Skip to main content

आजोबांसोबतचा प्रवास

लेखक हृषीकेश पालोदकर यांनी शनिवार, 12/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
vc प्रवास कुठला करतो यापेक्षा कुणाबरोबर करतो यात त्या प्रवासाची खरी गम्मत असते. योग्य सोबत बरोबर असली कि प्रवासाची मजा द्विगुणीत होते. एकदा अशीच कोकण रेल्वेची सफर अनुभवायला आम्ही दोन सवंगडी मंगलोरला पोहोचलो. नेत्रावती आणि गुरुपुरा या नद्यांच्या मधोमध वसलेलं हे शहर अत्यंत देखण आहे. दुसरया दिवशी सकाळीच आमची रेल्वे होती. सकाळी लवकर उठून रेल्वे स्टेशन गाठलं. ते स्टेशन एखाद्या बंद पडलेल्या कारखान्याप्रमाणे वाटत होतं. दारात साधा एक भिकारी नाही कि फलाटावर पाशिंजर नाही. हे असलं गर्दी विरहित स्टेशन पाहूनच गम्मत वाटली.खरंतर मेंगलोर हे काही स्टेशन नाही कारण स्टेशन च्या व्याखेत ते बसतच नाही.स्टेशन म्हणजे रेल्वे रुळावर लागणार एखादं गावं जिथे रेल्वे थांबते. पण इथे गम्मत वेगेळीच आहे, कोकण रेल्वेचा रुळ सुरूच इथून होतो आणि पार मुंबईतल्या दिव्या पर्यन्त नेऊन सोडतो. हा प्रवास खरतर पावसाळ्यात करायला पाहिजे पण आमचा मुहूर्त वेगळा निघाला. मंगलोर ते मडगाव साधारण पणे सहा तासांचा प्रवास. आम्ही डबा शोधून सीटवर जाऊन बसलो. प्रत्येक डब्यात जेमतेम आठ पंधरा लोक होते.गाडीने निघायचा शेवटचा भोंगा दिला त्यावेळी टीसी आणि एक चहावाला धरून आम्ही डब्यात एकूण सात लोक होतो. मंगलोर स्टेशन सोडलं आणि थोड्या वेळातच रेल्वे एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. काही क्षणात वातावरण बदलत गेलं. अगदी हेरीपोटर चित्रपटात होत तसं. थोड्या वेळातच रेल्वे रूळांनी आणि गाडीने मिळून असाकाही संमिश्र ठेका धरला कि बरोबर समेवर सम येत होती.ताल गती घेत होता आणि आजूबाजूच्या गर्द हिरवेगार रसिक झाडझुडपं माना डोलवायला लागले. मधूनच कौलारू घरांची टोळी या संगीत सभेत अडदान्डपणे डोकावून जायची. नारळ आणि सुपारी ने गर्दी खूप वाढवली होती. sm निळ्याशार आभाळाखाली हिरवीकच्च शेती त्यात लाल मातीची पायवाटेची रांगोळी आणि त्यावर पांढरे शुभ्र बगळे , ते बगळे फक्त कधी गाडी येते आणि आपण साडे-माडे-तीन करून आकाशात झेप घेऊ आणि नृत्यविष्कार दाखवू याचीच वाट पाहत बसलेले असायचे. थोड्या थोड्या वेळाने एखादी दुथडी वाहणारी छोटीशी नदी ठुमका देत लगेच नाहीशी व्हायची. कुठे तरी आडवळणवर गंभीर दिसणारे नारळाचे झाड मात्र त्या नखरेल नदीला वाकून छेडताना पण दिसले त कुणी वाकून काठावर लागलेल्या त्या छोट्या नावेशी बोलत बसलेला दिसायचा.रेल्वेचा कर्णकर्कश्य भोंगा वाजायचा आणि कुठलं तरी स्टेशन आलेलं असायचं. वाटेत लागणारे सगळे स्टेशन जवळ जवळ निर्मनुष्य त्यामुळे खूप शांतता. ना फेरीवाल्यांचा गोंधळ न चढणाऱ्या उतारणार्यांची लगबग. नंतर नंतर हा भोंगा मंगल वाद्याप्रमाणे वाटायला लागला. मागे गेलेल्या दृशांची रुखरुख तर पुढे येणाऱ्या नजर्यांची उत्कंठता यांना हे मंगलवाद्य जोडत होत. आज प्रकृती नेहमीपेक्षा जास्तच नटून थटून आल्याच भासत होती. आजची सफर मंतरलेली होती. संगीत आणि सौंदर्याची मुक्त उधळण. ps “आजची प्रवासाची मैफल काही और आहे” हेच बहुतेक डब्या डब्यात कुजबुजल जात असेल. अचानक सगळी सभा गंभीर होत असे व चीत्त स्थिर होत असे आणि विस्तीर्ण खाडीच्या रूपाने एक दीर्घ आलाप घेतला जायचा, सगळे काही शांत, दूरपर्यंत पाणीच पाणि, आता अभाळापेक्षाही नीळ पाणि, अस्वस्थता, दम गुदामाराल्यासारख व्हायच आणि लगेच सुटलेला ताल बरोबर समेवर येऊन अजस्त्र खाडी संपायची,एक पण मात्रा सुटली तर शप्पथ ! दारातून मागे पाहावे तर सगळे डबे देखील याच तालावर डुलत होते जणू शरीराचा एक एक अंग संगीतमय झालाय. k मी दारातून उठून डब्यात मित्राला जाऊन काय काय दिसलं याची संक्षेपात चर्चा करून परत जागेवर येऊन बसायचो. मी काही बोलायच्या आत तोच मला म्हणायचा “ पहिल का तू ? काय खाडी होती ती आणि काय वनराई ! व्वा ! कोकण रेल्वे कमाल आहे !’’ हाच कोकण रेल्वेचा प्रवास आम्हा दोन मित्रांना हजार किलोमिटरवरुन ओढून घेऊन आला होता. आणि त्यात एक मित्राचे वय तर ८० च्या जवळ. दोन वर्षाचा असताना पासूनच औरंगाबाद ते वैजापूर रेल्वे प्रवास असो का तेरा वर्षांचा असतानाचा भुसावळ ते कलकत्ता प्रवास. बत्तीस वर्षाचा असतानाचा कालची आमची विमान सफर असो कि आजचा हा कोंकण प्रवास. सगळं भटकायला मिळालं या माझ्या जिगरी मित्रामुळेच. nil तसं पाहिलं तर थोडंथाडक नाही आमचं अंतर पन्नास वर्षाचं. त्यात नात्याने सख्ये आजोबा. पण त्याच्या सहवासात हे अंतर कधी जाणवत नाही. काल माझा आणि मित्राचा पहिला विमान प्रवास. मित्राची हि विमानवारी म्हणजे त्याच्या यशस्वी आयुष्याचे उत्तुंग शिखर. परिस्तितीशी दोन हात केले. बालपणी मातृ छत्र हरविले. थोड्या दिवसांनी वडील गेले. मावशीकडे घरकाम करून राहिले आणि शिक्षण पूर्ण केले. जवळ पैसा अडका नाही कि पाठीशी मायबाप नाही. जिद्दीने शिक्षकी मिळवली ती टिकवली. स्वबळावर लग्न केले. त्याकाळात लग्न झाले नोकरी झाली कि बाकी काही करायची गरज नसायची. तरीही एम ए पूर्ण केले. हिंदी विषयात विद्वान झाले. सख्यासोबात्याला मदत केली, मित्र जमवले, खूप फिरले, आवडीपुरते संगीत उपभोगले, अध्यात्म हि केले परंतु कुठे याचा गाजावाजा नाही.भयाण गरिबी भोगून पण निवृत्ती नंतर स्वतः पैसा खर्च करून दत्तमंदिर उभारले आणि संसारिक असक्तीकडून योग्य वेळी विरक्ती पण स्वीकारली. एव्हडी सगळी जीवनाची शोभायात्रा पाहिलेल्या माणसाला हा सर्व प्रवास खूप शोभत होता. rm माझा जरी हा विमान प्रवास पहिला असला तरी मला काही उमगत नव्हते. त्यामानाने मित्र जाम खुश. मी मात्र हा विमान प्रवास काही न करताच अनुभवत होतो.सगळं काही आयत मिळालेलं. कुठे कष्ट करायचे म्हणजे काय करायचे असते ते अजून कळत नाही.आर्थिक असो व इतर, कसली काळजी नाही न जवाबदारी नाही. पैसे कमावतो पण आपण का जगतो हेच कळत नाही. जवाबदारी काय हे उमगत नाही आणि आयुष्य कसं जगायचं ह्याचा विचार नाही. हे माझच नाही तर माझ्या पिढीतल्या अनेकांचं. हे विचारांचे जाळे दम गुदमरवून टाकतात कधी कधी आणि मग मी सरळ हा माझा मित्र गाठतो. जमलं तर फिरायला निघतो. सल्ला घेण्याची गरज नाही पडत फक्त सहवास मिळाला कि मार्ग दिसायला लागतात. कोकण रेल्वे खूप सुंदर तर आहेच पण त्याहीपेक्षा सोबतीने तो प्रवास अजून मजेदार वाटायला लागतो. मंगलोर पासुन सुरु झालेली पाच सहा तासांची हि मैफल शेवटी मडगाव येथील स्टेशन वर येऊन संपली. इच्छा नसताना गाडीतून उतराव लागलं. शक्यतो रेल्वेची स्वच्छता पाहून कधी गाडीतून उतरू असं व्हायला लागतं. स्टेशन सोडताना सहज एक गाडीवर नजर मारावी म्हणून पाहिलं तर एका थकलेल्या कलाकाराचे समाधानी भाव गाडीवर दिसत होते. दमछाक झालेली ती गाडी सौंदर्य आणि संगीतच नव्हे तर मला विचारांच्या वेगळ्याच जगात घेऊन गेली होती. nm
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8131
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

