Skip to main content

मूर्तीपूजा - २

शुचि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
विविध तीर्थस्थानांमधून विधीवत प्राणप्रतिष्ठीत केलेल्या मूर्ती या हजारो वर्षांपासून धर्माच्या आधारस्तंभाची भूमिका बजावत आहेत. कोट्यवधी भक्तांच्या अढळ प्रेमाचे आणि चीरस्थायी श्रद्धेचे ध्रुवपद प्राप्त करून या मूर्ती राहील्या आहेत. अनेक मूर्तींबरोबर काही रम्य तर काही अलौकीक आख्यायीका जुडलेल्या आढळतात. टिटवाळ्याच्या महागणपतीची ही आख्यायीका आहे की या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रत्यक्ष कण्वमुनींनी केली. पुढे दुर्वास मुनींनी शकुंतलेला शाप दिल्यामुळे , दुष्यंत राजाला आपल्या पत्नीचा शकुंतलेचा जेव्हा विसर पडला तेव्हा कण्व मुनींच्या सांगण्यावरून शकुंतलेने याच गणपतीची पूजा-अर्चा केली.
तुळजापूरच्या भवानी मातेच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील ही एकमेव चल मूर्ती असून वर्षातून तीन वेळा ती विधीपूर्वक हलविली जाते आणि देवी शयन करण्यास गमन करते. तीसरी मजेशीर आख्यायीका गुहगरच्या उफराटा गणपतीची. हा गणपती पूर्वी म्हणे पूर्वाभिमुख होता. पण एकदा समुद्राचे पाणी वाधू लागले आणि गुहागर बुडून जाईल अशी स्थिओती निर्माण झाली. तेव्हा आपोआप ही मूर्ती पश्चिमाभिमुख झाली म्हणून नाव पडलं "उफराटा गणपती"
चवथी आख्यायीका मूर्तीची नसून मीनाक्षी देवीची आहे. पण मूर्ती असामान्य असल्याने उल्लेख करते आहे.मीनाक्षी देवी ही यज्ञामधून प्रसादाच्या रुपात उत्पन्न झाली. जन्मतःच ती ३ वर्षाची होती व तिला ३ स्तन होते. यज्ञामधून जन्मली म्हणून अयोनिजा. तसेच मासोळीसारखे डोळे घेऊन आली म्हणून मीनाक्षी. या देवीने आपल्या युद्धकौशल्याने संपूर्ण पृथ्वी जिंकली. ती कैलासावर स्वारी करण्यास सिद्ध झाली. तेव्हा साक्षात शंकर तिला सामोरे आले. त्यांना पहाताच तिच्या मनात लज्जाभाव उत्पन्न झाला, तिचा आवेश गळून पडला आणि तिची विकृती देखील दूर झाली. तिने शंकरांना आपले भावी पती म्हणून ओळखले.
फोटो सौजन्य - जाल
प्रशु

शुचीताई फार सुंदर उपक्रम, माझ्या कडे रा. चि. ढेरेंची दोन पुस्तके आहेत, 'लोकदेवतांचे विश्व' आणी 'श्री तुळजाभावानी', अरुणा ढेरेंच 'वेगळी माती वेगळा वास' वरील पुस्तकात आपल्या देव देवतां व त्यांचे आजचे रुप ह्यांवर छान माहीती आहे...
02/11/2010 - 21:18 Permalink
शुचि

In reply to by प्रशु

अहो मग येऊ द्या ना. मी तर हे फक्त (जवळजवळ)संकलन केलं आहे जालावरून. स्वतःची फारशी भर नाहीये. अर्थात शब्द थोडे ट ला ट जुळवून मांडले आहेत.
02/11/2010 - 21:37 Permalink
प्रशु

