✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे

स
स्पार्टाकस यांनी
Fri, 12/23/2016 - 19:13  ·  लेख
लेख
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणापासून ते अरुणाचलच्या जंगलापर्यंत पसरलेल्या भारतासारख्या विशाल देशाला एकत्रं आणणार्‍या ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्या म्हणजे भारतीय सैन्य, राजकारण आणि क्रिकेट! भारतीय सैन्य हा उभ्या देशाच्या अत्यंत आदराचा तर राजकारण हा सामान्यतः तिरस्काराचा विषय.परंतु दहा वर्षांच्या पोरापासून ते जराजर्जर म्हातार्‍यांपर्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चवीने चघळण्याचा विषय म्हणजे क्रिकेट! भारताचा राष्ट्रीय खेळ भले हॉकी असला आणि ऑलिंपिकमध्ये भारताने त्यात सुवर्णपदकं पटकावलेली असली, लिएंडर पेस - महेश भूपती यांनी ग्रँडस्लॅम जिंकले असले आणि अभिनव बिंद्रा, राजवर्धन राठोड, मेरी कोम, सिंधू आणि अनेक कुस्तीपटूंनी ऑलिंपिक मेडल्स जिंकली असली तरी भारतीयांना क्रिकेटइतकं दुसरं कशाचंही वेड नाही! पैसा आणि ग्लॅमर यांच्याबाबतीत इतर सर्व खेळांवर क्रिकेटने मात केली आहे. जगभरात पसरलेल्या प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या काही खास आठवणी असतात. कधी एक इनिंग्ज, फास्ट बॉलर किंवा स्पिनरचा खतरनाक बॉलिंग स्पेल, कधी कॅप्टनच्या चाणाक्षपणाची चुणूक तर कधी एखादा तोंडावर आपटवणारा निर्णय, कधी दोन खेळाडूंमधलं स्लेजिंग तर कधी मॅचपूर्वी किंवा मॅचनंतर केलेली एखादी कॉमेंट, कधी एखादी आख्खी संस्मरणीय मॅच.. अशा अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे तरी घर करुन असतात. बहुतांशी या आठवणी सुखद असल्या तरी अनेकदा हातात आलेली मॅच गमावल्यामुळे पदरी निराशा येणार्‍या असतात तर कधी कधी फिल ह्यूजच्या दुर्दैवी मृत्यूसारख्या चटका लावणार्‍याही असतात. मी क्रिकेटमध्ये इंट्रेस्ट घेऊन मॅच पाहण्यास सुरवात केली ती १९८५ मधल्या ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड सिरीज कप पासून. १९८३ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्याचं महत्वं कळण्याइतकं माझं वय नव्हतं (वय वर्ष ८)! परंतु वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा वर्ल्डकपच्या ट्रॉफीसह एक पोर्टरसाईझ फोटो बाबांनी विकत घेऊन दिलेला मला आठवतो. त्या फोटोत अजिबात ओळख नसलेला एक खेळाडू म्हणजे सुनिल वालसन! वर्ल्ड कपमधली एकही मॅच न खेळता लखपती झालेला नशिबवान माणूस! मात्रं १९८५ मध्ये भारताने जिंकलेली ही वर्ल्ड सिरीज आणि रवी शास्त्रीला मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळालेली ऑडी कार आजही लख्खं आठवते! अशीच एक आठवण १९८७ मधल्या पाकिस्तान संघाच्या भारतीय दौर्‍यातल्या चौथ्या टेस्टची. ही टेस्ट म्हणजे पाकिस्तानी बॅट्समन प्रेक्षकांचा किती अंत पाहू शकतात याची परिक्षा होती. टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर पाकिस्तानने पहिल्या इनिंग्जमध्ये ३९५ रन्स काढण्यासाठी तब्बल १८८ ओव्हर्स बॅटींग केली होती! पाकिस्तानी बॅट्समनच्या या कासवछाप बॅटींगला प्रेक्षक वैतागले होतेच, पण त्यापेक्षा सर्वांना जास्तं उत्सुकता होती ती सुनिल गावस्कर बॅटींगला येण्याची. सुमारे साडेतीन तासात ५७ रन्स काढल्यावर गावस्करने एजाज फकीच्या बॉलवर लेट कट मारुन ५८ वी रन काढली... अहमदाबादच्या स्टेडीयमधे फटाक्यांचा कडकडाट झाला आणि आसेतुहिमाचल भारतात टाळ्यांचा पाऊस पडला! अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, जोएल गार्नर, कॉलिन क्रॉफ्ट, माल्कम मार्शल, डेनिस लिली, जेफ थॉमसन, जॉन स्नो, बॉब विलीस, इयन बोथम, डेरेक अंडरवूड, इमरान खान, सर्फराज, सिकंदर बख्त अशा जगभरातल्या बॉलर्सना स्ट्रेट ड्राईव्हने नामोहरम करत गावस्करने टेस्ट क्रिकेटमध्ये १०००० रन्सचं एव्हरेस्ट गाठलं होतं! १९८७ मध्येच रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये नवज्योत सिंग सिद्धूने पहिल्याच वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मद्रासला मारलेल्या पाच सिक्स आणि चेतन शर्माने न्यूझिलंडविरुद्ध घेतलेली हॅटट्रीक या आणखीन दोन अविस्मरणीय आठवणी. त्याआधी चेतन शर्माने एकदा चक्क चौथ्या नंबरवर बॅटींगला येऊन वनडे मध्ये सेंच्युरी ठोकलेलीही आठवते. हातात असलेला वर्ल्डकप गमावणारा माईक गॅटींगचा रिव्हर्स स्वीपही आठवतो, पण त्यापेक्षा दु:खदायक आठवण म्हणजे सेमीफायनलमध्ये आरामात खेळत असलेल्या चंद्रकांत पंडीतला एलबीड्ब्ल्यू देणारा अंपायर टोनी क्राफ्टरचा साफ चुकीचा निर्णय. परंतु त्या वर्ल्डकपमधली डोक्यात घर करुन राहिलेली एक आठवण म्हणजे न्यूझीलंड - झिंबाब्वे मॅचमधली. न्यूझीलंडच्या २४२ रन्सचा पाठलाग करताना १०४ /७ अशा अवस्थेत असताना डेव्हिड हौटनने मार्टीन स्नेडन, इवान चॅटफिल्ड, विली वॉटसन, दीपक पटेल, जॉन ब्रेसवेल यांची यथेच्छ धुलाई करत न्यूझीलंडच्या तोंडाला फेस आणला. हौटन आणि इयन बुचार्टच्या ११४ रन्सच्या पार्टनरशीपमुळे अद्याप टेस्ट दर्जा न मिळालेला झिंबाब्वेचा संघ न्यूझीलंडला चकवणार असं वाटत असतानाच.. मार्टीन स्नेडनचा बॉल हौटनने मिडॉनवरुन उचलला आणि नक्कीच बाऊंड्री मिळणार या हिशेबाने हौटनच काय पण हैद्राबादच्या मैदानावर असलेले प्रेक्षकांच्या नजराही लाँगऑफच्या दिशेला वळल्या, परंतु मिडॉनला असलेल्या मार्टीन क्रोची नजर मात्रं पोपटाच्या डोळ्यावर नजर रोखलेल्या अर्जुनाप्रमाणे बॉलवर पक्की होती. बाऊंड्रीच्या दिशेत धावत जात आणि झेप घेत त्याने अफलातून कॅच घेतला! हौटन अवाक् झाला! न्यूझीलंडच्या खेळाडूंचाच काय पण खुद्दं मार्टीन क्रोचाही स्वत:वर विश्वास बसला नसावा! न्यूझीलंडने अवघ्या ३ रन्सनी ही मॅच जिंकली! आजकालच्या इंटरनॅशनल मॅचेसच्या वेळापत्रकामुळे भारतीय संघातील खेळाडू फार क्वचितच रणजी किंवा दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसतात. परंतु काही वर्षांपूर्वी मात्रं रणजीत खेळण्यासाठीही खेळाडू जीवाचं रान करीत असत. केवळ बिशनसिंग बेदीचे समकालीन असल्यामुळे पद्माकर शिवलकर आणि राजिंदर गोयलची करीअर रणजीपुरती मर्यादीत राहिली. अशीच एक अविस्मरणीय मॅच म्हणजे १९९१ मधली रणजी ट्रॉफीची फायनल! वानखेडेवर झालेल्या या मॅचचं दूरदर्शनच्या दुसर्‍या चॅनलवर लाईव्ह टेलीकास्ट झालं होतं. आजही या मॅचचा शेवटचा दिवस लख्ख आठवतो.. कपिल देवच्या हरीयाणाने पहिल्या इनिंग्जमध्ये ५२२ पर्यंत मजल मारल्यावर मुंबईला ४१० मध्ये गुंडाळल्याने पहिल्या इनिंग्जमधल्या लीडच्या जोरावर मॅच ड्रॉ झाली तरी हरीयाणा रणजी ट्रॉफी जिंकणार हे नक्की होतं. हरीयाणाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये १५४ / ८ अशा अवस्थेत असताना प्रदीप जैन आणि योगिंदर भंडारी यांच्या सहाय्याने अभिषेक बॅनर्जीने मुंबईला तंगवत ८८ रन्सची भर घातली. शेवटी पाचव्या दिवशी लंचच्या आधी हरीयाणाची इनिंग्ज संपल्यावर रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईला साडेचार तासात ३५५ रन्सची आवश्यकता होती! लालचंद राजपूत, शिशीर हट्टंगडी आणि मुंबईचा कॅप्टन संजय मांजरेकर लवकर आऊट झाल्याने लंचला मुंबईची अवस्था ३४ / ३ अशी झाली होती. लंचनंतर दिलीप वेंगसरकरबरोबर खेळायला आला १८ वर्षांचा सचिन तेंडुलकर! कपिलच्या पहिल्याच बॉलवर सचिनने सरळ सिक्स मारली आणि त्यानंतर तो शब्दशः उधळला! प्रदीप जैन, योगिंदर भंडारी, चेतन शर्मा आणि खुद्दं कपिल सर्वांची त्याने अक्षरश: धुलाई करायला सुरवात केली! सचिन 'सुटल्याची' बातमी मुंबईभर पसरली आणि हा-हा म्हणता वानखेडेवर १८००० प्रेक्षकांची हजेरी लागली! दुसर्‍या बाजूने वेंगसरकर कमालीच्या थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करत होता! कपिलने सर्व प्रयत्नं करुनही सचिनला आवरणं जमत नव्हतं! वेंगसरकरबरोबरच्या १३४ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये ९६ रन्स एकट्या सचिनच्या होत्या! ७५ बॉलमध्ये ९६ रन्स झोडपल्यावर भंडारीचा फुलटॉस नेमका सचिनने कव्हरला अजय जाडेजाच्या हातात मारला! सचिन परतल्यावर वेंगसरकर - कांबळी यांनी ८१ रन्सची पार्टनरशीप केली. एव्हाना वेंगसरकरला क्रॅम्प्सचा त्रास जाणवायला लागल्याने राजपूत रनर म्हणून आला पण त्याच्या फटकेबाजीत किंचीतही फरक पडला नाही. कपिलला त्याने दोन दणदणीत सिक्स मारल्यावर मुंबई मॅच जिंकण्याचा आकांती प्रयत्नं करणार हे स्पष्टं होतं. कांबळी, चंद्रकांत पंडीत, राजू