फारच भन्नाट वर्णन केलंत राव तुम्ही. माझ्या सारख्या कायम दुष्काळी भागात राहणाऱ्या माणसाला हा कोकण रेल्वेचा प्रवास करावासा वाटू लागलाय. आजोबांना आठवणीने नमस्कार सांगा.

आवडले! तुमच्या मित्राला आणि तुम्हाला पुढच्या अनेक सुखदायी आणि मजेशीर प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!! Sandy

dm मंगलोर स्टेशन k रिकामी गाडी rk हिरवीकंच शेती df नखरेल नदी hd वाकून छेडणारे नारळाचे झाड sknxs आभाळापेक्षाही नीळ पाणि...अजस्त्र खाडी fg sym गर्दी विरहित स्टेशन cb मडगाव dh

In reply to by हृषीकेश पालोदकर

आता प्रतिसादात दिसले फोटो.. सुरेख फोटो आहेत.

थोडक्यात केलेले आजोबांचे व्यक्तिचित्रण आणि कोकण चे निसर्गचित्रण आवडले.

In reply to by अमितदादा

:-)

फोटो प्रतिसादात दिसले, तुमच्या सच्च्या मित्राचे अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा, हा वसा तुम्ही तुमच्या नातवापर्यंत नक्की पोहोचवाल अशी खात्री आहे. आजोबाविना नातु नाखु

माझं पण माझ्या आजोबांशी असं नातं आहे .वय ८७+. आईचे वडील . अजूनही सगळं बोलू शकतो त्यांच्याशी सगळं शेयर करू शकतो .ते बरेच फिरले पण २ वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या बहिणीला परदेशात घेऊन जायचं होता तिला फिरवायचं होत हौस . नशिबाने मी तेव्हा तिथेच होतो माझा भाऊ त्यांना तिथे दोघांना घेऊन आला लहान मुलाप्रमाणे त्यांनी परत बहिणीला सिंगापुर दाखवलं जे आठवेल ते सांगितलं मला आणि भावाला बोलण्याची संधी ना देता . हे सर्व ८५ व्या वर्षी .केवळ बहिणीने पाहाव म्हणून . तुमच्या आजोबाना दीर्घायुष्य लाभो

In reply to by वरुण मोहिते

धन्यवाद. तुमच्या आजोबांचा उत्साह आणि स्मरणशक्तीला मानायला पाहिजे, खरच कमाल आहे. कृपया त्यांना माझ्यातर्फे नमस्कार सांगा.

मला तुमचा हेवा वाटतो.आईकडचे आजोबा जन्माआधीच नि बाबाकडचे 13 वर्षांपर्यंत मिळालेत मला.तुमचे आजोब असेच तरुण राहुदेत,ही शुभेच्छा. एकदा मडगाव-मंगलोर असा लोकल प्रवास ऐन पावसाळ्यात केला होता.भन्नाट अनुभव होता. फोटो सुरेख.

In reply to by मोदक

काहीतरी गडबड होतीये. काहींना फोटो दिसत आहेत आणि काही जणांना दिसत नाहीयेत. मी १३ नोव्हेंबर ला प्रतिसादामध्ये फोटो टाकले आहेत. पण परत पुन्हा लावायचा प्रयत्न करतो .

In reply to by संजय क्षीरसागर

गैरसोयीसाठी दिलगीरी. पुन्हा लावायचा प्रयत्न करतो . (मी १३ नोव्हेंबर ला प्रतिसादामध्ये फोटो टाकले आहेत.ते दिसत असावेत बहुदा)

खुप सुंदर !!! चित्रदर्शी प्रवास वर्णन वाचुन, फोटो बघायची तीव्र इच्छा आहे.