पराही परतली" याचा अर्थ सांगु शकाल का कृपया?

In reply to by रोमना

भारतीय तत्वज्ञानानुसार "परा", "पश्यंती", "मध्यमा" आणि "वैखरी" ही वाणीची चार रुपे आहे. वैखरी म्हणजे आपण जे उच्चार करुन बोलतो, दुसर्‍याला ऐकु जाते ते रुप. परा हे अतिशय सुक्ष्म मनात असलेल्या विचाराचे पहिले रुप. हा विचार सुद्धा विचार करता करता माघारी फिरला, म्हणजेच विचार त्या ब्रह्माच्या स्वरुपाचा विचार करण्यास असमर्थ ठरला असे "पराही परतली" या शब्दाने सांगितले आहे.

In reply to by अवलिया

+१ 'परा' या सूक्ष्म वाणीने ब्रम्हाचा जप करणारे सत्पुरुष एका कुळात होऊन गेले. त्यांचे वंशज आता परांजपे असे उपनाम धारण करतात. असे मी मराठी आडणावे या कोणीतरी लिहीलेल्या एका पुस्तकात वाचले होते. लेखकाचे नाव आठवत नाहीये.

इतके सुरेख निरुपण वाचावयास मिळाले, धन्य झालो. अवांतर : आपण शुची यांच्या लेखनातील 'एक काळा ठिपका' काढून नाही टाकला तर त्या काळ्या ठीपक्याला अश्या प्रकारे सजविले कि आता 'तोच काळा ठिपका' एक डाग बनून न राहता त्या कथेतील एक सौंदर्य दागिना झाला. व्वा. आता नव्याने जव्हा हि कथा वाचीन तेव्हा अजून आनंद होईन. कथाकार शुची आणि निरुपण कर्ते अवलिया यांचे मनापासून धन्यवाद.

वेगळा धागा काढणार होते, पण इथेच लिहिते आता; दत्तकथा: या गोष्टीची किल्ली 'भाव दृढ' ठेवा ही आहे. पोराना मारा अशी अजिबातच नाही. ते केवळ दर्शानार्थींची परिक्षा पाहण्यासाठी 'गारुड्याने'( = स्वत: दत्तागुरुनी/ समर्थांनी) उभे केलेले गारुड होते. दर्शनार्थींची इतर कुठली परिक्षा( सुंदर स्त्री पाठवणे वगरै) घेणे योग्य ठरले नसते, बाकीच्या मोहांपासून ते सुद्धा 'तप' करून मोकळे झाले असतील. त्यांच्या 'बेसिक इन्स्टिन्क्ट' ला हात घातला. सरव्हायवल इन्स्टिन्क्ट! इतके बीभत्स दृश्य समोर उभे केले की खरोखरच त्यांच्या 'भक्तीभावाच्या दृढतेची' कसोटी लागेल. मुळात सगळेजण 'जप-तप' करायचे सोडून त्या गारुड्याच्या गारुडात अडकलेच कसे? शिवाय समर्थांवाराच्या श्रद्धेची सुद्धा परीक्षा होईल. जर का या ब्राम्हणाना खात्री होती की समर्थ प्रत्यक्ष दत्तगुरूंचे दर्शन घडवून देऊ शकतात, मग ते आपले प्राण सहज वाचवतील, हा विश्वास का नाही ठेवला. इथेच ती किल्ली लागते, 'भाव दृढ' ठेवा! म्हणजेच विश्वास ठेवा. स्वत:वर, गुरुवर. ही किल्ली प्रत्येक परिक्षेसाथीच आवश्यक असते. इथे एक किस्सा आठवतो, युरी गागारीनची प्रशिक्षनाच्या दरम्यान एकदा परिक्षा होती. त्याला एकट्याला एका छोट्या खोलीत कोंडले, पेपर दिला, भयंकर मोठा पेपर आणि खूप कमी वेळ, असे होतंच. शिवाय पेपर सुरु झाल्यावर त्याच पेपरातल्या प्रश्नांची बरोबर व चुकीची देखील उत्तरे स्पीकरवर मोठमोठ्यानी सुरु केली. हा देखील त्या पातळीवरचा दुष्टपणाच आहे. पण त्यांनी 'भाव दृढ' ठेवला, मन खंबीर केले, एकाग्र केले पेपर चांगल्या पद्धतीनी सोडवून पुढे गेला. जसजशी परिक्षा वरची, तसतसा परिक्षकांचा 'दुष्टपणा' अधिक! आता अंधश्रद्धा: इथे कुठेही 'पोरे मारल्यामुळे दत्तगुरू दिसले' अशा प्रकारचा संदेश येत नाहीये. कशाला साप समजून भुई धोपटायाची! 'अंधश्रद्धा पसरतील' असा आरडाओरडा करणार्यांच्या 'भोळेपणा'बद्दल मला नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते! ;) एकंदरीत माणूस ( शिक्षित/अशिक्षित) हा इतका इरसाल प्राणी आहे, की खरोखरच असे कुणी कुणावर विश्वास ठेऊन कुणालाही मारेल असे वाटत नाही. माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. स्वत:च्या 'सोयीची' जी तत्वे असतील, ती तो अंगीकारतो. जीव वाचावायचाय, लेकाराबाळाना खायला मिळेल, थोडा मान मिळेल, चला 'धर्म' बदला! अशी माणसाची वृत्ती असते. ( इथे 'धर्म' चा अर्थ 'कुठलीही तत्वप्रणाली' - कम्युनिझ्म सुद्धा- असा आहे.) शेवटी माणूस स्वत:ला सोयीचे असेल तेच 'आदर्श' म्हणून घेतो. या श्रद्धा-अंधश्रद्धा वादाला काहीही अर्थ नाही! जाता जाता, आपल्या स्वत:च्या 'स्टेटस च्या भूकेपायी' स्वत:च्याच मुलांवर (कधी कधी आत्महत्या करेपर्यंत) अभ्यासाचा ताण आणाणारे पालक/समाज अंधश्रद्ध नसतात, पण क्रूर नक्कीच असतात! सगळीच माणसे आपापल्या 'कपॅसिटी' प्रमाणे कधी न कधी कमी-जास्त क्रूरपणा करतच असतात. त्यामूळे ही गोष्ट ( दत्तकथा) बिभत्स जरी असली, तरी २ जागतिक महायुद्धे बघितलेल्या अत्ताच्या मानवसमाजाने 'बोम्बाबोम्ब' सुरु करण्याइतकी भयानक नक्कीच नाही.

