मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवराज्याभिषेक

जिप्सी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शिवराज्याभिषेकाचे वर्णन आपण अनेकदा वाचले असेल पण एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून यावर लेखन फार क्वचितच झाले असेल. खास महाराजांच्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका डच वकीलाने लिहिलेले हे वर्णन.हा वकील वेंगुर्ल्यातल्या डच वखारीतला असावा,त्याने हे पत्र बटेव्हियातल्या (?) आपल्या वरिष्ठास लिहिलेले आहे. त्याचा हा गोषवारा. संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२ पुष्कळ दिवस तयारी होऊन जुनच्या सुरुवातीला राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून सुमारे ११ हजार लोक रायगडावर जमा झाले. २९ मे रोजी मोठ्या समारंभाने महाराजांना क्षात्रधर्माची दिक्षा देण्यात आली.या दिवशी सर्व संस्कार करून १७००० होन धर्मार्थ वाटून देण्यात आले. पापक्षालनार्थ म्हणून ४ जून रोजी महाराजांनी मोठा दानधर्म केला. यादिवशी महाराजांची १७००० होनांनी सुवर्णतुळा करण्यात आली..याच बरोबर चांदी,तांबे,जस्त्,कथील,शिसे,लो़खंड्,ताग्,कापूर्,मीठ्,खिळे,जायफळ्,जायपत्री,मसाले,लोणी,साखर्,सर्व प्रकारची फळे,खाद्ये,सुपारी,ताडी अशा नानाविध वस्तूंनी तुळा करून त्यांचा धर्म करण्यात आला. ६ जून रोजी पहाटेस ५ वा. महाराजांनी सिंहासनारोहण केले.यानंतर मुख्य प्रधान मोरोपंत यांनी मुजरा करून ८००० होनांनी महाराजांना सुवर्णाभिषेक केला. निळोपंतांनी ७००० होनांनी, इतर २ प्रधानांनी प्रत्येकी ५००० होनांनी महाराजांना सुवर्णाभिषेक केला.सेनापतींनी महाराजांच्या माथ्यावर छत्र धरले. इतर सर्व मुजरे करून सिंहासनाच्या दुतर्फा उभे राहीले.संभाजीराजे सिंहासनाच्या पायरीवर बसले. हा समारंभ १२ दिवस चालू होता व तितके दिवस भोजने चालू होती.या समारंभाचा व दानधर्माचा एकूण खर्च दिड ला़ख होन झाला.(हा आकडा कमी वाटतो) याप्रसंगी डचांनी काय नजराणा दिला याचा उल्लेख सापडत नाही. पण ब्रिटिशांच्या नजराणा खालील प्रमाणे होता :- महाराज :- १ हिरेजडित शिरपेच - रु.६९०/- २ हिरेजडित सलकडी - रु.४५०/- २ मोती(१० १/१० रती) - रु.५१०/- ------------------ रु. १६५०/- संभाजीराजे :- २ सलकडी -रु.१२५/- ८ हिर्‍यांची कंठी -रु.२५०/- ------------------ रु.३७५/- याशिवाय मोरोपंतांना २ मोती रु. ४००/-, अण्णाजी २ सोन्याचे गोफ वजन ७ तोळे रु.१२५/-,निराजी पंडीत २ पामर्‍या रु.७०/-,रावजी सोमनाथ २ पामर्‍या रु.७०/- व इतर लोकांना योग्यतेनुरूप नजराणे देण्यात आले.

वाचने 5050 वाचनखूण प्रतिक्रिया 21

सुनील 09/09/2010 - 01:18
या समारंभाचा व दानधर्माचा एकूण खर्च दिड ला़ख होन झाला.(हा आकडा कमी वाटतो) कंसातील टीप आपली की डच वकीलाची?

जिप्सी 09/09/2010 - 01:32
कंसातली टिप माझीच आहे. ब्रिटीशांच्या अंदाजानुसार हा खर्च ५ लाख होन इतका होता.मराठ्यांचे रायगडावरील दप्तर जळाल्याने अस्सल आ़कडा उपलब्ध नाही. अवांतर :- बटेव्हिआचा शोध घेतला असता असे कळते की बटेव्हिआ म्हणजे आजचा जाकार्ता.(विकीपेडिआ -Jakarta, on the island of Java, is the capital city of Indonesia. During the Dutch colonial era, it was called Batavia)

विलासराव 09/09/2010 - 11:15
नवीनच माहिती मिळाली. जिप्सी तुम्ही लिहीत रहा. खर्चाचे टेंशन घेउ नका, तो महाराजांनी केलेलाच आहे.जो असेल तो असेल.

