बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला.
पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा. त्याची आज्ञा न घेता भावंडांनी पाणी प्यायले असावे, म्हणून यक्षाने त्यांना दंडित केले असावे.
युधिष्ठिराने यक्षाला पुकारले, “हे यक्षदेव, तुम्ही दयाळू आहात. या वाळवंटात पाण्याचे संरक्षण करून प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य करत आहात. माझ्या भावंडांकडून चूक झाली, कृपया त्यांना क्षमा करा.”
युधिष्ठिराचा पुकारा ऐकून यक्ष प्रकट झाला. युधिष्ठिराने त्याला प्रणाम केला आणि भावंडांच्या प्राणांची भीक मागितली. यक्ष म्हणाला, “युधिष्ठिर, मी कोण क्षमा करणारा? तुझी तहानेने व्याकूळ भावंडे या सरोवरावर आली. त्यांनी पाणी पिण्याची माझी परवानगी मागितली. पण हे पाणी अत्यंत दूषित आणि विषारी आहे, म्हणून मी नकार दिला. त्यांनी माझे ऐकले नाही. पाणी प्राशन केले आणि मृत्यूमुखी पडले.”
युधिष्ठिराने पुन्हा हात जोडून विनंती केली, “हे यक्षदेव, आपण सर्वज्ञ आहात. यावर काही उपाय असेल का?
यक्ष म्हणाला, पूर्वी हिमालयात संजीवनी बुटी मिळायची. तीच आणून हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. पण आज हिमालयावर एकही वृक्ष नाही. संजीवनी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.” क्षणभर थांबून यक्षाने युधिष्ठिराला विचारले, “जीवनाचे अंतिम सत्य काय आहे?”
युधिष्ठिर म्हणाला, “मृत्यू हेच जीवनाचे शेवटचे सत्य आहे.”
यक्ष अट्टहासाने हसत म्हणाला, “युधिष्ठिर, तुला जीवनाचे सत्य माहित आहे, हे चांगलेच. तुझे बंधू जिवंत होऊ शकत नाहीत. इथे दूर-दूर पिण्यालायक पाणीही नाही. तुझ्यासमोर दोनच मार्ग आहेत- या सरोवराचे विषारी पाणी पिऊन काही क्षणांत मृत्यू स्वीकार किंवा तहानेने तडफडत मृत्यूला सामोरे जा.”
हे सांगून यक्ष अदृश्य झाला.
युधिष्ठिर काही वेळ विचारात गढून गेला. “मरण निश्चित आहे, तर भावंडांसोबत मेलेले बरे,” असा विचार करून त्याने विषारी पाणी प्राशन केले. तहान शांत झाली. काही क्षणांत तोही निष्प्राण झाला.
पाचही पांडव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडले होते. महाभारताचा अवेळीच अंत झाला. हा सत्याचा विजय नव्हता. प्रदूषणाचा मानवावर विजय झाला होता.
प्रतिक्रिया
21 Jan 2026 - 6:20 pm | युयुत्सु
तहानलेलं असताना पाणी पिण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागावी, त्या यक्षाला तहानलेल्यांची दया येऊ नये यासारखी मानवतेची क्रुर चेष्टा दुसरी नाही. एकंदरच अत्यंत टाकाऊ कथा...
22 Jan 2026 - 8:52 am | विवेकपटाईत
वैदिक काळापासून भारतात सरोवराच्या सुरक्षा साठी रक्षक नेमले जात होते. ब्रिटिश काळात पूर्वी ही सरोवरांची सुरक्षा करण्यासाठी रक्षकाचे नियुक्ती होत असे आणि सरोवराच्या पाण्याच्या हिशोबाने विभिन्न गावांना शेतीसाठी पाणीदिले जात होते. मालवा भागात पाटीदार हेच काम करायचे. बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली. बाकी ही कथा सामान्य बुद्धीच्या लोकांसाठी आहे.
22 Jan 2026 - 5:28 pm | स्वधर्म
>> बाकी सरकारी नीतीमुळे परंपरागत रक्षकांच्या अभावी गेल्या 70 वर्षात देशातील हजारो तलाव नष्ट झाले आणि शेतीसाठी पाण्याची समस्या आली.
तेवढ्यातल्या तेवढ्यात पण काँग्रेस व गैर भाजप सरकारांना दोष द्यायची संधी साधलीत तुंम्ही. कमाल आहे. आजच बातमी आहे कि ताडोबा अंधारीतील खाणींमुळे ६० वाघांचा आधिवास धोक्यात. दुवा: https://www.loksatta.com/nagpur/habitat-of-60-tigers-is-in-danger-due-to...
त्यात म्हटले आहे की ६ जानेवारीला तज्ञांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी इथे लोखंडाच्या खाणींना परवानगी दिली. यावर आपले काय म्हणणे आहे? किमान वर्तमान सरकारचे काहीतरी गैर आहे असे एकदा तरी म्हणून आपण विचार करू शकता हे सिध्द करावे अशी कळकळीची विनंती आहे.
22 Jan 2026 - 5:51 pm | टर्मीनेटर
'ताडोबा अंधारी' हे ठिकाण म्हणजे मला वाटतं नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातले...
म्हणजे डबल व्हॅमी.
छे...फारच जास्ती अपेक्षा करताय राव तुम्ही 😀
23 Jan 2026 - 8:27 am | विवेकपटाईत
हा लेख तलावांवर आहे खाणींवर नाही. बाकी ज्या राज्यात भाजप सरकार आहे त्या राज्यातही तलाव नष्ट होत आहे. रसायनिक कीटनाशक इत्यादींमुळे भाजपशासित राज्यात ही जमिनीच्या आतले पाणी विषारी होत आहे. इंदूर ही भाजप राज्यात आहे. प्रत्येक लेखात राजनीति आणू नका. लेखाचा उद्देश्य समजा. पुढे खाणींवर ही लेख टाकणार आहे त्यासाठी जर प्राचीन व संदर्भ तुमच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख प्रतिसादात करा. कथा निर्मिती मी करतो.
23 Jan 2026 - 3:57 pm | स्वधर्म
ते 'गेल्या सत्तर वर्षात' हा वाक्प्रचार सर्वसाधारणपणे भाजप समर्थक काँग्रेसच्या काळाचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण गेल्या ७७ वर्षात म्हणाला असतात तर मग ते सरसकट वाटले असते. असो, पण त्या निमित्ताने भाजप शासित राज्यातही पाण्याचे प्रदूषण चालू आहे याची नोंद घेतल्याबद्दल धन्यवाद.
29 Jan 2026 - 7:13 pm | सुबोध खरे
स्कोअर सेटलिंग आहे एवढं बोलून मी खाली बसतो
29 Jan 2026 - 7:14 pm | सुबोध खरे
हे युयुत्सु यांच्या प्रतिसादास उत्तर आहे
23 Jan 2026 - 5:50 pm | कॉमी
यक्षाला दया येण्याचा संबंध येतो कुठे ?
पाणी विषारी होते म्हणून ते मेले. यक्षाच्या जादू मुळे नव्हे.
21 Jan 2026 - 6:51 pm | चित्रगुप्त
रोचक कथा. आवडली.
22 Jan 2026 - 8:58 am | निनाद
भगवान श्रीकृष्णाच्या निधनानंतर आणि कलियुगाच्या आगमनानंतर, पांडवांनी या पृथ्वीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरचे सिंहासन अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती सोपवून, युधिष्ठिर आपल्या चार भावांसह आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने निघाला.
त्यांच्यासोबत एक अज्ञात कुत्राही या यात्रेत सामील झाला होता. पांडवांनी एका श्वानासह हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. या काळात द्रौपदीपासून सुरुवात करून शिखरावर पोहोचण्याच्या वाटेवर एक एक पांडव मरण पावले. युधिष्ठिर मागे वळून न पाहता चालत राहिले. शेवटी युधिष्ठिर आणि श्वान उरले. तिथे प्रत्यक्ष इंद्रदेव आपला रथ घेऊन प्रकट झाले. इंद्र म्हणाले, "युधिष्ठिरा, तू सदेही स्वर्गात येण्यास पात्र आहेस, पण तुला या कुत्र्याला मागे सोडावे लागेल. स्वर्गात श्वानांना स्थान नाही."
युधिष्ठिर ठामपणे म्हणाला, "हा प्राणी माझ्यासोबत शेवटपर्यंत आला आहे. याच्या निष्ठेचा त्याग करणे हे माझ्यासाठी महापाप आहे." इंद्राने आठवण करून दिली की त्याने आपल्या भावांचा आणि पत्नीचाही त्याग केला, मग या प्राण्याशी एवढा मोह का? त्यावर युधिष्ठिर म्हणाला, "माझ्या भावांचा मृत्यू अटळ होता, मी त्यांना वाचवू शकत नव्हतो. पण हा जीव श्वान जिवंत आहे आणि माझ्यावर विसंबून आहे. याला सोडून मी सुखाच्या शोधात जाणार नाही."
क्षणार्धात त्या कुत्र्याचे रूपांतर यमा मध्ये झाले. युधिष्ठिराची ही पहिली परीक्षा होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला.
पुढे ही स्वर्ग प्राप्ती कशी झाली याच्या कथा आहेत.
नरकाची प्राप्ती आणि अहंकाराचा अंत
या कथेत असे मानले जाते की, हिमालयात चढताना युधिष्ठिर मागे वळून पाहत नाही कारण त्याला वाटते की त्याने सर्व नातेसंबंध तोडले आहेत. पण जेव्हा तो स्वर्गात आपल्या भावांना पाहत नाही, तेव्हा तो रागाने विचारतो. यमराज त्याला सांगतात की, "तुला वाटले तू मोह सोडला आहेस, पण तुझ्या मनात अजूनही तुझ्या भावांबद्दल प्रेम आणि कौरवांबद्दल द्वेष शिल्लक आहे. हा अहंकार आणि द्वेष तुला स्वर्गासाठी अपात्र ठरवतो." या कथेत, मनातील सुप्त रागामुळे त्याला नरकाचे दर्शन घडते.
