आक्षेपार्ह काय ?

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
7 Jan 2016 - 4:41 pm

सामान्यत: मी प्रतिसादांवर प्रत्युत्तरे देण्याचे टाळतो. त्याचा उपयोग किती ह्याबद्दल शंकाच असते. एक दोनवेळा मित्रांना व्य,नि.पाठवला होता.आज मात्र त्याची गरज दिसते.
प्रथम सांगावयाची गोष्ट म्हणजे मी व प्रा.वालावलकर किमान गेली आठएक वर्षे आठवड्यातून सहावेळा संध्याकाळी भेटतो. समवयस्क, निनिराळ्या क्षेत्रातील सहा-सात ज्येष्ट नागरिकांची ही एक मैफलच असते. निरनिराळ्या क्षेत्रातील, निरनिराळ्या आवडीनिवडी, अनुभव यांची देवाणघेवाण यांमुळे हा आता दिवसाचा वाट पहावी असा घटक झाला आहे. एकमेकांची मते प्रत्येकाला माहीत असतात व त्यात बदल होणार नाही हे ही माहीत असते.त्यामुळे मंगळवारी देवीला व गुरूवारी दत्ताला जाणारा श्रद्धाळू माणुस व प्रा. वालाववलकर यांच्या मैत्रीत अंतराव येत नाही. मी तर कधीच देवपूजा न करणारा, सत्यनारायणाचा प्रसाद मस्त शिरा म्हणून परत मागून खाणारा, . उपनिषदे व दर्शने यांच्या अभ्यासामुळे निरिश्वरवादी विचाराचा माणुस. मी व प्रा. दोघेही (आणि कंपूत दोघेच) कोंकणातले. (हा किती घट्ट धागा असतो हे फक्त कोकणवासीच जाणतात.) आम्हा दोघांना "शब्दां"ची आवड; त्यांना शब्दकोड्यांमुळे व मला कवितारतीमुळे.
मला उपक्रमवर लिहावयास त्यांनी प्रवृत्त केले, त्याकरिता माझ्या घरी येऊन बराह कसा वापरावयाचे हे शिकवले. उपक्रम बंद झाल्यावर मी त्यांना मिपावर लेख पाठवण्याचा आग्रह केला. त्यांच्या लेखाचा वाचकवर्ग किती मोठा झाला हे संध्याकाळी मीच सांगत होतो.
म्हणजे आमच्यात वाद होत नव्हते कां? तसे नाही. होत होतेच. पण त्याचे कारण दोघेही निरीश्वरवादी असूनही दोघांच्या विचारसरणीतील फरक. ते तर्कनिष्ठ.विचारांपुढे भावनेला दुय्यम मानणारे. मी माऊलींचा निस्सीम उपासक. अद्वैतवादी असून भक्तीचा पुरस्कार का करतात याचा विचार करतांना ज्ञानोत्तर भक्ती वगैरे आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींवर वेळ घालवण्य़ाऐवजी त्यांना माझ्यासारख्या सामान्य जनांच्या वैचारिक कुवतीची अचूक जाणीव होती म्हणून विठ्ठलभक्तीचा सोपा मार्ग सुचवला असे मानतो.त्यामुळे काय झाले, निरीश्वरवादाचे वैचारिक श्रेष्टत्व मान्य करूनही मला देवावर विश्वास ठेवणार्‍यांवर "हे अडाणी, यांना सुधारले पाहिजे" असे वाटत नाही. उलट सत्, चित्, आनंद यापैकी आनंद मिळवण्यास ती एक सुलभ वाट वाटते. संध्याकाळच्या गप्पात एखादे नैमत्तिक निमित्त घेऊन आमच्यात वाद झडतात पण घरी जाईपर्यंत ते विसरलेलेही असतात.(प्रा.डॉ.ची निराशा झाली असेल नाही!)
आता मिपावरील लेखाबद्दल. एक देव नाही म्हणणारा, सर्वथ: देवाला नाकारणारा व दुसरा भक्तश्रेष्ठ संत यांच्यात काय समान असणार असा कोणालाही प्रश्न पडावा. पण मला त्यांच्यात एक समान दुवा दिसला.. दोघेही कवी, ओव्या अभंग लिहणारे, अज्ञ जनाबद्दल मनापासून कळवळा असणारे, निरीश्वरवादी आणि परत माझे मित्र. त्यात श्री. यनावालांनी केवळ चार लेखांत मिपावर मोठा वाचकवर्गही गोळा केलेला. तेव्हा हा दुवा एका खेळकर शैलीत सभासद मित्रांसमोर मांडावा असा विचार आला. .कै. जयवंत दळवी, ठणठणपाळ या नावाखाली "ललित" मध्ये लेख लिहित असत. त्याला अनुसरून लेख लिहला. त्यात कोठेही उपरोध नाही, शिंतोडे उडवलेले नाहीत, चिखलफेक नाही, त्यांच्या काव्याबद्दल अनुदार नाही, यनावला हे पूनावाला, बंदुकवाला या सारखे पारशी नाव वाटते याचा उपयोग तर पहिला नव्हेच. मग काही सभासदांना असे कां वाटावे ? अपरिचित शैली हे एक कारण असू शकेल. पण त्यामुळे असे नित्कर्ष काढणे मला अयोग्य वाटते. मागे गुरू संप्रदायावरील लेखातील "खाज" या शब्दाबद्दल असेच आक्षेप घेण्यात आले पण त्याला डॉ.प्रा. बरुटे सरांनीच उत्तर दिले व सभासदांच्या आक्षेपाचे निराकरण केले..आज मी सर्वश्री नादखुळा, नितीनचंद,, एस, तिमा, पेठकर इ.सभासदांना नम्र विनंती करत आहे की त्यांना नक्की काय आक्षेपार्ह वाटले व ते आक्षेपार्ह का हे सांगावे..असल्या मौलिक मार्गदर्शनाचा मला, इतर लेखकांना (व काय सांगावे, एखादे वेळी संपादक मंडळाही) फायदाच होईल.

