मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बर्‍याच दिवसानी पुन्हा थोडे कवितेत लिहावे म्हणतोय .. आवडले तर सांगा... चोचभर दाण्यासाठी वेशी बाहेर पाखरं टीचभर पोटासाठी घर उंबर्याशी वैर || पाणी आटलं डोळ्यात शेत जळलं रानात पोर धाडलं शरात गाव दुष्काळ पिडित || दारातली तुळस, कधीच.. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली... पांढर्‍या रानागत, गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, होता जेंव्हा आवळला फास... शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली अन्नाचा, कुठ हाय तपास... शासनाची पांढरी बुजगावनी, फिरतात कधी शेतात.. धा रुपडं हातात टेकवून टिव्हीत मिरवतात.. नाही गोठ्यामधी माय ना टोपल्यात भाकर गुलछडी उभी पेटली काऴळ ठिक्कुर घर || कणसात नाय दाणं रीती कापसाची बोंड जगण्याच्या अट्टासाची गळी आडकली धोंड गळी आडकली धोंड || कामा निहाय अछु:त झालाय शेतकरी... गावा गावात हिंडतोय तो भंग्या वानी... कुणी बघाना त्याकडं, कुणी पुसाना हाल...झाला महाग कोर भर भाकरीस... कोणत्या फांदिवर लटकलय .. माझ मरण, माहीत नाय.. पण एव्हड कळुन चुकलय.. मोठ्ठा मोठ्ठा असा कोण नसतो .. दुष्काळाच्या ह्या वनव्यात फक्त शेतकरी पेटतो.. फक्त शेतकरी पेटतो... --- शब्दमेघ ( ५ मार्च २०१६, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ) ------------------------------------------------------------------------------------------------------------ बोली भाषेतील शब्द: - धाडलं : पाठवले आहे. ( आटल..जळल.. या शब्दांचे शेवटचे अक्षर भार देवुन म्हंटल्यास ते भुतकाळ प्रतित करतात. उदा. पाणी आटलं .. म्हणजे पाणी आटुन गेले आहे. शेवटच्या शब्दावर भार नाही दिल्यास ते भविष्यकाळ वर्तवु शकतात, म्हणुन अश्या शब्दांवर अनुस्वार दिलेला आहे... आटलं) - धा रुपडं - १० रुपये - गुलछडी : निशिगंधाच्या फुलांचे झाड - पुसाना : विचारेना ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- १. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक : http://www.misalpav.com/node/18087 २. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती : http://www.misalpav.com/node/18290 ३. टिपुर आशेचं दाणं: http://www.misalpav.com/node/18399 ४. शिवार पिकल उद्या ... : http://www.misalpav.com/node/18515

वाचने 2817 वाचनखूण प्रतिक्रिया 9

प्रचेतस 05/03/2016 - 16:13
मधेच थोडंसं गद्य पेरत केलेली कविता आवडली.

कपिलमुनी 06/03/2016 - 00:29
आवडली फक्त शेतकऱ्यांना आळशी म्हणणारे कशे पोचले नाहीत याचे आश्चर्य वाटले

ज्ञानोबाचे पैजार 06/03/2016 - 09:52
आवडली असे तरी कसे म्हणु? पैजारबुवा,