In reply to by शुचि

प्रयत्न करेन, पण तुमचा धागा पळवायचा हेतु नाही हो, त्या पुस्तकात देवीच्या एका रुपाचा आणी त्या शिल्पाचा उल्लेख आहे जो मी मागे केला होता एका धाग्यावर, पण त्यावर तुफान प्रतिक्रिया आल्या आणि मुळ विषय बाजुला राहिला.. परत एकदा पुस्त्क वाचेन आणी लिहिन..
02/11/2010 - 21:43 Permalink
शुचि

In reply to by प्रशु

जरूर लिहा. जितकी माहीती मिळेल तितकं छान. या धाग्यावर लिहा अथवा नवा धागा काढा पण लिहा. काय देखणी शिल्पे असतात, काय सौंदर्य असते, काय सुरस चमत्कारीक कथानक गुंफलेलं असतं त्यांच्यामागे. मला हे सर्व फार फार अद्भुत वाटतं. म्हणतात ना - शिल्पकार शिल्प घडवताना फक्त अनावश्यक पाषाण दूर करतो आणि सुंदर प्रतिमा आपोआप साकार होते. म्हणजे ती त्या पाषाणात असतेच फक्त शोधक नजर हवी. मला लहानपणी एकदा म्हैसूर, बेलूर, हळेबीड, बेंगलोर ला जायला मिळलं होतं शाळेच्या सहलीबरोबर. मी मंत्रमुग्ध होऊन गेले होते. दर्पणात स्वतःचे रूप न्याहाळत असलेली ललना कुठे तर कुठे नाजूक पदन्यास करत असलेली नर्तकी आणि ते शिल्प देखील कसं तर तिचा पाय आणि चौथरा यामधे कळेल न कळेल अशी फट. जो बारकावा गाईडने आमच्या लक्षात आणून दिला होता.
02/11/2010 - 21:53 Permalink

गोनीदांच्या 'कादंबरीमय शिवकाल' मध्ये घारापुरीचे वर्णन वाचुन मी घारापुरीला गेलो होतो. एक धागा पण काढ्ला होता मी. वेरुळ फार लहानपणी पाहिलं होतं, परत बघायची फार ईछा आहे... एका विष्णुच्या मुर्ती चे मुर्तीशास्त्रांनुसार प्रकार असतात, लक्ष्मीनारायण, लक्ष्मीकेशव इ. तेसुद्धा चारही हातातील आयुधानुसार..
02/11/2010 - 22:07 Permalink
मुक्तसुनीत

माहितीपूर्ण लिखाण. संपूर्ण लेखमाला वाचणार आहे. हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन.
02/11/2010 - 21:30 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by मुक्तसुनीत

>>>>माहितीपूर्ण लिखाण. संपूर्ण लेखमाला वाचणार आहे. हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन. -दिलीप बिरुटे
03/11/2010 - 18:18 Permalink
Nile

तीसरी मजेशीर आख्यायीका गुहगरच्या उफराटा गणपतीची. हा गणपती पूर्वी म्हणे पूर्वाभिमुख होता. पण एकदा समुद्राचे पाणी वाधू लागले आणि गुहागर बुडून जाईल अशी स्थिओती निर्माण झाली. तेव्हा आपोआप ही मूर्ती पश्चिमाभिमुख झाली म्हणून नाव पडलं "उफराटा गणपती"
तुम्ही समुद्रात बुडताना पाठ समुद्राकडे केलीतर बुडणार नाही का? की पाठ दाखवली की समुद्र बाय बाय करतो? काही पण च्यायला. जरा दोन मीनीट विचार करुन मग मांडा की मतं. आणि उफराटाचा अर्थच उलटा (स्वाभाविक चुकीचा, विरुद्ध) असा आहे. (उफराटा न्याय वगैरे) असे असताना "जर सगळे गणपती पुर्वाभुमुखी असतील तर हा उफराटा आहे कारण तो पश्चिममुखी आहे. कुणीतरी पुर्वी चुकीने उलटा बसवला असेल. मुर्तीच ती, ती काय स्वतः अवतरली आहे का?का उगाच आपले काहीतरी आख्यायिका जोडायच्या अन त्यावर लेख पाडून पब्लिक का खुळ्यात काढायचं? असे काहीतरी लिहायचं अन मग त्यावर उफराट्या प्रतिक्रीया आल्याकी तक्रारी करायच्या, काय अर्थ आहे याला?
02/11/2010 - 21:45 Permalink