कुलकर्णी, सलील अंकोला एकापाठोपाठ एक आऊट होऊन परतले तरी वेंगसरकर मैदानात असेपर्यंत कपिललाही विजयाची खात्री नव्हती. शेवटचा बॅट्समन अ‍ॅबी कुरुविला खेळायला आला तेव्हा तो ९८ वर होता. मॅच जिंकण्यासाठी मुंबईला अद्याप ५० रन्स हव्या होत्या! अद्याप ९ ओव्हर्स बाकी होत्या. शेवट्च्या ८ ओव्हर्ससाठी कपिल आणि चेतन शर्मा बॉलिंगला येणार हे चाणाक्षं वेंगसरकरच्या ध्यानात आलं होतं. परिणाम? योगिंदर भंडारीवर त्याने अविस्मरणीय हल्ला चढवला! त्याच्या ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर त्याने साईटस्क्रीनवर सिक्स मारली. तिसर्‍या बॉलवर लेटकटची बाऊंड्री मारल्यावर चौथ्या आणि पाचव्या बॉलवर त्याने पुन्हा दोन सिक्स खेचल्या! शेवट्च्या बॉलवर एक रन काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवावा का सिक्स मारुन आणखीन रन्स कराव्या या द्विधा मनस्थितीत असताना भंडारीच्या शेवटच्या बॉलवर त्याने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह तुफान वेगाने बाऊंड्रीपार गेला! भंडारीच्या त्या एका ओव्हरमध्ये २६ रन्स निघाल्या होत्या! वेंगसरकरच्या या आतषबाजीला कुरुविलानेही तितकीच खमकेपणाने साथ देत कपिल - चेतन शर्माचे २५ बॉल खेळून काढले होते. रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईला १५ बॉलमध्ये केवळ ३ रन्सची आवश्यकता होती! कुरुविलाने चेतन शर्माचा बॉल फाईन लेगला खेळला. नॉनस्ट्रायकर एंडला असलेला राजपूत रन काढ्ण्याच्या हेतूने धावत सुटला. कुरुविलाचं अद्यापहॉ बॉलकडेच लक्षं होतं. राजपूत रन काढण्यासाठी येत असलेला पाहून भानावर आलेला कुरुविला धावत सुटला खरा पण एव्हाना उशीर झाला होता! फाईन लेगवरच्या अमरजीत केपीच्या थ्रोने कुरुविला रन आऊट झाला! कपिलच्या हरियाणाने केवळ २ रन्सनी रणजी ट्रॉफी जिंकली होती! रणजी ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात कपिल आणि हरीयाणाचे इतर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतले. कुरुविला, राजपूत आणि दोन्ही अंपायर्सही परतले, पण वेंगसरकर? स्क्वेअरलेगला वेंगसरकर आपल्या दोन्ही गुडघ्यांवर कोसळला होता! तो ओक्साबोक्षी रडत होता! कोणत्याही शब्दांनी त्याचं सांत्वन होणं अशक्यं होतं! प्रशांत देसाईने अखेर त्याची समजूत घालून ड्रेसिंग रुममध्ये आणलं पण वेंगसरकरला अश्रू आवरत नव्हते! १३७ बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि ५ सिक्ससह त्याने १३९ रन्स फटकावल्या होत्या, पण त्याच्या दृष्टीने त्या कवडीमोलाच्या होत्या! जीव तोडून प्रयत्नं करुनही रणजी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आल्याने तो अक्षरशः उध्वस्तं झाला होता. १९८६ मध्ये जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलला सिक्स मारल्यावर भारताच्या दृष्टीने शारजा म्हणजे हारजा हे समीकरण झालं होतं. पाकिस्तानची टीम उत्तम असली तरी त्यांच्या मदतीला अंपायर्सही सदैव तत्पर असत! अनेकदा तर न्यूट्रल अंपायर्स असूनही भारताविरुद्ध आणि पाकिस्तानच्या बाजूने कित्येक निर्णय दिले जात. १९९१ मध्ये अशाच खराब अंपायरींगचा फायदा उठवत अकीब जावेदने हॅटट्रीकसह भारताविरुद्धंं ७ विकेट्स घेतल्या. त्याच्या हॅटट्रीकमधल्या शास्त्री, अझरुद्दीन, तेंडुलकर या तिघांपैकी अझरुद्दीन आणि तेंडुलकरला अंपायरने सरळसरळ 'ढापलं' होतं! अझरच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल पॅडला लागला होता तर सचिनला एलबीड्ब्ल्यू देणार बॉल चौथ्या स्टंपच्याही बाहेरुन गेला असता! १९९१ च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ऑस्ट्रेलियाने टेस्ट सिरीज ४-० अशी जिंकली असली तरी या सिरीजमधली एक न विसरणारी आठवण म्हणजे सचिनची पर्थ टेस्टमधली सेंच्युरी! क्रेग मॅकडरमॉट, मर्व्ह ह्यूज, माईक व्हिटनी, पॉल रायफल, टॉम मूडी यांना फटकावत त्याने ११४ रन्स फटकावल्या पण तो भारताचा पराभव टाळू शकला नाही. ब्रिस्बेनच्या पहिल्या टेस्टमध्ये कपिलने ३ बॉलमध्ये अ‍ॅलन बॉर्डर आणि डीन जोन्सला बोल्ड करताना टाकलेले दोन अप्रतिम बॉल असेच स्पष्टपणे आठवतात. याच सिरीजमधल्या सिडनी टेस्टमध्ये रवी शास्त्री आणि सचिनने पहिल्याच टेस्टमध्ये खेळणार्‍या शेन वॉर्नची यथेच्छ धुलाई केली होती! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजनंतर १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा प्रथम सामना झाला. या मॅचमधला एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे किरण मोरे आणि जावेद मियांदादची बाचाबाची आणि त्यानंतर जावेदने मोरेची नक्कल करत मारलेल्या बेडूकउड्या! याच वर्ल्डकपच्या लीग मॅचमध्ये इयन बोथमने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे एकहाती बारा वाजवले होते! मार्टीन क्रोची दीपक पटेलला बॉलिंग आणि ग्रेटबॅचला बॅटींग ओपन करायला लावण्याची अफलातून चाल, फायनलमध्ये वासिम अक्रमने लागोपाठच्या बॉलवर अ‍ॅलन लॅम्ब आणि क्रिस लुईसची उडवलेली दांडी आणि सेमीफायनलला न्यूझीलंड संघाचं महिन्याभराचं कर्तृत्व कचर्‍यात भिरकावणारी इंझमामची इनिंग्ज सुद्धा न विसरण्यासारखी. पण मोमेंट ऑफ द वर्ल्ड कप म्हणजे जाँटी र्‍होड्सने इंझमामला रन आऊट करताना बॉलसकट स्टंप्सवर मारलेली झडप! या एका रनआऊटमुळे जागतिक क्रिकेटमधला फिल्डींगचा दर्जा आरपार बदलून गेला! टोनी ग्रेगने र्‍होड्सबद्दल काढलेले "Two-thirds of the globe is covered by water; the rest is covered by Jonty Rhodes!" हे उद्गार किती सार्थ होते हे र्‍होड्सने सिद्धं करुन दाखवलं! १९९३ मध्ये इंग्लंडचा संघ भारतीय दौर्‍यावर आला होता. गूच, आर्थर्टन, गॅटींग, स्ट्युअर्ट, रॉबिन स्मिथ असे एकापेक्षा एक बॅट्समन असल्याने आणि नुकताच ऑस्ट्रेलियात आणि वर्ल्डकपमध्ये भारत साफ अपेशी ठरल्यामुळे इंग्लंड सहज भारताला धूळ चारेल अशी बर्‍याच जणांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात अनिल कुंबळेच्या २१ विकेट्सनी इंग्लंडची अक्षरशः ससेहोलपट झाली. पण कुंबळे इंग्लंडला गुंडाळत असतानाही लक्षात राहण्यासारखा स्पेल टाकला तो मनोज प्रभाकरने. मुंबईच्या टेस्टमध्ये चार ओव्हर्समध्ये प्रभाकरने गूच, आर्थर्टन, स्ट्युअर्ट यांना अत्यंत डोकेबाजपणाने गंडवलं होतं! याच टेस्टमध्ये विनोद कांबळीने २२४ तर ग्रॅम हिकने १७८ रन्सची अप्रतिम इनिंग्ज खेळली होती. शारजाचीच आणखीन एक आठवण सांगण्यासारखी आहे. १९९४ मध्ये पाकिस्तानच्या २५० रन्सचा पाठलाग करताना सचिन, अजय जाडेजा, सिद्धू आणि अझर आऊट झाल्यावर भारताची अवस्था ८३ / ४ अशी होती. स्टेडीयममध्ये असलेल्या पाकिस्तानी सपोर्टर्सचा आवाज टीपेला पोहोचला होता. विनोद कांबळीला रन्स काढताना अक्षरशः घाम गाळावा लागत होता. मात्रं काही मिनीटांतच शारजाच्या मैदानावर अक्षरशः पिनड्रॉप सायलेन्स पसरला. याला कारण होता अतुल बेदाडे! अक्रम रझा - आमिर सोहेल यांना दोन ओव्हर्समध्ये चार सिक्स ठोकत त्याने अचानक फ्यूज उडाल्यासारखा पाकिस्तानी सपोर्टर्सचा आवाज बंद करुन टाकला! वन डे क्रिकेटमध्ये आज फिनीशर ही खास आवश्यकता मानली जाते. स्लॉग ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन रन्स वाढवणं आणि सुरवातीला विकेट्स गेल्या तर इनिंग्ज बिल्ड करणं ही फिनीशरची जबाबदारी. महेंद्रसिंग धोणी, एबी डिव्हीलीअर्स, माईक हसी हे यातले वाकबगार लोक. पण फिनीशर ही संस्था अस्तित्वात आणली ती ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बेव्हनने! कमालीच्या थंड डोक्याने आणि सुरवातीच्या विकेट्स गेल्यावर बॉलर्सना हाताशी धरुन बेव्हनने ऑस्ट्रेलियाला किती मॅचेस जिंकून दिल्या असतील याची गणतीच नाही! अशीच एक मॅच १९९६ च्या ट्रँग्युलर सिरीजमधली वेस्ट इंडीज विरुद्धची. फिनीशर म्हणून या मॅचपासूनच बेव्हनला जगभरात मान्यता मिळाली. वेस्ट इंडीजच्या १७२ रन्सचं लक्ष्यं समोर असताना कर्टली अँब्रोज आणि ओटीस गिब्सन यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था ३८ / ६ अशी करुन टाकली. रॉजर हार्परने इयन हिलीची दांडी उडवल्यावर बेव्हनने पॉल रायफलसह ८३ रन्सची पार्टनरशीप केली. मॅचच्या शेवटच्या बॉलवर जिंकायला ४ रन्स हव्या असताना थंड डोक्याने बाऊंड्री मारत बेव्हनने मॅच जिंकली! १९९६ च्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये अँब्रोज आणि इयन बिशप यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था १५ / ४ अशी केलेली असताना बेव्हननेच स्ट्युअर्ट लॉ बरोबर १३८ रन्सची पार्टनरशीप करुन ऑस्ट्रेलियाला २०७ पर्यंत पोहोचवलं होतं. रिची रिचर्ड्सन आणि शिवनारायण चँडरपॉल यांनी आरामात खेळत वेस्ट इंडीजला १६५ / २ अशा सुस्थितीत आणलं होतं, परंतु ग्लेन मॅकग्राथने चँडरपॉलला चकवल्यावर वॉर्न आणि डॅमियन फ्लेमिंगने वेस्ट इंडीजला २०२ मध्ये गुंडाळलं! रिची रिचर्ड्सन एका बाजूला नॉट आऊट राहीला पण तो वेस्ट इंडीजला फायनलमध्ये नेऊ शकला नाही! याच वर्ल्डकपमध्ये केनियाविरुद्धची मॅच अपमानास्पद रितीने हारल्यावर ग्रूपमधल्या आपल्या पाचही मॅचेस आरामात जिंकणार्‍या दक्षिण आफ्रीकेचं ब्रायन लाराने क्वार्टरफायनलमध्ये साफ वाटोळं केलं होतं! पण १९९६ च्या वर्ल्डकपमधली खास आठवण म्हणजे बँगलोरला झालेली भारत - पाकिस्तान मॅच! अजय जाडेजाने वकार युनुसची केलेली अभूतपूर्व धुलाई आणि प्रत्येक बॉलला उत्साहाने सुरु असलेली टोनी ग्रेगची कॉमेंट्री आजही कोणी विसरलं असेल असं वाटत नाही. Waqar Younus is being slaughtered आणि त्यापेक्षाही Kumble is playing a blinder (उच्चार कुंबली!) असं बापजन्मात कोणाच्या स्वप्नातही येऊ न शकणारं वक्तव्यं तोच करु जाणे. परंतु यापेक्षाही मोमेंट ऑफ द मॅच म्हणजे... वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलचा उखडलेला ऑफ स्टंप! आणि "Fuck off" असा खास शब्दांत दिलेला सेंड ऑफ! रवी शास्त्रीच्या क्रिकेट करीअरमधल्या कोणत्याही शॉटपेक्षा कॉमेंट्री बॉक्समध्ये इतका वेळ सोहेलवर स्तुतीसुमनं उधळणार्‍या इमरान खानला रवी शास्त्रीने Thats the best way you can answer a batsman! हे सुनावताना साधलेलं टायमिंग अचूक होतं! या एका विकेटने वेंकटेश प्रसाद भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने अजरामर झाला! जन्मभरात त्याने इतर काहीही केलं नसतं तरी कोणी त्याला एका शब्दाने विचारलं नसतं! १९९६ च्याच इंग्लिश मोसमातली आठवणारी एक मॅच म्हणजे बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस कपमधली लँकेशायर विरुद्ध यॉर्कशायर ही सेमीफायनल! भारतात मुंबई विरुद्ध दिल्ली आणि ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्स विरुद्ध व्हिक्टोरीया यांच्या तोडीस तोड पुरानी दुष्मनी म्हणजे लँकेशायर विरुद्ध यॉर्कशायर! ईएसपीएन किंवा स्टार स्पोर्ट्सच्या कृपेने ही मॅच पाहण्यास मिळाली होती. यॉर्कशायरने ४६ ओव्हर्समध्ये १९८ रन्स काढल्यावर पाऊस आला, पण या मॅचचं वैशिष्ट्यं म्हणजे वन डे असूनही यात रिझर्व्ह डे ची सोय होती! दुसर्‍या दिवशी ४ ओव्हर्समध्ये बेव्हन (९५*) आणि रिचर्ड ब्लॅकी (८०*) यांनी ५२ रन्स झोडपत यॉर्कशायरला २५० पर्यंत पोहोचवलं! लँकेशायरची अवस्था ९७ / ५ अशी झाली होती, पण बेव्हनच्या आधी वन डे स्पेशालिस्ट म्हणून नावाजला गेलेला नील फेअरब्रदर आणि विकेटकीपर वॉरन हेग यांनी ६२ रन्सची पार्टनरशीप करत मॅच फिरवली. फेअरब्रदर (५९) परतल्यावरही हेगने गॅरी येट्सबरोबर ६६ रन्स फटकावल्या! शेवटच्या बॉलवर पीटर मार्टीनने एक रन काढत लँकेशायरला मॅच जिंकून दिली! वॉरन हेगची ती ८१ रन्सची इनिंग्ज अविस्मरणीयच! १९९७ मध्ये कलकत्त्याच्या ईडन गार्डन्सवर अझरने दक्षिण आफ्रीकेची, खासकरुन लान्स क्लूसनरची केलेली धुलाई अशीच कायमची मनावर कोरली गेली आहे. ७७ बॉलमध्ये १०९ रन्स झोडपताना लंचनंतर एकाच ओव्हरमध्ये क्लूसनरला ५ बाऊंड्री तडकावतानाचा त्याच्या बेदरकारपणा निव्वळ लाजवाब! १९९७ मध्ये केपटाऊनला ५८ / ५ अशी अवस्था झालेली असताना सचिन (१६९) आणि अझर (११५) यांनी जेमतेम ३ तासांत २२२ रन्स कुटल्या! अझरने त्याचं गिर्‍हाईक असलेल्या क्लूसनरला तर सचिनने अ‍ॅलन डोनाल्डला पद्धतशीरपणे धुतलं होतं! याच सिरीजमध्ये डोनाल्डला द्रविडने सिक्स मारल्यावर आणि डोनाल्डने त्याला मनसोक्तं शिव्या घातल्यावर पुढच्याच बॉलला द्रविडने पुन्हा बाऊंड्री तडकावल्यावर रागाने धुमसणारा डोनाल्डही विसरणं अशक्यंच! १९९७ मध्येच कराचीच्या नॅशनल स्टेडीयमवर राजेश चौहानने सकलेनला मारलेली सिक्स ही आणखीन एक अविस्मरणीय आठवण! जेमतेम वर्षभराने पुन्हा सकलेनलाच हृषिकेश कानेटकरने शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेली बाऊंड्री अशीच कायम लक्षात राहणारी! वन डे मधला तो वर्ल्ड रेकॉर्ड चेस होता आणि तो सुद्धा ४८ व्या ओव्हरमध्ये! १९९८ मध्ये दक्षिण आफ्रीकेचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आलेला असताना माईक आर्थर्टन आणि अ‍ॅलन डोनाल्ड यांची नॉटींगहॅमशायरच्या ट्रेंट ब्रिज मैदानात रंगलेली अशीच एक अफलातून जुगलबंदी आठवते. आर्थर्टनच्या ग्लव्ह्जला बॉल लागूनही अंपायरने नॉटआऊट दिल्यावर आणि त्याच्या चेहर्‍यावरचे मिस्किल भाव पाहून भडकलेल्या डोनाल्डने टाकलेला तो स्पेल आजही अंगावर काटा आणतो! कर्टली अँब्रोजने इंग्लंडची अनेकदा वाताहात केलेली मी पाहिली आहे, पण डोनाल्डचा तो स्पेल निव्वळ खतरनाक होता! परंतु १९९८ मधली आणि खरंतर आतापर्यंतच्या पाहिलेल्या अगणित मॅचेसमधली मनावर कोरली गेलेली सर्वोत्कृष्टं आठवण म्हणजे सचिनने शारजात लागोपाठच्या मॅचेसमध्ये केलेली ऑस्ट्रेलियाची अभूतपूर्व धुलाई! डेझर्ट स्टॉर्म! शेन वॉर्नला स्वप्नातही भिती घालणार्‍या आणि स्टीव्ह वॉला "We did not loose to team India, we lost to Sachin Tendulkar!" अशा शब्दांत पराभव मान्य करायला लावणार्‍या या दोन सेंच्युरीबद्द्ल जितकं बोलावं तितकं कमी आहे. अशा वेळेस कॉमेंट्रीबॉक्समध्ये टोनी ग्रेगच हवा! शारजात तो होता आणि या दोन इनिंग्जच्या दरम्यान त्याची कॉमेंट्री सचिनच्या बॅटींग इतकीच तुफान होती! "When it gets tough, the tough gets going and Tendulkar has set himself to get a hundred!" "Sachin Tendulkar has taken it to Australians and Indians are through to final!" "This little man is nearest thing to Bradman!" "Oh its a six! What a player! What a wonderful player!" "The little man has hit big fellow for Six! He is half his size!" १९९९ मध्ये मद्रासला पाकिस्तानविरुद्ध चौथ्या इनिंग्जमध्ये सचिनची सेंच्युरी ही अशीच एक भळभळणारी जखम! दिल्लीच्या पुढच्या टेस्टमध्ये कुंबळेने इनिंग्जमध्ये १० विकेट्स घेऊन जिम लेकरची बरोबरी केली असली तरी कायम चुटपूट लावून जाते ती सचिनच्या सेंच्युरीनंतरही भारताने हातात असूनही गमावलेली मद्रासची ही टेस्ट! पाकिस्तान विरुद्धच्या सिरीजच्या आधी ऑस्ट्रेलियन संघ भारतात आलेला असताना सचिन विरुद्ध वॉर्न ही रंगलेली जुगलबंदी आणि सचिनने केलेली वॉर्नची धुलाई अशीच अविस्मरणीय! पहिल्या टेस्टच्या आधीच मुंबईकडून खेळताना सचिनने वॉर्नला फटकावत २०० रन्स झोडपल्या होत्या, पण टेस्ट मॅचेसमध्ये वॉर्नला पहिला डोस दिला तो सिद्धूपाजींनी! वॉर्नला सिद्धूचा हा हल्ला इतका अनपेक्षित होता की तो शेवटपर्यंत त्यातून सावरला नाही. याच सिरीजमध्ये सिद्धूबरोबर ओपनिंगला आलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने ९५ रन्स फटकावत पुढे येणार्‍या संकटाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग दिली होती! २००१ मध्ये ईडन गार्डन्सला राहुल द्रविडसह लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाची दादागिरी संपवली आणि भारतीय क्रिकेटने एका नव्या युगात प्रवेश केला! गेल्या तीसेक वर्षांत क्रिकेट पाहत असतानाच्या या काही आठवणी. २००१ नंतर गेल्या पंधरा वर्षातल्या आणि आधीच्याही कित्येक आठवणी यात आलेल्या नाहीत. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये दादा गांगुली आणि द्रविड यांनी टाँटनला श्रीलंकेची केलेली धुलाई आणि रचलेली ३१८ रन्सची पार्टनरशीप, ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियात फटकावलेली २७७ रन्सची इनिंग्ज, अँब्रोजने १ रन मध्ये घेतलेल्या ७ विकेट्स, डेव्हन माल्कमचा दक्षिण आफ्रीकेविरुद्धचा खतरनाक स्पेल, वॉरीकशायरकडून खेळताना शॉन पोलॉकने लेस्टरशायरविरुद्ध ४ बॉलमध्ये घेतलेल्या ४ विकेट्स, थर्ड अंपायरने रन आऊट दिलेला पहिला बॅट्समन सचिन अशा कितीतरी आठवणी... आठवाव्या तेव्हढ्या थोड्याच!
  • क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से
  • ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील!
  • टॉम ग्रेव्हनी - महा 'हलकट' माणूस!
  • क्रिकेट मधली घराणेशाही!
  • चंद्रास्तं! - शिवनारायण चँडरपॉल निवृत्त!
  • It's a Tie !!
  • फॉलोऑन आणि नंतर..

