सहल.. अशीही..!
उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासूनच आता यावर्षी ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप गार्डनला जायचेच जायचे असे ठरवले होते. ह्या दिवशी जायचं का त्या दिवशी.. आत्ता ती शेतं ट्युलिपनी बहरली असतील का? का अजून अवकाश आहे.. असं करता करता इथल्या ट्रॅवल एजन्सीनी २-३ तारखा काढून दिल्या. आमच्या गावापासून ऍमस्टरडॅमला एका दिवसात जाऊन येता येतं. सकाळी पहाटे निघून रात्री उशीरापर्यंत परत. या टूर मध्ये काऊकेनहोफमधलं भलंमोठ्ठ ट्युलिप गार्डन आणि शिवाय ऍमस्टरडॅम शहर असं दोन्ही होतं. पण यातली एकही टूर वीकांताला नव्हती. :( मग रजा टाकता येईल का? जमेल का? असं हो-नाही करता करता अखेरीस आम्ही गुरुवार ७ मे ला म्हणजे आज जायचं ठरवलं.
आता कधी एकदा गुरूवार येतोय असं झालं होतं. त्यात इथे स्वातीताईचा ट्युलिप्सच्या गावा वाचला आणि आता आपल्याला पण हे प्रत्यक्ष पहायला मिळणार याचा आनंद झाला. लगेचच दोन दिवसांनी शारंगरव यांनी ट्युलिप्सचे मनमोहक फोटो टाकले. आणि आता मात्र कधी एकदा गुरूवार उजाडतोय आणि आपण तिथे जातोय असं झालं.
गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशनच्या बाजूला साडेसहाची बस पकडायची म्हणजे घरातून साडे पाचला निघायलाच हवं होतं. त्यामुळे बुधवारी रात्री जय्यत तयारी करून ठेवायला लागणार होती. सकाळी बसमध्ये खायला सँडवीच, दुपारसाठी बटाट्याची भाजी लावलेले सँडवीच, फळं, बसमध्ये बसल्या-बसल्या चरायला वेफर्स, कुरकुरे,चॉकलेट्स, पाण्याच्या बाटल्या असं घेत घेत खायच्या सामानानेच एक सॅक भरली. दुसर्या सॅकमध्ये कॅमेरा, पाऊस आला तर पंचाईत नको म्हणून छत्री, मफलर,जुजबी औषधं अशी सगळी तयारी करेपर्यंत रात्री साडेअकरा वाजले. 'बापरे, उद्या साडेतीनला उठायला लागणार, झोपूया आता' असं म्हणून उद्या कसं फिरायचं, काय काय बघायचं, स्वातीताईनी सांगितलेली तिथली बोट ट्रिपही करुया.. असं कल्पनारंजन करत करत झोपलो.
बरोब्बर साडेतीनला गजर झाल्यानंतर नेहमीसारखं अजून ५ मिनिटे, अजून पाच मिनिटे असं न करता उठलो. अंगात अगदी लहान मुलांसारखा उत्साह संचारला होता. भराभर आवरून साडेपाचच्या बसनी आम्ही बरोब्बर पावणेसहाला रेल्वे स्टेशन वर पोचलो सुद्धा..! बापरे.. अजून निघायला पाऊण तास होता. बाहेर चांगलीच थंडी होती. पाऊण तास या थंडीत थांबणं अगदी नको झालं होतं. कधी एकदा आता बस येत्ये आणि बसमधल्या गरम हवेत जातोय असं झालं होतं. सहा वाजले.. आसपास कोणी आमच्यासारखे वाट बघणारे प्रवासी दिसेनात.. 