Skip to main content

"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी"

लेखक शिवप्रसाद यांनी मंगळवार, 08/01/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता ) ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून | परिक्षा येता जवळी वेळ जाईल निघुन || करायचे आहे आईवडिलांचे स्वप्न साकार | तुझ्या शिवाय त्यांना नाही कोणाचा आधार | अभ्यास करि चांगला लाउनी मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || आईवडीलांनी तुझ्यासाठी कष्ट केले अपार | प्रसंगी फक्त तुझ्याचसाठी सोसली उपासमार | शिक्षणाकडे लक्ष दे देऊनी ध्यान | परीक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || ठेच लागता तुझ, जीव त्यांचा तळमळे | आता तरी सोडुन दे तुझे ऊनाड चाळे | तुला करायला हवे अभ्यासात एकाग्र मन | परिक्षा जवळी येता वेळ जाईल निघुन || जिवनात असंख्य परिक्षा द्याव्या लागतात | वेळ निघुन गेल्यावरी काही नाही हातात | आई वडिल गुरू आज्ञेचे करावे पालन | जिवनात थोर होशिल परिक्षाच देऊन ||
लेखनविषय:

वाचने 3692
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

आपण सानेगुरुजींची पुस्तकं वाचता का?
"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" ऊठ मुला झडकरी आळस टाक झटकून |
मुलींनी काय घोडं मारलय हो तुमचं?

"माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी" (माझी पहिलीच कविता )
कविता चान्गली आहे. पण "विध्यार्थी" हा शब्द "विद्यार्थी" असा टंकल्यास उचित ठरेल! :)

In reply to by मृगनयनी

मला खात्री आहे की तो शब्द "विध्यार्थी"च अपेक्षित असणार आहे. "विध्यार्थी" म्हटल्यावर ते मास्तर बरोब्बर डोळ्यांसमोर "हुभे र्‍हाहिलेत" लई झ्याक हो शिप्र मास्तर! जे पी

दादा,म्रुगनयनि,आणि अमोलजी धन्यवाद, दादा- विद्यार्थी हा शब्द मला वाटते दोन्हीसाठी सुद्धा वापरतात म्हणजे मुली आणि मुले यांसाठि वर्गात एखादी सुचना आली तर "सर्व विध्यार्थ्यांना कळविण्यात येते की' असाच उल्लेख असायचा. म्रुगनयनी आपल्या सुचनेचे स्वागत

चांगली आहे कविता. एका विशिष्ट वयोगटातल्या मुलांना वाचून दाखवली तर प्रभाव पडू शकेल अशी. पहिलीच कविता आहे असं तुम्ही म्हटलं आहेत, म्हणजेच आता तुम्ही व्यक्त होण्याचं ठरवलं आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. विविध विषयांवर कविता आणि लेखन करत रहा.

जीव गलबलला...

In reply to by बॅटमॅन

सानेगुरुजींचा उल्लेख नेहमी काहीशा चेष्टेने येतो. मला साने गुरुजींचं लिखाण अतिशय आवडतं. त्यात असलेलं "एज ऑफ इनोसन्स" हे दुर्दैवाने आजुबाजूच्या जगाशी (आताशा नव्हे, आधीपासूनच) जुळवलं तर ते म्हटलं तर हास्यास्पदरित्या निष्पाप वाटतं. पण शुद्ध निष्पाप असं काहीतरी नमुन्यापुरतं तरी लहान मुलांनी वाचावं असं मला वाटतं. श्यामची आई हे पुस्तक अगदी आजही एक स्वतःमधलं सुंदर जग आहे आणि ते आपल्याला त्यात घेऊन जाण्याइतकं ताकदीचं आहे. खूप आउटडेटेड संदर्भ असले तरी. गोड गोड गोष्टी लहान पोरांना तरी ऐकवाव्यात. कडू डोस नंतर कंपल्सरी असतातच.

In reply to by गवि

शुद्ध निष्पाप वाचण्याबद्दल कुणाचेच दुमत नाही. अगदी लहानपणापासून ग फॉर गोलपिठा, व फॉर वासूनाका म्हणत पोरे मोठी होऊ नयेत असेच मलाही वाटते. पण तिटकारा येतो तो त्या बोधामृताचा. ते डोक्यात जातं. प्रसिद्ध कथाकार विद्याधर पुंडलीकांनी "आवडलेली माणसे" या त्यांच्या लेखसंग्रहात नेमके यावरच बोट ठेवले आहे. सानेगुरुजींना निष्पाप, उदात्त, सुंदर वैग्रेंची ओढ होती, पण जगातील कुरूपपणा, क्रौर्य, इ. पाहून त्यांनी वाङ्मयीन पलायनवाद स्वीकारला असे ते म्हणतात. श्यामची आई मध्ये mother-fixation (Oedipus complex नव्हे) दिसते असेही ते म्हणतात. फिक्सेशन वगैरे राहूदे, पण त्या कादंबरीत येणारे बोधपर डायलॉग कृत्रिम वाटतात, उदा. "जसा पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसे मनाला घाण लागू नये म्हणून जप",इ. मी स्वतः श्यामची आई ७वीत असताना वाचली होती, टिपिकल वाचकाप्रमाणे रडलोही होतो आणि पुन्हा रडू नये म्हणून नंतर कधी हात लावला नव्हता. पण नंतर बर्‍याच दिवसांनी पुंडलीकांचा हा लेख वाचला आणि त्यांचे निष्कर्ष बर्‍याच अंशी पटले.

In reply to by बॅटमॅन

सानेगुरुजींना निष्पाप, उदात्त, सुंदर वैग्रेंची ओढ होती, पण जगातील कुरूपपणा, क्रौर्य, इ. पाहून त्यांनी वाङ्मयीन पलायनवाद स्वीकारला असे ते म्हणतात
पण फक्त वाङ्मयीन? त्यांनी आत्महत्या केली हे कळल्यावर तर त्यांच्याबद्दलचा उरला-सुरला आदरसुद्धा वाटेनासा झाला. शामची आई मला वाचायला लावलं होतं. त्यावेळी ठिक-ठाक वाटलं होतं. त्यावेळी मी सहावी-सातवीत असेन. टिव्हीवर चित्रगीतमध्ये 'आपण सारेजण करू या भजन' लागलं की आई-वडील हातातलं काम टाकून कौतुममिश्रीत उत्साहात त्यांच्या बाललीला बघत माना डोलव(ता)त. मला त्यावेळीही ते गाणं प्रचंड भंपक वाटत असे. बाकी स्वतःच्या उदाहरणावरून आपल्याकडे लहान मुलांना अगदीच गोग्गोड संस्कार करतो असं वाटतं. त्यांना थोडेशे जंगलातले कायदेसुद्धा कळायला हवेत असं वाटतं. (एक उदाहरण म्हणून, त्यांना आपल्या बरोबर मटणाच्या/चिकनच्या दुकानात घेउन जाववं असं नाही पण मला लहानपणापासून खात असलो तरी अगदी बाहेरून कळेपर्यंत 'मटण' म्हणजे कापलेलं बोकड असतं हे माहीत नव्हतं.)

In reply to by दादा कोंडके

हम्म बरोबर आहे. आत्महत्या वगैरे तर खूपच मोठा पलायनवाद आहे.
बाकी स्वतःच्या उदाहरणावरून आपल्याकडे लहान मुलांना अगदीच गोग्गोड संस्कार करतो असं वाटतं. त्यांना थोडेशे जंगलातले कायदेसुद्धा कळायला हवेत असं वाटतं.
प्रचंड सहमत!!!

वावा फारच उदात्त काव्य आहे.

स्वतःचा साने गुरूजी करून घेणं आहे. आमच्या अपार्टमेंटमधे एकानं कॉलेज तरूणीला जागा रेंटाउट केली होती (`विध्यार्थी'). एका रात्री तिनं सर्व मित्रमैत्रिणी जमवल्या आणि प्लेअर वॉल्युम फुल्ल करून धमाल सुरू केली. एक वाजला तेंव्हा वरच्या मजल्यावरच्यांनी आमची बेल वाजवली. मनात म्हटलं मायला बघा तुम्ही तुमचं, तुम्हाला नाही का बोलता येत. इतर वेळी नवरा म्हणजे जगातला सर्वात निकामी माणूस पण अशावेळी भरीला घातला नाही तर पत्नी ती काय. शेवटी सर्वांना घेऊन गेलो आणि तिची बेल वाजवली. तोल सावरत आणि हातातली सिग्रेट मागे झाकत तीनं दरवाजा उघडला. आमची ओळख होती म्हणून तीनं किमान ऐकून तरी घेतलं. म्हणाली, आय वील वाइंड अप, बट आय टेल यू दीज पीपल कांट एन्जॉय अँड दॅटस वाय दे आर जेलस!

In reply to by संजय क्षीरसागर

इतर वेळी नवरा म्हणजे जगातला सर्वात निकामी माणूस पण अशावेळी भरीला घातला नाही तर पत्नी ती काय.
रोचक.

चांगला प्रयोग आहे काव्य निर्मितीचा. माझ्या अनुभवाप्रमाणे प्रत्येक कला-साहित्य-काव्य-संगीत निर्मिती हा एक नवा प्रयोग असतो. त्यामुळे निरनिराळे प्रयोग अवश्य करून बघावेत. उपदेशपर कविता हा प्रयोग करायचा म्हटल्यावर त्यात काही गोष्टी येणारच. मात्र एकाच साच्यात अडकून राहू नये. नित्य नवीन प्रयोग करून बघण्यातील आनंद, अनिश्चितता, हुरहुर वगैरे अनुभवावी. यापुढील कविता हा अन्य काही प्रकारचा प्रयोग असेल, अशी आशा बाळगतो.