✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

योगी पावन मनाचा

ध
धन्या यांनी
Tue, 01/07/2014 - 17:41  ·  लेख
लेख
मुक्ता, नावाप्रमाणेच मुक्त असलेली निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानाची ही सर्वात धाकटी बहिण. वयाने धाकटी असली तरी मोठमोठयांचा नक्षा आपल्या ज्ञानाच्या अधिकारावर क्षणात उतरवून टाकणारी ती तेजस्वी मूर्ती होती. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ साली शुक्रवारी म्हणजेच इ. स. १२७९ ला जणू काही आदिशक्ती मुक्तेच्या रुपाने इंद्रायणीतिरी सिद्धबेटावर जन्माला आली. ज्ञानाने लखलख करणारी आकाशीची वीजच जणू चांदण्यांचा शीतल साज लेवून आपल्या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठी भूतलावर अवतरली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी. परंतू आळंदीच्या ब्राम्हणांच्या सांगण्यानूसार जेव्हा त्यांच्या आई बाबांनी त्रीवेणी संगमात देहत्याग केला, तेव्हापासून या असाधारण कुटुंबाचे गृहिणीपणाची जबाबदारी मुक्तेवर पडली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आले. मुक्तेने आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. म्हणुनच तर पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे ज्ञानदादाचा मनावर बिंबवले. ही समजूत घालत असताना मुक्तेने उस्फुर्तपणे जे अभंग गायले तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. ताटीच्या अभंगात मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्तेने जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात. -- १ -- संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥ तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥ थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥ रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥ ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- २ -- योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥ विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥ शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥ विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ३ -- सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥ अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥ ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥ एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥ शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥ एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥ इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ४ -- वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥ त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥ आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥ आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ५ -- संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥ लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥ इह परलोकीं सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥ मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ६ -- एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥ उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचें गबाळ ॥ माय समूळ नुरे जेव्हां । विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥ ऐसा उमज आदिअंतीं । मग सुखी व्हावे संती ॥ चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ७ -- ब्रह्म जैसें तैशा परी । आम्हा वडील भूतें सारी ॥ अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥ जीभ दातांनी चाविली । कोणें बत्तीशी तोडीली? ॥ मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ८ -- सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥ बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥ जीव जीवासी पैं दयावा । मग करुं नये हेवा ॥ तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ९ -- सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥ वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥ पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥ एक मन चेष्टा करी । भूतें बापुंडी शेजारी ॥ अवघी ईश्वराची करणी । काय तेथें केलें कोणीं ॥ पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १० -- गिरीगव्हारे कशासाठीं । रागें पुरवीली पाठी ॥ ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो कां द्वेषी ॥ घर बांधिलें डोंगरीं । विषया हिंडे दारोदारीं ॥ काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥ गंगाजळ ह्रदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ११ -- अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥ ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥ ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥ वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥ ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १२ -- अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥ शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥ कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥ लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥ तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ ज्ञानियांच्या राजाची समजूत घालण्याच्या निमित्ताने ताटीच्या अभंगांमधून जगाला ईतका मोलाचा संदेश देणारी चिमुरडी मुक्ता तेव्हा जेमतेम नऊ दहा वर्षांची असेल. मुक्ता अतिशय स्पष्टवक्ती होती. एकदा ज्ञानदेवादी भावंडं पंढरपूरला गेली असताना तिथं त्यांना संत नामदेव भेटतात. त्यांना ज्ञानदेव नमस्कार करतात पण नामदेव त्याना नमस्कार करीत नाहीत. आपण ज्येष्ठ भक्त असल्यानं ज्ञानदेवांनी आपल्याला नमस्कार करणं योग्यच आहे, असं नामदेवाला वाटतं. ही गोष्ट मुक्ताईला रुचत नाही. ती नामदेवाला म्हणते - अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाही गेला? मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हातीं घेसी।। परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्याचे डोहळे का बाट जाले? कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी। अद्यापि नरोटी राहिली कां? घरी कामधेनू ताक मागूं जाये। ऐसा द्वाड आहे जगामाजी।। अशी नामदेवांची कानउघाडणी करुनच मुक्ताई थांबत नाही तर नामदेवांना भक्तीचं खरं मर्मच कळलं नाही, त्यासाठी योग्य गुरुपाशी जाऊन उपदेश आणि मार्गदर्शन घ्यायला हवं असा सल्लाही ती देते - झालासी हरिभक्त तरी आम्हा काय? आंतुली ती सोय न ठाउकी। घेउनि टाळदिंडी हरिकथा करिसी। हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे।। गुरुवीण तुज नव्हेचि गा मोक्ष। होशील मुमुक्षु साधक तूं। तुझ रुप तुवां नाही ओळखिलें। अहंतेतें धरिले कासयासी? मुक्तेने केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला. त्यांनी विसोबारायांना आपला गुरु केले. जी गत भक्तराज नामदेवांची, तीच गत योगिराज चांगदेवांची. योगसामर्थ्याने चौदाशे वर्ष जगणार्‍या चांगदेवाचं कोरं पत्र पाहताच ती उद्गारली, "अरेरे... एव्हढी चौदाशे वर्ष जगूनही हा चांगदेव योगी कोरडाच राहीला.". याच कोर्‍या कागदावर ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या लिहून चांगदेवाला पाठविल्या. आणि या चौदाशे वर्ष म्हातार्‍या बाळाने चिमुरडया मुक्ताईला आपला गुरु केलं. मुक्तेने केलेल्या अभंगांची संख्या मोजकीच असली तरी तिची अभंगरचना अतिशय प्रासादिक आणि रसाळ आहे. तिच्या अभंगांच्या ओळीओळीतून, शब्दाशब्दांमधून तिचा अध्यात्मामधील अधिकार, तिचे योगसामर्थ्य, तिची प्रौढ आणि प्रगल्भ जाण, तिचा आत्मविश्वास जाणवतो. इ. स. १२९६ मध्ये ज्ञानदेव आणि सोपानांनी एकामागोमाग समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्याकुळ झाले. दोघेही तिर्थाटनास निघाले. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या तीरावर मेहून येथे ते आले असताना सोसाटयाचे वादळ आले. जोराची वीज कडाडली आणि निवृत्तीनाथांची सर्वात छोटी बहीण मुक्ताई गुप्त झाली. आदीशक्ती आपल्या मुळ स्वरुपात विलीन झाली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
33265 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

