अर्थ कोणी सांगेल का ? -अणुरेणिया थोकडा

प्रसाद१९७१'s picture
प्रसाद१९७१ in जनातलं, मनातलं
13 Feb 2013 - 12:33 pm

हा अभंग तर सर्वांनाच माहिती आहे.
पण दुसर्‍या आणि तिसर्‍या कडव्याचा अर्थ कोणी सांगेल का?

अणुरेणिया थोकडा
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

13 Feb 2013 - 2:32 pm | प्रसाद१९७१

कोणीच नाही का अर्थ माहिती असलेला

पैसा's picture

13 Feb 2013 - 2:36 pm | पैसा

बिरुटे सर, धन्या, शरद, आणिही खूप आहेत. आणि कोणाची नावे लिहायला विसरले त्यांनी मारायला येऊ नका लगेच!

पण जरा वेळ द्या हो. याचा विचार केला पाहिजे ना लोकांनी. नुसतेच आवडले, छान छान म्हणायचं नाही ना इथे!

कवितानागेश's picture

13 Feb 2013 - 2:38 pm | कवितानागेश

कदाचित 'का सांगायचा?' असा विचार करत असतील लोक.
जरा धीर धरा.

मालोजीराव's picture

13 Feb 2013 - 3:09 pm | मालोजीराव

परमेश्वराबरोबरचे अद्वैत त्यांनी साधले होते. त्या क्षणी ते सामान्य मानवी न राहता देवाशी मनोमन एकरूप झाले होते. अणुरेणूपासून ते अथांग अवकाशापर्यंत सगळे विश्व व्यापलेला परमेश्वरच त्यांच्या अंतरंगात नांदत असतांना शरीराच्या, मनाच्या, गुणदोषांच्या किंवा शंकाकुशंकांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात,

अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥३॥
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता।।४।।

प्रसाद१९७१'s picture

13 Feb 2013 - 3:13 pm | प्रसाद१९७१

ह्याचाच अर्थ कळत नाहीये ना

गिळुन सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥३॥

मालोजीराव's picture

13 Feb 2013 - 3:19 pm | मालोजीराव

प्राकृत म्हराटी हाय काय हे...जाणकारांनी प्रकाश टाकावा

अवांतर : वरचा प्रतिसाद आनंद घारे यांच्या ब्लॉग वरूनच कॉपी पेस्ट केलाय ते बहुतेक मिपा चे सदस्य आहेत त्यामुळे ते नेमकं सांगू शकतील

आनंद घारे's picture

14 Feb 2013 - 10:13 am | आनंद घारे

माझ्या कुठल्या ब्लॉगवर तुम्हाला कोणते वाक्य सापडले ते कृपया दाखवलेत तर त्याचा संदर्भ मला लागेल. साहित्य, भाषा वगैरे माझे विषय नाहीत, अध्यात्म तर नाहीच. त्यामुळे मीच बुचकळ्यात पडलो आहे. माझा ब्लॉग हॅक तर झाला नाहीना?

anandghare2

आयला ! हे आनंद घारे तुमी नव्हं काय ? हे वेगळे असतील तर स्वारि पावन मिशटिक झाली काय तर

आनंद घारे's picture

14 Feb 2013 - 2:19 pm | आनंद घारे

मला अध्यात्म समजत नसले तरी संत तुकारामांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदरभाव आहे. त्यामुळे (माझ्या क्षेत्राबाहेर जाऊन) मला त्यांच्या अभंगांबद्दल लेख लिहावा असे वाटले. तो लेख लिहितांना उदाहरणादाखल मी त्यांचे काही प्रसिद्ध अभंग दिले आणि त्या अभंगामधला मला त्या वेळी समजलेला भाव थोडक्यात लिहिला. या अभंगाविषयी मी एवढेच लिहिले होते.
परमेश्वराबरोबरचे अद्वैत त्यांनी साधले होते. त्या क्षणी ते सामान्य मानवी न राहता देवाशी मनोमन एकरूप झाले होते. अणुरेणूपासून ते अथांग अवकाशापर्यंत सगळे विश्व व्यापलेला परमेश्वरच त्यांच्या अंतरंगात नांदत असतांना शरीराच्या, मनाच्या, गुणदोषांच्या किंवा शंकाकुशंकांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात,
अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ .....