In reply to by कवितानागेश

छान प्रतिसाद, अनुमोदन. अजून एक म्हणजे खेड्यातली आणि शालेय शिक्षण कमी झालेली लोकं मूर्ख असतात असा काहींचा प्रचंड गैरसमज असतो. माझ्या माहितीतली या कॅटेगिरीत (खेडूत आणि कमी शिक्षित ) येणारी सगळी लोकं साधी आहेत पण त्याचबरोबर अत्यंत प्रॅक्टीकल आणि चतुर आहेत.

In reply to by कवितानागेश

त्यांच्या 'बेसिक इन्स्टिन्क्ट' ला हात घातला. सरव्हायवल इन्स्टिन्क्ट! इतके बीभत्स दृश्य समोर उभे केले की खरोखरच त्यांच्या 'भक्तीभावाच्या दृढतेची' कसोटी लागेल. मुळात सगळेजण 'जप-तप' करायचे सोडून त्या गारुड्याच्या गारुडात अडकलेच कसे? आयुष्यात सर्वसंगपरित्याग करून देवभक्तीला लागणे सगळ्यांना जमतेच असे नाही ( आणि जमावे असेही नाही). जर या लोकांनी ते एकदा केले असेल, आणि जर देव भेटायच्या आत मेले, तर पुढच्या आयुष्यात ते जमेलच याची काहीच खात्री नाही. तेव्हा हे कसोटीच चुकीची आहे. अर्थात देव नेहेमीच बरोबर नसतो, त्यामुळे फारसे आश्चर्य वाटले नाही. आता अंधश्रद्धा: इथे कुठेही 'पोरे मारल्यामुळे दत्तगुरू दिसले' अशा प्रकारचा संदेश येत नाहीये. कशाला साप समजून भुई धोपटायाची! 'अंधश्रद्धा पसरतील' असा आरडाओरडा करणार्यांच्या 'भोळेपणा'बद्दल मला नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते! एकंदरीत माणूस ( शिक्षित/अशिक्षित) हा इतका इरसाल प्राणी आहे, की खरोखरच असे कुणी कुणावर विश्वास ठेऊन कुणालाही मारेल असे वाटत नाही. तसे नाही. पण पुराणात असे बळी दिल्याचे उल्लेख आहेत असा हवाला देउन व्यवसायवृद्धी, अपत्यप्राप्ती या समस्येने पीडलेल्या लोकांना भोंदू लोक बळी देण्यास प्रवृत्त करू शकतात, केल्याची उदाहरणे आहेत. लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत. अशा गोष्टी डीलीट करू शकत नसलो तरी निदान पसरवू तरी नये असे अनेकांना वाटते. माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. स्वत:च्या 'सोयीची' जी तत्वे असतील, ती तो अंगीकारतो. कुठला प्राणी नाहीये ? आणि स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः कष्ट करण्यात कसला आलाय स्वार्थीपणा ? जीव वाचावायचाय, लेकाराबाळाना खायला मिळेल, थोडा मान मिळेल, चला 'धर्म' बदला! अशी माणसाची वृत्ती असते त्यात काहीही चूक नाही. स्वसंरक्षण, अपत्यांची काळजी या आदिम आणि योग्य अशा नैसर्गिक प्रेरणा आहेत. बर्‍याचदा गोष्टी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत राहिले तर केव्हाच संपून जाउ. लाखो वर्षांपूर्वी आपले पूर्वज पर्वतकाय टायरॅनोसोरसच्या अंगावर धावून न जाता गुहेत लपून राहिले म्हणूनच आज मानवजात शिल्लक आहे. त्यामूळे ही गोष्ट ( दत्तकथा) बिभत्स जरी असली, तरी २ जागतिक महायुद्धे बघितलेल्या अत्ताच्या मानवसमाजाने 'बोम्बाबोम्ब' सुरु करण्याइतकी भयानक नक्कीच नाही. (स्वतःची) लहान मुले कापून चुलीत घातली ही दारू/ सिगरेट/ ड्रग्स प्रमाणे कालातीत, वादातीत वाईट गोष्ट आहे. तुम्हाला जर त्यात फारसे वावगे वाटत नसेल तर तो तुमचा आणि आसपासच्या मुलांचा प्रश्न आहे. इंटरनेटवर फक्त आक्षेप घेता येतो आणि लोकांनी तेच केले आहे.

In reply to by Pain

जर देव भेटायच्या आत मेले, तर पुढच्या आयुष्यात ते जमेलच याची काहीच खात्री नाही.>>> अग्गो बाय, कित्तीदा सांगू, ते स्वप्न असतंय ग! खरें नसतंय. ललू नको, उगी उगी! ;) अवांतरः मेल्यानन्तर पुढचे आयुष्य म्हणजे काय? तुम्ही पुनर्जन्म मानता की काय??? सगळ्या अंनिसकाकांनो, वाचवा वाचवा! ;) पुराणात असे बळी दिल्याचे उल्लेख आहेत असा हवाला देउन व्यवसायवृद्धी, अपत्यप्राप्ती या समस्येने पीडलेल्या लोकांना भोंदू लोक >> पुराणातल्या कथांचा इथे उल्लेख कशाला? आणि पुराणातल्या सर्व कथा रूपकात्मक आहेत हे कुणीही शहाणा माणूस सांगेल. तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै) लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत.>> तेच तर मी सांगतेय, माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी कशाचाही काहीही अर्थ लावू शकतो. पुराणे, समाजव्यवस्था, कायदा, ........इ. एकदा ठरवले की सगळ्याचे वाट्टेल ते अर्थ काढले जाऊ शकतात. वकील देखील कायद्यातून पळवाटा काढतात, तिथे अश्या रूपकात्मक गोष्टी तर काय, माकडाच्या हाती कोलितच! पण आपण 'माकड' व्हायचे की 'माणूस' हे मात्र त्या त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धी किती जागी आहे त्यावर ठरते. भावार्थ बघायचा की शब्दार्थ हे आता प्रत्येकानी आपले आपण ठरवा. लहान मुले कापून चुलीत घातली ही दारू/ सिगरेट/ ड्रग्स प्रमाणे कालातीत, वादातीत >>> पुन्हा तेच . तो 'भास' होता. या भयानक गोष्टीचे 'समर्थन' कुणीही कुठेही केले नाहीये. आणि ती भितीदायकच गोष्ट होती. म्हणून तर तपस्वी देखिल पळाले. अवांतर: 'चिकन' ला गुलाबी फ्रॉक शोभून दिसेल नै?! ;)

In reply to by शिल्पा ब

लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हेच शिबीर करायला आम्ही देखील रवाना होणार आहोत. तेव्हा आमचा इंटरनेटवरील स्नेह जरा कमी होईल अशी आशा बाळगतो! ;) (आणि श्री पेन यांच्या सारख्या एकाच गोष्टीवर दीर्घकाळ अडुन बसण्यार्‍या मंडळीशी देखील प्रतिसादरूपी युद्ध खेळण्याची ताकद येईल अशी देखील आशा बाळगतो!)