अवलिया 09/09/2010 - 13:46
चांगली माहिती. धन्यवाद. किंचित सुधारणा - आपण नेहमी शिवराज्याभिषेक असा उल्लेख करतो, जो किंचित चुक आहे. खरे तर जेव्हा राजांना अभिषेक झाला तेव्हा अभिषेकाआधी राज्य अस्तित्वात नव्हते. त्यांना अभिषेक झाल्यावर ते राजा झाले आणि मग राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे शिवराजाभिषेक असा शब्दप्रयोग योग्य. गागाभट्टांनी शिवाजीमहाराजांच्या राजाभिषेकासाठी विविध ग्रंथांचा आधार घेऊन सर्व अभिषेक प्रक्रिया नक्की कशी करायची यासाठी ग्रंथ लिहिला आणि त्याच्याच आधाराने सर्व सोहळा पार पाडण्यात आला. त्या ग्रंथात सुद्धा राजाभिषेक असा उल्लेख आहे. अर्थात त्यामुळे मुळ भावनेला काही फरक पडत नाही जोपर्यंत असे काही झालेच नव्हते असे विचार घेऊन कुणी पुढे येत नाही. अर्थात आले तर आमचे अशांना योग्य उत्तर असतेच. :)

लॉरी टांगटूंगकर 09/09/2010 - 20:22
भाईलोक, दप्तर या शब्दाचे आजचे आणि पूर्वी चे रूप इतके वेगळे का आहे???(ऐतिहासिक संधार्भा सह सांगितल्यास उत्तम)

धमाल मुलगा 09/09/2010 - 21:20
ह्म्म.... जिप्सीबुवांच्या पोतडीतुन एकेक लेख असे बाहेर यायला लागले आहेत हां :) ब्येस ब्येस! सायबा, आमची एक मागणी आहे. महाराजांच्या इतिहासाबद्दल जेव्हा लोकांना ठाऊक असतं तेव्हा ते बहुतांश त्यांच्या धामधुमीच्या काळाबद्दलची रोमांचकारक माहिती.. ह्या धामधुमीखेरीज उर्वरित काळात महाराजांनी राज्याची घडी बसवण्यासाठी काय योजना केल्या, जीवावर उदार होणारे मावळखोर्‍यांतले एकेक नररत्न कसकसे पारखुन उचलले, न्यायनिवाड्याची त्यांची पध्दत इत्यादी बाबींबद्दलही बखरी-दप्तरे-रुमाल बोलतात ते इथे आमच्यासारख्या काहीच ठाऊक नसलेल्यांसाठी लिहावे ही आग्रहाची विनंती.

प्रभाकर कुळ्कर्णी 09/09/2010 - 21:58
ही माहिती कुठली पुस्तकं वा पुस्तक वाचुल लिहिली आहे ते दिले नाही? मोरोपंत, निळोपंत - पंत म्हण्जे ब्राह्मण काय ? हा निळाजी पंडीत कोन? कारण आता मराठी बाल भारती त जे ३० एक वर्ष शिकवल्या गेलेलं आहे ते चुकीच आहे असं काही लोक म्हणत आहेत. ही माहीती बरोबर कशावरुन? " ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून" असं लिहिलं आहे. ब्राह्मणांना तर वाईट होते असं म्हणन्यात येत आहे. तू तर " छत्रपती शिवराय यांच्या अभिषेकाला" ब्राह्मण हे विद्वान व ईतरांच्या जोडीने बसले होते लिहित आहेस. जरा कोनत्या पुस्ताकातुन ही माहीती घेतली ती कळवीने. छत्रपती शिवाजी महाराज कि जय ! चू.भू. द्या. घ्या.

In reply to by प्रभाकर कुळ्कर्णी

धमाल मुलगा 09/09/2010 - 22:29
प्रभाकरराव, लेखाच्या सुरुवातीला जिप्सी ह्यांनी
संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२
हा संदर्भ दिला आहे. बाकी, जातीय तेढविषयक प्रश्न - पुर्ण दुर्लक्ष. (स्वगतःपरमेश्वरा...कुठवर पसरवलं गेलंय हे गैरसमजाचं विष! )

In reply to by कुक

धमाल मुलगा 09/09/2010 - 22:35
होन हे शिवरायांच्या राज्यातील महाराजांनी सुरु केलेले चलन होते. जसे आज भारतात रुपया. हे होन सोन्याचे घडवत असत.

सुनील 10/09/2010 - 00:42
होन म्हणजे काय, हा प्रश्न वर दोन जणांनी विचारला आहे. आता, होन म्हणजे एक शिवकालीन सोन्याचे नाणे, इतपत ऐकीव माहिती मला आहे. परंतु, एका शंकेचे उत्तर मला आजतागायत समाधानकारकरीत्या मिळालेले नाही. त्या काळात अनेक राज्ये होती. बहुतेक राजे स्वतःची नाणी घडवीत. आंतरराज्यीय व्यापार तर तेव्हाही होत असावाच. तर, ह्या सगळ्या अनेक नाण्यांचे (विविध राज्यांच्या) विनिमयाचे दर काय असत? ते कोण ठरवी? जर सगळी नाणी सोन्याची असती तर हा प्रश्न उद्भवला नसता कारण नाण्यातील सोन्याच्या प्रमाणावरून त्याचे मूल्य ठरले असते. परंतु, सगळीच नाणी सोन्याची नव्हती, हे खरे आहे. तसेच, राजकीय्/सामाजिक/आर्थिक परिस्थितीवरून नाण्यांच्या विनिमयाचे दर बदलीत असत काय? समजा एखादा राजा एखादी लढाई जिंकला, की वाढला त्याच्या नाण्याचा दर! असे काही होत असावे काय?