>>असे काहीतरी लिहायचं अन मग त्यावर उफराट्या प्रतिक्रीया आल्याकी तक्रारी करायच्या - काय राव , जरा नीट वाचा की. आख्यायिका असे लिहीले आहे त्यांनी. आख्यायिका शब्दाचा अर्थ तरी माहित आहे ना.
02/11/2010 - 22:02 Permalink
मूकवाचक

In reply to by Nile

आख्यायिका आहे असे लक्ष देऊन वाचले असते तर उफराटी प्रतिक्रिया टाळता आली असती. तुम्ही तर्कसन्गतीच्या बाबतीत भलतेच भावुक होता बुवा! असो.
02/11/2010 - 22:42 Permalink
बेसनलाडू

माहितीपूर्ण आणि आख्यायिकाधिष्ठित तरीही त्रोटक असे दोन्ही भाग वाचले. ठीक आहेत. (वाचक)बेसनलाडू आख्यायिका जुडलेल्या आढळतात? हे तर अस्सल हिंदाठी आहे, मराठी नव्हे. आख्यायिका जुळलेल्या/जोडल्या गेलेल्या असे काहीतरी हवे. (सुधारक)बेसनलाडू
02/11/2010 - 23:34 Permalink
मिसळभोक्ता

यज्ञामधून जन्मली म्हणून अयोनिजा ! अरे वा ! "त्या क्रियेला" यज्ञ म्हणणे आवडले ! आपले पूर्वज थोर होते, ह्याचा आणखी एक पुरावा. (ऐकताय ना उपक्रमतै?) (उगाच, "सारखा सारखा लघुरुद्र करून कंटाळा आला, आज महारुद्र घालूया" असे ड्वायलाक डोक्यात रुंजी घालू लागले.)
03/11/2010 - 01:48 Permalink
वेताळ

In reply to by मिसळभोक्ता

हा लेख वाचुन परत एकदा मला पटले. पण मुर्ती बघुन वाटते त्याना कापसापासुन कापड तयार करण्याची कला बहुधा त्या काळी अवगत नसावी.
03/11/2010 - 10:02 Permalink

आपले पुर्वज खरोखरीच महान होते! हा लेख वाचुन परत एकदा मला पटले. मी आपला अरनॉल्डचा टोटल रिकॉल पाहून हे काय नक्की 'अच्र्त की ऑसम' म्हणत होतो पण इथे तर आपल्या पुर्वजांना तिचे नाव, गाव, वय, वैशिष्ट सगळेच ठावूक होते. जसे आपल्या वर्गात, मित्रचमूत काही वाह्यात मंडळी असतात तशी आपली पूर्वज देखील होती का अशी शंका येते आहे पण देन अगेन 'आपले पुर्वज खरोखरीच महान' जर अयोनिजा सारखी खरी जीवंत उदाहरणे किमान १०% मिपाकरांना माहीत असतील तर कृपया मिपाकरांनी सांगावे अन्यथा आपल्या पूर्वजांचा खरा मूर्खपणा की बळचकर अभ्यासु लेख नावाखाली विजारजंती थिल्लरपणा / श्रद्धाळू किळसवाणे पालन करणे जास्त अशिष्ट हे लक्षात येत नाही आहे.
03/11/2010 - 10:11 Permalink
मिसळभोक्ता