In reply to by कवितानागेश

तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै) च्या मारी. कसे सुचले हे? लै भारी. ह.ह.पु.वा. ह्यामुळे तरी कुठेही बालके, बोकड, हल्या कापायच्या गोष्टी चालू आहेत त्या कमी होतील अशी भाबडी आशा आहे.

In reply to by कवितानागेश

अवांतरः मेल्यानन्तर पुढचे आयुष्य म्हणजे काय? तुम्ही पुनर्जन्म मानता की काय??? सगळ्या अंनिसकाकांनो, वाचवा वाचवा! मी काय मानतो किंवा काय मानत नाही याचा इथे काहीच संबंध नाही. विषय त्या तप करणार्‍या लोकांचा आणि श्रीदत्ताचा आहे. ज्याअर्थी ते देवदर्शनासाठी (धर्म/ पुराणातल्या प्रमाणे) तप करत होते, त्याअर्थी त्यांच्या त्यातील सर्व किंवा किमान महत्त्वाच्या गोष्टींवर विश्वास असणारच. तो होता म्हणून तर ते तपाला बसले. अग्गो बाय, कित्तीदा सांगू, ते स्वप्न असतंय ग! खरें नसतंय. गोष्टीत ते स्वप्न होते असे कुठेही म्हटलेले नाही. दत्तगुरु रुप घेउन आले असे लिहिलेले आहे. तुम्हाला गोष्टीचे सांगितले गेलेले तात्पर्य वाचून तो आभास/ माया होती हे कळत असले तरी त्या परिस्थितीत असणार्‍याला ते खरेच वाटणार (सापेक्षतावाद), त्याच्यासाठी ते खरेच असेल. (देवाने निर्माण केलेली सृष्टी खरी वाटते तर त्याचीच बनवलेली माया का वाटणार नाही?) पुराणातल्या कथांचा इथे उल्लेख कशाला? आणि पुराणातल्या सर्व कथा रूपकात्मक आहेत हे कुणीही शहाणा माणूस सांगेल. तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै) लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत.>> तेच तर मी सांगतेय, माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी कशाचाही काहीही अर्थ लावू शकतो. पुराणे, समाजव्यवस्था, कायदा, ........इ. एकदा ठरवले की सगळ्याचे वाट्टेल ते अर्थ काढले जाऊ शकतात. वकील देखील कायद्यातून पळवाटा काढतात, तिथे अश्या रूपकात्मक गोष्टी तर काय, माकडाच्या हाती कोलितच! पण आपण 'माकड' व्हायचे की 'माणूस' हे मात्र त्या त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धी किती जागी आहे त्यावर ठरते. भावार्थ बघायचा की शब्दार्थ हे आता प्रत्येकानी आपले आपण ठरवा. मला किंवा कुठल्याच मिपा वाचकाला यात शब्दश: अर्थ काढायचा नाही. प्रश्न भोळ्या भाबड्या जनतेचा आहे जी या आणि अशा कुठल्याही भूलथापांवर विश्वास ठेवून फसते. अनेक लोक असे फसलेले आहेत आणि मुलांचे बळीही गेलेले आहेत. वृत्तपत्र वाचत असाल तर माहिती असेल. ते थांबवण्यासाठीच अं.नि.स. चा जन्म झालेला आहे. आक्षेप घेणार्‍यांचे असे म्हणणे आहे की जर याचा प्रसारच थांबवला तर पुढे होउ शकणारा गैरवापर टळेल. अशी वर्णने वाचवतही नाहीत. तुम्हाला माझे प्रश्न किंवा म्हणणेच समजलेले नाहीये. असो. ज्यांना ते जमू शकेल अशी मंडळी आहेत, त्यांची वाट बघेन.

In reply to by शिल्पा ब

++

In reply to by Pain

तुम्हाला माझे प्रश्न किंवा म्हणणेच समजलेले नाहीये. असो. ज्यांना ते जमू शकेल अशी मंडळी आहेत, त्यांची वाट बघेन.>> कुणाचीही वाट बघताना 'भाव द्रुढ ठेवा' ही गोष्ट विसरु नका! ;) तरीसुद्धा पुन्हा एकदा, लोक भोळे नसतात!! शिवाय आभास, माया, सत्य, सत, असत, भास स्वप्न वगरै गोष्टींविषयी इथे बरेच गोंधळ दिसतायत. (स्वगतः आणि त्याबद्दलची 'शिक्रेट्स' मी इथे कशाला फोडू? ;)) असो, अनुभवाशिवाय श्रद्धा नाही हे मी स्वानुभवानी सांगू शकते, त्यामूळे मीसुद्धा इथे कळफल़क बडवत माझा वेळ वाया घालवत नाही. दुसरे बकरे शोधत असल्याबद्दल धन्यवाद! माझा पास!

In reply to by कवितानागेश

शिवाय आभास, माया, सत्य, सत, असत, भास स्वप्न वगरै गोष्टींविषयी इथे बरेच गोंधळ दिसतायत. (स्वगतः आणि त्याबद्दलची 'शिक्रेट्स' मी इथे कशाला फोडू? Wink) अशा गोष्टी शिक्रेट ठेवायच्या असतात हे माहीती नसल्याने घोळ झाला असेल...ते शिक्रेट माहीती करुन घ्यायला कोणाच्या शिबीराला जावे लागेल? का ते पण शिक्रेटच ?

