Skip to main content

मक्केतील उठाव ४

मक्केतील उठाव ४

Published on शनीवार, 15/10/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
आधीचा भाग ३ मशिदीचा नकाशा सौदी अरेबियाच्या वेळेनुसार बुधवारी (२१ नोव्हेंबर १९७९) रात्री उशिरा दळणवळण बंदी (अर्थात कम्युनिकेशन ब्लॅकआउट) उठवण्यात आली. मग थोडी फार खरी हकीकत लोकांच्या कानावर येऊ लागली. सौदी अरेबियाचे राज्यकर्ते ह्या नात्याने सौदी राजघराणे हे इस्लामच्या सर्वात पवित्र स्थळाचे विश्वस्त बनलेले आहेत. त्यातून त्यांना प्रत्येक वर्षी अब्जावधी डॉलर्स महसूल मिळतो. तेलाचे भाव कमी जास्त होतात पण जगभरातून येणारे इस्लामी भाविक प्रत्येक वर्षी वाढत्या संख्येने येतात त्यामुळे उत्पन्नाचा हा स्रोत कधीच आटत नाही. अनेक इस्लामी देशांना हे खुपते. तमाम इस्लाम देशांची एक संघटना बनवावी आणि तिला ह्या तीर्थस्थळांचे विश्वस्त बनवावे अशी एक मागणी मधून मधून डोके वर काढत असते. जर ह्या हल्ल्याचे प्रकरण असेच चिघळत राहिले असते तर ही मागणी करणारे लोक हे अजून एक कारण देऊ शकले असते. त्यामुळे सौदी सरकारला तातडीने ह्या संकटाचे निवारण करणे आवश्यक होते. कितीही पैसे, मेहनत खर्च झाली तरी ती करणे आवश्यक होते. अनेक इस्लामी लोकांचा हाही एक आक्षेप असतो की सौदी घराणे हे कुरेशी घराण्याशी संबंध नाही. प्रेषित महम्मद हा कुरेशी घराण्याचा. तेव्हा मक्का आणि मदिना ह्या स्थानांची जबाबदारी कुरेशी घराण्यातच असली पाहिजे. हाही एक नाजूक मुद्दा आहे. तो इतका सहजासहजी निकालात काढता येत नाही कारण प्रेषिताशी संबंधित आहे. त्यामुळे शाही मशिदीचे प्रकरण हा मोठा बाका प्रसंग होता. सुरवातीला सौदी सरकारने असे ठरवले की हा अंतर्गत मामला आहे त्याकरता सैन्याची मदत घ्यायची नाही. पोलिसदलाच्या मदतीने ह्याचा बंदोबस्त करता येईल. सुरवातीला सरकारने अगदी जपून हल्ला करायचे ठरवले. तोफांतून नुसतेच आवाज आणि प्रकाश निर्माण करणारे बहुतांश निरुपद्रवी गोळे झाडून मशीदीतील अतिरेक्यांना गोंधळात टाकायचे आणि त्याचा फायदा घेऊन बाब अल सलाम (शांतता फाटक) ह्या गेटमधून प्रवेश करायचा आणि पुढच्या सैन्याचा टोळीला घुसण्याचा मार्ग करून द्यायचा असा बेत होता. पण ह्या निरुपद्रवी तोफहल्ल्याचा अतिरेक्यांवर काहीही परिणाम झाला नाही. ते चांगले कसलेले सैनिक होते. पहिली टोळी गेटच्या जवळ येताच मिनारावरील नेमबाजांनी काही मिनिटात त्या सगळ्यांवर अचूक गोळ्या झाडून बहुतेक सगळ्यांना ठार केले. दोन चार लोक वाचले ते कसेबसे आसपासच्या लोकांच्या मदतीने खुरडत निसटले. मग एका सैन्याच्या तुकडीला बोलावले गेले. त्यांच्या सेनापतीने राजपुत्र नाएफ ह्याला आपला बेत सांगितला की अंधार पडल्यावर आम्ही हल्ला करतो. पण ते राजपुत्राला आजिबात आवडले