पाचोळा -२
पाचोळा -१
क्षणार्धात पायाखालची जमीन सरकली.एक बाई आणि दोन लहान मुली माझ्याकडे पाठ करुन बसलेल्या होत्या.हातातला पाण्याचा तांब्या दणक्कन खाली पडला आणि माझं लक्ष विचलित झाले त्या निमिषार्धात खोली पूर्ण रिकामी होती.तिथे आता कोणीच नव्हतं. मला भास झालेला का? मी लाइट तसाच चालू ठेउन बाहेर उभा राहिलो.खोलित परत जायची हिंमत होत नव्हती.पण पाच दहा मिनिटांनी मनानेच समजून घातली झोपेत कदाचित भास झाला असावा.एक सेंकदभर फार तर दिसले आपल्याला नक्कीच मी झोपेत असणार.मी परत खोलीत आलो.आता तिथे काहीही नव्हते, तसाच बल्ब चालु ठेवला,आणि पडून राहिलो अजूनही धडधडत होतें जाणो परत काही घडलं तर पण नंतर काहीच झाले नाही. सकाळी जाग आली तेव्हा डोकं प्रचंड दुखत होतं.थोडासा ताप जाणवत होता.बाहेर गडी आलेले होते.चहा नाष्टा आटोपल्यावर देशमुखांजवळ मी विषय काढला.काका काल रात्री तुम्ही जागे होतात का? बरं वाटत नव्हतं का? देशमुख माझ्याकडे रोखून बघत म्हणाले नाही. का काय झाले तु जागा होतास का? त्यांचे ते रोखून बघणे मला विचित्रच वाटले.नाही कण्हण्याचा आवाज येत होता म्हणून विचारले.
पुढचा एक आठवडा विशेष काहीच घडले नाही. गड्यांनी वाड्याचा वरचा भागही साफ करुन घेतला,पण बर्याच खोल्या बंद होत्या.देशमुखांमध्ये जाणवण्याएवढा बदल होत होता.आता रोजचे त्यांना मटण लागत होते.( नक्की मटणच होते ना ते? आदिवास्यांकडे ना मला कधी कोंबडी दिसली ना बकरी) इतका अशक्तपणा असूनही कसलितरी उर्जा त्यांच्यात संचारलेली होती.दिवसदिवस ते वरच असायचे.एकदा सहज म्हणून संध्याकाळी मी जिन्याने वर आलो.(न विचारता)वर देखिल सहा सात खोल्या होत्या,एका खोलित दिवा जळत होता,आत कोणीतरी वावरत होते का?( देशमुख असावेत) आणि कसलासा जळपट वास येत होता. तेवढ्यात मागुन देशमुख ओरडले, तु कशाला वर आलास मुर्खा, जेवढे सांगितले तेवढेच करायचे समजले? जा खाली.जेवणाचे बघ.अचानक आलेल्या आवाजाने दचकलो.देशमुखांचे डोळे लालसर झालेले होते,जिभ तोंडातल्या तोंडात वळवळत होती.मी तसाच पटापट खाली उतरलो.देशमुख माझ्या मागे होते तर खोलित कसला वावर मला जाणवला? वाड्यात काहितरी नक्कीच विचित्र प्रकार सुरु होता.आणि मला त्यापासून जाणीवपूर्वक दुर ठेवले जात होते.रात्रीची जेवणे आटोपली.देशमुखांना त्यांच्या खोलित ऒषधे देउन पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडायची परवानगी मागितली.जा पण लवकर या,बाहेर वातावरण खराब आहे तुमच्या सारखे शहरात वाढलेले इथे टिकत नाहीत.हॅ हॅ,देशमुख स्वतः शिच बोलल्यासारखे पुटपुटले,पण दुसर्याच क्षणी दचकून त्यांची नजर माझ्या गेली,अाणी चेहरा पांढराफटक पडला.मीही पटकन मागे पाहीले खोलीबाहेर कोणीच नव्हते.
