Skip to main content

आनंदाचा निसर्गदत्त ठेवा

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


आनंदाचा निसर्गदत्त ठेवा




माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष सनातन आहे. अन्न ही प्राथमिक गरज भागविण्यासाठी आपल्याला बरेच कष्ट करावे लागतात. सजीवांच्या गुणधर्मानुसार आपण पुनरुत्पादन करतो आणि त्यातूनच कुटुंबव्यवस्था निर्माण होते. मग आयुष्यभर आपण संसाराचा गाडा ओढत राहतो. या दीर्घ प्रवासात अनेक चढउतार येतात. अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. वेळप्रसंगी शारीरिक व मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. या सगळ्याचा आपल्या मनःस्वास्थ्यावर परिणाम होत असतो. संसाराच्या या व्यापतापात आनंदाचे चार क्षण मिळवीत राहणे ही आपली गरज असते. मग कसा मिळवावा आपण हा आनंद? तो काही आकाशातून पडत नाही किंवा कुठे विकतही मिळत नाही! मात्र तो आपला आपणच मिळवायचा असेल, तर तशी सोय निसर्गानेच खुद्द आपल्या शरीरात करून ठेवलेली आहे. आपल्या मेंदूमध्ये अशी काही केंद्रे आहेत, जिथून काही खास रसायने स्रवतात. आपल्या शरीरात या रसायनांचा संचार झाला की मग कसे आपल्याला काही काळ मस्त मस्त वाटते. आनंद, सुख आणि समाधान यासारख्या भावनांचे आपल्यावर जणू गारुड होते. अशा आनंदाच्या लाटांवर वारंवार तरंगायला आपल्याला नक्कीच आवडते. मग काय करू शकतो आपण त्यासाठी? एक लक्षात घ्यावे - या नैसर्गिक सुखप्राप्तीचे बटन आपल्याच हातात असते, फक्त ते चालू करता आले की झाले. ते कशा प्रकारांनी चालू करता येईल ते लेखात पुढे येईलच.
तर मग पाहू या ही मेंदूतील आनंदजनक यंत्रणा नक्की काय आहे ते. संबंधित रसायने कुठली, ती नेमके काय करतात आणि ती उत्तम स्रवण्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्याचा ऊहापोह या लेखात करीत आहे. अशा या अद्भुत रसायनांचे शास्त्रीय नाव आहे Endorphins, अर्थात 'आनंदजनके'. Endorphins हा एक संयोग शब्द असून त्याची फोड अशी आहे : Endorphin = Endogenous + morphine. म्हणजेच ही अशी अंतर्गत रसायने आहेत, ज्यांचे काम 'morphine' या रसायनाप्रमाणे असते! Morphine हे वैद्यकातील 'Opium’ या गटातील महत्त्वाचे औषध आहे. ते एक प्रभावी वेदनाशामक आहे. म्हणजेच एखाद्या वेदनेची ते मेंदूपर्यंत जाणीव होऊ देत नाही. त्याचा आणखी एक गुणधर्म आहे - जर विशिष्ट डोसमध्ये ते घेतले, तर त्या व्यक्तीत ते अत्यानंदाची भावना (euphoria) निर्माण करते. याच धर्तीवर आपली आनंदजनके तसेच काम करतात. एक प्रकारे ती आपली नैसर्गिक वेदनाशामके आहेत. मेंदूतील उत्पादन इथल्या काही विशिष्ट पेशींत POMC नावाचे एक आकाराने मोठे प्रथिन असते. त्याचे विघटन होऊन अ, ब आणि क या प्रकारची आनंदजनके (‘आज’) तयार होतात. जेव्हा शरीरात एखाद्या वेदनेला सुरुवात होते, तेव्हा मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून 'आज' सोडली जातात. पुढे ती पेशींतील विशिष्ट प्रथिनांशी संयोग करतात. त्यामुळे वेदना मेंदूकडे पोहोचविणारी अन्य काही रसायने निष्प्रभ होतात. त्यामुळे आपल्याला आता ती वेदना जाणवत नाही. याच्या जोडीला मेंदूत आणखी एक बदल होतो, तो म्हणजे तेथील 'डोपामिन' या रसायनाचे प्रमाण वाढते. त्याच्या गुणधर्मामुळेच आपल्यात आनंदाची भावना निर्माण होते. 'आज'चे शरीरातील परिणाम : विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या शरीरातील प्रमाणानुसार संबंधितास खालील परिणाम जाणवतात : १. वेदनेची तीव्रता कमी होणे, जेणेकरून ती सुसह्य होऊ शकते. २. आपल्याला उत्तेजित ठेवणे. तसेच समाधानाची भावना निर्माण करणे. ३. आत्मविश्वास वाढविणे. ४. दुःखामुळे होणारी भावनिक आंदोलने नियंत्रित ठेवणे. ५. अत्यानंदाची भावना निर्माण करणे. विशेषतः 'अमुक एखादी कृती केल्याने मला खूप छान वाटते' अशी भावना त्या व्यक्तीत प्रबळ होते. त्यामुळे ती कृती आवडीने वारंवार केली जाते. 'आज'ची निर्मिती वाढविणारे घटक : विशिष्ट शारीरिक क्रियांच्या दरम्यान मेंदूतून 'आज' अधिक प्रमाणात स्रवतात, असे आढळून आले आहे. त्या क्रिया अशा आहेत - १. दमदार व्यायाम २. भरपूर मनमोकळे हसणे ३. लैंगिक क्रिया आणि संभोग ४. आवडीचे पदार्थ खाणे ५. आवडीचे संगीत ऐकणे आता या क्रियांबद्दल सविस्तर लिहितो. दमदार व्यायाम : आरोग्यासाठी व्यायाम ही कल्पना आता सर्वमान्य आहे. इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे. लुटुपुटुच्या व्यायामाने काही 'आज'ची निर्मिती होणार नाही, तो अर्थातच दमदार असला पाहिजे. तो पुरेशा कालावधीसाठी असावा आणि त्याने आपली दमछाकही झाली पाहिजे. मात्र तो अघोरीदेखील नको. या संदर्भात पळण्याचा व्यायाम आणि 'आज'निर्मिती यावर बरेच संशोधन झालेले आहे. 'पळणे आणि आनंदनिर्मिती' याचे मूळ मानवजातीच्या इतिहासात सापडते. आपल्या आदिम अवस्थेत 'अन्नासाठी दाही दिशा' हा जगण्यासाठीचा मूलमंत्र होता. अन्न काही सहज उपलब्ध नसायचे. ते हिंडून शोधावे लागे! मग ते मिळविण्यासाठी अर्थातच स्पर्धा आली आणि स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यासाठी पळायला, धावायलाच हवे होते. अन्नशोधाच्या या धडपडीतूनच 'पळा पळा, कोण पुढे पळे तो' ही वृत्ती निर्माण झाली. या दमदार पळण्यामुळे शरीरात 'आज'ची निर्मिती होऊ लागली. त्यातून आनंदाची भावना वाढू लागली. परिणामी तत्कालीन माणसांचे पळणे अधिक उत्साहात आणि वेगात होऊ लागले आणि पुढे त्यांच्यात अधिक अंतर पळण्याची क्षमतादेखील निर्माण झाली. किंबहुना खूप अंतर धावले तरच नंतर 'छान छान' वाटते, हेही त्यातून स्पष्ट झाले. थोडक्यात, व्यायाम आणि 'आज'ची निर्मिती याबद्दल असे म्हणता येईल : • व्यायाम हा दीर्घश्वसन होणारा असावा. • तो पुरेशा कालावधीसाठी (सुमारे ४० मिनिटे) असावा. • तो दमदार हवा, पण एखाद्याच्या कमाल क्षमतेपेक्षा थोडा कमीच असावा. • नियमित व्यायाम सुरू केल्यानंतर लगेचच 'आज'निर्मिती होत नाही. पुरेशा सरावानंतर आणि काळानंतर ती जाणवू लागते. मनमोकळे हसणे हास्य आणि 'आज'निर्मिती हा कुतूहलजनक, बहुचर्चित आणि काही मतांतरे असलेला विषय आहे. आता हास्यातून मेंदूतील घटनाक्रम कसा होतो ते पाहू. एखादी व्यक्ती जर ठरावीक काळ मनमोकळी हसली, तर त्यातून मेंदूवरील आवरणाचा (cortexचा) विशिष्ट भाग उत्तेजित होतो. त्यामुळे खालील घटना घडतात : १. 