जिजाऊ दाखवा.....
सप्रेम नमस्कार आणि सुप्रभात ! हिंदु(स्थान) हॄदयसम्राट प्रौढप्रताप पुरंदर गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांची आज ३८० वी जयंती ! या थोर सेनानीस मानाचा त्रिवार मुजरा करून एक लेख इथे देत आहे त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती ! विज्ञापना, जाणिजे.....लेखनालंकार.....
जिजाऊ दाखवा.....
'रायगडावरील होळीच्या माळावरून जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना आज इतक्या वर्षांनी पण आम्हांस असं अस्वस्थ का वाटावं?' असा वेडा प्रश्न आज आम्हाला स्वतःला ३८० वर्षांनी पण पडलाय ! अं , काय म्हणालात? ३८० वर्षे कुणी जिवंत असेल का? तर , नाही, त्रिवार नाही , पण अतृप्त आत्मा तळमळत तर असू शकेल की नाही? आजपासून ३८० वर्षांपूर्वी जन्माला आलेले आम्ही अ़जूनही आम्हांस पूर्णपणे समजून घेणार्या व्य्क्तीच्या शोधात शरीर त्यागून , रायगडापासून क्षणभरही दूर जाऊ शकत नाही ; निदान आज, या घडीला रसातळाला चाललेल्या या आमच्या देशात ; किमानपक्षी "मला जिजाऊ व्हायचंय !" असं नुसतं म्हणणारी माऊली भेटेपर्यंत तरी नाहीच नाही ! आम्हांस अजून सारं काही लख्ख आठवतंय.....
यवनांनी पादाक्रांत केलेल्या त्याकाळच्या अखिल हिंदुस्थानात फक्त वतनासाठी हपापलेल्या तमाम मुर्दाडांमध्ये एक जाज्वल्य अभिमान उराशी बाळगणार्या आमच्या आऊसाहेब - जिजाऊ-म्हणजेच जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड ! सारी सुखं अवतीभवती असूनही कष्टी होत्या.कां? तर सारे मोठे सरदार सुरक्षित होते , सुखी होते पण तमाम प्रजा मात्र नागडी उघडी होती ! गरीबाची अब्रू सुरक्षित नव्हती ! यवनांच्या टोळधाडीत घरची लक्ष्मी-बायको, लेक, सून, बहीण यांपैकी कधी कुणास कुठल्या नराधम यवनासाठी पाय फाकवावे लागतील याची शाश्वती नव्हती ! आणि कहर म्हणजे हे सगळे आपल्याच माणसांच्या बाबत घडवून आणायला मदत करणारे सारे सरदार मात्र ये देशीचे वतनासाठी चटावलेले हिंदू ! भूतकाळात अंधार , वर्तमानात अठरा विश्व दारिद्र्य घेवून पोटं खपाटीशी गेलेल्या प्रजेला 'माणूस म्हणून जगावं इतपत तरी भविष्य असावं!' ही तळमळ आऊसाहेबांच्या मनात होती.ओठाशी नेलेला भाकरीचा नेवाळा गिळला जात नव्हता ! प्रत्यक्ष नवर्याने - शहाजीराजांनी केलेले स्वराज्याचे प्रयत्न दोनदा फसले होते - एकदा पुण्यावर रायारावने गाढवाचा नांगर फिरवला आणि दुसर्या वेळी -मुर्तुजा निजामशहास आदिलशहाच्या हवाली केल्याच्या नंतर मिळालेल्या शिक्षेनुसार शहाजीराजांना मोठ्या मुलासह-संभाजी राजांसह बंगरुळात वास्तव्य करावं लागलं ! शत्रू - नव्हे प्रत्यक्ष सासरा-लखूजी जाधवराव पाठीस लागले अस्ताना बायकोला शिवनेरीवर आपल्या व्याह्यांकडे सोडण्यासाठी शहाजीराजांसोबत आऊसाहेबांना गरोदरपणात घोडदौड करावी लागली होती.१९ फेब्रुवारी १६३० - म्हणजे ही तुमची आजची इंग्रजाळलेली तारीख - ज्यादिवशी आम्ही जन्मांस आलो ! त्या दिवसापासून ते आम्ही छत्रपती होईपर्यंत - अखिल हिंदुस्थानास्,गोर्-गरीबांस तारणारा छत्रपती प्रजेस मिळेपर्यंत अव्याहत खपणार्या आमच्या आऊसाहेब ! आज म्हणे या विज्ञानयुगात खूप दुरवरचं दिसणारी दुर्बीण आहे , पण आम्ही जन्मल्यापासून ते आम्ही छत्रपती होईपर्यंत अव्याहत ' एक रामराज्य आणणारा राजा ' इतकं दूरवरचं बघणारी आमच्या आऊसाहेबांसारखी दुर्बिंण आम्ही आजतागायत पाहिली नाही ! आम्ही लढलो , खूप काही स्वराज्यासाठी कमावलं , त्यासाठी खूप सगे सोयरे गमावले , पण आजही आम्हांस आठवतात आऊसाहेबांचे ते अखेरचे शब्द.....