In reply to by कवितानागेश

तुम्ही एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिलेले नाही. फक्त फाटे फोडणे आणि विषयाशी संबंध नसलेल्या गोष्टी आणून त्यांची सरमिसळ करणे (सायकोबॅबल) एवढेच करता येते असे दिसते. प्रत्य्क्षात घडलेल्या गोष्टी (गेलेले बळी, अंनिसचे कार्य वगैरे) नाकारून श्रद्धेबद्दल बोलणे अयोग्य. सगळ्यांना सगळे येत नाही. स्वत:ला एखादी गोष्ट येत नसेल तर तसे कबूल करण्याचा प्रांजळपणा दाखवा आणि अपरिचित लोकांशी बोलाताना किमान शिष्टाचार पाळायला शिका.

In reply to by Pain

सावरकरांच्या धाग्यावर हिरिरिने लिहिणार्‍या तुम्हीच ना त्या? वा! सावरकरांचे विचार अगदी सार्थकी ठरले म्हणायचे!! चालू द्या..

In reply to by आमोद शिंदे

हे बघा मास्तर, इतरांची 'ऑन सावरकर' पुस्तके वचून सावरकर 'कळले' असा ग्गोगोड गैरसमज करुन घेण्यापेक्षा सरळ 'फ्रॉम सावरकर' वाचून चिन्तन करा. भले होइल.( अर्थात आमचे सगळ्यांचे! तुमचे मला माहित नाही.) या कवितेपासून सुरुवात करा. अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।। लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दाससम चाटिल तो पदांगुला कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते हलाहल । त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।। अवांतरः जरा बीभत्सच वाटते नै ही कविता!! आता रडतील की काय इथली भित्री, भोळी पोरे?!

In reply to by कवितानागेश

वा! सावरकरांची ही कविता आणि इथली भाकड कथा तुम्हाला एकाच पंक्तित बसवासे वाटलेले पाहून धन्य झालो. पोरे कापून शिजवायची कथा वाचून सावरकर काय म्हणाले असते हो? भाव दृढ करा??

In reply to by आमोद शिंदे

माहीत असण्याची शक्यता कमी वाटते म्हणून त्यातील काही ओळी येथे देतो. धन्य अपुला वंश/सुनिश्चये इश्वरी अंश की रामसेवा-पुण्य-लेश/ आपुल्या भाग्यी लाभला (उदा. म्हणून एव्हडे पुरे असावे) आपण स्वा.सावरकरांचे नाव वापरुन कोणाचिही खिल्ली उडवताना त्यांचे विचार आणि लेखनाचा पुन्हः अभ्यास करावा.

In reply to by आमोद शिंदे

काय हो अमोदमामु, उगाच सावरकरांचे नाव कारण नसताना का घेताय? सावरकर भल्याभल्यांना अजूनही समजले नाहीत तर सामन्यांची काय कथा? जरा विचार करून लिहित चला.

In reply to by कवितानागेश

@ लीमाउजेट : फार खोलवर्चे ४ शब्द.. (तुम्हाला माउली ही पदवी द्यावी का विचार झाल्यावर मिपा मंडळाकडे शिफारस करीन म्हणतो.)

In reply to by डावखुरा

तुम्हाला माउली ही पदवी द्यावी का विचार झाल्यावर मिपा मंडळाकडे शिफारस करीन म्हणतो
एका संपादिकेचा ह्याला आक्षेप असु शकतो =)) उगाच विडंबण वाटेल म्हणुन :)

या प्रकारच्या कथा अशा निरुपणासहितच सांगितल्या जाव्यात. कारण सर्वसामान्यांना आगोदरच ते गर्भितार्थ कळतील न कळतील.. आणि जे अर्थ घेतले जातील ते वेगळेच / चुकीचे समजले, घेतले जाण्याची शक्यता मूळ गूढार्थ समजण्यापेक्षा अधिक असेल. एखादे महाराज नेहमी थोबाडीतच मारतात, किंवा मिठी मारतात, हाच त्यांचा प्रसाद असतो (पर्टिक्युलर महाराजांची नावे माहीत नाहीत याबद्दल क्षमस्व..उदाहरण म्हणून गृहित धरावे..) पण तो प्रसाद आहे हे काही भक्तांना माहीत असते तर बर्‍याच नव्या सामान्य अनोळखी लोकांना ते माहीत नसू शकते. त्यामुळे आपल्यातला वाईटपणा, खलत्व घालवणे अशा प्रतीकात्मक उद्देशाने जरी महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी कोणा नागरिकाच्या थोबाडीत मारली तर तो त्याला "थोबाडीत"च समजेल, तो "प्रसाद" आहे /ते महाराज आहेत हे कोणीतरी तिथल्यातिथे उलट हात उठायच्या आत त्याला सांगावे लागेल कारण बोलूनचालून तो सामान्य आहे. समर्थचरित्र पूर्वीच वाचले आणि त्यात गळू चोखण्यापासून कफदाणी पोटात थारा देउन मोकळी करण्यापर्यंत शिष्यत्वाच्या परीक्षेच्या कथा / उल्लेख आहेत. (अशा अनेक आवृत्त्या असल्यास आणि त्यातल्या काही जेन्युईन नसल्यास माहिती नाही पण कॉमनली वाचली जाणारी एक आवृत्ति वाचली होती.) कफ, गळू यातही प्रतीकात्मक अर्थ असतीलही पण ते तिथल्या तिथे समजावून सांगणारी आवृत्ती असावी. अन्यथा एका चांगल्या विचाराबद्दल अकारण किळस अज्ञानी वाचकांना (भक्त नव्हेत) वाटू शकते. वाद उत्पन्न करायचा म्हणून नाही तर फक्त वरील पहिले वाक्य अधिक स्पष्ट व्हावे म्हणून उदाहरण दिले. उलट लेख आवडला आहे आणि हीच काही समजावून सांगण्याची योग्य पद्धत आहे हे आधीच म्हटले आहे.

अतिशय सुंदर निरूपण. नानानहाराज की जय _____/\______

दत्तात्रय हरे कृष्णा..उन्मत्तानंद दायाकाll दिगंबरा मुनीबाला..पिशच्चा ज्ञानसागराll आपण अवलियाच आहात.. मन:पुर्वक धन्यवाद..

अतिशय सुंदर निरुपण केले आहे. अवलिया, तुम्ही 'रेग्युलर' किर्तनकार/ प्रवचनकार आहात का हो? इतके सगळे शब्द सुचतात कसे?