रसाळ आणि भावपूर्ण लेखन !

मितान
Wed, 01/08/2014 - 18:07 नवीन
रसाळ आणि भावपूर्ण लेखन ! आवडले.
  • Log in or register to post comments

एका चांगल्या धाग्याचं

यशोधरा
Wed, 01/08/2014 - 19:59 नवीन
एका चांगल्या धाग्याचं आध्यात्मिक पानिपत करु नका अशी कळकळीची विनंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धाग्यावरचा सोडून माझे सग्गळे

प्यारे१
Wed, 01/08/2014 - 20:14 नवीन
धाग्यावरचा सोडून माझे सग्गळे उपप्रतिसाद उडवावेत ही विनंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

प्रतिसादांच्या वाचनाच्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/08/2014 - 23:34 नवीन
प्रतिसादांच्या वाचनाच्या निमित्तानी अत्ता पुन्हा सर्व लेख शांतपणे वाचला. आध्यात्मातून ऐहीक उद्धारणार्थ लेखन व्हावं तर ते असं! झालासी हरिभक्त तरी आम्हा काय? आंतुली ती सोय न ठाउकी। घेउनि टाळदिंडी हरिकथा करिसी। हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे।। गुरुवीण तुज नव्हेचि गा मोक्ष। होशील मुमुक्षु साधक तूं। तुझ रुप तुवां नाही ओळखिलें। अहंतेतें धरिले कासयासी? >>> यातला होशील मुमुक्षु साधक तूं। हा तर आध्यात्माचा आधार घेणार्‍या दांभिंकांवर वर्मी घाव आहे. ================ आणी किस्ना म्हणाला तसं यातलं पुढलं लेखन तू करायचच आहेस,असा आमचा आग्रह आहे. :)
  • Log in or register to post comments

बर्फाळ लांडगा हे संजय

मारकुटे
गुरुवार, 01/09/2014 - 10:11 नवीन
बर्फाळ लांडगा हे संजय क्षीरसागरांचे दुसरे प्रतिरुप असावे की काय इतपत शंका यावी अशा पद्धतीचे त्याचे प्रतिसाद आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मारकु!