तसाच बाहेर पडलो.आकाशात हलकेच गडगडत होतं मध्येच एखादी वीज लख्खकन चमकून जात होती.बाहेरून एकदा वाड्याकडे नजर टाकली,आणि एक हलकी शिरशिरी येऊन गेली.काहीतरी वेगळ्याच प्रकारात मी हळूहळू ओढला जात होतो.इथुन पळून जायचे का?असाही विचार मनात आला.अगदी आहे त्या अवस्थेत.पण नको आयुष्यात तसही काही उरलेलं नव्हतं. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते.पण इथे जे घडतय, त्यात मलाही कुठेतरी भितीयुक्त उत्सुकता वाटायला लागली होती.वाड्याभोवती धुके पसरायला लागले आणि मी विचारांच्या तंद्रीतुन बाहेर आलो. मागल्या माळरानातुन धुक्याचे लोट येत होते.त्यात वाडा हळूहळू दिसेनासा व्हायला लागला.काहीतरी घडणार होते का? मी झपाझप दिंडीदरवाजातुन आत शिरलो.आणि विहिरीपाशी समोर काहीतरी आकार घेत होतं.माझे पाय जणु गोठलेच.विहीरीतुन गाठोड्यांसारखं काहीतरी वर आले, ते तिन गोळे धापक्कन खाली पडले आणि सरकत सरकत बागेच्या दिशेने जायला लागले.वातावरण हुडहुडी भरेल असे गार पडलेले होते.मी दरवाजा घट्ट धरुन उभाच होतो.काहीतरी हमहमहमहम अशी अगम्य गुणगुण ऎकु येत होती.कोणीतरी खुसखुसत होतं,अचानक वीज चमकली आणि उजेडात समोरचे द्रुष्य दिसले,ते गोळे नव्हतेच.मानवी आक्रुती सरपटत वाड्यामागे जात होत्या या आधीही दिसलेली एक बाई आणि दोन लहान मुली.परमेश्वरा,मेंदूवर हातोड्याने वार केल्यासारखे आघात होत होते,मन पळून जाण्यासाठी ओरडत होतं पण सारे अवयव जणु दगड झालेले होते.किती वेळ असा गेला काही कल्पना नव्हती पण वाड्यातून देशमुखांची भयंकर किंकाळी ऎकु आली अाणी काचेला तडा जाउन ती खळ्ळकन फुटावी तशी सारी बंधने तुटली,मी धावत वाड्यात घुसलो.देशमुख ओरडत होते.त्यांच्या खोलीत जाउन लाइट लावला. खोली पाण्याने ओली झालेली होती,त्यात कुसलेली पाने पडलेली होती, देशमुख पलंगावरच वेडेवाकडे झालेले होते.मी आलेले पाहुन त्यांना धिर आला, ती आली ,परत आली, बंदोबस्त करायला हवा, बंधन तुटली, आता वेळ नाही असं काहीतरी आढ्याकढे बघत बडबडत राहीले.
सकाळ झाली ती सुद्धा ढगाळच,चहूकडे मळभ दाटून आलेले होते.देशमुखांना पहाटे झोप लागली. मी तर जागाच होतो.बाहेर आलो तर सगळीकडे पाचोळा पडलेला होता. विहिरीपाशी गेलो तर पाण्याचे थारोळे जमलेले होते, ते तसेच पसरत वाड्याभोवती गेलेले दिसत होते. मी समजून गेलो हे भास नाहीत.एकप्रकारे उत्तेजित झाल्यासारखे वाटत होते, माझ्या निरस आयष्यात काहीतरी थरारक (कदाचित जीवावर बेतणारे?) घडत होते.आता या प्रकारचा छडा लावायचाच हे मनाशी नक्की केले.गडी आल्यावर त्यांना सांगून बाहेरचे आवार आणि खोली झाडून घेतली.देशमुख वर त्यांच्या खोलीत होते. दुपारी जेवणाच्या वेळी त्यांनीच विषय काढला.काल काय झाले होते?तुला काही जाणवले का?मी मुदामुनच मला काही जाणवले नाही असेच सांगितले( मी खोटे का बोललो ? ) मी बाहेर शतपावली करत होतो, तेवढ्यात तुमचा आवाज ऐकला आणि धावत आलो,खोली पाण्याने भरलेली होती तुम्ही पलंगावर वाकडे तिकडे झालेले होतात, मला आता तरी कळेल काय इथे काय प्रकार सुरु आहे? (माझ्या आवाजाला पहिल्यांदीच थोडीशी धार चढलेली होती.
