✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी मोठा शहाणा...

ध
धन्या यांनी
गुरुवार, 08/15/2013 - 18:44  ·  लेख
लेख
असतात अशी काही माणसं. स्वतःला अगदी देव नाही परंतू देवाखालोखाल समजणारी. इतरांना कस्पटासमान लेखणारी. स्वतःच्या ज्ञानाबद्दल, क्षमतेबद्दल, त्यांच्याशी निगडीत सार्‍याच बाबींबद्दल अवास्तव कल्पना असणारी. इतर व्यक्तींच्या मताला काडी ईतकीसुद्धा किंमत न देणारी. प्रत्येक संवाद हा आपल्याच वाक्याने संपायला हवा असा अट्टाहास असणारी. समोरच्याच्या बोलण्यात कितीही तथ्य असलं तरीही मी म्हणतो तेच बरोबर असा हेका धरणारी. ही यादी न संपणारी आहे. आणि एव्हाना तुमच्याही लक्षात आलं असेल की, अशी माणसं तुमच्या आजुबाजूलाही आहेत. काहींच्या घरात आहेत. काहींच्या दारात. तर काहींच्या कार्यालयात. अशी माणसं दारात असतील, कार्यालयात असतील तर आपण त्यांच्याशी जेव्हढयास तेव्हढे संबंध ठेवू शकतो. अगदीच सहन करण्याच्या पलिकडे गेलो तर त्या दारात न जाण्याचा, नोकरी बदलण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. पण अशी व्यक्ती जर घरात असेल तर? तर मात्र "आलीया भोगाशी असावे सादर" असे म्हणत त्या व्यक्तीला जशी आहे तशी स्विकारण्यापलिकडे काही पर्याय नसतो. कधी कधी अशा व्यक्तींच्या प्रवृत्ती इतक्या टोकाच्या असतात की घरातील इतर व्यक्तींच्या आयुष्याचा नरक होऊन जातो. मानसशास्त्र हे मानवी भावभावनांचा, मानवी मनाचा, मेंदूचा, मानवी स्वभावाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्या शास्त्राला अशा व्यक्ती माहिती नसतील असं कसं होइल? मानसशास्त्र अशा व्यक्तींना आत्मरत व्यक्ती म्हणतं. स्वतःच्या कोशात गुरफटलेली, स्वतःपलिकडे जग नसलेली माणसं. पाश्चिमात्य मानसशास्त्र अशा व्यक्तींना नार्सिसिस्ट म्हणतं. आणि या मानवी स्वभावविकाराला नाव आहे "नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर". कुठून बरं आलं हे नार्सिसिस्ट नाव? ते आलं एका ग्रीक पुराणकथेतून. बोईओटीया मधील थेस्पियाई नावाच्या शहरामध्ये नार्सिसस नावाचा एक सुंदर तरुण राहत होता. जलदेव सेफिसस आणि जलपरी लिरिओपचा हा मुलगा. त्याच्या सौंदर्यामुळे तो खुप नावाजलेला होता. परंतू अंगच्या उद्धटपणामुळे त्याला लोक टाळू लागले. त्याच्या सौंदर्यावर भाळून अनेक जलपर्‍या आणि मुली त्याच्या प्रेमात पडल्या. परंतू नार्सिसस स्वतःमध्येच इतका मशगुल होता की त्या सार्‍यांना त्याने झिडकारले. अशीच एक जलपरी ईको. नार्सिससने आपला अव्हेर केला हे सहन न होऊन तीने स्वतःला विरघळवून टाकले. एके दिवशी नार्सिसस एका तळ्याकाठी गेला असता त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. नार्सिसस आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाच्या एव्हढा प्रेमात पडला की त्याला काळाचे भान राहिले नाही. शेवटी तो तसाच मरुन गेला. narc या आत्मरत व्यक्तींची ठळक स्वभाव वैशिष्ट्ये: १. अशा व्यक्तींना किंचितही त्यांच्या विरोधी मत सहन होत नाही. अशावेळी प्रचंड राग येतो त्यांना. २. स्वतःची ध्येये गाठण्यासाठी इतरांचा शीडीसारखा वापर करतात. ३. स्वतःची प्रचंड भलावण करतात. ४. स्वतःचे यश, बौद्धीक क्षमता, सौंदर्य, बुद्धीमत्ता या विषयी अवास्तव कल्पना असतात. ५. दुसर्‍यांनी आपल्याला नेहमी चांगलंच म्हणावं, सर्व बाबतीत आपल्यालाच प्राधान्यक्रम दयावा अशी अपेक्षा असते. ६. दुसर्‍याचा सुखाचा, यशाचा, कर्तुत्वाचा यांना नेहमी मत्सर वाटतो. ७. आपण कुणीतरी "खास" असल्याची भावना मनात घर करुन असते. ८. दुसर्‍यांच्या भावनांची, अपेक्षांची मुळीच जाणिव नसते. ही यादीसुद्धा न संपणारी आहे. दुसर्‍यांच्या भावनांशी, मतांशी काही घेणंदेणं नसल्यामुळे, आपल्या ईप्सित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कसलाही विधीनिषेध न बाळगता माणसांना वापरण्याच्या हातोटीमुळे ही माणसं ज्या कामात हात घालतात त्या कामात बहूधा यशस्वीच होतात. नेहमी लोकांना जाळ्यात पकडण्यासाठी अशी लोकं एक हसरा मुखवटा घालून चारचौघात वावरतात. पहिल्या भेटीत अशा व्यक्ती समोरच्यावर नेहमीच छाप पाडतात. परंतू जसजसे आपण अशा व्यक्तींबरोबर वेळ घालवू लागतो तसतसे अशा व्यक्तींचे अंतरंग उघडे पडत जातात. अशी एखादी व्यक्ती जर तुमच्या कार्यालयातील साहेब किंवा साहेबीण असेल तर त्यांची अपेक्षा तुम्ही दिवसरात्र कार्यालयात राबावं एव्हढीच असते. तुम्हाला घर-दार आहे, मुलं-बाळं आहेत, तुम्हाला भावभावना