Skip to main content

१ ऑगस्ट २०१०

Published on मंगळवार, 03/08/2010
आज १ ऑगस्ट २०१०. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. दररोज सकाळी इंटरनेटवर वृत्तपत्र वाचणे हा माझा क्रम ठरलेला आहे. त्याप्रमाणेच आज मी सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, आणि लोकसत्ता ही नेहमीची वृत्तपत्रे उघडली. अर्थात टिळकांचा स्मृतीदिन आणि रविवार असा योग असल्या कारणाने माझ्या या आवडत्या व्यक्तिमत्वाबद्दल भरभरून वाचायला मिळणार अशी माझी खात्री होती. पण मी एक गोष्ट विसरलो होतो किंवा दुर्लक्षित केली होती म्हणणे योग्य होईल, कि या महान नायकाच्या पुण्यतिथीपेक्षाही महत्त्वाची तिथी आज होती. ती म्हणजे आपल्या मायबाप अमेरिकेची आपल्याला मिळालेली आणखी एक भेट, ‘Friendship Day’, अर्थात मैत्री दिन. तीनही वृत्तपत्रांमध्ये मैत्री दिनाला दिलेले महत्त्व ठळकपणे जाणवत होते. नाही म्हणायला महाराष्ट्र टाइम्समध्ये टिळकांवर लिहिलेले दोनच पण चांगले आणि माहितीपूर्ण लेख आणि कुमार केतकर यांचा लोकसत्तामधील टिळक आणि जीना यांवरील लेख वाचून थोडे समाधान झाले. पण हे लेखही शोधून काढावे लागतील अशा ठिकाणी दिलेले होते. सकाळने तर टिळकांच्या पुण्यतिथीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. यापेक्षा त्यांना कोल्हापुर सकाळचा वर्धापन दिन किंवा सिनेतारकांच्या मैत्री दिनामध्ये जास्त रस दिसत होता. ‘Valentines Day’ वर वेगळी पुरवणी काढणाऱ्या या वृत्तपत्रांना टिळकांच्यासारख्या व्यक्तिमत्वाबद्दल एखादे पान काढण्याचे भानही राहू नये ही लज्जास्पद गोष्ट आहे. खरेतर टिळक, आगरकर, सावरकर, महात्मा गांधी, विनोबा भावे, यांच्यासारख्या महानायकांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून, या थोर लोकांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आणि विचारांबद्दल आजच्या तरुण पिढीला अवगत करून देण्याचे कार्य या वृत्तपत्रांकडून अपेक्षित आहे. जेणेकरून आम्ही किती थोर विचारवंतांचे वंशज आहोत आणि पुरोगामी विचार म्हणजे काय आणि ते बाहेरून आंदण घेण्याची गरज नाही याची जाणीव समाजाला होईल. पण यात दोष वृत्तपत्रांचा नाही असेच म्हणावे लागेल. कारण जे विकले जाइल तेच छापले जाते. नैतिकता, समाजसुधारणा अशा जुनाट संकल्पना आपल्या पुढारलेल्या वृत्तपत्रांनी केंव्हाच टाकून दिलेल्या आहेत. तीही आता भारतापेक्षा India चीच मुखपत्रे आहेत हेच खरे.
लेखनविषय:

वाचन संख्या 2621
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

तुमचे विचार चांगले आहेत, पण >>कारण जे विकले जाइल तेच छापले जाते. यातच सर्व काही आले. प्रश्न तिथेच संपतो. :)

केवळ पैशाच्या मागे असणार्यांकडून ह्या अपेक्शा ठेवणे व्यर्थ आहे... लोकांना फालतू गोष्टीतच जास्त ईंटरेस्ट असतो....

अवांतर आज का लौंढा कहे की हम तो बिस्मील चट गये, अपनी आजादी तो भैया , लौंढीया के तिल मे है . आज का लौंढा (अडगळ)

>>खरेतर टिळक, आगरकर, सावरकर, महात्मा गांधी, विनोबा भावे, यांच्यासारख्या महानायकांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून, या थोर लोकांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आणि विचारांबद्दल आजच्या तरुण पिढीला अवगत करून देण्याचे कार्य या वृत्तपत्रांकडून अपेक्षित आहे. सारंगराव टिळक, आगरकर, सावरकर , विनोबा भावे हे महानायक होते ही नवी माहिती आहे. आम्हाला बुवा फक्त महात्मा गांधीच म्हानायक होते एवढचं माहित. गांधींबद्दल ना राग ना लोभ. पण त्यांच्या पुढे एक नेहरु सोडले तर दुसर कुणी स्वातंत्र लढ्यात होते हेच मान्य नाही काँगीजनांना. लाल बहादुर शास्त्र्यांची जयंती पण २ अक्टोबरलाच असते पण किती वृत्त्पत्रे न्युझ च्यॅनल त्याचा उल्लेख करतात?

