Skip to main content

आंघोळ

लेखक मितान यांनी रविवार, 08/03/2015 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी व्हाट्सॅप वर एक विनोद वाचला. म्हणे, आरशासमोर एक ग्लास पाणी घेऊन उभे रहा, बचकन पाणी आरशावर फेका. म्हणा," झाली बाबा आंघोळ एकदाची !" काय झकास कल्पना ! मला फार आवडला हा विनोद. मी पण पुढे ढकलला. ( आपण कशाला सोडायचं!) मग आंघोळीला गेले. कढत कढत पाणी. वाफा येणारं. बाथरूम भरून गेली वाफांनी. आरशावर वाफ जमा झाली. दोन बादल्या अशा कढत पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. मग गरम चहा करून प्यायले. आणि पांघरुण घेऊन गुडुप ! एकदम लहान बाळ झाल्यासारखं वाटलं. शांत, निवांत, निर्मळ ! लोकांना आंघोळीचा एवढा कंटाळा का असतो काय माहीत.
विशेष

झेप

लेखक विभावरी यांनी रविवार, 08/03/2015 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता सरला काळोख उजाडला दिवस सूर्यकिरणांची नक्षी खेळेल दारात नाही वळून पहायचे सखे मागे आता तुझ्यासाठी आहेत चहुदिशांनी वाटा चाललीस वाट तू खाचाखळग्यांची विसर सर्व सारे आणि झेप घे गरुडाची झाले मोकळे आकाश आज तुझ्या माझ्यासाठी स्वप्न पाखरांचा थवा घाले गगना गवसणी - विभावरी
विशेष

ही वाट दूर जाते

लेखक सुचेता यांनी रविवार, 08/03/2015 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
“ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा” खरेतर खूपदा कानावर येणारं, ऐकून- ऐकून सवयीनं लक्षात राहिलेलं हे गाणं, पण आज का कोण जाणे त्यातील आर्तता माझ्या अगदी-अगदी अंगावर येत गेली. केव्हा न कळे माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये पाण्याचा सागर भरून गेला नकळत माझ्या, माझीच मी अशी उरली नाही, गालावरून सरीवरून सरी ओघळत राहिल्या, त्या लडिवाळ स्वरांच्या मागून माझं मन कुठल्या कुठे-कुठेतरी प्रवासाला जात राहिले. एक-एक पाऊल मागे-मागे जात असताना मनातील कितीतरी अलवार क्षणांना जागवत गेले.
विशेष

खानदेशी खाद्यसंस्कृती

लेखक आरोही यांनी रविवार, 08/03/2015 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
खानदेश... नाव उच्चारताच सर्व प्रथम आठवते आपली बहिणाबाई आणि तिच्या साध्या सहज पण अत्यंत भावस्पर्शी कविता. बहिणाबाईंच्या कविता आणि ओव्या लहानपणीच कानावर पडायला लागलेल्या, पण तेव्हा त्याचा मथितार्थ म्हणावा तसा कळला नव्हता. जेव्हा स्वयंपाकघरात लुडबुड सुरू केली तेव्हा आजीच्या तोंडी ऐकले, "आधी हाताले चटके तेव्हा मियते भाकर".. तेव्हा गमतीत घेतलेले हे वाक्य, नंतर त्याचा अर्थ लागला प्रत्यक्षात स्वयंपाक घरात जेव्हा काम करण्याचा प्रसंग आला तेव्हा! प्रत्येक वेळी आजीचे हे वाक्य आठवते. लहानपण खानदेशात गेले...
विशेष

मुक्काम पोस्ट स्लोव्हाकिया

लेखक Mrunalini यांनी रविवार, 08/03/2015 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशात जायचं म्हणजे अमेरिका! इंग्लंड! किमान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तरी..? आपल्यापैकी बहुतेकांसाठी परदेश हा साधारण एवढ्याच देशांपुरता असतो. पण यातली कोणतीही नावं न घेता आम्ही पोचलो ते स्लोव्हाकिया या युरोपियन देशात. आता सांगायला हरकत नाही.. पण माझे लग्न ठरेपर्यंत मलाही स्लोव्हाकिया या नावाचा एखादा देश आहे हे माहीतच नव्हते. :P इतकंच नाही, तर आमच्या लग्नानंतर व्हिसासाठी प्रोसेस सुरू केली होती; व्हिसासाठी काही पेपर आणायला जेव्हा कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जायचो, तेव्हा तिथले लोकही असा कुठला देश आहे?? असे त्यांच्या नजरेनेच आम्हाला विचारायचे.
विशेष

लई भारी..

