Skip to main content

तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 20/02/2014 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? फेस्बुकावर तर स्वतंत्र विदर्भ मागणीस समर्थन चालू आहे। शिवसेना आणि मनसेने निव्वळ आपली राजकीय गोची होईल म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करू नये...मुंबईत बसून गडचिरोलीची समस्या सोडविता येत नाही...असे एक मत आहे तर पूर्वी नेहरूंनी बेरारात घातले, मग अत्रे, डांगे यांनी महाराष्ट्रात घातले परंतु विदर्भातील शेतकर्याची उपेक्षा मात्र थांबली नाही...धरणे झालीत परंतु कालवे, नाही...कापूस विदर्भात आणि सुतगिरण्या मात्र पश्चिम महाराष्ट्रात...नामशेष होत चाललेल्या कापूस आणि संत्रा लागवड क्षेत्राकडे कोणत्या जाणत्या राजाने आजवर लक्ष दिले?? संत्राप्रक्रिया कारखाना येणार होता, त्याचा अजस्त्र सोफिया कसा झाला?? मिहानचा वेग का मंदावला?? गोसेखुर्द करिता निधी नाही परंतु कृष्णा-कोयना खोर्यात गरज नसताना अब्जोवधी रुपये खर्च होतात...देशाच्या मध्यभागी व चहूबाजूंनी सुरक्षित असलेल्या नागपूरचे महत्व आपण कधी जाणणार?? अडचणी आहेत… पण काहि लोकाना अखंड महाराष्ट्र हवा आहे... शिवरायांचे VISION आणि पेशव्यांचा पराक्रम यांचे जर आपण मनापासून कौतुक करत असलो, तर कमीतकमी महाराष्ट्राचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी तरी आपण नक्कीच घेऊ शकतो, नाही का? इतर राज्यांचे जाऊ द्या. इतर राज्यांना नुसताच 'भूगोल' आहे, आणि महाराष्ट्राला भूगोलाबरोबर 'इतिहास' सुद्धा. देखना है आगे आगे क्या होता है......

वाचने 56888
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

साहेब मेन बोर्डावर वर तर आपलेच नाव झळकते आहे... एकामागुन एक असे लेख पडत आहेत की हलवाईच्या दुकानात जिलब्या... @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

कुठल्याही विषयात जिलेबी सोडुन लगेच दुसरी कडची जेवणाची ऑर्डर घेता.इकडे जिलेब्या गोळा करणार कोण? छोटी राज्ये निर्मिती आज पर्यत झाली आहेत,त्या राज्यांचा विकास किती झाला आहे याबाबत माहिती घेवुन इथे ठेवा आधी मग चर्चा करु.

इतर राज्यांना नुसताच 'भूगोल' आहे, आणि महाराष्ट्राला भूगोलाबरोबर 'इतिहास' सुद्धा.
याहून विनोदी वाक्य ऐकले नव्हते. आता भरून पावलो. असो.

In reply to by ऋषिकेश

माझ्या माहीतीनुसार हे वाक्य चिंतामण द्वारकानाथ देशमुख ह्यांचे आहे. आता हसा ...हा हा हा .

In reply to by प्रसाद गोडबोले

मी हे वाक्य शिवसेना स्पेशल आहे असे समजत होतो. पण सी डी देशमुखांनी असे विधान केले असेल तर तेही या ठिकाणी साफ गंडलेत हे सरळच आहे.

In reply to by बॅटमॅन

इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे इतिहासाचाची आणि स्वतःच्या अस्मितेची जाणीव असणे असा आहे ... महाराष्ट्र वगळता बहुतांश सर्वच राज्य कायमच परकीयांपुढे झुकुन वाकुन जगत राहिली महाराष्ट्राच तसं नाही ( नाही म्हणजे सी डींच्या काळापर्यंत तरी नव्हतं ,आता हायकंमांडचे आदेश सुटले की महाराष्ट्राचे धाबे दणाणतात .) नाहीतर तंस म्हणलं तर अंटार्टिकावरच्या बर्फालाही इतिहास आहेच की !!

In reply to by प्रसाद गोडबोले

इतिहास असणे ह्याचा अर्थ येथे इतिहासाचाची आणि स्वतःच्या अस्मितेची जाणीव असणे असा आहे ...
मग त्या निकषावर तमिऴनाडू व बंगाल तोडीसतोड आहेत. तमिऴनाडू तर महाराष्ट्राच्या कैक योजने पुढे असावा.
महाराष्ट्र वगळता बहुतांश सर्वच राज्य कायमच परकीयांपुढे झुकुन वाकुन जगत राहिली महाराष्ट्राच तसं नाही
अहो अख्खी दख्खनच तशी होती. आदिल-निजामादि 'परकीयांनी' महाराष्ट्रावर ठोकून २००-३०० वर्षे राज्य केलेच की. तमिऴनाडूवर तेही नव्हते. किंबहुना विजयनगर असेपर्यंत तुंगभद्रेच्या दक्षिणेकडे स्वातंत्र्यच होते. विजयनगर पडल्यानंतर मराठे वर आले. अन आजवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मौर्य साम्राज्य हे उत्तरेत उदयास आलेले अन दक्षिणेत घुसलेले एकमेव ब्रिटिशपूर्व साम्राज्य म्हणावे लागेल. मुघलांनी तसे प्रभुत्व मिळवले पण ते अत्यल्पजीवी ठरले. हिंदू असो वा मुसलमान, दक्षिण ही उत्तरेपासून नेहमीच स्वतंत्र राहिलेली आहे-अपवाद अर्थातच ब्रिटिश अन ब्रिटिशोत्तर काळाचा. मुस्लिम काळातही हे आदिल-निजाम मुघलांच्या विरुद्धच होते. पाहिजे तेव्हा युती करायचे पण मुघलांचे स्वामित्व मान्य नव्हते कधीच. किंबहुना मुघल विरुद्ध आदिल-निजाम या संघर्षाचा चलाख वापर करूनच शिवाजीराजे सुरुवातीच्या काळात आपले बस्तान पक्के करते झाले आहेत. उत्तरेचे स्वामित्व न मानणे या निकषावर तर अख्खी दख्खन यात येऊ शकते. 'परकीयांचे' स्वामित्व झुगारणे अभिप्रेत असेल तर विजयनगरचे उदाहरणही आहे. स्वतःची अस्मिता अभिप्रेत असेल तर तमिऴनाडू अन नंतर उरलेली दक्षिणी राज्येही आलीच. उत्तरेत पोलिटिकली स्वतंत्र राहणे जवळपास अशक्यच होते. तरीही वेगळी अस्मिता इ. साठी बंगाल व पंजाब प्रांतही फेमस आहेच. पंजाबचे तर स्वतःचे राज्यही होते. पंजाबातही शिखांचा उदय झालाच. अगोदर धर्म म्हणून तो पसरला आणि अन नंतर मुघलांशीही त्यांनी लै झगडे घेतले. त्यांच्या गुरूंना कैक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या पण शेवटी त्यांच्या मिस्ल एकत्र होऊन रणजितसिंगांचे राज्य तयार झालेच. तीच गोष्ट आसामची. मुघलांना त्यांनी सराईघाटच्या लढाईत निर्णायकपणे हरवले अन शर्थीने राज्य राखले. तस्मात, परकीयांना यशस्वीरीत्या तोंड देणे, त्याची स्मृती राखणे अन ती स्वतःच्या अस्मितेत सामावून घेणे, स्वतःची वेगळी संस्कृती जपणे हे प्रकार महाराष्ट्राखेरीज अन्य ठिकाणीही कैकवेळेस झालेले आहेत. महाराष्ट्राची शिवकाळापासूनची पोलिटिकल अचीव्हमेंट तत्कालीन इतर कुणाही सत्तेपेक्षा या बाबतीत मोठी असली तरी उत्साहाच्या भरात हे नजरेआड होऊ नये असे वाटते. भारतातल्या प्रत्येक भागाला स्वतःचा वेगळा सुवर्णकाळ आहे आणि तो त्या त्या राज्याच्या सांस्कृतिक आत्मभानात तसा कमीअधिक फरकाने तत्रस्थ लेखक-कवींनी जागवलेला आहे. तसेच बोलायचे तर मग बिहारने अख्ख्या भारतावर राज्य केलेले आहे- एकदा नाही तर दोनदा. मौर्य अन गुप्तकाळात ग्रीक-हूणादि आक्रमणेही यूपी-बिहारने परतवली आहेत. निव्वळ आजच्या सांस्कृतिक जाणिवेत तो इतिहास जागवलेला दिसत नाही म्हणून त्यांना तो इतिहास नाही हे म्हणणे फार धार्ष्ट्याचे अन तितकेच अज्ञानमूलक आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घेतले तर शिवपूर्वकालीन महाराष्ट्राला काय इतिहास नव्हता? पण महाराष्ट्राचा इतिहास आज शिवाजीपासून सुरू होतो अन शिवाजीपर्यंत संपतो. सातवाहन, यादव, आदि लोकांची राज्ये शिवकालातील राज्यापेक्षा कितीतरी मोठी अन पॉवरफुल होती. त्या इतिहासाशी लोकांची अ‍ॅटॅचमेंट शिवकालाइतकी नसली म्हणून त्याचे मूल्य कमी होत नाही. नजीकच्या इतिहासात जे झाले त्यावरून असा सार्वकालिक सिद्धांत काढू नये असे वाटते. किती मागे जावे हाही एक प्रश्न आहेच, पण मग अशा ब्लँकेट विधानांना कालातीतपणाचा जो वास येतो तो दूर करण्यासाठी डिस्क्लेमर तरी लावावा. महाराष्ट्राचे विविध क्षेत्रांतील अफाट योगदान कुणाही अन्य प्रांताइतकेच, प्रसंगी अजून भारी आहे. पण त्याच्या स्मरणार्थ अन्य प्रांतांना कमी लेखणे चूक आहे.