देशमुख त्यांचे लालसर डोळे बारीक करून मला पाहत राहिले. मग म्हणाले काही गोष्टी तुला सांगावयाच लागतील. या वाड्यात काही अनैसर्गिक शक्तींचा वावर आहे.त्याच्याच बंदोबस्तासाठी मी पुण्यात येऊन जाऊन असतो.काही महिन्यांसाठी त्यांना काबूत ठेवायला मला जमले होते, पण आता त्या पुन्हा जागृत झालेल्या आहेत.यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही.अजूनतरी जोवर तू त्यांच्या मार्गात येत नाहीस तुला काही त्रास नाही.(अजून तरी ?)मी आज पुन्हा पुण्याला जायला निघणारे.तुला नेता येणार नाही. वाड्याची जबाबदारी २ दिवसांकरता तुझ्यावर आहे.मी सांगितल्याप्रमाणे वर अजिबात पाउल ठेऊ नकोस. शक्यतो खोलीत राहा. रात्री अपरात्री तर अजिबातच बाहेर फिरू नकोस.गाडी तुला जेवणाचा डबा आणून देत जाईलच. बाहेर गेलास तरी संध्याकाळच्या आत परत येत जा. आणि पळून जायचा विचार असेल तर आत्ताच सांग, म्हणजे ह्या ह्या... त्यांचे ते भेसूर हास्य बघून किळस आली आणि कुठेतरी धोक्याची जाणीव पण झाली. माझी इथून सहजा सहजी सुटका होण्यातली नव्हती हे नक्की होते.चेहऱ्यावरचे भाव बदलू न देता मी म्हणालो, छे मला नोकरीची गरज आहे, मी घेईन माझी काळजी तुम्ही जाऊन या. या छोट्याश्या भेटी नंतर मी आपल्या खोलीत आलो. आता काहीतरी प्लान करावाच लागणार होता.हे प्रकरण खरेच गुंतागुंतीचे झालेले होते.अनैसर्गिक शक्ती? अजून तरी मला धोका नाही म्हणजे नंतर आहे का? त्या बाई चा आणि देशमुखांचा काय संबंध? या सर्व प्रश्नांची उत्तरे मला कदाचित वरच्या मजल्यावर सापडणार होती. आणि आता तशी संधीही चालून आलेली होती. संपूर्ण वाड्यात मी एकटाच होतो.