त्यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ मला त्या वेळी समजला नव्हता. या धाग्यामुळे आता तो थोडासा समजला. जीवंतपणीच शरीराच्या बाहेरून आपले कलेवर पाहणे वगैरे फार फार कठीण आहे.

शरद's picture

13 Feb 2013 - 3:21 pm | शरद

अभंगाचा अर्थ सांगण्याआधी शब्दांचे अर्थ पहा.
कलेवर ...प्रेत. भव भ्रम... भव ऐहिक जग, भ्रम ..चुकीची समजूत. हे भोवती दिसणारे जग हे सत्य आहे अशी चुकीची समजुत
त्रिपुटी ... (उदाहरण म्हणून) दृष्य-दर्शन-द्रष्टा. ही एक तत्वज्ञानातील संज्ञा आहे. जी गोष्ट दिसते ती दृष्य (उदा. चेंडू). पहाणारा (उदा. मी) हा द्रष्टा. पहाण्याची क्रिया म्हणजे दर्शन. म्हणजे मी चेंडू पहातो यात द्रष्टा-दृष्य-दर्शन हे तिन घटक. अद्वैतात जग ही माया म्हणजे खोटे असे मानल्यामुळे दृष्य नाहीच. मग द्रष्टा दर्शन कशाचे घेणार ? पुढे असे सांगितले की दृष्य व द्रष्टा एकच आहे. कारण या सर्वांत ब्रह्मच आहे. हे ज्ञान झाले म्हणजे त्रिपुटी सांडिली. इतर काही त्रिपुटी..अधिदैव-अध्यात्म-अधिभुत. ज्ञाता-ज्ञान -ज्ञेय. कर्ता-करण-कार्य.ध्याता-ध्यान-ध्येय इ. मूळ वस्तु अखंड आहे; मन:कृत कल्पनेमुळे ती त्रिधा भासते.
घट ..शरीर. घटी दीप उजळला .. ( देहाच्या आंत प्रकाश पडला) आत्मज्ञान झाले
( हे अतिशय थोडक्यात सांगावयाचा प्रयत्न केला आहे. ज्ञाते आणखी प्रकाश पाडतीलच).
आता अभंगाकडे वळू. आत्मज्ञान झाल्यानंतरच्या अवस्थेचे वर्णन बोवा करत आहेत.
तुकाराम ही व्यक्ती म्हणून अगदी नगण्य आहे म्हणून अणुरेणुया थोकडा. अणुपेक्षाही क्षुल्लक. पण आता आत्मज्ञान झाल्यावर आपण म्हणजेच ब्रह्म हे कळले म्हणून तो आकाशाएवढा, अमेय, झाला
हे शरीर, ही खोल, जीवात्मा बाहेर गेल्यावर कलेवर होते. "मी म्हणजे शरीर नव्हे" हे कळल्यावर हे शरीर म्हणजे एक भ्रामक समजुत आहे याची खात्री झाली, जणु ते शरीर गिळूनच टाकले. हे कशामुळे झाले ? अंतर्यामी प्रकाश पडल्याने.
हे ज्ञान झाल्यावर बोवांना स्वत:करिता करण्यासारखे काहीच उरले नाही. आता "बुडती हे जन, न पाहावे डोळा" या करुणेमुळे ते आता फक्त इतरांवर उपकार करण्याकरिताच उरले आहेत.
शरद

धन्या's picture

13 Feb 2013 - 8:19 pm | धन्या

छान विश्लेषण केलं आहे तुम्ही.

चौकटराजा's picture

14 Feb 2013 - 9:14 am | चौकटराजा

मी याचा अर्थ लावण्यात फार गोंधळलो होतो. पण...गुरू आपण सगळे उत्तम उलगडून दाखविलेत. ऋणी आहे देवा !