In reply to by बॅटमॅन

+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

In reply to by बॅटमॅन

जबरदस्त!! फारच आवडला प्रतिसाद. आपल्याकडे उगाचच आपण छत्रपतींच्या राज्यात जन्माला आलो म्हणजे दर पिढीत एक छत्रपती होता आणि बरेचदा आपण स्वतःच एक छत्रपती आहोत असे बऱ्याच लोकांना वाटते. मग ५६ इंची छाती फुगते बाकी काही नाही. ते गुज्जू आणि मारवाडी सगळे धंदे करतात आणि आपले तुणतुणे घेवून मराठीचे काय होणार असे चर्चासत्र खेळत बसतो

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हा सविस्तर, माहितीपूर्ण प्रतिसाद द्यायला लावणार्‍या गोडबोलेंचे आभार!

In reply to by प्रदीप

सविस्तर प्रतिसाद आवडला . पॉईट टेकन :)

In reply to by प्रसाद गोडबोले

लोक्स आम्ही तर मीपावर खाते उघडल्या पासुनंच बॅट्याचे पंखा झालो आहोत. बॅट्या तुला पुन्हा एकदा _/\/\_

तु मला प्रत्यक्ष भेट बॅट्या जिथे भेटशील तिथे साष्टांग दंडवत घालीन म्हणतो.


In reply to by प्रमोद देर्देकर

प्रतीसाद "नीऱक्षीर्"विवेक.. बॅट्(सुंदर नजाकतीने चालवणार्या) मॅन (कायम माणूस पण जपणार्या) व.वा.चा पंखा..

In reply to by बॅटमॅन

"भारतातल्या प्रत्येक भागाला स्वतःचा वेगळा सुवर्णकाळ आहे " "पण महाराष्ट्राचा इतिहास आज शिवाजीपासून सुरू होतो अन शिवाजीपर्यंत संपतो. सातवाहन, यादव, आदि लोकांची राज्ये...." अगदी अगदी.

In reply to by बॅटमॅन

आभार रे ब्याट्या! नुसते माझे टंकनश्रम वाचवलेच नाहिस तर माझ्याही माहितीत भरच टाकलीस! :)

In reply to by बॅटमॅन

सुरेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद. खरे म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी हा महाराष्ट्राचा पहिला "शिवाजी"! असो, ज्या वाक्यावरून हा वाद सुरू झाला ते "इतिहास-भूगोल" वाक्य अत्र्यांचे आहे. अत्र्यांच्या इतर (दहा हजार वर्षांत ... इत्यादी) वाक्यांच्या तुलनेतच हे वाक्यदेखिल समजून घ्यायचे!

In reply to by सुनील

माझ्याही माहितीप्रमाणे हे "इतिहास, भूगोल.." हे वाक्य आचार्य अत्रे ह्यांचे आहे. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात लोकांना चेतवण्यासाठी केले असावे. त्या संदर्भात पहिले असता अगदी शब्दशः घेण्यापेक्षा भावार्थ लक्षात घेणे अधिक सयुक्तिक ठरेल.

यांना सकाळ मुक्तपीठातला बब्बन चावला वाटते. एS एS एS ब Sब्बSSS न

तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? हो येईल की..

नमस्कार, सुरूवात करताना लेखातील लिहीण्याच्या ओघात झालेली एक चुक दुरूस्त करावी म्हणतो... वर नेहरूंनी बेरारात घातले हे जे म्हटले आहे ते चुक आहे. बेरार म्हणजे वर्‍हाड. आणि वर्‍हाड म्हणजे आजचा अमरावती महसुल विभाग किंवा पश्चिम विदर्भ. नागपुर महसुल विभागाला बोलीभाषेवरून 'झाडी' असे म्हणतात. दोन्ही मिळून विदर्भ होतो. १८५३ साली बेरार हा ब्रिटीशांनी हैद्राबादच्या नवाबाकडून महसुली खर्चासाठी काढून घेऊन त्यावर आपला अंमल बसवला. पुर्व विदर्भ आधीपासूनच ब्रिटीशांच्या ताब्यात होता, त्याता मध्य प्रांत असे नाव होते. पुढे ह्या बेरार ला त्या सेंट्रल प्रॉव्हिन्सशी जोडल्या गेला व सिपीएन्डबेरार असा प्रांत अस्तीत्वात आला. तो तसाच पुढे कायम राहीला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हा विदर्भ महाराष्ट्रात येण्याबाबत साशंक होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भ व महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करून विदर्भाने महाराष्ट्रात सामील होऊ नये. असा सल्ला दिला होता. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. नागपुर करार व अकोला करार करून विदर्भावर अन्याय होणार नाही व विदर्भाच्या प्रगतीसाठी संसाधनांची समन्यायी वाटणी होईल अश्या लिखीत आश्वासनांवर विश्वास ठेवून विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. विदर्भ वेगळा व्हावा व स्वतंत्र राज्य व्हावे असा मतप्रवाह विदर्भात सुरूवातीपासूनच होता व आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विदर्भातून 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' असा जो मत प्रवाह आहे तो दोन पातळ्यांतून येतो व त्या दोहोंची पार्श्वभूमी वेगळी आहे. पहिला प्रवाह आहे राजकारणी लोकांचा - यात सामान्यतः असे राजकारणी आहेत ज्यांना मुंबईत कुणी विचारेणासे झालंय. किंवा राजकीय फायद्यासाठी पक्षांतर केलेले लोक, किंवा विदर्भाच्या ठराविक पट्ट्यात समर्थक असलेले लोक असे दिसतात. सत्तेच्या मुख्यप्रवाहाच्या बाहेर पडलेले लोक, पक्षश्रेष्ठींच्या नजरेत यायला, पेपरात बातमी व्हायला हा मुद्दा वापरतात असे दिसते. मुख्य प्रवाहात असताना, भाजपा हा एकच पक्ष वेगळा विदर्भ व्हावा यासाठी इतर कुणी प्रस्ताव मांडल्यास समर्थन देऊ अशी भूमीका घेऊन आहे, शिवसेना कट्टर विरोधात आहे. कॉग्रेसची भूमिकाच नाही, राष्ट्रवादीला विदर्भाशी सोयर सुतक नाही. या प्रवाहात माजी कॉग्रेस पदेशाध्यक्ष श्री रणजीत देशमुख व आता एवढ्यात नागपुरचे खासदार श्री विलास मुत्तेमवार हे मुख्य धारेत असतानासुध्दा विदर्भाच्या बाजुला बोलणारे नेते म्हणून बघू शकतो. यांच्या शिवाय काही नवीन नेते ज्यांना स्थानिक राजकारणात मुद्दा पाहिजे ते वेगळा विदर्भ घेऊन रॅली काढताहेत. दुसरा प्रवाह आहे तो अभ्यासकांचा - ह्यांचा वेगळा विदर्भ हा विदर्भावर झालेल्या अन्यायातून निर्माण झालेल्या चिडीपायी आहे. विदर्भावर निधीवाटपात तसेच अनेक वेगवेगळ्या शासकीय पातळीवर अन्याय होतो हेच आधी सरकारला मान्य नव्हते. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. पि.सी. अलेक्झेंडर यांनी सर्वप्रथम हे मान्य केले व हा अनुशेष दूर करण्यासाठी कार्यक्रम आखण्याचे निर्देश राज्यशासनाला दिले. त्यानंतर काही प्रमाणात काम झाल्याचं दिसून आलं. ते तेवढ्यापुरतं टिकलं. विदर्भाच्या विषयांवर अभ्यास करणारे पत्रकार, विद्यार्थी, नेते आदींचा यात समावेश होतो. मात्र ह्या दुसर्‍या प्रवाहातील लोकांना एकतर जनमताचा पाठींबा नाही आणि सामान्य लोकांपर्यंत त्यांची पोहोच नाही. त्यामुळे हे लोक विदर्भाच्या मुद्द्यावर मत बनलेले लोक जेथे जमतात तेथे आपले मत मांडतात. अश्या कार्यक्रमाला गेल्यावर मला तरी हा प्रकार 'होकार आल्यावरसुध्दा मुलीला मागणी घालण्याचा प्रकार' वाटतो. त्यामुळे केवळ आधी सहमत असलेले लोक सहमत होत असावेत कदाचीत. वेगळ्या विदर्भाला सामान्य जनतेचा अद्यापही पाठींबा नाही. यावर मागे एका माजी मुख्यमंत्र्याना नागपुरात पत्रकारांनी विचारले की विदर्भातील जनतेचा वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठींबा नाही असे कशावरून म्हणता? त्यावर त्यांचे उत्तर असे होते की विदर्भाबाबत ठाम विरोध केवळ शिवसेनेचा आहे आणि विदर्भातून शिवसेनेचे खासदार व आमदार भरभरून निवडून येतात, यावरून सामान्य लोकांचे मत समजते आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या लोकांची संख्याच नाही. ज्यांचा तेलंगणाच्या आंदोलनाचा अभ्यास असेल ते लोक वेगळ्या विदर्भाच्या तथाकथीत आंदोलनाची तुलना तेलंगणाशी करणार नाहीत. कारण वेगळा व्हावा याशिवाय तेलंगणाच्या आंदोलनाशी वेगळा विदर्भाच्या आंदोलनाचा संबंध, तुलना नाही. वेगळ्या विदर्भाला जनमताचा पाठींबा आहे की नाही यासाठी विदर्भात सध्या एक मस्त प्रकार चालला आहे. तो म्हणजे जनमतचाचणीचा. यात विदर्भवादी कार्यकर्ते आधीच एक तारीख घोषणा करतात, त्यादिवशी त्या शहरात मुख्य चौक, महाविद्यालये आदींसमोर मतपेट्या ठेवल्या जातात. त्यासोबत वेगळा विदर्भ पाहिजे की नाही अशी मत पत्रीका असते. त्यात ज्या लोकांना उत्साह असेल (ज्यात वेगळा पाहिजेचा उत्साहवालेच अधीक असतात) ते लोक मतदान करतात. समजा त्यात जर ७० हजार लोकांनी मतदार केले असेल आणि त्यातील ८०% लोकांचा वेगळ्या विदर्भाला पाठींबा असेल तर मग लागलीच असे जाहीर होते की ८०% लोकांचा विदर्भाला पाठींबा आहे. :) यात हे विसरले जाते की त्या शहराची लोकसंख्या ९ लाखाच्या वर आहे. ;) विदर्भवादी लोक आंदोलन करताना दिसत आहेत. सामान्य जनता शांत आहे. विदर्भात जनमानसातून आलेलं आणि आपला मतदारसंघ सोडून प्रसिध्दी किंवा लोकांवर अधिकार आहे असे नेते कमी आहेत. त्यामुळे जोपर्यंत राजकारणात अश्या विदर्भमान्य नेत्याचा उदय होत नाही किंवा वेगळ्या विदर्भाला जनमानसात वजन असलेल्या अराजकीय व्यक्तीचं नेतृत्व मिळत नाही तो पर्यंत विदर्भ वेगळा होणे शक्य नाही. - नीलकांत