राज्याभिषेकाचा सर्व सोहोळा आटोपून - कोदंडधारी बनून - आऊसाहेबांचा शिवबा-छत्रपती बनून सुर्यास्त समयी आपल्या कक्षाकडे जाण्या अगोदर आशिर्वाद आणि अनुज्ञा घेण्यासाठी आम्ही त्यांच्या महाली आलो होतो.लटलटत्या पायांनी , अंधुक दृष्टीने आपल्या थरथरत्या हातांनी आम्हांस मुजरा करण्यासाठी उभं रहात आपल्या कांपर्या आवाजात आऊसाहेब म्हणत होत्या,"तीन तीन यवनाधिपतींच्या छाताडावर पाय रोवून गोरगरीबांचा वाली झालेल्या श्रीरामाप्रमाणे निष्कलंक, नि:स्वार्थीचरित्र असलेल्या , श्रीकृष्णाप्रमाणे लोककल्याणार्थ झिजणार्या हिंदुस्थानच्या छत्रपतींना हा मानाचा मुजरा !"
आमच्या घशात आवंढा आला, मोठ्याने आक्रोशत आम्ही आऊसहेबांच्या पायांस मिठी घातली.आपला नकीच काहितरी मोठ्ठा अपराध झाला असावा म्हणून आऊसाहेब आम्हांस अशा हिणवत आहेत अशा समजुतीने आम्ही म्हणालो ,"आऊसाहेब, आमच्या कुठल्या अपराधाची सजा म्हणुन आपण आम्हांस मुजरा करून हिणवता? आम्हांस क्षमा करा, पण या सजेपाठीचा आमचा अपराध तरी आम्हांस समजावून सांगा हो आऊसाहेब ....." असं म्हणून धारा लागलेल्या आमच्या डोळ्यांनी आम्ही वर पाहिले आणि आमच्या मुखी अपूर्व तेज मुखी ल्यालेल्या आऊसाहेबांच्या डोळ्यातील अश्रूंचे दोन थेंब पडले ! तमाम पवित्र नद्यांचे पाणी, पंचामृत अशी तीर्थे दिवसभर प्राशन केलेल्या आमच्या मुखी आऊसाहेबांच्या डोळ्यातील अश्रू पडले आणि आम्हास आमच्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले ! पण या अमृततुल्य तीर्थापेक्षाही आऊसाहेबांनी आम्हांस जे बोधामृत पाजले तसा प्रसाद आम्हांस आजवर मिळाला नाही ! त्या म्हणाल्या,
"हिंदुस्थानच्या अभिषिक्त छत्रपतींना असं हळवं होणं आनी रडणं शोभत नाही ! उठा , छत्रपती, उठा ! राजा म्हणजे पृथ्वीपती , या नात्याने आम्ही आपणास मुजरा केला , हिणवण्यास नव्हे ! तुम्ही जगास आज छत्रपती दिसत असाल , पण आम्ही आपणास आमच्या उदरात असल्यापासून छत्रपती म्हणूनच पाहिलंय ! आपल्या वडीलबंधूंच्या - संभाजी राजांच्या अकाली वीरगती नंतर आपण आम्हांस एकच पुत्र होतात.तदपश्चात् महाराजसाहेब पण गेले....आमचा एकमेव आधार आपणच होतात , पण काळजावर पत्थर ठेवून आम्ही वावरलो, प्रसंगी बावरलो असूही - पण सावरलो , ते याच दिवसाची वट बघत ! याच साठी केला होता हा अट्टाहास रे माझ्या लेकरा !.अं... न नाही नाही , आता तुम्ही आमचे लेकरू नाहीत तर प्रजा म्हणून आम्हीच आपले लेकरू आहोत ! जे दिवशी जन्मलात ते दिवसापासून आजपावेतो स्वराज्याच्या पटावर तुम्हांस आम्ही पणांस लावलं , तुमच्या पश्चात् - तुम्ही अफझलखानास भेटावयास गेलात तेंव्हा, पन्हाळ्यास अडकलात तेंव्हा,शाईस्तेखानास अद्दल घडविण्यास लाल महालात गेलात तेंव्हा,आगृयास अडकून पडलात तेंव्हा,सुरतेच्या स्वारीच्या वेळेस, आणि हाती तलवार घेवून जेंव्हा जेंव्हा रणांगणात घोडा नाचवलात तेंव्हा तेंव्हा....आम्ही अनंत मरणे जगलो , शिवबा, अनंत मरणे जगलो !महाराजसाहेबांच्या पश्चात् सती जाण्याची घोडचूक करावयास निघालो होतो तेंव्हा आम्हांस ठाम्बवलं ते तुमच्या डोळ्यातील अश्रूंनी नव्हे , तर तुमच्या त्या आक्रोशाने आम्हांस आमच्या ध्येयाची जाणीव करून दिली.