आनंदाचा निसर्गदत्त ठेवा
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकाआनंदाचा निसर्गदत्त ठेवा

माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष सनातन आहे. अन्न ही प्राथमिक गरज भागविण्यासाठी आपल्याला बरेच कष्ट करावे लागतात. सजीवांच्या गुणधर्मानुसार आपण पुनरुत्पादन करतो आणि त्यातूनच कुटुंबव्यवस्था निर्माण होते. मग आयुष्यभर आपण संसाराचा गाडा ओढत राहतो. या दीर्घ प्रवासात अनेक चढउतार येतात. अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. वेळप्रसंगी शारीरिक व मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. या सगळ्याचा आपल्या मनःस्वास्थ्यावर परिणाम होत असतो. संसाराच्या या व्यापतापात आनंदाचे चार क्षण मिळवीत राहणे ही आपली गरज असते. मग कसा मिळवावा आपण हा आनंद? तो काही आकाशातून पडत नाही किंवा कुठे विकतही मिळत नाही! मात्र तो आपला आपणच मिळवायचा असेल, तर तशी सोय निसर्गानेच खुद्द आपल्या शरीरात करून ठेवलेली आहे. आपल्या मेंदूमध्ये अशी काही केंद्रे आहेत, जिथून काही खास रसायने स्रवतात. आपल्या शरीरात या रसायनांचा संचार झाला की मग कसे आपल्याला काही काळ मस्त मस्त वाटते. आनंद, सुख आणि समाधान यासारख्या भावनांचे आपल्यावर जणू गारुड होते. अशा आनंदाच्या लाटांवर वारंवार तरंगायला आपल्याला नक्कीच आवडते. मग काय करू शकतो आपण त्यासाठी? एक लक्षात घ्यावे - या नैसर्गिक सुखप्राप्तीचे बटन आपल्याच हातात असते, फक्त ते चालू करता आले की झाले. ते कशा प्रकारांनी चालू करता येईल ते लेखात पुढे येईलच.
तर मग पाहू या ही मेंदूतील आनंदजनक यंत्रणा नक्की काय आहे ते. संबंधित रसायने कुठली, ती नेमके काय करतात आणि ती उत्तम स्रवण्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्याचा ऊहापोह या लेखात करीत आहे. अशा या अद्भुत रसायनांचे शास्त्रीय नाव आहे Endorphins, अर्थात 'आनंदजनके'. Endorphins हा एक संयोग शब्द असून त्याची फोड अशी आहे : Endorphin = Endogenous + morphine. म्हणजेच ही अशी अंतर्गत रसायने आहेत, ज्यांचे काम 'morphine' या रसायनाप्रमाणे असते! Morphine हे वैद्यकातील 'Opium’ या गटातील महत्त्वाचे औषध आहे. ते एक प्रभावी वेदनाशामक आहे. म्हणजेच एखाद्या वेदनेची ते मेंदूपर्यंत जाणीव होऊ देत नाही. त्याचा आणखी एक गुणधर्म आहे - जर विशिष्ट डोसमध्ये ते घेतले, तर त्या व्यक्तीत ते अत्यानंदाची भावना (euphoria) निर्माण करते. याच धर्तीवर आपली आनंदजनके तसेच काम करतात. एक प्रकारे ती आपली नैसर्गिक वेदनाशामके आहेत. मेंदूतील उत्पादन
इथल्या काही विशिष्ट पेशींत POMC नावाचे एक आकाराने मोठे प्रथिन असते. त्याचे विघटन होऊन अ, ब आणि क या प्रकारची आनंदजनके (‘आज’) तयार होतात. जेव्हा शरीरात एखाद्या वेदनेला सुरुवात होते, तेव्हा मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून 'आज' सोडली जातात. पुढे ती पेशींतील विशिष्ट प्रथिनांशी संयोग करतात. त्यामुळे वेदना मेंदूकडे पोहोचविणारी अन्य काही रसायने निष्प्रभ होतात. त्यामुळे आपल्याला आता ती वेदना जाणवत नाही. याच्या जोडीला मेंदूत आणखी एक बदल होतो, तो म्हणजे तेथील 'डोपामिन' या रसायनाचे प्रमाण वाढते. त्याच्या गुणधर्मामुळेच आपल्यात आनंदाची भावना निर्माण होते.
