✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देव आणि धर्म, माझे मत

श
शरद यांनी
Tue, 06/19/2012 - 11:11  ·  लेख
लेख
देव आणि धर्म श्री. वालावलकर यांच्या पुस्तकासंबंधित प्रतिसादात बरेच जणांनी देव व धर्म यावर आपले विचार प्रगट केले आहेत. हिन्दू धर्म व देव याबाबत मी वाचलेल्या ग्रंथांवरून बनलेले माझे मत येथे देत आहे. हिन्दू हा शब्दच बाराव्या शतकात मुसलमान आक्रमकांनी सिन्धू नदीच्या काठी राहणारे, गुलाम या अर्थाने वापरला आहे. त्या आधी हिन्दू हा शब्दच नव्हता तर मग हिन्दू धर्म तरी कोठून असणार ? तर मग त्यापूर्वीच्या काळामध्ये धर्म नव्हताच काय ? या करिता प्रथम धर्म याची एक व्याख्या बनवू. लोकांचे आचार विचार, श्रद्धा,भावना , अभ्यास, परंपरा इ. यांच्या प्रभावाखाली जगण्याची जी शैली त्यांनी स्विकारली असेल ती त्यांचा धर्म म्हणावयाचे. उदा. बुद्धाचे व त्याच्या शिष्यांचे विचार ज्यांना पटतात व त्याप्रमाणे वागावयाचा जे प्रयत्न करतात, त्यांचा धर्म बौद्ध. लहानपणापासून घरातील व आजूबाजूच्या लोकांनी आई-वडीलांशी कसे वागवयाचे ह्याबद्दल जे काही सांगितले ते ऐकून-जाणून त्याप्रमाणे वागणे हा पुत्रधर्म. क्षात्रधर्म, समाजधर्म, राजधर्म वगैरे अनेक धर्म एकाच माणसाला एकाच वेळी पाळावे लागत असतात. ही व्याख्या परिपूर्ण नक्कीच नाही. पण वरील इ. त आणखी थोडी भर घालून तुम्ही या व्याख्येप्रमाणे धर्माला या लेखापुरते स्विकारा. राजाचा राजधर्म, सैनिकाचा क्षात्रधर्म , संसारी माणसाचा गृहस्थधर्म, वगैरे पार वैदिक काळापासून चालत आले आहेत व अजूनही पाळले जातात. आज आपण ज्या अर्थाने धर्म (हिन्दू, मुस्लीम, बौद्ध इ. ) हा शब्द वापरतो तोही यातील एक पोटविभाग. आता देव या बद्दलचे विचार सांगून परत धर्माकडे येऊ. आज सर्वस्वी विज्ञानावर अवलंबून रहावे लागत आहे. तरीही दाभोळकर-वालावालकर यांच्या कळपात चार माणसे आली तर दहा बाबा-बापू यांच्या आश्रमात, शिर्डी-तिरुपतीला पळत आहेत. असे का होते ? ही सर्व काही अडाणी नव्हेत. चांगले शिकलेले , धनाड्य, व्यवहारचतुर, राजकारणी , सर्व काही तिकडॅ पळतांना , अमाप संपत्ती दान करतांना दिसतात. याचे कारण असे की सर्वसामान्य माणूस दाभोळकरांपेक्षा फार फार निराळा आहे. तो केवळ विचार करून त्याप्रमाणे जगू शकत नाही. त्याला राग, लोभ, प्रेम, भीती अशा अनेक "भावना" आहेत. त्याचे जगणे या भावनांच्या सांगण्यावर अवलंबून असते. आणि ही त्याला माणुस निर्माण झाला तेव्हापासून मिळालेली देण आहे. अंधारात हिंस्त्र जनावरे हल्ला करत म्हणून आदीमानव अंधाराला घाबरत होता. आजही जन्मलेले प्रत्येक मुल अंधाराला घाबरतेच. मग भले ते अत्याधुनिक रुग्णालयात जन्मलेले असेना का. तुम्ही या भावना कमी /नाहिश्या करू शकाल पण मग मानव रोबो बनेल. ते बाजूला ठेऊ. या भावना अतिशय तरल व काबूत ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे जगतांना मानवाला "आधार " लागतो. लहानपणी तो आईचा आधार घेतो, शाळेत गेल्यावर शिक्षकाचा घेतो, समाजात वावरतांना नातेवाईक-मित्र यांचा घेतो. अगदी श्री. वालावलकरसुद्धा असा आधार घेतात. माझी खात्री आहे की त्यांनी प्रयोगशाळेत जाऊन प्राणवायू आहे याची खात्री करून घेतलेली नाही. पण त्यांचा विश्वास आहे की ते काही शिक्षण घेऊन, प्रयोग करून, प्राणवायू खराच आहे हे तपासू शकतील. हा विज्ञानावरचा विश्वास हा त्यांचा "आधार" आहे. कोणताही माणुस भावनिक, शारीरिक, बौद्धिक , इ. आधार घेतल्याशिवाय जगू शकत नाही. "देव" हा असाच एक आधार आहे. सगळ्यांना असा आधार लागेलच असे नाही. ज्याला लागत नाही तो माणुस देव न स्विकारता जगू शकेल. पण अशी माणसे विरळी. बाकिच्यांना देव ही एक गरज आहे. म्हणूनच माणुस श्रीमंत आहे, बुद्धीमान आहे, शूर आहे हे महत्वाचे नसते. तो भारतात आहे की अमेरिकेत हेही गौण असते. हा देव अनादी, अनंत आहे, त्याला