जिप्सी 14/09/2010 - 07:15
होन हे शिवाजी महाराजांचे सोन्याचे नाणे होते. वजन २.७२ ग्राम. त्यावेळेचा विनिमयाचा दर साडेतीन ते पावणेचार रुपये. होन साधारणपणे शर्टाच्या बटणाएवढा असतो. (मी अस्सल होन हातात घेउन बघीतलेला आहे त्यावरून). प्रताप नावाचे सोन्याचे नाणेही होते. याबद्दल विशेष माहीती उपलब्ध नाही. सुवर्णनाण्यांशिवाय्,शिवराई,सापिका,फलम व चक्र ही तांब्याची नाणीही चलनात होती. यापैकी फलम व चक्र ही नाणी अजून उपलब्ध झालेली नाहीत. अवांतर :सिधुदुर्गाच्या उभारणीचा खर्च १ कोटी झाला होता,म्हणजे तेंव्हाचे सुमारे ३.५ कोटी म्हणजे आजच्या परिस्थितीचा विचार करून सुमारे ३५ कोटी तरी म्हणायला हरकत नसावी. मोरोपंत पिंगळेंचा वार्षिक पगार ७००० होन होता. बाकी सर्व प्रधानांना वार्षिक पगार ५००० होन मिळत असे. सुनिल :- तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा काहीसा प्रयत्न करत आहे. महाराजांच्या काळात आंतरराज्यीय व्यापार बरेचदा वस्तुविनिमय पद्धतीने होत असे. २ राज्यांमध्ये चलन विषयक करार झाल्याशिवाय परराज्यातील चलन वापरता येत नसे. या करारावेळी विनिमय दर सुद्धा ठरत असे. काही राज्यांचा असा करार झाला नसल्यास चलनाचा विनिमय दर राजा न ठरवता सावकार ठरवत असत. व त्यावेळेच्या विनिमय दराप्रमाणे पैसे देत. आंतरराज्यीय मोठे आर्थिक व्यवहार तर हुंड्यांमार्फत होत. हुंड्यां म्हणजे आजचे डीडी. सावकारांच्या पेढ्यांवरती हुंड्यां वटवल्या जात. (आजच्या चेकला त्याकाळात वराता असे म्हणत) पुढे पेशवाईत देशभरातली सर्व नाणी जवळपास सर्वत्र चालत. यांचा विनिमय दराबद्द्ल फारसे माहीत नाही. पण पेशवाईत पुणेरी रुपया,जुन्नर रुपया,सुरती रुपया असे रुपये होते. एखाद्या वस्तूची किंमत ४ सूरती रूपये वगैरे अशी असे. बाकी या विषयावर माझ्याकडे सध्यातरी एवढीच माहीती आहे. या विषयावर अधिक अभ्यास करून आपल्याला सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करीन

विंजिनेर 14/09/2010 - 09:20
रंजक माहिती. या लेखात, इतर इतिहासाच्या पुस्तकांत कायम एक शब्द वाचण्यात येतो की इंग्रजांची वखार होती, डचांची वखार होती इ. तर हे 'वखार' प्रकरण काय आहे? मलातर वखार म्हटलं की लाकडाची नाहीतर कोळशाचीच टिणपाट पत्रे आणि सुभाबळीच्या वाफ्यांनी बांधलेली वखारच डोळ्यासमोर येते. पण एखादा कडक इस्त्रीची विजार, सोनेरी चकचकीत बटणे लावलेला कोट आणि काळेकुळकूळीत बूट घातलेला टोपीकर अशा वखारीत, लाकडाच्या भुशात/कोळशाच्या खकाण्यात राहून एकेकाळी भारतावर राज्य करायची स्वप्ने रंगवत होता यावर विश्वास बसत नाही :)

जिप्सी 14/09/2010 - 09:32
त्याकाळात वखार म्हणजे कचेरी वजा गोदाम असा प्रकार होता. ईंग्रज व ईतर व्यापारी सुके खोबरे,मसाल्याचे पदार्थ अशा त्याच्या व्यापारी वस्तून्चा साठा करून ठेवत तसेच कंपन्यांचा सर्व व्यवहार इथूनच होत असे. महाराजांनी स्वराज्यातील कुठल्याही कुंपणीला वखारीस तट्बंदी करू दिली नव्हती पण सुरतेतील वखारीस तट्बंदी असल्याचे उल्लेख सापडतात.