Skip to main content

किशोरी आमोणकरांच्या नव्या ग्रंथाविषयी

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 04/03/2009 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आताच लोकसत्तामध्ये किशोरी आमोणकर यांनी लिहिलेल्या 'स्वरार्थरमणी' ग्रंथाबद्दल वाचले. किशोरीताईंनी त्या ग्रंथात रागसंगीताबद्दलचे त्यांचे विचार आणि संगीताच्या रसग्रहण प्रक्रियेबद्दल विचार मांडले आहेत असे समजले. लोकसत्तातील बातमीमधून ....... रागसंगीतात रसनिर्मिती होते म्हणजे नेमके काय होते, त्यामागे कोणती मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया घडते, याचा अभ्यास गेली पन्नास वर्षे किशोरीताई करीत आहेत. संगीतावरील अनेक ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास करत असताना साहित्यातील रससिद्धांताकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यातून हा नवा विचार जन्माला आला. हे लेखन करताना मी स्वत:ला त्यातून पूर्ण बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. राग संगीतातील अनेक अवघड प्रश्न मला गेली अनेक वर्षे सतावत होते. मी स्वत: संगीत निर्माण करत असताना त्या मागील प्रक्रियेचा सातत्याने मागोवा घेत होते. संगीतातील राग सादर करत असताना कलावंताने रागमय होणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. सैद्धान्तिक विवेचन करताना त्यातील प्रत्येक बारकाव्यांचा मला माझ्या संगीतात कुठे कुठे पुरावा मिळतो आहे, याची तपासणी मी नेहमी करत आले आहे. त्यामुळेच या प्रश्नांचा मागोवा घेताना मिळालेल्या ज्ञानाची मांडणी या ग्रंथात करण्याचा मी प्रत्यत्न केला आहे. असे किशोरीताई या वेळी म्हणाल्या. या ग्रंथाचे प्रकाशन पुण्या-मुंबईत कधी आहे ते बातमीत दिले आहेच. आपल्या पैकी कुणी त्या सोहळ्यास गेल्यास कृपया इथे लिहावे. तसेच तो ग्रंथ कुणी वाचला तर त्याबद्दलसुद्धा काही लिहावे ही विनंती. ग्रंथाबद्दल उत्सुकता आहे. --लिखाळ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2864
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मला सुद्धा अजून जाणून घ्यायला आवडेल... बिपिन कार्यकर्ते

Exactly मुद्दा काय आहे यात? प्रत्येक महान गायक्-गायिका हाच विचार मांडेल.. कोणी तरी ग्रंथ वाचून प्रतिक्रिया द्यावी. मला ही हा ग्रंथ वाचायला आवडेल.

मी रसिक.कॉम वरुन हे पुस्तक मागवले आहे. चार-पाच आठवड्यात इथे अमेरिकेत पोहोचून कधी वाचायला मिळेल याची फार उत्सुकता आहे. दत्ता मारुलकरांच्या किशोरीताईंवरच्या चरित्रवजा पुस्तकात किशोरीताईंचे रससिद्धांताच्याविषयीचे विचार थोडक्यात आले होते. ते या पुस्तकात अधिक तपशिलात वाचयला मिळतील अशी अपेक्षा आहे.

लेखन म्हणजे काय ?? तर एकीकडे सर्वसामान्यांच्या नेणीवा जाणीवा आणि दुसरीकडे एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना विशिष्ट गुणवत्तेच्या माणसांच्या स्वत्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोहोंचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया म्हणजे लेखन...... तर असंच काहीसे संगीतनिर्मितीच्या रसास्वादाच्या सैद्धांतिक विवेचनाच्या बारकाव्यांच्या पुराव्यांच्या तपासणीच्या मागोव्याच्या ज्ञानाच्या मांडणीचे असणार... खुदकेसाथ बाता : कोणत्या रागात कोणती कोणती फिल्मी गीतं बांधली आहेत , यावरून रागसंगीताची गंमत घेणार्‍या माझ्यासारख्या मूर्खांसाठी हे पुस्तक नसणारच बहुतेक... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

लेखन म्हणजे काय ?? तर एकीकडे सर्वसामान्यांच्या नेणीवा जाणीवा आणि दुसरीकडे एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना विशिष्ट गुणवत्तेच्या माणसांच्या स्वत्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोहोंचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया म्हणजे लेखन......
वाहवा.. काय सुंदर.. शब्दन शब्द खरा आणि प्रकटीकरणाच्या प्रक्रियेची सर्व वाक् वळणे प्रामाणिकपणे आणि तटस्थपणे वर्णन करणारा. प्रतिभावान लेखकाच्या चिद् घन आणि तरीही तरल अशा पारस सदृश जाणिवांच्या अभिव्यक्तीक्रियेला स्फटिकस्पष्ट शब्दांत मांडणारा मौलिक प्रतिसाद ! :) खुदकेसाथ बातां : लिखाळाला संगीताले सा की रे कळत नसतानाही पांडित्याचा आव आणण्यासाठी लगबगीने त्याने ही बातमी इथे कळवली आहे हे चाणाक्ष वाचकांना समजले की काय? -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

ग्रेसाळलेला प्रतिसाद आवडला! ;) चतुरंग

मलाही किशोरीताईंचं हे पुस्तक वाचायला आवडेल.. त्यांच्या विलक्षण गानप्रतिभेला सलाम..! आपला, (किशोरीताईंचा चाहता) तात्या.