बर्फाळलांडगा
गुरुवार, 01/09/2014 - 10:26 नवीन
प्रत्येका मधेच एक लांडगा लपलेला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

सुन्दर

सुखी
Fri, 01/10/2014 - 17:31 नवीन
सुन्दर खुप छान वाटल लेख वाचुन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन खुप आवडले

अनिल तापकीर
Sat, 01/11/2014 - 12:11 नवीन
अप्रतिम लेखन खुप आवडले
  • Log in or register to post comments

खुपच छान..... अमोल केळकर

अमोल केळकर
Sat, 01/11/2014 - 14:13 नवीन
खुपच छान..... अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मला ज्ञानेश्वरां बद्दल काही

काळा पहाड
Sat, 01/11/2014 - 20:24 नवीन
मला ज्ञानेश्वरां बद्दल काही प्रश्न पडतातः १. समाधी घेतली म्हणजे नक्की काय? समाधीची गरज काय होती? कार्य संपलं म्हणजे काय? समाज सुधरला होता का? की ज्ञानेश्वरांचं फक्त आणि फक्त कार्य ज्ञानेश्वरी लिहिणं हेचं होतं? आणि हे त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं? २. समाधी घेतल्या ठिकाणी सध्या काय असेल? ३. चारिही भावंडं इतक्या लहान वयात एवढं मॅचुअर्ड कसं लिहू शकतात? मी एक समजू शकतो. पण चारिही? ४. या चारिही भावंडांचं आयुष्य एक प्रकारे ट्रॅजेडीच नाही का? मग ते देवाचे अंश कसे समजता येतील? ५. जर त्या वेळच्या समाजानं या भावंडांना त्रास दिला तर त्यांचं लिखाण कसं जपलं?
  • Log in or register to post comments

१. समाधी घेतली म्हणजे नक्की

धन्या
Sat, 01/11/2014 - 21:13 नवीन
१. समाधी घेतली म्हणजे नक्की काय?
ज्ञानदेवांनी समाधी घेतली याचा सर्वसामान्यांमध्ये रुढ असलेला अर्थ "ज्ञानदेवांनी जिवंत समाधी घेतली" असा आहे. संत नामदेव हे ज्ञानदेवांचे समकालीन संत तसेच ज्ञानदेवांचे आदय चरीत्रकार होत. दोघेही अगदी पंजाबापर्यंत एकत्र प्रवास करुन आले होते. नामदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधी प्रसंगाचे वर्णन आपल्या अभंगांमधून केले आहे. हे अभंग "समाधीचे अभंग" म्हणून ओळखले जातात. हे अभंग कुठल्याही धार्मिक पुस्तकं विकणार्‍या दुकानात "समाधीचे अभंग" याच नावाने मिळतील. ज्ञानदेवांच्या समाधी संदर्भात वेगळा दृष्टीकोन मु. रा. कुलकर्णी लिखीत "श्रीज्ञानदेवांचा मृत्यू" या पुस्तकात वाचायला मिळतो. लेखकाच्या मते संतांच्या मृत्यूला स्थूल मानाने "समाधी" म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळे नामदेवांनी वापरलेला समाधी हा शब्दही असाच मृत्यू या अर्थी वापरला आहे असं लेखकाचं मत आहे.
समाधीची गरज काय होती? कार्य संपलं म्हणजे काय? समाज सुधरला होता का? की ज्ञानेश्वरांचं फक्त आणि फक्त कार्य ज्ञानेश्वरी लिहिणं हेचं होतं? आणि हे त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं?
या प्रश्नांचा हेतू माहिती मिळवणं हा आहे असं वाटत नाही. काहीही असलं तरी या प्रश्नांची उत्तरे ज्ञानदेवांच्या काळानंतर आठशे वर्षांनंतर कुणीच देऊ शकणार नाही.
२. समाधी घेतल्या ठिकाणी सध्या काय असेल?
आधूनिक तंत्रज्ञानाने हे तपासता येईल असं काहींचं म्हणणं होतं. मात्र श्रद्धावानांनी विरोध केल्यावर पुढे काही झालं नाही. अर्थात ही ऐकीव माहिती आहे. त्यात कितपत तथ्य आहे हे नाही माहिती.
३. चारिही भावंडं इतक्या लहान वयात एवढं मॅचुअर्ड कसं लिहू शकतात? मी एक समजू शकतो. पण चारिही?
दिलजले नावाच्या अजय देवगण अभिनीत एका टुकार चित्रपटातील "हो नही सकता" या गीताच्या आधीच्या संवादातील एक वाक्य आहे, "होनेको तो कुछ भी हो सकता हैं मेरे श्याम". जोक्स अपार्ट, सारी सख्खी भावंडं समजूतदार, प्रतिभावंत उपजणं आणि आई वडीलांच्या संस्कारांनी त्यांची आयुष्ये सोन्यासारखी झळाळून निघणं ही अशक्य गोष्ट नाही.
४. या चारिही भावंडांचं आयुष्य एक प्रकारे ट्रॅजेडीच नाही का? मग ते देवाचे अंश कसे समजता येतील?
ट्रॅजेडीच होती ती. सामान्य माणसाच्या कुवतीपलिकडची वाटणारी एखादी "असामान्य" गोष्ट एखादयाने केली की त्याचा देव बनवून त्याची पूजा करायची ही गोष्ट माणसाला नविन नाही. संत कान्होपात्रेच्या एका अभंगातील पहिली ओळ अशी आहे: शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई।।
५. जर त्या वेळच्या समाजानं या भावंडांना त्रास दिला तर त्यांचं लिखाण कसं जपलं?
त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांमध्ये या गुणी भावंडांच्या विद्वत्तेने, प्रतिभेने आणि समजूतदारपणाने प्रभावीत होऊन हा त्रास निवळला असावा. ज्ञानदेव हे महाराष्ट्राला आठशे वर्षांपूर्वी पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. मग कुणी त्यांना अवतार म्हणो वा ज्ञानियांचा राजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

