मांझी- द माऊण्टन मॅन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बर्याच दिवसानंतर चित्रपट गृहात एखादा चित्रपट पाहण्याचा योग आला. आणि खूप दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिल्याचे समाधान देखील मिळाले. चित्रपट होता मांझी- द माऊण्टन मॅन
चित्रपट सुरु होतो.. आणि पहिल्या मिनटालाच कळते कि हि एका गरीब माणसाची आणि अजस्त्र अश्या डोंगराची लढाई आहे. १९६० च्या आसपास या बिहार मधील गेहेलोर गावामध्ये दशरथ मांझी नावाचा एक युवक एका डोंगराशी एकटा लढू लागतो. ते हि फक्त हातोडी आणि छनी च्या सहाय्याने. असे काय घडलेले असते कि हा युवक त्या डोंगराला संपवण्यासाठी पेटून उठतो... या प्रश्नाचे उत्तर पुढच्या २ तासात कळते..
१९६० चा काळ. स्वातंत्र्य मिळून १३ वर्षे झाली तरी सर्व समस्या जसे कि अस्पृश्यता, गरिबी, वेठबिगारी, बालविवाह सावकारी इ हे जशे च्या तसे होते. दशरथ मांझी च्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतलेले असते पण कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो आपल्या मुलाला म्हणजेच दशरथ ला सावकाराकडे चाकरी करण्यासाठी ठेवण्याचा प्रयत्न करतो.. परंतु दशरथ तिथून पळ काढतो व तो परततो ते थेट २० वर्षानंतर. परत आल्यावर बरेच काही बदलेले असते. मुख्य म्हणजे सरकारने अस्पृश्यता विरोधी कायदा केलेला असतो. आणि "सब बराबर" चा नारा घुमत असतो. परंतु दशरथ ला लवकर च समजते कि समाज अजून देखील तसाच आहे. प्रत्यक्षात काहीच बदललेले नाहीये. आणि याच दरम्यान दशरथ ची पहिली भेट होते फगुनिया शी ...
फागुनिया हि तीच असते जिच्याबरोबर लहानपणी दशरथ चा विवाह झालेला असतो. दशरथ गावी आल्यानंतर काही कामधंदा करत नसल्यामुळे फागुनिया च्या घरून त्यांचा लग्नाला विरोध होतो. परंतु दोघेही नंतर पळून जाउन आपला संसार सुरु करतात.
चित्रपटात या दोघांचे चोरून भेटणे, एकमेकांना गिफ्ट देणे, जत्रेमध्ये फिरणे हे सारे प्रसंग खूपच छान जमले आहेत. त्यांच्या लव स्टोरी मध्ये कोणताही प्रकारे अवास्तव गोष्टी किंवा फालतू गाणी (ज्यामध्ये हिरो हिरोईन आणि मागे २०-३० जण नाचत आहेत) नाहीयेत. थोडक्यात टिपिकल बॉलीवूड लव स्टोरी दाखवून फुटकळ टाईमपास केलेला नाहीये. जे काही आहे ते एकदम रीअलिस्टिक वाटते.
लवकरच दशरथ आणि फागुनिया ला एक मुलगा होतो. दशरथ आता आपल्या गावातून डोंगरापलीकडे असलेल्या गावात काम करण्यासाठी जात असतो. कामावर गेलेल्या पतीला दुपारचे जेवण घेऊन फागुनिया डोंगर चढून जात असताना तिचा पाय घसरतो, आणि ती खाली पडते. तिच्या पोटात त्यावेळी त्यांचे दुसरे अपत्य असते. तिला ताबड्तोक हॉस्पिटल मध्ये हलवणे गरजेचे असते. अश्यावेळी दशरथ आणि त्याचा साथीदार तिला कडेवर घेऊन डोंगर चढून वजीरगंज या गावी हॉस्पिटल मध्ये नेतात. फागुनिया च्या पोटातील मुलगी वाचते. परंतु फागुनिया ला मात्र डॉक्टर वाचवू शकत नाहीत. आपल्या पत्नी डोंगर चढत असताना पडली व याच डोंगरामुळे वेळेवर दवाखान्यात आणता आले नाही म्हणून तिचा जीव गेला. जर त्या डोंगरातून येण्याजाण्यासाठी जर रस्ता असता तर कदाचित आज आपली पत्नी जिवंत असती असा विचार मांझी च्या मनात येतो.. आणि तो तिचेच मनाशी ठाम निश्चय करतो कि या डोंगराला फोडून तो त्यामध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता बनवेल.
डोंगरातून रस्ता बनवायचा आहे या एकाच ध्येयाने झपाटलेल्या दशरथ मांझी चा पूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. गावातील इतर लोक त्याची खूप चेष्टा करतातपरंतु तो कोणाकडेही लक्ष देत नाही, त्याचे ध्येय ठरलेले असते. आणि तो आपल्याच स्वप्नात जगात असतो. गावामध्ये भयानक दुष्काळ पडल्यावर सगळे गावकरी शहराकडे जातात. पण दशरथ पोटापाण्याची पर्व न करता डोंगर आणि त्याची लढाई सुरु च ठेवतो.
चित्रपटात १-२ मिनिटासाठी येणाऱ्या इंदिरा गांधी आणि त्यांचा गरिबी हटाव चा नारा पण खूप छान जमला आहे. त्याच्याच गावातील सरपंच व इतर मंडळी त्याचे नाव पुढे करून मिळालेली सरकारी मदत देखील हडप करतात. त्याने फोडलेली दगडे परस्पर नेउन त्यातून पैसे कमावतात. हे सगळे पाहताना आपल्याला भ्रष्ट प्रशासन व्यवस्थेची चीड आल्याशिवाय राहत नाही..!! शेवटी वनविभाग चे अधिकारी देखील त्याला पत्थर माफिया असा आरोप करून जेल मध्ये घालतात. परंतु या सगळ्याशी लढताना दशरथ ची स्वप्ने आणि त्याच्या कष्टांचा च विजय होतो.
आपल्याला मिळालेले सरकारी पैसे दुसरेच कोणी तरी हडप केले याबाबत तक्रार करण्यासाठी दशरथ बिहार ते दिल्ली जाण्यसाठी निघतो. पण इंदिरा गांधी आणि त्याची भेट काही होत नाही. रेल्वे च्या तिकिटासाठी चे पैसे नसल्यामुळे १३०० किमी चे अंतर तो पायी च चालत जातो. यावेळी चित्रित केलेले "ओ राही" हे गाणे देखील छान जमलेय.
चित्रपट कोठेही रेंगाळत नाही. कोणतीही अनावश्यक गोष्ट या चित्रपटात नाहीये. जसे कि आयटम सॉंग किंवा प्रसंग नसताना मुद्दामहून घडवून आणलेले विनोद इ. नावाजुद्दिन सिद्दिकी ने दशरथ ची भूमिका उत्तमपणे निभावली आहे. दशरथ चा "शानदार जबरजस्त जिंदाबाद" हा डायलॉग लक्षात राहतो.. राधिका आपटे ने देखील फागुनिया ची भूमिका उत्तमपणे हाताळली आहे. चित्रपटात अधून मधून एन्ट्री घेणारा अलोक झा नावाचा पत्रकार देखील लक्षात राहतो.
दशरथ चा तारुण्यापासून ते वार्धक्यापार्याचा प्रवास या चित्रपटात असल्यामुळे मेक अप अर्टिस्ट समोर खूप मोठे आव्हान होते. पण त्याने ते उत्तम रित्या पेलले आहे.
असा हा मांझी द माऊण्टन मैन हा चित्रपट नक्कीच आवर्जून पाहण्यासारखा आहे. परंतु हा चित्रपट व्यावसाईक श्रेणी मधला (ज्यामध्ये फुटकळ कथा, २-४ प्रणय दृश्ये, आयटम सॉंग, स्फोटात २०-३० फूट उडणार्या गाड्या, एक्शन च्या नावाखाली बेदम हाणामारी) नसल्यामुळे बॉक्स ऑफिस वर कोटीच्या कोटी उड्डाणे घेईल असे वाटत नाही. परंतु मला तरी हा चित्रपट एकदम शानदार जबरजस्त आणि जिंदाबाद असा वाटला.
रेटिंग - ****
प्रतिक्रिया
अजून एक होते. त्यांनी एकटयाने विहीर खोदली होती.
मागो, मानाचा मुजरा तुम्हाला !
भापकर गुरूजिंचीच एक यू ट्यूब
धन्यु, नाव आडनाव !
बरोबर आहे तुमचे.
बरोबर आहे तुमचे.
ही नवीनच माहिती कळाली, अतिशय
चित्रपट नक्की बघणार !
चित्रपट पाहिला. खरच खूप सुंदर
बघितला पाहिजे
Pagination