In reply to by सहज

जर अयोनिजा सारखी खरी जीवंत उदाहरणे किमान १०% मिपाकरांना माहीत असतील तर कृपया मिपाकरांनी सांगावे हल्ली म्हणे सिझरियन डिलिव्हरीचे प्रमाण खूपच वाढले आहे (आय टी तल्या बायकांना सुटी काढावी लागते ना, त्यासाठी आधीच तारीख सांगावी लागते.) त्या सगळ्या डिलिव्हरीज अयोनिजा ! म्हणूनच म्हणतो, की आपले पूर्वज महान होते !
04/11/2010 - 00:49 Permalink
मिसळभोक्ता

In reply to by सहज

जर अयोनिजा सारखी खरी जीवंत उदाहरणे किमान १०% मिपाकरांना माहीत असतील तर कृपया मिपाकरांनी सांगावे हल्ली म्हणे सिझरियन डिलिव्हरीचे प्रमाण खूपच वाढले आहे (आय टी तल्या बायकांना सुटी काढावी लागते ना, त्यासाठी आधीच तारीख सांगावी लागते.) त्या सगळ्या डिलिव्हरीज अयोनिजा ! म्हणूनच म्हणतो, की आपले पूर्वज महान होते !
04/11/2010 - 00:49 Permalink
llपुण्याचे पेशवेll

In reply to by वेताळ

असे नक्की कशावरून वाटले बॉ? कंबरेखाली तर वस्त्र दिसते आहे. तुम्हाला दिसले नाही का?
03/11/2010 - 10:23 Permalink
शिल्पा ब

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्यांचे तिकडे लक्षच नसेल गेलं...असते एकेकाची सवय. अजूनही काही आदिवासी जमातीत कमरेवर वस्त्र घालत नाहीत..
03/11/2010 - 10:42 Permalink
वेताळ

In reply to by शिल्पा ब

त्यांचे तिकडे लक्षच नसेल गेलं...असते एकेकाची सवय. होय खाली वाकुन बघायची सवय नसल्यामुळे बहुधा असे घडले असावे.
03/11/2010 - 10:54 Permalink
llपुण्याचे पेशवेll

In reply to by वेताळ

हा हा हा.. छान अहो स्वतःच्या नाही मूर्तीच्या म्हणत आहेत. कमरेखालचे वस्त्र नुसत्या दृष्टीक्षेपात पण दिसते हो.
03/11/2010 - 11:15 Permalink
मूकवाचक

In reply to by मिसळभोक्ता

'त्या क्रियेविना' अपत्य होउच शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे काय? आता स्पर्म डोनेशन वगैरे करतात तेव्हा कुठे होते 'त्या क्रियेने' अपत्यप्राप्ती? तेव्हा चुकीचे गृहीतक ठामपणे मान्डून असले पाचकळ निष्कर्ष काढायचे, तर मग तीन स्तन असणारी आणि आपोआप त्यातील एक स्तन गळून पडणारी मुलगी जन्माला यावी या बद्दल आपले काय गृहीतक आहे? त्यामुळे उगाच असे वाकड्यात जाऊन कुणाची तरी थोरवी मोजत बसण्यापेक्षा 'मिथ' या शब्दाचा अर्थ नीट समजाउन घेणेच सयुक्तिक ठरेल. नाही का?
03/11/2010 - 22:59 Permalink
बिपिन कार्यकर्ते