आहेत हे त्यांच्या गावीच नसतं. तुम्ही महिनाभर खपून जर एखादा अहवाल बनवलात तर तो अहवाल मीच बनवला असं आपल्या वरीष्ठांना सांगून तुमच्या कामाचं श्रेय लाटणं हा अशा व्यक्तींच्या डाव्या हाताचा मळ असतो. अशी व्यक्ती जर कुटुंबात असेल तर? गरुड पुराणात वर्णन केलेला नरक जिवंतपणीच अनुभवायला मिळतो. दुसर्‍यांनाही भावना आहेत, त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, आपलंही कधीतरी काही चुकत असेल, आपणही कुठेतरी आपल्या जबाबदार्‍या पार पाडत असताना कमी पडत असू याचं भानच त्यांना नसतं. प्रत्येक बाबतीत घरच्यांनी त्यांनाच अग्रक्रम द्यावा असा त्यांचा हेका असतो. अशा व्यक्तींचं मन ही अभेदय भिंत असते, कितीही डोकं आपटलं तरी न तुटणारी. आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत कधीच फचत नाही. त्यांच्यात ती क्षमताच नसते. जणू काही नियतीने त्यांना तसा शापच दिला असावा. पण असा स्वभाव बनतो कसा? एखाद्या असाध्य आजाराप्रमाणे तो एका पीढीतून दुसर्‍या पीढीकडे संक्रमीत होतो की लहानपणी झालेल्या संस्कारांचा तो परीणाम असावा? असा स्वभाव एका पीढीतून दुसर्‍या पीढीकडे संक्रमीत जनुकांच्या माध्यमातून संक्रमीत होत असावा याला पुष्टी देणारे पुरावा जनुकशास्त्राला अजूनतरी सापडले नाहीत. मग उरते एकच कारण. लहानपणी होणारे संस्कार. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञांच्या मते लहान मुल वाढत असताना मुलाच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजांची अक्षम्य हेळसांड जर झाली तर ते मुल स्वतःचं मन मारायला शिकतं. आपल्या भावभावना बधिर करतं. आणि त्यामुळेच दुसर्‍यांच्या भावभावना त्याच्यापर्यंत पोहचतच नाहीत. किंवा याच्या अगदी उलटही असू शकतं. एखादया सुखवस्तू घरात मुल वाढत असताना त्याचे अवाजवी लाड झाले, ते मुल म्हणेल ती वस्तू क्षणार्धात त्याच्यासमोर हजर केली जाउ लागली तर त्याच्या मनाचा वेगळाच ग्रह होतो. आपण कुणीतरी खास आहोत, आपल्याला जे जे हवं ते ते आपल्यासमोरक्लगेच हजर व्हायला हवं, आपला तो अधिकारच आहे अशी त्या मुलाच्या मनाची समजूत होऊ लागते. हे ग्रह पुढे खुपच घट्ट होउन व्यक्तीचा स्वभाव आत्मकेंद्री होतो. स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. हे म्हणणं आत्मरत व्यक्तींना तंतोतंत लागू होतं. एखादी व्यक्ती आपला स्वभाव कधी बदलते? जेव्हा त्या व्यक्तीला आपलं काहीतरी चुकतंय असं वाटतं. आत्मरत व्यक्तींच्या बाबतीत अशी काहीच शक्यता नसते. त्यांच्या दृष्टीने ते सर्वज्ञ, सर्वगुणसंपन्न असतात. जी काही वैगुण्ये असतात ती इतरांमध्ये असा आत्मरत व्यक्तींचा ठाम ग्रह असतो. त्यामुळे अशा आत्मरत व्यक्ती सुधारणे किंवा त्यांचा स्वभाव बदलणे ही जवळपास अशक्यप्राय अशी गोष्ट असते. नाही म्हणायला एखादी आयुष्य ढवळून टाकणारी घटना घडली तर एखादया आत्मरत व्यक्तीचे डोळे खाडकन उघडू शकतात. परंतू असा उ:शाप मिळालेली अहिल्या हजारात एखादीच असते. बाकीच्यांच्या नशिबी शापित शिळेचं जगणं असतं. ज्या शिळेवर कधी कधी कुटुंबच्या कुटुंब आपल्या अपेक्षांचा बळी देतात. अशा व्यक्तींसोबतचं आपलं जीवन सुसह्य करण्याचा मार्ग म्हणजे अशी व्यक्ती जशी आहे तशी स्विकारणं, त्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पुर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही याची मनाशी खुणगाठ बांधणं. गोनिदांनी ज्ञानदेवांच्या जीवनावर लिहिलेल्या "मोगरा फुलला" नावाच्या कादंबरीत एक वाक्य आहे, अपेक्षा फार नसल्या की अपेक्षाभंगाचं दु:ख सहन करावं लागत नाही. हे वाक्य आत्मरत व्यक्तींसोबत आयुष्य जगताना तंतोतंत लागू होतं. पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ "हाऊ टू डील विथ नार्सिसिस्ट?" असा प्रश्न विचारला की "रन अवे फ्रॉम हिम्/हर फॉर युवर लाईफ" असं उत्तर देतात. भारतीय मनाला हे उत्तर पटणार नाही. त्यामुळे परिस्थीतीशी जुळवून घेणं हा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. असो. जाता जाता एव्हढंच लिहितो की या लेखाचा उद्देश आत्मरत व्यक्तींना सैतान ठरवणं हा नाही. केवळ वास्तवाशी ओळख करुन देणं एव्हढा हेतू हा लेख लिहिताना समोर आहे. आत्मरत व्यक्ती असे दुर्दैवी जीव असतात की आपल्यामुळे इतरांना प्रचंड त्रास होतोय याची पुसटशीही जाणिव त्यांना नसते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
20176 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

