तुझ्याविना घर खायला उठतं मला. तू असताना जांभळीच्या पांनातून येणारं वारं सोबत शहारे घेऊन येतं आणि तू नसताना, मनाला कापरं भरवतं. तू नसल्याच्या जाणीवेनी माझा भूप भैरवी बनतो आणि मागे उरतात फक्त काही आर्त स्वर – काळीज चिरत जाणारे.
तुला कितपत कळेल माझी भाषा, माझी आर्तता, माझ्या भावना, नाही माहिती मला. तरीपण तुला सांगावासं वाटतं, तू माझा आधार आहेस. माझं आभाळ आहेस. म्हणशील मला तू खुळचट आणि विचारशील “अगं वेडे, आभाळ कधी आधार देऊ शकतं का?” इतरांना नाही देऊ शकणार कदाचित पण तू आहेस माझं आभाळ आणि आधारपण!
लोकांना जगण्यासाठी डोक्यावरती छप्पर लागतं, एक निवारा लागतो, चार भिंती लागतात.