चार हात आहेत की हत्तीचे तोंड याला काहीच महत्ब नाही. तुमची गरज भागवता येणे एवढे त्याला जमले पाहिजे . मग काय होते की प्रत्येकाची गरज निराळी असली की त्याचा देव निराळा होतो. जगातील गुंडांना तोंड देणे ही ज्याची प्राथमिक गरज त्याचा देव दैत्यसंहारक असतो. पावसाची गरज असलेल्या शेतकरी असा पाउस पाडणारा देवच मागणार. त्यामुळे एक तर देव अनेक असतात किंवा एकच देव सर्व काही देणारा असतो. काही जणांना वत्सल, प्रेमळ देवाची गरज असते तर काहींना त्यांच्या अलौकिक प्रश्नांची उत्तरे देंणारा. तर असा हा देव अनादी काळापासून, सर्वत्र होता, आहे व पुढेही असणारच. असा हा देव माणसाहून निराळा असणार हे उघडच आहे. पण माणुस आपले काही गुणधर्म त्याला चिकटवतोच. मग असा देव क्षीरसागरात नागावर झोपणार, स्वर्गात अमृत पिणार, लग्न करून मुले प्रसवणार. तो प्रेमळ असेल किंवा क्रुरही असेल. पृथ्वीवर नसूनही भक्तांच्या रक्षणाकरिता तो पृथ्वीवर अवतार घेणार. आपल्याला जसे कोणी आपल्याबद्दल चार चांगले शब्द काढले की बरे वाटते तसे तुम्ही त्याची प्रार्थना केलीत, स्तुती केलीत तर तोही प्रसन्न होणार. तुम्हाला आपले घर वरळी सीफेसला असलेले आवडेल तसे देवांपैकी कोणी काशी पसंत करतो तर कोणी तिरुपती. तिथे त्याला भेटावयास जाणेच इष्ट, होय की नाही ? तुमचे आर्टीओत काम असेल तर तुम्हाला मध्यस्थ लागतो. मग देवाकडून काम करवून घ्यावयाचे असेल तर बडवे, पांडे, बाबा, बुवा आलेच. परत नेहमीच्या व्यवहारकडे या. शेती करावयाची तर नांगरणी, पेरणी, वगैरे करणे, त्यांची पद्धत ठरवणे गरजेचे असते. तसेच या पुजारी लोकांनी केले. त्यांनी देवाची पुजा अर्चना करण्यचे नियम ठरवून दिले व या कर्मकांडालाच आपण धर्म, नेहमीच्या अर्थाचा धर्म, समजू लागलो. सामान्य माणुस मेंढरासारखा असतो. कुणाच्यातरी मागून जाणे त्याला सोपे वाटते.तसेच त्याला विहिरीतल्या बेडकांसारखा एक राजाही लागतो. बाबा-बापू ही बेरकी माणसे ते काम पार पाडावयास तयार असतातच.आणि जर या सगळ्याला शतकांची परंपरा मिळाली की झालेच, अगदी वज्रलेप. अन्निसचे कार्यकर्ते कितीही प्रयत्न करोत , त्यांना यश मिळणे दुरापास्तच. आता थोडा भारतातला इतिहास बघू. वैदिक काळात देव नव्हता. इन्द्र, वरुण, अग्नी सारख्या देवता होत्या. त्यांच्याकडे मागणेही साधे होते, देवताही साध्या होत्या. यज्ञ हा एकमेव कर्मकांडाचा मार्ग होता. उपनिषदकारांनी तर त्यांनाही जवळजवळ झिडकारले होते. सोळ्या प्रमुख दर्शनातील तिन-चार देवाला स्विकारतात. नंतर आले बुद्ध्-महावीर. त्यांना चांगले अनुयायी मिळाले, दोन धर्म भरभराटीस आले. काही शतके चलती होती. कर्मकांडांची सोय करण्यात आली होती.या सर्व काळात समाजाच्या खालच्या वर्गातील लोकांनी त्यांची प्राथमिक गरज सांभाळावयास त्यांचे देव जपले होतेच. बहुदा यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुराणीकांनी स्वप्नमयी दुनियेतील विष्णु-शंकर आदी देव निर्माण केले. यांचा जनसामान्यावर इतका पगडा बसला की दोन हजार वर्षे समाज या जोखडाला उराशी धरून बसला आहे. मुसलमानांसारखे कडवे आक्रमक त्याला खिंडार पाडू शकले नाहीत, अन्निस म्हणजे किस झाडकी पत्ती ! याला म्हाणावयाचे "हिन्दू धर्म ". तर असे आहे हे लफडे. तुमच्या मोलकरणीने कर्ज काढून सत्यनारायणाची पुजा केली किंवा देवीकरिता बोकड मारला तर ती तिची गरज आहे, भावनिक गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तिला अडाणी म्हणता येईल पण साईबाबाच्या मूर्तीवर दीड किलो सोन्याचा मुकुट चढवणाराही अडाणीच का ? मला तर हा सगळा प्रकार,अन्निसचे काम, दारूबंदीवर व्याख्यान देण्यासारखा वाटतो, न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो ! शरद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9566 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