'आज'चे शरीरातील परिणाम :
विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या शरीरातील प्रमाणानुसार संबंधितास खालील परिणाम जाणवतात :
१. वेदनेची तीव्रता कमी होणे, जेणेकरून ती सुसह्य होऊ शकते.
२. आपल्याला उत्तेजित ठेवणे. तसेच समाधानाची भावना निर्माण करणे.
३. आत्मविश्वास वाढविणे.
४. दुःखामुळे होणारी भावनिक आंदोलने नियंत्रित ठेवणे.
५. अत्यानंदाची भावना निर्माण करणे. विशेषतः 'अमुक एखादी कृती केल्याने मला खूप छान वाटते' अशी भावना त्या व्यक्तीत प्रबळ होते. त्यामुळे ती कृती आवडीने वारंवार केली जाते.
'आज'ची निर्मिती वाढविणारे घटक :
विशिष्ट शारीरिक क्रियांच्या दरम्यान मेंदूतून 'आज' अधिक प्रमाणात स्रवतात, असे आढळून आले आहे. त्या क्रिया अशा आहेत -
१. दमदार व्यायाम
२. भरपूर मनमोकळे हसणे
३. लैंगिक क्रिया आणि संभोग
४. आवडीचे पदार्थ खाणे
५. आवडीचे संगीत ऐकणे
आता या क्रियांबद्दल सविस्तर लिहितो.
दमदार व्यायाम : आरोग्यासाठी व्यायाम ही कल्पना आता सर्वमान्य आहे. इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. लुटुपुटुच्या व्यायामाने काही 'आज'ची निर्मिती होणार नाही, तो अर्थातच दमदार असला पाहिजे. तो पुरेशा कालावधीसाठी असावा आणि त्याने आपली दमछाकही झाली पाहिजे. मात्र तो अघोरीदेखील नको. या संदर्भात पळण्याचा व्यायाम आणि 'आज'निर्मिती यावर बरेच संशोधन झालेले आहे.
'पळणे आणि आनंदनिर्मिती' याचे मूळ मानवजातीच्या इतिहासात सापडते. आपल्या आदिम अवस्थेत 'अन्नासाठी दाही दिशा' हा जगण्यासाठीचा मूलमंत्र होता. अन्न काही सहज उपलब्ध नसायचे. ते हिंडून शोधावे लागे! मग ते मिळविण्यासाठी अर्थातच स्पर्धा आली आणि स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यासाठी पळायला, धावायलाच हवे होते. अन्नशोधाच्या या धडपडीतूनच 'पळा पळा, कोण पुढे पळे तो' ही वृत्ती निर्माण झाली. या दमदार पळण्यामुळे शरीरात 'आज'ची निर्मिती होऊ लागली. त्यातून आनंदाची भावना वाढू लागली. परिणामी तत्कालीन माणसांचे पळणे अधिक उत्साहात आणि वेगात होऊ लागले आणि पुढे त्यांच्यात अधिक अंतर पळण्याची क्षमतादेखील निर्माण झाली. किंबहुना खूप अंतर धावले तरच नंतर 'छान छान' वाटते, हेही त्यातून स्पष्ट झाले. थोडक्यात, व्यायाम आणि 'आज'ची निर्मिती याबद्दल असे म्हणता येईल :
• व्यायाम हा दीर्घश्वसन होणारा असावा.
• तो पुरेशा कालावधीसाठी (सुमारे ४० मिनिटे) असावा.
• तो दमदार हवा, पण एखाद्याच्या कमाल क्षमतेपेक्षा थोडा कमीच असावा.
• नियमित व्यायाम सुरू केल्यानंतर लगेचच 'आज'निर्मिती होत नाही. पुरेशा सरावानंतर आणि काळानंतर ती जाणवू लागते.