आता आणखी एक शंका निरसन.नवीन धागा कां ? त्याचे काय आहे, एखाद्या धाग्यावर तीस-एक प्रतिसाद झाले की पुढचे कोणी वाचतच नाहीत. निदान मला तरी तसे वाटते. तर आता या धाग्यावरील मौलिक प्रतिसाद सर्वांना वाचावयास मिळावेत म्हणून नवीन धागा.
(मागे अशाच एका प्रसंगी मी संपादक मंडळाला विचारले असतांना त्यांनी " हरकत नाही " असे सांगितले होते)

शरद

.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

नाखु's picture

7 Jan 2016 - 5:07 pm | नाखु

आक्षेप नोंदवला नव्हता तर हा लेख टिकला तर मला आश्चर्य वाटेल असं म्हटल होतं:

कारणे दोन :
१.कुठल्याही प्रकारची टिंगल नसलेला पण थेट नाव घेतलेला लेख होता तो.
२.तुमची आणि त्यांची मैत्री परिचय आहे का नाही त्याच्याशी माझ्या प्रतिक्रियेच काहीही (सुतराम) संबध नाही.
३.आपण माझ्यासारख्या अडाणी मिपाकरांकडेही (यांचा उद्धार कोण करणार) अश्या कणवयुक्त नजरेने पाहात नसाल तर त्याकरिता खास अभिनंदन.आणि जाहीर आभार

धन्यवाद
(जग थेट फक्त काळे किंवा फक्त पांढरे आहे असा अजिबात पुर्वग्रह नसलेला नाखु)

प्रचेतस's picture

7 Jan 2016 - 5:42 pm | प्रचेतस

संक्षिप्त व्यक्तिचित्रण म्हणूनही छान.

अनुप ढेरे's picture

7 Jan 2016 - 6:07 pm | अनुप ढेरे

शालजोडीतला?

प्रचेतस's picture

7 Jan 2016 - 6:15 pm | प्रचेतस

नाही.
शरदकाका आणि यनावाला ह्यांच्या लेखणीशी बऱ्यापैकी परिचित आहे म्हणून.