मला तर हा सगळा

मृत्युन्जय
Tue, 06/19/2012 - 11:32 नवीन
मला तर हा सगळा प्रकार,अन्निसचे काम, दारूबंदीवर व्याख्यान देण्यासारखा वाटतो, न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो ! याहुन परफेक्टली अजुन कोणी सांगु शकेल असते असे वाटत नाही. :)
  • Log in or register to post comments

एग्जॅक्टलि

बॅटमॅन
Tue, 06/19/2012 - 12:44 नवीन
एग्जॅक्टलि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१

सुनील
Tue, 06/19/2012 - 18:56 नवीन
न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो प्रचंड सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

धर्माची उकल उत्तमपणे उलगडून

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 11:55 नवीन
धर्माची उकल उत्तमपणे उलगडून दाखवलीत. बाकी जैन धर्म इतर संस्कृतींबरोबर बराचसा समांतरपणेच चालू होता. त्यांच्याकडून धर्मप्रसार इतक्या प्रभावीपणे झाला नसावा, पण अशोकाच्या प्रभावी धर्मप्रचारामुळे बुद्धांमध्ये धर्मप्रसार हाच धर्म बनला ह्यातच कुठेतरी बौद्धांच्या र्‍हासाची बीजे रोवली गेली आणि हिंदू धर्म उदयास येत गेला.
  • Log in or register to post comments