यशोधरा's picture

15 Feb 2013 - 9:18 am | यशोधरा

सुरेख लिहिले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2013 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभंगाचा अर्थ उत्तम समजावून सांगितला. धन्स.

-दिलीप बिरुटे

शरद यांचे मतास अनुमोदन. नश्वर शरीर गळून पडले आणि केवळ आत्मतत्त्वाचा अनुभव आला...कलेवर गळून पडले. भव-संसार हा भ्रमाचा आधार आहे. मायेचे आवरण असल्यामुळे जग हेच नित्य आहे असे वाटत होते. ते अज्ञान दूर झाले. सांडिली त्रिपुटी- ज्ञाता-ज्ञान आणि ज्ञेय अशी त्रिपुटी नाही ते सगळे एकच आहे. दीप उजळला घटी- आत्मज्ञानाचा उदय झाला. आश्चर्य या गोष्टीचे वाटते जी घटपटांची भाषा शंकराचार्यांच्या भाष्यांमध्ये आढळते त्याचे संदर्भ इथे देखील आढळतायत.

अद्वैत तत्त्वज्ञान समजावून सांगताना घटाकाश,बिंदु-सिंधु,कुंभ-सरिता या सोप्यात सोप्या संकल्पना अनेकांनी वापरल्या आहेत. वापरून वापरून त्या घिशापिट्या झालेल्या आहेत म्हणा ना. रिकाम्या घड्यातले आकाशतत्त्व हे मूळ आकाशापेक्षा वेगळे नसते; बिंदुमध्ये जे जल,तेच सिंधुमध्ये; नदीतले जल आणि कुंभातले जल दोन्ही एकच,बाह्य आकारामुळे ते आपल्याला वेगळे (आहे ) असे वाटते. केवळ तुकारामच नव्हेत तर अद्वैताच्या कुठल्याही भाष्यामध्ये ह्या संकल्पना सापडणारच. त्या इतक्या सर्वसाधारण (कॉमन) झाल्या की मूळ हेतूपासून दूर गेल्या आणि पुढे पुढे उपरोधाला पात्र ठरल्या. घटपटादि खटपट करून खरे ज्ञान होणार आहे का असाही प्रश्न विचारला जाऊ लागला.खरे ज्ञान हे अनुभवानेच येते,तत्त्वचर्चा किंवा शब्दछ्ल करून नव्हे असे काही ज्येष्ठांनी म्हटलेही आहे पण ते केवळ पुस्तकी पांडित्य नको,आत्मज्ञान,अनुभूती पाहिजे हे सांगण्यासाठीच. संत तुकाराम हे आत्मज्ञानी होते, साक्षाकारी होते. पूर्वसूरींनी मांडलेल्या संकल्पना आणि त्यासाठी योजलेले शब्द तुकारामांना ठाऊक असणारच.

हा अर्थ एकदम करेक्टाय. यात एक पैश्याची चूक नाही.

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2013 - 4:31 pm | प्रसाद गोडबोले

तुकारामांचे अभंग म्हणजे एखाद्या महान चित्रकाराने काढलेल्या चित्रा सारखे असतात ... त्यातलं काही कळत नसलं तरीही सुंदर वाटतात ...अन जसं जसं कळायला लागतं तसं तसं तुम्ही त्यात हरवुन जायला लागता ...आणि जेव्हा तुम्ही पुर्णपणे त्यात हरवुन जाता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की चित्र काढणारा , ते चित्र आणि तुम्ही ह्याच्यात काहीच द्वैत नाहीये !!
त्याच धाटणीतला हा एक अभंग .