नाही. "तू खरोखरचा मर्द आहेस का कोण आहेस?" असे काहीसे विचारुन त्याला खजील केले. ते ऐकताच नाखुशीने सेनापती लगेच हल्ला करायला तयार झाला. सैन्याने कसेबसे लपतछपत मारवा गेटजवळ सुरुंग पेरले. त्यांचा स्फोट करुन ते मजबूत गेट मुळापासून उखडले. पहिल्या तुकडीने मशिदीत प्रवेश केला. मारवा गेट ते सफा गेट असा एक अंतर्गत मार्ग आहे त्यावर ते चालू लागले. काही काळ सामसूम होती. पण सैन्य योग्य ठिकाणी येताच अतिरेक्यांनी त्यांना खिंडीत गाठावे तसे गाठले आणि सर्व बाजूंनी गोळीबार केला. ह्या हल्ल्यात खुद्द माहदी मानला जाणारा महंमद अब्दुल्ला हा नेतृत्त्व करत होता. त्या भयंकर कोंडीतून सुटणे कुणाला शक्य झाले नाही. सगळी तुकडी मारली गेली. त्यांच्या मदतीला दुसरी तुकडी धावली तिचीही तशीच गत झाली. असला भयंकर रक्तपात झाला पण बाहेरच्या जगात ह्यातले काही समजले नाही. कुठल्याशा अनाकलनीय कारणाने २२ नोव्हेंबर १९७९ च्या गुरुवारी सौदी सरकारने असे जाहीर केले की मक्का मशीद अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवण्यात यश आले आहे. आता सगळे ठीक आहे! एका मंत्र्याने सांगितले की "हा संपूर्ण विजय अगदी संपूर्ण नाही. शेवटचे वळवळणारे शेपूट उरले आहे ते संपवले की ही कारवाई खरोखर पूर्ण होईल." मग काय? सगळ्या मुस्लिम जगतातून सौदी सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पाकिस्तानातून झियाने सौदीला तार धाडली "आम्हा सर्वांना एक सुटकेचा आनंद होतो आहे आणि धन्य वाटते आहे की सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेने आपल्या सैन्याने त्या कृष्णकृत्य करणार्‍यांना पराभूत केले". "तमाम इस्लामी भक्तगणांना पुन्हा मुक्तपणे शाही मशिदीत प्रार्थना करता येणार आहे आणि ह्याचे सगळे श्रेय आपणालाच जाते". सुरवातीला अमेरिकेलाही हे खरे वाटले. पण पुन्हा तोच हेलिकॉप्टर पायलट! त्याने अशी खबर आणली की तो जेव्हा शाही मशिदीजवळ घिरट्या घालत होता तेव्हा त्याला सर्वत्र सामसूम आढळली. भाविक लोक वगैरे कुणी दिसले नाहीत. आसपासच्या रस्त्यांवर मोठा बंदोबस्त होता. ही विजयाची बातमी खरी नसावी. हे ऐकून अमेरिकन सरकार बुचकळ्यात पडले. अजूनही इस्लामी जगात हे सगळे अमेरिकेचेच कारस्थान आहे असा समज होताच. बांगला देशमधे अमेरिकन दूतावासावर मोठा जमाव मोर्चा घेऊन गेला. तिथे काही अघटित घडू शकले असते. पण सुदैवाने जवळच्या सौदी दूतावासातील अधिकारी जातीने तिथे उपस्थित होते. त्यांनी लोकांना साकडे घालून सांगितले की अमेरिकेचा ह्या हल्ल्याशी काही संबंध नाही. आणि परिस्थिती नियंत्रणात आली. २३ तारखेला शुक्रवार. हा जगभरातील मुस्लिमांचा पवित्र दिवस (यौम अल जुम्मा अर्थात एकत्र येण्याचा दिवस!) . मक्केतील शुक्रवारचे व्याख्यान इस्लामी