कोणी हे पुस्तक वाचल्यास पुस्तकाविषयी जरुर लिहा, उत्सुकता आहे.

खर म्ह्णणजे असं पुस्तक लिहिले जाणे हा किती दुर्मिळ योग आहे. महान कलाकार त्यांच्या कलेत कितीही श्रेष्ठ असले तरी या श्रेष्ठत्वापर्यंत ते कसे पोहोचले, तिथे पोहोचताना त्या कलेतले बारकावे त्यांना कसे आणि कुठे समजले, ते त्यांच्या दृष्टीकोनातून काय असतात आणि नसतात, त्या कलेचा आनंद, तिचे सौंदर्य नेमके कशात सापडते या संदर्भात त्यांचे विचार काय आहेत हे त्यांना इतरांना उकलुन सांगता येइलच असे नाही. बरेचदा कलाकार म्हणतात, "मला काय सांगायचे आहे ते माझ्या कलेतूनच मी सांगतो/सांगते". पण सर्वसामान्य रसिकाला ही सर्व अभिव्यक्ती कळेलच असे नाही. मग जेंव्हा असा कलाकारच हातात लेखणी घेतो आणि आपल्या कलेपलिकडले हे माध्यम आपल्या कलेसंदर्भात समर्थपणे हाताळतो, तेंव्हा रसिकांना केवळ त्या कलाकाराचीच कला अधिक समजायला मदत होत नाही तर एकूणच ती कला, तिची अभिजात सौंदर्यस्थळे, त्यातल्या रसनिष्पत्तीच्या शक्याशक्यता इत्यांदीचा एक महत्वाचा कायमस्वरुपी संदर्भ निर्माण होतो. हिंदुस्थानी अभिजात संगीतासारख्या मौखिक परंपरेतुन चालत आलेल्या कलेबाबत हे विशेषकरुन लागू आहे. या संगीतातल्या घराण्यांनी अनेक दिग्गज कलावंत दिले, पण या कलेमागच शास्त्र आणि तिची सौंदर्यमीमांसा बरीचशी डोक्यांमधे आणि सांगोवांगीमधे अडकली आहे. भातखंड्यांनी त्यांच्या खंडांमधून या कलेमागच्या शास्त्राला लिखीतस्वरुप दिले. कुमार गंधर्वांनी आपल्या अनुपरागविलासांतुन याच शास्त्राला नवनिर्मीतीची परिणामे देत पुढे नेले. पण ह्या ग्रंथांचा उपयोग रसिकांपेक्षा संगीतशास्त्राचा तांत्रिक पातळीवर अभ्यास करणार्‍यांनाच जास्त होतो. (अश्विनी भिड्यांचा अगदी अलिकडचा स्वररचनांजली याच प्रकारांत मोडतो). प्रभा अत्रेंनी त्यांच्या पुस्तकांमधुन (उदा. स्वरमयी) आपल्या कलेतील केवळ शास्त्रापलिकडची काही अंगे दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. अशोक रानडे (स्वतः कलाकार), दत्ता मारुलकरांनीही असे लेखन केले आहे. आता खुद्द गानसरस्वती आपले संगीतविषयक विचार या मराठी ग्रंथाद्वारे समोर ठेवत आहे हे मराठी भाषेचे, ग्रंथपरंपरेचे, आणि संगीतरसिकांचे मोठे भाग्य आहे! उद्या मंगेशकर बंधू-भगिनींनी भाव/सुगम संगीतावर असा ग्रंथ लिहिला तर काय बहार येइल!

In reply to by नंदा

वा वा .. फार छान प्रतिसाद. (शब्द नसलेले संगीत आपल्याला कसे भावते या बद्दल मला खरेच उत्सुकता आहे.) आपण हे पुस्तक वाचलेत की त्याबद्दल जरूर मिपावर लिहा. -- लिखाळ.

खरे तर ही पट्टीची गायक मन्डळी त्यान्च्या कलेच्या माध्यमातुन जाणिवे पलीकडचा अनुभव प्रत्यक्ष स्पर्शत असतात.... हाच अनुभव इतराना कळावा म्हणुन त्याला शब्दन्च्या पलिक्डून शब्दान्च्या कक्षेत आणण्याचा हा गानसरस्वतींचा प्रयत्न आहे.. त्याना मानाचा मुजरा..