अणुरेणिया थोकडा
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
>>>> ब्रह्मतत्वाचा शोध घेत सुरु केलेला प्रवास आता आत्मतत्वाशी येवुन थांबलाय परीपुरण पणे स्थिरावलाय ...ते आत्मतत्व एतके सुक्ष्म आहे की अगदी अणु रेणु पेक्षाही थोकडे /छोटे ! अन पहायला गेले तर आकाशा पेक्षा व्यापक ...आणि ही अनुभुती महाराजांना येत आहे ...तुका आकाशा येवढा .. एकाच वेळी अणु पेक्षा लहान अन आकाशा येवढे व्यापक

गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥

>> ह्याप्रवासातली ही एक घटना ...गिळुनी सांडिले कलेवर ...हा पंच महाभुतांचा देह गिळुन सांडीले म्हणजे टाकुन दिले सोडले त्याच्याशी तद्रुपता संपली ह्या अर्थाने आणि हे जमले कसे ? कारण कलेवर होते तरी काय ? भव भ्रमाचा आकार ...अर्थाच माझ्या कल्पनांनी रंगवलेले माझे मीपण ! त्याच्याशी तद्रुपता आता तुटुन गेली !

सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
>>> त्रिपुटी म्हणजे कार्य-कारण-कर्ता उदागरणार्थ . ज्ञाता ज्ञान ज्ञेय , भक्त भक्ती भगवंत ...ही त्रिपुटी सांडीली अर्थात नष्ट ज्हाली ... आता तिन्ही एकच होवुन गेले ...हा जो अनुभव आला तिथेही अनुभवता -अनुभव-अनुभव्य ही त्रिपुटी विरुन गेली ...अन दीप उजळला घटी म्हणजे आत्मत्त्वाची ज्योती ह्या काल्पनिक कलेवरात उजळुन निघाली !

तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥

तर तुकाराम महाराज म्हणतात की ह्या अवस्थेत जीवशिवाच्या ऐक्याच्या स्थितीत तत्वमसिच्या अनुभुतीत मी परिपुर्ण विरुन गेलोय आता काहीच आसक्ती उरली नाही कसलाच योगक्षेम उरला नाही ...हा देह जो काही उरलाय तो फक्त परोपकाराकरिता !!

अहाहा

पांडुरंग पांडुरंग !!

प्रसाद१९७१'s picture

13 Feb 2013 - 4:43 pm | प्रसाद१९७१

सर्वांना धन्यवाद. बरासचा अर्थ कळतोय आता.

नाहीतर कीतीही प्रयत्न केला असता तरी "त्रिपुटी" चा अर्थ कळला नसता

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2013 - 4:47 pm | प्रसाद गोडबोले

साधु दिसती वेगळाले | परी ते अंतरी मिळाले ||

वरील प्रतिसाद देत असताना इतर संतांच्या अभंगाची आठवण झाली

अणुरेणिया थोकडा
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
>>> अरे अरे ज्ञाना झालासे पावन | तुझे तज ध्यान कळो आले ||
तुझा तुची देव तुझा तुची भाव | फिटला संदेह अन्य तत्त्वी ||- माऊली

सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
>>> दीपकी दीपक मावळल्या ज्योती | घरभर वाती शुन्य झाल्या || माऊली
त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबिला | उजळली निजात्म ज्योती , तेणे जळोनिया गेला || समर्थ

तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
काय अवस्था असेल ही ...
बापरखमा देवीवरु , हृदयीचा जाणोनि , अनुभव सौरसु केला
दृष्टीचा डोला पाहु गेलीये तव भीतरी पालटु झाला ||

आता व्हायचे ते होयेना का | अन जायचे ते जायेना का |
तुटली मनातील आशंका | जन्म मृत्याची || श्रीराम ||समर्थ

तिमा's picture

13 Feb 2013 - 5:42 pm | तिमा

साठीनंतर प्रत्येक सामान्य व्यक्तीनेही 'उरलो उपकारापुरता' अशी वृत्ती ठेवली तर कितीतरी प्रश्न सुटतील.

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2013 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले

साठ हा कट ऑफ्फ कुठुन शोधला ??

