Skip to main content

त्यांना हे जमत कसं..?

लेखक Pradeep Phule यांनी सोमवार, 27/03/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा माझा हा पहिला लेख. पण विषय कोणता निवडावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर आं वासून उभा होता. कारण मिपावर सर्व विषयांवर भरपूर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. शेवटी विषय मिळालाच. ज्यांच्या कविता वाचून मी मोठा झालो, त्यांनाच निवडावं असं ठरवलं. यांच्या शिवाय मराठी साहित्य संस्कृती अपूर्ण आहे, असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे "बहिणाबाई चौधरी". लिहायला सुरवात तर केली, पण शब्द मात्र ययातीतल्या अलका सारखे गट्टी फु करून बसलेत. माझं प्रत्येक वेळी असचं होतं, कोरा कागद समोर आला कि डोकं कसं अगदी बधिर होऊन जातं. आणि त्यांच्या बद्दल मी काय लिहावं. त्या म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहेत. बहिणाबाई शाळेत गेल्या नाहीत, पण त्यांना आयुष्याच्या शाळेने खूप काही शिकवलं. आणि तेच त्यांनी त्यांच्या कवितांमधून मांडलं. मी शाळेत असताना त्यांच्या कविता असायच्या, पण त्यावेळेस त्यांचा अर्थ कळायचं नाही. फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवायचे हा एकमेव हेतू असायचा. पण आता त्यांच्या कविता आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात. त्यांच्या शब्दांचे अर्थ कळी उमलावी तसे उमगत जातात. पण मला एक प्रश्न पडतो कि त्यांना हे जमत कसं? आपण म्हणतो ना ते "जे नं देखे रवी, वो देखे कवी" देवाने अशा लोकांना काही वेगळा रसायन तयार करून पाठवला असणार असं मला वाटतं. बहिणाबाई म्हणजे मराठी साहित्य संस्कृतीला पडलेले एक सुंदर स्वप्न.आयुष्य जगत असताना त्यांना जे काही अनुभव आले, ते त्यांनी किती नाना तर्हेने त्यांच्या कवितांमधून मांडलेले आहेत.निसर्गाचं एक अनोखं दर्शन बहिणाबाईंच्या कवितांमधून घडतं. त्यांची एक कविता मला खूप आवडते. "अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी तिनं, झोका झाडाले टांगला खोपा इनला इनला,जसा गिलक्याचा कोसा पाखरांची कारागिरी, जरा देख रे माणसा तिची उलूशीच चोच, तेच दात,तेच ओठ तुले दिले रे देवाने,दोन हात दहा बोट..." माणूस एक नं दहा गोष्टींबद्दल सतत तक्रार करत असतो. पण बहिणाबाई म्हणतात कि हि सुगरण बघा, तिला देवाने इवलीशी चोच, आणि इवलेसे ओठ दिले आहेत, पण तरीही किती सुरेख पद्धतीने तिने तिचा खोपा तयार केला आहे. आणि माणसाला देवाने दोन हात आणि दहा बोट दिली असूनही तो मात्र नेहमी तक्रार करत असतो. आयुष्याच्या पायवाटेवरून चालत असताना कधी कधी पायाला ठेच लागतेच, मग त्यांच्याच कविता सोबतीला येतात, "नीट जाय मायबाई नको करू धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड! "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4900
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

पहिलाच प्रयत्न सुरेख

मी शाळेत असताना त्यांच्या कविता असायच्या, पण त्यावेळेस त्यांचा अर्थ कळायचं नाही. फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवायचे हा एकमेव हेतू असायचा. पण आता त्यांच्या कविता आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात. त्यांच्या शब्दांचे अर्थ कळी उमलावी तसे उमगत जातात.
छान लिहिलंय.

बहिणाबाईंनी गुढीपाडव्यासाठी लिहिलेल्या या ओळी:

'गुढी उभारनी'

गुढीपाडव्याचा सन आता उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनातली आढी गेलं सालं गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा कसे पडले घोरत असे निस्सयेलावानी हां हां म्हनता गेला रे रामपहार निंघूनी आता पोथारा रे घर सुधारा रे पडझडी करीसन सारवन दारी उभारा रे गुढी चैत्राच्या या उन्हामधी जीव व्हये कासाईस रामनाम घ्या रे आता रामनवमीचा दिस पडी जातो तो ‘पाडवा’ करा माझी सुधारनी आता गुढीपाडव्याले म्हना ‘गुढी उभारनी’ काय लोकांचीबी तर्‍हा कसे भांग घोटा पेल्हे उभा जमीनीच्या मधी आड म्हनती उभ्याले आसं म्हनू नही कधी जसं उभ्याले आडवा गुढी उभारतो त्याले कसं म्हनती पाडवा....

In reply to by जव्हेरगंज

त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या आणि आचार्य अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला असं वाचलंय बऱ्याच ठिकाणी...