मारवा's picture

7 Jan 2016 - 5:55 pm | मारवा

आता मिपावरील लेखाबद्दल. एक देव नाही म्हणणारा, सर्वथ: देवाला नाकारणारा व दुसरा भक्तश्रेष्ठ संत यांच्यात काय समान असणार असा कोणालाही प्रश्न पडावा. पण मला त्यांच्यात एक समान दुवा दिसला.. दोघेही कवी, ओव्या अभंग लिहणारे, अज्ञ जनाबद्दल मनापासून कळवळा असणारे, निरीश्वरवादी

शरदरावांना अज्ञ जीवांविषयी जो कळवळा आहे तो दुर्देवाने काही अभाग्यांच्या लक्षातच येत नाही. तो दाखवुन देण्यासाठी त्यांना जे कष्ट पडतात ते आता बघवत नाहीत.
काही अज्ञ जीव म्हणतात की आमचेही इथे मित्र आहेत पण आम्ही सार्वजनिक स्थळी त्यांना अलिंगन देत नाही. कारण असे की जे आमच्या मित्राच्यावर इतर कारणांसाठी प्रेम करत असतात त्यांना ही मग त्यांना अलिंगन द्यावेसे वाटते. अलिंगनामुळे आमच्या मित्रावर प्रेम करण्यास चिथावणी मिळते.
आमचा मित्र आणि आम्ही जो काय राडा घालायचा तो सार्वजनिक जागेत घालत नाही.
जेव्हा आम्ही तसे करतो तेव्हा आमची एक भुमिका असते.

विकास's picture

7 Jan 2016 - 5:57 pm | विकास

खुलासा करण्याची गरज होती असे वाटत नाही. पण तरी देखील हा प्रतिसाद/खुलासा आवडला.

मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे |
तैसे जनासी शिकवावे हळू हळू || - समर्थ रामदास

गुटगुटीत मित्रास पाठीवर धपाटा घालून "अरे कित्ती वाळलाहेस अशा अर्थाने.

चौकटराजा's picture

7 Jan 2016 - 6:37 pm | चौकटराजा

निरीश्वरवादाचे वैचारिक श्रेष्टत्व मान्य करूनही मला देवावर विश्वास ठेवणार्‍यांवर "हे अडाणी, यांना सुधारले पाहिजे" असे वाटत नाही. उलट सत्, चित्, आनंद यापैकी आनंद मिळवण्यास ती एक सुलभ वाट वाटते. @ नाखुदा
अगदी अशीच नव्हे पण अशा स्वरूपाची टिपण्णी करून मी व यनावाला यान्चातील फर्क मी अन्यत्र दाखविला आहे हे आपण जाणताच .मला फक्त या चिद आनंदाचे पर्यावसान काही वेळा मक्केत नाशकात भक्तगण चिर्डून ठार झाले अडीच लाखाच्या समुदायाने अमुकाना ठार मारले एका स्टेशनात एका जमावाने दुसर्‍या धर्माच्या जमावाला जाळले असे झाल्याचे दिसते त्यावेळी हा चिद्विलास उन्माद तर नाही ना अशी शंका येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2016 - 8:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण दोघांनाही मी भेटलेलो नाही. आपल्या दोघांच्याही लेखनाची शैली मला मात्र चांगली परिचित आहे. आणि ती मला नेहमीच आवडते. शरदसरांचे साहित्यविषयक विशेषतः ललित लेखन, जुन्या कवितांचे रसग्रहण आणि वालावलकरसेठ यांचा आधुनिक विचार, विज्ञाननिष्ठ लेखन आणि डोळसपणाने पारंपरिक गोष्टींकडे पाहण्याचा आग्रह धरणे ही आपल्या दोघांच्याही लेखनाची खास वैशिष्ट्ये. आपण दोघांनीही आपापल्या लेखनासहित मिपावर नेहमी लिहित राहावे. मैत्रीपूर्वक गंमत सार्वजनिक म्हणजे मुख्य बोर्डावर आल्यामुळे अनेक मिपाकरांना ते आक्षेपार्ह वाटणे साहजिकच होते. असो.

आपल्या दोघांमधे एखाद्या लेखनावरुन तिरप्या प्रतिसादाची जुगलबंदी मला पाहता यावी अशी माझी इच्छा मात्र कायम आहे. :)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्त पुण्यात येतोय. वल्लीला जरा वेळ मिळाला तर संध्याकाळी तुमच्या मैफिलीच्या ठिकाणी तुम्हा दोघांना गाठल्याशिवाय मी मात्र राहणार नाही. आपल्या मैत्रीला, वैचारिक भांडनाला असेच दीर्घायुरारोग्य लाभो अशी मनोमन पार्थना करतो.

आपण माझी निराशा केली म्हणुन यनावालांचा शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ | तर तुम्हा दोघांनाही मला गुरु करुन घ्यायचे असल्यामुळे गुरु... एक कोडे हा शरद सरांचा लेख वाचुन येतो.

-दिलीप बिरुटे
(विद्यार्थी)

प्रचेतस's picture

7 Jan 2016 - 8:28 pm | प्रचेतस

मी आहेच. तुम्ही येणार आहात म्हटल्यावर कसाही वेळ काढूच. साथीला धन्याशेठ असतीलच.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jan 2016 - 10:35 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतॉय हां मी, वाचतॉय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jan 2016 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कधी येताय प्रा.डॉ.

तिमा's picture

7 Jan 2016 - 8:42 pm | तिमा

आपल्या लेखाला मी कोण आक्षेप घेणारा ? आपले आणि यनावालांचे भरपूर लेखन मी वाचले आहे. तुमची आणि त्यांची मैत्री, नवीन सभासदांना माहिती नसेल. त्यामुळे, त्यातील मतितार्थ न समजता, व्यक्तिगत लेख मिपावर रुजणे, ही एक शक्यता वाटली. त्याला अनुसरुन प्रतिक्रिया लिहिली.
मिपावरच्या दिग्गज लेखकांसमोर तिमा ही माती आहे असे समजा.

प्रभाकर पेठकर's picture

8 Jan 2016 - 3:34 am | प्रभाकर पेठकर

त्या लेखात मला आक्षेपार्ह काय वाटले ते मी माझ्या प्रतिसादातच दिले आहे. त्यामुळे पुन्हा वेगळे स्पष्टीकरण देणे मला आवश्यक वाटत नाही.
एखाद्याच्या भक्तीवर, श्रद्धेवर माझाही आक्षेप नाही पण वाढत्या अंधश्रद्ध भक्तांमुळे देवळांची, उत्सवांची वाढती दुकानदारी उघड्या डोळ्यांनी दिसते आणि स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे होऊनही भारतात खेडोपाडी असणारी शिक्षण, वैद्यकिय सुविधा, रस्ते, पिण्याचे पाणी, वीज आदी सोयीसुविधांची मुलभूत गरज पुरी झालेली नसताना इश्वरचरणी होणारी पैशांची उधळण मनाला खटकते. देवाच्या डोक्यावर ओतून वाया जाणारे दूध, शिवाय मिठाई स्वरूपात खवा (आटीव दूध), साखर पाहता मला कुपोषणाने मरणारी मुलं आठवतात. त्यामुळे कुठेतरी ह्याला आळा बसावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. देवावर भरवसा टाकून, ईश्वरेच्छा असे म्हणत प्रयत्नशीलता हरवून बसलेले अनेकजणं मी पाहीले आहेत. ते सर्वजणं 'प्रयत्नांती परमेश्वर' ही व्यावहारीक भूमिका सोयिस्कररित्या दूर लोटून 'आधी-मधे-शेवटी फक्त 'तो' आणि फक्त 'तोच' तारणहार' ह्या विचारधारणेत गुंतत चाललेले दिसतात. हे दृश्य त्या व्यक्ती साठी आणि अशा व्यक्तींची वाढती संख्या पाहता आपल्या समाजाला घातक आहे. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' ह्या निष्क्रियतेच्या वाटेवर नेणारी आहे. ह्यात कोणावर जबरदस्ती नाही, कुणा 'अज्ञा'ला 'सुज्ञ' करण्याचा आव नाही. पण शंभरातील एकाला जरी माझे विचार पटले तरी मला आनंद होईल.