जगात रेडियो आणि टीव्हीद्वारा प्रसारित होत असे. पण ह्या शुक्रवारी अघटित घडले. मक्केतून काहीही प्रक्षेपण झाले नाही. त्याऐवजी रियाधच्या इमामाने धार्मिक प्रवचन दिले. मग तमाम इस्लामी जगतात खळबळ माजली. पण अतर्क्य गोष्ट अशी की सगळा संताप हा अमेरिकेविरुद्ध होता! त्यात सौदी सरकारने ह्यात अमेरिकेचा काही हात नाही असे स्पष्ट बोलणे टाळले. सौदी सरकारला अमेरिकेचा राग आला होता कारण त्यांनी अगदी मंगळवारीच मक्केवर हल्ला झाल्याची बातमी छापून सौदी सरकारची नाचक्की केली होती. एका राजपुत्राचे वाक्य असे होते की "इतक्या कमी वेळात अमेरिकन सरकारने ह्या हल्ल्याची प्रतिक्रिया दिली की इतरांना अशी शंका येणे स्वाभाविकच आहे की ह्यांना हे आधीच माहित होते की काय?" शुक्रवारी ढाक्यात पुन्हा दंगा उसळला. पण तो कसाबसा नियंत्रणात आला. कलकत्त्यात इंदिरा गांधींनी ह्या आगीवर आपली पोळी भाजायचे ठरवले. त्यांनी स्थानिक मुस्लिम लोकांना चिथावणी देऊन कलकत्यातील अमेरिकन कॉन्सुलेटवर दगडफेक करवली. प. बंगालमधे कम्युनिस्ट सरकार होते त्यांना नामोहरम करायची ही एक संधी म्हणून काँग्रेसने हे केले. सुदैवाने कलकत्त्यातील पोलिसांनी अश्रूधूर वापरुन दंगल काबूत आणली. अनेक डझन लोक जखमी झाले. दक्षिणेत हैद्राबादेत अमेरिकन वकिलात वगैरे काही नव्हती. मग तिथल्या लोकांनी हिंदू दुकानांवर हल्ले केले. लुटालूट, दगडफेक वगैरे कार्यक्रम केले. मग सरकारने संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली. यानंतर अमेरिकन सरकारने सौदी सरकारवर जोरदार दबाव आणणे सुरू केले आणि शेवटी नाईलाजाने सौदी सरकारने असे निवेदन दिले की मक्केवरील हल्ल्यात अमेरिका आणि इराण ह्यांचा काहीही सहभाग नाही. हे सगळे सौदी नागरिकांनीच घडवून आणलेले आहे. आणि मग हे जगभरातील दंगे थांबले. ह्या मक्केच्या हल्ल्याचे असे जीवघेणे पडसाद जगभर उमटले. सौदी सरकारचा खोटारडेपणा आणि मानीपणा ह्याची मोठी किंमत अमेरिका आणि भारतासारख्या देशांना भोगावी लागली ज्यांचा ह्या हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता. मक्केतील हल्लेखोर पुरेपूर तयारीत होते. दारूगोळा आणि अन्नपाण्याचा मोठा साठा त्यांच्याकडे होता. सगळ्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतलेले होते. आणि धार्मिक उन्माद असल्यामुळे इच्छाशक्ती जबरदस्त होतीच. ओलिस असणार्‍या यात्रेकरूंचे मात्र हाल होते. हल्लेखोरांनी ताब्यात घेतलेल्या मशिदीच्या भागात स्वच्छतागृहे नव्हती. त्यामुळे कुठल्याशा खोलीतच लोकांना ते विधी करावे लागत. थोड्याच वेळात तो परिसर दुर्गंधाने भरून गेला. हल्लेखोरांना ह्याची काडीचीही पर्वा नव्हती. आता इस्लामचे शुद्ध राज्य येणार आहे ह्या विचाराने ते भारून गेलेले होते.
लेखनप्रकार