प्रतिसाद आवडला अतिशय.

यशोधरा
Sat, 01/11/2014 - 21:16 नवीन
प्रतिसाद आवडला अतिशय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा प्रतिसाद बाकी खूपच आवडला.

बॅटमॅन
Sat, 01/11/2014 - 21:17 नवीन
हा प्रतिसाद बाकी खूपच आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+१

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/11/2014 - 22:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संयत

राही
Sat, 01/11/2014 - 22:19 नवीन
अतिशय संयत प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

फारच सुंदर प्रतिसाद !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/11/2014 - 22:31 नवीन
फारच सुंदर प्रतिसाद ! ज्ञानदेव हे महाराष्ट्राला आठशे वर्षांपूर्वी पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. मग कुणी त्यांना अवतार म्हणो वा ज्ञानियांचा राजा. हे वाक्य तर त्यावरचा कळस आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धन्यवाद. प्रतिसाद आवडला.

काळा पहाड
Sat, 01/11/2014 - 22:36 नवीन
धन्यवाद. प्रतिसाद आवडला. अर्थात, दुसरा प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि तो प्रश्न थोडासा माहिती मिळवण्यासाठी आणि बराचसा debate सदरातला होता. बाकी जेव्हा जेव्हा मी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा विचार करतो, तेव्हा तेव्हा मला ती घटना भीषण वाटते. कुठल्याही मर्त्य माणसाच्या मानसिक मर्यादा असतात यावर माझा विश्वास आहे. ज्ञानदेवांनी घेतलेली जिवंत समाधी मला कुठल्याही मानवी मर्यादेच्या पलीकडची गोष्ट वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+1

बर्फाळलांडगा
Sat, 01/11/2014 - 23:16 नवीन
स्वप्न कितीही सुंदर होते तरीही झोप काळ रात्रिचीच होती. बाकी ज्ञानेश्वर हे संत की सामान्य मानव कवी प्रेषित भाषांतर कार लेखक की ज्ञानियान्चा सम्राट वगैरे नेमक्या प्रश्नांना उत्तर देताना तळ्यात मळ्यात करताना बघून मौज वाटली.... नाही ज्ञानेश्वर अधिकाराने जे होते ते कायमच राहतील पण धागा लेखक दोन दगडावर एकाच वेळी पाय का रोवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