तुम्ही म्हणाला होतात्,"आऊसासाहेब , तुम्ही गेलात तर , मिळवलेले हे स्वराज्य आम्ही कोणांस दाखवावे, कोणांस?" त्या दिवसापासून आजतागायत शिवबा, आम्ही खंबीर राहिलो.आज आपण छत्रपती झालात , निष्कलंक्,नि:स्वार्थी , चारित्र्यवान राजाची माता होण्याचा मान आम्हांस दिलात , आम्ही धन्य झालो राजे, धन्य झालो ! पण तुमच्या जन्मापासून स्व्राज्यमातेला दान करून टाकलेले तुम्ही आज देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पृथ्वीपती झालात ! आता आम्हीही तुमच्यासाठी तुमचं लेकरू झालो आणि तुम्ही आमच्यासाठी सर्व काही -"त्वमेव माता च पिता त्वमेव , त्वमेव बंध्श्च सखा त्वमेव , त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव !" झालात , आणि म्हणून हा मानाचा मुजरा छत्रपती ! लाखमोलाचा लेक दान दिलेल्या या जिजाऊस आज आपण कॄतकृत्य केलंत , आता आम्हांस चिंता नाही ! स्वराज्यरथ घेवून आता आमचा श्रीकृष्ण अखंड दौड करत दिल्लीपर्यंत मजल मारेल येविषयी आम्हांस यत्किंचितही शंका नाही ! आता आम्हांस या बंधनातून मुक्त करा राजे, मुक्त करा !"
अश्रू पाझरणार्या डोळ्यांस धूसर दिसणारी ती वात्सल्यमूर्ती , ती जे बोलली ते खरं करून गेली ! आमच्या राज्याभिषेकापासून बाराव्या दिवशी आऊसाहेब आम्हांस सोडून गेल्या !
ते दिवशीपासून पुढे आमच्या देहत्यागानंतर आजतागायत आमच्या या देशात होणारा अत्याचार पाहीन , आमच्याच माणसांकडून आमच्याच माणसांचे होत असणारे जातिवादाचे,आरक्षणाचे होणारे राजकारण पाहून , यवनांचे,देशद्रोहींचे होणारे लांगूलचालन पाहून ३८० वर्षांचा आमचा आत्मा बेभान झालाय ! कधी एकदा आपण कुणा गर्भवती मातेच्या उदरीच्या कुडीत शिरून पुन्हा जन्म घेतोय असं झालंय आम्हांस ! पण पोटात असतानापेक्षाही आजन्म पुत्रवियोगाचं टांगतं परंतु आपण स्वतःच जाणूबुजून स्वीकारलेलं दु:ख आपल्या देवतातुल्य आईला क्षणोक्षणी आजन्म देणार्या या शिवाजीला सांभाळणारी स्वप्नाळू, पण धीरोदात्त, तेजस्विनी जिजाऊच आम्हांस दिसत नाही !
आज १९ फेब्रुवारी म्हणजे आमचा जन्मदिवस नसून जनकल्याणासाठी आपलं लेकरू 'इदं न मम' म्हणणार्या जिजाऊंचा 'त्याग'दिवस आहे !
आम्हांस माहिती आहे , वय वर्षे ८८ (फक्त) असलेल्या कुणा बाबासाहेब पुरंदरे वा त्यांच्या बरोबर निम्म्या वयाच्या , ४४ वर्षाच्या कुणा उदय गंगाधर सप्रे सारख्या अनेकांना अजून आमची याद आहे आणि आम्ही अजूनही मुक्तच झालो नसल्यामुळे जन्म घेण्यास तयार आणि उत्सुक आहोत ! बस्स .....लोकांसाठी मुलास दान करून क्षणोक्षणी पुत्रवियोगाचं हलाहल पचवूनही स्वराज्याचं स्वप्नं उरी बाळगणारी, रामराज्य आणण्यास जीवन समर्पण करण्यास सदैव तयार असलेली जिजाऊ आम्हांस दाखवा.....जिजाऊ दाखवा.....जिजाऊ दाखवा !
वर्गीकरण
सुंदर लेखन
In reply to सुंदर लेखन by जे.पी.मॉर्गन
आम्हांस
In reply to सुंदर लेखन by जे.पी.मॉर्गन
अगदी बरोबर आहे.....
In reply to अगदी बरोबर आहे..... by उदय सप्रे
जाने दो..
सुंदर लेखन
In reply to सुंदर लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
छत्रपती
उत्तम लेख!
सुंदर
हाय क्लास
सुंदर
वास्तववादी लेख..
अ प्र ती म