मनमोकळे हसणे
हास्य आणि 'आज'निर्मिती हा कुतूहलजनक, बहुचर्चित आणि काही मतांतरे असलेला विषय आहे. आता हास्यातून मेंदूतील घटनाक्रम कसा होतो ते पाहू. एखादी व्यक्ती जर ठरावीक काळ मनमोकळी हसली, तर त्यातून मेंदूवरील आवरणाचा (cortexचा) विशिष्ट भाग उत्तेजित होतो. त्यामुळे खालील घटना घडतात :
१. 'आज'निर्मिती होते आणि त्यांच्यामुळे वेदनाशमन.
२. जेव्हा 'आज' रक्तप्रवाहात येतात, तेव्हा ती रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला उत्तेजित करतात आणि मग त्यातून 'नायट्रिक ऑक्साइड (NO) सोडले जाते.
३. NOमुळे रक्तवाहिन्या रुंदावतात, ज्यामुळे एखाद्या भागातील रक्तपुरवठा वाढतो. तसेच NOमध्ये दाह कमी करण्याचाही गुणधर्म आहे.
४. हास्याचा आणखी एक परिणाम म्हणजे त्यामुळे Cortisol व Adrenaline ही 'स्ट्रेस हॉर्मोन्स'देखील कमी स्रवतात.
वरील सर्व परिणाम आरोग्यदायक आहेत, हे लक्षात येईलच.
आता वरील सर्व फायदे मिळण्यासाठी हास्य कुठल्या परिस्थितीत असावे, हा चर्चेचा विषय आहे. हास्यनिर्मिती एकतर मोजक्या व्यक्तींच्या संभाषणातून होते किंवा ठरवून एखाद्या समूहात केली जाते. यापैकी कुठला प्रकार अधिक फायदेशीर आहे यावर तज्ज्ञांत काहीसे मतभेद आहेत.
गेल्या काही वर्षांत सामूहिक हास्यात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा काही गटांवर विविध शास्त्रीय प्रयोग केले आहेत. त्यांचे काही निष्कर्ष असे आहेत :
१. अशा समूहातील प्रत्येक व्यक्ती सारख्याच क्षमतेने हसू शकत नाही. एखाद्याची हास्यक्षमता आणि मेंदूतील विशिष्ट प्रथिने (receptors) यांचा घनिष्ठ संबंध असतो.
२. काहींच्या मेंदूत ही प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि त्यांच्यामुळेच तिथे 'आज'चे परिणाम व्यवस्थित होतात.
३. ज्यांच्या मेंदूत अशी प्रथिने बरीच कमी असतात, त्यांच्यात जरी 'आज' निर्माण झालेली असली तरी त्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. तसेच ती कमी प्रमाणातच स्रवतात.
४. यातून आणखी एक निष्कर्ष निघतो - मेंदूत ती प्रथिने भरपूर असलेल्या व्यक्ती अधिक समूहप्रिय असतात.
५. तर, ती प्रथिने कमी असलेल्या व्यक्ती काहीशा एकलकोंड्या असल्याने एखाद्या समूहात मनमोकळे हसू शकत नाहीत.
आता समजा, एखादी व्यक्ती समूहप्रिय आहे आणि सामूहिक हास्यात नियमित सहभागी असते, तर अशा व्यक्तीत 'आज'निर्मिती सुखासुखी होईल का? नक्कीच नाही. त्यासाठीदेखील हास्यकष्ट बऱ्यापैकी घ्यावे लागतात! हास्याच्या कृतीतून दीर्घ श्वसन झाले पाहिजे आणि त्यातून पोटाच्या स्नायूंची अगदी दमछाक झाली पाहिजे, तरच थोडी वेदना निर्माण होते आणि त्यामुळेच आज-निर्मिती चांगली होते. वेदना ही 'आज'निर्मितीची प्रेरणा (stimulus) आहे, हा मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यावा.