स्वतः टोलिंग करणारे जेव्हा

मदनबाण
Fri, 08/16/2013 - 09:34 नवीन
स्वतः टोलिंग करणारे जेव्हा स्वतः दुसर्‍यांना ट्रोलिंगचे धडे देउ लागतात तेव्हा त्यांच्या मानसिक स्थीतीची काय अवस्था असावी असा विचार करतो आहे... बाकी लेख आवडला. :)
  • Log in or register to post comments

लेख आवडलाच.

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/16/2013 - 09:58 नवीन
लेख आवडलाच. या प्रकारची पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही कायमस्वरुपाची असते काय? या बद्दल साशंक आहे. आयुष्याच्या एका टप्प्यातील फेज असावी. कधी तरी ती व्यक्ती भानावर येत असावी. स्वभावाला औषध नसते असही म्हणतात व औषध असते असेही म्हणतात. मानसिक आरोग्य राखणे हे एक अवघड काम आहे. तारेवरच्या कसरतीसारखे मला ते अवघड वाटते.
  • Log in or register to post comments

लेख अतिशय उपयुक्त आहे. आणि

इनिगोय
Fri, 08/16/2013 - 10:25 नवीन
लेख अतिशय उपयुक्त आहे. आणि चर्चाही अजूनतरी मुद्देसूद होत आहे. मनापासून आभार. अशी लक्षणं दर्शवणाऱ्या एका परिचित व्यक्तीच्या वागण्याचा बराच उलगडा झाला. त्या व्यक्तीला मदत व्हावी अशी मनापासून इच्छा आहे. धनाजीराव एक प्रश्न. समजा 'तुमचं वागणं चुकतं आहे' हे सांगून पाहिलं तर त्या व्यक्तीने ते खरंच मान्य केलं आहे, की तोंडदेखलं हो हो म्हटलं आहे हे कसं ओळखावं? कारण माझ्या परिचयातल्या या व्यक्तीला फक्त स्वतःची बाजूच कशी योग्य आहे, हे ठामपणे पटलेलं अाहे. त्यामुळे असा फीडबॅक एेकला की पुढचा संवाद तुटक होऊन जातो. चांगले संबंध असल्यामुळे 'रूम बदलणं' (पक्षी: अपने हाल पे छोड दो) हे सोपं वाटलं तरी योग्य वाटत नाही. काय करावं?
  • Log in or register to post comments

पर्सनॅलिटी डिसऑर्डर

सुबोध खरे
Fri, 08/16/2013 - 11:17 नवीन
पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार (किंवा विकृती) हि सामान्य माणूस आणि मनोरुग्ण याच्या मध्ये येणारा आहे. म्हणजे पूर्ण स्वस्थ नाही कि पूर्ण आजारी नाही. मूळ कोणताही मनुष्य स्वभाव हा आदर्श नाही आणि मानसिक समतोल हा स्थळ काळ आणि संस्कृती याला सापेक्ष असतो त्यामुळे रस्त्यावर चुंबन घेणे हे पैरिस मध्ये सतराव्या शतकात अनैसर्गिक होते पण तेच आता तेथे नैसर्गिक आहे परंतु तिच गोष्ट भारतात अजूनतरी निषिद्ध आहे. रस्त्यावर शौचास बसणे हे भारतात तितके निषिद्ध मानले जात नाही जितके कोणत्याही पाश्चात्य देशात आहे. म्हणून एक सरासरी काढून अमुक तर्हेचे वागणे हे त्या स्थल काळ आणि संस्कृती प्रमाणे नैसर्गिक किंवा सामान्य( नॉर्मल) मानले जाते. जेंव्हा त्या माणसाचे वागणे हे फारच कक्षेच्या बाहेर जाते तेन्व्हा त्याला मानसिक आजार संबोधले जाते पण जे लोक कुंपणाच्या आतबाहेर आहेत त्यांना पूर्ण मनोरुग्ण समजले जात नाही पण ते नॉर्मल सुद्धा नसतात अशा लोकांचे पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये वर्गीकरण केले जाते. सामान्य माणसांच्या भाषेत ज्याच्या मेंदूत केमिकल लोच्या आहे तो मनोरुग्ण. ज्याच्या मेंदूत असा पूर्ण लोच्या नसतो पण त्याची केमिकल नॉर्मल पण नसतात असे लोक म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर. याचा महत्त्वाचा भाग म्हणजे हे आजार सहज पणे निदान करता येत नाहीत तसेच ते सहजासहजी उपचाराला प्रतिसाद पण देत नाहीत. मुळात मनोविकार तज्ञात त्याबद्दल एकवाक्यता नाही. इतके पर्सनॅलिटी डिसऑर्डर बाबत नार्सिसिझम बद्दल क्रमशः
  • Log in or register to post comments

वा डॉक्टर...

धन्या
Fri, 08/16/2013 - 12:22 नवीन
अमुक तर्हेचे वागणे हे त्या स्थल काळ आणि संस्कृती प्रमाणे नैसर्गिक किंवा सामान्य( नॉर्मल) मानले जाते. जेंव्हा त्या माणसाचे वागणे हे फारच कक्षेच्या बाहेर जाते तेन्व्हा त्याला मानसिक आजार संबोधले जाते पण जे लोक कुंपणाच्या आतबाहेर आहेत त्यांना पूर्ण मनोरुग्ण समजले जात नाही पण ते नॉर्मल सुद्धा नसतात अशा लोकांचे पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये वर्गीकरण केले जाते. सामान्य माणसांच्या भाषेत ज्याच्या मेंदूत केमिकल लोच्या आहे तो मनोरुग्ण. ज्याच्या मेंदूत असा पूर्ण लोच्या नसतो पण त्याची केमिकल नॉर्मल पण नसतात असे लोक म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर. याचा महत्त्वाचा भाग म्हणजे हे आजार सहज पणे निदान करता येत नाहीत तसेच ते सहजासहजी उपचाराला प्रतिसाद पण देत नाहीत.
सौ सुनार की और एक लोहार की. पर्सनॅलिटी डिसऑर्डरची ईतकी अचूक आणि समजायला सोपी व्याख्या मी अजूनतरी वाचली नव्हती. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे साहेब जरा अवांतर

चौकटराजा
Fri, 08/16/2013 - 13:59 नवीन
खरे साहेब माझ्या आयुष्यात तू मला आवडतोस असे म्हणणारी एकही स्त्री ( कोणत्याही भूमिकेत ) मला भेटलेली नाही. मला आयुष्यात कधीही कोणतेही प्रमोशन नोकरीत मिळालेले नाही. म्हणजे लौकिक अर्थाने महत्वाच्या दोन बाबीत मी जाम फेल माणूस आहे. असे असून सुद्धा मी इतराना सुखी माणसाचा सदरा हवा असेल तर तो माझ्याकडे आहे. तो भाग्यवान मी आहे.असे सांगत असतो . हे विचित्रच नाही का ? ही कोणती पर्सनॅलिटी डिसॉर्डर आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या आजाराला "सुखी माणसायटिस"