'आज'निर्मिती होते आणि त्यांच्यामुळे वेदनाशमन. २. जेव्हा 'आज' रक्तप्रवाहात येतात, तेव्हा ती रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला उत्तेजित करतात आणि मग त्यातून 'नायट्रिक ऑक्साइड (NO) सोडले जाते. ३. NOमुळे रक्तवाहिन्या रुंदावतात, ज्यामुळे एखाद्या भागातील रक्तपुरवठा वाढतो. तसेच NOमध्ये दाह कमी करण्याचाही गुणधर्म आहे. ४. हास्याचा आणखी एक परिणाम म्हणजे त्यामुळे Cortisol व Adrenaline ही 'स्ट्रेस हॉर्मोन्स'देखील कमी स्रवतात. वरील सर्व परिणाम आरोग्यदायक आहेत, हे लक्षात येईलच. आता वरील सर्व फायदे मिळण्यासाठी हास्य कुठल्या परिस्थितीत असावे, हा चर्चेचा विषय आहे. हास्यनिर्मिती एकतर मोजक्या व्यक्तींच्या संभाषणातून होते किंवा ठरवून एखाद्या समूहात केली जाते. यापैकी कुठला प्रकार अधिक फायदेशीर आहे यावर तज्ज्ञांत काहीसे मतभेद आहेत. गेल्या काही वर्षांत सामूहिक हास्यात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा काही गटांवर विविध शास्त्रीय प्रयोग केले आहेत. त्यांचे काही निष्कर्ष असे आहेत : १. अशा समूहातील प्रत्येक व्यक्ती सारख्याच क्षमतेने हसू शकत नाही. एखाद्याची हास्यक्षमता आणि मेंदूतील विशिष्ट प्रथिने (receptors) यांचा घनिष्ठ संबंध असतो. २. काहींच्या मेंदूत ही प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि त्यांच्यामुळेच तिथे 'आज'चे परिणाम व्यवस्थित होतात. ३. ज्यांच्या मेंदूत अशी प्रथिने बरीच कमी असतात, त्यांच्यात जरी 'आज' निर्माण झालेली असली तरी त्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. तसेच ती कमी प्रमाणातच स्रवतात. ४. यातून आणखी एक निष्कर्ष निघतो - मेंदूत ती प्रथिने भरपूर असलेल्या व्यक्ती अधिक समूहप्रिय असतात. ५. तर, ती प्रथिने कमी असलेल्या व्यक्ती काहीशा एकलकोंड्या असल्याने एखाद्या समूहात मनमोकळे हसू शकत नाहीत. आता समजा, एखादी व्यक्ती समूहप्रिय आहे आणि सामूहिक हास्यात नियमित सहभागी असते, तर अशा व्यक्तीत 'आज'निर्मिती सुखासुखी होईल का? नक्कीच नाही. त्यासाठीदेखील हास्यकष्ट बऱ्यापैकी घ्यावे लागतात! हास्याच्या कृतीतून दीर्घ श्वसन झाले पाहिजे आणि त्यातून पोटाच्या स्नायूंची अगदी दमछाक झाली पाहिजे, तरच थोडी वेदना निर्माण होते आणि त्यामुळेच आज-निर्मिती चांगली होते. वेदना ही 'आज'निर्मितीची प्रेरणा (stimulus) आहे, हा मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यावा. लैंगिक क्रिया आणि संभोग संभोग ही स्त्री-पुरुष मिलनातील परमोच्च सुख देणारी क्रिया आहे. यातून मिळणाऱ्या आनंदाशी शरीरातील अनेक हॉर्मोन्स निगडित आहेत. यात मुख्यतः मेंदूतील Oxytocin आणि ‘आज’ यांचा समावेश आहे. या संदर्भात अलीकडे बरेच संशोधन होत आहे. पण अद्याप त्यातून ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत. संशोधनाचा साधारण सूर असा आहे : जेव्हा स्त्री व पुरुष समागमासाठी जवळ येतात, तेव्हा सुरुवातीच्या काही प्राथमिक क्रियादेखील महत्त्वाच्या असतात. एकमेकाला स्पर्श, मिठी आणि दोघांच्याही स्तनाग्रांचे आणि जननेंद्रियांचे उद्दीपन या सगळ्यांमुळे पिच्युटरी ग्रंथीतून Oxytocin स्रवते. त्याची पातळी पुरेशी वाढली की मग ‘आज’देखील स्रवतात. आता त्यांचा वेदनाशामक गुणधर्म चांगलाच कामी येतो – विशेषतः स्त्रीच्या बाबतीत. जेव्हा समागमाचे जोडीदार नवखे असतात, तेव्हा या क्रियेदरम्यान स्त्रीला वेदना बऱ्यापैकी होण्याचा संभव असतो. अशा वेळी जर ‘आज’ चांगल्यापैकी स्रवली असतील, तर मग वेदना कमी होतात. त्यातूनच जोडीदाराबद्दलचा विश्वास दृढ होऊ लागतो आणि या क्रियेची गोडी लागते. आता या क्रियेतील पुढचा भाग फार महत्त्वाचा आहे. दोघांतही ‘आज’निर्मिती उत्तम होण्यासाठी स्त्री-पुरुष दोघेही परमोच्च बिंदूला पोहोचले पाहिजेत. इथे पुरुषाचा प्रश्न सोपा आहे, त्यात काही अडचण नसते. मुद्दा आहे स्त्रीचा. पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे त्या बिंदूला पोहोचणे सहज नसते. त्यासाठी पुरेसे ‘कष्ट’ घ्यावे लागतात! समाजातील बऱ्याच स्त्रियांचे – किंबहुना जोडप्यांचे - या बाबतीत अज्ञान दिसून आले आहे. अशांच्या बाबतीत मग संभोग ही केवळ एक यांत्रिक क्रिया होऊन बसते. थोडक्यात, प्रणयाराधन आणि संभोग समरसून करून दोघेही परमोच्च बिंदूला पोहोचल्यास ‘आज’निर्मिती उत्तम होते. त्यातूनच संबंधित जोडीदारांचे प्रेम व आपुलकी वाढीस लागते. आवडीचे पदार्थ खाणे अन्न ही आपली मूलभूत गरज आणि आवडीचे पदार्थ मनसोक्त खाणे ही तर अत्यंत समाधान देणारी गोष्ट. अशा खाण्यातून आपल्याला जो आनंद मिळतो, त्याच्या मुळाशीही ‘आज’ आहेत. या संदर्भात काही रोचक संशोधन झालेले आहे. त्यासाठी खाण्याचे विशिष्ट पदार्थ निवडले गेले. त्यांत प्रामुख्याने तिखट झणझणीत पदार्थ, पिझ्झा, चॉकलेट आणि काही पौष्टिक पेये यांचा समावेश होता. ही यादी वाचल्यावर आपल्यातील काही जणांच्या तोंडाला नक्की पाणी सुटले असेल! यापैकी तिखट पदार्थांची शरीरातील क्रिया आता बघू. स्वयंपाकाचे तिखट पदार्थ तयार करताना विविध प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात. त्यांमध्ये capsaicinoids या प्रकारची रसायने असतात. आपण जेव्हा तिखट पदार्थ तोंडात घेतो, तेव्हा या रसायनांमुळे स्थानिक वेदनानिर्मिती होते. ही जाणीव चेतातंतूंद्वारा मेंदूस पोहोचविली जाते. त्यातून खूप प्रमाणात ‘आज’निर्मिती होते आणि ही ‘आज’ अखेर चेतातंतूंच्या टोकाशी पोहोचतात. त्यामुळे काहीसे ‘वेदनाशमन’, समाधान आणि आनंद अशा भावना शरीरात क्रमाने निर्माण होतात. याचप्रमाणे चॉकलेटमधील ‘कोको’ शरीरात अशीच प्रक्रिया घडवितो. अर्थात त्यासाठी चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण भरपूर असावे लागते. खाणे आणि ‘आज’निर्मिती यावरून एक गोष्ट लक्षात येईल. आपल्या प्रत्येकाच्या खूप आवडीचे असे काही पदार्थ असतात. ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आवडीने खातोच आणि त्यातून समाधान प्राप्त करतो. त्यामुळे आपल्याला आनंद देणारा एखादा खाद्यपदार्थ वारंवार मिळावा अशीही इच्छा मनात घर करून राहते. इथे एक सावधगिरीची सूचना द्यावीशी वाटते. जर का आपण अशा आवडीच्या पदार्थांबाबत संयम ठेवला नाही, तर बघा काय होते - समजा, ते पदार्थ उच्च उष्मांकयुक्त आहेत. आता ते जर आपण वारंवार आणि प्रमाणाबाहेर खात सुटलो, तर मात्र ते इष्ट नाही. मग शरीरातील घटनाक्रम असा होतो : आवडीचे खाणे >> आनंद व समाधान >> अधिकाधिक तेच खाणे >> अधिक ‘आज’निर्मिती आणि आनंद >> प्रमाणाबाहेर खात राहणे >>> भरपूर मेदनिर्मिती >> लठ्ठपणा! अर्थात खाणे आणि लठ्ठपणा हा इतका सोपा विषय नाही. खाण्याचे प्रमाण ही बाब व्यक्तिसापेक्ष आहे आणि जीवनशैलीतील इतरही अनेक घटकांचा त्याच्याशी संबंध आहे. तूर्त एवढे लक्षात घेऊ, की आवडीचे पदार्थ बेसुमार खाण्याने आपल्या ‘आज’निर्मिती यंत्रणेवर फाजिल ताण येऊ शकतो. त्यातून ते खाणे आणखी प्रमाणाबाहेर होऊ शकते. हे दुष्टचक्र टाळले पाहिजे. संगीत आणि वाद्यवृंद लेखात वरती व्यायाम आणि हास्य यांचा ‘आज’निर्मितीशी असलेला संबंध आपण पाहिला आहे. आपले मन रिझविणाऱ्या कलांमध्ये संगीताचे स्थान बरेच वरचे आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे संगीत माणसांना आवडतेच. व्यक्तिगत आवडी भिन्न असतात, पण संगीत अजिबात न आवडणारा माणूस तसा विरळाच. समाजातील बहुसंख्य माणसे संगीत ऐकतात, त्यातील काही ते शास्त्रशुद्ध शिकतात आणि काही मोजके जण त्याचे कार्यक्रम सादर करतात. पण या सर्व गटांत एक बाब समान असते. ती म्हणजे संबंधित माणूस त्या संगीतातून आनंद मिळवितो. या आनंदप्रक्रियेत ‘आज’चा महत्त्वाचा वाटा आहे. संगीत ऐकणे आणि सादर करणे या दोन्ही क्रियांदरम्यान आपल्या मेंदूचे विशिष्ट भाग चेतविले जातात आणि त्यातून बरीच ‘आज’निर्मिती होते. अर्थात त्यांच्या जोडीला Oxytocin, Cortisol यांचा आणि अन्य काही हॉर्मोन्सचादेखील या आनंदप्रक्रियेत वाटा असतो. या संदर्भात बरेच संशोधन चालू आहे. समूहाने संगीत सादर करणारे आणि निव्वळ ऐकणारे अशा दोन्ही गटांवर निरनिराळे प्रयोग झालेले आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेतो. प्रथम संगीत सादर करणारा गट पाहू. यासाठी वाद्यवृंदातील कलाकार हे उत्तम उदाहरण आहे. यात एखादे गाणे सादर होत असताना गायक समरसून गात असतो, तर विविध वाद्ये वाजविणारे एका तालात साथ देत असतात. काही वेळेस एक सूत्रधार त्याच्या हाताच्या लयबद्ध हालचालींनी त्या सर्वांना एकत्र गुंफत असतो. प्रत्येक जण अगदी झोकून देऊन काम करीत असतो. अशा या सामूहिक कृत्यातून त्या कलाकारांच्या मेंदूत उत्तम ‘आज’निर्मिती होते. जसजसे हा समूह पुढे अधिकाधिक कार्यक्रम करू लागतो तशी त्या सहभागींची एकत्रित आनंदभावनाही वाढीस लागते. संगीताशी परिश्रमपूर्वक जोडल्या गेलेल्या लोकांत वेदना सहन करण्याची क्षमताही वाढलेली दिसून येते. अगदी भिन्न संस्कृतीतील माणसेदेखील जर संगीतामुळे एकत्र आली तर त्यांच्यात एक आपलेपणाचे नाते तयार होते. असा हा समूहसंगीताचा महिमा आहे. आता संगीत निव्वळ ऐकणाऱ्यांबद्दल पाहू. सामूहिक प्रकारापेक्षा या बाबतीतले संशोधन तसे कमीच आहे. संगीताचे अनेक प्रकार आहेत आणि व्यक्तीनुसार आवडीही भिन्न असतात. जे लोक विशेषतः उच्च तालबद्धता असलेले संगीत वारंवार ऐकतात, त्यांच्या बाबतीत काही गोष्टी समजल्या आहेत. अशांच्या मेंदूचे आदेश देणारे भाग (motor regions) या संगीताने उत्तेजित होतात. त्यातून पुढे ‘आज’निर्मिती होते. त्यामुळे अशा लोकांनादेखील आनंद व समाधान मिळते. तसेच बारीकसारीक वेदना सहन करण्याची त्यांची क्षमताही वाढते. संगीत आणि ‘आज’निर्मिती या विषयाला आणखी एक पैलू आहे. ‘आज’मुळे शरीरात वेदनाशमन होते हे आपण जाणतोच. या मुद्द्याचा उपयोग वैद्यकातील उपचारांत करता येतो. गेल्या काही वर्षांत वैद्यकात ‘संगीत उपचार’ या बाबतीत उत्साही संशोधन होत आहे. विशेषतः शस्त्रक्रियेच्या रुग्णांना याचा उपयोग होतो. हे रुग्ण शस्त्रक्रियेपूर्वी मानसिक ताणाखाली असतात. तेव्हा जर त्यांना आवडीचे संगीत ऐकविले, तर त्यांचा ताण थोडाफार कमी होतो. काही शस्त्रक्रियांत शरीराच्या खालच्या निम्म्याच भागाला भूल देतात आणि अशा वेळी त्या रुग्णास गुंगीचे औषध जोडीने दिले जाते. इथे जर संगीताचा योग्य वापर केला, तर गुंगीच्या औषधाचा डोस बऱ्यापैकी कमी करता येतो. तसेच शस्त्रक्रियेनंतरदेखील वेदनाशामके कमी प्रमाणात लागतात. मेंदूच्या काही दीर्घकालीन आजारांतही या संदर्भातील संशोधन जोरात चालू आहे. भविष्यात ‘संगीत उपचार’ ही एक पूरक उपचारपद्धती म्हणून विकसित झालेली असेल. मानवी मेंदू हे निसर्गातील एक आश्चर्यजनक प्रकरण आहे. त्यातील लाखो चेतातंतूंच्या जाळ्यात असंख्य रासायनिक घडामोडी सतत चालू असतात. त्या घडामोडी आणि मानवी भावना यांचा घनिष्ठ संबंध असतो. आनंदजनके ही त्यातील एक निसर्गदत्त रसायने. ती चांगल्यापैकी स्रवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपल्यापुढे या लेखातून सादर केले. त्यातील जमेल तितक्या क्रिया आपण मन लावून करीत राहायचे, बस्स ! त्यातून नियमित निर्माण होणारी ‘आज’ आपल्याला कायम आनंदी ठेवतील यात शंका नाही. ही दिवाळी आपणा सर्वांना आनंददायक आणि समाधानाची जावो, हीच आंतरिक इच्छा.