माहितीकण :

प्यारे१
Sun, 01/12/2014 - 00:03 नवीन
माहितीकण : फार पूर्वीचं कशाला? आजच्या काळात सुद्धा जीवनात करायचं ते करुन झालं आता जगणं पुरे अशा भावनेनं आयुष्य संपवणारे वयस्कर लोक आजूबाजूला दिसतात. स्वा. सावरकर, विनोबा भावे, वरदानंद सरस्वती (डॉ. अनंतराव आठवले) अशी चटकन आठवणारी नावे आहेत. मिसळपाव वरच अशा प्रकारचे काथ्याकूट झालेले निश्चित आठवतात. भगतसिंग, सुखदे व, राजगुरु २५ वयाची मुलं. आपण काय करतोय हे ठाऊक असून एका ध्येयानं प्रेरित होऊन फाशीच्या दोरखंडाचं चुंबन घेऊन स्वत: त्यात मान अडकवणारी मुलं ही. मानवी मानसिकतेच्या मर्यादा पार केल्यात म्हणून तर आज नाव निघतं ना? ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रागा, अपयशाची भावना इ.इ.इ. सगळे प्रकार नव्हते. अत्यंत शांतपणं, तृप्त मनानं नि धैर्यानं मृत्यू ला जवळ केलं गेलं होतं. (हे सगळं आपण आपल्या पातळीवरुन (शांतपणा अथवा भीषण घटना) पाहून सापेक्षतेनं घेतो असंच मानता, म्हणता येईल.) ज्ञानेश्वर महाराजांना अवतार मानावं, नाही मानावं अथवा आणखी काही... त्यांच्या हरिपाठातलीच एक ओळ 'मागिलिया जन्मा मुक्त झालो'. मुक्त झालो म्हणून पुन्हा स्वेच्छेने जन्म घेतला असं मानलं जातं. संस्कृत भाषेत अडकलेलं गीतेचं तत्त्वज्ञान सामान्यांसाठी खुलं करुन देण्याच्या हेतूनं ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. काम झालं की निघाले. आपल्याला आपल्या बुद्धीला पटेलसे नि झेपेल असेच युक्तीवाद ऐकण्याची सवय झालेली आहे. त्याच्या पलिकडचं काही असलं की ते नाहीच्च. नसतंच. असं मानून त्याला आपल्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न होतो. एका विशिष्ट पातळीवर गेल्यावर बर्‍याच गोष्टी वेगळ्या प्रकारानं उलगडू लागतात. नामदेव महाराजांनी म्हणे समाधी शीळेचा दगड लोटला. त्यांना आ ज कदाचित एखाद्या खटल्याला सामोरं जावं लागलं असतं. मिसळपाव वरच बॅटमॅनचं उदाहरण समोर आहे. पटकन समोर आलं म्हणून बॅटमॅन. संस्कृत भाषेमध्ये अतिशीघ्र काव्य करण्याची 'असामान्य क्षमता' मानावी का? माझ्यासाठी आहे. दुसरं उदाहरण इस्पिकचा एक्का. ह्यांनी अबब एवढ्या डिग्र्या घेतल्यात. ही क्षमता सगळ्यांकडे असते का? माझ्याकडे नाही. (उदाहरण म्हणून दोनच नावं घेतलीत) आमचा धन्या आहेच्च. (कधी सखू मोड मध्ये तर कधी संत मोड मध्ये झटकन काहीतरी भन्नाट लिहून जातो) मी ह्या सगळ्या गुणांना सलाम करतो. माझ्या बुद्धीच्या मर्यादे/विचारशक्ती पलिकडे एखादी गोष्ट घडत असेल तर त्याला उगाच्च विश्लेषण करत बसण्यात फार काही राम नाही असं मला वाटतं. बाकी विश्ले षणाचा उपयोग पुढे जाऊन सकारात्मक होणार असेल तर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

एक शक्यता!

