मराठी माध्यम की इंग्लिश मिडीयम
महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत.
याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसते. इंग्लिश माध्यमामधे मुलाला घालणारे पालक काही स्वतः फाडफाड इंग्लिश बोलत नसतात.
त्यांना मराठीचे प्रेम नसते असेही नाही पण यामुळे मुलाचे भले होइल असा एक विचार मात्र असतो.
मराठी काय मुद्दाम शिकायला लागत नाही. ती आसमंतात असतेच
पण व्यवहारामधे, नोकरीसाठी इंग्लिश आवश्यक आहे असा एक समज या पालकांचा असतो.
इंग्लिशचा पोटापाण्याशी फार पूर्वीपासून संबंध जोडण्यात आला आहे.
आता राज्यकर्त्यांमुळे अनेक गोष्टी बदलतात. हेही खरे.
आज शाळेत अरबी फारसी किंवा तुर्की कंपलसरी केले तर ?
पण एके काळी अरबी फारसी आणि काही प्रमाणात तुर्की या भाषा गरजेच्या होत्या.
इंग्रजी अंमलानंतर अनेक गोष्टी बदलल्या. इंग्रजीचे आगमन झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढणार्या अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांना इंग्रजीचे उत्तम ज्ञान असे.
खरी पंचाइत स्वातंत्र्यानंतर झाली. इंग्रज गेल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांपैकी काही हटवाद्यांनी इंग्रजांच्या अनेक गोष्टींबरोबरच इंग्रजीही हटविली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला अनेक शैक्षणिक प्रयोग अनुभवायला लागले. परिणाम त्यांच्या इंग्रजीवर झाला.
तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांचेही बर्यापैकी मराठीकरण झाले होते.
याला कोणतेच शासकीय खाते अपवाद नाही. त्यामुळे किमान शासकीय सेवेत नोकरी मिळायला अडचण येत नसे.
पण इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण झालाच. मग आपल्याला नाही तर मुलांना तरी हे हाल भोगायला लागू नयेत.
या विचाराने इंग्रजीकडे वळणारेही काही पालक आहेत.
या सगळ्यातून असे दिसते की पाल्याला इंग्रजी / मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना
आपली संस्कृती टिकवायची किंवा बुडवायची यापेक्षा
उद्याच्या जगात पाल्य नीटपणे आपल्या पायावर उभा रहावा एवढाच विचार असतो.
काही जणांना वाटते मराठीमुळे भले होइल, काहींना वाटते इंग्रजीमुळे भले होइल.
अनेकजण जे दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतात ते पुढे अकरावी सायन्सला विनातक्रार
इंग्लिशमधून अभ्यास करतात.
गुजरातमधे गुजरातीतून इंजिनयरींग करण्याची सोय आहे. तसे महाराष्ट्रात नाही.
आजूबाजूला नजर टाकली तर आयुष्यात यश मिळवलेल्या अनेक यशवंतांपैकी
अनेकजण मराठीमधे शिकलेले आढळतात तर अनेकजण इंग्रजीमधे शिकलेले.
म्हणजे मराठी कि इंग्रजी या निश्कर्षापर्यंत येणेही अवघड होऊन बसते.
बरं सामान्य माणसाला दोन्ही माध्यमांचे समर्थन खरे वाटते आणि कन्फ्युजन आणखी वाढते.
इंग्रजीमधे शिकलेल्या अनेक लोकांना मराठी साहित्य वाचताना अडचणी येतात. मराठी मधले बारकावे, अलंकार समजत नाहीत.
पण रोजीरोटी मराठीवर अवलंबून नसल्याने त्यांचे काही अडत नाही भले त्यांचे सगळे आयुष्य इंग्लंडमधे नव्हे तर महाराष्ट्रातच जाते.
आता पुण्यामंबईत पूर्वीसारख्या दर्जेदार मराठी शाळा राहील्या आहेत कुठे ? असा प्रश्नही कानी पडतो.
यातही महाराष्ट्र सरकारचे धोरणही मराठी शाळांबाबत दुजाभावाचे आहे. नव्या मराठी शाळांना परवानगी मिळत नाही. मिळाल्यास अनुदानापाशी अडते. त्यामुळे लोकांनाच मराठी नको आहे यापेक्षा शासनालाच
मराठी शाळा नकोशा झाल्या आहेत.
अजून एक गोष्ट. आमच्या परिचयातील एक मुलगी. तिला कंपनी फ्रान्सला पाठवणार होती.
याकरीता जुजबी फ्रेंच ती शिकत होती. तिचे एकच म्हणणे असे, इंग्लिशशी झगडण्यात इतकी वर्षे गेली.
ते पुरेसे नाही म्हणून आता फ्रेंच शिकावे लागते आहे.
त्यामुळे पडलेला प्रश्न हा आहे की संस्कृती कशी टिकेल यासाठी नव्हे
मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ? इंग्रजी माध्यमात शिकले तरी पुढच्या पंधरा वीस वर्षांनंतर इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ?
की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत!
तेव्हा नेमके कोणते माध्यम निवडावे ? हा मोठा प्रश्न आहे.
प्रतिक्रिया
स्वत वरून जग ओळखा
Pagination