Book traversal links for आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे

  • क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा

प्रतिक्रिया द्या
40716 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

+१

प्रसन्न३००१
Wed, 12/28/2016 - 15:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

टोनी मॅन

चौकटराजा
Tue, 12/27/2016 - 09:38 नवीन
१९७७ ७८ च्या सीरीज मधे ऑस्त्रेलियाच्या टोनी मॅन या बोलरने नाईट वोचमन म्हणून येउन भारता विरूद्ध शतक काढले. ते इतिहासातील पहिले नाईटवाचमन शतक व बहुतेक करून शेवटचेच.
  • Log in or register to post comments

नसीम-अल-घनी

स्पार्टाकस
Tue, 12/27/2016 - 10:36 नवीन
पाकिस्तानच्या नसीम-अल-घनी याने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध ठोकलेली सेंच्युरी ही नाईटवॉचमनने काढलेली पहिली सेंच्युरी. १९६२ च्या सिरीजमध्ये घनीने हा पराक्रम केला होता आणि तो सुद्धा पाकिस्तानच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये! नाईट वॉचमन म्हणून सेंच्युरी ठोकणारे इतर बॅट्समन म्हणजे आपला किरमाणी, टोनी मान आणि सगळ्यांवर कडी करणारा जेसन गिलेस्पी. बांगलादेशविरुद्ध त्याने चक्कं २०१ रन्स काढल्या आणि त्या सुद्धा नॉटआऊट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जबरी आठवणी ! ९१ मधली कर्नलची

विशाल कुलकर्णी
Tue, 12/27/2016 - 11:19 नवीन
जबरी आठवणी ! ९१ मधली कर्नलची ती खेळी निव्वळ अविस्मरणीयच होती.
  • Log in or register to post comments

त्याला कर्नल का म्हणायचे?

गवि
Tue, 12/27/2016 - 11:36 नवीन
त्याला कर्नल का म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सी के नायडूंशी साम्य होते

पैसा
Tue, 12/27/2016 - 11:43 नवीन
वेंगसरकरची शरीरयष्टी आणि खेळ यात कर्नल सी के नायडूंशी साम्य होते त्यामुळे त्याला कर्नल नाव पडले. (बहुधा बॉम्बे जिमखन्यावर सुरुवातीच्या काळात मारलेल्या सिक्सर्समुळे असावे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ओह ओके. थँक्स. मला वाटलं

गवि
Tue, 12/27/2016 - 11:51 नवीन
ओह ओके. थँक्स. मला वाटलं मानद दर्जा वगैरे मिळालेला की काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दिनांक - ३० ऑगस्ट १९७९