'काय इथली लोकं तरी.. साडेसहाची बस म्हणजे अगदी आयत्या वेळेला सहा-वीस पर्यंत येतील सगळे' असं वाटलं. सव्वा सहा झाले तरी इतर कोणी लोकं दिसेनात.. आज गुरुवार-मधला वार म्हणजे फारच कमी लोकं असतील असं झालं तरी आमच्या शिवाय इतर कोणीच दिसेना. अजून ५ मिनिटे गेल्यावर मात्र चलबिचल व्हायला लागली. एकदा तिकिट बघून ते आजचच आहे ना.. आपण बरोबर जागी थांबलोय ना आणि मुख्य म्हणजे वेळ बरोबर आहे ना.. अशी सगळी खात्री करून घेतली. सगळं बरोबर आहे, हातात तिकिट आहे, कोणी प्रवासी पण दिसत नाहीयेत.. थंडी तर काय त्रास देतच होती. आता मात्र अगदी हद्द झाली होती. ज्या ट्रॅव्हल एजन्सीतून तिकिट काढले होते तिथे आम्ही फोन करतोय तर ते ऑफिस उघडणार होतं आठ वाजता.. आता काय करायचं असा प्रश्न पडला. आता जवळ जवळ सात वाजत आले होते. परत एकदा तिकिट बघताना आम्हाला ज्या मुख्य कंपनीची बस होती त्या कंपनीचा नंबर दिसला. त्यांचं ऑफिसही जरी आठला उघडणार असलं तरी इमर्जन्सीसाठी त्यांनी दुसरा नंबर दिला होता. आता त्या नंबरवर फोन करायला सुरुवात केली. २-३ प्रयत्नानंतर लागला एकदाचा फोन. त्याला सगळा गोंधळ समजावून सांगितल्यावर तो पठ्ठा अतिशय शांतपणे म्हणाला,'अहो, आजची टूर रद्द झाली आहे... :( ' आपण बहुतेक चुकीचं ऐकलं असं वाटून त्याला परत एकदा विचारलं तर परत तेच उत्तर.. 'वीक डे असल्याने बस पुरेशी भरली नाही आणि त्यामुळे बस रद्द करण्यात आली आहे.' आणि वरती आम्हालाच म्हणाला, 'त्या एजन्सीने तुम्हाला कसं काय सांगितलं नाही? आता तुम्ही शांतपणे घरी जा आणि आठ वाजता मुख्य ऑफिसमध्ये फोन करा. तेव्हा तिथे तुम्हाला पुढे काय करायचं ते कळेल.' आता मात्र आमचे चेहेरे पहाण्यासारखे झाले होते. पार जमिनीवर खाली पडले होते. आमचा नुसता हिरवा पोपट नाही तर चांगला सप्तरंगी पोपट झाला होता. उत्साहाचा भलामोठ्ठा फुगा फुटला. नुसती चिडचिड आणि संताप! आता थंडीचाही फारच त्रास वाटू लागला. आता काय.. बॅक टू पॅव्हिलियन असं म्हणत आणि यापुढे कुठेही असलो, तरी सहलीला जायच्या आदल्या दिवशी फोन करून खात्री करून घ्यायची असा धडा गिरवत शांतपणे घरी आलो. :(
'आता त्या कंपनीशी असं भांडू, तसं भांडू..' असं ठरवून चिडूनच फोन केला.. तर त्या बाईने सुरूवातीलाच अतिशय गोड आवाजात आपली चूक कबूल केली आणि तितक्याच गोड आवाजात आमचे पैसे परत करण्याची तयारी दर्शवली. आणि तसं नको असेल तर दुसर्या टूरची ऑफर देऊन, आपण होऊनच त्या टूरमध्ये २० युरोची सवलत देण्याचेही कबूल करून टाकले आहे...
आता आम्ही निर्णय घेऊ..
--शाल्मली.
वाचने
4400
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
अरेरे..
ह्म्म...
In reply to ह्म्म... by यशोधरा
म्हणुन तर
अर्रर्रर्रर्रर्र्...
अरे रे रे
शुभेच्छा.
अगं पण
ओह, तरीच
अरेरे. तुमच्या उत्साहावर पाणी पडल्याचं वाईट वाटलं!
In reply to अरेरे. तुमच्या उत्साहावर पाणी पडल्याचं वाईट वाटलं! by चतुरंग
सहमत आहे
In reply to सहमत आहे by बेसनलाडू
बेला,
In reply to बेला, by चतुरंग
तुझ्या
लवकरच पुन्हा
अर्रर्र
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार
(स्वगतः
कोई बात नही!
चलता है!!!
आता काय..
धन्यवाद!