मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गणित..

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं. करिअरचा दुभाजक पार केलेला असतो. बायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो. घरातले लसावि, मसावि होत असतात. नाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक .. प्रमेय बनून ती येते. सुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते "मी"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण. खाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू! रुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ... प्रतलच.. तशीही कुठल्या रूढ चोकटीत ती मावतच नाही...मूळसंख्येसारखी.. मैत्रिणीच्या पलिकडली प्रेयसीच्या अलिकडली. चूक बरोबरच्या व्याख्येत न बसणारी.. तिच्यात "डावी-उजवी बाजू" ठरवताच येत नाही. तिच्या''सम" तीच! खरं तर रोज भेटते असंही नाही. पण तिचा एखादा संदेश, फोन, हसू दिवस उजळून जातो. "हातचा" जणू रोजच्या रुक्ष जगण्यातला. तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ.. या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये.. बस् जीवापाड जपावं तिला.. ......... भले गणित सुटो वा न सुटो..

वाचने 16684 वाचनखूण प्रतिक्रिया 21

माहितगार Wed, 02/19/2020 - 14:09
प्राची - अश्विनींच्या कविता म्हणजे प्लॅटॉनिक उत्कट, प्रणयाच्या जवळ पण कामभावनेपासून दूर, नात्यानात्यातील निर्मळ भावनांनी, भारतीय संस्कृतीतील सकारात्मकतेवरील विश्वासाने ओतप्रोत, नेटक आणि सुंदर काव्य निर्मितीचा आनंद घेत कवियत्री आपल्या कवितांचा पुनःश्च आनंददायी प्रत्यय या नव्या मुक्तकातूनही वाचकांना येतो म्हणजे मला आला इतर वाचकांनाही मिळेल असा विश्वास आणि शुभेच्च्छा आहेच.

खिलजि Wed, 02/19/2020 - 16:56
कितीही गुणिले किंवा भागिले या पूर्णांकास ( म्हणजे मला ) मूळसंख्येने तरी बाकी शून्यच राहणार मी ते विष आहे , जे हवंहवंसं वाटतं पण प्राशनांती , वाढू लागते तळमळ आताही वाईट , आणि दूरही वाईट कारण , आपले आधीच अप्रूव्ह केलेले प्रोटोकॉलच असतात टाईट...

मायमराठी Mon, 02/24/2020 - 21:13
न सुटणारी तरीही आनंद देणारी अशीकाही प्रमेय असतात सिद्ध काहीच करायचं नसतं तरीही 'रचना'करून बघाव्या लागतात. काव्यातलं गणित आणि गणितातील काव्य खूप भावलं.

गणेशा Mon, 05/25/2020 - 16:29
तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ.. या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये.. बस् जीवापाड जपावं तिला.. अत्यंत खरे लिहिले आहे तुम्ही.. मनापासून आवडले..