श्रीगुरुजी
Tue, 12/27/2016 - 21:44 नवीन
दिनांक - ३० ऑगस्ट १९७९ स्थळ - ओव्हल मैदान, इंग्लंड भारत वि. इंग्लंड यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ४ था सामना ३० ऑगस्ट पासून सुरू झाला. भारताने या मालिकेत पहिला सामना गमाविला होता. पुढील २ सामने अनिर्णित राहिले होते. तिसर्‍या कसोटीत भारताच्या यजुवेंद्रसिंगने फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करताना एका डावात ५ झेल घेऊन जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात गावसकरने ६८ व ६१ आणि गुंडाप्पा विश्वनाथने ५१ व ७८ धावा केल्या होत्या. बाकी सर्व फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. गावसकरने दुसर्‍या व तिसर्‍या कसोटीतही अर्धशतक करून पहिल्या ३ कसोटीत ४ अर्धशतकांच्या सहाय्याने ५ डावात एकूण ३०८ धावा केल्या होत्या. पहिला दिवस - इंग्लंडचा कर्णधार माईक ब्रेअर्लीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. ३८ वर्षीय जेफ्री बॉयकॉट व ग्रॅहम गूच सलामीला आले होते. काही वेळाने इंग्लंडची अवस्था ३ बाद ५१ अशी झाली. कपिलने बॉयकॉटला पायचित केले व पुढच्याच चेंडूवर डेव्हिड गॉवरला पायचित करून हादरा दिला. परंतु नंतर ३ वर्षांनी संघात आलेल्या पीटर विलीने गूचबरोबर ९७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. विली ५२ धावांवर बाद झाल्यावर बॉथम मैदानात आला. दोघांनी ५५ धावांची भागीदारी केल्यावर बॉथम बाद झाला. परंतु दिवसअखेर इंग्लंडने अजून बळी न गमाविता ५ बाद २४५ धावा केल्या. दुसरा दिवस - दुसर्‍या दिवशी लगेचच गूच ७९ वर बाद झाला. गूच नंतरच्या काळात भारतासाठी कर्दनकाळ ठरला होता. १९८७ मधील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने शतक मारले होते. नंतर १९९० मध्ये भारताविरूद्ध ३३३ धावा करून त्रिशतक मारले होते. परंतु १९७९ मध्ये गूच खूप नवीन होता व अतिशय धडपडत खेळायचा. त्यामुळेच पहिल्या दिवशी दिवसभर खेळून सुद्धा त्याने जेमतेम ७९ धावा केल्या होत्या. काही वेळाने इंग्लंडचा पहिला डाव ३०५ वर संपला. कर्णधार वेंकटराघवन व कपिलने प्रत्येकी ३ बळी घेतले होते. भारताची सुरूवात अत्यंत वाईट झाली. चेतन चौहान व गावसकर सलामीला आल्यावर काही वेळातच चौहान व पाठोपाठ वेंगसरकर हे दोघेही स्लिपमध्ये बॉब विलीसच्या गोलंदाजीवर बॉथमच्या हातात झेल देऊन बाद झाले व भारताची अवस्था २ बाद ९ अशी झाली. काही वेळाने गावसकर १३ वर बाद होऊन भारत ३ बाद ४७ वर अडखळायला लागला. विश्वनाथने डाव सावरून ६२ धावा केल्या. परंतु दिवसअखेर भारताची अवस्था ५ बाद १३७ अशी वाईट होती. तिसरा दिवस - तिसर्‍या दिवशी थोड्या वेळाने भारताचा डाव फक्त २०२ धावात आटोपला. यजुवेंद्रसिंगने ४३ धावा केल्या. बॉथमने २ झेलांसहीत ६५ धावात ४ बळी घेतले. विलीस व माईक हेंड्रिकने प्रत्येकी ३ बळी घेतले. तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने आपल्या दुसर्‍या डावात ३ बाद १७७ धावा करून २८० धावांची आघाडी घेतली होती. बॉयकॉट ८३ धावांवर नाबाद होता. चौथा दिवस - चौथ्या दिवशी तब्बल ७ तास फलंदाजी करून १२५ धावा करून बॉयकॉट बाद झाला. पदार्पण करणार्‍या डेव्हिड बेअरस्टॉ या क्षेत्ररक्षकाने ५९ धावा केल्या (सध्या इंग्लंडच्या संघात असलेल्या जॉनी बेअरस्टॉ या क्षेत्ररक्षकाशी याचा काही संबंध आहे का याची माहिती नाही). तो बाद झाल्यावर लगेचच इंग्लंडने ८ बाद ३३४ वर डाव घोषित करून भारताला विजयासाठी एकूण ८ तास २० मिनिटात ४३९ धावा करण्याचे आव्हान दिले. भारताच्या गावसकर व चौहानने संथ सुरूवात केली. सामना न हरता अनिर्णित ठेवावा हा त्यांचा उद्देश असावा. चौथ्या दिवसाच्या १४० मिनिटात त्यांनी फक्त नाबाद ७६ धावा जोडल्या. पाचवा व अखेरचा दिवस - भारताला विजयासाठी अजून ३६३ धावा हव्या होत्या. एकच दिवस शिल्लक होता. परंतु सर्व १० गडी शिल्लक होते. गावसकर व चौहानने पुन्हा एकदा संथ खेळ सुरू केला. ते विजयासाठी प्रयत्न करीत आहेत असे वाटतच नव्हते. परंतु त्यांनी पहिल्या विकेटसाठी ३१४ मिनिटात तब्बल २१३ धावांची भागीदारी केल्यावर चौहान ८० धावा करून बाद झाला. गावसकरने त्यापूर्वीच आपले शतक पूर्ण केले होते. ५०० मिनिटांपैकी आता फक्त १८६ मिनिटे शिल्लक होती आणि अजून २२६ धावा हव्या होत्या. आता गावसकरच्या जोडीला वेंगसरकर आल्यावर गावसकरने गिअर बदलला. त्याने फटकेबाजी सुरू केली. चहापानाच्या वेळी भारताची धावसंख्या १ बाद ३०४ होती. आता फक्त २ तास शिल्लक होते व अजून १३५ धावा हव्या होत्या. त्यावेळच्या नियमानुसार शेवटचा १ तास राहिला की त्यानंतर २० षटके टाकणे सक्तीचे होते. जेव्हा खेळाचा १ तास शिल्लक राहिला तेव्हा भारताची धावसंख्या १ बाद ३२८ होती व भारताला आता उर्वरीत २० षटकात १११ धावा हव्या होत्या. १९७९ मध्ये जेव्हा पूर्ण दिवस खेळ करून जेमतेम २२५-२५० धावा व्हायच्या. त्या काळात २० षटकात १११ धावा करणे हे अत्यंत अवघड होते. या जोडीने एकूण १५३ मिनिटात १५३ धावांची वेगवान भागीदारी केल्यावर वेंगसरकर वैयक्तिक ५३ धावांवर बाद झाला. भारत २ बाद ३६६. भारताची धावसंख्या ३६५ असताना बॉथमने वेंगसरकरचा झेल सोडला होता. परंतु लगेचच त्याने फिल एडमंड्सच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. आता फक्त ७३ धावा हव्या होत्या. वेंकटराघवनने फटकेबाजीसाठी कपिलला ४ थ्या क्रमांकावर पाठविले. परंतु तो शून्यावर बाद झाला. भारत ३ बाद ३६७. नंतर आलेल्या यशपाल शर्माच्या जोडीने गावसकरने अजून २२ धावांची भर घातली. आता ८ षटकात ४९ धावा हव्या होत्या व बॉथम गोलंदाजीला आला. पराभव टाळण्यासाठी ब्रेअर्ली वेळकाढूपणा करून आपल्या गोलंदाजांना षटके संपवायला भरपूर वेळ लावायला सांगत होता. ८ षटके असताना त्याने अचानक ड्रिंक ब्रेकची मागणी केली. नंतर खेळ सुरू झाल्यावर दमलेल्या व अचानक आलेल्या ड्रिंक ब्रेकमुळे एकाग्रता गमावलेला गावसकर २२१ धावा करून बाद झाला. तो तब्बल ८ तास ९ मिनिटे फलंदाजी करीत होता. २१ चौकारांच्या सहाय्याने तब्बल ४४३ चेंडू खेळून तो तब्बल २२१ धावांची अविस्मरणीय खेळी खेळून अगदी मोक्याच्या क्षणी बाद झाल्यामुळे घात झाला. त्याने एक नवीन विक्रम केला. यापूर्वी पतौडीने इंग्लंडविरूद्ध सर्वाधिक २०३ धावा केल्या होत्या. आता हा विक्रम गावसकरच्या नावावर गेला. या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत गावसकरने ७ डावात ४ अर्धशतके व एक द्विशतक करून ७७.४२ धावांच्या सरासरीने तब्बल ५४२ धावा केल्या होत्या. आता भारताची गती खुंटली होती. बॉथमने लगेचच अजून २ बळी घेतले व पीटर विलीने विश्वनाथला बाद केले. भारताला शेवटच्या षटकात १५ धावा हव्या होत्या व ८ गडी बाद झाले होते. दुर्दैवाने भारताला शेवटच्या षटकात फक्त ५ धावा करता आल्या. यष्टीरक्षक भरत रेड्डीला शेवटचे षटक खेळून पराभव होऊ नये याची दक्षता घ्यावी लागली. भारताचा डाव ८ बाद ४२९ वरच थांबला. विजयासाठी फक्त १० धावा कमी पडल्या. शेवटच्या २० षटकात भारताने १०१ धावा केल्या. बॉथमने ९७ धावात ३ गडी बाद केले. परंतु त्याने शेवटच्या मोक्याच्या ४ षटकात केवळ १७ धावा देऊन तीनही बळी घेतले होते. गावसकरचा एक अत्यंत अविस्मरणीय डाव विजय देऊ शकला नाही. विजय न मिळाल्यामुळे संपूर्ण भारत हळहळत होता. गावकरला सामनावीर व बॉथमला मालिकावीराचा सन्मान देण्यात आला. या सामन्याने धावते वर्णन पाचही दिवस रेडीओवर ऐकले होते. शेवटच्या दिवसाचे वर्णन तर अक्षरशः प्राण कंठाशी आणून ऐकत होतो. शेवटी विजय फक्त १० धावांनी दूर राहिल्यावर आलेली निराशा अनेक दिवस कायम राहिली. ही मालिका संपल्यानंतर वेंकटराघवनला कर्णधारपदावरून हटवून त्याच्या जागी गावसकरला कर्णधार करण्यात आले. या मालिकेपूर्वी भारत इंग्लंडमध्ये दुसरी विश्वचषक स्पर्धा जून-जुलै मध्ये खेळला होता. या मालिकेतील ४ कसोटीनंतर भारत भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ६ व पाठोपाठ पाकिस्तानविरूद्ध ६ कसोटी खेळला व नंतर मार्चमध्ये बीसीसीआयच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १ कसोटी सामना खेळला. म्हणजे एकूण ९-१० महिन्यात भारत १७ कसोटी सामने व विश्वचषक स्पर्धेतील ३ एकदिवसीय सामने खेळला. एकंदरीत त्या काळात क्रिकेटचे अजीर्ण झाले होते.
  • Log in or register to post comments

डेव्हीड बेअरस्टो

स्पार्टाकस
Tue, 12/27/2016 - 22:11 नवीन
डेव्हीड बेअरस्टो हा जॉनी बेअरस्टोचा बाप. जॉनी बेअरस्टो प्रमाणेच त्याचा बापही विकेटकीपरच होता. या मॅचमध्ये त्याने केलेल्या ५९ रन्स हा इंग्लंडकडून ८ व्या नंबरवर टेस्टमधल्या आपल्या पहिल्याच इनिंग्जमध्ये सर्वाधीक रन्स करण्याचा विक्रम या डेव्हीड बेअरस्टोच्याच नावावर होता जो नुकत्याच संपलेल्या चेन्नईच्या शेवटच्या टेस्टमध्ये लियाम डॉसनने मोडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

याच डेव्हिड बेअरस्टोने १९९८

प्रसन्न३००१
Wed, 12/28/2016 - 15:31 नवीन
याच डेव्हिड बेअरस्टोने १९९८ मध्ये दुखापतींमुळे उद्भवलेलं आजारपण, बायकोचं आजारपण, आर्थिक ओढाताण आणि या सगळ्यांचा परिणामी आलेलं मानसिक नैराश्य, यामुले स्वतःच्या घरात गळफासावर लाटून आत्म्यहत्या केली. Sad End to a fine career :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

क्या बात है !!

