मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वरराधा

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
काव्यरस
भैरव वा भटियार पहाट फुलवत येती, स्पर्श जणू कान्ह्याचे राधेला उठवुन जाती. ठाऊक तिला सारंग माध्यान्ही झुलवत येतो, "गंध" न त्यास स्वत:चा तरि वृंदावनी घमघमतो. यमन असा कान्ह्याचा यमुनेचे श्यामल पाणी. निनाद गोघंटांचा सांज करी कल्याणी. मालकंस वा जोग, अमृत बरसे गात्री. कान्ह्याच्या ओठी वेणू तिच्याचसाठी रात्री. कणकणात भिनली आहे मल्हाराची आस, मेघ पेटवून जातो मयूरपंखी प्यास. पण सूर भैरवीचा का राधेला माहीत नाही? युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..

वाचने 4981 वाचनखूण प्रतिक्रिया 9

राघव 23/08/2019 - 12:35
चांगली कल्पना. अर्थात् "प्यास" हा शब्द खटकला. :-) अवांतरः जिला ध्यानी-मनी-जीवनी केवळ कृष्णच सगळं आहे, तिला अजून कशाची वाट बघावी लागणार? असा प्रश्न मनांत डोकावून गेला.

जालिम लोशन 23/08/2019 - 23:47
ज्या मुलीची कृष्णजन्मानंतर कंसाच्या तुरुंगात अदलाबदल केली तिला काय वाटले असेल या भावनेवर पण एक कविता करा.

सुरेख जमली आहे. दिल बाग बाग हो गया... अडकलेला बोळा निघून पाणी मोकळे झाले आणि पुन्हा खळखळा वाहू लागलेले दिसते आहे. हा निर्झर असाच खळाळत राहो ही सदिच्छा... पैजारबुवा,

माहितगार 24/08/2019 - 08:57
प्राची अश्विनींच्या गाण्यांमधल्या राधेच्या लोभाची उधळण पाहून कृष्णालाही कृष्णाचा हेवा वाटेल, आम्हाला फक्त राग-लोभातले राग समजतात, प्राची अश्विनींच्या कवितेतले राग समजले नाही तरी त्या रागात फक्त कृष्णावरचा लोभ असतो हे माहित असल्याने फरक पडत नाही.