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/16/2013 - 16:10 नवीन
या आजाराला "सुखी माणसायटिस" असे म्हणतात. कारण... "सुख पाहिजे ते मिळण्यात नसते तर मिळाले ते पाहिजे असण्यात असते."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौ रा साहेब

सुबोध खरे
Sun, 08/18/2013 - 00:28 नवीन
चौ रा साहेब माझा प्रतिसाद वाचून आपल्या लक्षात आले असेल कि समाधानी आणि नार्सिसिस्ट यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपण म्हणता तसे नोकरीत एकही बढती न मिळालेले लक्षावधी लोक असतात. सफाईवाला, बसचा चालक वाहक, स्वागत सहायिका इत्यादी लोक आपल्या आजूबाजूला रोज दिसतात एकदा नोकरीत लागले कि वर्षानुवर्षे तेच काम आणि तीच नोकरी असे असूनही ते समाधानी असतातच. आणि आपल्याला एकही स्त्री तू मला आवडतोस असे बोलणारी भेटली नाही हि सुद्धा फार सामान्य गोष्ट आहे. कित्येक स्त्रिया मनात असून बोलू शकत नाहीत किंवा असे स्त्रियांनी बोलायचे नसते हे त्यांना "संस्कार" केले जातात. हि परिस्थिती काही मदनाच्या पुतळ्यांच्या पण नशिबात येते. तुम्ही जर आनंदात आहात तर हि खंत का आहे?आपल्या अंतर मनात डोकावून पहा आणि हि अपराधीपणाची भावना काढून टाका म्हणजे आपले मन अधिक साफ झाल्याची जाणीव होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

खरे साहेब माझ्या आयुष्यात तू

मराठी कथालेखक
Tue, 03/08/2016 - 16:09 नवीन
खरे साहेब माझ्या आयुष्यात तू मला आवडतोस असे म्हणणारी एकही स्त्री ( कोणत्याही भूमिकेत ) मला भेटलेली नाही.
१) तुम्ही कोणत्या स्त्रीला "तू मला आवडतेस" असं कधी म्हंटल आहे का ? २) "तू मला आवडतोस" असे जरी स्त्रीने म्हटले नाही तरी तिच्या (एक किवा अधिक स्त्रिया) कृतीतून तुम्हाला कधी जाणवले का ? ३) एखाद्या स्त्रीला आपण आवडावे यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का ? पहिल्या व तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर नाही आणि मधल्या प्रश्नाचे होय असे असेल तर तुम्ही दु:खी होण्याचे काहीच कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

लिहावं की न लिहावं असा विचार

आदूबाळ
Fri, 08/16/2013 - 11:42 नवीन
लिहावं की न लिहावं असा विचार करत होतो. ही अशी "नार्सिसिस्टिक पर्सनालिटी" माझ्या एका ज्येष्ठ व्यावसायिक सहकार्‍याची आहे. आठापैकी सात लक्षणं त्यांना लागू होतात.
५. दुसर्‍यांनी आपल्याला नेहमी चांगलंच म्हणावं, सर्व बाबतीत आपल्यालाच प्राधान्यक्रम दयावा अशी अपेक्षा असते.
हे लागू होत नाही. "मी मला हवं ते करणार, जग गेलं ***त" असा त्यांचा बाणा आहे. निंदा किंवा वंदा, काहीच फरक पडत नाही. आमच्या व्यवसायातला तो तज्ज्ञ आहे. या मनुष्याकडून खूप शिकलो. पण याच्याबरोबरच रहावं असं त्याच्या स्वभावामुळे कधी वाटलंच नाही. जेडीने सांगितल्याप्रमाणे 'रुम बदलली'. वयाने आणि मानाने ज्येष्ठ असल्याने (आणि बॉस-सबॉर्डिनेट संबंधामुळे) मी त्याला "तुमचं वागणं चुकतंय" असं कधी स्पष्ट सांगू शकलो नाही. पण वर इनिगोयताई म्हणतात त्याप्रमाणे ते योग्य वाटत नाही. "माझी एकट्याची जबाबदारी आहे का?" "मी काय पत्कर घेतलाय का जग सुधरायचा" वगैरे बोलून मी डिनायलमध्ये जातो, पण ते काही खरं नाही हे वाटणं थांबत नाही...
  • Log in or register to post comments

बिग बॅंग थिअरी मधल्या

संपत
Fri, 08/16/2013 - 19:22 नवीन
बिग बॅंग थिअरी मधल्या लेनर्डची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

माफ करा शेल्डनची आठवण झाली

संपत
Fri, 08/16/2013 - 19:24 नवीन
माफ करा शेल्डनची आठवण झाली असे म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

जबरदस्त लिहलंय धन्या. फोनवर

किसन शिंदे
Sat, 08/17/2013 - 22:16 नवीन
जबरदस्त लिहलंय धन्या. फोनवर बोलताना या विषयावर बरंच ऐकलं होतं तुझ्याकडून.
गरुड पुराणात वर्णन केलेला नरक जिवंतपणीच अनुभवायला मिळतो.
याच्याबद्दल टाक की इथेच..
  • Log in or register to post comments

हे सगळे वाचून नको ते विचार

दशानन
Sat, 08/17/2013 - 22:51 नवीन
हे सगळे वाचून नको ते विचार मनात येत आहेत, आसपासच्या लोकांना त्या नजरेतून न बघता या नजरेतून बघायची सवय लागू नये म्हणजे मिळवले. * गेली काही महिने मी मेंदू व मेंदूची रचना या विषयी खूप काही वाचत आहे, पाहत आहे (डाक्युमेंट्रीज) खूप काही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढे वाचले त्यातून एका मतावर आलो असे नाही पण साधारणपणे माझे एक मत झाले आहे की आपण वागत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संबध मेंदूशी असतोच पण त्याच सोबत लहानपणापासून ज्या वातावरणातून आपण आलो आहोत त्याचा पण हात असतो. कधी कधी एकाद्या अपघातात मेंदू ला झालेली छोटीशी दुखापत देखील मोठे मोठे खेळ करून दाखवते, त्यामुळे हा सध्या सर्वात गहन विचार आहे की निर्णय कोण घेतं! मेंदू की मन (?) आता पर्यंतचे सगळे संशोधन हे सांगत आहे की निर्णय मेंदू घेतो. आपण घेतलेला निर्णय कोणताही असो, तो आपण न घेता मेंदूने आधीच घेऊन ठेवला असतो, पर्यायासोबत! मग त्यातून एक तो लागू करतो. सहज समजेल असे सांगतो की हा प्रतिसाद लिहणे हे ठरवणे कोणी केले? तर वरील वाचून जी काही वैचारिक प्रतिक्रिया माझ्या मनात/ मेंदूत झाली त्यातून हे ठरले गेले. पण मी काय लिहणार आहे याची तयारी मी लिहण्याआधीच मेंदूने केली असते. मानसिक रोगी / अडचण असलेली व्यक्ती हे निर्णय पुर्ण पणे मेंदूच्या एका बाजूला सोपवून मोकळी झालेली असते, पर्याय असे त्यांच्या मेंदूत येतच नाहीत. व जर पर्याय येत असतील तर मात्र ते धोकादायक मार्गावर जाणाचे लक्षण असते.. एकाच व्यक्तीचे पर्यायी व्यक्तीमध्ये (जे त्याला सोयीचे वाटेल ते ) रुपांतर क्षणात होऊ शकते.. ज्याला वर सांगितले गेले आहे की मल्टीपल आयडेंन्टीटी सिंन्ड्रोम! एकाच व्यक्तीमध्ये किमान २ ते ६ रुपे असू शकतात व ते वेवङ्यावेगळ्या परिस्थीत गरजेनूसार पुढे येतात. अवघड आहे सगळे, समजून घेण्याचा मी पण प्रयत्न करत आहे, हा धागा वाचला म्हणून हे अवांतर!
  • Log in or register to post comments

मेंदू की मन (?)

धन्या
Sat, 08/17/2013 - 23:37 नवीन
मेंदू की मन (?)
मेंदूविज्ञानातील अगदी ताज्या संशोधनानूसार मन असं काही नसतंच. मेंदूला होणार्‍या संवेदना किंवा जाणिव म्हणजेच मन.
आता पर्यंतचे सगळे संशोधन हे सांगत आहे की निर्णय मेंदू घेतो. आपण घेतलेला निर्णय कोणताही असो, तो आपण न घेता मेंदूने आधीच घेऊन ठेवला असतो, पर्यायासोबत!
या गोष्टीवर मेंदूविज्ञानाने शिक्कामोर्तब केलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

ताजं सशोधन विश्वासार्ह आहे का?

arunjoshi123
Sat, 08/17/2013 - 23:46 नवीन
मेंदूविज्ञानातील अगदी ताज्या संशोधनानूसार मन असं काही नसतंच. मेंदूला होणार्‍या संवेदना किंवा जाणिव म्हणजेच मन.
शरीरशास्त्राच्या अगदी ताज्या संशोधनानुसार माणूस असं काही नसतंच. पर्यावरणात असणार्‍या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा एक प्रकारचा संयोग म्हणजेच माणूस. विज्ञानानं रोज एक ताजं (म्हणजे कच्चं) संशोधन घेऊन यावं आणि आम्ही आमचं जग बदलावं हे थोडं अन्यायकारक वाटतंय.
  • Log in or register to post comments

ताजं सशोधन विश्वासार्ह आहे का

धन्या
Sun, 08/18/2013 - 00:01 नवीन
ताजं सशोधन विश्वासार्ह आहे का?
माझ्यासाठी आहे. तुम्ही विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. संदर्भ आता हाताशी नाहीत. तुम्हाला उत्सुकता असल्यास शोधून देईन.
शरीरशास्त्राच्या अगदी ताज्या संशोधनानुसार माणूस असं काही नसतंच. पर्यावरणात असणार्‍या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा एक प्रकारचा संयोग म्हणजेच माणूस.
होच की. म्हणून तर मृत व्यक्तीला पुरलं की मॄतदेहाची माती होते. जाळलं की त्याची राख होते आणि पाण्यात सोडलं की ते कुजून जातं.
विज्ञानानं रोज एक ताजं (म्हणजे कच्चं) संशोधन घेऊन यावं आणि आम्ही आमचं जग बदलावं हे थोडं अन्यायकारक वाटतंय.
विज्ञान संशोधन करतं म्हणजे विज्ञान नव्याने काही निर्माण करतं असं नाही. विज्ञान फक्त निसर्गाच्या नियमांचा उलगडा करतं. आणि हा निसर्ग नियमांचा उलगडा करतात ते वैज्ञानिक. पण वैज्ञानिक म्हणजे कोण तर तुमच्या आमच्यासारखी माणसंच. फक्त ते अज्ञाताचा शोध हजारो वर्षांच्या पोथ्यापुराणांतून न घेता प्रयोगशाळेत घेतात. एकदा एखादया निसर्ग नियमाची उकल झाली की ते ज्ञान दैनंदिन जीवनात कसं वापरता येईल याचा विचार केला जाऊ लागतो. आणि यातूनच मानवाचे भौतिक जीवन समृद्ध करणारे शोध लागतात. तुमच्या आक्षेपाबद्दल बोलायचं झालं तर माझ्यातरी ऐकण्यात किंवा वाचण्यात असं उदाहरण नाही की विज्ञानाने एखादं कच्चं संशोधन जगावर लादून जगावर बदलण्याची जबरदस्ती केली आहे. तुम्ही असं एखादं उदाहरण सांगा म्हणजे मला त्यावर अभ्यास करुन चर्चा करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

अवांतराचा दुसरा वर्ग

arunjoshi123
Sun, 08/18/2013 - 01:33 नवीन
मृत व्यक्तीला पुरलं की मॄतदेहाची माती होते. जाळलं की त्याची राख होते आणि पाण्यात सोडलं की ते कुजून जातं. म्हणून मनुष्य मूलद्रव्यांचा संयोग (इतकंच) आहे.
याला अतिवैज्ञानिक विधान म्हणतात. मी जर आपल्याला ७० किलो ऑक्सिजन, १५ किलो हायड्रोजन, १० किलो कार्बन, इ इ आणून दिले तर आपण मला १०० किलो वजनाचा माणूस बनवून द्याल. असं का? ते असू द्या. अशा माणसाच्या शरीराची कोणतीही एक पेशी, किंवा एक पेशी भाग, जसे मायटोकाँड्रिया, किंवा किमान तिची भिंत, किंवा फक्त तिचा एक रेणू (molecule forming the main cell wall material), किंवा हाच रेणू 'मृत' अवस्थेत (molecule having same chemical composition though not resulting in a live cell wall) अजून माणसाने बनवला नाही. लोक जेव्हा 'कृत्रिम हृद्य बनवले' इ वाचतात तेव्हा they overread into what exactly is made. त्यांना वाटतं कि वैज्ञानिकांनी धडधडणारे कातडीचे काळीज बनवले.
आणि यातूनच मानवाचे भौतिक जीवन समृद्ध करणारे शोध लागतात.
मानवाच्या भौतिक समृद्धीचा एक निकष (नाव, प्रमाण आणि एकक) सांगा, विज्ञानापूर्वी आणि नंतर त्याचे प्रमाण सांगा. कोणत्या शोधाने मानवाचे भौ. जीवन सुखाचे झाले आहे ते जाणायची मला इच्छा आहे.
तुम्ही असं एखादं उदाहरण सांगा म्हणजे मला त्यावर अभ्यास करुन चर्चा करता येईल.
सध्याला अति अवांतर होतंय. आपण मानसशास्त्राकडे परत येऊ. नैराश्याकरता आज कोणते औषध (रसायन, base molecule in pharma terminology) हाच विषय घेऊ. नैराश्यावर आज काय इलाज उपलब्ध आहे याचं नि:संदिग्ध उत्तर काय हेच माझं उदाहरण मानू. 'वैचारिक अधिष्ठान' म्हणून माणसाची गरज पूर्ण करायची अपेक्षा जी विज्ञानाकडून केली जाते ती पूर्ण करण्यास ते अपुरे ठरते आहे असा काहीसा माझा सुर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

याला अतिवैज्ञानिक विधान

धन्या
Sun, 08/18/2013 - 12:25 नवीन
याला अतिवैज्ञानिक विधान म्हणतात.
म्हणजे माझे विधान पुर्णतः वैज्ञानिक आहे.
मी जर आपल्याला ७० किलो ऑक्सिजन, १५ किलो हायड्रोजन, १० किलो कार्बन, इ इ आणून दिले तर आपण मला १०० किलो वजनाचा माणूस बनवून द्याल. असं का?
विज्ञान म्हणजे जादूची कांडी नाही.विज्ञानाला सर्व काही कळलंय असा विज्ञानाचा दावा नाही. मनुष्य जर मुलद्रव्यांचा संयोग आहे म्हणता ना मग घ्या ती मुलद्रव्ये आणि बनवा माणूस असं म्हणणं हे वादासाठी वाद घालणं झालं. विज्ञान आज तरी तेव्हढं प्रगत नाही. न जाणो येत्या भविष्यकाळात कदाचित ते ही विज्ञान करु शकेल. आज मोबाईल ही अत्यावश्यक गरज झाली आहे. पन्नास वर्षांपूर्वी कुणी जर म्हटलं असतं की येणार्‍या काळात केवळ मुठीत मावेल इतकं छोटं उपकरण वापरून माणूस जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यक्तीशी बोलू शकेल तर त्याला मुर्खात काढलं गेलं असतं.
अशा माणसाच्या शरीराची कोणतीही एक पेशी, किंवा एक पेशी भाग, जसे मायटोकाँड्रिया, किंवा किमान तिची भिंत, किंवा फक्त तिचा एक रेणू (molecule forming the main cell wall material), किंवा हाच रेणू 'मृत' अवस्थेत (molecule having same chemical composition though not resulting in a live cell wall) अजून माणसाने बनवला नाही.
पुन्हा तेच सांगतो, विज्ञान ही जादूची कांडी नाही. विज्ञानाला सर्व काही कळला असा विज्ञानाचा दावा नाही.
लोक जेव्हा 'कृत्रिम हृद्य बनवले' इ वाचतात तेव्हा they overread into what exactly is made. त्यांना वाटतं कि वैज्ञानिकांनी धडधडणारे कातडीचे काळीज बनवले.
अशा लोकांना आपल्यासासारख्या विज्ञान कळणार्‍या लोकांनी पेसमेकर म्हणजे काय, ते उपकरण कसे चालते हे समजावून सांगायला हवे. इतकंच नव्हे तर त्याही पुढे जाऊन विज्ञान म्हणजे काय, विज्ञानाच्या मर्यादा काय हे ही त्यांच्या लक्षात आणून दयायला हवे.
मानवाच्या भौतिक समृद्धीचा एक निकष (नाव, प्रमाण आणि एकक) सांगा, विज्ञानापूर्वी आणि नंतर त्याचे प्रमाण सांगा. कोणत्या शोधाने मानवाचे भौ. जीवन सुखाचे झाले आहे ते जाणायची मला इच्छा आहे.
भौतिक समृद्धी हा शब्द मी विज्ञानाने मानवी जीवनात केलेले सुखकारक बदल अशा अर्थी वापरला होता. मोबाईल, संगणक, जलद वाहतुकीचे विविध पर्याय, दुरचित्रवाणी, वैद्यक जगतातील विविध शोध ही सारी विज्ञानाची देणगी आहे. आणि या सार्‍यांनी मानवी जीवन समृद्ध केलं नाही असं म्हणणे कृतघ्नपनाचे ठरेल.
नैराश्याकरता आज कोणते औषध (रसायन, base molecule in pharma terminology) हाच विषय घेऊ. नैराश्यावर आज काय इलाज उपलब्ध आहे याचं नि:संदिग्ध उत्तर काय हेच माझं उदाहरण मानू.
माणुस अगदीच झुरुन मरण्यापेक्षा किंवा एखादया मांत्रिकाच्या किंवा बाबाबुवाच्या नादी लागण्यापेक्षा मानसोपचारतज्ञाकडे जाऊन आजच्या घडीला उपलब्ध असलेले औषधोपचार करुन घेणं केव्हाही चांगलं नाही का?
'वैचारिक अधिष्ठान' म्हणून माणसाची गरज पूर्ण करायची अपेक्षा जी विज्ञानाकडून केली जाते ती पूर्ण करण्यास ते अपुरे ठरते आहे असा काहीसा माझा सुर आहे.
तुम्ही प्रतिसादाच्या शेवटी मुख्य मुद्दयावर आला आहात. :) तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य आहे. आजची विज्ञान मानणारी पीढी अगदी बेबंद वागताना दिसते. वरकरणी तसं वाटतं तरी. माणूस देव, धर्म, संस्कार यांपासून दूर जाऊन अगदी बेताल वागतो आहे. विशेषतः आता आजी आजोबा असलेल्या किंवा होऊ घातलेल्या पीढीला ही बाब प्रकर्षाने जाणवत असेल. दहा बारा वर्षांचा नातू जेव्हा कर्णकर्कश्श आवाजात "भाग बोस डी के डी के बोस भाग भाग" हे गाणं लावून जेव्हा हात पाय हलवून नाचत असेल तेव्हा आपले शुभंकरोतीचे दिवस आठवून ते पोक्त मन नक्कीच खंतावत असेल. पण या या सार्‍याला विज्ञानाला जबाबदार धरणे किंवा विज्ञानाकडून 'वैचारिक अधिष्ठान' म्हणून माणसाची गरज पूर्ण करायची अपेक्षा बाळगणं याचा अर्थ विज्ञान आपल्याला (व्यक्तीशः तुम्हाला नाही, आपणा सार्‍यांना) कळलंच नाही असं खेदाने म्हणावे लागेल. विज्ञान म्हणजे जादूची कांडी नाही. विज्ञान म्हणजे आपल्यातल्याच प्रगल्भ बुद्धीमत्तेच्या माणसांनी निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल. आता हे ज्ञान जेव्हा तो वैज्ञानिक जगासमोर ठेवल्यानंतर जगाने त्याचा वापर करताना तारतम्य बाळगले नाही तर त्यात विज्ञानाचा काय दोष? ईंजिनाच्या शोध लागला, वाहतूकीची साधने निर्माण झाली. जे अंतर पायी कापायला दोन तीन दिवस लागतील ते अंतर माणूस तीन चार तासात कापू लागला. पण हे करत असताना हळूहळू माणसाचं भान सुटू लागलं. तो नशापान करुन वाहने चालवू लागला, वळणा-वळणांवर वेग कमी करा अशा सुचना असूनही त्याकडे दुर्लक्ष करु लागला, दुसर्या वाहनांच्या वेगाशी स्पर्धा करु लागला. आणि पर्यायाने स्वतःला मृत्यूच्या खाईत ढकलू लागला. आता हा दोष ईंजिन निर्माण करणार्‍या वैज्ञानिक ज्ञानाचा की ते ज्ञान वापरताना धरबंद सोडणार्‍या माणसाचा? ही झाली एक बाजू. आता तुम्ही शब्दांत न मांडलेली पण तुमच्या शब्दांतून अध्याहृतपणे व्यक्त होणारी दुसरी बाजू पाहूया. आपण ढोबळ मानाने एक विधान करतो की भारतीय संस्कृती पाच हजार वर्ष जूनी आहे. तेव्हा आपल्याला पाच हजार वर्षांचा ईतिहास ढोबळ्मानाने का होईना पण माहिती आहे. इतिहासामध्ये स्वतःला ज्ञानी, धर्मपंडीत किंवा देवाला जवळ असणारे म्हणवणार्‍यांनी काय केले हे आपण जाणतोच. या सार्‍यांनी आपल्यासारख्याच माणसांना पशूपेक्षाही नीच जीवन जगायला लावले. त्यांना तर "वैचारिक अधिष्ठाण" होतेच की. मग त्यांनी का असं माणसाला जनावरासारखे वागवले? ज्यांना कुणाला वाटते देव, धर्म, अध्यात्म या गोष्टी माणसाला सन्मार्गावर नेतात, तो त्यांचा भ्रम आहे. माणसाला सन्मार्गावर नेते ती त्याची विवेकबुद्धी. मग त्याचा या सार्‍या गोष्टींवर विश्वास असो वा नसो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

समाजाच्या अवस्थेचे मानसशास्त्र विचित्र वर्णन करत आहे

arunjoshi123
Sun, 08/18/2013 - 16:35 नवीन
आपल्या लेखात आपण एका (नविन)मानसिक रोगाचे वर्णन केले आहे. आजच्या जीवनात आणि आजच्या विचारसरणीला धरुन आपल्या लेखाची उपयुक्तता वादातीत आहे. मला केवळ एक ऑड दृष्टीकोन समोर ठेवायचा होता. इथे मी एकूण काय लिहू पाहत होतो ते पाहा. मानसशास्त्राला एक 'प्रमाण स्वभावाचा मनुष्य' वर्णायचा आहे. कोणतीही बाब या प्रमाण स्वभावाच्या रेंजबाहेर गेली तर तो मानसिक रोगी किंवा डिसऑर्डरचा शिकार! हे मला योग्य वाटत नाही. आता का? परवा पुण्याची बातमी आली होती. पुण्यात १५ ते २० टक्के लोक मानसिक आजाराने पिडित आहेत. अमेरिकेत, नामीच्या म्हणण्याप्रमाणे, 'कोणत्याही क्षणी' २५% लोक मानसिक आजाराने पिडित असतात. आयुष्यभराचा विचार केला तर ही संख्या ५०% ते ९०% पर्यंत जाते. आपण याची तापाशी तुलना करू. आयुष्यभराचा विचार केला अगदी १००% लोक कधी ना कधी या आजारातून जातात. पण एकाच वेळी (आणि नेहमी) २०% (पुणे) आणि २५% (अमेरिका) लोकसंख्येला ताप आहे हे विधान अति वाटते. मानसिक आजार तर तापापेक्षा कमी कॉमन आहे. मी पुण्यात ४ वर्षे काढली आहेत आणि मला तिथले किती लोक मानसिक आजारी वाटलेचे उत्तर दशांशात येईल. आपण किंवा मानसशास्त्र जेव्हा असे लेख लिहिता तेव्हा बर्‍याच गरजूंना मदत होते. हा एक पक्ष झाला. मानसिक रोगाची नीट जाण नसलेले बरेच आपल्या भोवतीच्या समाजात, मंडळीमधे रोगी 'शोधू लागतात'. हा ही एक पक्ष आहे. तो मांडायचा मी प्रयत्न करत आहे. एक शेवटची गोष्ट. श्रद्धेचा '१००% विज्ञानावर श्रद्धा' हा एक पर्याय आहे. इतर जवळजवळ अनंत प्रकार सांगता येतील. मी जेव्हा संपतराव सरपंच होण्यालायक नाहीत म्हणतो तेव्हा गणपतराव रोज संध्याकाळी दारू पितात हे सांगणे गरजेचे नाही. सरपंचपदासाठी गणपतरावांचे नाव मी सुचवलेले नाही. विज्ञानाचा मानवजीवनावरचा परिणाम हा विषय आहे. त्यात विज्ञानाची इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान यांची तुलना भलतेच विषयांतर होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नार्सिसिस्टीक पर्सनालिटी

सुबोध खरे
Sun, 08/18/2013 - 00:07 नवीन
नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर " हा एक आजार आहे पण नार्सिसिझम एका विशिष्ट पातळीपर्यंत इष्ट किंवा वांछनीय आहे कारण अशा मानसिकतेचे लोक स्वतावर खुश असतात पण आपली वरची परिस्थिती तशी राखून ठेवण्यासाठी ते लोक कोणतेही कष्ट उचलण्यास तयार होतात. असे लोक जर आपले सहाय्यक असतील तर त्यांना थोडासा गूळ लावून बरीच कामे करून घेता येतात. पण अशी माणसे आपले वरिष्ठ असतील तर ते आपले दुर्दैव होऊ शकते. दुर्दैवाने नार्सिसिझम कुठे संपते आणि नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर कुठे सुरु होते ते नक्की कळत नाही. नार्सिसिझम मध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे आत्मकेंदित वृत्ती,अप्पलपोटेपणा, दुसर्या बद्दल सहानुभूती नसणे, जे लोक स्तुती करतात त्यांच्या कडे जास्त लक्ष देणे आणि जे लोक त्यांची स्तुती करीत माहित वा परखडपणे सांगतात त्यांच्या बद्दल दुस्वास करणे. स्वार्थासाठी दुसर्याचा बेदरकार पणे उपयोग करणे. त्याबद्दल कोणतीही लाज न बाळगणे, सत्तेची लालसा बाळगणे. आपल्या कामगिरी बद्दल टिमकी वाजवणे किंवा आपल्या साध्य गोष्टीची अतिशयोक्ती करून सांगणे आणि शेवटी चूक लक्षात आणल्यावर ही त्यांना त्याबद्दल कोणतीही लाज किंवा खंत नसते.कृतघ्न पण असतात. असा माणूस जर आपला वरिष्ठ असेल तर नोकरी बदलणे हे इष्ट ठरते. आणि जर तो आपला खोलीतील साथीदार(रूम पार्टनर) असेल तर कोणतीही अपराधीपणाची भावना( guilt) न ठेवता खोली बदलणे हे श्रेयस्कर आहे याचे कारण हि मानसिक स्थिती किंवा आजार सहजासहजी सुधारणारा नसतो. अगदी मनोविकार तज्ञाकडे सुद्धा यावर पूर्ण आणि कायमचा इलाज अजून तरी नाही. अगदी कितीही सद्हेतूने तुम्हि ते केलंत तरी करणार्याला त्याची कोणतीही जाणीव नसते आणि असली तरी ती बोलून दाखवण्याची सदवृत्ती त्याच्यात नसते.
  • Log in or register to post comments

मस्त रे.

मोदक
Sun, 08/18/2013 - 00:17 नवीन
मस्त रे. फक्त यावरच थांबू नकोस - मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या पैलूंवरती एक लेखमाला लिही!
  • Log in or register to post comments

अशा मनोवृत्तीचा अश पद्धतीने

sanjivanik१
Sun, 08/18/2013 - 14:07 नवीन
अशा मनोवृत्तीचा अश पद्धतीने विचार फारच उत्तम मांडला आहे. त्या मागची कथा पण आवडली . अशा माणसाना हाताळण आणि त्याच्यावर उपाय कारण म्हणजे खरच एक कसोटी आहे कुटुंबिया साठी . तुम्ही म्हटल्या प्रमाणे त्यांच्या आयुष्यात जर त्यांच मन हलवून टाकणारी गोष्ट मुद्दाम पण खोट्या पद्धतीने घडवून आणली तर ते जास्त प्रभावी ठरावे अस मला वाटत . अशी घटना आपोआप घडण्याची वाट बघावी लागणार नाही आणि तिचे दुष्परिणाम पण टाळता येतिल.
  • Log in or register to post comments

लेख छानच.

अप्पा जोगळेकर
Sun, 08/18/2013 - 22:18 नवीन
लेख छानच. मी गेले दीड वर्ष नार्सिसिस्ट साहेबाबरोबर काम करत आहे. आणि हे सांगू शकतो तो व्यावसायिक आणि कौटुंबिक आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेला, सतत दुसर्‍यांवर आरडाओरडा करणारा मनुष्य आहे. त्यामुळे ही माणसे नेहमी यशस्वी ठरतात हे पटले नाही. सतत दुसर्‍याच्या चुका काढणारा साहेब मिळाल्याचा मला व्यावसायिक कौशल्याच्या दॄष्टीने फायदाच झाला. मीदेखील दोन-चार वेळा चार-पाच फ्रेशर लोकांच्या समोर आरडाओरडा करत त्याच्या चुका दाखवून त्याचा पाणउतारा केल्यावर त्याने आवाज करणे बंद केले. जर आपले काम चोख असेल आणि आपली एखादी चूक दाखवून दिल्यावर ती मान्य करण्याचा मोकळेपणा असेल तर कोणत्याही साहेबा बरोबर काम करताना अडचण येत नाही असे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख, वाचनिय चर्चा !

चौथा कोनाडा
Wed, 03/09/2016 - 08:01 नवीन
सुंदर लेख, वाचनिय चर्चा ! सगळेच प्रतिसाद अभ्यासपुर्ण आहेत. थॅन्क्यु धन्या या सहज सोप्या सुंदर लेखा साठी !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा