Skip to main content

भोंगा - मराठी चित्रपट

लेखक तर्कवादी यांनी सोमवार, 23/05/2022 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशातही गाजत असलेल्या मशिदीवरील भोंगा या विषयाच्या निमित्ताने "भोंगा" या चित्रपटाचा अल्पपरिचय. काही महिन्यांपुर्वी झी ५ अ‍ॅपवर मी हा चित्रपट पाहिला. शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे असे विकीवरुन समजते. चित्रपटाची कथा मशिदीवरील भोंगा, भोंग्यावरुन दिली जाणारी अजान या विषयाभोवती गुंफलेली आहे. पण लेखक/दिग्दर्शकाने चित्रपटाला हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग दिला नाही. तर दोन भावांच्या बायकातील रोजच्या कटकटींना कंटाळून धाकटा भाऊ त्या गावातच त्या कुटुंबाच्या मालकीच्या दुसर्‍या एका जुन्या घरी आपले बिर्‍हाड हलवितो. हे घर मशिदीच्या समोर असते. त्यामुळे भोंग्याच्या आवाजाचा त्याच्या तान्ह्या बाळाला त्रास होवू लागतो (बाळ आधीच आजारी असते). याबाबत बांगीशी बोलण्याचा प्रयत्न करता बांगी हेकटपणा करतो कारण त्याचा या कुटुंबावर वैयक्तिक कारणामुळे राग असतो. पुढे गावातले काही ज्येष्ठ मुस्लिम, प्रतिष्ठित हिंदूसुद्धा मध्यस्थी करुन हा वाद सोडवू बघतात अशी कथा आहे. सर्व पात्रांचा अगदी नैसर्गिक आणि सशक्त अभिनय, आणि सहज सोपे संवाद हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य.. मुस्लिम कुटुंब दाखवले असले तरी उगाच दोन मराठी वाक्यानंतर एक हिंदी वाक्य असला साधारणतः चित्रपटात दाखवतात तसा टिपीकल प्रकार नाही. सगळे पात्र सहज सोपे , थोडासा ग्रामीण बाज (तोपण अगदी वास्तव वाटतो उगाच ओढून ताणून ग्रामीण ढब नाहीये) असलेले मराठी बोलतात. चित्रपट कुठेही भडक केलेला नाही. साधा सोपा पण हृदयद्रावक शेवट असलेला हा चित्रपट संवेदनशील मनाच्या प्रेक्षकांनी आवर्जुन पहावा असा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3546
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

तर दोन भावांच्या बायकातील रोजच्या कटकटींना कंटाळून धाकटा भाऊ त्या गावातच त्या कुटुंबाच्या मालकीच्या दुसर्‍या एका जुन्या घरी आपले बिर्‍हाड हलवितो
एका मुस्लिम कुटुंबातील दोन भावांच्या असे वाचावे. संपादक महोदय, जमल्यास धाग्यात दुरुस्ती करुन द्यावी ही विनंती.

मलाही हा चित्रपट आवडला होता. आजिबात भडक वाटला नाही. धन्यवाद.

चांगला संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.हिंदू काय किंवा मुस्लिम काय माणसचं असतात.. मन कुलुशित नसतील तर एकमेकाच्या समस्या समजतात... मुस्लिम हौसिंग सोसायटी मध्ये सर्व मुस्लिम आहेत.एकच हिंदू कुटुंब आहे . आणि तो व्यक्ती सोसायटी चालवते. दंगलीत पण तिथेच ते कुटुंब होते Corona मध्ये त्याची नोकरी गेली होती तो सोडून चालला होता. पण त्याचा खर्च पण भागविण्याची जबाबदारी त्या मुस्लिम लोकांनी घेतली. अशी उदाहरणे आहेत हे उदाहरण माझ्या मित्र नी सांगितले. आहे त्या मुळे कोणाचा धर्म,जाती वरून द्वेष करणे योग्य नाही. त्या मुळे द्वेष वाढतो. महाराष्ट्रात किती तरी गावात एक किंवा दीन च मुस्लिम घर आहेत . पण त्यांना अगदी 1993, मधील हिंदू मुस्लिम दंगलीत काहीच त्रास झाला नाही.काही अडचण पण आली नाहीं . ही ग्राउंड रिॲलिटी आहे..राजकीय लोक स्वतःच्या फायद्या साठी समाजात फूट पाडतं असतात.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. या चित्रपटाबद्दल सांगायची आणखी एक गोष्ट म्हणजे - चित्रपटात कथेच्या अनुशंगाने येणारे गावातील हिंदू -मुस्लिम संबंध , त्यातील सहजता उगाच एखाद्या गल्लाभरु चित्रपटाप्रमाणे नाटकी पद्धतीने हिंदू मुस्लिम ऐक्य न दाखवता दोन समाजातले वास्तववादी असे एकजिनसीपण दाखवले आहे.