सुरेख! निरूपण फार सुरेख केले आहे. लिमाउजेट, चा प्रतिसादही अतिशय सुंदर आहे. मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे. हे वाचताना, संत ज्ञानेश्वरांच्या कानडा ओ विठ्ठलू, कर्नाटकू या गाण्यातील भाव आठवला. :)

अशी गोष्ट असू शकेल, आणि त्याचे काहीतरी स्पष्टीकरणही असेल, पण या गोष्टीसाठी तुमचे स्पष्टीकरण पटले नाही. उपमा/रुपके ओढून ताणून बसवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी श्रीदत्ताच्या आरतीच्या अर्थासाठी धन्यवाद. सार्थ मनाचे श्लोक, गणेशस्त्रोत्र असते पण आरत्यांचा अर्थ सहसा मिळत नाही. त्या बर्‍यापैकी सहज समजतात म्हणूनही असू शकेल.

अध्यात्मिक उन्नती झाल्यासारखे वाटले. उन्नत या शब्दाचा अशा अर्थानेही वापर करता येतो (हे त्या घासकडवींना सांगा कुणीतरी!) दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥ आम्ही लहानपणी 'जन्ममरणाचा 'पेढा' चुकविला' असे म्हणत असू आणि पेढा का चुकवावासा वाटला असेल याचे त्या वेळी नवल वाटत असे.

नाना आजोबा, निरुपण आवडले...कथा adult आहे पण निरुपण छान केले आहे. शुचे, पुढच्या वेळी अशी कथा वगैरे देताना नानाचा सल्ला घेऊन बोध, निरुपण वगैरे पण देत चल...

Spin doctor Meaning A political press agent or publicist employed to promote a favourable interpretation of events to journalists. उगाच नाही बुवाबाजी वाढत आहे! टाळ्या वाजवायला, जपनामाला, प्रेक्षक केव्हाचा तयार आहे. नाना, तुम्ही सिद्ध केलेले यंत्र, रुद्राक्ष विकायला काढा आता. एजन्सी द्या मला. स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.

In reply to by सहज

स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच.
पूर्णपणे सहमत

In reply to by सहज

अवलियांनी लिहिले ती शैली सुंदरच आहे. तीच कथा पण बटबटीतपणाची झाक टाळून सुश्राव्य आणि अर्थपूर्ण केली आहे. हे सर्व मान्य करुनही तुमच्या या मताशी सहमत. कारण शोधले की कोणत्याही गोष्टीचा कुठेही दुसरा / आल्टरनेट अर्थ सापडतोच. उदा: उदा.मांत्रिक केरसुणीने झोडपून एखाद्याचे भूत उतरवतोय म्हणजेच तो जणू केरकचरा,घाणसदृश असे त्याच्यातले दुरित गुण स्वच्छ करत आहे.इ.इ.तस्मात आल्टरनेट अर्थ कशातही शोधता येतात. .... शिष्याने गळू चोखले..म्हणून तो खरा पट्टशिष्य.. म्हणजे भक्ती/सेवा करताना घाणीची पर्वा न करता निखळ सेवा करावी (जसे नर्सने पेशंटची काळजी घेताना त्याचे मलमूत्रही काढायची तयारी ठेवावी लागते तरच ती सुश्रुषा होते.) ... इ.इ. हे सर्व (मूर्ख )सामान्य मर्त्य माणसाला कसे कळावे? तो पहिलाच अर्थ घेणार.. बर्‍याच जणांनी "यामुळे अंधश्रद्धा वाढतील/ बळी दिले जातील" वगैरे म्हटले आहे. त्याविषयी सांगणे कठीण आहे. तशा तर अनेक गोष्टी सिनेमातून वगैरे दिसतच असतात. त्यामुळे प्रत्यक्ष किती बळी/ गुन्हे वाढले हे सिद्ध करणे कठीण. फक्त अशा गोष्टी सांगताना जो अर्थ घेणे अपेक्षित आहे त्यासह सांगाव्यात. चार आंधळ्यांमधे एक हत्ती सोडला आणि समजा चारही जणांनी त्याला "साप", "खांब" वगैरे वेगवेगळे इन्टरप्रीट केले तरी तो हत्ती आहे हे ज्यांना माहीत आहे त्या डोळसांनी तिथेच ते आंधळ्यांच्या लक्षात आणून द्यावे म्हणजे हतीच्या पायी तुडवले जाणे टळेल.

In reply to by गवि

सहज उत्सुकता म्हणून विचारते, हा ( http://www.misalpav.com/node/15427 ) धागा बिभत्स नाही का? आणि या ( http://www.misalpav.com/node/15606 ) धाग्यात गुरुंनी घेतलेली परिक्षा 'दुष्ट' नाही का? ही मी खरोखरच उत्सुकता म्हणून विचारत आहे. मला 'प्रगल्भ' लोकांच्या अशा शब्दांच्या व्याख्या समजून घ्यायच्या आहेत!