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/12/2014 - 01:39 नवीन
आपल्या प्रतिसादातच उत्तर दडलय! जर ज्ञानेश्वरांच्या मनावर गीता सोप्या भाषेत अणताना तीचा पगडा बसणं,स्वाभाविक आहे.. असं मानलं,तर कर्मविपाकाचा परिणाम मनावर होऊन ,आपण म्हणता तसं-"आपला कार्यभाग उरकला" असं वाटणंही नाकारता येत नाही. आणी तसं असेल,तर मी तरी त्याला कर्मविपाकाचा दुष्परिणामच मानीन! एखादा चार्वाक तिथे असता,तर हा दुष्परिणामही टळताना पाहायला मिळाला असता.. असंही म्हणण्याचा मोह होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आपला कार्यभाग उरकला

अर्धवटराव
Sun, 01/12/2014 - 02:34 नवीन
ज्ञानेश्वरांनी आपला कार्यभाग उरकुन समाधी घेतली म्हणजे त्यांनी आपलं कार्य थांबवलं असं नाहि. एखादा सुतार काहि वेळाकरता खिळे-हातोडी वापरतो, ति ठेऊन मग आरी हातात घेतो, त्यानंतर लाकडाला भोकं पाडातो. एक साधन ठेवलं म्हणजे कार्य संपलं असं होत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बब्बौ वेद रेड्याने खरच म्हटले असतील

बर्फाळलांडगा
Sun, 01/12/2014 - 11:34 नवीन
तर चरवाकही देव देव करू लागला असता तस्मात त्से काही म्हणायचा मोह आवर्लेलाच बरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सिलेक्टिव रीडिंग ला शहाण पण मानणार्या चालु कपटी

बर्फाळलांडगा
Sun, 01/12/2014 - 11:43 नवीन
लोकांवर हवी तेव्हड़ी टिका टिपणी करा. पण प्रत्यक्ष विभूती बाबत तोल गेला नाही पाहिजे. दया प्रेम क्षमा शांति करुणा वगैरे अपार प्रमाणात माण्सातहि जागी होउ शकते पण दिव्यत्व अन मांगल्य ही एकमेव खुण ईश्वराची आहे त्याची प्रचिती दिली असेल तर वी मस्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

अवतार.

अर्धवटराव
Sun, 01/12/2014 - 02:30 नवीन
अवांतरः अवतार, विभूती म्हणजे ज्यांना दु:ख शिवत नाहि असं काहिसं व्यक्तीमत्व आपल्यापुढे येतं आणि त्यात चमत्कारीक काहितरी शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. पण त्यांना दु:ख शिवत नाहि असं होत नसतं, तर त्यांच्यात दु:ख (आणि सुख देखील) स्विकारायची, पचवायची असामान्य क्षमता असते हे लक्षात घेतलं पाहिजे. इतरांप्रमाणे ते देखील संसार सागरात बुडलेले असतात, फक्त त्यांची मान पाण्याच्या वर असते. शंकराने चहा समजुन विष प्राशन केलं नाहि. त्याला माहित होतं कि ते हलाहल आहे, व त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम त्याच्यावर झालाच. शरीराचा दाह शांत करायला त्याला किती उपाय करावे लागले. शेवटी ओठांवर आणि मनात राम बसवुन त्याने कंठात विषाला ब्लॉक केलं. हा त्याचा चमत्कार नसुन त्याची असामान्य क्षमता आहे. हि क्षमता ज्याच्या ठायी बाणते, उमगते तो देखील शिवरूप होऊन जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बरोबर.

प्यारे१
Sun, 01/12/2014 - 02:41 नवीन
बरोबर. सुख किंवा दु:ख केव्हा? प्रतिक्रिया येईल तेव्हा! वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणं प्रतिभेचं देणं सगळ्यांना लाभेल असं नाही मात्र अंतःस्थिती जशी चार भावंडांची होती तसं होणं गुरुकृपा, ईशकृपा नि स्वप्रयत्न/साधना ह्यांनी शक्य आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे. : 'गिळायला शिकलात तर परमार्थ सहज शक्य आहे'. वाक्याचा अर्थ जास्त न ताणता अपमान असो की मान, सुख असो की दु:ख गिळावं. बाकी आम्ही लवकरच 'भगवान शंकरांची आरती' बद्दल लिहू. ;) तेव्हा वरचा मुद्दा येईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शंकराचं विष पिण्याचं उदाहरण