लैंगिक क्रिया आणि संभोग
संभोग ही स्त्री-पुरुष मिलनातील परमोच्च सुख देणारी क्रिया आहे. यातून मिळणाऱ्या आनंदाशी शरीरातील अनेक हॉर्मोन्स निगडित आहेत. यात मुख्यतः मेंदूतील Oxytocin आणि ‘आज’ यांचा समावेश आहे. या संदर्भात अलीकडे बरेच संशोधन होत आहे. पण अद्याप त्यातून ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत. संशोधनाचा साधारण सूर असा आहे :
जेव्हा स्त्री व पुरुष समागमासाठी जवळ येतात, तेव्हा सुरुवातीच्या काही प्राथमिक क्रियादेखील महत्त्वाच्या असतात. एकमेकाला स्पर्श, मिठी आणि दोघांच्याही स्तनाग्रांचे आणि जननेंद्रियांचे उद्दीपन या सगळ्यांमुळे पिच्युटरी ग्रंथीतून Oxytocin स्रवते. त्याची पातळी पुरेशी वाढली की मग ‘आज’देखील स्रवतात. आता त्यांचा वेदनाशामक गुणधर्म चांगलाच कामी येतो – विशेषतः स्त्रीच्या बाबतीत. जेव्हा समागमाचे जोडीदार नवखे असतात, तेव्हा या क्रियेदरम्यान स्त्रीला वेदना बऱ्यापैकी होण्याचा संभव असतो. अशा वेळी जर ‘आज’ चांगल्यापैकी स्रवली असतील, तर मग वेदना कमी होतात. त्यातूनच जोडीदाराबद्दलचा विश्वास दृढ होऊ लागतो आणि या क्रियेची गोडी लागते.
आता या क्रियेतील पुढचा भाग फार महत्त्वाचा आहे. दोघांतही ‘आज’निर्मिती उत्तम होण्यासाठी स्त्री-पुरुष दोघेही परमोच्च बिंदूला पोहोचले पाहिजेत. इथे पुरुषाचा प्रश्न सोपा आहे, त्यात काही अडचण नसते. मुद्दा आहे स्त्रीचा. पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे त्या बिंदूला पोहोचणे सहज नसते. त्यासाठी पुरेसे ‘कष्ट’ घ्यावे लागतात! समाजातील बऱ्याच स्त्रियांचे – किंबहुना जोडप्यांचे - या बाबतीत अज्ञान दिसून आले आहे. अशांच्या बाबतीत मग संभोग ही केवळ एक यांत्रिक क्रिया होऊन बसते. थोडक्यात, प्रणयाराधन आणि संभोग समरसून करून दोघेही परमोच्च बिंदूला पोहोचल्यास ‘आज’निर्मिती उत्तम होते. त्यातूनच संबंधित जोडीदारांचे प्रेम व आपुलकी वाढीस लागते.
आवडीचे पदार्थ खाणे
अन्न ही आपली मूलभूत गरज आणि आवडीचे पदार्थ मनसोक्त खाणे ही तर अत्यंत समाधान देणारी गोष्ट. अशा खाण्यातून आपल्याला जो आनंद मिळतो, त्याच्या मुळाशीही ‘आज’ आहेत. या संदर्भात काही रोचक संशोधन झालेले आहे.
त्यासाठी खाण्याचे विशिष्ट पदार्थ निवडले गेले. त्यांत प्रामुख्याने तिखट झणझणीत पदार्थ, पिझ्झा, चॉकलेट आणि काही पौष्टिक पेये यांचा समावेश होता. ही यादी वाचल्यावर आपल्यातील काही जणांच्या तोंडाला नक्की पाणी सुटले असेल!
यापैकी तिखट पदार्थांची शरीरातील क्रिया आता बघू. स्वयंपाकाचे तिखट पदार्थ तयार करताना विविध प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात. त्यांमध्ये capsaicinoids या प्रकारची रसायने असतात. आपण जेव्हा तिखट पदार्थ तोंडात घेतो, तेव्हा या रसायनांमुळे स्थानिक वेदनानिर्मिती होते. ही जाणीव चेतातंतूंद्वारा मेंदूस पोहोचविली जाते. त्यातून खूप प्रमाणात ‘आज’निर्मिती होते आणि ही ‘आज’ अखेर चेतातंतूंच्या टोकाशी पोहोचतात. त्यामुळे काहीसे ‘वेदनाशमन’, समाधान आणि आनंद अशा भावना शरीरात क्रमाने निर्माण होतात.
