मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लई भारी..

सस्नेह · · विशेष
विशेष
आम्ही कोल्हापुरी. म्हंजे जगात भारी. कमीतकमी महाराष्ट्रात तरी भारीच ! का म्हणून विचारता ? खिक ! अहो नकाशा बघा की, आख्खा महाराष्ट्र खांद्यावर पेललाय कोल्हापुरानं ! हे कोल्लापूर इचिबन लई गुणाचं. ग्वाडबी आन तिकाटबी. हितली मान्सं अंगानं उभी-आडवी आन मनानं आश्शी ग्वाड जशी उसाची काकवी ! ...कॉलेजात असताना कोल्हापूर आत्तापेक्षा खूप निराळे होते. तेव्हाच आम्ही मैत्रिणी प्रथम कोल्हापूरच्या प्रेमात पडलो. दोन वर्षात दोन पायावर आख्खे करवीर पालथे घातले ! आणि जसा परिचय होईल तसं हे इचिबन कोल्हापूर लैच आवडायला लागलं ! थेट कावळा नाक्यापासून ते कात्यायनी-पन्हाळ्यापर्यंत ! नाव कोल्हापूर का तर हितंच अंबाबाईनं कोल्हासुराला मारलं अन करवीर निवासिनी झाली. जगाची महालक्ष्मी असली तरी हितं ती अंबाबाईच. तिच्या दर्शनाची पद्धत हाय का माहिती ? .असं महाद्वारातनं आत यायचं, येताना पायरीला हात लावायचा. मग अंबाबाईच्या समोरच्या बाळगणेशाचं दर्शन घ्यायचं. मग नीट रांग धरून गाभाऱ्यातल्या देवीची साजरी शोभा बघून तिच्यापुढं माथा टेकायचा. ते झाल्यावर कडेच्या निरुंद जिन्यानं वर जाऊन कळसाच्या मनोऱ्यात बसलेल्या महादेवांना दंडवत घालायचा. खाली येऊन साक्षी गणेशाला हात जोडायचे. अंमळ पायरीवर टेकायचं अन घाटी दरवाजातनं बाहेर पडायचं. आन मगच झालं बयाजवर दर्शन ! आता घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ खावी अन खुशाल मोकाट हिंडावे. तशी, मिसळ खासबाग, चोरगे अन बावड्याचीपण नामांकित. पण झणझणीतपणात दत्त उजवी. खाल्ल्यावर पाणीच मागायला पाहिजे ! अंबाबाईच्या भैणी टेमलाई म्हंजे त्र्यंबोली अन कळंब्याची कात्यायनी. अंबाबाईभवताली फेर धरून बसलेल्या. भर उन्हात टेमलाईच्या बागेत बसून गच्च झाडीने डोक्यावर ढाळलेला गारवा झेलावा. कळंब्याच्या थंडगार पाण्यात सूर मारावा. कात्यायनीचा डोंगर करंजीच्या झाडांच्या सावलीच्या आडोशाने पालथा घालावा. चारी बाजूंनी घेरणाऱ्या रंकाळा, पद्माळा, राजाराम तलाव अन कळंबा यांचा गारवा पांघरून गावभर खुशाल हिंडावे. ताराराणीसरकारांना, आईमहाराजांना मुजरा करावा. बाईच्या पुतळ्याला फेरी घालावी. लैच कट्टाळा आला, तर ‘एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज..’ ही लावणी गुणगुणत गुजरीत फेरी मारावी. पारंपारिक ठुशी, जोंधळपोत, मोहनमाळ, नथ, कोल्हापुरी साज, बोरमाळ, गोठ तोडे, पाटल्या, बाजूबंद, कमरपट्टा असले घसघशीत नमुने मनसोक्त न्याहाळावेत. ‘काहीतरी करून, कोल्हापुरी जाऊन, गुजरीत बसून ..’ एकतरी सोन्याचा अस्सल कोल्हापुरी नग आपापल्या ऐपतीनुसार घडवायला आलेले हौशे गवशे नवशे ‘नग’ निरखावेत. कधी पापाच्या तिकटीला जायचं, पण पापा परदेशीच्या दुकानाची पायरी नाय चढायची. बरोब्बर उलट वळायचं आणि कोल्हापुरी ‘आयतान-पा’ नी भरलेली दुकानं, इच्छित-पादत्राण-प्राप्ती होईपर्यंत पालथी घालावी. पापाच्या तिकटीपासनं ते थेट बिनखांबी गणपतीपत्तोर महाद्वार पायी चाळून काढावा. कपिलतीर्थात चक्कर मारावी अन कुठे मोडाचे वरणे, कुठे कोकमाची फळे, लोणच्यासाठी माईनमुळे, ताजी ईडलिंबे, भोकरे, मुळ्याच्या शेंगा असले आप्रूबाईचे जिन्नस गोळा करावे. कधी बेजान भुका लागल्यावर ‘गोकुळ’ मध्ये जाऊन मस्तपैकी झुणका, भाकरी, वांगं, खर्डा अन दही चापावं अन द्याची ताणून ! अश्शी ताणून दिली की संध्याकाळी सा लाच जाग यायला पायजे ! कधी सकाळी सकाळी उठून च्याची चूळ न भरता तसंच जायचं मिरजकर तिकटीला, म्हस पिळून दिलेलं दूध प्यायला. गरमागरम निरशा दुधाचा पेला रिचवून गरगरीत ढेकर द्यावी. कधी एखाद्या धुंद संध्याकाळी थेट रंकाळ्यावर मोर्चा न्यायचा. शालिनी पॅलेसच्या हिरवळीवर आडवं व्हावं अन रंकाळ्याची साजरी शोभा बघावी. बघता बघता रंकाळ्याच्या झुलत्या लाटांवर जीव अलगद सोडून द्यावा ! ..आता तो रंकाळ्यातल्या केंदाळात जाऊन अडकत नाही ना हे मात्तर बघायचं हां ! कधी रंकाळा बघून जीव भरला, तर पंचगंगेच्या घाटावर जाऊन निवांत बसून डोहाच्या स्तब्ध पाण्यावर दगडांनी भाकऱ्या काढाव्यात. कधी ताराबाई पार्कातल्या गच्च झाडीने झाकलेल्या रस्त्यावरून रपेट मारावी . किरण बंगल्याचे पोर्च आणि दार, दाटलेल्या झाडीतून दिसते का ते डोळे ताणून ताणून बघावे. संध्याकाळी भुका जबर लागल्यावर थेट अस्सल कोल्हापुरी जेवणाच्या हाटेलात मोर्चा. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, खेकडा रस्सा, मुंडी रस्सा, कोंबडीचा रस्सा, सुक्कं, चुलीवरची भाकरी नायतर चपाती पापलेटाची भजी, दहीकांदा आन कोळंबीभात ! असला अस्सल गावरान चमचमीत बेत आधी डोळ्यांनी आन मग तोंडानं खाऊन टाकाळ्यापासनं पन्हाळ्यापत्तूर लांबलचक ढेकर द्यावी . दोन दिवस सुट्टी मिळाली की कधी पन्हाळा, कधी विशालगड, कधी जोतीबा तर कधी कणेरीमठ गाठावा. दिवसभर हिंडून पायाचे तुकडे पडायला आले, की गुमान होस्टेलवर जाऊन गपगार निजावं. ताराबाई पार्कात फिरायला गेलं तर संध्याकाळी सहालाच तिथून निघावं लागे. कारण गच्च झाडी नि रस्ते सामसूम ! रिक्षापण मिळायची नाही. नोकरीला लागले तेव्हा मेरा हॉटेलमध्ये कसलासा सेमिनार होता. कंपनीवाल्यानं एकाला विचारलं, काय अँबिशन आहे बाबा तुझी ?’ तर म्हणाला, ‘ताराबाई पार्कात ऐसपैस फ्लॅट आणि होंडा सिटी !’ ...पण आताशा हे लाडकं कोल्हापूर खरंच कुठंतरी हरवलंय. हल्ली कोल्हापूरला खूपदा जाते, पण कोल्हापूर ‘भेटत’ नाही कधी मला ! परवा ताराबाई पार्कात गेले होते. गच्च झाडीझुडुपे गायब होऊन सगळीकडे कॉन्क्रीटचे साम्राज्य पसरलेलं ! ....बघितलं आणि , काही वर्षापूर्वी, ताराबाई पार्कातला फ्लॅट विकला याची रुखरुख विरून गेली !! (( चित्रे आंजावरून साभार )