धन्या
Sun, 01/12/2014 - 07:46 नवीन
शंकराचं विष पिण्याचं उदाहरण सोडून बाकीचा प्रतिसाद आवडला.
अवतार, विभूती म्हणजे ज्यांना दु:ख शिवत नाहि असं काहिसं व्यक्तीमत्व आपल्यापुढे येतं आणि त्यात चमत्कारीक काहितरी शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. पण त्यांना दु:ख शिवत नाहि असं होत नसतं, तर त्यांच्यात दु:ख (आणि सुख देखील) स्विकारायची, पचवायची असामान्य क्षमता असते हे लक्षात घेतलं पाहिजे. इतरांप्रमाणे ते देखील संसार सागरात बुडलेले असतात, फक्त त्यांची मान पाण्याच्या वर असते.
या धाग्यावर खुप चांगले विचार प्रतिसादातून वाचायला मिळाले. त्यापैकी हा एक सुंदर विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हि क्षमता ज्याच्या ठायी बाणते

कवितानागेश
Sun, 01/12/2014 - 09:41 नवीन
हि क्षमता ज्याच्या ठायी बाणते, उमगते तो देखील शिवरूप होऊन जातो.>> तेच सांगायचा प्रयत्न करतेय.. दु:खाला/ संकटाला भिडले, त्याचा न घाबरता, पळून न जाता अभ्यासपूर्वक स्वीकार केला (पक्षी: गिळलं) तरच असामान्य करुणा जागी होते. स्वतःसकट जागाला व्यापून टाकणारी. पण सामान्यतः आपण त्रासापासून पळ काढतो, संपून गेलेल्या दु:खदायक गोष्टी आठवायच्या देखिल टाळतो, मग त्या समजून घेउन गिळून टाकणं तर फारच दूर. त्याला analysis करणं अशक्य. मग दु:ख म्हणजे नक्की काय हे कळणार तरी कसं? त्याशिवाय त्यावर, आणि त्यानीच भरलेल्या एकंदरीत मानवी आयुष्यावर भाष्य आणि उपाय अशक्य. हे करण्याइतकी विरक्ती ज्यांनी पेलली, ते त्या वाटेवरच्या लोकांसाठी 'देव' बनले. (विरक्ती आणि कोरडेपणा यात फरक आहे, तो आपला आपण विचार करुन समजून घ्यावा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अतिशय सुंदर .

म्हैस
Wed, 01/15/2014 - 12:03 नवीन
अतिशय सुंदर . धन्याला धन्यवाद आणि ४ हि भावंडांना नमस्कार. बाकी बर्फाळ लांडग्याला नक्की काय म्हणायचं ते समजला नाही. मोठमोठे शब्द वापरून गोंधळात टाकणारी वाक्यरचना करण्यापेक्षा आम्हा पामरांना समजेल असं बोलला तर चर्चा करायला सोप्पं जाईल
  • Log in or register to post comments

म्हैस

बर्फाळलांडगा
Wed, 01/15/2014 - 12:21 नवीन
तुम्हा पामरात एक वाक्यता नाही प्रत्येक जण एक नविन आक्षेपाचा मुद्दापुढे करून आपले म्हणने रेट्त आहे. परिणामी फार मोठा कलह निर्माण झालाय. मला जे म्हणायचे आहे ते मी म्हटले आहेच तुमा पामरांचा गोधळ उडवणारे माझे विधान जर हाई लाईट केले तर तुम्हा पामरान्ना समजे पर्यंत व्यवस्थित स्पष्टीकरण देइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

प्यारे१ चा शेवटचा प्रतिसाद

म्हैस
Wed, 01/15/2014 - 12:11 नवीन
प्यारे१ चा शेवटचा प्रतिसाद अतिशय आवडला. अनेकांचे प्रतिसाद वाचल्यावर असं दिसतंय कि असामान्य प्रतिभा आणि अति उच्च स्थानावर पोहचलेला योगी किवा ईश्वरी अवतार ह्यात गफलत केलेली दिसते.
  • Log in or register to post comments

