सुम्याच्या निधनाच्या आठवणी
काल गुरूकाकाने आईबद्दल जे सांगीतलं ते ऐकून सुम्याची मुलगी मनातून भयभयीत झाली होती.तिला आपल्या आईची खूपच काळजी वाटायला लागली होती.आपली आई आता जास्त दिवस काढणार नाही हे तिने मनात निश्चीत केलं होतं.त्या दिशेने म्हणजेच तिला कसलीही खाण्याची इच्छा झाली ती ती पुरवत होती.खरं म्हणजे सुम्याला खाण्याची कसलीच इच्छा राहिली नव्हती.आपल्या मुलीला किंवा गुरूनाथला वाईट वाटेल म्हणून ती बोलत नव्हती पण मनोमनी तिला वाटत होतं की आपण आता या जीवनातून मुक्त व्हावं.पण तशी इच्छा करून भागत नाही.प्राण जाणं कुणाच्या हातात नाही.परंतु,मला जगावं असं वाटत नाही असं आपल्याच लोकाना परत परत सांगून त्यांच्या मनाला उगाचच क्लेश होतो हे तिला चांगलच माहित होतं.
पण असं म्हणतात जेव्हा खरोखर जगण्याची इच्छाच जाते तेव्हा शरीरापेक्षा मनच तसं व्हायला साहाय्य करतं. अलीकडे सुम्या काही खायला आणून दिलं तर नकोच म्हणायची.गुरूनाथने डॉक्टरना बोलावून घेतलं. तिला तपासून डॉक्टरानी सांगीतलं की सुम्या आता सिंकींग कंडीशनमधे आहे.तिचा व्याधी बळावत आहे.आणि भुकेची इच्छाच मेल्याने तिचं काही खरं नाही.
आणि तसंच झालं त्या दिवशी सकाळी उठल्यावर गुरूनाथ तिला जागं करायला आला होता.पण सुम्या कसलाच प्रतिसाद देत नव्हती.त्याने सुम्याच्या मुलीला बोलावून घेतलं.तिलाही तसंच वाटलं.डॉक्टरना बोलावलं आणि त्यांनी सांगीतलं दोन तासापूर्वी ती झोपेतच गेली.
नियतीने स्वतःच्या कथेला एक महत्वाचं वळण आणलं होतं.सुम्या आणि गुरूनाथ ह्या मुख्य दोन भुमिकेतून एक भुमिका नियतीने कथेतून काढून टाकली होती. सुम्याच्या मुलीला आणि गुरूनाथला तो दिवस फारच भय़ंकर गेला.सुम्याला न्यायला लोकं आली. गुरूनाथने सोनचाफ्याची सर्वच्या सर्व फुलं काढून तिच्या बॉडी सभोवती डाळून ठेवली.तिचे अंत्यसंस्कार गुरूनाथनेच केलं.
कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवलेलं असतं हे जर का खरंच कळलं असतं तर काय हा:हा:कार झाला असता.गुरूनाथ खरोखर खचला होता.हे बघण्यासाठी आपण जीवंत का राहिलो असं त्याला क्षणभर वाटलं.आपल्या म्हातार्या आईवडीलांच्या अंतावेळी जेव्हडं त्याला वाटलं होतं त्याच्यापेक्षाही हे वाटणं भयंकर होतं.
प्यार से भी ज़रूरी कई काम हैं
प्यार सब कुछ नहीं ज़िंदगी के लिए
सुम्या ह्या ओळी गुणगूणायची त्या ओळींची त्याला आठवण झाली.
नियतीच्या कथेतला हा एक टर्निंग पॉंइन्ट होता.आता सुम्याविना पुढचे दिवस कसे काढायचे ह्याची गुरूनाथला आणि सुम्याच्या मुलीला विवंचनेत टाकण्याची पाळी आली होती.सुम्याच्या मुलीला एक विचार येत होता की गुरूकाकाला मुंबईला घेऊन जावं आणि कोकणातला बिझीनेस बंदच करावा.आपल्या आईची आठवण येऊन भेडसावत रहावं लागणार नाही.पण गुरूकाका मुंबईला यायला कबूल होईल का? हा तिला प्रश्न भेडसावयाचा.
एक दिवस तिने धीरकरून गुरूकाकाला आपला विचार सांगीतला.गुरूकाकाने त्तत्क्षणी नकार दिला.त्याचा विचारही संयुक्तिक होता.तो तिला म्हणाला आता माझा शेवट कोकणातच व्हावा.सुम्या आपल्यात नसली तरी तिच्या लहानपणापासूनच्या आठवणी निश्चीतच ह्या दोन घरांच्या वातावरणात आहे.ते वातावरण आता मला जगू देत राहिल.सुम्याच्या मुलीने मुंबईत जाऊन आपल्या संसाराकडे आणि बिझीनेसकडे जास्त लक्ष केंद्रीत करावं.त्यामुळे तिचा वेळ जायला तिला मदत होईल.
