Skip to main content

एक्सपायरी डेट.

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 31/10/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
रेशमी साड्यांच्या बासनात मोरपिशी साडीच्या घडीत अलगद ठेवलेलं, ते पत्र.. तिथून बाहेर नाही काढत कधी हलकेच चाचपडते अधूनमधून त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे... त्यातला शब्दंशब्द पाठ आहे लिहून खोडलेला , पाण्याने पुसटलेला... किती मिनतवा-या. हट्ट, रुसवे फुगवे काय अन् काय हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी.. आपल्यामधे जे काही होतं नव्हतं, (नव्हतं तेच जास्त खरंतर) ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र... तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव (ते तेव्हांही खटकलेलं थोडं) एका अधमु-या नात्याची एकमेव खूण.. का कोण जाणे पण आज अचानक वाटलं, हर रिश्ते की एक उमर होती है तशी, पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?
लेखनविषय:

वाचने 5308
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

खूपच छान. 'मेरा कुछ सामान...' ची आठवण करून देणारी कविता. जी कधी रुजू शकली नाहीत अशा नात्यांच्या वाळलेल्या रोपांची कलेवरं किती काळ पुस्तकाच्या पानात जपून ठेवायची, असा प्रश्न एक दिवस पडतोच कधी ना कधी. आठवणींना एक्सपायरी डेट नसेल कदाचित, पण विस्मृतीचा अभिशापतरी असावाच.

पत्राला पण एक्सपायरी डेट असते का? असायला हवी खरतर. लेट गो करणं सोपं नसतं पण आवश्यक असतं. कविता आवडलीच.

एक्सपायरी डेट हवीच तर प्रत्येक गोष्टीला. रेणुका शहाणेने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल लिहिले होते की,"it died it's natural death" तेव्हा अंगावर चरचरून काटा आला होता, पण गोष्ट, नाते संपणे आणि पुढे चालू लागणे अपरिहार्य असते. अपरिहार्यतेच्या दु:खासाठी विस्मरण हा अभिशाप नव्हे तर वरदान आहे. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन उसे इक खूबसुरत मोड देकर छोडना अच्छा।

आपल्यामधे जे काही होतं नव्हतं, (नव्हतं तेच जास्त खरंतर) ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
आवडलं लिहिलेलं... कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये नसतेच ती गम्मत किंवा तो आपलेपणा जो माणूस शोधत असतो अशावेळी ती गोष्ट संपणेच योग्य असते. तरच एखाद्या नव्या गोष्टीला सुरुवात करता येते. नाहीतर ती रखडलेली नाती ना पुढे जाऊन देतात ना जवळ असल्याचा आनंद देतात... नातं संपले कधी हे माहित असणे तसे भाग्याचे म्हटले पाहिजे, नाहीतर काही नात्यांचे धागे इतके विरत जातात कि ते कधी तुटून गेले हे देखील कळत नाही... ज्या व्यक्तीबरोबर आपण कुठल्या तरी नात्यात होतो ते नाते कधी संपून गेले याची काहीच आठवण नसणे जास्त त्रास देते!

छानच हं ! एकदम पटलं. आपल्यामध्ये काही नव्हतं हे वेळीच ध्यानात येणं हे महत्वाचं. तरीही ते जपून ठेवणं हा कुठला तरी नाजूक धागा मोरपिशी साडीच्या धाग्यासारखाच नाही का ?

काही ओळी अगदी मर्मभेदी! ज्यांना फुलही रुतून जखमा झालेल्या असतात, त्यांनाच कळेल या ओळींचे मर्म. जुन्या जखमा जाग्या झाल्या!

खुपच चटका लावून जाणारी कविता. छान. एकच म्हणेन " उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या" पत्राला एक्पायरी डेट असेल, पण ठसठसत्या जाणीवेचे काय ?

साहिर लुधियानवींची चलो "इक बार फिर से अज़नबी बन जाएँ हम दोनों" कविता आठवली..

गदीमांच्या गीतरामायणातल "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे एक उल्लेखनीय गीत आहे. त्यात सागरातल्या दोन ओंडक्यांची कल्पना कोणतीही दोन नाती एका अर्थाने क्षणिकच असतात हे सांगते. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा - 6 नको आसू ढाळू आता, पूस लोचानास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास... प्रॅक्टीकली माणसे अशीच वागत असावीत. व्यक्तीशः मीही असाच वागतो -तुकारामांच्या गाथेतील "तेलणीशी रुसला वेडा" प्रमाणे - अहं ही फार स्ट्राँग गोष्ट असते , पण तरीही माणसांच्या पुन्हा भेटण्याची शक्यता थेरॉटीकली शिल्लक असते. सांगरातील लाटेने दुरावलेली ओंडकी पुन्हा एखाद्या लाटेने पुन्हा भेटणारच नाहीत हेही कसे सांगावे. मानवाचा पुत्र पराधीन असल्याचे सांगणार्‍या गदींचा राम भरताशी वनवासानंतर पुन्हा भेटतोच. रोज कितीतरी माणसे भेटून विस्मृतीत जातात , त्या सर्वांबद्दल केवळ दोन ओंडकी जवळ आली म्हणून तुम्ही कविता लिहिता का ? समजा की पाण्याचा ग्लास पूर्ण रिकामा झाला आहे पण कुठेतरी ओल असल्या शिवाय तो रिकामा ग्लासही आठवतो का ? प्रॅक्टिकली माणसे दुरावतात हे मान्य पण थेअरॉटीकली समहाऊ व्यक्तिशः हि शक्यता शिल्लक राहते हे स्विकारणे अधिक रास्त वाटते. (अर्थात हे लिहिताना नात्यांच्या एकाच प्रकारचा मी विचार करत नाही तर विभीन्न नात्यांचा विचार करतो आहे)

In reply to by माहितगार

बापरे, तुम्ही फारच philosophical झालात. अर्थात तुमचा मुद्दा पण बरोबर आहे म्हणा.

In reply to by प्राची अश्विनी

बापरे, तुम्ही फारच philosophical झालात. अर्थात तुमचा मुद्दा पण बरोबर आहे म्हणा.
तसं नाही मगच्या एका मिपाधागा चर्चेतला एक मुद्दा कदाचित खूप लिहूनही मला नीट कव्हर करता आला नव्हता तो यावेळी आपल्या कवितेला प्रतिसादाच्या निमीत्ताने कमी शब्दात आधीपेक्षा बरासा जमतोय असे वाटते ;). एका मुलीने एका बापाला सर्व हेवेदावे सोडून भेटले पाहीजे अशी माझी भूमिका मिपाकराम्च्या कोण टिकेचा भाग झाली होती. असो.