तुम्हा पामरात एक वाक्यता नाही

म्हैस
Wed, 01/15/2014 - 18:13 नवीन
तुम्हा पामरात एक वाक्यता नाही
कोणाशी १ वाक्यता ठेवावी असं कुणीही मला इथे दिसत नाहीये.
विधान जर हाई लाईट केले तर तुम्हा पामरान्ना समजे पर्यंत व्यवस्थित स्पष्टीकरण देइन.
हे अभंग लिहले मुक्ताईने साक्षात ज्ञानेश्वरांसाठी.. तो त्यांचा अधिकार सांगितली गीता श्रीकृष्णाने अर्जुनासाठी...तो ही त्यांचा अधिकार तुम्ही आम्ही हे का वाचतो अन वरून छान आहे म्हणतो... ? थोडक्यात सांगणारा अन ऐकणारा ज्या भावावस्थेत आहे त्याचा संदर्भ नसूनही आपण त्याला अनुमोदन देतो. कारण मोठी गुंता गुंत आहे. उदा.. जोकपाल हिशोबनिस समजतो तो ज्ञानेश्वर आहे अन मिपाकर त्याला छळणारि जनता म्हणुन तत्वज्ञान न पटुनहि तो फार छान आहे म्हणतो. काय विरोधाभास आहे.... प्रत्येकाचे कारण वेगळे आहे पण लिहणारा अन वाचणारा दोघेही चान चान म्हणत आहेत शंका येते ही तीच जमात का जी याच क्षणात तत्वापेक्षा अस्तित्व महत्वाचे म्हण्त जगणार आहे? ह्या प्रतिसादात नक्की काय म्हणायचंय ते समजला नाही. आणि ह्या नंतरचेही २-३ प्रतिसाद समजले नाहीत
आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.
थोडक्यात आपल्या पोरांना सत्याची जाणीव कधी होऊ नये अशी इच्छा मनात भरुन येते
  • Log in or register to post comments

ओके म्हैस आलं आले लक्षात.

बर्फाळलांडगा
गुरुवार, 01/16/2014 - 01:43 नवीन
आता तुमचे विचार अजुन थोडे सोपे व समग्र करूयात करूया म्हणजे काय तर तुम्हाला काय कळाले नाही हे कळवले हे उत्तम पण आता काय क्ळाले त्याचेही असेच थोडक्यात विवेचन दया म्हणजे तुझे आहे तुज पाशी प्री तू जागा चुकलासी याची प्रचिती तुम्हास सोदाहरण येइल याची खात्री देतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

सुंदर

राही
Wed, 01/15/2014 - 18:36 नवीन
लेख अत्यंत रसाळ होता. प्रतिसादही फार भरकटले नाहीत. एक चांगली चर्चा वाचायला मिळाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 01/15/2014 - 22:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

मी तुम्हाला विचारलं होतं

म्हैस
गुरुवार, 01/16/2014 - 13:19 नवीन
मी तुम्हाला विचारलं होतं तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ? तुम्ही मला काय काय समजला नाही ते विचारलं . ते सांगितल्यावर आता तुम्ही मला काय समजलंय हे विचारताय. तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर तसं स्पष्ट सांगा .
  • Log in or register to post comments

सिलेक्टिव रीडिंग करू नये. हांच संदेश मी या धाग्यात दिला आहे.

बर्फाळलांडगा
गुरुवार, 01/16/2014 - 14:17 नवीन
माझे सर्व प्रतिसाद वाचा म्हणजे हे आपल्या आपोआप लक्षात येइल. किम्भुना धाग्यातिल लेखकाच्या लिखाणावर तसेच त्याने लिहलेल्या रेफ़रन्स अभन्गावरही हा च आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

अहाहा

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/29/2015 - 13:58 नवीन
अहाहा आज काही कारणाने हा लेख परत वाचायचा योग आला :) कित्ती सुंदर लिहिले आहेस सतिश ! असे लेखन करत जा अजुन ! - प्रगो
  • Log in or register to post comments

अप्रतिम

diggi12
Sat, 12/28/2024 - 15:32 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

+1

अनन्त्_यात्री
Sat, 12/28/2024 - 19:52 नवीन
https://www.misalpav.com/node/49542
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: diggi12
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा