बाई सोडून गेली
काव्यरस
अवचित ते घडले, जणू आभाळ फाटले, धरणी कंपली
एक सुनामी आली की जगबुडी झाली,
अन बाई सोडून गेली
किती केली विनवणी, तिज आमिषेही दिली
पाषाणहृदयी त्या बालेला परि दया जराही न आली
अन बाई सोडून गेली
म्हणे तुम्हास बाई मिळेल दुसरी, जर शोधाशोध केली
जीव माझा जरी गेला, काळजी का कोणा इथे वाटली
अन बाई सोडून गेली
तरी बयेस कधी न कामास जुंपले, कायम लाडीगोडी केली
तऱ्हा तिच्या सांभाळत, आंजारत गोंजारत कामे करून घेतली
तरीही बाई सोडून गेली
म्हटले चला तर आता, कामाला लागायची वेळ झाली
बाई मंगळावर जरी पोचली, घरची कामे का तिला चुकली
कशी बाई सोडून गेली
झाडून काढता काढता, जळमटे डोक्यातली निघाली
फरशी पुसता पुसता, लख्ख सफाई मनाची झाली
हरकत नाही जरी बाई सोडून गेली
कपडे रगडू रगडू धुता, कित्येकांची मनोमन धुलाई केली
भांडी घासू घासू काढता, नकोशी बोलणी घासून काढली
बरं झालं बाई सोडून गेली
अखंड कामे करूनि अंग जरी दुखले, कंबर ढिली झाली
पाठ कामातून गेली, हातांचीही वाट पूरी लागली
ठीक आहे जरी बाई सोडून गेली
सगळेच न मिळतसे, एक हे नाहीतर ते, कायम निवड करावी लागली
आयुष्य म्हणजे घरचं बाहेरचं सांभाळत, तारेवरची कसरत सारी झाली
त्यात बाई सोडून गेली
स्त्रीमुक्तीच्या गप्पा कितीही मारा, खरेच का मुक्तता मिळाली
एका बाईच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात दुसरी मुक्त झाली
शेवटी बाई सोडून गेली
स्त्रीमुक्ती वाल्यांनी समानतेसाठी आंदोलने जरी किती केली
लढण्यासाठी बाहेर त्या पडता, कोण करत असेल कामे घरातली
जर बाई सोडून गेली
वाचन
9008
प्रतिक्रिया
0