विंदा करंदीकरांच्या विरूपिका - (१) २८ जानेवारी १९८०
प्रस्तावनेतील दोन ओळी -
एखादा भावलेला अनुभव,विचार किंवा अवस्था विरूपाच्या आधाराने काव्यरूप झालेली दिसली की त्या कवितेला मी विरूपिका म्हणतो. याहून अधिक मूल्यामूल्यविवेक करून या संग्रहाला नसते वजन प्राप्त करून देण्याचा मोह मी टाळतो!
- विंदा करंदीकर
गेले काही दिवस मी विरूपिका वाचतो आहे. त्यातल्या विषयांना, कल्पनांना, विचारांना त्या त्या काळचे अथवा बर्याचदा कालनिरपेक्ष संदर्भ असल्यासारखे वाटते. वृत्त, जाति, छंद यांच्या वादात न पडता त्यांनी असे का? नक्की काय? कुणासाठी? लिहिले हे प्रश्न प्रामुख्याने मला पडले. त्यातल्या मला आवडलेल्या, कळलेल्या आणि न समजणार्याही (!) विरूपिकांना इथे टंकण्याचा मोह आवरत नाही म्हणून हा उद्योग.
२८ जानेवारी १९८०
आजचा दिवस मला साजरा करू दे.
आज आर्. के. लक्ष्मणने लिहिली
आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता
अर्धी रेषांत, अर्धी शब्दांत :
"नगरपालिकेने स्वच्छतेपोटी
कचर्याचे ढीग इथून हालवले
तर आम्ही भुकेने मरू."
आजचा दिवस मला साजरा करू दे.
कचर्यातील अन्नांश उचलून
जिवंत राहण्याचा हा हक्क
आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का?
तसे नसल्यास,
सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल
आपले सरकार या लोकांवर
फिर्याद घालू शकेल की नाही?
-- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी
आजचा दिवस मला साजरा करू दे.
- विंदा करंदीकर
वाचने
8208
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
अनेक आभार !
जबरा!
का? नक्की काय? कुणासाठी?
बापरे..
कविता