Skip to main content

मी माझ्यातच संतुष्ट आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 08/02/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या अशुद्ध बोलण्याच्या पद्धतीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात काही फरक झालेला नाही.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं." मी एकदा एका लायब्ररीत पुस्तकं चाळीत बसलो होतो.दोन तीन पुस्तकं मला आवडली आणि वाचायला न्याविशी वाटली.ती घेऊन मी काऊंन्टरवर गेलो.काऊंटरवर बसलेली व्यक्ति मला जरा वयाने लहान वाटली.मी कुतुहलाने त्याला विचारलं, "तू शाळेत शिकत असशिलच."तो हो म्हणाला. "मी माझ्या फावल्या वेळात लायब्ररीत येऊन बसतो आणि वाचन करतो.कधी कधी मला लायब्ररीचे व्यवस्थापक मदत करायला सांगतात.आणि मी त्यांना आवडीने मदत करतो.नुसतंच अभ्यासाची पुस्तकं वाचून शाळेतल्या परिक्षा पास होता येईल पण ज्ञान वाढवायचं झाल्यास आणखीन खूप वाचन केलं पाहिजे.आणि मला वाचनाची आवड आहे" तेव्हड्यात लायब्ररीचे व्यवस्थापक काऊंटरकडे आले आणि त्यांनी त्या मुलाला मोकळं केलं. मी त्या मुलाला घेऊन बाजूच्या कॅन्टीनमधे येतोस का विचारलं,आणि आम्ही दोघं कॅन्टीनमधे जाऊन दोन कप कॉफीवर चर्चा सुरू केली. मी त्याला म्हणालो, "तुझे विचार ऐकून मला तुझ्या बद्दल जरा कुतुहल वाटलं तू सांगशील का तुझी हकीकत". तो सुरवाती पासूनचे आपले अनुभव सांगू लागला, "माझी घरची परिस्थिती खूपच गरिब आहे.पण मला शिक्षणाची खूप आवड आहे.आईवडील आणि घरातले इतर अंगमेहनतीची कामं करून उदर्निवाह करीत असल्याने शाळेत जायला कुणी विचारच केला नाही.मी वयाने लहान असल्याने मला तेव्हडा शाळेत जायचा चान्स मिळाला.सुरवातीला मी शाळेत गेल्यावर, " तू गांवढळच का राहत नाहीस?" माझ्या शाळेत इतर विद्दार्थ्याकडून मला हा प्रश्न प्रकर्षाने विचारला जायचा.मला असं दिसून आलं की माझ्या सारख्या गांवढळ व्यक्तिकडून काय अपेक्षा करावी ते लोकाना आपल्या डोक्यात अगोदरच ठरवून ठेवायला आवडत होतं. पण माझ्या मनात येत की मी जो आहे तो आहे आणि मी कसा असावा हे दुसर्‍यानी ठरवाव अस नसाव. शाळेतल्या माझ्या पहिल्या दिवशी,मी गणिताच्या वर्गात गेलो होतो.माझ्या त्या वर्गातल्या दोन विद्दार्थ्यानी माझ्याकडे अंगुलीनिदर्शन करून माझं हसं उडवल होतं. प्रथम मला वाटलं कदाचीत माझ्या पॅन्टची झीप उघडी असावी,किंवा माझ्या दातात काही तरी अडकलेल त्याना दिसत असावं.पण मी ज्यावेळी माझ्या सीटवर जाऊन बसलो,त्यावेळी एका विद्दार्थ्याला कुजबुजताना ऐकलं, "हा गांवढळ मुलगा कशाल शाळेत शिकायला येतोय?" म्हणजे त्याचा अर्थ माझी झीप उघडी नक्कीच नव्हती. पण त्याच वर्गात एक गबाळ्या सारखे कपडे घालून डोळे अस्वच्छ असूनही बसलेला विद्दार्थी त्याना चालत होता. त्यामानाने माझे कपडे ठिगळलेले असले तरी स्वच्छ होते.त्याना वाटायचं माझे कपडे नव्या सारखे दिसावे आणि ते अस्वच्छ असले तरी चालावे.काही मुलं माझ्या कपड्यांकडे निरखून बघत आणि काही तरी टाकून बोलत.हे मी सातवीत असताना व्हायचं. माझ्या एका संस्कृत वर्गात मला गुरूजीने विचारलं, "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" याचा अर्थ काय? मी पटकन सांगितलं, "कर्म करीत जा फलाची आशा धरू नकोस" हे ऐकून माझ्या वर्गातल्या इतर विद्दार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसून आलेला गहरा धक्का पाहून मला वेगळेपण आल्यासारखं वाटलं. आता मी मॅट्रिक व्हायला आलो आहे.मी सर्व वरचे क्लासिस घेतो.माझे घरचे कपडे पण मला हवेसे वाटतात तसेच आहेत. माझ्या मित्र निवडण्याच्या पद्धतीत पण मी दुजाभाव ठेवित नाही.शाळेतपण मी क्रियाशिलता ठेवतो.आणि कधी कधी मी अशुद्ध शब्दपण उच्चारतो. माझ्या शुद्ध-अशुद्ध उच्चाराने माझं व्यक्तिमत्व बदलं नाही आणि माझ्या व्यक्तिमत्वाने माझे उच्चार बदले नाहीत. माझा माझ्यावर विश्वास आहे.मला वाटतं मी कोण आहे त्याची व्याख्या मीच करावी आणि माझ्या जीवनात काय कारवाई करावी ते पण मीच ठरवावं.शाळेमधली लोकप्रियता बहुदा शाळेतली विचारधारा अंगीकारण्याच्या तुमच्या स्वेच्छेवर अवलंबून असते.आणि मला कुणी तरी म्हणालं की प्रौढता आणणं तितक सोप नाही.दुसरा एखादा विकल्प म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाला- दुसर्‍यांच्या समाधानीसाठी आणि त्यांच्या पसंतीसाठी- बळी देणं. खरंच,अस करणं जरा आकर्षित वाटत असेल,पण माझा स्वाभिमान राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मी थोडा अलोकप्रिय झालो असेन आणि कधीकधी माझी घृणाही आली असेल आणि त्याचा अंतही दृष्टीक्षेपात आला ही नसेल. पण दुसर्‍यानी माझ्याशी संतुष्ट असणं हे मी माझ्याशी संतुष्ट असण्याइतकं महत्वाच मानीत नाही. आता मी मॅट्रिकची परिक्षा दिल्यावर नक्कीच कॉलेजात शिकायला जाणार.ह्याच लायब्ररीतल्या व्यवस्थापकानी मला इथेच काम करून काही पैसे कमविण्याचा मार्ग दाखवला आहे.त्याने मी माझा शिक्षणाच्या खर्चाला थोडा हातभार लाविन.आणि खचीतच माझी भरपूर शिकायची इच्छा पूर्ण करीन." मला त्या मुलाची जीद्द बघून खूपच आनंद झाला.त्याला मी सुयश चिंतीलं. श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1284
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आपले कपडे कसे आहेत, ह्या पेक्षा आपले मन कसे आहे हे म्हत्वाचे. उगाच ब्रँडेड कपडे घातले म्हणजे खुप चांगले होत नाही. आपले विचार आपल्याला इतरांपासुन वेगळे करतात.