देशमुख निघाले एक गडी सोबत गेला.मला वर जायचेच होते.पण खुप काळजी घ्यावी लागणार होती.ती रात्र पण चित्रविचित्र स्वप्नांचीच होती.दुसर्या दिवशी नेहमीचे काम आटपुन गडी निघुन गेला,त्याला रात्री जेवण नको म्हणुन सांगितले,म्हणजे आता कोणीच येणार नव्हतं.मुख्य दरवाजा लावुन मी कोणी सरळ आत येणार नाही याची काळजी घेतली,आणी हिंमत करुन वर आलो.वर सर्व खिडक्या लावून घेतल्याने तसा काळोखच होता. कसलासा विचित्र वास येत होता.खुप जुन्या पोथ्या उघडल्यावर येतो तसा.पहीले माझी नजर एका मोठ्या कपाटा कडे गेली. त्याला चक्क किल्ली लागलेली होती ( देशमुख कुलुप लावायला विसरले होते की काय).मी हळूच ते कपाट उघडले. दार उघडतानाचा कर्रर्र आवाज पण त्या शांततेत केवढातरी वाटला.मी दचकुन तसाच उभा राहीलो. सर्व नीट आहे याची खात्री केल्यावर हातातल्या टाँर्च ने आत झोत टाकला. अख्खे कपाट जुन्या पुस्तकांनी, ग्रंथानी भरलेले होते.कसली पुस्तक आहेत हे पहायला काही पुस्तके मी बाहेर काढली,आणि हादरलोच.अघोरी विद्येचे पुस्तक होते ते,आत अनेक प्रकारचे विधी, मंत्र लिहिलेले होते.बाकी पुस्तके,ग्रंथ पण याच विषयावर होते.भयानक आक्रुत्या होत्या.नरबळींची चित्रे होती.कित्येक ग्रंथांच्या तर भाषा पण वेगळ्याच होत्या. देशमुख हा कसला अभ्यास करत होते?थरथरत्या हाताने मी कपाट बंद केले. त्या बाजूला दुसरेही एक कपाट होते.तेही उघडले, आतुन एकदम कुबट वास आला,इतका घाणेरडा की मला मळमळायला लागले, आत अनेक बरण्या, लहान गाठोडी, डबे होते. त्यातले एक गाठोडे उचलून खाली ठेवले,लिबलिबित असे काहीतरी होते, मनाची हिंमत होत नव्हती तरी तशाच त्या गाठोड्याच्या गाठी सोडवल्या आत कोणाचे तरी कापलेले केस वेणी सकट ठेवलेले होते,त्यावर जुनाट गजरा पण होता. घाबरुन मी दोन पावले मागे आलो.हाताला कंप सुटायला लागला.बाकी गाठोड्यात काय असावे याचा अंदाज आलेला होता. तसेच गाठोडे आत सरकवले.वर बरण्या होत्या. त्यावर बॅटरी मारली, परमेश्वरा. . . प्रत्येक बरणीत कसलीतरी रसायने होती आणि त्यात मानवी अवयव तरंगत होते. हातापायातली ताकदच गेली. कसतरी ते प्रकरण बंद केले.लटपटत खाली आलो.
अजुन खोल्या उघडून पाहील्याच नव्हत्या,ही केवळ झलक होती.सरळ वाड्याबाहेरच्या एका झाडाखाली येऊन बसलो.इथून पळून जावे असे आता प्रकर्षाने जाणवायला लागले होते.मस्त संधी होती.नको तो थरार,केली तेवढी हिम्मत पुरे असे वाटायला लागले.पण एक मन अजूनही सांगत होते की थांब ,लढ आयुष्यभर पळतच आलोय.काहीतरी गोष्ट होती जी मला अजूनही इथे थांबवुन ठेवत होती.तसही मला अजूनही कसला वॆयक्तिक त्रास झालेला नव्हता.एव्हाना बाहेर गार भणाण वारे सुटलेले होते.हलकेच वीज चमकून जात होती, काळेकुट्ट ढग जमायला सुरवात झालेली होती.मी आत जायचे ठरवले. आत आल्या आल्याच बाहेर पावसाला सुरवात झाली.काही वेळातच पावसाने जोर धरला आणि वीज गेली.मी खोलीतच बसून राहिलो.एक कंदील पेटवला आणि गणपतीच्या मूर्तीची आठवण झाली. तिला बाहेर काढली स्वच्छ पुसली आणि एका टेबलावर ठेवली.मनातल्या मनात येत होती नव्हती तेवढी सर्व स्तोत्र म्हणुन घेतली.मन भितीच्या दरीच्या टोकावर उभे होते, भितीच्या लाटा एकावर एक आदळत होत्या ,एक कारण भितीच्या दरीत लोटायला पुरेसे होते, वाड्यात भयाण शांतता पसरलेली होती.मी कुठे काय होतय का याचा कानोसा घेत होतो.पण कधी कधी काहीही न घडण्याची पण भिती वाटते. माझा धीर हळुहळु सुटत होता.ती शांतता साधी नव्हती.किती वेळ गेला समजले नाही, बहुतेक माझा डोळा लागला असावा.एका मोठ्या आवाजाने मला जाग आली.बाहेर प्रचंड आवाज करत वीज कोसळली.मी खिडकीतुन बाहेर पाहीले सगळा काळोख पसरलेला होता.मुसळधार पाऊस सुरु होता.इतक्यात कसलातरी सरकवल्याचा आवाज आला.मी खिडकी लावून घेतली. पुन्हा कसलातरी आवाज आला.आवाज वरतुन येत होता.कोणीतरी काहीतरी खेचुन नेतानाचा आवाज.एखादी अवजड वस्तू ... वर कोणीतरी होते.देशमुख आले तर नसतील? या विचारानेच हायसे वाटले.सोबत आली असू शकत होती.
मी दार उघडून बाहेर आलो.वरचा मजला काळोखात बुडालेला होता.पण एका खोलीतुन क्षीण प्रकाश बाहेर झिरपत होता.नक्की तो उजेडच होता का? नीटसे काही समजत नव्हते.पुन्हा काहीतरी ढकलल्याचा ,सरकवल्याचा आवाज आला.( कोणीतरी वर नक्की होते) मी दबक्या आवाजात देशमुखांना हाक मारली.त्या शांततेत माझ्याच आवाजाची मला भिती वाटली. तो आवाज काही क्षणांकरता थांबला आणी पुन्हा यायला लागला. चोर तर नसेल ना माझ्या डोक्यात अजुन एक विचार आला.तसे असेल तर मला काहीतरी करावेच लागणार होते.वाड्याची जबाबदारी माझ्याकडे होती.मी माझ्याजवळ असलेला चाकु घेउन आलो.मोठा श्वास घेतला आणि वर चढायला सुरवात केली.वरचा मिट्ट काळोख बघता पाऊल पुढे पडत नव्हते, तेवढ्यात एका खोलीचे दार उघडे दिसले.मी त्यादिशेने थोडासा सरकलो. आतुन कसली तरी अगम्य गुणगुण ऎकु येत होती.त्या विक्रुत आवाजाने डोके जड व्हायला लागले.कसातरी आधार घेत मी खोलीत डोकावलो, आणि ह्रदय एक क्षणासाठी थांबलेच.खोलीत मिणमिणता प्रकाश पसरलेला होता, अख्खी खोली पानांनी भरलेली होती.त्याच प्रकाशात एक बाई दोन पाळण्यात फावड्याने ती पाने भरत होती.मध्येच ते पाळणे पुढे मागे करत होती
,मेंदू कुरतडुन निघाल्यासारखा वाटला, भयंकर ओरडलो,पण तोंडातून आवाज आलाच नाही,तेवढ्यात त्या आक्रुतीने मागे पाहीले.चेहरा? परमेश्वरा. . . . चेहरा नव्हताच, सर्वत्र माती,पाने चिकटलेली होती. मी धडपडत मागे फिरलो, आणि एका खोलीत शिरलो.धाडकन दरवाजा लावून टाकला. दरवाजालाच चिकटून थरथरत उभा राहीलो.थंडीने अंग कापत होते.
.
.
.
तेवढ्यात मागे परत काहीतरी हालचाल सुरु झाली.कोणतरी फावडे जमिनीला घासत होते.हम्हम्हम्हम गुणगुण आता जवळ जवळ येत होती
क्रमशः
Book traversal links for पाचोळा -२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
व्वा..... स्पा भौ.तुम्ही एकदम
पुढचा पार्ट येऊ द्या.....
एकदम ता इट झाली :)
पुढचा भाग.....