कवितानागेश's picture

13 Feb 2013 - 7:19 pm | कवितानागेश

साठीशांती मुळे असेल. :)

प्रसाद गोडबोले's picture

14 Feb 2013 - 9:39 am | प्रसाद गोडबोले

साठीनंतर पंडीत रवी शंकर ह्याना २ मुली झाल्या आहेत ... ;)

आम्हीही साठी नंतर एक शांती शोधणार आहोत =))

मूकवाचक's picture

13 Feb 2013 - 10:54 pm | मूकवाचक

'साठी बुद्धी नाठी' असे उगाच म्हणत नाहीत. उपकारापुरते उरणारे फार विरळे. बाकीचे उपदेशापुरते आणि अडल्यानडल्यांचा उपमर्द करण्यापुरते उरतात. असो.

आनंद घारे's picture

14 Feb 2013 - 10:29 am | आनंद घारे

आजकाल मिळत असलेल्या औषधोपचारांमुळे वयोमार्यादा वाढल्या आहेत, 'साठी बुद्धी नाठी' होत नाही किंवा लोक 'सठिया गये' होत नाहीत. रिटायर मात्र व्हावे लागते. त्या वेळेपर्यंत मुले आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली असतात. माझ्या पिढीतल्या लोकांना आपल्या जीवनात बराच स्ट्रगल करावा लागला होता. मनसोक्त वागायला, हिंडायला, फिरायला, खायला प्यायला वगैरे मिळाले नव्हते. आत्मा परमात्मा वगैरेमध्ये इंटरेस्ट नसतो. त्यामुळे थोडा बहुत परोपकार करून उरलेला वेळ आता मौज मजा करण्यात घालवायचा आहे अशीच बहुसंख्य लोकांची प्रवृत्ती दिसते. असे माझे निरीक्षण आहे.

ऋषिकेश's picture

13 Feb 2013 - 4:58 pm | ऋषिकेश

जे सांगायला पॉलो कोहेलोला अख्ख आल्केमिस्ट लिहावं लागलं (आणि ते लिहुनही इतकं नेमकं तो अजिबातच सांगु शकलेला नाही) ते तुकोबांनी या चार ओळींत अधिक व्यापक आणि नेमकं लिहिलंय!

जाण्कारांच्या रोचक प्रतिक्रियांच्या अपेक्षेत.

प्यारे१'s picture

13 Feb 2013 - 5:07 pm | प्यारे१

'अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता' म्हणणारे भ. शंकराचार्य नि 'सांडिली त्रिपुटी' म्हणणारे तुकाराम महाराज... संत एकत्वाचा अ नुभव घेताघेता त्याच्याही पलिकडे जातात!

आपण बसतो कुणाचा कुठला वाद नि कुणाचा कुठला मार्ग म्हणत... असो.

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2013 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

तेव्हा लोकशाही न्हवती त्यामुळं वाद काढुन काही विषेश फायदा होईल असे नव्हते ना ! =))

आता कसं संताना कॉपीराईट करुन घेतलं बुध्द आमचा , नामदेव , तुकाराम आमचे , ज्ञानेश्वर एकनाथ रामदास त्यांचे ... वगैरे वगैरे की कसं त्यांच्या नावावर राजकारण करायला सोप्पं जातं =))

हा प्रतिसाद निरथर्क आहे पण काय करणार सध्या ' आहे हे असं आहे " दुर्दैव आपलं :(

प्यारे१'s picture

13 Feb 2013 - 5:26 pm | प्यारे१

त्याहून जास्त दुर्दैव हे की 'आमचा' म्हणणार्‍या 'आमच्या माणसाचं' सुद्धा आम्ही काहीच वाचत नाही !

ते वाचलंतरी पुष्कळ अक्कल येईल. नुस्तं गजकर्ण!
असो.

बाकी 'अणुरेणूया थोकडा' म्हणताना त्या अभंगाचं किमान इम्प्लिमेण्टेशन सुद्धा माणसाचा अहंगंड नि न्यूनगंड दूर करु शकतील असे शब्द महाराज वापरतात.

उंच असणार्‍या माणसाला उंचीबद्द्ल अहंकार असतो तर बुटक्या माणसाला खुजेपणाचा... तुकाराम महाराज एवढे उंच अथवा एवढे छोटे कसे असू शकतात असा विचार केला तर उंची एवढी, एवढीच नि वजन एवढंच, एवढं जास्त, काळा गोरा, सुंदर कुरुप इ. सगळी शारिरीक कारणे मागे पडतात...

आम्ही चालूच ठेवतोय .... की जय म्हणणं!

प्रसाद गोडबोले's picture

13 Feb 2013 - 5:32 pm | प्रसाद गोडबोले

तुमने तो मेरे मुंह की बात छिनली !!

सुधीर's picture

13 Feb 2013 - 9:51 pm | सुधीर

शरद यांचा प्रतिसाद आणि युट्युब वरचा व्हिडीओ दोन्ही आवडले. पाऊलो कोएलोचं अल्केमिस्टही खूप चांगलं आहे असं मला वाटतं.

पैसा's picture

14 Feb 2013 - 9:19 am | पैसा

शरद, श्रेयाताई, राही, गिरीजा, प्यारे सर्वांना धन्यवाद!

क्रान्ति's picture

14 Feb 2013 - 9:32 am | क्रान्ति

काय छान निरुपण केलं आहे!

श्रिया's picture

14 Feb 2013 - 11:22 am | श्रिया

शरद यांनी सांगितलेला अर्थ भावला.

विटेकर's picture

15 Feb 2013 - 10:06 am | विटेकर

आत्मसाक्षात्काराचा आनंद प्रत्येक संतानी असा थोडासा गूढ वाटावा असाच सांगितला आहे ...
ज्ञानोबा - मोगरा फुलला..
मुक्ताई - मुंगी उडाली आकाशी
तुकोबा- अणुरिणिया तोकडा.
समर्थांनी दासबोधात शिष्याच्या प्रश्नाना उत्तर देताना सक्षात्काराचा क्षण सांगतात.... ओव्या आठवल्या की सांगतो.

तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥

ही ज्ञानोत्तर भक्ती .. मिपावर आणखी एका धाग्यावर ज्ञानोत्तर भक्ती / ज्ञानोत्तर कर्म यावर चर्चा झाली होती.. बहुधा संक्षी असावेत.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 2:20 pm | संजय क्षीरसागर

आम्ही आपले गप्पच बरे.
तरी जातजाता सांगतो खरे,

ज्ञानोत्तर भक्ती किंवा कर्म असे काही नोहे,
ते ज्ञानोत्तर जगणे असे.

`प्रत्येक रात्र शनिवार आणि दिवस रविवार'
हा तो मंत्र जाणियेजे ॥१॥

संडे असो वा मंडे, आपला एव्हरी डे आहे संडे :)

प्रसाद गोडबोले's picture

15 Feb 2013 - 3:34 pm | प्रसाद गोडबोले

प्रत्येक रात्र शनिवार आणि दिवस रविवार'
हा तो मंत्र जाणियेजे ॥१

>>> आमचा ५ डे वीक असतो त्यामुळे प्रत्येक रात्र शुक्रवार असा बदल केला तर चालेल का =))

त्यामुळे वारांची नांव काहीही चालतील

विटेकर's picture

15 Feb 2013 - 5:06 pm | विटेकर

तुमचं फकस्त नावं घेतलयं... " नावं" ठेवली नाहीत.

- आपणांस आहे मरण | म्हणून राखावे बरवेपण

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2013 - 12:01 pm | संजय क्षीरसागर

आम्ही सुद्धा सर्वांस उपयोगी होईल असा ज्ञानोत्तर जगण्याचा श्लोक दिला आहे ॥३४।२८।३६॥

प्यारे१'s picture

15 Feb 2013 - 4:59 pm | प्यारे१

शनिवार रात्र नि रविवार दिवस हे काय प्रकरण आहे संक्षीबुवा?