In reply to by कवितानागेश

हो आपण दिलेला माझा पहिला धागा बीभत्स आहे आणि दुसर्‍या धाग्यात गुरुंनी दुष्ट अवघड परीक्षा घेतलेली आहे. पण मला एकमेव अर्थाने तेच म्हणायचे आहे. हातोड्यासारखा बोल्ट गन पावडरनं दणकवलेला असतो. दोन डोळ्याच्या मध्यभागी टेकवून उडवतात. यात दोन प्रकार आहेत. एक पेनीट्रेटिंग बोल्ट. हा डोक्यात घुसून मेंदूचा बराच भाग नष्ट करतो. याच्यावर बंदी आली आहे. कारण मेंदू फुटल्यामुळे त्याचे टिश्यूज रक्तप्रवाहात मिसळून ते मांस खाणा-या माणसांत मॅड काउ डिसीज फैलावू शकतो. या बीभत्स रचनेचा अर्थ तोच आणि एकच आहे. यातून दुसरा काही अर्थ निघत होता आणि तो आपणा अज्ञांस कळला नाही असं नव्हतं. ज्यावर चर्चा चालू आहे त्या कथेत ते "बाळांना चिरुन शिजवण्याचे वर्णन किती बाई किळसवाणे" असा आक्षेप माझा कधीच नव्हता. तर तसे केल्याने पुढे परीक्षा पास झाली, दर्शनप्राप्ती झाली, परमेश्वरप्राप्ती झाली वगैरे दर्शवण्याला विरोध होता. एका पोस्टमधे मी एका मांत्रिकाने मुलीला चेटकीण ठरवल्यामुळे तिच्याच आईबापांनी तिला कोंडून भुके मारलं तेव्हा ती टाचा घासत मेली. .. अजून एकः एका केसमधे स्टाफच्या इग्नोरन्समुळे इन्क्युबेटरमधे बाळं जळून मेली, याची वर्णनं केली आहेत.. जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते तथाकथित आल्हाददायक असावे असे मुळीच म्हणणे नाही. पण (उदा. समजा त्याच माझ्या पोस्टमधे ) अशी पोटची पोर टाचा घासत मारल्याने त्यांच्यावर पुढे येणारे संकट टळले वगैरे अशी कथा लिहिणे मी सरळ सरळ दुरित समजतो. (आणि वरुन मग चेटकीण हे प्रतीकात्मक आहे. चेटकीण म्हणजे अस्वच्छता, रोगराई.. ती टाळणे म्हणजे चेटकीण मारणे..असे वेगळाले अर्थ समजून घेणे..!!) मी काय म्हटलंय? अवलियांची शैली आवडली..बटबटीतपणा टाळला आहे. याचा अर्थ कोणीच तसे बटबटीत बीभत्स वर्णन करु नये असा होत नाही. अवलियांनी तीच कथा वेगळ्या रसात सौम्य करुन सांगितली आहे हे पाककौशल्य मी वाखाणत होतो. फक्त अशा गोष्टी (जिथे रुपकात्मक अर्थ सर्वांना समजणे अवघड आणि आवश्यक आहे) सांगताना जो अर्थ घेणे अपेक्षित आहे त्यासह सांगाव्यात. हा मुद्दा तुम्हाला बघायचाच नाहीये असं दिसतं. खूप खूप वाईट हे वाटते की वादासाठी उत्साहित होऊन मी जे म्हणतोय स्पष्ट ते न लक्षात घेता आपण ताशेरे मारत आहात. (याचे कारण मला असे वाटते की मूळ लेखाविषयी असंख्य सहमत आणि विरोधी प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या विरोधी प्रतिक्रियांचेही अनेक एकमेकांपासून वेगळे विचार होते. तुम्ही ते सर्व एकत्र करून सहमत वि. असहमत अशी चर्चा चालू केली आहेत. त्यामुळे एका व्यक्तीचा विरोधी प्रतिसाद, जो इतर अनेक विरोधी प्रतिसादांच्याही विरोधातच आहे हा विचार मागे पडला असावा..) किचकट वाटल्यास हे शेवटचे र्‍हाव दे.. :) मी प्रगल्भ आहे की नाही हे माहीत नाही पण त्या शब्दाविषयी किंवा तसे असण्याविषयी मला आकस नाही म्हणून प्रगल्भ हा तुमचा शब्द उपरोधिक म्हणून घेतला नाहीये. सॉरी..

In reply to by गवि

माफ करा, मला देखिल वाद घालायचा नाहिये. तुमच्याशी तर वाद घालण्याचा हेतु बिलकुलच नाहिये. मला त्या कथेतुन काय कळले हे मी फक्त शेअर करत होते, कारण सरळ अर्थांचा विपर्यास होताना दिसला. मला काय किंवा कुणालाच काय मी म्हणते/तो तेच खर्रे खर्रे असं देखिल म्हणायचे नाहिये. 'बीभत्स' काहीच लोकांसमोर येउ नये असे मला देखिल वाटते, पण म्हणून जे आधीच लिहिले गेले आहे, त्याची विनाकारण (जुने म्हणजे वाइटच असे ठरवून) हेटाळणी करने योग्य नाही. (आणि ते इथे लिहिणार्‍या व्यक्तीची करणे तर तर अगदीच योग्य नाही) इथे सरळ अर्थ सांगणार्‍या प्रत्येकावर वैयक्तिक स्वरुपाचे आरोप केले गेले, त्यांमूळे चर्चेला वादाचे स्वरुप आले आहे. मला तुमच्यावर वइयक्तिक आरोप करायचा नाहिये, पण ज्या गोष्टींवर अक्षेप घेतला जातोय त्याचेच आधुनिक /थोडे सौम्य वर्णन असलेले माहितीपर लेखन चालते, हा विरोधाभास सर्वांनाच दाखवायचा होता. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीनी कथा लिहिल्या जातात. त्यामूळे अत्ताच्या पिढीला या अशा कथा वाचायला बर्‍या वाटणार नाहित, हे न कळण्याइतकी मी म्हातारी झाले नाहिये. शिवाय जुनेच कवटळून बसु नये हेदेखिल इथे सगळ्याना कळते. पण म्हणून अर्थाचा विपर्यास करुन विनाकारण शंख करत रहावे हे देखिल योग्य नाही. मलादेखिल असेच म्हाणायचे आहे की, खूप खूप वाईट हे वाटते की वादासाठी उत्साहित होऊन मी जे म्हणतेय स्पष्ट ते न लक्षात घेता इथे सतत ताशेरे मारले जात आहेत.

In reply to by कवितानागेश

हो.. लिहिणार्‍या व्यक्तीवर वैयक्तिक आरोप केले गेले. हे अत्यंत निषेधार्ह आहे होते आणि राहील. आम्ही तिथेच प्रथम उपलब्ध क्षणी याविरुद्ध निषेध दर्शवला/ त्याला पाठिंबा दिला.. आपण माझी पूर्वीच्या पोस्टची (दोनपैकी दोन माझीच) उदाहरणे वापरून काही सिद्ध करु पाहू गेलात म्हणून साहजिकच आपला थोडा (गैर) समज झाला असावा असे वाटून इतके टंकले. आता दूर झाला असावा. इतःपर ठीक.. :)

In reply to by सहज

सहमत आहे. (अवांतर: आम्ही काही लोक काळेकाका आणि गांधीवादी यांना पेपरातल्या बातम्यांचे असेच वेगळे अर्थ काढून दाखवतो. पण त्यांना ते पटत नाहीत).