वरुण मोहिते
Wed, 12/28/2016 - 14:22 नवीन
या धाग्यावर पुस्तक होईल एखादं. बाकी आम्ही सचिन द्रविड गांगुली च्या जमान्यातले . एक सामना असाच ह्रिषीकेश कानिटकर ने पण जिंकून दिला होता .एक दिवस स्टार झाला मग कुठे गेला काय माहित .
  • Log in or register to post comments

तो सामना हृषिकेश कानिटकरने

श्रीगुरुजी
Wed, 12/28/2016 - 15:00 नवीन
तो सामना हृषिकेश कानिटकरने जिंकून दिला होता असे म्हणणे धाडसाचे ठरेल कारण त्या सामन्यात काही इतर खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. ११ जानेवारी १९९८ या दिवशी ढाक्यात झालेल्या त्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून ४८ षटकात तब्बल ३१४ धावा केल्या होत्या (धावगती ६.५४ प्रति षटक). पाकिस्तानकडून सईद अन्वरने १३२ चेंडूत १४० तर इजाज अहमदने ११२ चेंडूत ११७ धावा केल्या होत्या. भारताच्या डावाची सुरूवात सचिन व गांगुलीने केली. सचिनने आल्याआल्या जोरदार फटकेबाजी सुरू केली व काही वेळाने संघाची धावसंख्या ८.१ षटकात नाबाद ७१ असताना केवळ २६ चेंडूत ४१ धावांवर तो बाद झाला. आपल्या छोट्या खेळीत त्याने ७ चौकार व १ षटकार मारला होता. तो बाद झाल्यावर कर्णधार रॉबिन सिंगला बढती देऊन तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला पाठविले. रॉबिन सिंगने त्याचा निर्णय योग्य ठरवत जोरदार फटकेबाजी केली. ४ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ८३ चेंडूत ८२ धावा करून तो बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या ३८.१ षटकात २ बाद २५० इतकी भक्कम होती. विजयासाठी पुढील ५९ चेंडूत फक्त ६५ धावा हव्या होत्या व फक्त २ गडी बाद झाले होते. अजून अझरूद्दीन, जडेजा, सिधू, कानिटकर, मोंगिया इ. फलंदाज शिल्लक होते. दुसरीकडे गांगुली नाबाद शतक झळकावून ठाम उभा होता. परंतु रॉबिन सिंग बाद झाल्यावर अचानक सामन्याचा रंग पालटला. अझरूद्दीन फक्त ४ धावा काढून बाद झाला (४१.२ षटकात २६८/३). आता ४० चेंडूत ४७ धावा हव्या होत्या. काही वेळाने गांगुली १३८ चेंडूत १२४ धावा करून बाद झाला. त्याने ११ चौकार व १ षटकार मारला होता. भारत ४२.४ षटकात २७४/४. आता ३२ चेंडूत ४१ धावा हव्यात. दादाच्या पाठोपाठ सिधू (४३.२ षटकात २८१/५), जडेजा (४५.४ षटकात २९६/६) हे देखील बाद झाले. आता १४ चेंडूत १९ धावा हे लक्ष्य अजूनही आवाक्यात होते. ४७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नयन मोंगिया बाद झाला. आता ६ चेंडूत ९ धावा हव्यात. कानिटकर व श्रीनाथने पहिल्या ४ चेंडूत ६ धावा घेतल्या. शेवटच्या २ चेंडूत धावा हव्या असताना सकलेन मुश्ताकच्या डाव्या यष्टीवर पडलेल्या चेंडूवर कानिटकरने एका गुडघ्यावर बसून मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू उचलून चौकार मारून १ चेंडू राखून व ३ गडी राखून सामना जिंकून दिला. जरी विजयी फटका कानिटकरने मारला तरी गांगुली, सचिन व रॉबिन सिंग यांचा विजयात सिंहाचा वाटा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

तरीही तो सामना लक्षात आहे,

प्रसन्न३००१
Wed, 12/28/2016 - 15:35 नवीन
तरीही तो सामना लक्षात आहे, ह्रिषीकेश कानिटकर च्या चौकारामुळे.... ह्रिषीकेश चांगला अष्टपैलू खेळाडू होता, १९९९ च्या ऑस्ट्रेलिया टूर नंतर त्याला बळीचा बकरा केला आणि नंतर कधीच भारतीय संघात संधी दिली नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यावेळेस अंधुक प्रकाशामुळे

विशुमित
Wed, 12/28/2016 - 16:19 नवीन
त्यावेळेस अंधुक प्रकाशामुळे सामना काही काळ थांबवला होता. पण तरी ही अझरुद्दीन ने रिस्क घेऊन पुढे खेळण्याचा निर्णय घेतला होता, असे अंधुकसे आठवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न३००१

http://www.espncricinfo.com

श्रीगुरुजी
Wed, 12/28/2016 - 15:48 नवीन
http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/62737.html वरील रोचक धावफलक बघा. भारत वि. इंग्लंड लीड्स येथे ५-९ जून १९५२ मध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना. भारत पहिला डाव - सर्वबाद २९३ (१२६ षटके, विजय मांजरेकर १३३, विजय हजारे ८९, जिम लेकर ४ बळी, फ्रेड ट्रुमन ३ बळी, अलेक बेडसर २ बळी) इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद ३३४ (१६५ षटके, ग्रॅव्हेनी ७१, इव्हान्स ६६, गुलाम अहमद ५ बळी, रामचंद २ बळी) भारत दुसरा डाव - पंकज रॉय झेल कॉम्प्टन गोलंदाज ट्रुमन - ० (भारत १ बाद ०) दत्तू गायकवाड झेल लेकर गोलंदाज बेडसर - ० (भारत २ बाद ०) माधव मंत्री त्रिफळा ट्रुमन - ० (भारत ३ बाद ०) विजय मांजरेकर त्रिफळा ट्रुमन - ० (भारत ४ बाद ०) भारत यावेळी ४ बाद ० अशा दारूण अवस्थेत होता. नंतर विजय हजारे (५६) आणि दत्तू फडकर (६४) यांनी बर्‍यापैकी फलंदाजी करून भारताचा डाव सावरला. तरीसुद्धा भारताला सर्वबाद फक्त १६५ धावा करता आल्या. ट्रुमन व जेनकिन्सने प्रत्येकी ४ बळी घेतले. नंतर रामचंदही शून्यावर बाद झाला होता. हा सामना नंतर इंग्लंडने ३ बाद १२८ धावा करून आरामात जिंकला. अजून एका वेगळ्या सामन्यात भारताची धावसंख्या एकवेळ ५ बाद १ इतकी दारूण होती. हा नक्की कोणता सामना ते आठवत नाही.
  • Log in or register to post comments

लॉर्डसवरील १९७४ चा सामना का?

गॅरी ट्रुमन
Wed, 12/28/2016 - 17:14 नवीन
अजून एका वेगळ्या सामन्यात भारताची धावसंख्या एकवेळ ५ बाद १ इतकी दारूण होती. हा नक्की कोणता सामना ते आठवत नाही.
१९७४ मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा लॉर्ड्सवर ४२ धावांमध्ये खुर्दा उडाला होता तो सामना का? अर्थातच हा सामना मी बघितलेला नव्हता (कारण माझा जन्मही तेव्हा झालेला नव्हता :) ) पण या सामन्याविषयी बरेच ऐकले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नाही नाही. हा तो सामना नाही.

श्रीगुरुजी
Wed, 12/28/2016 - 20:37 नवीन
नाही नाही. हा तो सामना नाही. साधारणपणे असाच धावफलक २०१५ च्या विश्वचषकात विंडीज वि. पाकडे या सामन्यात होता. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ३१० धावा केल्यावर पाकड्याची अवस्था ४ थ्या षटकात ४ बाद १ इतकी दारूण होती. जेरोमी टेलरने ३ व जेसन होल्डरने १ बळी घेऊन पाकड्यांचे कंबरडे मोडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

रडीचा डाव

गामा पैलवान
Wed, 12/28/2016 - 15:57 नवीन
लोकहो, कुठल्याशा सामन्यात बक्कीस जिंकायला एक अंकी धावा हव्या होत्या. तेव्हा प्रतिस्पर्धी संघ (बहुतेक वेस्ट इंडीज) वेळकाढूपणाचा रडीचा डाव खेळला होता. फलंदाजाने मारलेला चेंडू परत आणण्यासाठी यष्टीरक्षक सीमेपावेतो चालंत गेला. त्यामुळे वेळ संपली आणि सामना अनिर्णीत राहिला. त्या काळी चालू षटक पूर्ण करायची पद्धत नव्हती. अन्यथा बक्कीने जिंकला असता. जाणकारांना हा सामना आठवतोय का? धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

अरे वा!!

बाळ सप्रे
Wed, 12/28/2016 - 16:45 नवीन
अरे वा!! ८० च्या दशकातल्या क्रिकेटच्या आठवणी वाचून पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले.. 'एकच षटकार' नावाचं एक क्रिकेटवरच नियतकालिक येत असे तेव्हा त्याची आठवण झाली. त्यातील लिखाणाची शैली अशीच होती.. बहुदा संदीप पाटिल चालवायचा ते.. गुगलला माहीती नाही वाटतं.. एकही रेफरन्स मिळाला नाही नेटवर.. :-(
  • Log in or register to post comments

मला आठवतंय हे मॅगझीन... संदीप

प्रसन्न३००१
Wed, 12/28/2016 - 16:57 नवीन
मला आठवतंय हे मॅगझीन... संदीप पाटील संपादक होता त्याचा... दर दिवाळीमध्ये आवाज, जत्रा या दिवाळीअंकांबरोबर षटकारची सुद्धा खरेदी व्हायची. साधारण १९९९ पर्यंत हे मासिक मिळायचं, नंतर बहुदा बंद पडलं. अजूनही, दिवाळीअंक खरेदी करताना नजर बुक स्टॉलवर एकच षटकार ला शोधात असते @सप्रे काका, एकच षटकार ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अष्टपैलू हेही होतं ....