लेखक सस्नेह यांनी रविवार, 08/03/2015 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही कोल्हापुरी. म्हंजे जगात भारी. कमीतकमी महाराष्ट्रात तरी भारीच ! का म्हणून विचारता ? खिक ! अहो नकाशा बघा की, आख्खा महाराष्ट्र खांद्यावर पेललाय कोल्हापुरानं ! हे कोल्लापूर इचिबन लई गुणाचं. ग्वाडबी आन तिकाटबी. हितली मान्सं अंगानं उभी-आडवी आन मनानं आश्शी ग्वाड जशी उसाची काकवी ! ...कॉलेजात असताना कोल्हापूर आत्तापेक्षा खूप निराळे होते. तेव्हाच आम्ही मैत्रिणी प्रथम कोल्हापूरच्या प्रेमात पडलो. दोन वर्षात दोन पायावर आख्खे करवीर पालथे घातले ! आणि जसा परिचय होईल तसं हे इचिबन कोल्हापूर लैच आवडायला लागलं ! थेट कावळा नाक्यापासून ते कात्यायनी-पन्हाळ्यापर्यंत !
विशेष

आरपार घुसलेलं असं काही......

लेखक सविता००१ यांनी रविवार, 08/03/2015 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीची सुट्टी लागलेली शाळेला. नुसतं हुंदडणं चालू होत. खरं तर मी आणि माझी एक मैत्रीणच काय त्या राहिलो होतो पुण्यात. बाकी सगळ्या गुल. कुणी गावाला, कुणी कुठे तर कुणी कुठे. मग आम्ही दोघींनी ठरवलं, संध्याकाळ झाली की जायचंच फिरायला. मग हे लांब लांब कुठेही जायचो. ४ वाजता निघायचं आणि ७ वाजता परत यायचं. मस्तच. दररोज नवीन रस्ते घ्यायचे. शिवाय पुण्यात घरसुद्धा अशा सुरेख ठिकाणी की एकीकडून हनुमान टेकडी, (एफ. सी. ची टेकडी ), एकीकडून वेताळ टेकडी, एकीकडून चतु:श्रुंगी आणि राहिलेल्या बाजूने गावात जायला हमरस्ता. त्यामुळे फिरायला जायचं तरी कुठे हा प्रश्न कधीच पडला नाही. उंडारत असायचो दररोज.
विशेष

राणी पद्मिनीचा चित्तोडगड

लेखक इशा१२३ यांनी रविवार, 08/03/2015 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ आली आणि सुट्टीत ट्रीपला जाण्याचे बेत ठरू लागले. मग जाण्यासारख्या ठिकाणांची उजळणी सुरू झाली. मी गोवा आणि नवरा राजस्थानवर अडून बसला आणि शेवटी जिंकला. मुलांना असणार्या सुट्ट्यांचा हिशोब करून त्यानुसार मुख्य ठिकाण, अंतर इ. माहिती मिळवून एकदाची आखणी झाली. सुंदर शाही राजवाड्यांच्या हॉटेलात राहायचा अनुभव घ्यायचे ठरले. दिवाळीनंतर ठरल्याप्रमाणे उदयपूरला पहिल्यांदा पोहचलो. उदयपूरचा भव्य सिटी पॅलेस आणि इतर ठिकाणे पाहून चौथ्या दिवशी गाडी पुष्करकडे वळली. जाताना वाटेत पाहायचे होते चित्तोड.
विशेष

स्त्री असणं ही मर्यादा नव्हेच!

लेखक इनिगोय यांनी रविवार, 08/03/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती पांडे बँकिंग इंडस्ट्रीतील इन्फ़र्मेशन सिक्युरिटी व ईडीपी ऑडिट याविषयातील तज्ज्ञ समजल्या जातात. विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांनी सिस्टिम ऑडिटच्या प्रसार व प्रशिक्षणासाठी केलेलं काम मूलगामी असून त्या क्षेत्राचा चेहरा बदलून टाकणारं ठरलं आहे. ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्युट या जागतिक मानांकने बनवणाऱ्या संस्थेने भारतातील 'एलिट ऑडिटर्स पॅनल'वर त्यांना निमंत्रित केले असून या पॅनलवर काम करणारी ही पहिली मराठी महिला आहे. या संस्थेतर्फे भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांचे इन्फ़र्मेशन सिक्युरिटी ऑडिट केले जाते तेव्हा स्वाती पांडे यांचा त्यात समावेश असतोच.
विशेष

स्वयंसिद्धा

लेखक अनाहिता यांनी रविवार, 08/03/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
खडतर परिस्थितीशी सामना खरंतर अनेकींना करावा लागतो. पण या सगळ्याला झुगारून त्यातून मार्ग काढणाऱ्या स्त्रिया या कुठल्याही स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य अशा कुठल्याही शब्दांशिवाय त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया दिसतात ज्यांनी अशी अनेक आव्हानं समर्थपणे पेलली, आणि नुसती पेलली नाही, त्याची झळ आजूबाजूच्यांना किंवा पुढच्या पिढीला बसू दिली नाही. अशा परिस्थिती मधून अगदी सहज पणे येऊ शकणारा कडवटपणा त्यांनी शिताफीने चुकवला आणि पुढच्या पिढीकडे तो जाता जाता राहिला !
विशेष