आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं...
लेखनविषय:
आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं, कि जरा भीती वाटते....
खरंच.. नाही शब्दात सांगता येत, कि नेमकी किती वाटते...
म्हणजे बघ ना.. आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि चंद्र, रात्र ह्या सार्यांना टाळून कसं चालेल..?
आणि टाळलंच तर साधं पान तरी कसं हालेल..?
आता पान हललं कि पानगळ ठरलेली.. मला उद्ध्वस्त करणारी वादळं ठरलेली..
आणि माझ्या रात्रीला तुझ्या स्वप्नांची झळ सुद्धा ठरलेली..
सोसत बसते मग बिचारी मग जेवढं सोसणं होत...
मग काय, पुन्हा आभाळ भरून येतं..
बरसू लागतात मग सरींवर सरी..
आणि प्रकर्षानं आठवू लागते तुझ्या-माझ्यातली दरी..
त्या दरीचं एक टोक तू आणि मी एक टोक..
मी व्यवहारात नेहमीच मार खायचो, तुझं मात्र नेहमीच चोख..
म्हणजे बघ ना.. पाहिलेली स्वप्नं, वाहिलेले अश्रू.. सारं कसं तोलूनमापून..
आमचं सारंच अघळपघळ.. सतत हातात काळीज कापून..
आता वाटतंय तेंव्हाच सारा हिशोब जमायला हवा होता..
तोच तर ह्या वर्तमानाचा भविष्याशी असणारा दुवा होता..
हक्कानं रहायला जावं तीच अनोळखी वस्ती वाटते..
.
.
.
खरंच...
हल्ली तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि जरा भीती वाटते..
-चेतन दीक्षित
वाचन
3697
प्रतिक्रिया
0