याद्या 23984
प्रतिक्रिया 40

लेख मालिका वाचतोय !!!! प्रतिसाद दर भागाला देत नसलो तरी वाचतोय. चांगली लेख मालिका

कलकत्त्यात इंदिरा गांधींनी ह्या आगीवर आपली पोळी भाजायचे ठरवले. त्यांनी स्थानिक मुस्लिम लोकांना चिथावणी देऊन कलकत्यातील अमेरिकन कॉन्सुलेटवर दगडफेक करवली.
याला काही पुरावा? एक तर तेव्हा त्या पंतप्रधान नव्हत्या. त्या १९८० मध्ये झालेल्या निवडणुका जिंकून परत पंतप्रधान झाल्या. ही घटना नोव्हेंबर १९७९ मधली आहे.आणि बंगालमध्ये सत्तेवर असलेले कम्युनिस्ट आणि केंद्रात सत्तेवर असलेले जनता पक्षाचे सरकार हे कितीही अमेरिकाविरोधी असले तरी या कृत्याचा मोठाच परिणाम झाला असता. इंदिरा गांधींसारख्या महापाताळयंत्री राजकारणी असली गोष्ट उघडपणे, कोणाच्याही लक्षात येईल अशा प्रकारे करतील हे जरा खटकतं.

In reply to by बोका-ए-आझम

+१. इंदिरा गांधींनी इतक्या फुटकळ प्रकाराला थारा दिला नसता. अमेरिकेला शह त्यांनी दिला, पण तो श्रीलंका आणि पूर्व पाकिस्तान संबंधात.

In reply to by बोका-ए-आझम

इंदिराजी व काँग्रेसचे नाव घालून तुम्ही का पोळी भाजून घेताय ?

In reply to by बोका-ए-आझम

जनता पार्टीची पडझड त्याआधी केव्हाच सुरू झालेली होती. १९८० जानेवारीत निवडणूका होऊन त्यात इंदिरा गांधी दणदणीत जिंकल्या आणि पुन्हा सत्तेवर आल्या. १९७९ नोव्हेंबरमधे हे सगळे स्पष्ट होऊ लागले असणार. त्यामुळे इंदिराबाई सत्तेवर नसल्या तरी पुन्हा प्रबळ होत होत्या. निवडणूकांच्या आधी त्यांनी दिल्लीच्या इमामाची भेट घेऊन एक दहा कलमी कार्यक्रम मुस्लिमांच्या भल्यासाठी राबवायचे कबूल केले होते. त्यामुळे त्यांच्या निवडणुकांच्या डावपेचात मुस्लिम लांगूलचालन हा एक महत्त्वाचा भाग होता. १९७१ च्या बांगला देश निर्मितीनंतर कदाचित पश्चिम बंगाल व बांगला देश ह्यांतील संबंध जास्त घट्ट झाले असतील त्यामुळे ढाक्यातील दूतावासावरील हल्ल्याचे पडसाद कलकत्त्यात जास्त उठले. माझ्याकडे त्या काळातील वर्तमानपत्रे उपलब्ध नाहीत. पण एवढे परिस्थितीजन्य पुरावे माझ्या लेखी पुरेसे आहेत. इंदिरा गांधी ह्या पूर्णपणे राजकारणी होत्या. आपल्या फायद्यासाठी त्यांनी अनेक वाईटसाईट गोष्टी केलेल्या आहेत. इंदिरा इज इंडिया असे म्हणणार्‍यांचा तो काळ होता. त्यामुळे काँग्रेस इज इंदिरा म्हणायला काहीच हरकत नसावी. काँग्रेसचे प्रत्येक धोरण हे इंदिराबाईंच्या देखरेखीखालीच ठरत होते.

In reply to by हुप्प्या

त्या काळातील वर्तमानपत्रे उपलब्ध नाहीत. पण एवढे परिस्थितीजन्य पुरावे माझ्या लेखी पुरेसे आहेत छान !

In reply to by हुप्प्या

https://en.m.wikipedia.org/wiki/Attacks_on_U.S._diplomatic_facilities यात १९७९ च्या कलकत्ता हल्ल्याचा उल्लेखही नाहीये. २००२ चा अमेरिकन कल्चरल सेंटरवर केलेला हल्ला आहे. विकीपिडिया हा १००% विश्वासार्ह नाही, हे मान्य आहे. त्यामुळे निश्चित असं काही सांगता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

कॉन्सुलेटवर मोर्चा काढला होता. तो हिंसक होता. पण पोलिसांनी तो आटोक्यात आणल्याने कॉन्सुलेटवरील हल्ल्यात त्याचे रुपांतर झाले नाही अशी माझी माहिती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कॉन्सुलेटचे काहीही नुकसान झाले नव्हते. त्यामुळे हल्ला म्हणून दखल घेण्याइतका तो महत्त्वाचा नव्हता. असो. लेखाचा मुख्य विषय तो नाही.