शुचि, अतिशय छान उपक्रम हाती घेतला आहे तुम्ही. खूपच माहिती मिळत आहे. भरपूर लिहा. बाकी, श्रद्धा असो वा नसो पण एक आख्यायिकांमधून चालत आलेला वारसा म्हणून किंवा संस्कृतीचे देणे म्हणून तरी या लेखनाचा आस्वाद घ्यावा सगळ्यांनी. प्रत्येक ठिकाणी छिद्रान्वेषीपणा करायलाच पाहिजे असे नाही. केला तरी त्याबद्दल लिहिलेच पाहिजे असे नाही. आणि लिहिलेच एखाद्याने तरी इतरांनी दखल घेतलीच पाहिजे असे नाही. शुचि, पुढच्या (अजून सविस्तर) भागांची वाट बघतो आहे.
03/11/2010 - 10:51 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रद्धा असो वा नसो पण एक आख्यायिकांमधून चालत आलेला वारसा म्हणून किंवा संस्कृतीचे देणे म्हणून तरी या लेखनाचा आस्वाद घ्यावा सगळ्यांनी.
या वाक्यात सगळ्यांनी सदर प्रकारच्या लेखनाचा आस्वाद घेण्याची जबरदस्ती दिसते. माझ्यासारख्या काही लोकांना या धाग्याचा आस्वाद घेणं शक्य नाही पण टाळणं शक्य आहे. अशा लोकांनीही आख्यायिकांना वारसा समजावं अथवा संस्कृतीचं देणं समजावं हे मान्य नाही. मला स्वतःलातरी या आख्यायिकांमधून काही विचार, चांगला वारसा अथवा सुसंस्कृतपणा दिसत नाही. अर्थात अशा आख्यायिकांमुळे हानी होत नसल्यास आहे तसं चालू राहिलं तरीही काही त्रास नाही. फक्त दोन्ही बाजूंनी अशा गोष्टी इतरांवर आवडून (वा नावडून) घेण्याची जबरदस्ती होऊ नये एवढंच!
03/11/2010 - 14:23 Permalink
बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जबरदस्ती नाहीच. पुढेही नसेल. पण म्हणण्याचा अर्थ एवढाच : एखाद्या लेखात मांडलेले विचार पटो न पटो. त्यावर 'मला हे सगळे पटत नाही. मला लेख आवडला नाही.' असे किंवा तत्सम प्रतिसाद द्यावेत की. चेष्टा करणे अथवा खुळ्यात काढणे हे का? माझ्याही प्रतिसादात मी असेच ध्वनित केले आहे की मलाही यातले बरेच काही पटत नाही. शेवटी बोलून चालून त्या आख्यायिकाच. किती खर्‍या आणि किती खोट्या हे ठरवणे शक्य नाही. माझ्या मते त्या केवळ कल्पनेच्या भरार्‍याच. पण म्हणून शुचि अथवा समविचारी लोकांची चेष्टा करणे उचित नाही. अजून एक असे की, अशा प्रकारच्या आख्यायिकांनीच (ज्या जगभरात सगळ्या संस्कृतीत आहेत.) लोकजीवन / लोककला रंगतदार बनतात / समृद्ध होत जातात. म्हणून त्याच्याकडे तेवढेच महत्व देऊन बघावे. आशा आहे की माझा मुद्दा नीट मांडला गेला आहे.
03/11/2010 - 16:04 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपिन, व्यक्तीश: तुझे विचार वेगळे सांगायची गरज नाही; तुझ्या त्या वाक्याचा अर्थ काय लावायचा हे ही मला चांगलंच माहित आहे, पण पुढच्या वादाच्या वेळी "अशी जबरदस्ती होते" टाईप प्रतिसाद भडक नास्तिकांकडून वाचायला लागू नये म्हणून मुद्दामच हा खुस्पट-प्रपंच!
पण म्हणून शुचि अथवा समविचारी लोकांची चेष्टा करणे उचित नाही.
हज्जारदा सहमत. वाद विचारांशी घालावा, माणसांशी भांडणं करू नयेत. स्वतःला संस्कृतीचे पाईक समजणार्‍यांनी विचारजंत हा शब्द वापरताना किमान थोडाफार सुसंस्कृतपणा दाखवावा अशी अपेक्षा प्रकट करण्यासाठी ही जागा अगदी चुकीची नसावी!
03/11/2010 - 16:10 Permalink
ए.चंद्रशेखर