याचप्रमाणे चॉकलेटमधील ‘कोको’ शरीरात अशीच प्रक्रिया घडवितो. अर्थात त्यासाठी चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण भरपूर असावे लागते.
खाणे आणि ‘आज’निर्मिती यावरून एक गोष्ट लक्षात येईल. आपल्या प्रत्येकाच्या खूप आवडीचे असे काही पदार्थ असतात. ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आवडीने खातोच आणि त्यातून समाधान प्राप्त करतो. त्यामुळे आपल्याला आनंद देणारा एखादा खाद्यपदार्थ वारंवार मिळावा अशीही इच्छा मनात घर करून राहते. इथे एक सावधगिरीची सूचना द्यावीशी वाटते. जर का आपण अशा आवडीच्या पदार्थांबाबत संयम ठेवला नाही, तर बघा काय होते - समजा, ते पदार्थ उच्च उष्मांकयुक्त आहेत. आता ते जर आपण वारंवार आणि प्रमाणाबाहेर खात सुटलो, तर मात्र ते इष्ट नाही. मग शरीरातील घटनाक्रम असा होतो :
आवडीचे खाणे >> आनंद व समाधान >> अधिकाधिक तेच खाणे >> अधिक ‘आज’निर्मिती आणि आनंद >> प्रमाणाबाहेर खात राहणे >>> भरपूर मेदनिर्मिती >> लठ्ठपणा!
अर्थात खाणे आणि लठ्ठपणा हा इतका सोपा विषय नाही. खाण्याचे प्रमाण ही बाब व्यक्तिसापेक्ष आहे आणि जीवनशैलीतील इतरही अनेक घटकांचा त्याच्याशी संबंध आहे. तूर्त एवढे लक्षात घेऊ, की आवडीचे पदार्थ बेसुमार खाण्याने आपल्या ‘आज’निर्मिती यंत्रणेवर फाजिल ताण येऊ शकतो. त्यातून ते खाणे आणखी प्रमाणाबाहेर होऊ शकते. हे दुष्टचक्र टाळले पाहिजे.
संगीत आणि वाद्यवृंद
लेखात वरती व्यायाम आणि हास्य यांचा ‘आज’निर्मितीशी असलेला संबंध आपण पाहिला आहे. आपले मन रिझविणाऱ्या कलांमध्ये संगीताचे स्थान बरेच वरचे आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे संगीत माणसांना आवडतेच. व्यक्तिगत आवडी भिन्न असतात, पण संगीत अजिबात न आवडणारा माणूस तसा विरळाच. समाजातील बहुसंख्य माणसे संगीत ऐकतात, त्यातील काही ते शास्त्रशुद्ध शिकतात आणि काही मोजके जण त्याचे कार्यक्रम सादर करतात. पण या सर्व गटांत एक बाब समान असते. ती म्हणजे संबंधित माणूस त्या संगीतातून आनंद मिळवितो. या आनंदप्रक्रियेत ‘आज’चा महत्त्वाचा वाटा आहे.
संगीत ऐकणे आणि सादर करणे या दोन्ही क्रियांदरम्यान आपल्या मेंदूचे विशिष्ट भाग चेतविले जातात आणि त्यातून बरीच ‘आज’निर्मिती होते. अर्थात त्यांच्या जोडीला Oxytocin, Cortisol यांचा आणि अन्य काही हॉर्मोन्सचादेखील या आनंदप्रक्रियेत वाटा असतो. या संदर्भात बरेच संशोधन चालू आहे. समूहाने संगीत सादर करणारे आणि निव्वळ ऐकणारे अशा दोन्ही गटांवर निरनिराळे प्रयोग झालेले आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेतो.
प्रथम संगीत सादर करणारा गट पाहू.
