मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैशाखाची ऊन्हं ..

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली, वळीवाची आठवण उमलून आली. बहाव्याने केली रिती फुलांची पखाल, पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली.. सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे, वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे. चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी, धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे. सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह, सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह. काठावर कुणी वेडा सूर तोलणारा, कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह. ऐकुनिया बकुळी ती लाजली जराशी, चित्त तिचे उडुनिया गेले कुणापाशी? नादावले मन तिचे उतू उतू जाई पायापाशी म्हणूनच नव्हाळीची राशी. वैशाखाची उन्हं मग गंधमय झाली वळीवाची आठवण दूरदूर गेली...

वाचन 5017 प्रतिक्रिया 0