In reply to by नीलकांत

उत्कृष्ट प्रतिसाद. बेरार आणि नेहरूंविषयी हेच सांगायचे होते. तेव्हढ्यात आपला सर्वंकष प्रतिसाद वाचला. आणि मग वेगळे लिहिण्याजोगे असे काही उरलेच नाही. माझा विदर्भाविषयी फारसा अभ्यास नाही. पण त्या प्रदेशातून फिरताना असे जाणवते की संपूर्ण विदर्भाची एकच अशी अस्मिता नसावी. नागपूर वगैरेची वेगळी, अकोला-अमरावतीची वेगळी,एकट्या यवतमाळचीसुद्धा वेगळी. यवतमाळ बाजूची वेगळी, चांदा-भंडार्‍याची आणखीनच वेगळी. बुलढाणा-वाशिम तर मराठवाड्याचाच भाग वाटतात. वर्धा जिल्हा सेवाग्राममुळे म्हणा किंवा बजाजांमुळे म्हणा वेगळाच वाटतो. नागपूरवरही मध्यप्रदेशची छाप जाणवते. गडचिरोली आणखीनच वेगळा. हे सर्व प्रांत एका समान अस्मितेने पेटून उठू शकतील का असा प्रश्न पडतो.

In reply to by राही

अतिशय मार्मिक प्रतिसाद. काहीसे अस्पष्टपणे जे वाटत होते ते अगदी व्यवस्थित मूर्तरूपाने मांडून नीलकांत यांनी धाग्याचे एकदम उन्नयनच केलेले आहे.

In reply to by राही

@राही, तुमच्या निरीक्षणाशी सहमत. संपूर्ण विदर्भाची एक अस्मिता दिसत नाही यावर पूर्वी कधी असा विचार केला नव्हता पण हे वाचून ते काही अंशी पटले. फक्त यामागची जर कारणे पहिली तर भौगोलिक परिस्थिती बरीचशी कारणीभूत आहे असे दिसते. बुलढाणा जिल्हा हा विदर्भात असला तरीही जवळचे मोठे आणि विकसित शहर म्हणून नागपूर पेक्षा औरंगाबाद जवळ आहे. त्यामुळे साहजिकच वैदकीय सेवा, शिक्षण इत्यादी साठी आधी औरंगाबाद चा पर्याय जवळचा वाटतो. आणि विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या तिन्हीच्या सीमारेषा जवळ असल्यामुळे संमिश्र प्रभाव दिसतो. अंतराच्या दृष्टीने पहिले तर बुलढाण्याहून नागपूर आणि पुणे एकाच अंतरावर आहेत त्यामुळे दोन्ही सारखेच दूर वाटतात. त्यातून गेल्या दहा वर्षात शिक्षणासाठी सगळ्यांचीच ओढ ही पुण्याकडे दिसते. पूर्वी असे अनेक जण होते की ज्यांना अकोला अमरावतीहून पुढील शिक्षणाचा पर्याय म्हणून नागपुरच दिसायचे. हे चित्र गेल्या काही वर्षात बदलले. बुलढाणा आणि चंद्रपूर-गडचिरोली ही विदर्भाची दोन टोके पाहिली तर असे लक्षात येईल की एवढे अंतर बघता इथे सांस्कृतिक, भौगोलिक बाबतीत प्रचंड तफावत असणे बरेच स्वाभाविक आहे. पुणे आणि सातारा किंवा पुणे आणि मुंबई यामध्येही महाराष्ट्राची अस्मिता असली तरीही वेगळेपणा आहेच. तसाच तो विदर्भात देखील आहे. लग्नातल्या पद्धती, खाण्यापिण्याच्या पद्धती, बोलीभाषा यात बरीच समानता आढळते. बाकी नीलकांत यांचा प्रतिसाद खूपच आवडला. शब्दाशब्दाशी सहमत. विशेष करून वेगळ्या विदर्भाला सामान्य जनतेचा अद्यापही पाठींबा नाही हे अगदी खरे. केवळ वेगळा विदर्भ करून विकास होईल हा भाबडा आशावाद वाटतो. त्यासाठी भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरण, राजकारण्यांचा सक्रिय सहभाग आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे विदर्भातील लोकांचाही या विकासासाठी सहभाग हे आवश्यक वाटतात. मी या बाबतीत कुणी तज्ञ नाही, परंतु लहानपण सगळे विदर्भात गेले. आजही आई बाबा तिथे आहेत शिवाय अनेक नातेवाइक. त्यामुळे आजही जाणे येणे आहे. त्या अनुभवातून जे वाटले ते फक्त लिहिले. विदर्भ आणि महाराष्ट्र दोघांचीही अस्मिता बाळगणारी

In reply to by नीलकांत

प्रतिसाद नेहमीप्रमाणेच उत्तम
नागपुर महसुल विभागाला बोलीभाषेवरून 'झाडी' असे म्हणतात.
हा झाडी हा शब्द लै जुना आहे. नागपूर-भंडारा विभागतल्या जंगलझाडीयुक्त भागाला 'झाडीमंडळ' म्हणत. देवगिरीचा अखेरचा स्वतंत्र यादवसम्राट रामचंद्रदेवाच्या ठाणे ओवळे ताम्रपटात हेमाद्रीपंडीताने झाडीमण्डळ जिंकल्याचा उल्लेख आला आहे. समस्त हस्तिपकाध्यक्षो निजगुणसुभगभावुके समस्तकरणाधिपत्यमंगी कुर्वाणेच निर्ज्जित झाडीमंडले मंत्रीचुडामणी गुणरत्नरोहणाद्रौहेमाद्रौ | सर्व हत्तीदळाचा प्रमुख, करणाधिप (अर्थ खात्याचा प्रमुख), मंत्रीचुडामणी अशा सर्व गुणरत्नांनी युक्त अशा हेमाद्रीने झाडीमंडळ जिंकले आहे.

