मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरोप

शिव कन्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
थकल्या दोन चरणांवरती हलका झुकला माथा 'सुखी रहा'च्या शब्दांपाशी निरोप अडला साधा! अनुबंधांची कि जन्मांतरीची अशीच असते रेषा परतो, अथवा जावो दिगंता चिवट असते आशा. वाटला तितका सोपा नव्हता वृद्ध अनोळखी धागा जुन्यापान्या झाडांचाच खोल असतो ठिकाणा!

वाचने 2696 वाचनखूण प्रतिक्रिया 8

बहुगुणी 23/08/2015 - 19:20
अप्रतिम! थोडीशी प्रभा गणोरकर यांच्या "आलीस बाई, ये" या कवितेची आठवण झाली. माणसाला माणूस दिसत नाही अशी गडद संध्याकाळ जवळपास रात्रच पण बोळांतून गल्ल्यांतून घराकडे वळत गेलेली पायाखालची वाट दिसत जाते रस्त्यावर दिवे नसतानाही पायांना सापडत जाते जुन्या घराचे सारवलेले अंगण वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या दरवाजाचा काळा मखमली स्पर्श वेचीत माझे हात दार ढकलतात साखळी वाजते आतून हळू आवाज येतो आलीस बाई, ये. तुमच्या आवडलेल्या कवितेत केवळ किंचित लयीसाठी थोडासा शब्द-बदल करावासा वाटला, औद्धत्याबद्दल क्षमस्व! थकल्या दो चरणांच्या पाशी माथा हलके झुकला 'सुखी रहा' या शब्दांपाशी निरोप साधा अडला! जन्मांतरीच्या अनुबंधांची अशीच असते रेषा परतो, अथवा दिगंत जावो अखंड असते आशा गमे परंतु सोपे नव्हते वृद्ध अनोळखी धागे जुनी-पुराणे वृक्ष आजही मूळांपासुनी जागे!

In reply to by बहुगुणी

मांत्रिक 23/08/2015 - 19:25
तर्री ताई यांची कविता आणि आपले नवे रूपांतर दोन्ही अतिशय उत्तम! @बहुगुणी: आलीस बाई ये ही कविता पूर्ण देऊ शकाल? व्यनी केली तरी चालेल!!!

In reply to by मांत्रिक

बहुगुणी 23/08/2015 - 19:40
मला ती अपूर्णही वाटली नाही. पण कदाचित असतीलही आणखी ओळी, तुम्हाला आधिक माहिती मिळाली तर तुम्हीच द्या.

एस 24/08/2015 - 05:48
वाह! तर्री ताई आणि प्रभा गणोरकरांच्या कविता फार आवडल्या. कसंय ना हे सगळं! या वयात आपण माणसांच्या येण्याची वाट पाहत असतो आणि माणसे आपल्या जाण्याची...

चित्रगुप्त 24/08/2015 - 06:15
तर्रीताये रचिला पाया, स्वॅप्स झालासे कळसः
आपण माणसांच्या येण्याची वाट पाहत असतो आणि माणसे आपल्या जाण्याची...