गामा पैलवान
Wed, 12/28/2016 - 18:17 नवीन
बाळ सप्रे, बरोबर आहे. संदीप पाटील हे पाक्षिक (की साप्ताहिक?) चालवायचा. त्यातल्या लेखकांपैकी मकरंद वायंगणकर हे नाव आठवलं. त्यात बी.बी. मामा यांची पंचगिरीची कोडी व लेख येंत. नंतर यांस प्रतिस्पर्धी म्हणून अष्टपैलू हे नियतकालिक सुरू झालं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हो हो. एकच षट्कार.. लुप्त

गवि
Wed, 12/28/2016 - 18:33 नवीन
हो हो. एकच षट्कार.. लुप्त झालेली आठवण परत वर आणलीत. "एकच" हे शब्द एकदम लहान फॉन्टमधे आणि षट्कार हा शब्द एका वेगळ्या डिझाईनमधे मोठा. पोलीस टाईम्सप्रमाणे (आठवा: काव्यात्मक यमकी टायटल्स.. पक्षी: उकलेना हे गूढ, कुठे आहे जावयाचं धूड? ... किंवा भाऊ वैरी झाला, कोथळा बाहेर आला.. इ.इ. ) हा षटकारही लोकप्रिय होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

१९८३ चा विश्वचषक भारताने

श्रीगुरुजी
Wed, 12/28/2016 - 20:28 नवीन
१९८३ चा विश्वचषक भारताने जिंकल्यावर भारतात क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली १९८३ पर्यंत भारतात स्पोर्ट्स स्टार, स्पोर्ट्स वीक इ. ३-४ इंग्लिश साप्ताहिके प्रसिद्ध होत होती. मराठीत "क्रीडांगण" या नावाचे एकमेव साप्ताहिक होते. बहुतेक बाळ पंडीत त्याचे संपादक होते. विश्वचषक जिंकल्यानंतर अचानक "षटकार" सुरू झाले. संदीप पाटील त्याचा संपादक होता. संदीप पाटीलने फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी "षटकार" हे साप्ताहिक, जाहिरातीत मॉडेलिंग, चित्रपटात काम करणे, लफडी अशा गोष्टींवर वेळ घालविल्याने अंगी गुणवत्ता असूनसुद्धा १९८६ मध्येत त्याची कारकीर्द संपली. १९७९-१९८६ या काळात फक्त ७ वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याचाच कित्ता पुढे विनोद कांबळीने गिरवून क्रिकेटबाह्य गोष्टींवर वेळ घालवून स्वतःच्या कारकिर्दीवर स्वतःच्या हाताने धोंडा पाडून घेतला. "षटकार" मध्ये दिलीप प्रभावळकर हे "गुगली" या नावाचे एक विनोदी सदर लिहीत होते. "षटकार"च्या बरोबरीने "अष्टपैलू" (संपादक अजित वाडेकर) आणि पुण्यातून "एकच चौकार" (संपादक डॉ. दिलीप देवधर) ही साप्ताहिके सुरू झाली. "षटकार"च्या तुलनेत यांचा खप फारसा नव्हता. सध्या या ४ साप्ताहिकांपैकी कोणते जिवंत आहे याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अष्टपैलू

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 12/29/2016 - 10:59 नवीन
हो त्या काळी षटकार, चौकार, क्रिडांगण ही नियतकालिके वाचायचोच. त्याचबरोबर 'अष्टपैलू' नावाचेही नियतकालिक यायचे असे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अक्षर प्रकाशनाने एकच षट्कार

बोका-ए-आझम
Sat, 12/31/2016 - 09:32 नवीन
अक्षर प्रकाशनाने एकच षट्कार काढलं होतं. निखिल वागळे (हो, तेच ते) प्रकाशक होते. षट्कारचा दिवाळी अंक छान असायचा. त्यात क्रिकेटर्सचे दणदणीत ब्लोअप (हाही षट्कारचा खास शब्द) असायचे. १९८७ च्या वर्ल्ड कपच्या वेळी षट्कारने खास अंक काढला होता - दिवाळी अंकाव्यतिरिक्त. त्यात आॅस्ट्रेलिया या वर्ल्ड कपचे डार्क हाॅर्स आहेत असं म्हटलं होतं. शेवटी तेच झालं. ७ रन्स एवढ्या कमी फरकाने आॅस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

पॅट सिमकॉक्स

सिरुसेरि
Wed, 12/28/2016 - 17:51 नवीन
पॅट सिमकॉक्सलाही एका भारतीय खेळाडुने सिक्स मारली होती . आत्ता नाव आठवत नाही .
  • Log in or register to post comments

१९९७ मधल्या वेस्ट इंडिज

चावटमेला
गुरुवार, 12/29/2016 - 00:54 नवीन
१९९७ मधल्या वेस्ट इंडिज दौर्यातील बार्बाडोस टेस्ट कायमची लक्षात आहे. शेवटच्या दिवशी जिंकायला केवळ १२० धावा हव्या असताना आपण ८१ मध्येच गारद झालो होतो आणि जवळपास २५ वर्षांनंन्तर वेस्ट इंडिज मध्ये मालिका जिंकण्याची संधी गमावली होती. अनिल कुंबळे आणि सचिन दोघांनीही एका मुलाखतीत हा त्यांच्या कारकीर्दीतला सगळ्यात निराशाजनक पराभव असल्याचे म्हटलेले आठवते :(
  • Log in or register to post comments

कर्नल...

अमेरिकन त्रिशंकू
गुरुवार, 12/29/2016 - 01:19 नवीन
१९७५ च्या इराणी ट्रॉफीच्या मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया मॅचमध्ये वेंगसरकरने बेदी, प्रसन्ना यांची धुलाई करत शतक (११० धावा) ठोकले होते. तेव्हा लोकांना म्हणे कर्नल सी.के नायडू यांची आठवण झाली होती.
  • Log in or register to post comments

मस्त धागा! आणि सुंदर किस्से.

नरेश माने
गुरुवार, 12/29/2016 - 16:05 नवीन
मस्त धागा! आणि सुंदर किस्से. एकच षटकार आणि क्रिकेट सम्राटचीपुष्कळ पारायणे केली आहेत. त्यातील अनेक खेळाडूंची चित्रे कापून एक वही केली होती आता ती शोधावी लागेल.
  • Log in or register to post comments

खेळीयाड

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 12/29/2016 - 17:17 नवीन
त्या काळची अजून एक आठवण म्हणजे दूरदर्शनवर खेळीयाड या नावाने क्विझ असायचे. सुभाष अवस्थी आणि मिलिंद वागळे ते सादर करायचे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने विक्रमी भागीदारी केल्यानंतर त्या दोघांनाही या कार्यक्रमात एकदा बोलावलेही होते.या कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक आठवड्यात एक प्रश्न विचारायचे आणि त्याचे उत्तर दुसर्‍या आठवड्याच्या कार्यक्रमात द्यायचे.त्या प्रश्नाचे उत्तर काय असेल याविषयी आम्ही मित्रमंडळींमध्ये चर्चाही करायचो.
  • Log in or register to post comments

एक वेगळा किस्सा.

