मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गिलोटिन

पालीचा खंडोबा १ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अल्लड भासांना तू काजळमोही फुंकर घातलीस अन भासांचे फुललेले वासनानिखारे झाले, जाळायला लागले सर्वांग अन् दाह सर्वदूर पसरले अज्ञातात, मग शरीर मशाल होवून जळायला लागले. पतंगाने दिव्याभोवती घिरट्या घालून जोहार करावे तसे शरीर संभोगजोगवा मागत रानोमाळ मुक्तीसाठी भटकत असताना शांती मनो-याच्या घंटा आकाशव्यापी टाहो फोडत परतीच्या हाका घुमवू लागल्या दुर्दैव इतकेच संमोहनपटलाच्या गर्तेतले शरीर बधीर झालेले प्रतिसादास प्रतिकूल. विखारी भोगाचे काटे तुडवत शरीर चाळणी चाळणी होवून अंधा-या रात्रीत ज्वराने रसरसलेले वाळवंट मार्गु लागले तरीही घंटा ध्वनी माग काढतच राहिले अन् दोलायमान शरीर भिरभिरत भोगजखमांचे रक्त जमिनीवर सांडत अंतजवळकीच्या स्वागताची रांगोळी सजवत रस्ते चितारू लागले. वधवेदींच्या खडकाळ प्रदेशात निवडूंगांचे फड खड्ग बनून शरीराची खांडोळी करू लागले असताना तो विनवू लागला " विश्व शांतीच्या रस्त्यावर माझा वध झाला तू काय करतोयस माघारी फिर, बघ ह्या घंटांचे प्रतिध्वनी ह्या निबीडातूनही मार्गरेखा पुन्हा आखतील, शरण ये ! शरण ये ! भासशरण शरीर वधवेदीवर जावून विसावले निवडुंगाच्या फडाचे गिलोटिन होवून मस्तक धडावेगळे झाले...... अन् रसरसलेल्या शरीराची स्निग्ध ज्योत शांतीघंटांचे प्रतिध्वनी माग काढत मनो-याकडे गेली वाळवंटाचे पर्जन्यवन झाले अन् खडकांचे संगमरवरी थडगे ताजमहालाचे स्मरण देवू लागले " प्रेम चिरंतन आहे , आत्मा सर्वचिरंतन हेच सांगण्यासाठी त्या दयाळू महात्म्याने हातापायी खिळे ठोकून घेतले अन मस्तकी काटेरी मुकुट " आता वासनेला अर्थ तो काय राहिला ? विजयकुमार......... २८.११.२००९, मुंबई

वाचन 1721 प्रतिक्रिया 0