Skip to main content

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

Published on बुधवार, 24/06/2015 प्रकाशित मुखपृष्ठ

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

जुन्या काळचे डाकू तरी लै बेस व्हते
शेतावरच्या श्रमिकांना कधी लुटत नोयते
शोषकांच्या छाताडावर पुरणपोळी लाटे
तीर्थप्रसाद करुनशान भुकेल्यांना वाटे
शेतीच्या गच्चीवर आता सरकारच बसते?

उठसूठ होयनोय पाखुरा करते
'मुक्या'च्या चुलीपाशी झाडलोट करते
गावातला 'मुका' इथं फास घेऊन मरते
पोशिंद्याच्या मढ्यावर बांडगूळ चरते
'अभय'तेच्या मस्तीवर ऐदी फुसफुसते?

                         - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------
लेखनविषय:

याद्या 2893
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!

मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....

आयला आता वाढवली ना एमेस्पी. ओतले साखर कारखान्यांच्या बोडक्यावर ६००० कोटी रुपये शेतकर्‍यांना द्यायला.

रेकॉर्ड अडकली आहे. त्याच त्या चर्चा तेच ते प्रतिसाद.