यासाठी वाद्यवृंदातील कलाकार हे उत्तम उदाहरण आहे. यात एखादे गाणे सादर होत असताना गायक समरसून गात असतो, तर विविध वाद्ये वाजविणारे एका तालात साथ देत असतात. काही वेळेस एक सूत्रधार त्याच्या हाताच्या लयबद्ध हालचालींनी त्या सर्वांना एकत्र गुंफत असतो. प्रत्येक जण अगदी झोकून देऊन काम करीत असतो. अशा या सामूहिक कृत्यातून त्या कलाकारांच्या मेंदूत उत्तम ‘आज’निर्मिती होते. जसजसे हा समूह पुढे अधिकाधिक कार्यक्रम करू लागतो तशी त्या सहभागींची एकत्रित आनंदभावनाही वाढीस लागते. संगीताशी परिश्रमपूर्वक जोडल्या गेलेल्या लोकांत वेदना सहन करण्याची क्षमताही वाढलेली दिसून येते. अगदी भिन्न संस्कृतीतील माणसेदेखील जर संगीतामुळे एकत्र आली तर त्यांच्यात एक आपलेपणाचे नाते तयार होते. असा हा समूहसंगीताचा महिमा आहे.
आता संगीत निव्वळ ऐकणाऱ्यांबद्दल पाहू. सामूहिक प्रकारापेक्षा या बाबतीतले संशोधन तसे कमीच आहे. संगीताचे अनेक प्रकार आहेत आणि व्यक्तीनुसार आवडीही भिन्न असतात. जे लोक विशेषतः उच्च तालबद्धता असलेले संगीत वारंवार ऐकतात, त्यांच्या बाबतीत काही गोष्टी समजल्या आहेत. अशांच्या मेंदूचे आदेश देणारे भाग (motor regions) या संगीताने उत्तेजित होतात. त्यातून पुढे ‘आज’निर्मिती होते. त्यामुळे अशा लोकांनादेखील आनंद व समाधान मिळते. तसेच बारीकसारीक वेदना सहन करण्याची त्यांची क्षमताही वाढते.
संगीत आणि ‘आज’निर्मिती या विषयाला आणखी एक पैलू आहे. ‘आज’मुळे शरीरात वेदनाशमन होते हे आपण जाणतोच. या मुद्द्याचा उपयोग वैद्यकातील उपचारांत करता येतो. गेल्या काही वर्षांत वैद्यकात ‘संगीत उपचार’ या बाबतीत उत्साही संशोधन होत आहे. विशेषतः शस्त्रक्रियेच्या रुग्णांना याचा उपयोग होतो. हे रुग्ण शस्त्रक्रियेपूर्वी मानसिक ताणाखाली असतात. तेव्हा जर त्यांना आवडीचे संगीत ऐकविले, तर त्यांचा ताण थोडाफार कमी होतो. काही शस्त्रक्रियांत शरीराच्या खालच्या निम्म्याच भागाला भूल देतात आणि अशा वेळी त्या रुग्णास गुंगीचे औषध जोडीने दिले जाते. इथे जर संगीताचा योग्य वापर केला, तर गुंगीच्या औषधाचा डोस बऱ्यापैकी कमी करता येतो. तसेच शस्त्रक्रियेनंतरदेखील वेदनाशामके कमी प्रमाणात लागतात. मेंदूच्या काही दीर्घकालीन आजारांतही या संदर्भातील संशोधन जोरात चालू आहे. भविष्यात ‘संगीत उपचार’ ही एक पूरक उपचारपद्धती म्हणून विकसित झालेली असेल.
मानवी मेंदू हे निसर्गातील एक आश्चर्यजनक प्रकरण आहे. त्यातील लाखो चेतातंतूंच्या जाळ्यात असंख्य रासायनिक घडामोडी सतत चालू असतात. त्या घडामोडी आणि मानवी भावना यांचा घनिष्ठ संबंध असतो. आनंदजनके ही त्यातील एक निसर्गदत्त रसायने. ती चांगल्यापैकी स्रवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपल्यापुढे या लेखातून सादर केले. त्यातील जमेल तितक्या क्रिया आपण मन लावून करीत राहायचे, बस्स ! त्यातून नियमित निर्माण होणारी ‘आज’ आपल्याला कायम आनंदी ठेवतील यात शंका नाही.
ही दिवाळी आपणा सर्वांना आनंददायक आणि समाधानाची जावो, हीच आंतरिक इच्छा.
श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.

.png)
वाचन
38194
प्रतिक्रिया
0