सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ५)

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
13 Nov 2016 - 1:45 am

उतार वय होण्या अगोदर जे आयुष्य असतं ते ही मनाची द्विधा करीत असतं त्यावेळच्या आठवणी.

सुम्याच्या मुलीची अमेरिकेतली कॉलेजची वर्ष आता संपत आली होती.सुम्याचा एक प्रश्न तिच्या मुलीने सोडवला होता.सुम्याच्या मुलीला अमेरिकेतच एक चांगला जोडीदार मिळाला होता.तो पुण्याचाच होता. तिच्या बरोबर शिकत होता.अमेरिकेत जास्त काळ न थांबता भारतात परत जायचा दोघांचा विचार पटत होता.
सुम्याच्या मुलीने आपल्या जोडीदाराविषयी आपल्या आईवडीलांना कळवलं होतं.मुलीची बातमी कळल्यावर सुम्या तिच्या नवर्‍याला म्हणाली सुद्धा.तिच्या वेळचे हे दिवस निराळे होते.जोडीदार मनात असला तरी.आईवडीलांना सांगण्याची बिशाद नव्हती.आईवडील योग्यवेळी आपली सोयरीक बघणार.आणि त्यांनी केलेली निवड आपल्यासाठी योग्यच असणार.अशी त्यावेळची तिच्या वयाच्या मुलींची विचारसरणी असायची.

तिचं आणि गुरूनाथचं प्रेम जुळत होतं.पण शिक्षणाच्या निमीत्ताने त्यांच्या दोघांची फार्रकत झाली होती. होतं ते बर्‍यासाठी होतं असा विचार त्यावेळी प्रबळ असायचा.
आणि तिच्या बाबतीत जे झालं ते योग्यच झालं असं सुम्याने नवर्‍याला प्रांजाळपणे सांगून टाकलं.

सुम्याचं हे ऐकून तिच्या नवर्‍याला गहिवरून आलं.तो तिला म्हणाला की, त्या वयात बर्‍यांचं असं होतं. आयुष्य हे एक योगायोग आहे.आपण म्हणत असतो की मी हे केलं,मी ते केलं पण खरं तर आपल्या नकळत तसं होण्यासाठी आपण केवळ निमीत्त असतो.असा विचार करून बर्‍याच गोष्टीकडे पाहिलं की आपल्याला नाहक टेन्शन येत नाही.नाहीतरी होणारं होऊन गेलंलं असतं.आपण आपल्या मुलीचा पुढे काय विचार आहे त्याचा विचार करूंया.

सुम्याच्या मुलीने इकडे येऊन आपलं लग्न करून घेउन आपला संसार थाटावा.त्या दोघांना आपण आपली मुंबईची जागा देऊंया.त्या जागेत राहून,त्यांनी संसार थाटून नोकरी किंवा बिझीनेस त्यांना हवं ते करावं.

आणि तसंच झालं.सुम्याच्या मुलीने भारतात परत येऊन त्या जोडीदाराशी लग्न केलं.गुरनाथ त्यांच्या लग्नापुरता येऊन गेला होता.दोघंही कंप्युटर सॉप्टवेअर शिकल्याने त्यांनी मुंबईत आपली कंपनी स्थापून लहान मोठ्या हॉटेलांचं मॅनेजमेंट application लिहीण्याचा बिझीनेस चालू केला.भरपूर यश मिळत होतं. त्यांन्या एक मुलगाही झाला.पुण्याला सुम्याकडे त्याला ठेवून ती दोघं आपल्या धंद्यात लक्ष देत होती.

अशीच काही वर्षं निघून गेली.नातुही मोठा होऊन शाळेत शिकत होता.सुम्या आणि तिचा नवरा थोडे दिवस चेंज म्हणून कोकणात जाऊन राहिले.गुरूनाथ त्यांच्या शेजारीच रहात असल्याने त्यांच्या रोजच्या गाठीभेटी व्हायच्या.गुरूनाथचे आईवडीलही त्यांना बोलायला मिळायचे.काही दिवस कोकणात राहून सुम्या आणि तिचा नवरा पुण्याला परत आले.अधूनमधून ते मुंबाईला सुम्याच्या मुलीकडे जायचे.नातवाच्या संगतीत राहिल्याने त्यां दोघांचा वेळ मजेत जायचा.