वाचने 13761 वाचनखूण प्रतिक्रिया 38

सविता००१ 08/03/2015 - 14:08
छान वर्णन कोल्हापूरचं आणि फोटो ही सुरेखच. सगळे दागिने तर कसले सही दिसतायत.... आणि माझी मैत्रीण तर नेहमीप्रमाणेच अत्यंत सुरेख दिसतेय. तीच गं आपली अंबाबाई.

In reply to by स्रुजा

दिपक.कुवेत 10/03/2015 - 15:34
कधी काळी केलेली छोटिशी कोल्हापूर वारी अजूनहि स्मरणात आहे. लेखनातून कोल्हापूर मधील रांगडेपणा पुरेपुर उतरलाय. पण शेवटि त्या भरल्या थाळीचा फोटो पाहून पोटात अशक्य कालवाकालव झाली आहे. त्या बद्दल तुला माफि नाहि....

स्पंदना 09/03/2015 - 03:56
आगं आगं आगं अश्शी कुट्टं चाललीस हुंदक द्येत? ऑ? आनं येव्हढ फिरताना आमचा भवानी मंडप इसारलीस व्हयं? ऑ? जून्या राजवाड्याच्या भिंतीवरन आजबी रसरशीत इत्यास झळझळतोया नव्हं? आन आमची भवानी माय? कसं ऐसपैस मंदिर, शाउ म्हारांजाचा पुतळा?? झालच तर इद्यापिट, आन युनवर्सीटी बी राह्यह्यलीच बग्गा बाय!! लय झ्याक रसरशीत वरनन !! अंबाबाई, टेंबलाबाई आगदी डोळ्यासमोर आली नव्हं !!!

In reply to by जयराज

सस्नेह 10/03/2015 - 07:08
आई भवानीचं मंडपातलं मंदिर, खासबाग, महाराजांचा पुतळा सगळं लै कवतिकाचं. आणि इद्यापीठ तर पायांनी इंच इंच विंचरलय सगळं !

लई भारी लेख. कोल्हापुरात आत्याचे घर ताराबाई पार्कातच असल्याने मुक्काम नेहमी तिथेच. खूप आठवणी आहेत तिथल्या. गर्द झाडी, किरण बंगला, महालक्ष्मी मंदिर, ते आताचे काँक्रीटचे साम्राज्य सगळे डोळ्यासमोर आले.

जुइ 09/03/2015 - 21:05
काही वर्षांपुर्वी कोल्हापुरात काही महिने राहायचा योग आला. वरील बर्‍याच गोष्टींचा अनुभव घेतला आहे. कोल्हापुराच्या आठवणी खुपच सुखद आहेत :)

इशा१२३ 10/03/2015 - 09:22
काय छान वर्णन केले आहेस.खूप आठवणी आहेत कोल्हापुरच्या. त्रिवेणीच्या खान्देशातुन बाबांची बदली झाली ती नंदुरबारच्या मानाने मोठ शहर असलेल्या कोल्हापुरात.माध्यमिक शाळेतला प्रवेश, मोठ्या शाळेतल नविन वेगळच वातावरण अजुन आठवतय.महाद्वारोड जवळच रहायला असल्याने आइबरोबर रोज भाजी घ्यायला मंडईत फेरी आणि अंबाबाईचे दर्शन.अजिब्बात गर्दि नसायची त्यावेळेस.सुंदर सजवलेली अंबाबाई फार आवडीची.आणि देवळाबाहेर मिळणारी तिखटमिठाची आवळाकट्टी आणि ताजेताजे गजरे.रंकाळ्यावर मिळणारी कैरी घातलेली मिरची सोबतची भेळ अन शालीमार पॅलेस.त्यावेळेस तिथे एक हत्ती बांधलेला असायचा.तो बघायला जायचच.भवानी मंडपात खाउच्या गाड्या असायच्या.चप्पल दुकान तर ओळीनी उभी,प्रत्येक आलेले पाहुणे तिथे खरेदि करणारच.मिसळ मात्र त्यावेळेस फार तिखट वाटायची.नकातोंडातुन पार पाणी काढत खायचे.देवळापलीकडे असणार्‍या सराफ दुकानातील झळझळीत चांदिची भांडी अन साज सुंदर दिसायचे. जवळच्या पन्हाळा,जोतिबा,गणपतीपुळेला तर किती भेटी झाल्या असतील देव जाणे.पाहुणे आले कि फेरी व्हायचीच.काय काय आठवतय.सुंदर आहे कोल्हापुर.अलीकडे बरेच दिवसात जाणे झाले नाहि.