In reply to by बोका-ए-आझम

जनता पार्टीची पडझड त्याआधी केव्हाच सुरू झालेली होती. १९८० जानेवारीत निवडणूका होऊन त्यात इंदिरा गांधी दणदणीत जिंकल्या आणि पुन्हा सत्तेवर आल्या. १९७९ नोव्हेंबरमधे हे सगळे स्पष्ट होऊ लागले असणार. त्यामुळे इंदिराबाई सत्तेवर नसल्या तरी पुन्हा प्रबळ होत होत्या. निवडणूकांच्या आधी त्यांनी दिल्लीच्या इमामाची भेट घेऊन एक दहा कलमी कार्यक्रम मुस्लिमांच्या भल्यासाठी राबवायचे कबूल केले होते. त्यामुळे त्यांच्या निवडणुकांच्या डावपेचात मुस्लिम लांगूलचालन हा एक महत्त्वाचा भाग होता. १९७१ च्या बांगला देश निर्मितीनंतर कदाचित पश्चिम बंगाल व बांगला देश ह्यांतील संबंध जास्त घट्ट झाले असतील त्यामुळे ढाक्यातील दूतावासावरील हल्ल्याचे पडसाद कलकत्त्यात जास्त उठले. माझ्याकडे त्या काळातील वर्तमानपत्रे उपलब्ध नाहीत. पण एवढे परिस्थितीजन्य पुरावे माझ्या लेखी पुरेसे आहेत. इंदिरा गांधी ह्या पूर्णपणे राजकारणी होत्या. आपल्या फायद्यासाठी त्यांनी अनेक वाईटसाईट गोष्टी केलेल्या आहेत. इंदिरा इज इंडिया असे म्हणणार्‍यांचा तो काळ होता. त्यामुळे काँग्रेस इज इंदिरा म्हणायला काहीच हरकत नसावी. काँग्रेसचे प्रत्येक धोरण हे इंदिराबाईंच्या देखरेखीखालीच ठरत होते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

छान चालली आहे लेखमालिका. पुभाप्र.
सहमत. बरीच नविन व कधीही वाचनात न आलेली माहिती मिळतेय. धन्यवाद.

भिंद्रनवाले वगैरे अतिरेकी शीख मंडळींचा अकाली दलाविरुद्ध वातावरण तापवण्याकरता इंदिरा गांधींनी वापर केलाच होता. पुढे ते प्रकरण जड गेले आणि त्यात इंदिराजींचाच बळी गेला हा इतिहास आहे. तेव्हा धार्मिक भावनांचा राजकारणाकरता वापर करून आपली पोळी भाजून घ्यायची इंदिराबाईंची एकमेव वेळ नव्हे.

In reply to by हुप्प्या

INDIA AFTER INDEPENDENCE या पुस्तकात पंजाबी सुभा, पंजाबचं विभाजन (पंजाब, हरियाणा आणि हिमाचल), आनंदपूर साहिब ठराव, ब्ल्यू स्टार, भिंद्रनवाले वगैरे विषयांवर चांगलं विवेचन आहे. पण तुम्ही म्हणताय त्याचे संदर्भ कुठे सापडले नाहीत. असो.

माहितीपूर्ण मालिका , वाचते आहे. स्वाती

मला ह्या दिवसाचा न्यू यॉर्क टाइम्स इंटरनेटवर सापडला. त्यात ही बातमी होती अधिकृत सूत्रांनी अशी माहिती दिली की कलकत्त्यातील अमेरिकन वकिलातीवरील दगडफेक ही मुस्लिम लीग आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेने मिळून घडवून आणली होती. ही जवळ आलेल्या निवडणूकीकरता खेळली गेलेली एक खेळी होती (टॅक्टिक). तेव्हा निदान न्यू यॉर्क टाइम्सचे तरी असेच म्हणणे होते.