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.


20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 38213
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

२००३ साली मला एका मुलाला वाचविताना दुचाकी ( माझी) कलंडून मी पडलो व ती एका हाताने उचलली म्हणून कंपाउंड रेडियल फ्रॅक्चर झाले. मला बी पी असल्याने म्हणा ... अनस्थेशिया जनरल ठरले . मी ऑपरेशन टेबलावर निजलो तो सर्जनाना एक जोक सांगितला तो असा.... तो पेशंट फारच नर्व्हस होता . .त्याची ही चिंता सर्जन ने हेरली व विचारले " अहो तुम्ही इतके अस्वथ का ?.... त्यावर तो डॉ ला म्हणाला ." काय आहे ,आज माझे हे पहिलाच ऑपरेशन आहे आयुष्यात .... " हाड तिच्या ,,मग त्यांना टेंशन काय ते घ्यायच,,? ... माझही ही पहिलीच वेळा आहे ऑपरेशन ची ,,, पुढे भूलीचा खर्च वाचला .असे होता असतानाच माझ्या शिरेत सुई शिरली .. व मग काय .. आनंदाचे डोही आनंद तरंग .. सातवा स्वर्ग वगरे काय असते , मस्त रंग .. विविधी ग्राफिक्स .. सारीच लयलूट . पुढे मी सर्जना विचारले " काय चारले मला ? " ते म्हणाले काही वेगळे नाही तुम्हाला जो आनंद मिळाला असे सगळ्यांना होत नाही. .. . तुम्ही मस्त मूड मध्ये टेबलावर आडवे झालात .हा रिमार्क ही त्यांनी पुस्तकात लिहिला हे विशेष . मला वाटते ते मॉर्फीन असावे . बाकी मला लेख फार आवडला .लेख वाचून ज्ञानातं भर पडल्याने व कौतुक करण्याचा माझा स्थायीभाव असल्याने आताही ही " आज" ची निर्मिती होतच आहे !

२००३ साली मला एका मुलाला वाचविताना दुचाकी ( माझी) कलंडून मी पडलो व ती एका हाताने उचलली म्हणून कंपाउंड रेडियल फ्रॅक्चर झाले. मला बी पी असल्याने म्हणा ... अनस्थेशिया जनरल ठरले . मी ऑपरेशन टेबलावर निजलो तो सर्जनाना एक जोक सांगितला तो असा.... तो पेशंट फारच नर्व्हस होता . .त्याची ही चिंता सर्जन ने हेरली व विचारले " अहो तुम्ही इतके अस्वथ का ?.... त्यावर तो डॉ ला म्हणाला ." काय आहे ,आज माझे हे पहिलाच ऑपरेशन आहे आयुष्यात .... " हाड तिच्या ,,मग त्यांना टेंशन काय ते घ्यायच,,? ... माझही ही पहिलीच वेळा आहे ऑपरेशन ची ,,, पुढे भूलीचा खर्च वाचला .असे होता असतानाच माझ्या शिरेत सुई शिरली .. व मग काय .. आनंदाचे डोही आनंद तरंग .. सातवा स्वर्ग वगरे काय असते , मस्त रंग .. विविधी ग्राफिक्स .. सारीच लयलूट . पुढे मी सर्जना विचारले " काय चारले मला ? " ते म्हणाले काही वेगळे नाही तुम्हाला जो आनंद मिळाला असे सगळ्यांना होत नाही. .. . तुम्ही मस्त मूड मध्ये टेबलावर आडवे झालात .हा रिमार्क ही त्यांनी पुस्तकात लिहिला हे विशेष . मला वाटते ते मॉर्फीन असावे . बाकी मला लेख फार आवडला .लेख वाचून ज्ञानातं भर पडल्याने व कौतुक करण्याचा माझा स्थायीभाव असल्याने आताही ही " आज" ची निर्मिती होतच आहे !

२००३ साली मला एका मुलाला वाचविताना दुचाकी ( माझी) कलंडून मी पडलो व ती एका हाताने उचलली म्हणून कंपाउंड रेडियल फ्रॅक्चर झाले. मला बी पी असल्याने म्हणा ... अनस्थेशिया जनरल ठरले . मी ऑपरेशन टेबलावर निजलो तो सर्जनाना एक जोक सांगितला तो असा.... तो पेशंट फारच नर्व्हस होता . .त्याची ही चिंता सर्जन ने हेरली व विचारले " अहो तुम्ही इतके अस्वथ का ?.... त्यावर तो डॉ ला म्हणाला ." काय आहे ,आज माझे हे पहिलाच ऑपरेशन आहे आयुष्यात .... " हाड तिच्या ,,मग त्यांना टेंशन काय ते घ्यायच,,? ... माझही ही पहिलीच वेळा आहे ऑपरेशन ची ,,, पुढे भूलीचा खर्च वाचला .असे होता असतानाच माझ्या शिरेत सुई शिरली .. व मग काय .. आनंदाचे डोही आनंद तरंग .. सातवा स्वर्ग वगरे काय असते , मस्त रंग .. विविधी ग्राफिक्स .. सारीच लयलूट . पुढे मी सर्जना विचारले " काय चारले मला ? " ते म्हणाले काही वेगळे नाही तुम्हाला जो आनंद मिळाला असे सगळ्यांना होत नाही. .. . तुम्ही मस्त मूड मध्ये टेबलावर आडवे झालात .हा रिमार्क ही त्यांनी पुस्तकात लिहिला हे विशेष . मला वाटते ते मॉर्फीन असावे . बाकी मला लेख फार आवडला .लेख वाचून ज्ञानातं भर पडल्याने व कौतुक करण्याचा माझा स्थायीभाव असल्याने आताही ही " आज" ची निर्मिती होतच आहे !

२००३ साली मला एका मुलाला वाचविताना दुचाकी ( माझी) कलंडून मी पडलो व ती एका हाताने उचलली म्हणून कंपाउंड रेडियल फ्रॅक्चर झाले. मला बी पी असल्याने म्हणा ... अनस्थेशिया जनरल ठरले . मी ऑपरेशन टेबलावर निजलो तो सर्जनाना एक जोक सांगितला तो असा.... तो पेशंट फारच नर्व्हस होता . .त्याची ही चिंता सर्जन ने हेरली व विचारले " अहो तुम्ही इतके अस्वथ का ?.... त्यावर तो डॉ ला म्हणाला ." काय आहे ,आज माझे हे पहिलाच ऑपरेशन आहे आयुष्यात .... " हाड तिच्या ,,मग त्यांना टेंशन काय ते घ्यायच,,? ... माझही ही पहिलीच वेळा आहे ऑपरेशन ची ,,, पुढे भूलीचा खर्च वाचला .असे होता असतानाच माझ्या शिरेत सुई शिरली .. व मग काय .. आनंदाचे डोही आनंद तरंग .. सातवा स्वर्ग वगरे काय असते , मस्त रंग .. विविधी ग्राफिक्स .. सारीच लयलूट . पुढे मी सर्जना विचारले " काय चारले मला ? " ते म्हणाले काही वेगळे नाही तुम्हाला जो आनंद मिळाला असे सगळ्यांना होत नाही. .. . तुम्ही मस्त मूड मध्ये टेबलावर आडवे झालात .हा रिमार्क ही त्यांनी पुस्तकात लिहिला हे विशेष . मला वाटते ते मॉर्फीन असावे . बाकी मला लेख फार आवडला .लेख वाचून ज्ञानातं भर पडल्याने व कौतुक करण्याचा माझा स्थायीभाव असल्याने आताही ही " आज" ची निर्मिती होतच आहे !

वरील प्रकार कॉम्युटर मध्ये आज च्या ऐवजी " माज " मल्टिपल ऍक्सेस जोल्ट झालेला आहे . एक ठेवून बाकी काटावे !

नुसतेच मनोरंजक, नीटनेटके नव्हे तर नेमक्या शब्दातले, माहितीपूर्ण आणि १०० टक्के विश्वासार्ह. छान वाटले. दिवाळी भेट म्हणून मस्त आनंददायक लेख दिलात. धन्यवाद. मी कुठेसे वाचले होते की बालपणी जेव्हा मेंदूची वाढ जोमाने होत असते तेव्हा जर कानावर संगीत पडले तर मेंदूच्या विशिष्ट भागाची चांगली वाढ होते आणि त्या व्यक्तीच्या कल्पनाशक्तीचा आणि तदनुषंगाने प्रतिभेचाही चांगला विकास होतो. हे शास्त्रीयदृष्ट्या खरे काय? आईनस्टाईन चांगला पियानोवादक होता आणि त्याच्या व्हायोलीनवादक प्रथमपत्नीला - मिलेव्हाला तो पियानोवर साथ करीत असे.

चौरा, छान प्रतिसाद. नक्कीच आनंदवर्धक आहे ! त्यात तो ४ वेळा पडल्याने माझा आनंद चौगुणीत झाला आहे !!

कुमार sir खूप छान लेख . शोधिसी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या ह्या अंतरी. ह्याच धर्तीवर आनंद ,सुख मिळवण्यासाठी पूर्ण आयुष्य माणूस बरबाद करतो . पण सुख मिळवायचे कसे जे तुम्ही सांगितलं

सुधीर, धन्यवाद.
बालपणी जेव्हा मेंदूची वाढ जोमाने होत असते तेव्हा जर कानावर संगीत पडले तर मेंदूच्या विशिष्ट भागाची चांगली वाढ होते
>>>>>> हे वाचून पाहेन. चांगला विषय सुचवलात. राजेश, धन्यवाद व सहमती.

माहितीपूर्ण लेख. डॉ. तुम्ही ह्यावेळी दिवाळी अंकासाठी सर्वप्रथम लेख पाठवून आमची उत्तम बोहोनी केलीत. नंतर भरपूर लेखन आलं. प्रत्येक उपक्रमात असं सगळ्यात आधी लेखन पाठवत जा, म्हणजे मागून भरपूर लेख येतील! =))

यशोधरा, माझी बोहोनी हे केवळ निमित्त आहे. तुम्ही आणि सर्व सहकार्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच आपला अंक सर्वांगसुंदर झाला आहे. मिपावरील प्रेमापोटी नेहमी लिहीत राहीन. धन्यवाद.

नेहमीप्रमाणे दमदार झालाय सर लेख....आमचा 'आज' बाहेर काढल्याबद्दल धन्यवाद.

गुल्लूदादा, धन्यवाद. कंजूस, होय, बरोबर.
मानसिक त्रास/ शारिरीक विवंचना नसणं हाच आनंद.
>>>> +१११

दमदार व्यायाम २. भरपूर मनमोकळे हसणे ३. लैंगिक क्रिया आणि संभोग ४. आवडीचे पदार्थ खाणे ५. आवडीचे संगीत ऐकणे
यात संगीत ऐकणे ही क्रिया सोडली तर एक गोष्ट लक्षात आली काय ? बाकीच्या चारही गोष्टी शरीरातील रक्त प्रवाह मेंदूऐवजी शरीराच्या विविध भागाकडे जास्त वळवतात. अगदी अंघोळ केल्यानेही शरीराचे रक्ताभिसरण वाढून नेमके हेच होते... अन ज्या ज्या वेळी मेंदूचा असा पुरवठा जरा विचलित होतो मनात विचार कमी आणी ताजे पणा आंनदाची भावना जास्त जाणवते, बाबाजी उगाज सकाळ सकाळ कपालभाती मारतात का टीव्हीवर ? शेवटी हेच रक्त प्रवाह नैसर्गिकपणे इतरत्र वळवणे की मेंदू विश्रातींचा अनुभव घेतो आणी लोकांना आध्यत्मिक प्रगती झाल्याची नशाही येते....

याबाबत बोलायचे तर वैयक्तिक अनुभव उलटा आहे संगीतामुळे भान नाहीसे होते वाढत नाही.

याला तुम्ही आपल्या शरीरातील शब्दशः परब्रम्ह समजा हवे तर... हे मेंदूत जास्त स्त्रवायला लागले की व्यक्ती प्रत्यक्ष आंनदाचा अनुभव करतो आणी कमी व्हायला लागले की चिडचिड व निराशा. बरेच लोक डोपामाईन आंनद स्वरूप मानतात पण ते फक्त तीव्रआसक्ती स्वरूप आहे त्या असक्तीची पूर्ती झाली की आपण भोगणारे समाधान म्हणजे सेरेटोनिनच होय. :) परब्रम्ह. म्हणून जेंव्हा हे कमी कमी होऊ लागते व्यक्तीचा प्रवास चिडचिडेपणा, नैराश्य, पराकोटीचे नैराश्य, वेडसरपणा आणी आत्महत्या अथवा समाज्याला मोठी इजा पोहचेल अशी वेडाच्या भरात केलेली वर्तणूक असा असतो तर जर हे मेंदूत वाढू लागले तर व्यक्तीचा प्रवास, उत्साह, आनंदिपणा, समाधानाची अनुभूती, कृतकृत्याची भावना व आनंदाच्या व समाधानाच्या उन्मादात आता काही करण्यासारखे उरलेच नाही म्हणून पुन्हा कृत्रिम देहत्यागच असा होतो. म्हणूनच शरीराने याविरोधात डिफेन्स यंत्रणा आधीच तयार केलेली आहे ती तिचे काम करतच राहते शरीर टिकून राहण्यासाठी उदा. तुम्हाला सुका बटाटा भाजी खूप आवडते तर ती तुम्ही रोज रोज खाउ लागलात तर ते शरीराला नुकसानदायक आहे म्हणूनच तिचा कंटाळा येतो आणी हे गाणे ऐकण्यापासून प्रत्येक कृतीला लागू होते आणी हा कंटाळाच आपल्याला जीवन्त ठेवतो त्यामुळे जर चंचल मन हा कोणाला दोष वाटत असेल तर ते निसर्गाच्या दृष्टीने कमालीचे अज्ञान होय. व्यक्तीने चंचल, असामाधानी असणं तो टिकून रहायला सुदृढ असण्याचे लक्षण आहे त्याचे स्वागत करा... बाकी हे टिकून का रहायचे हा एक वेगळा विषय आहे त्यामुळे त्यावर चर्चा दुसऱ्या धाग्यावर अवश्य व्हावी

ग झ , आनंद वाटला. धन्यवाद. जॉन, सविस्तर अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सिरोटोनीन, डोपामिन आणि ‘आज’ यांची आपापली विशिष्ट कार्ये आहेत. एकंदरीत भावना आणि रसायने हा गुंतागुंतीचा विषय आहे. त्याला अनेक पैलू आहेत. सवडीने त्यांवर जरूर चर्चा व्हावी. तूर्त दिवाळीचा आनंद आपण सगळेच घेऊ !

In reply to by हेमंतकुमार

बाकी सविस्तर आहे की नाही माहीत नाही पण अभ्यासपूर्णतेची मला ऍलर्जी आहे हे नम्र व ठामपणे नमूद करतो. पण आपली लेखनशैली रंजक आहे म्हणून आवडते आणी माहितीप्रद असल्याने लिखाणही छान वाटते. लिहीत रहा.

तेच तेच खाणे शरीराला अपायकरक आहे हे एक वेळ मान्य म्हणून कंटाळा येतो हे ही एकवेळ मान्य .पण गाण्याचा, साहित्याचा, सुगन्धाचा आनंद व खाण्याचा यात फरक आहे. खाणे हे शरीराशी संबंध जास्त ठेवते या उलट गाण्याचे .सबब अतिवाचनाने डोळा बिघडतोच असे नाही, अति श्रवणाने कान बिघडतोच असे नाही किंवा अति सुन्गन्ध घेतल्याने नाक कामातून जाते असे ही नाही. कारण या तिन्ही आनन्दात , कर्बो , प्रोटीन ,मेद , आम्लधर्मीय अल्कधर्मीय अशी गुंतागुंत नाही .सबबी दुःखाचे गाणे ही माणसाला आनंदच देत असते व सुखाचेही .

चौरा,
सबबी दुःखाचे गाणे ही माणसाला आनंदच देत असते व सुखाचेही .
>>>> अहाहा ! काय माझ्याही मनातले बोललात ! एखाद्या सहलीस गेलो असता मला किशोरकुमारांची उडत्या चालीची गाणी भलतीच आवडतील. तर कधी संध्याकाळी घरी एकटाच असताना “आंसू भरी है...” सारखी गाणी, मंद प्रकाशात स्वतः अश्रू काढीत ऐकतानाही मला तितकाच आनंद होतो !

अथांग, सुंदर व अनुरूप चलतचित्रासाठी धन्यवाद. .................... आवडीच्या पदार्थांचे बेसुमार सेवन आणि लठ्ठपणा यांचा संदर्भ वर लेखात आलेला आहे. त्या अनुषंगाने एका नव्या संशोधनाची भर घालतो. खाणे आणि ‘आज’ ही प्रक्रिया अशी असते: आवडीचे खाणे >> आनंद व समाधान >> अधिकाधिक तेच खाणे >> अधिक ‘आज’निर्मिती आणि आनंद >> प्रमाणाबाहेर खात राहणे. लठ्ठपणाचे काही रुग्ण प्रचलित उपचारांना दाद देत नाहीत. त्यांना अधिक खाण्याची ‘हाव’ (crave) झालेली असते. किंबहुना त्यांना अधिक खाण्याचे व्यसन जडलेले असते. ते कमी करण्याच्या दृष्टीने काही नवे संशोधन चालू आहे. त्यात एका यंत्राच्या सहाय्याने चुंबकीय तंत्राने मेंदूला चेतवतात. असे उपचार नियमित दिल्यास मेंदूतील ‘आज’निर्मिती नियंत्रित होते, असे प्राथमिक निष्कर्ष आहेत. हे तंत्र फक्त खाण्याच्याच नव्हे तर अन्य व्यसनांच्या मुक्तीसाठीही भविष्यात उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

In reply to by हेमंतकुमार

अधिक खाण्याची आवड हा विकारच आहे .त्यात खवैया म्हणजे चवीचवीने खाणारा असेल तर विचारूच नका ! अशा या विकारावर गॅस्ट्रिक बँड ऑपरेशन हे आता केले जाते. वाळूच्या घड्याळाप्रमाणे जठराला रबर बॅण्ड लावून दोन भाग केले जातात . वरील भागातील अन्न हळू हळू वाळूच्या घड्याळात ज्याप्रमाणे वाळू येते त्याप्रमाणे खालच्या भागात येते. वरील अर्धा भाग भरला की जठराच्या वरील अर्ध्या भागातील स्नायूंवर ताण निर्माण होतो व चेता तंतूद्वारे " लवकर" तृप्तीचा निरोप मेंदूला पाठवल्यामुळे माणासाला पोट भरल्याची भावना निर्माण होते. परिणाम असा की वजन कमी होत जाते !

In reply to by हेमंतकुमार

कुमार, तुम्ही दिलेला सिक्वेन्स आणि त्यातली 'आनंद व समाधान' ही पायरी महत्वाची आहे. हा आनंद व समाधान ही शारिर पातळीवर एक संवेदना असते जी शरिरात होणार्या बायोकेमीकल प्रोसेसमुळे होते. जनरली ही संवेदना शारिरीक पातळीवर आपल्याला जाणवत नाही कारण आपण त्याबाबतीत अनभिज्ञ असतो. ह्या संवेदनांवरच्या रिअ‍ॅक्शन ह्या दोन मुलभूत प्रकारच्या असतात, ‘हाव’ (craving) आणि 'तिरस्कार' (aversion). ही रिअ‍ॅक्शन मनाच्या कंडीशनिंगवर (संस्कारांवर) हाव किंवा तिरस्कार हे रूप घेते. ही संवेदना होते हे समजणं आणि ती होतेय हे कळल्यावर तिच्यावर रिअ‍ॅक्ट न होणं ह्याचा सराव त्या संवेदनेवर रिअ‍ॅक्ट होणं ह्याचं निर्मूलन करू शकते. कारण ह्यात मनाचं कंडीशनिंग किंवा मनावरचे संस्कार पुसले जातात. तुम्ही म्हणताय तो उपचार नियमित दिल्यास मेंदूतील ‘आज’निर्मिती नियंत्रित होते पण हे फक्त त्या संवेदनेचं सप्रेशन किंवा दाबून टाकणं होइल. मनाचं कंडीशनिंग किंवा मनावरचे संस्कार तसेच राहणार आणि उपचारांमधील नियमितता कमी झाल्यास ते परत जोराने उफाळून येतात. - (नैसर्गिक उपचार भावणारा) सोकाजी

या लेखात वेदना हा शब्द शारिरिक वेदना या अर्थाने आहे.

कुमार सर, 'आज' निर्मिती बोर्डाच्या ह्या परीक्षेत पाच पैकी चार विषयांत (पहिला विषय-दमदार व्यायाम सध्या ऑप्शनला टाकला आहे😀) १०० पैकी १०० गुण मिळवून तुमचा हा विद्यार्थी सरासरी ८०% गुणांनी उत्तीर्ण झाला आहे 🙏 नेहमीप्रमाणेच सहज सोप्या भाषेतील माहितीपूर्ण लेख आवडलाच, त्याचबरोबर गुणतालिका पाहून माझ्या सतत आनंदी राहण्या मागचे रहस्यही उलगडले! धन्यवाद.

टर्मिनेटर,
“आज' निर्मिती बोर्डाच्या ह्या परीक्षेत पाच पैकी चार विषयांत तुमचा हा विद्यार्थी सरासरी ८०% गुणांनी उत्तीर्ण झाला आहे”
>>>>>>> त्याबद्दल अर्थातच तुमचे हार्दिक अभिनंदन ! असेच असंख्य विद्यार्थी या परीक्षेत अधिकाधिक गुणांनी उत्तीर्ण होवोत ही इच्छा. खास ‘आज’च्या जमान्यातील या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून एक. गेले ३ दिवस तुम्ही अंकाच्या अनुक्रमणिकेनुसार ओळीने प्रत्येक धाग्यास मनापासून जे प्रतिसाद देत आहात त्याबद्दल कौतुक व प्रशस्तीपत्र !

In reply to by हेमंतकुमार

प्रशास्तीपत्रा साठी आभार! मिपाकर लिहितातच इतकं छान की त्याला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. प्रत्येक वेळी हे शक्य होतेच असे नाही म्हणून गेल्या वर्षापासून निदान दिवाळी अंका पुरता तरी क्रमाने वाचनाचा आणि प्रतिसाद देण्याचा निश्चय केलाय...

लेख आवडला खुप छान माहिती मिळाली. मानसशास्त्र हा एकेकाळचा आवडीचा विषय.

आनन्दी ठेवणारी रसायने जर आपण इन्जेक्शन मार्फत वा अन्य प्रकारे शरिरात घेतली तर आपण आनन्दाचे मॅनेजमेन्ट करु शकु ही गोष्ट शक्य आहे का?

बरखा, धन्यवाद. प्रकाश,
आनन्दी ठेवणारी रसायने जर आपण इन्जेक्शन मार्फत शरिरात घेतली तर …
. >>>>> चांगला प्रश्न. पण उत्तर नकारार्थी आहे. जर ‘आज’ इंजेक्शनद्वारा घेतली तर पुढील अडचणी येतात: १. रक्तातच त्यांचा बराचसा चयापचय होऊन निचरा होतो, आणि २. रक्तातून त्यांचा मेंदूत शिरकाव अवघड असतो.

लेख झकास. आनंदी राहण्याचा नेहेमीच प्रयत्न करतो, राहतोही. :-)

तुमच्या लेखनाने ज्ञानात भर पडते. त्यामुळे नेहमी तुमचं लेखन सवडीने आणि शांतपणे वाचत असते. कारण माझ्यासाठी तरी तुमचे हे सगळे लेखन म्हणजे एक प्रकारचा अभ्यासच आहे. असे उत्तम लेख लिहून आमच्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद.

अनिंद्य आणि श्वेता, तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या नियमित प्रतिसादामुळेच वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याची स्फूर्ती मिळते. धन्यवाद !

नेहमीप्रमाणे हाही लेख सुरेख. आपल्या लेखांतून नेहमी अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती देत असता, त्याबद्दल खूप आभार. शंका: डोक्याला तेल लावण्याचा आणि 'आज' चा संबंध आहे का? कपाळावर गंध किंवा कुंकू रेखण्याच्या (टिकली लावण्याच्या नव्हे) प्रथेमागे पिट्युटरी ग्रंथीला चालना मिळावी हा मूळ हेतू होता, हे एक ऐकिवातलं ज्ञान या अनुषंगाने आठवलं.

In reply to by स्मिताके

हे जग अतिषय विस्मयजनक आहे हे च ख रे. कुमारजी नुकतेच एक मिपाकरांचे लिखाण वाचनात आले ते पुन्हा पुन्हा म्हणत होते काळ वेळ वगैरे काही अस्तित्वात नाही, तो एक भास आहे, त्याचे स्पष्टीकरण आपण वरील विज्ञानातून कसे करू शकाल ?

स्मिताके, धन्यवाद.
डोक्याला तेल लावण्याचा आणि 'आज' चा संबंध आहे का?
>>>>> माझ्या मते तरी नाही ! आधुनिक वैद्यकाच्या अभ्यासात तरी वाचनात आलेले नाही.

वाचला लेख. उत्तम प्रकारे सोदाहरण समजावून सांगितले आहे. मन चंगा तो सब चंगा वाचनखूण साठविली आहे खुशालचेंडू नाखु पांढरपेशा

जॉन, मी बापडा यावर काय बोलणार ? आरोग्यविज्ञान ही माझी मर्यादा ! … ** नाखु, मन चगा>>>> + ११ धन्यवाद

लठ्ठपणाचे काही रुग्ण प्रचलित उपचारांना दाद देत नाहीत. त्यांना अधिक खाण्याची ‘हाव’ (crave) झालेली असते. किंबहुना त्यांना अधिक खाण्याचे व्यसन जडलेले असते
व्यसन या बाबत माझे निरीक्षण असे आहे की , शरीरात एखादा बाह्य घटक घुसला तर शरीर तो बाहेर टाकून द्यायचा प्रयत्न जोमाने करते निसर्गाचाच तो गुणधर्म आहे. पण मनाचा धर्म वेगळा आहे ते उत्क्रांत व्हायला बनले आहे तसेच ते सूक्ष्मही आहे...म्हणून मन शरीराच्या नेमके उलट म्हणजे मन हे सतत नव नवीन गोष्टी हुडकणे व सामावून घ्यायला बनलेले आहे. आणी हे अनुभव स्मृतींच्या द्वारे ते स्वतःचा भागही बनवते, समजते. आता या स्मृती जर सुखदायक संवेदना असतील तर आपण त्या पुन्हा पुन्हा निर्माण करतो, आणी या तात्पुरत्या उत्तेजना क्रेविंगच्या नादात आपल्या मनामधे आपण एक बाहय गोष्ट घुसवत आहोत याचे भानही आपल्यास नसते. जी गोष्ट घडून नये म्हणून शरीराबाबत आपण इतकी काळजी घेतो तितकाच निष्काळजीपणा मनाबाबत आपण बाळगतो. आणी समाविष्ट करून घेण्याच्या स्वभावामुळे मनाला व्यसनाचा भोग हे त्याचेच एक नैसर्गिक नियमीत अंग वाटू लागते आणी ते मिळाले नाही की ते गोंधळून जाते आणि अस्वस्थ होते, हेच व्यसन होय असे मला वाटते.

In reply to by जॉनविक्क

जॉन, मन आणि व्यसनाचा संबंध तुम्ही अचूक मांडला आहे. विश्लेषण आवडले.

In reply to by हेमंतकुमार

तिटकारा असूनही तेंव्हा मला तंबाखू का खावीशी वाटते आहे याचे कोडे अजिबात सुटत न्हवते मग लक्षात आले, की मनाला तंबाखू खाऊन झाल्यावर निर्माण होणाऱ्या जाणीवा या त्याच्या उत्क्रांतीचा भाग म्हणून समजत असे व वानवा होउ लागली की ते त्याचा एखादा नैसर्गिकरित्या विकसीत झालेला भाग मिसिंग आहे असा समज करून पुढील तल्लफ गोंधळ निर्माण करत असे त्यावेळी वरील निरीक्षण झाले, ते माझ्यापुरते मर्यादित आहे, पण यातून आपण चांगल्या व वाईट सवयी आपल्याश्या का करतो याबद्दल माझ्यापुरते बरेच स्पष्टीकरण मला मिळाले.

In reply to by जॉनविक्क

सर्वच बाह्य पदार्थ शरीर बाहेर टाकायचा प्रयत्न करीत नाही. फक्त बायोलॉजिकली " परका" च टाकून द्यायचा प्रयत्न करते. किंवा त्याला ठार मारायचा प्रयत्न करते. अन्न हा ऑर्गोनिझम नव्हे त्यामुळे अन्नास शरीर परके मानीत नाही व असे परके ना मानलेले अन्न चरबीच्या रूपाने साठविले जाते. बाकी व्हायरस ,बुरशी, बॅक्टेरिआ ,परासाईट यांची ( डेब्री ) विल्लेवाट लावली जाते. न पचलेले अन्ना ची तीच अवस्था !

In reply to by चौकटराजा

शरीर अन्नही बाहेर टाकते, मूठभर मीठ वाढवा बरे,प्रमाणात आहे म्हणून त्याचा अवरोध जाणवत नाही इतकेच. तसेही शरीराला अन्न जर बाहेर टाकायचे नसते तर पचनसंस्थाच.... असो, चरबी शरीराचा भाग आहे म्हणून ते परके नाही पण त्याला आपले बनण्याची सत्वपरीक्षा ही पास व्हावीच लागत असावी ना ?

'आज’ आणि झोप यांचा संबंध असतो का, असा एक प्रश्न व्य नि तून आला आहे. तो महत्वाचा असल्याने इथेही घेतो: …. दिवसाच्या २४ तासांत असे दिसते की ‘आज’ची पातळी रात्री १० ते पहाटे ४ या काळात न्यूनतम, तर पहाटे ४ ते सकाळी १० मध्ये सर्वोच्च असते. अपुरी झोप आणि आज या बाबतीतले संशोधन सुस्पष्ट नाही. त्याबद्दल उलटसुलट मते आहेत. किंबहुना झोपेच्या संदर्भात सिरोटोनिन आणि अन्य काही रसायने अधिक महत्वाची आहेत. आज हे व्यायामाशी अधिक संबंधित आहे. खूप व्यायाम संध्याकाळी केला असता आजची पातळी बरीच वाढते. त्यामुळे काहींना झोप लागण्यात अडचण येऊ शकते.

एव्हाना बहुतेक इच्छुकांचा लेख वाचून झाला असावा. म्हणून समारोपाचा हा प्रतिसाद. यंदाच्या दिवाळी अंकासाठी काय लिहावे याचा विचार ऑगस्टमध्ये करत होतो. लेख आरोग्यासंबंधी असावा पण कुठल्या आजाराबद्दल नको असे मनाशी ठरवले होते. आनंदाच्या सणाचे वेळेस आनंदाशी संबंधित लिहावे असे मनात आले. Endorphins वर विचार करताना एकदम त्यासाठी मराठी शब्द सुचला - आनंदजनके. तो क्षण माझ्यासाठी सर्वात आनंदाचा होता. पुढे माहितीचे संकलन आपसूक घडले. ते निव्वळ टंकनश्रम. लेख आपल्याला पसंत पडला याचे समाधान आहे. सर्व वाचक, प्रतिसादक, संपादक आणि मालक या सर्वांचे या छान अंकाबद्दल आभार !

लेख आवडला.

या लेखात शस्त्रक्रियेदरम्यान संगीताचा वापर याचा उल्लेख आहे. आता यापुढची भन्नाट घटना बघा: एका रुग्णाच्या मेंदू-शस्त्रक्रियेदरम्यान खुद्द ती स्वतः व्हायोलिन वाजवत आहे ! बातमी : https://futurism.com/watch-play-violin-during-brain-surgery

संगीताचा रोगोपचारासाठी वापर या विषयावर वैद्यकात आता बऱ्यापैकी संशोधन होत आहे. एका संशोधनात कर्करोगाच्या रुग्णांवर संगीत उपचार करण्यात आले. त्यातून काही कालावधीसाठी त्यांच्या वेदना, चिंता व नैराश्य कमी झाले असा निष्कर्ष आहे. अर्थात असे संशोधन अधिक व्यापक होण्याची गरज आहे. अमेरिकेतील Mount Sinai येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात Iain Forrest या विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली Music at Bedside हा उपक्रम रुग्णालयांमध्ये राबवला जातो.

सुंदर लेख! कुमारजी pituitary gland विषयक लेख लिहिला आहे का? शोधलं पण तुमच्या लेखनात सापडला नाही.

In reply to by Bhakti

धन्यवाद.
pituitary gland
नाही. फक्त त्या ग्रंथीवर वेगळा लेख लिहिलेला नाही

In reply to by mayu4u

होतो तर . आवडीचे कुठलेही 'काम' केल्याने जो आनंद व समाधान मिळते त्यातून 'आज' निर्मिती होते. .. उत्तर द्यायला उशीर झालाय. क्षमस्व !

काही आरोग्य समस्यांसाठी संगीताचे उपचार करणे यावर निरंतर संशोधन चालू आहे. अलीकडेच स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर असे संगीतोपचार एका संशोधन प्रकल्पात करण्यात आले. The jena project या नावाने ओळखला जाणारा प्रकल्प 2018 ते 2021 या कालावधीत जर्मनीत पार पडला. संशोधनासाठी निवड झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णांना मनापासून आवडणाऱ्या संगीताची माहिती काढण्यात आली. त्यानंतर या सर्व रुग्णांना नियमित स्वरूपात संबंधित संगीत ऐकवण्यात आले. संशोधनाचे निष्कर्ष बऱ्यापैकी आशादायक आहेत. बऱ्याच रुग्णांमध्ये त्यांचे आवडते संगीत ऐकल्याने त्यांच्या तारुण्यातील संबंधित प्रसंगाची आठवण जागृत झाली. काही रुग्णांचा मूड सुधारला तर अन्य काही अधिक बोलके झाले.

यांचा परस्परांशी काही संबंध आहे का? संशोधनातून तसे कांहीं सिद्ध झाले आहे कां असा मध्ये कधीतरी एकदा डोक्यात किडा वळवळला. याचे उत्तर आपणांशिवाय कोण देऊं शकेल?

In reply to by सुधीर कांदळकर

Endorphins आणि त्यांच्यासारखीच अन्य रसायने यांचा प्रतिकार यंत्रणेमध्ये काही वाटा असावा असे गृहीतक बऱ्याच वर्षांपूर्वी मांडले गेलेले आहे. या संदर्भात त्यांचे कार्य असे असू शकेल: १. अँटीबोडीजच्या निर्मितीला मदत करणे २. लिम्फोसाइट्स या पांढऱ्या पेशींच्या कार्यांत मदत करणे . अर्थात या मुद्द्यावरील अलीकडील संशोधन फारसे वाचायला मिळत नाही. चांगला संदर्भ वाचनात आल्यास यथावकाश अधिक बोलता येईल.

लौकरच तसे कांही आपल्या हाताला लागेल अशी आशा आहे.

In reply to by सुधीर कांदळकर

या विषयावर जरा अधिक धांडोळा घेतला तेव्हा असे लक्षात आले की अद्यापही ‘आज’च्या संदर्भातील बरेचसे संशोधन प्राण्यांच्या पातळीवरच चालू आहे. तूर्त असे म्हणता येईल की : १. “आज”ना सर्वसाधारणपणे दाहप्रतिबंधक गुणधर्म आहे विविध दाहप्रक्रियांच्या वेळेला जी दाहकारक रसायने शरीरात निर्माण होतात त्यांना दाबण्याचे काम ते करू शकतात. २. अँटीबोडीज निर्मितीच्या बाबतीत आजचा गुणधर्म परस्परविरोधी दिसून आला आहे- काही प्रसंगी ते त्यांना वाढवतात तर अन्य काही प्रसंगी त्यांची निर्मिती कमी करतात.