मितान 11/03/2015 - 13:17
कोल्हापुरी भाषेत वाचताना अजूनच छान वाटले. रंकाळ्याचा आणि चपलांचा फोटू मस्त !

गिरकी 11/03/2015 - 16:14
आता ४ दिवस सुट्टी टाकून जायलाच लावणार बघ तू स्नेहातै… राजाभाऊ चीभेळ, रंकाळ्यावरची पाणीपुरी, आहाराची मिसळ, झाडाखालचा आणि शामचा वडापाव, अर्ध्या शिवाजी पुतळ्याचा लोणी डोसा, विद्यापीठच चाट, वामनचे मासे, कुठल्या कुठल्या थाळ्या, ओवनचा हॉट डॉग … छे ४ दिवस नाहीच पुरणार :(

बाप्पू 11/03/2015 - 21:26
लेख आवडला. नाद खुळा...!!!! आजही जेव्हा कोल्हापूर ला जातो.. तेव्हा कावळा नाका ओलांडला कि खूप ताजेतवाने आणि हलके वाटते. एक उत्साह वाटतो. आपल्या घरी आल्यासारखे वाटते... सगळे बालपण आणि कौलेज च्या आठवणी जाग्या होतात.

तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर दर्शन केलं होतं. मटणाची थाळी हादडली आणि फिरताफिरता एक सुंदर मूर्त्यांचं दुकान सापडलं. (नाव विसरले, रेल्वे लाईनजवळ आहे.) कोल्हापूरचा कांदा-लसूण मसाला तर लई भारी. आता पुन्हा कोल्हापूरला जाणे आले.

उमा @ मिपा 15/03/2015 - 01:44
आधी सगळे फोटो बघून मन तुडुंब भरून घेतलं आणि मग शिस्तीत वर्णन वाचायला घेतलं. आई अंबाबाईचं तेज __/\__ अप्रतिम लिहिलंय. माझं भाग्य म्हणजे एका अस्सल कोल्हापूरप्रेमी मैत्रिणीने अतिशय प्रेमाने कोल्हापूर फिरवलंय मला. कोल्हापुरकरांकडून कायमच भरपूर प्रेम आणि माया मिळालीय. हे वर्णन वाचून परत कधी एकदा जाते कोल्हापूरला असं झालंय.

प्रचेतस 15/03/2015 - 06:35
मस्त लेख. आवडला. मागच्या वर्षीच कोल्हापूर दौरा केला होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

एस 16/03/2015 - 20:22
फोटो छान आहेत. कोल्हापूरला जाणं बर्‍याचदा झालंय, पण तिथे थांबलो फक्त पुढचा रस्ता विचारण्यापुरताच. त्यामुळे कोल्हापूरची प्रतिमा आमच्या मनात फक्त मंदिराभोवतालच्या गल्लीबोळांसारख्या बारीकबारीक रस्त्यांपुरतीच मर्यादित आहे. कित्येकजणांना रत्नागिरीचा रस्ता विचारूनदेखील परत परत गाडी तिथेच येत राहिली होती. शेवटी पडलो एकदाचे बाहेर तिथून. (वेळ रात्री दोनेक वाजताची.) नाही म्हणायला ज्योतिबाचा डोंगर (की पन्हाळा? आठवत नाहीये!) आणि रंकाळा तळं ह्या गोष्टी गाडीच्या काचांतून मान अनुक्रमे वरती ताणून आणि खाली काढून पाहण्याचा प्रयत्न केल्याचं आठवतंय बुवा. आणि हल्ली तर त्या टोलनाक्यांवर भारीच खोळंबून राहतात गाड्या. काय वाट लावलीये सरकारने! कोल्हापूरकरांची या टोळधाडीतून सुटका व्हावी हीच त्या अंबाबाईच्या चरणी प्रार्थना! :-)

कोल्हापूर शहराची थोडक्यात ओळख आवडली. मिसळ हा पदार्थ मूळचा कोल्हापूरचा आहे का? मी एक दुर्दैवी जीव आहे जो स्वतःचे राज्यच निवांतपणे बघू शकलेला नाही. पुढच्या भारतवारीत दक्षिण महाराष्ट्र सहल करण्याचा मानस आहे.