In reply to by chitraa

मी माझ्या लायब्ररीचा सदस्य क्रमांक वापरून प्रोक्वेस्ट ह्या साईटवर जुन्या न्यू यॉर्क टाइम्सचा शोध घेतला. त्याची लिंक ही त्या लायब्ररीचे सदस्य नसाल तर चालणार नाही. २५ नोव्हेंबर १९७९ च्या पेपरात U.S. Aides Doubt Khomeini Can Incite Religious War: No Consistent Anti-U.S. Trend ह्या शीर्षकाची बातमी पाहिलीत तर त्यात हा तपशील आहे.

In reply to by हुप्प्या

लिंक कुठे आहे ? लिंक इतराना ओपन नसेल होत तरी बातमीचे पेज तुम्ही ओपन करुन त्याचे डेस्क्टॉप प्रिंट स्क्रीन करुन ते पेंट फाइलात पेस्ट करून निदान ते इथे देऊ शकालच की.

In reply to by हुप्प्या

अमेरिकेने खोमेनीबाबत शंका घेतली , इतकेच तुम्ही लिहिले आहे. इंदिरा गांधी , काँग्रेस व कलकत्ता दंगल कुठे आहे ?

In reply to by हुप्प्या

अमेरिकेने खोमेनीबाबत शंका घेतली , इतकेच तुम्ही लिहिले आहे. इंदिरा गांधी , काँग्रेस व कलकत्ता दंगल कुठे आहे ?

In reply to by chitraa

https://goo.gl/photos/AsxfVkk5natq3d348 हा लेख हा असे म्हणतो की सध्या उफाळलेला अमेरिकाविरोध हा निव्वळ धार्मिक नाही. काही ठिकाणी त्याला राजकीय पैलू आहेत. जसे कलकत्त्यातील दगडफेक, इंदिरा गांधींनी मुस्लिम लीगला फूस देऊन घडवून आणली.

हुप्प्याशेठ, पहिली चूक म्हणजे तुम्ही आधीच एका महान शांततावादी,कोणाच्याही हत्ये चे कुठल्याच कारणाने समर्थन न करणाऱ्या धर्माची दुखरी बाजू वर आणत आहात. त्यात सेक्युलरांच्या लाडक्या अशा पक्षाला आणि महान घराण्याच्या वंशजांना चर्चे मध्ये आणता आहात. म्हणजे तुम्ही किती मोठा प्रमाद करता आहात हे तुमचे तुम्हाला तरी कळते आहे काय ?

In reply to by lakhu risbud

बदनामी करु देत हो ... ती तर वर्षानुवर्षे सुरुच आहे.. पण पुरावे महत्वाचे आहेत... आधी बोल्ले ... फक्त परिस्थितीजन्य पुरावा आहे. मग अमेरिकेतला पेपर .... पण त्याची लिंक नाही. मायबोलीवरही , १९७१ ची निवडणूक जिंकण्यासाठी इंदिराजीनी १९७१ चे भारत पाक युद्ध लढले व त्या सहानुभूतीवर त्या इलेक्शन जिंकल्या , असे स्टेटमेंट केले होते.. पण इलेक्शन आधी जानेवारी मार्च ७१ ला झाली व युद्ध नंतर डिसेंबरात झाले , हे इतर जाणकारानी सांगितल्यावर ते महोदय गायब झाले. तसे काही होऊ नये , ही अपेक्षा.

हुप्प्याभाउ, एक सजेस्शन आहे. अशा मालिकेत स्थानिक राजकारण आणलत की मुख्य विषय दूर राहून इंदिरा गांधींवरच वाद सुरू होतो. ते टाळता आलं तर बघा.

अधर्म - युद्ध तसेच एका तेलियाने ह्या कुबेरांच्या पुस्तकांमध्ये मक्केवरील हल्ल्याचा उल्ल्लेख आहे ...छोटे प्रकरण च आहे म्हणा ना

मस्तच आहे लेखमाला. एकदम ओघवती. मागील भागांप्रमाणेच पुढील भागांच्यासुद्धा लिंक्स द्याव्यात. शिवाय अजून थोडी चित्रे चिकटवली तर रंगत वाढेल.