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/29/2016 - 21:09 नवीन
एक वेगळा किस्सा. पुण्यात पूर्वी नेहरू स्टेडियमवर अनेक सामने व्हायचे. रणजी व दुलीप करंडकाचे अनेक सामने या मैदानात झाले आहेत. नंतर अनेक एकदिवसीय सामने सुद्धा झाले. २००५ मधील श्रीलंकेविरूद्दच्या एका एकदिवसीय सामन्यानंतर इथले आंतरराष्ट्रीय सामने बंद झाले व कालांतराने गहुंजे येथे नवीन मैदान तयार झाल्यावर नेहरू स्टेडियमवरील सर्व प्रकारचे सामने थांबले. लहानपणी मी नेहरू स्टेडियमवर अनेक सामने स्टेडियमच्या पॅव्हेलियन किंवा एखाद्या स्टँडमध्ये घुसून फुकट पाहिले आहेत. एकाही सामन्याचे पैसे देऊन तिकिट काढलेले नव्हते. आता फेब्रुवारीत गहुंजे मैदानात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामना आयोजित केला आहे. तो मात्र आगाऊ तिकीट काढून पाहण्याचा विचार आहे. पूर्वी एका दुलीप करंडकाच्या सामन्यात पॅव्हेलियनमध्ये फुकट घुसून खुर्चीवर बसून सामना पहात असताना चहापानानंतर पश्चिम विभागाचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात निघाल्यावर पळत पळत जाऊन गावसकरची सही घेतली होती. त्यावेळी गावसकरने सही दिल्यावर गंमतीने माझ्या डोक्यावरील टोपी स्वतःच्या डोक्यावर घातली होती. नंतर अजून एका रणजी करंडक सामन्याच्या वेळी पॅव्हेलियनच्या तिसर्‍या मजल्यावरील प्रक्षेपण खोलीजवळ जायचे धाडस केले होते. अचानक प्रक्षेपण खोलीचे दार उघडून आतून गावसकर व बाळ ज. पंडीत बाहेर आले. ते जिन्यावरून खाली उतरत असताना मी पुन्हा एकदा गावसकरची सही आणली होती. दुर्दैवाने या दोन्ही सह्या मी कोठेतरी हरवून टाकल्या. १९८१ मध्ये इंग्लंडचा संघ भारतात आला होता. त्यावेळी नेहरू स्टेडियमवर भारताच्या २१ वर्षांखालील खेळाडूंचा संघ व इंग्लंड यांच्यात तीन दिवसांचा सामना आयोजित केला होता. भारतीय संघाचा कर्णधार श्रीकांत होता. श्रीकांतने भारतीय संघाच्या दोन्ही डावात जबरदस्त फटकेबाजी करून दोन्ही डावात अंदाजे मिनिटाला १ या वेगाने ८०+ धावा केल्या होत्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे पॅव्हेलियनमध्ये यशस्वीपणे घुसून पॅव्हेलियनच्या पहिल्या मजल्यावरून भारताची फलंदाजी बघितली होती. पहिल्या दिवशी अगदी खेळ संपतासंपता गुरशरणसिंगने टिळक रस्त्याच्या बाजूने गोलंदाजी सुरू असताना एक शैलीदार फटका स्लिपमधून मारून चौकार मारून आपले शतक पूर्ण केले होते. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सामना पहायला जाणे जमले नाही. परंतु तिसर्‍या दिवशी हिराबागेच्या बाजूला असलेल्या स्टँडमध्ये फुकट घुसून सामना बघितला. त्या सामन्यात श्रीकांतने खिलाडूपणे उपाहाराच्या सुमाराला अंदाजे २५० धावांचे लक्ष्य ठेवून डाव घोषित केला होता. परंतु इंग्लंडने बॉथम व गॉवरला सलामीला पाठविले व दोघांनी व नंतरच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करून सामना जिंकला होता. १९८४ मध्ये पुन्हा एकदा इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर होता. या मालिकेत एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना नेहरू स्टेडियमवर आयोजित केलेला होता. मी व माझा एक मित्र नेहमीप्रमाणे घुसायचा प्रयत्न करायला लागलो. त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये घुसणे शक्य झाले नाही. त्यामुळे पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला नटराज हॉटेलच्या बाजूने प्रवेश असणार्‍या स्टँडमध्ये यशस्वीपणे घुसलो. त्या सामन्याला प्रचंड गर्दी होती. २०-२५ हजार क्षमता असणार्‍या स्टेडियममध्ये ३५००० हून अधिक प्रेक्षक आले होते. त्यातले किमान १०-१५ हजार आमच्यासारखे घुसलेले फुकटे होते हे वेगळे सांगायला नको. त्या गॅलरीत अजिबात जागा नव्हती. अक्षरशः मुंगीच्या पावलाने बर्‍यापैकी पुढे पोहोचलो. असंख्य प्रेक्षक उभे राहून सामना पहात होते. अतिशय कडक उन होते व गॅलरीवर काहीही आच्छादन नव्हते. सामना नीट दिसत नसल्यामुळे आम्ही दोघेही तिथून बाहेर पडून टिळक रस्त्याच्या बाजूने प्रवेश असलेल्या क्लब ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीत यशस्वीपणे घुसलो. ही इमारत पॅव्हेलियनच्या १८० अंशात पॅव्हेलियनच्या अगदी समोर आहे. त्या इमारतीत घुसून दुसर्‍या मजल्यावरच्या बाल्कनीत दिवसभर उभे राहून संपूर्ण सामना बघितला. ती बाल्कनी म्हणजे लॉर्डसच्या मैदानातील पहिल्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीप्रमाणे आहे. तिथून सामना अगदी जवळून बघता येत होता. खेळपट्टी अगदी समोर उभी दिसत होती. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. माझ्या आठवणीप्रमाणे त्या सामन्यात काही कारणाने गावसकर व कपिलदेव खेळत नव्हते. श्रीकांतने सलामीला येऊन अर्धशतक केल्यावर नंतर वेंगसरकरने जोरदार नाबाद शतक केले. भारताने एकूण ४५ षटकात २१५ धावा केल्या होत्या. इंग्लंडची सुरूवात वाईट झाली. फलंदाजी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने पॅव्हेलियन बाजूने गोलंदाजी करणार्‍या चेतन शर्माच्या गोलंदाजीवर डावखुर्‍या ग्रॅहम फाउलरचा अगदी जमिनीलगत आलेला झेल मिडविकेटला यशपाल शर्माने अचूक पकडला. नंतर जेव्हा आम्ही सामना बघत होतो त्या भागात चेतन शर्मा क्षेत्ररक्षणासाठी आल्यावर एका स्टँडमधील एका मुलींचा गट त्याला बघून जोरात चित्कारल्यावर तो भलताच खूष झाला व त्याने मुलींना हसून अभिवादन केले. ईंग्लडची फलंदाजी सुरू असताना त्यांचे खेळाडू नियमित अंतराने बाद होऊ लागले. मध्ये एका पेयपानाचा ब्रेकच्या वेळी कपिल मैदानात आल्यावर प्रेक्षकांनी जोरदार आरडाओरडा करून आपला आनंद व्यक्त केला. काही वेळाने इंग्लंडचे ६ गडी बाद झाले व त्यांना विजयासाठी जवळपास ८०-९० धावा हव्या होत्या. मैदानात गॅटिंग नाबाद होता. त्याच्या जोडीला बहुतेक बॉब टेलर आला. दोघांनी शांतपणे धावसंख्या वाढवायला सुरूवात केली. शेवटी विजयासाठी जेमतेम १५-२० धावा हव्या होत्या व अजून दोघेही टिकून होते. तोपर्यंत मैदानावर शांतपणे बसून सामना पाहणार्‍या प्रेक्षकांचा संयम सुटायला लागला. प्रचंड गर्दीमुळे झालेली दाटी, त्यामुळे सामना बघण्यात येणारा व्यत्यय, अत्यंत कडक ऊन, डोक्यावर आच्छादन नसल्याने भाजत असणारे शरीर आणि आता डोळ्यांसमोर होणारा पराभव यामुळे काही प्रेक्षकांची निराशा शिगेला पोहोचली. हिराबाग व क्लब ऑफ महाराष्ट्र या दोन्हींच्या मध्ये असणार्‍या स्टँडमधून अचानक एका प्रेक्षकाने बिअरची काचेची मोठी तपकिरी बाटली मैदानात भिरकावली. काही सेकंदानंतर अजून एक बाटली मैदानात आली. काही सेकंदानंतर अजून २-३ बाटल्या मैदानात आल्या. त्यानंतर अचानक त्या स्टँडमधून मैदानात बाटल्यांचा वर्षाव सुरू झाला. सर्व खेळाडू गोंधळून खेळ थांबला. एक बाटली तर एका खेळाडूच्या अगदी जवळ जाऊन पडली. त्यामुळे पंचांनी खेळ थांबवून सर्व खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परत नेले. मैदानातून अनेक पोलिस स्टँडकडे धावत गेले. बाटल्यांचा वर्षाव सुरूच होता. जवळपास १५-२० मिनिटे मिनिटाला २०-२५ बाटल्या या वेगाने मैदानात भिरकावल्या जात होत्या. आम्ही बाल्कनीतून आश्चर्यचकीत होऊन पहात होतो. तो स्टँड आम्ही होतो त्याच्या अगदी शेजारीच होता व हवेतून बाटल्या भिरभिरत मैदानात येतानाचे दृश्य प्रेक्षणीय होते. प्रेक्षकांकडे बिअरच्या इतक्या बाटल्या कोठून आल्या हे एक गूढच होते. नंतर अनेक पोलिस स्टँडमध्ये गेले व त्यांनी बाटल्यांची फेकाफेकी थांबविली. १५-२० मिनिटांनंतर मैदानात तब्बल ३००-४०० बाटल्या पडल्या होत्या. नंतर मैदान कर्मचार्‍यांनी मैदानात येऊन सर्व बाटल्या गोळा केल्यावर काही वेळाने खेळ पुढे सुरू झाला. थोड्या वेळाने गॅटिंगने आपले शतक पूर्ण केले व इंग्लंडने ४ गडी राखून सामना जिंकला. गॅटिंगला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
  • Log in or register to post comments

खरे दर्दी आहात गुरुजी

गवि
गुरुवार, 12/29/2016 - 22:43 नवीन
खरे दर्दी आहात गुरुजी क्रिकेटचे.. व्हॉट्स लाईफ विदाऊट अ लिट्ल पॅशन? तुमच्या पॅशनचं कौतुक वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मज्जा आणि हेवा वाटतो

विशुमित
Fri, 12/30/2016 - 10:02 नवीन
मज्जा आणि हेवा वाटतो गुरुजींचे क्रिकेट वेड पाहून..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

_/\_

बोका-ए-आझम
Sat, 12/31/2016 - 09:34 नवीन
सहीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

@ गुरुजी

वरुण मोहिते
गुरुवार, 12/29/2016 - 22:58 नवीन
राजकारण सोडून असं पण लिहीत राहा ..मस्त
  • Log in or register to post comments

१९९२ विश्वचषकादरम्यान अफवा

गॅरी ट्रुमन
Sun, 01/01/2017 - 21:06 नवीन
१९९२ च्या विश्वचषकाच्या वेळची एक आठवण आहे. भारताने न्यू झीलंडबरोबरचा सामना गमावला आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकणार नाही हे नक्की झाले. भारताचा एकच सामना बाकी होता आणि तो होता दक्षिण आफ्रिकेविरूध्द १५ मार्च १९९२ रोजी. हा सामना म्हणजे केवळ औपचारीकता होती. या सामन्याच्या दोन दिवस आधी मुंबईत अफवा आली होती की न्यू झीलंडचा मार्क ग्रेटबॅच आणि अन्य एका खेळाडूने तर वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंनी ड्रग्स घेतली आहेत हे उघडकीला आले आहे त्यामुळे न्यू झीलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघाला विश्वचषकातून बाद करण्यात आले आहे आणि या दोन संघांनी तोपर्यंत जिंकलेल्या सामन्यांमधील पराभूत संघांना दोन गुण बहाल करण्यात आले आहेत.त्यामुळे भारताचे ५ वरून ९ गुण झाले आहेत आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळायची आशा अजूनही आहे!! तो होळीचा दिवस होता.त्याकाळी एकच दूरदर्शन होते त्यामुळे २४/७ बातम्या नसायच्या.पण जेव्हा जेव्हा बातम्या लागत होत्या तेव्हा तेव्हा याविषयी काही बातमी येते का हे अगदी उत्कंठेने बघत होतो.अर्थातच असे काहीही झालेले नव्हते.दुसर्‍या दिवशी मटामध्ये मुंबईत अशी अफवा पसरली आहे आणि त्यात काही तथ्य नाही असे आले आणि सगळ्याचा उलगडा झाला :)
  • Log in or register to post comments

हो अशी अफवा पसरली होती.

नरेश माने
Tue, 01/03/2017 - 12:28 नवीन
हो अशी अफवा पसरली होती. त्यावेळी सामने सकाळी ४ वाजता सुरू व्हायचे आणि आम्ही सकाळी चारचा गजर लावून उठायचो. शाळा सकाळी सातची त्यामुळे भारताचा सामना असेल तर उर्वरित सामना बघता येणार नाही ही रूखरूख लागलेली असायची. त्यात एक सामना म्हणजे भारत विरूध्द पाकिस्तान दांडी मारावी तर घरी मार पडणार ही भिती. शाळेत जावे लागणार हे पक्के परंतु सामना तर पहायचाच हा आम्हा क्रिकेटवेड्या ग्रुपचा पण. आमच्या एका मित्राने नामी शक्कल लढवली. आमच्या वर्गात शाळेतील एका शिपायाचा मुलगा शिकत होता. शिपाई वर्गासाठी शाळेच्या मागेच राहण्याची व्यवस्था होती. त्याला आमच्या कटात सामील करून घेतले. प्रार्थना झाल्यावर शिक्षकांनी हजेरी घेतली आणि मग एक एक करून मागच्या दाराने शिक्षकांची नजर चुकवून आम्ही सात जण सटकलो आणि त्याच्या घरी जाऊन उर्वरित सामना पाहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा