मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

येशील?

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काव्यरस
अजुनही आठवतंय... सुंदर पुरीया रंगलेला असतांना कटकन सतारीची एकचं तार तुटावी असे काहीतरी झाले होते ----- तू गेलीस त्या दिवसापासून हे असचं होतयं मग माझ्या सगळ्या कवितांचा पसारा मांडुन बसतो घरभर पानचं पानं आणि मध्ये मी ---- अमावस्येच्या रात्री हट्ट धरून बसली होतीस मला चंद्रचं हवाय त्या रात्री कागदाचा एक चंद्र करुन खिडकीच्या काळ्या काचेवर चिकटवला होता तेव्हा कुठे समाधान झाले तुझे ती बघ तिकडे त्या कोपर्‍यात त्या कागदाच्या चंद्रावरची कविता ती माझ्याकडे कशी रागाने बघतेय... ----- दोन आठवड्यांसाठी मी परगावी जातांना डोळ्यात दोनच टप्पोरे थेंब होते तुझ्या एकाने मला बांधून टाकले आणि दुसरा तुझ्या गालावरून चरचरत ओठांवर आला होता तोंड फिरवून तो गिळतांना तुझ्या बटांनी जी जीवघेणी हालचाल केली होती ! कां कोण जाणे पण आता माझ्या बाजूला पडलेल्या या कवितेच्या शाईचा रंग त्याच बटेसारखा झालाय तपकिरी... ------ आत्ता या क्षणी हातात आहे ती कविता आहे जेव्हा तुझं माझं पहिलं भांडण झालं होतं किती झरझर उतरली होती ही कविता ती वाचल्यावर जी घट्ट मिठी मारली होतीस जिवाचा ठाव घेऊन गेले होते ते शब्द 'वेडा! इतकं कां कोणी मनाला लावून घेतं असतं?' पिसासारखा हलका हलका झालो होतो.. ----- आणि ही, त्या मीठ जास्त झालेल्या भाजीवरची लटकीचं पण किती ती चिडचिड? मला इकडे हसू आवरेना आणि तुला तिकडे राग तयार झाल्यावर तुला वाचायला दिली तर तुझ्या कानामागच्या तिळाची उपमा त्या भाजीला दिलेली पाहून तुझीही हसून हसून मुरकुंडी उडाली होती पार डोळ्यांतून पाणी येईस्तोवर हसलो होतो आपण आता तीच कविता परत माझ्या डोळ्यातून पाणि काढतेय... ----- मला माहीत आहे शक्य नाहीये तुला पण एकदाच परत येशील? माझ्यासाठी नको... पण निदान त्या कागदाच्या चंद्रासाठी नाहीतर त्या मीठ जास्त झालेल्या भाजीसाठी सांग ना... येशील? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०७/०१/२०१३)

वाचन 6153 प्रतिक्रिया 36