तुमच्या मोलकरणीने कर्ज काढून

एम.जी.
Tue, 06/19/2012 - 11:54 नवीन
तुमच्या मोलकरणीने कर्ज काढून सत्यनारायणाची पुजा केली किंवा देवीकरिता बोकड मारला तर ती तिची गरज आहे, भावनिक गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तिला अडाणी म्हणता येईल पण साईबाबाच्या मूर्तीवर दीड किलो सोन्याचा मुकुट चढवणाराही अडाणीच का ? त्या मोलकरणीला अडाणी म्हटलं तर सोन्याचा मुकुट चढवणार्‍यालाही अडाणीच म्हणायला हवं. भावनिक गरज हाच मुद्दा असेल तर तिला तरी अडाणी का म्हणायचं..?
  • Log in or register to post comments

लफडे

श्रावण मोडक
Tue, 06/19/2012 - 12:14 नवीन
हे लफडे आहे हे सांगितलेत ते एक उत्तम केलेत. विवेकवादी, तर्कवादी, विज्ञानवादी वगैरे तूर्त इथं फारसे दिसत नाहीत. नाही तर या धाग्यावरून आणखी थोडी करमणूक झाली असती. छ्या... गमावलं ते सुख... :-) त्या तिथंही हे लिहिलं आहे का? जाऊन पहावे लागेल... :-)
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/19/2012 - 12:21 नवीन
विवेकवादी, तर्कवादी, आणि विज्ञानवादीच जेव्हा रामातल्या दैवत्त्वाचा शोध घ्यायला लागतात तेव्हा समजायचं की हल्ली करमणूक कुठेच उरली नाही. अर्थात आता फक्त खबरदार म्हणायचं आणि नमोनमः करायचं.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

विघ्नसंतोषी वृत्ती

सुनील
Tue, 06/19/2012 - 19:00 नवीन
नाही तर या धाग्यावरून आणखी थोडी करमणूक झाली असती. छ्या... गमावलं ते सुख... काय ही विघ्नसंतोषी वृत्ती!! जरा गंभीर चर्चा पण करा की राव. नेहेमीच काय खेचाखेची? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

विवेकवादी, तर्कवादी,

निवांत पोपट
Wed, 06/20/2012 - 17:42 नवीन
विवेकवादी, तर्कवादी, विज्ञानवादी हे दैववादी होत नाहीत हा त्यांच्या दैवाचा(नशिबाचा) तर भाग नसेल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हाहाहा

श्रावण मोडक
Wed, 06/20/2012 - 18:31 नवीन
हे लय भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

हा हा हा

रमताराम
Wed, 06/20/2012 - 19:59 नवीन
निवांत बसलेला पोपट चोच उघडतो तेव्हा नेमकं बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

शरद साहेब

रणजित चितळे
Tue, 06/19/2012 - 12:21 नवीन
परत एकदा सेंच्युरी मारलीत. मस्त लेख. आवडले विचार. मनापासून सहमत.
  • Log in or register to post comments

आवडला लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/19/2012 - 12:23 नवीन
सर, लेख आवडला. देव, धर्म, श्रद्धा आणि विज्ञान यांचा गुंता इतका सहजासहजी सुटणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

<<नंतर आले बुद्ध्-महावीर. या

शिल्पा ब
Tue, 06/19/2012 - 12:34 नवीन
<<नंतर आले बुद्ध्-महावीर. या सर्व काळात समाजाच्या खालच्या वर्गातील लोकांनी त्यांची प्राथमिक गरज सांभाळावयास त्यांचे देव जपले होतेच. बहुदा यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुराणीकांनी स्वप्नमयी दुनियेतील विष्णु-शंकर आदी देव निर्माण केले. याचा अर्थ असा होतो की बुद्धाच्या आधी शंकर,विष्णु ह्या कल्पना / देव नव्हते. हे कसं स्पष्ट कराल?
  • Log in or register to post comments

तपशिलात बराच घोळ आहे पण ढोबळ

बॅटमॅन
Tue, 06/19/2012 - 12:43 नवीन
तपशिलात बराच घोळ आहे पण ढोबळ लॉजिक बरोबर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

चांगले मांडले आहेत तुम्ही

नाना चेंगट
Tue, 06/19/2012 - 18:43 नवीन
चांगले मांडले आहेत तुम्ही विचार. :)
  • Log in or register to post comments