गुरूनाथचे आईवडील अधूनमधून आजारी व्हायचे.एकट्या गुरूनाथची त्यांची सेवा करताना तीरपीट उडायची.कधी तरी त्याच्या मनात विचार यायचा,लग्न केलं असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटायचं.पण सुम्याकडून मिळणारी प्रेमाची सर दुसर्‍या कुणाही मुलीकडून मिळणार नाही ह्याची त्याला जाणीव व्हायची.आणि झालं ते बर्‍यासाठीच झालं असं मनात आणून तो स्वतःची समजूत करून घ्यायचा.

एक दिवशी गुरूनाथची आई गंभीर आजारी झाली.तिला त्याने जवळच्या हॉस्पीटलात नेली.पण ती बरी होऊन घरी आली नाही.तिच्या निधनानंतर त्याचे वडीलही एक महिन्याच्या आत निर्वतले.असं कधी कधी होतं म्हाणतात.आपला पार्टनर गेल्याचं दुःख अनिवार्य होऊन माणूस जातो.गुरूनाथ एकटा झाला.त्याला बाळा म्हणायला मोठं असं आता कुणी उरलं नव्हतं.अख्खं घर त्याला खायला यायचं.गुरूनाथची ही परिस्थिती सुम्याला कळल्यावर ती थोडी अस्वस्थ झाली.ती नवर्‍याला म्हणाली की आपण कोकणात जाऊया.गुरूनाथबद्दल तिला खूप काळजी वाटायला लागली होती.

पुण्याच्या जागेत नाहीतरी असाच वेळ जात असल्याने कोकणातलं त्यांचं घर बंद ठेवण्या ऐवजी आपण कायमच तिथे जाऊन रहावं असा त्यांचा विचार व्ह्ययला लागला.सुम्याने आपल्या मुलीशी विचारविनीमय केला.तिलाही त्या दोघांचा विचार पटला.खर्चासाठी लागले तर आपण आणखी पैसे तिथे पाठवू असं मुलीने त्यांना सांगीतलं.

गुरूनाथला ज्यावेळी सुम्याचा हा विचार कळला त्यावेळी तो खूपच आनंदी झाला.
नको हे आयुष्य असं मध्यंतरी त्याला वाटत होतं.ती दोघं कोकणात येउन रहाणार आहेत याचा त्याला खूपच आनंद झाला असं त्याने सुम्याला कळवलं.सुम्याच्या नवर्‍याने तिला सांगीतलं की,आयुष्यात सुख आणि दुःख कायमची नसतात.पण एव्हडं मात्र खरं की कुणी तरी म्हटलंय की,
"सुख जवापाडे,दुःख पर्वाता एव्हडे"
हे अगदी खरं आहे.सुम्या त्याला म्हणाली की गुरूनाथ सारख्या काही माणसाना आयुष्यभर दुःखच जास्त सोसावं लागतं.थोड्याच दिवसात पुण्याचा गाशा गुंडाळून ती दोघं आता कायमची कोकणात जायला सज्ज झाली होती.

जाण्याच्या आदल्या दिवशी सुम्या बाल्कनीत एकटीच उभी होती.तिला कोकणातल्या लहानपणातल्या आय़ुष्याची एकदम आठवण आली,गुरूनाथ बरोबरचे ते लहानपणातले दिवस आठवले,गेले ते मजेचे दिवस होते असं मनात म्हणाली,गुरूनाथालाही लहानपणाची दिवस आठवत असतील का?

कळश्यात बावीतला पाणी घेऊन
तुझ्या अंगावर मी उपडी करय
तू पाठमोरो होऊन अंगाक साबू चोळीस
मी तुझ्याकडे टक लावून बघतय म्हणून
तू लाजून नजर दुसरीकडे फिरवीस
बघ माझी तुकां आठवण येतां कां?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे (कॅलिफोरनीया)

कथालेख

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

13 Nov 2016 - 5:01 am | चित्रगुप्त

सुंदर, सात्विक, र्‍हदयस्पर्शी लेखन.