सुम्याच्या मुलीला हे गुरूकाकाचं म्हणणं पटलं आणि त्याप्रमाणे आणखी दोन आठवड्याने मुंबईला जायचं ठरवलं.जाण्यापूर्वी गुरूनाथ एकटाच कोकणात असल्याने त्याच्या साठी एक मदतनीस ठेवायचं ठरवलं.आणि कोकणातला बिझीनेस तसाच चालू ठेवावा.मधून मधून ती कोकणात येत जाईल आणि गुरूकाकाला कंपनी देईल. गुरूनाथला ही कल्पना आवडली.
गुरूकाकाच्या व्याधीवर लक्ष ठेवायला तिने डॉक्टरला विनंती केली.आणि तसंच काही सिरयस वाटल्यास आपल्याला त्यानी कळवावं असं ठरलं.सुम्याच्या काही आठवणी येण्यासारख्या गोष्टी असल्यास आपल्या बरोबर त्या न्याव्यात असा विचार करून ती सुम्याच्या कपाटात वस्तु शोधीत होती.काही वस्तुमधे तिला सुम्याची एक डायरी सापडली.निवांत वेळ मिळाल्यावर तिने ती डायरी चाळून पहायचं असा तिने विचार केला.
बर्याच आठवणी त्या डायरीत सुम्याने लिहिल्या होत्या.आपल्या नवर्याबरोबरचे झालेले महत्वाचे संवाद, त्याचे शहाणपणाचे विचार,काही तिला आवडलेल्या गाण्यांचे उतारे,तिने केलेली काही कवनं असं बरंच काही होतं.
तिच्या नवर्याबद्दलची तिची मतं फारच आदरपूर्वक होती.
एके ठिकाणी तिने लिहलं होतं की,असा नवरा मिळायला ती खरोखरच नशिबवान होती आणि त्यासाठी तिने देवाचे मनापासून आभार मानले होते.कधीही माझा अवमान न करणारा माझा नवरा,मला समजून घेणारा,माझ्यासाठी कोणताही त्याग करायला मागेपुढे न पहाणारा माझा नवरा,माझं चुकत असलं तरी माझी समजूत घालत असताना, माझा कुठेही कमीपणा होऊ नये म्हणून दक्षता ठेवणारा माझा नवरा, कधीही माझ्यावर न चिडणारा माझा नवरा, असं त्याच्या विषयी कितीही लिहिलं तरी अपुरंच होईल, आणि मी खरोखरच त्यासाठी त्याला बायको म्हणून लायक होते का अशी तिला स्वतःविषयी शंका वाटायची.किंबहूना त्याच्या सहवासात राहून माझ्यात सुधारणा करून घ्यायला मला त्याने उद्युक्त केलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये असं तिने लिहिलं होतं.तो स्वतः माणूस होता आणि मलाही माणूस कसं असावं हे त्याने शिकवलं.
गुरूकाका विषयीही तिने बरंच काही लिहिलं होतं.गुरूकाकाच्या लहानपणातल्या आठावणी.त्या अल्लड वयात त्याच्याशी प्रेम करायला इच्छा होणं.आईवडीलाना आपले संबंध सांगावेत की कसं? तसं न केल्याने एका अर्थी बरं झालं.आपलं बिनबोभाट लग्न झालं.आणि खरं गुपीत आपल्यात आणि गुरूनाथापुरतं सिमीत राहिलं.आपलं लग्न झाल्यावर नवर्याशी आपण एकरूप राहू शकले.आपल्या नवर्याच्या थोर मनामुळे पुढे एकदा आपण आपल्या नवर्याला आपल्यात आणि गुरूनाथबरोबर लहानपणी आलेल्या संबंधाबद्दल उघडपणे सांगीतल्यावरही केवळ त्याच्या मोठ्या मनामुळेच तो आपल्याला समजून घेऊ शकला.असं हे सर्वच पुरूषांकडून समजूतीने घेतलं जाईल असं नाही.
सुम्याचा नवरा गेल्यानंतर तिला खूपच डिप्रेशन आलं होतं.एके ठिकाणी ती लिहिते,
वाट संपली आहे
मी उगाचच चालत रहाते
तू एकावं म्हणून उगाचच
मी माझ्याशीच बोलत रहाते
रेंगाळलेले आहे सर्व
सारेच थांबले आहे
थांबून वळून पहायचे तर
सर्व थोडेसे लांबले आहे
मातीच्या इवल्याश्या पणतीत
ज्योत वातीशी खेळत आहे.
एके ठिकाणी सुम्या एक कविता करते ती बहुतेक गुरूकाकाला उद्देशून असावी असं सुम्याच्या मुलीला वाटलं,
सोनचाफ्याचं फूल आणून देताना
जेवढा तुला आनंद झाला
दुप्पटीने झाला आनंद मला
फुल ते हातात घेताना
सुगंध त्याचा दरवळला
उजळूनी जुन्या आठवणी
पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे
आणिती डोळ्यात पाणी
क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचे
करीते काम विलोभण्याचे
कुठले फूल अन कुठला सुगंध
जाईन पुन्हा त्या स्वपनात
होईन मी पुन्हा आनंदाने धुंद
ही कविता वाचून सुम्याच्या मुलीला मनात आलं की ही डायरी आपण गुरूकाकाला दाखवावी.तिने त्याच्या जवळ ती डायरी वाचायला दिली.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)