एक शंका

सुनील
Tue, 06/19/2012 - 19:06 नवीन
एक शंका - थोडा धक्का लागला की, धार्मिक व्यक्तींच्या धार्मिक भावनांना लागलीच ठेच लागते. तसेच, सतत धार्मिकतेचे स्तोम माजवित राहिल्यास, अधार्मिक व्यक्तींच्या अधार्मिक भावनांना ठेच लागते का? अन्निसचा अनुभव काय आहे?
  • Log in or register to post comments

>> धार्मिकतेचे स्तोम माजवित

नाना चेंगट
Tue, 06/19/2012 - 19:16 नवीन
>> धार्मिकतेचे स्तोम माजवित राहिल्यास, अधार्मिक व्यक्तींच्या अधार्मिक भावनांना ठेच लागते का? अर्थात ! >>>अन्निसचा अनुभव काय आहे? अन्निसचे माहित नाही. पण आम्हाला तरी असेच दिसते ब्वा ! :) तुम्हाला या गोष्टी माहितच नाहीत असे नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मला वाटते...

विकास
Tue, 06/19/2012 - 21:43 नवीन
धार्मिक व्यक्तींना उगाच ठेच लागली हे कधी समजावे?
जर धार्मिक व्यक्तींच्या व्यक्तीगत अथवा सामुहीक भावनांवर आपणच कसे शहाणे (आणि पर्यायाने तमाम धार्मिक व्यक्ती/समुह निर्बुद्ध) असे म्हणले जाते अथवा धक्का मारलो जातो तेंव्हा ठेच लागते...
तसेच, सतत धार्मिकतेचे स्तोम माजवित राहिल्यास, अधार्मिक व्यक्तींच्या अधार्मिक भावनांना ठेच लागते का? धार्मिकतेचे स्तोम माजवताना जर कोणी उगाच सुरवात करत, अधार्मिक व्यक्तीस ते कसे चुकीचे आहेत असे म्हणत नसेल तर त्यांच्या भावनांना ठेच लागण्याचा प्रश्न नसावा. (येथे मी धार्मिकतेचे समर्थन करत नाही, अंधश्रद्धेतून होणार्‍या अनेक चुकीच्या/घातक प्रथांचे तर त्याहूनही करत नाही). :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

प्रतिक्रिया कशी द्यावी?

सुनील
Tue, 06/19/2012 - 22:25 नवीन
ठेच दोन्ही बाजूंना लागते / लागू शकते, हे मान्य झाले तर, प्रश्न असा येतो की, ह्या ठेचेची प्रतिक्रिया कशी द्यावी (दोन्ही बाजूंनी)? १) दुर्लक्ष करून २) आपली बाजू दुसर्‍यांना समजावण्याचा प्रयत्न करून ३) आगपाखड करून ४) अन्य प्रकारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

Nothing is sacred

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/19/2012 - 22:51 नवीन
ठेच दोन्ही बाजूंनी लागतेच असंही नाही. दोन्ही बाजूंना ठेच न लागणारे लोक असतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं स्पेसिफिक असं उत्तर माझ्याकडे नाही. अधार्मिकांमधे आणखी पंथ असतात. त्यांच्यापैकी nothing is sacred (पवित्र असे काहीही नाही) या तत्त्वाला प्रमाण मानणारे काही लोकं धर्माची, धार्मिकतेची, अधर्माची आणि अधार्मिकता/अधार्मिक सगळ्याची आणि सगळ्यांची खिल्ली उडवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

भीति

तिमा
Wed, 06/20/2012 - 11:33 नवीन
An average person is scared of the sacred. सामान्य माणसाला लहानपणापासून भीति दाखवली जाते. त्यामुळे 'उगाच, विषाची परीक्षा पहा कशाला' ? असा विचार करुन तो पूर्वापार चालत आलेल्या रुढी पाळतो. ज्यांना लहानपणापासूनच डोळसपणे वागण्याचे धडे मिळतात तेच स्वतंत्र विचार करु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>ज्यांना लहानपणापासूनच डोळसपणे वागण्याचे धडे मिळतात

संजय क्षीरसागर
Wed, 06/20/2012 - 12:00 नवीन
तेच स्वतंत्र विचार करु शकतात. = येस! आणि जे या वयातही सारासार विचार करु शकतात त्यांच्या धारणा बदलू शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

>>>त्यांच्यापैकी nothing is

नाना चेंगट
Wed, 06/20/2012 - 15:00 नवीन
>>>त्यांच्यापैकी nothing is sacred (पवित्र असे काहीही नाही) या तत्त्वाला प्रमाण मानणारे काही लोकं धर्माची, धार्मिकतेची, अधर्माची आणि अधार्मिकता/अधार्मिक सगळ्याची आणि सगळ्यांची खिल्ली उडवतात. पवित्र असे काहीही नाही असे मानणारे स्वतःच्या आईवडिलांच्या फोटोवर थुंकतात का हो? आपल्या आईवडीलांना कंट्रोल करता आला नाही म्हणून आपला जन्म झाला अशी त्यांच्यासमोर खिल्ली उडवतात का हो ? (आप्ली केवळ उत्सुकतेपोटी शंका बाकी काही नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

थुंकण्यामागचा तुमचा हेतू शुद्ध आहे असं मान्य करूनही

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/20/2012 - 20:17 नवीन
थुंकण्यामागचा तुमचा हेतू शुद्ध आहे* असं मान्य करूनही, खिल्ली उडवणे आणि रोगराईचा प्रसार होण्यासारख्या गोष्टी करणे किंवा शरीराने नाकारलेल्या गोष्टी शरीरातून बाहेर टाकणे यांच्यातला फरक तुमच्याकडे शाळांमधे शिकवत नाहीत का थुंकणे ही क्रिया मजेशीर वाटावी एवढे लहान आहात? *रोगाच्या तपासासाठी थुंकीचे निरिक्षण करतात, कधी इनव्हॉलंटरी कारणांमुळे थुंकी गळते ती पुसावी लागते इ.
आपल्या आईवडीलांना कंट्रोल करता आला नाही म्हणून आपला जन्म झाला अशी त्यांच्यासमोर खिल्ली उडवतात का हो ? (आप्ली केवळ उत्सुकतेपोटी शंका बाकी काही नाही)
जन्मामधे खिल्ली उडवण्यासारखं काही आहे हे मला समजलेलं नाही. तुम्हाला समजलं असेल आणि शक्य असेल तर समजावून सांगाल अशी अपेक्षा आहे. आपल्या जन्माच्या "रहस्या"मधे काही भयंकर वाटणं हे सर्वसाधारणपणे मुलग्यांना एका ठराविक वयात वाटतं. (या वयात थुंकण्यात काही विनोद दिसणं नष्ट झालेलं असतं.) असं का होतं यासंदर्भात मानसशास्त्रज्ञांकडे काही स्पष्टीकरणही आहे. मी ठराविक वयाची अनेक वर्षांपूर्वी होते आणि नंतर 'मोठी झाले'. तुम्ही थुंकण्याशिवाय हाही मुद्दा काढला आहेत तर तुमच्या मानसिक आणि शारीरिक वयाबद्दल काही तर्क आहे. असो. आई-वडलांकडून आपला जन्म या पलिकडे काही महत्त्वाचं, लक्ष देण्यासारखं, उल्लेखनीय इतर काही काम झालेलं नाही असा निदान माझा माझ्या जन्मदात्यांबद्दल समज नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना आणि/किंवा त्यांची खिल्ली उडवताना इतर अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

खुलाशाबद्दल धन्यवाद. तुमची

नाना चेंगट
गुरुवार, 06/21/2012 - 07:01 नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद. तुमची भुमिका समजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कैच्याकै

रमताराम
Wed, 06/20/2012 - 20:16 नवीन
नाना वडाची साल पिंपळाला लावू नको. पवित्र नसलेली प्रत्येक गोष्ट धिक्कारार्ह असते असा अर्थ नसतो. जगात बहुतेक गोष्टी As Is देखील स्वीकारल्या जातात किंवा तू दिलेल्या उदाहरणाप्रमाणे भावनिक बंधातून वा अन्य नात्यातून, बंधातून, अपरिहार्यतेतूनही. याचा अर्थ आपले आई-वडिल पवित्र असतात असा अर्थ नसतो, ते 'आपले' असतात इतकाच अर्थ असतो. तू आयुष्यात स्वीकारलेली प्रत्येक गोष्ट काय 'पवित्र' आहे म्हणून स्वीकारलेली असते काय? आणि जी स्वीकारली नाही त्या प्रत्येक गोष्टीवर तू थुंकतोस काय? प्रतीकात्मतेलाही एक मर्यादा असते, प्रतीक म्हणून स्वीकारलेली गोष्टच मूळ तत्त्वाला बाजूला सारून महत्त्व वाढवू लागली तर तिच्यावर थुंकणेदेखील नको, सरळ कचर्‍यात फेकून द्यावी - मग तो फोटो असतो की मूर्ती - नि मूळ तत्त्वाला सुसंगत असे नवे प्रतीक स्वीकारावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

आपुलकीबद्दल धन्यवाद.

नाना चेंगट
गुरुवार, 06/21/2012 - 07:02 नवीन
आपुलकीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आपल्या आईवडीलांना कंट्रोल

राजेश घासकडवी
Wed, 06/20/2012 - 22:14 नवीन
आपल्या आईवडीलांना कंट्रोल करता आला नाही म्हणून आपला जन्म झाला अशी त्यांच्यासमोर खिल्ली उडवतात का हो ? (आप्ली केवळ उत्सुकतेपोटी शंका बाकी काही नाही)
हे हीन पातळीचं वक्तव्य आहे. यात 'तुमच्या आईवडीलांना कंट्रोल करता आला नाही म्हणून तुमचा जन्म झाला' असा अपमान करण्याचा प्रयत्न दडलेला आहे. फोटोवर थुंकणं वगैरे वाक्यांबरोबर आल्यावर तो उद्देश अधिक उघड होतो. अशा पोरकट, थिल्लर आणि घाणेरड्या भाषेचा मी निषेध करतो. या व्यासपीठावर एकमेकांच्या आईबापांचा अशा प्रकारे उल्लेख होऊ नये असं वाटतं. मुद्दे संपले की गुद्दे सुरू होतात याचं हे विधान उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

+१

नाना चेंगट
गुरुवार, 06/21/2012 - 07:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

छे छे

Nile
गुरुवार, 06/21/2012 - 02:51 नवीन
आपल्या आईवडीलांना कंट्रोल करता आला नाही म्हणून आपला जन्म झाला अशी त्यांच्यासमोर खिल्ली उडवतात का हो ?
आम्ही तर ब्वॉ प्लान्ड होतो. तुम्ही नकोसे होता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

असो.

नाना चेंगट
गुरुवार, 06/21/2012 - 07:03 नवीन
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

nothing is sacred (पवित्र असे

मृत्युन्जय
गुरुवार, 06/21/2012 - 12:00 नवीन
nothing is sacred (पवित्र असे काहीही नाही :) अरेरे. खुप मोठ्या आनंदाला मुकते आहेस तु आणि तुझ्यासारखे अजुन बरेच इतर लोक. असो. काही गोष्टी नक्कीच sacred असतात. आपण त्याचा कधी तसा विचार करत नसू तर गोष्ट वेगळी पण तरीही त्या गोष्टी sacred असतातच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

:)

अर्धवटराव
गुरुवार, 06/21/2012 - 21:33 नवीन
पावित्र्याचि ओळख एकतर ति "अनटचेबल" असेपर्यंतच नाहि तर स्पर्ष्याच्या पावित्र्याची खात्री असेल तर. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

उद्देशाप्रमाणे

विकास
Wed, 06/20/2012 - 00:53 नवीन
क्रियेमागच्या उद्देशाप्रमाणे प्रतिक्रीया द्यावी. उगाच कोणी सुई टोचत असेल तर दोन हात करून बाजूला करावे लागते तर जेंव्हा डॉक्टर सुई टोचतो/ते तेंव्हा त्या मागील कार्यकारणभाव समजून सहन करता मान्य करावे लागते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

+१

सुनील
Wed, 06/20/2012 - 20:19 नवीन
उद्देशाप्रमाणे ह्याच्याशी सहमत. पण मग हा उद्देश ठरवायचा कोणी? मारणार्‍यानी की लागणार्‍यानी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