In reply to by सहज

उगाच नाही बुवाबाजी वाढत आहे! टाळ्या वाजवायला, जपनामाला, प्रेक्षक केव्हाचा तयार आहे. नाना, तुम्ही सिद्ध केलेले यंत्र, रुद्राक्ष विकायला काढा आता. एजन्सी द्या मला. अत्यंत बिनबुडाचा आरोप. माझ्या लेखामुळे बुवाबाजी वाढत आहे किंवा मी यंत्र, रुद्राक्ष विकण्याचा धंदा सुरु करण्याच्या विचारात आहे अशा प्रकारचा असंबंध्द आरोप करणार्‍या श्री सहजराव यांच्या मानसिक स्थितीत योग्य तो बदल घडो. स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. . कुठलेही तत्वज्ञान हे शब्दाच्या आश्रयाने असते. शब्दानेच मांडले जाते. तत्वज्ञानाचे समर्थन किंवा विरोध हा शब्दानेच होत असतो. ज्ञानाचे परस्परांमधील आदानप्रदान हे शब्दानेच होत असते. कूठलेही तत्वज्ञान हे विज्ञानाप्रमाणे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. त्यामुळे चोरी करु नये असा उपदेश असो किंवा अमुक अमुक नागरिकाचे हक्क आहेत असा घटना दत्त अधिकार सुद्धा शब्दांनीच मांडला जातो. त्याची कूठल्याही प्रयोगशाळेत सिद्धता मिळत नाही. तत्वज्ञानातील तत्वांचे (अगदी घटनादत्त अधिकारांचे वा हक्कांचे सुद्धा) वर्णन करुन त्यावर भाष्य करायचे असल्यास त्या काळाला सुसंगत असे भाष्य करणे अपेक्षित असते, त्यात सर्वमान्य, त्या काळाला अनुरुप, समोरील संवादकर्त्याला आणि ग्रहण कर्त्याला समजतील असेच दृष्टांत (सोपे करुन सांगण्यासाठी वापरलेली रुपके) सांगावे लागतात. यात गैर काही नाही. त्यामुळे अशा प्रकारे कूणी समजावून सांगत असेल तर त्यातला हेतु नीट न समजणे हे अज्ञान असल्याचे लक्षण असल्याने त्यावर विशेष टिपण्णीची गरज नाही. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते सदर लेख लिहुन मला मिपा मालक किंवा संपादक किंवा सदस्य यांच्याकडून कोणतेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मानधन मिळाले नाही. त्यामुळे माझ्या पोट भरण्यात सदर लेखापासुन असलेल्या मिळकतीचा काहीही वाटा नाही हे मी नमुद करु इच्छितो. धन्यवाद.

In reply to by सहज

स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
गुरुपेक्षा भक्त हुशार असतात त्याचे उदाहरण वाटते. :)

In reply to by सहज

स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
अभिनंदन श्री.सहज. स्पष्टवक्ता परखड प्रतिसाद आवडला.

In reply to by सहज

उत्तम प्रतिसाद. मुलं कापण्याची रूपकं जुनी, कालबाह्य आणि बेकायदेशीर वाटू शकतात; (मिपावर पहाता अनेकांना ती तशीच वाटतात). तेव्हा आधुनिक बाबा, बुवा, गुरूजी, माता, देवाचे दलाल, बडवे, पुजारी, उत्पात, निरूपणाचार्य, कीर्तनकार हे लोकं नवीन गोष्टी का नाही हुडकून काढत किंवा बनवत?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+१
तेव्हा आधुनिक बाबा, बुवा, गुरूजी, माता, देवाचे दलाल, बडवे, पुजारी, उत्पात, निरूपणाचार्य, कीर्तनकार हे लोकं नवीन गोष्टी का नाही हुडकून काढत किंवा बनवत?
त्याचे काय आहे, हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले ते केवळ धर्मग्रंथात लिहिले या एका कारणाने त्यावर स्वत:चा विचार न करता "परंपरा जपायच्या" या गोंडस नावाखाली त्याच त्याच गोष्टी पिढ्यानपिढ्या चालू ठेवण्यात लोक धन्यता मानतात.अशा गोष्टींना साधे क्वेश्चन करणारे लोक पाखंडी आणि हिंदूविरोधी समजले जातात.म्हणजे कोण हिंदू समर्थक आणि कोण विरोधी हे ठरवायचा अधिकार अशा ठराविक मंडळींना दिलेला असतो (की कोणीही न देता तो त्यांनी स्वत:कडे घेतलेला असतो)." असे त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणाऱ्यांना "हिंदूविरोधी" म्हणणारे लोकच मोठ्या तोंडाने "आमचा हिंदू धर्म किती सहिष्णू" असेही म्हणतात. अशा वातावरणात कोण नवीन काही निर्माण करायला जाईल?तेव्हा अशा स्वयंघोषित हिंदू समर्थकांकडे दुर्लक्षच केलेले इष्ट.

In reply to by क्लिंटन

.अशा गोष्टींना साधे क्वेश्चन करणारे लोक पाखंडी आणि हिंदूविरोधी समजले जातात.म्हणजे कोण हिंदू समर्थक आणि कोण विरोधी हे ठरवायचा अधिकार अशा ठराविक मंडळींना दिलेला असतो (की कोणीही न देता तो त्यांनी स्वत:कडे घेतलेला असतो).
वा!
अशा स्वयंघोषित हिंदू समर्थकांकडे दुर्लक्षच केलेले इष्ट.
सहमत (हिंदू) आजानुकर्ण

In reply to by क्लिंटन

असे त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणाऱ्यांना "हिंदूविरोधी" म्हणणारे लोकच मोठ्या तोंडाने "आमचा हिंदू धर्म किती सहिष्णू" असेही म्हणतात.
क्लिंटनराव, क्या बात है! नुकतंच कुणाच्यातरी सहित असलीच काहीतरी बरळ वाचल्यासारखं वाटतंय. ;-)

In reply to by सहज

स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच.
अगदी योग्य मुद्यावर बोट ठेवलंत. चांगलं म्हणजे काय व वाईट म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या लेखनात मुळातच संदिग्धता असता कामा नये. जर दोन अर्थ निघत असतील तर चांगला तेवढा घ्यावा व वाईट सोडून द्यावा असं म्हटलं तर काय अर्थ आहे? द्वयर्थी अश्लील लेखनात 'चांगला तेवढा घ्यावा' असं म्हणता येतं का? संस्कृतीचे रक्षक स्वतः वाईट अर्थ घेऊन बोंब मारणारच. शेवटी 'सोयीस्कर अर्थ घ्यावा व तो अर्थ सांगण्याचा मक्तादेखील सोयीस्करपणे स्वतःकडे घ्यावा' हेच खरं.

In reply to by सहज

सहजकाकांची एंट्री आवडली, आमचे प्रतिसाद टंकायचे कष्ट वाचवल्याबद्दल आभार. नाना ह्या बुवावाजीच्या धंद्यात उतरले* तर बक्कळ पैसा कमावतील असे भविष्य त्यांच्या नाड्या हातात न घेता वर्तवतो. *मुळात आहेत की नाहीत हे आपल्याला ठावुक नाही ब्वॉ.

In reply to by Nile

नाना ह्या बुवावाजीच्या धंद्यात उतरले* तर बक्कळ पैसा कमावतील असे भविष्य त्यांच्या नाड्या हातात न घेता वर्तवतो.
सहमत आहे. नानांकडे ते कौशल्य चांगले आहे.

In reply to by Nile

सहमत आहे. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञानावर व्याख्याने देण्याचा विचार आहे. आता ही उल्लेख केलेली मंडळी बुवाबाजी करत होती का ते माहित नाही. आणि त्यातुन त्यांना किती आर्थिक लाभ होत होता ते माहित नाही.

ती गोष्ट सहा आंधळ्यांची आहे. रामदासकाकानी त्यात सातवा आंधला अ‍ॅड केलाय. पण त्या सातव्या आंधळ्यामुळे हत्तीने त्या सर्वाना पायतळी तुडवले

In reply to by विजुभाऊ

मुळात आंधळेच असणार्‍यांना आपल्यासोबत अजून तीन आंधळे आहेत , चार आहेत की पाच हेही पटकन कळणे अवघड. त्यामुळे संख्या चुकू शकते.. आम्हाला चारच वाटले. ;)

अवलियाच्या (दत्तप्रभूना अवलिया ही म्हणतात) रसाळ निरुपणानंतर खरंतर काही लिहायला नको पण, दत्त महाराजांच्या आई वडिलांबद्द्ल थोडे लिहावेसे वाटले. आईचे नाव अनसुया आणि वडील अत्रि. अन्-असूया आणि अ-त्रि. थोडी फोड केल्यावर लक्षात येते की, दत्त कोणापोटी जन्म घेतात? जिला अजिबात असूया वाटत नाही तिच्या आणि अ त्रि म्हणजे जे त्रि-तीन गुणांच्या पलिकडे गेलेले आहेत अशा वडिलांच्या पोटी. जरी वर त्रिगुणात्मक असे म्हटले असले तरी दत्त महाराज हे त्रिगुणातीत आहेत. ब्रह्मदेव रज, विष्णू सत्त्व आणि शंकर तमोगुणाचे स्वामी आहेत. आणि अर्थातच स्वामी हा नियंता /नियंत्रण करणारा अशा अर्थाने वापरला आहे. दत्त हे या तिन्हीचे मिळून रुप असल्याने साहजिकच ते तिन्ही गुणांचे अधिपती आणि त्रिगुणावतार अशा अर्थाने म्हटले गेले आहेत. शिवाजी दुसर्‍याच्या घरी जन्मावा अशी इच्छा असणार्‍या लोकांसाठी परमार्थ नाही. रोख ठोक मामला. पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे सारखा आणि अत्यंत व्यक्तिगत. मला कोणाबद्द्ल किती असूया वाटते आणि मी कुठ्ल्या गुणाच्या (सत्व, रज, तम) प्रभावाखाली (दारुडा दारुच्या असतो तसे) आहे हे न जाणून घेता, दुसर्‍या व्यक्ति, मत,विचारधारा यांवर झोड उडवणारे लोक बघितले की कीव येते. दत्त आहेत का, खरे की खोटे या प्रश्नाआधी किमान दुसर्‍या बद्दल असूया मत्सर द्वेष नसणे एवढे मिळाले तरी पुरे. अवांतरः बाकी मोर नाचताना त्याचा फुललेला पिसारा बघायचे सोडून मागे जाऊन त्याचा पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????

In reply to by प्यारे१

पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????>>>> ...मला वाटते हल्ली सर्वांगीण विचार या अशाच कृतीला म्हणतात.

In reply to by कवितानागेश

सर्व संत्री-मंत्री "वाह वा, काय सुंदर आहे राजाचा अंगरखा" असं म्हणत असताना "राजा नागडा आहे" असं ओरडणर्‍या मुलाची गोष्ट आठवली. तिरळ्या राजाचं सुंदर चित्र काढण्याची जबाबदारी खांद्यावर पडलेला चित्रकार, राजा एक डोळा बंद करून बाण सोडण्याचा तयारीत आहे, असं चित्र काढतो अशीही एक गोष्ट आहे. =================================================== 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' का 'जो बात तुझ में है तेरी तस्वीर मे नही' हा फक्त दृष्टीकोनाचाच मुद्दा असतो. नसणार्‍या मोराचा नसलेला पिसारा बघणं सोपं नसावं.

In reply to by प्यारे१

बाकी मोर नाचताना त्याचा फुललेला पिसारा बघायचे सोडून मागे जाऊन त्याचा पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????
पार्श्वभाग दाखवुन नाचणार्‍या गाढवाकडे पाहुन काय उमदा घोडा आहे असे म्हणणारे निराळेच.

श्री गुरुदेव दत्त! फार सुरेख विवेचन, मस्त निरूपण. याच धर्तीवर अजून लेखन करावे ही मनापासून विनंती!

In reply to by गुंडोपंत

हेच म्हणतो..

वाहवा छान चर्चा चालली आहे. चांगले वैचारीक वाचायला मिळाले. नानासाहेबांचे निरुपण तर क्लासच. वर अजून कोणीतरी अत्रि -अनसूया यांच्याबद्दल लिहीलेले पण छानच आहे. पटले. =================================================== 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' का 'जो बात तुझ में है तेरी तस्वीर मे नही' हा फक्त दृष्टीकोनाचाच मुद्दा असतो. नसणार्‍या मोराचा नसलेला पिसारा बघणं सोपं नसावं पण पार्श्वभाग बघणं असावं. कारण तसे करताना अनेक लोक दिसतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आध्यात्मिक (रूपक) कथेची कोडी सोडवण्यासाठीची किल्ली. खरेतर सर्व (अंतर्मुख व बहिर्मुख) शास्त्रांच्या अभ्यासात हा प्रश्न पडतो व सोडवता यावा लागतो (च). टिंगल तर सर्वच गोष्टींची करता येते. असो.