In reply to by नीलकांत

अत्यंत सविस्तर, माहितीपूर्ण प्रतिसाद.
विदर्भावर निधीवाटपात तसेच अनेक वेगवेगळ्या शासकीय पातळीवर अन्याय होतो हेच आधी सरकारला मान्य नव्हते. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. पि.सी. अलेक्झेंडर यांनी सर्वप्रथम हे मान्य केले
माझा ह्या प्रश्नावर काहीही अभ्यास नाही, तरीही विदर्भास शासकीय पातळीवर डावलले गेले आहे, ह्या विधानाविषयी आश्चर्य एव्हढ्यासाठी वाटत आले आहे, की विदर्भाचे श्री. वसंतराव नाईक, तब्बल ११ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते कुशल व्यवस्थापक होते, अत्यंत धूर्त राजकारणीही होते (तेंडुलकरांच्या त्यांच्यावरील लेखामध्ये ह्याची थोडी झलक मिळते. आणि मुंबईमधे पन्नाशी-साठीच्या दशकांत डोईजड होऊ पहाणार्‍या डाव्या पक्षांना त्यांनी कसा व्यवस्थित शह दिला, हे सर्वश्रूतच आहे). तेव्हा इतके तोलामोलाचे वैदर्भीय नेते राज्याच्या जवळजवळ सुरूवातीच्या काळातच राज्याच्या सर्वोच्च पदावर असतांना हे असे का व्हावे?

तुमचा हरवलेला की बोर्ड सापडलेला दिसतोय :) हाबिण्णंदन!!

अकुंच्या धाग्यावर इतके सुंदर प्रतिसाद अपेक्षित नव्हते.. अकु.. असे प्रतिसाद येणार असतील तर तुमचे ४६१८३७ निरर्थक धागे माफ करु आपण! नीलकांत आणि बॅटमॅन, दोघांचेही प्रतिसाद अत्युत्तम!!

In reply to by पिलीयन रायडर

नीलकांत आणि बॅटमॅन, दोघांचेही प्रतिसाद अत्युत्तम!!
+१ हे प्रतिसाद म्हणजे धाग्याचं म्याटर पाहिजे होतं - एक दस्तऐवजीकरण म्हणून.

छान प्रतिसाद. बॅटमॅन आणि नीलकांतचे. वरवर विचार करता तरी छोटी राज्ये जास्तं चांगला विकास देऊ शकतील असं वाटतं.

हा प्रकार म्हणजे मुळातच पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत संस्थाना समोर तुलनेने गरिब असलेली संस्थाने अर्थातच आवश्यक कमी पैसा चारु शकणार व परिणामी वरुन सत्ताकेंद्रे नेहमीच प.महाराष्ट्रकेंद्रीत वाटली जाणार यातुन निर्माण झालेली कमीपणाची जाणिव इतकेच याचे स्वरुप समजत होतो. प.महाराष्ट्राच्या श्रीमंतीला कर्तुत्वापेक्षाही भौगोलीकतेचा व निसर्गाचा प्रमुख हातभार आहे त्यामुळे त्यामुळेच उद्या वेगळा प्रदेश निर्माण होउनही जर त्यातील जनता गरिब व विषेश कर न देणारीच राहिली (कोणतेही कारण असो कर्तुत्वाभाव वा इतर प्रकोप) तर हा प्रदेश उलट भरघोस नक्षल निर्मीतीचे केंद्र का बनणार नाही अशी शंका मनात येते. अर्थात बॅट्मॅन व निलकांत यांनी बराच चांगला उहापोह केला आहे.

In reply to by आत्मशून्य

थोडासा वेगळा मुद्दा नजरेस अनु इच्छितो. विदर्भाच्या आर्थिक अनुषेशाप्रमाणेच मला वाटते भक्तीचा अनुशेष मोठा आहे. ज्ञानोबा-तुकाराम, पंढरीचा विठोबा,अष्टविनायक,जेजुरीचा खंडोबा, शिर्डी साईबाबा हि बर्याच मोठ्या मराठीसमूहाची भक्तीस्थाने प्रामुख्याने पुणे आणि लगतचे जिल्हे यांमध्येच आहेत.आणि या भक्ती स्थानांची लोकप्रियता वाढविण्यात चित्रपट आणि सहयोगी साधनांनी हातभार लावला आहेच. तशाच प्रकारचे branding किवा प्रसिद्धी म्हणा विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील श्रद्धास्थानांची झाली नाही. मग त्या अनुषंगाने येणारे spiritual tourism पण नाही. वर्षातून एकदा तरी वारी किवां यात्रेच्या निमित्ताने विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील जनतेला या ठिकाणी यावे लागते. तसे पुणे आणि लगतच्या जिल्ह्यां मधील जनतेला विदर्भ किवा मराठवाड्यात जावे लागत नाही (काही अपवाद जरूर असणार,पण एकूण संख्या कमीच )त्यामुळेसुद्धा इकडच्या जनतेच्या मनामध्ये आणि पर्यायाने नेतृत्वा मध्ये एक प्रकारच्या श्रेष्ठत्वाची (अहंगंडाची) भावना मनात येत असावी का ? असा एक विचार मनात येतो

In reply to by lakhu risbud

वारकरी संप्रदायाचा प्रसार विदर्भात बर्‍यापैकी झालेला आहे. त्यामुळे पंढरपुर, देहू, आळंदी, नेवासे ही विदर्भातील लोकांची श्रध्दास्थाने आहेतच. शिर्डी हे सुध्दा विदर्भातील लोकांचे श्रध्देचे ठिकाण आहे. मात्र गेल्या दोन दशकात शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त बर्‍यापैकी वाढत आहेत आणि विदर्भातील सर्व ठिकाणाहून शेगावला लोक येतात. विशेषत: गेल्या आठवड्यात गजानन महाराजांचा प्रगटदिन महोत्सव झाला. त्या दिवशी शेगाव मध्ये खुप मोठ्या संख्येत लोक हजर असतात. मात्र अद्यापही शेगावची मार्केटींग तेवढी झालेली नाही हे खरं आहे. शेगावच्या संस्थानने वारकरी संप्रदायाच्या प्रसाराची मोठी मोहीम हाती घेतली आहे. शेगाव ते पंढरपुर अशी पायी वारी दरवर्षी जाते. माहुरची रेणूका (नांदेड मराठवाडा) हे सुध्दा विदर्भातील लोकांचे श्र॑ध्दास्थान. महाराष्ट्रातील प्राचीण संप्रदायापैकी महानुभावपंथाची जवळपास सर्वच महत्वाची तिर्थक्षेत्रे ही विदर्भात आहेत. - नीलकांत

विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र स्पर्धेचं कारण अजून मागच्या इतिहासात पण सापडू शकेल. नागपूरकर भोसले हे एक सत्ताकेंद्र होतं. "अंताजीची बखर" नावाच्या भारी कादंबरीच्या प्रस्तावनेत असा काहीतरी उल्लेख आहे. कुठेसं वाचल्याचं आठवतंय - नागपूरकर भोसल्यांपैकी एकाला पेशव्यांच्या मदतीने छत्रपती बनवण्याचा प्रयत्नही झाला होता - सातार्‍याच्या गादीवर दत्तक वगैरे देऊन. बॅटमॅन आणि इतर इतिहासप्रेमी अर्थातच जास्त प्रकाश टाकू शकतील.

हो पण महाराष्ट्राचे जे सहा (विदर्भ , मराठवाडा , कोंकण...वगैरे) असे प्रांत आहेत ते कोणत्या निकषावर केले गेलेत म्हणजे भौगोलिक दृष्ट्या की आणखी काही कारणं आहेत. तसेच ते कधीपासुन असे नावाजले गेले. यावर बॅटमन, आणि वल्ली साहेबांनी कृपया प्रकाश टाकावा.

नाकापेक्षा मोती जड!! या धाग्यावर एकापेक्षा एक छान प्रतिसाद आलेत. नीलकांतने आठवड्यात २ दिवस तरी मिपावर जास्त वेळ घालवावा अशी विनंतीवजा आज्ञा देत आहे! ;)

पहिल्यांदाच अकुंचा धागा पुनर्वाचनीय झालाय! मला वाटते, डॉ श्रीकांत जीचकार यांनी आर्थिक मुद्द्यावर स्वतंत्र विदर्भ हा पर्याय योग्य नसल्याचे दाखवून दिले होते.

प्राचीन संस्कृत साहित्यात राजकुमाराने विदर्भातील सुंदर राजकन्ये बरोबर विवाह करीत असे. असे बरेच उल्लेख आहेत. स्वयं श्री कृष्णाने ही वैदर्भी राजकन्येशी लग्न केले होते. असो. आमची सौ. ही विदर्भातील आहे. (आता ती सुंदर आहे कि नाही या वर मी काहीच बोलणार नाही कारण अन्यथा 'आगे कुआं आणि पिछे खाई वाली गत होईल,तिने वाचले तर). तुमच्या जिभेला काही हाड नाही असं/अस तिचे नेहमीच म्हणणे असते. (तेही खरं/खर आहे म्हणा, विदर्भातले लोक नाकात बोलत नाही) दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरला गेलो होतो. देशातील सर्वात जास्त वीज चंद्रपूरच्या पंचक्रोशीत होते तरी ही १० तास वीज नव्हती. सर्व वीज मुंबईला जाते. विद्युत केंद्रातील एक अधिकारी म्हणाला, एका युनिट वर २० पैशे ही रायेल्टी मिळाली तरी ही विदर्भ देशातील श्रीमंत राज्य बनेल. असो

In reply to by विवेकपटाईत

एक जरा अवांतर शंका :
विदर्भातील सुंदर राजकन्या
आजच्या विदर्भात सुंदर पोरी असतात का हो ? म्हणजे बंगाली / कश्मीरी / पुणेरी / मल्लु / हरियाणवीपंजाबी सुंदर पोरी पाहुन आहे ...पण खास नागपुर विदर्भ वगैरेची सुंदर पोरगी अजुन तरी पाहण्यात नाही ...

In reply to by प्रसाद गोडबोले

आजच्या विदर्भात सुंदर पोरी असतात का हो? म्हणजे काय? असतातच.. आम्ही नागपुरातच टापायचो पोरी. तेवढ्यासाठी पुण्या-मुंबैला थोडी जाणार? ;-)

In reply to by टवाळ कार्टा

'स्वदेस'वाली गायत्री जोशी नागपुरची असल्याची ऎकल्याचे स्मरते. मलातरी तीने त्यानंतर चित्रपट न केल्याचे वाईट वाटले..

काही गोष्टी या चर्चेत नजरेत आणून द्याव्याश्या वाटतात. हायकमांडला राजकारणातील स्त्री आरक्षण सुद्धा हवे होते तशीच इतर अनेक विधेयके पण ते तेलंगाणा विधेयक काहीही झाले तरी करूच या अतीइर्षेने ढकलले तसे ढकलले नाही. सिमांध्रच्या जेवढ्या सिट काँग्रेस गमावेल तेवढ्याच तेलंगाणात मिळतील हे स्पष्ट नसतानाही एवढा उपद्व्याप काँग्रेस पक्ष श्रेष्टींनी का केला ? टिआरएस शी हात मिळवणी केली तरी फार फारतर तेलंगाणापुरताच फायदा होतो. टिआरएसच्या मागणीला हैदराबादच्या काही धर्मांध शक्तींचा पाठींबा आहे. नमोंमुळे काही अंशी ध्रुवीकरण होणारच आहे तर ध्रुवीकरण आणि बेरजेचे स्वतःकडे वळवण्याचे डाव आखाडे तर नसावेत अशी जराशी शंका चाटून गेली. हि शंका येण्याच कारण म्हणजे सध्या तेलंगाणाच्या इतिहासाच पुर्नलेखन केल जात आहे. हैदराबादचा शेवटचा निजाम कसा आदर्श होता हे सांगण्याच्या शर्यतीत काँग्रेस आणि टिआरएस आणि धर्मांध खांद्याला खांदा देऊन बोलताहेत. गेल्या दोनचार वर्षातील रेल्वे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राने नवीन न मागितलेल्या बर्‍याच आगगाड्या मिळाल्या त्याची उजळणी मराठी वृत्तपत्रांनी महाराष्ट्राला रेल्वे अर्थ संकल्पातन काय मिळाले यात केली. पण गंमत म्हणजे या सर्व (बहुसंख्य) रेल्वेगाड्या उत्तर भारतात पोहोचतात. सकाळची ही बातमी विदर्भ, मराठवाडाही वेगळे करा पहा उत्तरेतल्या नेत्यांना विदर्भ, मराठवाडाची मोठी पडली आहे ? एकुण महाराष्ट्रातील मराठी लोक डिव्हाईड झाले म्हणजे मुंबई पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातला मराठी प्रभाव आपोआपच कमी होतो. त्यामुळे तुम्हाला नको असेल तरी विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्यास उत्सुक आहोत असा सरळ सरळ संदेश आहे. उत्तरेत मतांचा टक्का वाढत असेल आणि चिल्लरपार्टी पक्ष काँग्रेस मध्ये भरती होत असतील तर काँग्रेस हायकमांडलाही आनंद असेल. आणि हायकमांड हो म्हणाली कि पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी माना हलवतील. विदर्भ, मराठवाडा नको नको म्हणाले तरी वेगळ राज्य हाती पडेल. असच असेल अथवा होईल अस नाही पण हायकमांड आणि उत्तरेचे गूगली पडण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

In reply to by माहितगार

हा माझा संशय वाद आहे संशयाच प्रमाण जेवणातल्या मीठाच्या प्रमाणात आणि प्रमाणातच हव. आणि म्हणून आपण ते तेवढच घ्याव :)

आजच्या लोकसत्ता मध्ये गिरीश कुबेरांचा लहान राज्यांच्या संदर्भात लेख आहे. लहान राज्य असण्याला माझा तसा विरोध नाही. मात्र आ़ज आपण हे बघतोय की ४८ खासदार असून सुध्दा महाराष्ट्राची दिल्लीत विशेष छाप नाही तर मग ११ खासदार घेऊन विदर्भ व ३७ खासदार घेऊन उर्वरीत महाराष्ट्राची काय किंमत उरेल? आजही उत्तरांचल व झारखंड वेगळा होऊनही उत्तर प्रदेश व बिहारचीच दिल्लीच्या राजकारणावर पकड आहे. रेल्वेचा मुद्दा असा आहे की उत्तरेतील लोकांना दक्षीणेत जेथे जायचं असेल तेथे रेल्वे येते. महाराष्ट्रातील रेल्वे मंत्री दंडवतेंचा अपवाद सोडला तर नाहीच. त्यामुळे मला जर अमरावतीहून औरंगाबादला जायचे असल्यास रेल्वेचा मार्ग नाही. अद्याप महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्या मुख्यालयेसुध्दा रेल्वेने जोडलेले नाहीत. रेल्वेचे विद्युतीकरण आदी बाबींवर कुणी बोलत नाही. त्यामुळे केवळ महाराष्ट्रात नवीन रेल्वे सुरू झाली यात आनंद मानायची पाळी आपल्यावर आहे. रेल्वे विषयी खुप बोलता येईल. मात्र त्याने विषयांतर होईल. - नीलकांत

In reply to by नीलकांत

(गिरीश कुबेरांचा लेख मोठा असल्याने वाचण्यास वेळ दिला नाही.) तर्काचा आणि भावनेचा संबंध असलाच पाहीजे असे नाही; राजकारणी स्वतःची सोय पहातात आणि राजकारण (मास पॉलीटीक्स) भावनेशी खेळत चालवले जाते. प्रदेशाचे आकारमान लहान असेल तर प्रगती होते आणि नसेल तर होत नाही हे तर्कसुसंगत असते तर कदाचित जगातली असंख्य छोटी राष्ट्रे भारतापेक्षा विकसित राहीली असती आणि आमेरीकेतील असंख्ये राज्यांमध्ये विकासच साधला गेला नसता. मंत्र्यांच्या संख्येवर आमदारांच्या १५ % पेक्षा अधिक असू नयेत अस बंधन आल आहे. महामंडळांवरही राजकीय नेमणूका करणे अशक्य होते दुसरीकडे लोकसंख्या वाढली आहे त्या प्रमाणात व्यक्तीगत राजकीय आकांक्षांना वाटकरून देणे गरजेचे असू शकते. त्या शिवाय बर्‍याच प्रमाणावर राजकीय त्रिशंकु परिस्थितीत या आकांक्षांना धरबंध रहात नाही. विभागीय असमतोलांच्या तक्रारीत अंशतः तथ्य असले तरी महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्रीय लोकांच्या उद्योजकता विकासात सामाजिक आणि राजकीय नेते वस्तुस्थितीची जाणीव असूनही पुरेसे यशस्वी होऊ नाही शकलेले. त्यामुळे रोजगाराच्या मुख्य प्रश्नांना विवीध अस्मितांच्या चष्म्यातून पहाणे या ना त्या मार्गाने असंतोषास वाटकरून देताना स्वतःला राजकारणात तरंगत ठेवणे हे होते आहे. पण केवळ अस्मितांचे भावनिक राजकारण करून विकास ना व्यक्तीचा ना समुहाचा साधला जाऊ शकतो. दिल्लीतील राजकीय प्रभाव दोन-तीन प्रकारचे आहेत एक मतपेटी प्रभाव जो उत्तरप्रदेश बिहार गाजवत आणि दुसरा आर्थिक प्रभाव देविलाल मोदे आणि नमो हे प्रभाव दुसर्‍या प्रकारातले आहेत हे दोन्ही प्रभावही महाराष्ट्राच्या वाट्यास येत नाहीत. तिसरा प्रभाव राजकीय नेतृत्वाने राष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता प्राप्त करणे यात महाराष्ट्रा बाहेर कमी पडणारा राजकीय जनसंपर्क महाराष्ट्राबाहेरच्या राजकीय गरजांच्या जाणीवेचा अभाव भाषा कौशल्याचा अभाव महाराष्ट्र आणि इतर दक्षिणेतील राज्यांमधील आपापसातले विवाद हे प्रभाव कमी करण्यास कारणीभूत ठरतात. महाराष्ट्राची दोन किंवा तीन छोटी छोटी राज्ये झालीतर काही ना काही विवाद व्हावयाचाच आणि मग प्रभावात आपसूक घट येईल हे सहाजिक आहे. हो ना हो असे झालेच तर राजकीय नेतृत्वाने राष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता प्राप्त करण्याचा आता पर्यंत टाळलेला मार्ग अधिक जोरकस पणे करावा लागेल पण आपले राजकीय नेतृत्व हे करू धजेल का हे केवळ काळच सांगू शकतो.

In reply to by नीलकांत

नेहमीच सत्ता पक्षशी निष्टावंत राहिल्या मुळे महाराष्ट्र हा टेकन फार ग्रांटेट आहे. महाराष्ट्र कडे सर्वात जास्त दुर्लक्ष होत कारण आपले नेता आरडा ओरड करत नाही. जिथे विरोधी पक्षाचं राज्य असतो, त्या राज्याला अधिक भाव मिळतो. बाकी महाराष्ट्राचे नेता अत्यंत स्वाभिमानी असतात कसे बघा...खरा मराठी बाणा म्हणतात तो हाच का ????

बॅट्या, निलकांतची फटकेबाजी नेहमीप्रमाणे लाजवाब. स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन इतक्यात तरी जोर पकडणार नाहि... कारण मुळातच हा प्रांत आंदोलनकारी वगैरे नाहि. कोकणचं थोडं रफ व्हर्जन म्हणजे विदर्भ. हातभट्टी ते हुच्च हिंग्लीश अशी कुठलीही दारु प्यायची आणि सुशेगात जगायचं या पलिकडे व्हिजनच नाहि. आर.एस.एस. च्या मदतीने विदर्भ राज्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न नितीन गडकरींनी करुन बघितला. साक्षात टाटा वगैरे मंडळीच्या गळ्यात विदर्भाच्या औद्योगीकरणाची घंटा बांधण्याचा प्रयत्न केला. पण टाटा काय कमि धूर्त आहेत. त्यांनी बरोब्बर ओळखलं विदर्भाचं पाणि. शिवाय गडकरींची स्वतःचीच उंची काहि फार नाहि आणि जनमताचा पाठिंबा सुद्धा यथातथाच. मागच्या पिढीत वसंत साठे वगैरे वजनदार मंडळी होती. पण दिल्लीत त्यांचं पुण्य कमि पडलं. बाकि आनंदी-आनंद आहे त्या भागात. प्रतिभा पाटिलांच्या कृपेने अर्धा डजन फ्लायओव्हर बांधण्यापलिकडे अमरावतीत काहि घडलं नाहि फारसं. विजयादशमीला आर.एस.एस.चं रेशीमबाग आणि आंबेडकरांची दीक्षाभूमी शक्ती प्रदर्शन करते. पण त्याचा कुठलाच आवाज विदर्भाच्या बाबतीत नसतो. आता मोनोरेल होणार असं ऐकतोय. म्हणजे तत्वतः प्रोजेक्टला मंजूरी मिळाली म्हणतात. पुढच्या ३-४ दशकात ते एक काम होऊन जाईल म्हणा. पु.ल. खरच बोलले होते... "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे" ला अस्सल अस्सल नागपूरकर "का फिजुल फोका मारुन राहिला बेsssss"च म्हणणार.

वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरेल का हे सांगणे तसे अवघडच आहे. यापूर्वी १९९६-९७ मध्ये व २००१ मध्ये आंदोलनांना बऱ्यापैकी जोर होता. या धाग्यावर अनेक अभ्यासू मते मांडण्यात आली आहेत. मी स्वतः अमरावतीकर असल्याने हा विषय फारच जवळचा आहे. इतरांच्या मतांबद्दल आदर दर्शवून मी माझी निरीक्षणे व मते मांडू इच्छितो. सर्वप्रथम विदर्भाला मागासलेला प्रदेश जे म्हंटले जाते त्यामुळे एक चुकीचे चित्र विदर्भाला जवळून न ओळखणाऱ्यांच्या मनात उभे राहते. पायाभूत सुविधा जसे रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण असे अत्यंत महत्त्वाचे निकष लावल्यास विदर्भ कुठल्याही प्रकारे मागासपणाच्या व्याख्येत बसत नाही. उलट या बाबतीत राष्ट्रीय सरासरीच्या वरच असावा. विदर्भाची दशकानुदशके असलेली समस्या म्हणजे शेतीसाठी आवश्यक असणारा पाणीपुरवठा नसणे. शेतजमीन सुपीक असली तरी कोरडवाहू शेती करताना निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा गोरगरीब शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जातो. महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या इतर भागांत राजकीय इच्छाशक्तीमुळे व नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेमुळे जी सिंचनव्यवस्था निर्माण होऊ शकली ती विदर्भात नाही होऊ शकली. त्याखेरीज मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल असे उद्योगधंदे विदर्भात नसणे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मुंबईपासून जवळ असणाऱ्या भागांना मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र जवळ असण्याचा नैसर्गिक लाभ मिळाला तसा तो विदर्भाला मिळाला नाही. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी याबाबतीत दूरदृष्टी दाखवून थोडेबहुत उद्योगधंदे विदर्भाकडे वळवले असते तर आज नक्कीच चित्र वेगळे असते. मध्य भारतातले सर्वात मोठे व्यापारी केंद्र व उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले नागपूर शहर विदर्भासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी बलस्थान ठरले असते व रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होऊन व नवे रोजगारकेंद्र बनले असते. ज्यायोगे प्रादेशिक असमतोल निर्माण झाला नसता. अनेकांना असे वाटते की आजवर सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्रिपदावर बसणारी व्यक्ती (स्व वसंतराव नाईक) हे विदर्भातले होते तरीही त्याचा विदर्भाला फारसा उपयोग झाला नाही. याबद्दल माझे निरीक्षण असे आहे की मराठी माणूस जसे राष्ट्रीय स्तरावर मोठ्या हुद्द्यावर पोचला की तो जसे स्वतःच्या राज्याला झुकते माप देणे अयोग्य समजतो तसेच विदर्भातला माणूस राज्यस्तरावर पोचल्यावर घडते. स्व वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तो काळ सरून ४ दशके होत आली आहेत. त्यानंतर दीड वर्षांसाठी सुधाकरराव नाईक व युतीच्या काळात नितीन गडकरी यांच्याखेरीज राज्यस्तरावर महत्त्वाचे पद भुषवलेली विदर्भातील व्यक्ती मला तरी स्मरत नाही. त्यातही गडकरी यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले ते काही मुख्यमंत्रिपदावर किंवा केंद्रीय मंत्रिपदावर नव्हते. विदर्भात खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या दोन संधी पहिली १९९१ च्या उदारीकरणानंतर व ९० च्या दशकाच्या शेवटी व गेल्या दशकाच्या सुरुवातीला माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा राज्याकडे चालून आलेल्या ओघाचा न्याय्य हिस्सा विदर्भाकडे वळविण्यास राज्य सरकारे कमी पडली किंवा त्यांची तशी इच्छाशक्ती होती का यावरही साशंकता वाटते. कागदोपत्री दिसणारा आर्थिक अनुशेष तर आहेच पण संधींचा मोठा अनुशेष वर्षानुवर्षे तसाच आहे. बरेचदा असे म्हंटले जाते की मग विदर्भातले नेते यावर आवाज का उठवत नाहीत? यावर एक उदाहरण देतो. २००४ च्या निवडणुकीतील पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारात स्वतः शरद पवार २००३-०४ मधील पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाबद्दल तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते नितीन गडकरी यांना दोष देत होते. कारण विदर्भाचा निधी इतर कारणांसाठी वापरला जात असल्याबाबत त्यांनी आक्षेप घेणारे पत्र राज्यपालांना लिहिले होते व राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांद्वारे सरकारवर त्या बाबतीत बंधन आणले होते. ज्यांना राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून गौरवले जाते तेच असे वागत असतील तर इतर राज्यस्तरीय नेत्यांकडून प्रादेशिक समतोल राखण्याची काय अपेक्षा बाळगायची. वेगळे राज्य झाल्यास नेमका काय बदल होईल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाजगी उद्योगांद्वारे गुंतवणुकीसाठी तुलनेत लहान क्षेत्रफळाचे स्वतंत्र मार्केटींग करता येईल. देशातील इतर औद्योगिक केंद्रांपेक्षा सध्यातरी विदर्भात लागणारा खर्च (जमीनीच्या किमती, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी) तुलनात्मकरित्या कमी राहील. मी २००० साल पूर्वीचे मध्य प्रदेशचा भाग असणारे छत्तिसगढ व नंतरचे छत्तिसगढ जवळून पाहिले आहे. आज त्या भागाची जी प्रगती झाली आहे ती मध्य प्रदेशात राहून नक्कीच झाली नसती. विदर्भ राज्य वेगळे झाल्यास उर्वरित महाराष्ट्रालाही लाभ होईल. गेले काही वर्षे सत्ताधारी इतर भागांतील विकास योजनांना निधी अपुरा पडू लागला की विदर्भाचा अनुशेष भरून काढला जातोय अशी कारणे सांगतात. असले काही कारण तेव्हा उरणार नाही. विदर्भातील सामान्य जनतेचा वेगळ्या राज्याला पाठिंबा नाही असा पण मुद्दा वर आलाय. माझे असे निरीक्षण आहे इतर मराठी जनांप्रमाणेच विदर्भातली जनताही सोशिक आहे. तेलंगाणा वगैरे सारखे हिंसक आंदोलन विदर्भात कधीच होणार नाही. विदर्भाचे वेगळे राज्य झाले तर बहुतांश सामान्य जनतेला समाधानच वाटेल अन नाही झाले तरी आजवर जसे जुळवून घेतले आहे तसे जुळवून घेण्याचा प्रयत्न निरंतर सुरू राहील. बाकी वेगळ्या राज्याची मागणी केल्यास बरेच लोक या प्रकारे आक्षेप घेतात की वेगळा देशच मागितला जात आहे. आजच्या विदर्भाचा भूभाग वेगळ्या राज्यात राहिला काय किंवा महाराष्ट्रात राहिला काय शेवटी एकाच देशात असणार आहे. आंध्र प्रदेश सारखी अविश्वासाची, खुनशीपणाची भावना विदर्भासकट महाराष्ट्रात कुठेही आढळत नाही. विदर्भ महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासूनच मराठी माणसाची सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रतीके एकच होती ती नंतरही एकच राहतील. देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्राची कूर्मगतीने प्रगती होत राहण्यापेक्षा महाराष्ट्र व विदर्भ या राज्यांच्या प्रगतीची घोडदौड होणे व्यापक हिताचे ठरेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

आंध्र तेलंगाणचे नाते माहित नाही पण पुर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला जाणारे वारकरी असोत अथवा इतर संत मंडळींनी शतकोनशतके महाराष्ट्राचा धागा एकत्र विणून ठेवला आहे. त्याशिवाय बेरार आणि मराठवाड्याने त्यांना नको असलेल्या सत्ताधिशांसोबत गेली बरीच स्वातंत्र्यपुर्व शतके संसार केला असल्यामुळे महाराष्ट्रात एकत्र नांदणे हि पहिली पसंत असणे स्वाभाविक आहेच. महाराष्ट्रातील उद्योजकता विकास हा किमान प्राथमिक स्तरावरील माझ्या अभ्यासाचा विषय आहे. फुले लोकहितवादी रानडे टिळक ते आतापर्यंतचे सामाजिक राजकीय नेते मंडळी उद्योजकता विकासाचे महत्व प्रतिपादन करत आली आहे. व्यावसायिकतेत जाण्यास केवळ विदर्भ मराठवाडा नव्हे आख्या महाराष्ट्राचा समाज कमी पडतो. मी गुजरात गुजराथी अथवा नमोंचा भक्त नाही तरीही काही सामाजिक स्तरीय माझ्या ऑब्झर्वेशन मधील तुलना नोंदवतो. गुजराथ मधल्या गुजराती वृत्तपत्रात टॉपवरची एक राजकीय बातमी संपली कि खाली उद्योजकता क्षेत्रातल्या बातम्या असतात. आकाशवाणीच्या टिव्हीच्या गुजराथी बातम्यांची सुद्धा अशीच गोष्ट आहे. गुजराथेत रहाण्याच्या जागांपेक्षा कमर्शियल शॉप्स आणि जागांची बांधकाम आणि विक्री राहत्या जागांपेक्षा अधिक होते कारण रहायला स्वतःची जागा नसली तरी गुजराथी माणूस दुकान आधी घेईल. कितीही सामान्य व्यवसाय केला तरी बाकी समाज तुच्छतेने पहात नाही (अर्थात जातीयवाद तिथे अजूनही आहे पण तो वेगळा मुद्दा आहे) अहमदाबाद मध्ये मी असताना रविवारी सकाळी फ्लॅटचा दरवाजा नॉक केला जात असे राष्ट्रीयकृत बँकेचा माणूस तुमच्या बिल्डींगच्या खाली आमच्या बँकेचा स्टॉल लागलाय भेट देऊन जा म्हणे तेही डिपॉझीट्स गोळा करण्या करता अथवा कार आणि हाऊसिंग लोन करता नव्हे व्यावसायिक कर्जा देण्या करता स्टॉल लागलेला असे. आम्ही महाराष्ट्रीय लोक उद्योग व्यवसाय सोडून इतरच चर्चा करत असतो. मराठी संकेतस्थळांवर उद्योजगते बद्दल किती धागे काढले जातात ? हि सामाजिक परिस्थिती न बदलली जाण्यात राजकारण्यांना दोषी धरता येईल पण समाजाचा म्हणून स्वतःचा काही एक दोष आहे. वेगळ्या राज्य निर्मितीने काही अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह डिसीजन जवळ आणि लौकर होऊ शकतील नाही असे नाही पण तेवढ्याने सामाजिक वास्तव बदलण्याची शक्यता कमी आहे. छत्तिसगढमध्ये छतिसगढच्या बाहेरच्या व्यापार्‍यांनी येऊन काय विकास साधला हे महत्वाचे नाही तिथल्या छत्तिसगढी माणसाचा काय विकास साधला गेला हे महत्वाचे असणार आहे. तसे विदर्भ मराठवाड्या बाबतीत मराठी माणसाचा काय विकास झाला हे महत्वाचे आहे पण मराठी माणूस सामाजिक दृष्ट्या स्वतःस बदलण्यास तयार नाही झाला तर वेगळ्या राज्याचा उपयोग नाही वरून मराठी माणसाची राजकीय एकता संपली तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे आले असे होऊ नये याची काळजी घ्यावयास हवी. विदर्भ मराठवाडा वेगळा झाला तर सर्वात आधी आनंद पश्चिम महाराष्ट्राचे नेते आणि उत्तर भारतीय आधी साजरा करतील कारण मुंबईचे करातून येणार्‍या उत्पन्नातले दोन वाटेकरी तसेच गळतील. त्यामुळे सिमांध्रा सारखा पश्चिम महाराष्ट्रातले नेते विरोध करतील हि शक्यता कमीच. खरे म्हणजे दर तीस वर्षांनी एकत्र यावे वेगळे व्हावे अशी काही एक व्यवस्था असेल तर विकासा करता तात्पुरते वेगळे झालो होतो पण राजकीय एकते करता पुन्हा एकत्र आलो असे काही करता आले तर अधिक सु़ज्ञपणाचे ठरू शकेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद. अर्थात कन्क्लूजन खटकतेय थोडे पण त्याच्या खंडनमंडनार्थ लागणारा अभ्यास नाही, सबब वाचत राहतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रतिसाद आवडला. जाता जाता, धागाकाढूनअविनाशकुलकर्णीकुठेपळाले?कीधाग्यावरआताकाहीखरोखरीचगंभीरचर्चाहोतसल्यानेत्यांचाइंटरेस्टराहिलेलानाही?

In reply to by श्रीरंग_जोशी

पायाभूत सुविधा जसे रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण असे अत्यंत महत्त्वाचे निकष लावल्यास विदर्भ कुठल्याही प्रकारे मागासपणाच्या व्याख्येत बसत नाही. उलट या बाबतीत राष्ट्रीय सरासरीच्या वरच असावा.
या वाक्याशी असहमत. विदर्भ संपूर्णपणे मागासलेला आहे असे माझे मत नाही, फक्त पिण्याचे पाणी किंवा रस्ते याबाबतीत असहमत. विशेषतः पिण्याचे पाणी या मुद्द्यावर. विदर्भात समाविष्ट असलेल्या बुलढाणा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमधील अनेक वर्षांचा दुष्काळाचा प्रश्न बघता हे वाक्य सरसकट पणे संपूर्ण विदर्भाला लागू होत नाही. पाण्याचा वापर आणि दुष्काळ या विषयावर बोलायचे झाल्यास एक अख्खा लेख होईल. त्यामुळे फार काही लिहीत नाही. रस्त्यांच्या बाबतीत नागपूर अख्या महाराष्ट्राला अपवाद ठरू शकेल पण इतर विदर्भातले रस्ते गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात पुरेपूर अनुभवलेत. पावसामुळे वाट लागली नाही असा अमरावती नागपूर हा एकमेव रस्ता होता. इतरत्र आनंदी आनंद. अजून एक म्हणजे या गोष्टी तुलनात्मक पण असतात बरेचदा. जसा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भावर अन्याय होतो तसा विदर्भात बुलढाणा, वाशिम जिल्ह्यावर होतो. असे असूनही वेगळा विदर्भ झाला की हे सगळे बदलेल असेही वाटत नाही. विदर्भ वेगळे राज्य झाले तरीही कुठले उद्योग बुलढाणा अकोला किंवा वाशिम या भागात तग धरू शकतील जिथे पाण्याचे इतके दुर्भिक्ष आहे आणि विजेचा तुटवडा. वेगळे राज्य झाले की चंद्रपूरची सगळी वीज फक्त विदर्भासाठी असे होईल का? अन्यायच दूर करायचा असेल तर राजकारणी आणि जनता या सगळ्यांनाच आवाज उठवावा लागेल. मग महाराष्ट्रात असूनही विदर्भ मागासलेला किंवा दुर्लक्षित राहणार नाही. वर अर्धवटरावांनी म्हटले आहे की हा प्रांत आंदोलनकारी नाही हे खरे आहे. सद्यस्थितीत हा प्रदेश मागासलेला आहे असे म्हटले जाते उद्या हे राज्य अविकसित आहे असे फक्त होऊ नये ही एवढीच इच्छा आहे. हे माझे वैयक्तीक मत. तुमच्या मतांचा आदर आहेच. जर या सगळ्यातून विकास साध्य झाला तर आनंदच होईल.

In reply to by मधुरा देशपांडे

माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. मुळात या दीर्घकालीन समस्येवर कोणताही एक उपाय उत्कृष्ट असणार नाहीच. प्रत्येक मार्गाचे फायदे तोटे असणारच. परंतु गेल्या अनेक दशकांचा अनुभव बघता विदर्भ महाराष्ट्र राज्याचाच हिस्सा राहिल्यास परिस्थिती जैसे थे राहण्याची शक्यता अधिक वाटते. माहितगार - एकदा वेगळ्या राज्याची निर्मिती झाली की पुन्हा एकत्रीकरण होणे शक्य नसते. जुन्या राज्यातील लोक यासाठी तयार होणे अशक्यच. मधुरा - वर लिहिलेली निरीक्षणे ढोबळ मानाची होती. अकोल्यातील खराब रस्त्यांचा अनुभव एकेकाळी घेतला आहे. मी परदेशात राहत असल्याने आजकाल रस्त्यांची नेमकी अवस्था कशी असेल हे ठाऊक नाही. पायाभूत सुविधांच्या विषमतेबाबत तुमच्या मताशी सहमत. ती आपल्या संपूर्ण देशाचीच समस्या आहे. लहान राज्य असेल तर उपेक्षित भागांतील लोकप्रतिनिधींचा आवाज मोठ्या राज्याच्या तुलनेत अधिक ऐकला जाईल. मी या बाबतीत चांगलाच आशावादी आहे. राज्याचा आकार लहान असल्यास राजकारणातील प्रस्थापितांखेरीज नवे लोकही उत्साहाने सहभागी होतील. याखेरीज कुणीतरी वर लिहिले आहे की शिवसेनेचे विदर्भात बरेच उमेदवार निवडून येतात म्हणून वेगळ्या विदर्भाला बहुतांश स्थानिकांचा विरोध आहे असा तर्क एका काँग्रेस नेत्याने मांडला आहे. हा तर्क अजिबात पटण्यासारखा नाही. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेला (त्याबरोबर भाजपला) बरेच यश मिळाले असले तरी तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसचेच आमदार सर्वाधिक आहेत. त्यांच्या जोरावरच काँग्रेसचे नेतृत्व राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये नियंत्रणात ठेवू शकत आहे. १९९९ पासून झालेली राष्ट्रवादीची प्रगती खास करून विदर्भासाठी फारच गैरसोयीची ठरली. उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादी वरचढ नसती तर कदाचित आजवर काँग्रेसने वेगळ्या विदर्भासाठी पावले उचलली देखील असती. शिवसेनेला विदर्भात मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये ९० च्या दशकापासून स्व. बाळासाहेबांच्या करिष्म्यामुळे निर्माण झालेले तरुण कार्यकर्त्यांचे जाळे व २००५ ते २००७ मध्ये उद्धव यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोमाने आंदोलन करणे हे घटक आहेत. दिवाकर रावतेंसारख्या कुशल संघटकाचा उद्धव यांच्या नेतृत्वाला विदर्भात जम बसण्यास चांगला हातभार लागला. दोन महिन्यांपूर्वी लोकसत्तेमध्ये प्रकाशित झालेला शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचा हा लेख वाचनीय आहे. ते वेगळ्या विदर्भाचे कट्टर समर्थक असल्याने त्यांनी लेखामध्ये मांडलेल्या काही दाव्यांची अतिरंजितता नाकारता येत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

राज्याचा आकार लहान असल्यास राजकारणातील प्रस्थापितांखेरीज नवे लोकही उत्साहाने सहभागी होतील. या विषयी किंचित वेगळे मत आहे. मतदारसंघ जितका लहान तितकी राजकीय माफियेगिरी अधिक असे आज दिसते. लोकांना धाकात ठेवणे छोट्या भूभागात अधिक सोपे जात असावे. बाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे बलाबल आणि त्याचा विदर्भावरील परिंणाम या विषयीची टिप्पणी अचूक आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या ताकतीबाबतही सहमत.

In reply to by श्रीरंग_जोशी

एकदा वेगळ्या राज्याची निर्मिती झाली की पुन्हा एकत्रीकरण होणे शक्य नसते. जुन्या राज्यातील लोक यासाठी तयार होणे अशक्यच.
आपण एका असेतू हिमाचल अशा भारतभूमीचे भाग आहोत स्वतंतत्र राष्ट्रे नव्हे. दीर्घ काळात भूभाग भाषा संस्कृती समाजकारण आणि राजकारण या परिवर्तनीय गोष्टी असतात. (भूभाग सुद्धा पुर्वी भारतीय उपखंड गोडवनाप्रदेशाला जोडलेला होता.) लोकांच्या गरजा बदलतात तशी फ्लेक्झिबिलीटी हवी. जनते करता राज्ये आहेत का राज्यांच्या इगो करता जनता आहे? जर राज्यांच्या इगो करता जनता असेल तर महाराष्ट्रात अजून स्वतंत्र राज्ये बनवण्याचा प्रश्नच उपस्थित रहात नाही. जन गण मन या राष्ट्रगीतात येणारी सारी भूमी मिळून जबतक चांद सूरज रहेगा घोषणा ठिक आहे त्या सिमांच्या आत या घोषणेचा उन्माद प्रॅक्टीकल किती या बाबत मी जरासा साशंक आहे