22 Jan 2026 - 9:10 am | युयुत्सु
होय तर! मूळ कथा वेगळी आहे.
यांचा आता बहुधा महाभारताचे पण पुनर्लेखन करायचा इरादा दिसतो!
23 Jan 2026 - 8:13 am | विवेकपटाईत
महाभारत असा ग्रंथ आहे जो कालातीत आहे. महाभारतातून धडा घेऊन भविष्यात काय करू नये हे कळते. आज सरोवर काय तर नद्याही विषारी झालेल्या आहेत. दिल्लीच्या निगम बोध घाटावर स्नान आज श्राद्धाचे कर्म करणारे ही करत नाही.
23 Jan 2026 - 11:33 am | सोत्रि
नियोग करावा की करू नये?
- (योगी) सोकाजी
23 Jan 2026 - 12:53 pm | युयुत्सु
Ha ha ha
23 Jan 2026 - 2:50 pm | युयुत्सु
विनोदाचा भाग सोडला तर माझ्या संस्कृतच्या (माफक) ज्ञानाप्रमाणे नियोजन, नियोग या मध्ये नि+ युज् हा धातू येतो. त्याचा अर्थ प्लॅन किंवा अरेंजमेंट असा आहे. त्यामुळे नियोग करण्यास काहीच हरकत नाही ;)
25 Jan 2026 - 8:34 am | विवेकपटाईत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आहे. पुत्र कोणाही पासून झाला असेल तरी पिता हा लग्न झालेला बाप राहणार. अर्थात त्यालाच त्या मुलाचा खर्च उचलावे लागेल. याचा अर्थ आता नियोगसाठी समाज किंवा नवऱ्याच्या अनुमतीची ही गरज नाही.
22 Jan 2026 - 8:22 pm | अर्धवटराव
मूळ कथा पाण्डवांच्या निर्वाणावेळ्ची नाहि तर वनवासादरम्यानची आहे. तहानलेले भाऊ एक एक करत तळ्याचं पाणी प्यायला जातात. रक्षक यक्ष त्यांना प्रथम आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतो आणी तसं न केल्यामुळे चार भावांचा मृत्यु होतो. युधिष्ठीर मात्र उत्तरं देतो. अर्थात, फिलॉसॉफीकल चर्चेला कथारूप आधार द्यायचा हा प्रयत्न आहे.
23 Jan 2026 - 8:10 am | विवेकपटाईत
मूळ कथे वेगळी आहे.ही कथा आजच्या संदर्भात आहे. जमिनीचे पाणी ही रासायनिक कीटनाशक इत्यादींमुळे विषारी झाले आहे. देशात अनेक भागात जमिनीचे पाणी पिण्यालायक राहिले नाही आहे. त मूळ कारण तलावांचे नष्ट होणे आहे. आमच्या दिल्लीत ही पाचशेच्या वर तलाव होते जे पावसाचे पाणी साठवायचे. तलावाच्या शेजारी स्मशान आणि जंगल असायचे. आपल्या सरकारने सत्ता कोणाचीही असो उदाहरण बिंदापूरमध्ये जंगलाच्या जमिनीवर कम्युनिटी सेंटर एक मोठे प्रसूती हॉस्पिटल एक वृद्धाश्रम, एक झुग्गी कालोनी रीसेटल केली आणि लोकांनी कब्जा करून वाल्मिकी मंदिर रविदास मंदिर एवढेच नव्हे तर संत गाडगेबाबा मंदिर ही बांधले. परिणाम वीस वर्षे आधी तलाव सुकून गेला. जमिनीचे पाणी दीडशे फूट खोल गेले आहे. हे देशात सर्वत्र झाले आहे.
22 Jan 2026 - 12:39 pm | मदनबाण
त्याकाळी देखी पाणी पिऊन मृत्यु मिळत असे आणि आजच्या काळात देखील पिऊन मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा यक्ष होता आता मोदी आहेत.
Another Indore Man Dies Due To Contaminated Water, Number Of Deaths Now 25
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kabhi Bekasi Ne Maara... Alag Alag ( 1985 )
25 Jan 2026 - 8:31 am | विवेकपटाईत
उत्तम नगर दिल्लीत प्रत्येक दुसऱ्या गल्लीत सीवर लाइन तुटलेली असते. दोन तीन महिन्यानंतर काही महिने पाणी ती येते. वर्षातून आठ महिने प्रदूषित पाणी येते. दिल्लीच्या सर्व अवैध कॉलोनीस मध्ये हीच दशा आहे. ( दिल्लीत ८० टक्के लोक अश्याच भागात राहतात) . जवळपास सर्वच ro पाणी पितात. सरकारने पाईपलाईन बदलण्याचा निश्चय केला तरी दहा बारा वर्ष लागतील. दिल्लीत हजारो लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे दगावले जात असतील. बाकी इंदोर स्वच्छ शहर आहे म्हणून तिथली घटना मीडियावर आली.