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती यांच्याशी सहमत. माझ्या मते बहुतेक आख्यायिका या ते विशिष्ट देऊळ किंवा स्थान लोकप्रिय व्हावे, त्या ठिकाणी भक्तांचा ओघ लागून स्थानिकांना धनप्राप्ती व्हावी या उद्देशाने पसरवल्या जातात. या सर्व आख्यायिका कोणाच्या तरी सुपिक डोक्यातून निर्माण झालेल्या असतात. अंधश्रद्ध व भावूक मंडळी असल्या आख्यायिकांना सहज बळी पडतात. असल्या आख्यायिकांना मिपा सारख्या संकेतस्थळावर प्रसिद्धी देणे हे एक प्रकारचा अंधश्रद्धा प्रचारच आहे असे मला वाटते.
04/11/2010 - 08:53 Permalink
बेसनलाडू

In reply to by ए.चंद्रशेखर

सर्व आख्यायिका कोणाच्या तरी सुपिक डोक्यातून निर्माण झालेल्या असतात. अंधश्रद्ध व भावूक मंडळी असल्या आख्यायिकांना सहज बळी पडतात. असल्या आख्यायिकांना मिपा सारख्या संकेतस्थळावर प्रसिद्धी देणे हे एक प्रकारचा अंधश्रद्धा प्रचारच आहे असे मला वाटते. असहमत. आख्यायिका या एन-पी कम्प्लीट प्रॉब्लेमसारख्या असाव्यात असे वाटते. आजवर त्यांचे मूळ/उत्पत्ती/कार्यकारणभाव सापडला नाही म्हणजे तो अस्तित्त्वातच नाही/सगळे काल्पनिकच आहे, असे नाही. आणि जर एखाद्या आख्यायिकेचे मूळ/उत्पत्ती सापडले/ली किंवा ती काल्पनिक नाही, असे सिद्ध झाले तर सगळ्याच आख्यायिकांचे सापडू शकेल/कपोलकल्पित नाहीत, असे म्हणता येईल. तसेच याच नियमानुसार काही वा सर्वच आख्यायिका काही वास्तव घटनांच्या जवळच्याच आहेत, असे सिद्ध करता येईल. उदा. तीन स्तनांच्या अयोनिजा मीनाक्षीकडे जनुकीय बिघाडाचे उदाहरण म्हणून का पाहता यायचे नाही? जनुकीय बिघाड आणि त्याने बाधित बालके ही तर आख्यायिका नाही, शास्त्रीय वास्तवच आहे. असो. (संगणकशास्त्री)बेसनलाडू मिपावरचे असे लेखन म्हणजे अंधश्रद्धा प्रसार हा बादरायणसंबंध पाहून तर खो खो हसलो. आता उरलेला दिवस मजेत जाणार, हे नक्की! (सदासुखी)बेसनलाडू
04/11/2010 - 23:10 Permalink
मूकवाचक

In reply to by ए.चंद्रशेखर

आख्यायिका/ मिथक या अमुक ठिकाणी गणपती दूध प्यायला लागला या सारख्या गोष्टी नाहीत.
05/11/2010 - 01:33 Permalink
गवि

नुकताच दिवेआगरचा सुवर्ण गणेश पाहिला. तो श्रीमती पाटील नामक बाईंना त्यांच्या सुपारीच्या बागेत खणताना मिळाला. फक्त मानेपासून वर, मुखवट्यासारखा आहे. तो संपूर्ण सोन्याचा आहे असं म्हणतात. वाटतो ही तसाच. पण तो ज्या प्रकारच्या छोट्या रस्त्याकडेच्या देवळात आणि जशा शून्य सुरक्षेत ठेवला आहे ते बघून शंका येते की सोन्याचाच आहे का?.
03/11/2010 - 12:28 Permalink
मराठे

लेख आवडला. मार्लेश्वराच्या धबधब्याखाली उभं राहून 'शिवशंभो' असं ओरडलं की पाण्याचा प्रवाह वाढतो अशी एक आख्यायिका आहे. अर्थात मी करून पाहिलं पण तसं काही झालं नाही.
05/11/2010 - 01:46 Permalink