In reply to by गणपा

>>>सारंगराव टिळक, आगरकर, सावरकर , विनोबा भावे हे महानायक होते ही नवी माहिती आहे. पहिल्या नावासाठी १+ (ह.घ्या)

In reply to by अरुण मनोहर

:) :)

>>आणि कुमार केतकर यांचा लोकसत्तामधील टिळक आणि जीना यांवरील लेख वाचून थोडे समाधान झाले. पण हे लेखही शोधून काढावे लागतील अशा ठिकाणी दिलेले होत>> कुमार केतकरांच्या लोकसत्तामधे लोकरंग पुरवणीत अगदी समोरच (अर्थात पहिल्या पानावर) हा लेख (भलामोठ्ठा!) छापून आला होता.. तो ही तुम्हाला शोधावा लागला हे दुर्दैवच.. (लेख चांगला लिहिला आहे तरी आय टी वाइफ यावर तुम्ही लेख लिहिला असल्याने तुम्ही ब्लॅक लिस्टीत आहात्..माझ्याच.. त्यामुळे तुमच्या लेखनातील खोट शोधण्याचे काम आपोआप झाले..)

अगदी १ ऑगस्टलाच नाही पण ३१ जुलैच्या महाराष्ट्र टाईम्स मध्यी श्री.सारंग दर्शने यांनी श्री.ए.जी.नूराणी यानी लिहिलेल्या आणि ऑक्सफर्ड प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या "जीना अँड टिळक : कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल" या पुस्तकाचा छान परिचय करून दिला आहे. फाळणीनंतर कराचीत दंगे चालू होते. तिथला लोकमान्यांचा पुतळा माथेफिरूंच्या तावडीत सापडू नये म्हणून कायदे आझम जीनांनी पुतळ्याच्या रक्षणासाठी तातडीने लष्कर पाठवले व नंतर तो पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवला. टिळकांवरील एका खटल्यासाठी तर त्यांनी मराठी शिकून घेऊन वकील या नात्याने प्रभावी युक्तिवाद केला होता. म.टा.च्या याच अंकात "भारतीय असंतोषाचे जनक" या नावाचा एका शाळकरी मुलीचा लेख आहे, तोही प्रभावी आहे.

याच विषयावर धागा काढायच्या विचारात होतो पण सारंग यांनी ते काम आयतेच केल्यामुळे चांगलीच सोय झाली. मी १ ऑगष्ट्ला तीनवेळा न्यूज चॅनल लावून पाहिले तेदेखील मराठी. पण कुठेच यासंदर्भातली बातमी मिळाली नाही. नाही म्हणायला महाराष्ट्र टाइम्समध्ये टिळकांवर लिहिलेले दोनच पण चांगले आणि माहितीपूर्ण लेख आणि कुमार केतकर यांचा लोकसत्तामधील टिळक आणि जीना यांवरील लेख वाचून थोडे समाधान झाले. +१. सामना मधला 'लोकमान्यांचे स्मरण' हा सोमवारचा अग्रलेख देखील नितांत सुंदर होता. एक व्यायामपटू, एक गणितज्ञ, एक संपादक, मित्रांसाठी जीव टाकणारा माणूस, संस्कृत पंडित, गीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन वेदाज लिहिणारा विद्वान, मुरब्बी राजकारणी आणि स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा महापुरुष. विशेषणे लावत बसलो तर पानेच्या पाने भरुन जातील. तो फ्रेंडशिप डे की काय म्हणतात त्यामुळे टिळक पुण्यतिथीला मिळणारी स्पेस खूपच कमी झाली आहे असे म्हणण्यास पूर्ण वाव आहे. त्यामानाने महात्मा गांधी, सावरकर इत्यादी मंडळींची आठवण ठेवणारे बरेच लोक आहेत. आज १ ऑगस्ट २०१०. हे ३ ऑगष्ट ला का पोस्ट केले ? कोणत्याच सदस्याने (माझ्यासकट) १ ऑगष्ट ला यासंदर्भात काहीच पोस्ट केले नाही. आपले संपादक मंडळ सुद्धा सदस्यांप्रमाणेच थोरामोठ्यांच्या स्मॄतीदिनांबाबत बेपर्वा होत चालले आहे असे वाटले. तात्यांची कमतरता जाणवते आहे. असो. लोकमान्यांना आदरांजली.

In reply to by अप्पा जोगळेकर

>>कोणत्याच सदस्याने (माझ्यासकट) १ ऑगष्ट ला यासंदर्भात काहीच पोस्ट केले नाही. आपले संपादक मंडळ सुद्धा सदस्यांप्रमाणेच थोरामोठ्यांच्या स्मॄतीदिनांबाबत बेपर्वा होत चालले आहे असे वाटले. तात्यांची कमतरता जाणवते आहे. आमचा एक हायपोथेसिस आहे. तो असा वारंवार सिद्ध होत राहतो.