ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही.
सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले:
तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची? मी मुक्ततेचे प्रतिक आहे.
मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी||
माझ्यावर गरूडासारखे आकाशाचे राजे राज्य करतात आणि तू तर एक कैदी आहेस, तू माझ्यापर्यंत कविता लिहिण्यासाठी कसा पोहोचणार?
माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||
आभाळाने सावरकरांना हिणवले, "तुझ्या पायात तर जड साखळदंड आहेत. मला विचारण्यापेक्षा तुझ्याजवळ असलेल्या जमिनीलाच का नाही विचारत? ती कदाचित तयार होईल तुझ्यासाठी कागद होण्यास."
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||
पण ती अंदमानातील कालकोठडीची जमीनही कदाचित इंग्रजांची बटिक झाली होती. तिनेही या स्वातंत्र्यसूर्याच्या विनंतीस मान दिला नाही.
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
यानंतर सावरकरांनी त्यांच्या बाण्यानुसार त्यांच्याकडे मदतीची याचना केली नाही.
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||
अश्या वेळी या प्रतिभावान स्वातंत्र्यसूर्याची अवस्था कशी झाली असेल? सर्व जगावर संताप झाला. आकाश व जमीन यांचा प्रचंड राग आला. यामुळे डोळ्यात अश्रू आले, पण संतापामुळे त्यांच्या ठिणग्या झाल्या. हनुमानाने लंका जाळली तद्वत सर्व जग जळेल इतका संताप त्या डोळ्यातून व्यक्त झाला.
पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||
मनात विचारांचे काहूर उठले. माझ्या कवितेचा हा प्रपात झेलालयला कोण तयार आहे? स्वर्गातून पृथ्वीवर गंगौघ येत आहे. कोण तयार आहे हा भार झेलायला? जर हिमालयासारखा कणखर व बलदंड आधार तयार नसेल तर ही गंगा या पृथ्वीवर येईल का?
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रक्तन जसे इंद्रायणीच्या डोहात बुडणे होते, तसे तर माझ्या काव्याचे नाही ना?
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||
पण अश्या वेळी अचानक एक चमत्कार झाला. त्या कालकोठडीच्या दगडाच्या भिंती पुढे सरसावल्या आणि म्हणाल्या:
दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||
यापुढील इतिहास आपणास ठावूक आहेच.
--------------------------------------------------------------------------------
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ही अप्रतिम कविता लोककवी मनमोहन नातू यांची आहे.
कवी मनमोहन नातू यांनी ही कविता "सुनित" (SONET) या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अत्यंत आवडत्या काव्यप्रकारात बांधली आहे. सुनित हे १४ ओळींचे काव्य असते. कवितेच्या पहिल्या भागात एक कल्पना विस्तार असतो व पुढच्या भागात त्या कल्पनेला एकदम कलाटणी देवून शेवट केलेला असतो. याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात ही मांडणी ८ + ६ अशी असते तर दुसर्या प्रकारात १२ + २. सदर काव्य १२ + २ या प्रकारातील आहे.
वाचकांच्या सोईसाठी संपूर्ण कविता सलग परत देत आहे.
मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||
माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||
पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||
दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||
-- लोककवी मनमोहन नातू.
--------------------------------------------------------------------------------
टीपः ही कविता आम्हाला इयत्ता ९वी च्या बालभारतीमध्ये अभ्यासाला होती. कविता मला खूपच आवडली म्हणून मी ती लिहून ठेवली. पण त्यात कडवे क्रमांक ६ नव्हते. अनेक वर्षांनंतर एका वर्तमानपत्रात ठाणे येथील श्री. भागवत यांच्यावर एक लेख आला होता (त्या लेखात त्यांचा दूरध्वनी क्रमांकही होता. पण आज माझ्याकडे नाही. मला मिळाला की लगेच मि. पा. वर देईन.). त्यांनी अंदमानातील सावरकरांच्या कोठडीत ही कविता कायमस्वरूपी लिहिण्याबाबत केंद्रसरकारशी बराच पत्रव्यवहार केला होता व त्याचे फलित म्हणजे आज ही कविता त्या कोठडीत लिहिली आहे. सदर लेखात ही सर्व कविता दिलेली होती. मी माझ्याकडील कवितेत नसलेले कडवे लिहून घेतले. कदाचित या ओळी वेगळ्या असू शकतील. जाणकारांनी सुधारणा करावी. या कवितेचे मूळ शीर्षक "ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली" असे आहे.
मनमोहन नातू यांची इतर काव्यसंपदा येथे वाचायला मिळेल. पण यात वरील कविता नाही. मनमोहन नातू हे त्यांच्या 'ती पहा बापूजींची प्राणज्योत', 'हळू हळू बोल कृष्णा' व 'राधे तुझा सैल अंबाडा' या कवितांच्यामुळे प्रसिध्द आहेत. ही कविता काहिशी अप्रसिध्द आहे.
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात.
नितीन
वाचन
9831
प्रतिक्रिया
0