दोघांनीही

विकास
Wed, 06/20/2012 - 20:34 नवीन
पण मग हा उद्देश ठरवायचा कोणी? माझ्यामते दोघांनीही. एक गोष्ट खरी की ज्याला लागते त्याने दिलेली प्रतिक्रीया ही रिफ्लेक्स अ‍ॅक्शन असते.पण मारणार्‍याची विवेकबुद्धी कुठे पेंड खायला गेलेली असते? उठसुठ स्वतःला शहाणे समजताना इतरांना, त्यांचे म्हणणे कितीही पटले नसते तरी जर कोणी मुर्ख म्हणत असेल तर अशा व्यक्तीस विवेकबुद्धी आहे असे मला वाटणार नाही. (आणि हो वरील दुव्यातील प्रतिसाद आता बराच मवाळ आहे. तरी देखील... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मुर्ख !!

अर्धवटराव
Wed, 06/20/2012 - 22:23 नवीन
हि "मुर्ख " लिंक पाहिली. "आपण विवेकवादी आहोत" या अंधश्रद्धेच्या निर्मुलनासाठी एखादी अनिंस काढण्याचा विचार करतोय. यच्चयावत याना, नका येऊ ना, जाना, नका जाउ ना वगैरे वगैरे वाल्यांच्या डोक्यातली "परोपकारी गटणे" जळमटे पार झाडुन काढता आली तर किती सुखी होईल हे जग. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ठेच दोन्ही बाजूंना लागते /

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/20/2012 - 06:50 नवीन
ठेच दोन्ही बाजूंना लागते / लागू शकते, हे मान्य झाले तर, प्रश्न असा येतो की, ह्या ठेचेची प्रतिक्रिया कशी द्यावी (दोन्ही बाजूंनी)? एकूण मिपाचा आमच्या वावराचा अनुभव पाहता अधार्मिकवाद्यांकडून देव देवतांची अकारण खिल्ली उडवली जाणे, त्यांच्या लैंगिकतेवर भाष्य करणे (म्हणजे इतके की बिचारी पुराणे देखील नि:शब्द होतील) , श्रद्धास्थानांवर अस्थानी हल्ला करणे वगैरे चालू असते. त्यामुळे हा प्रश्न एका अधार्मिकवादी (विशेषतः वैदिक आम्लेट वाल्याला ) पडावा याचे आश्चर्य वाटते. असो. धार्मिकतावाद्यांकडून यातून थोडेसे शिकण्याची गरज वाटत आहे. त्यानिमित्त आपण न्यूटन महादेव मंदिराची मिपावर स्थापना करावी असा प्रस्ताव मी मांडत आहे. तसेच मिपा सरकारकडे मिपा मूखपृष्ठावर २*२ चा एक चौकोन मंदिराच्या दारासाठी मागत आहे. दिले नाही तर आंदोलन करू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आपुन एकही मारा लेकीन साला

प्यारे१
Wed, 06/20/2012 - 10:00 नवीन
आपुन एकही मारा लेकीन साला सॉलिड मारा....! ;) -दांभिक प्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

अगदी अगदी जशी नारळीकरांनी

नाना चेंगट
Wed, 06/20/2012 - 15:03 नवीन
अगदी अगदी जशी नारळीकरांनी न्युटनच्या सफरचंदाच्या झाडाची फांदी आणून लावली होती तसेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मुसलमानांसारखे कडवे आक्रमक

कवितानागेश
Tue, 06/19/2012 - 20:10 नवीन
मुसलमानांसारखे कडवे आक्रमक त्याला खिंडार पाडू शकले नाहीत, अन्निस म्हणजे किस झाडकी पत्ती !>> म्हणजे नक्की काय? मुसलमान आक्रमक धार्मिक होतेच. शिवाय आक्रमणाची प्रत्यक्षदर्शी कारणे आणि मूळ कारणे नेहमीच वेगळी असतात.मुसलमानांचे आक्रमण इथल्या समाजाबद्दलच्या प्रेमानी आणि समाजसुधारणेसाठी झाले नव्हते. अनिसची ध्येय वेगळी असावीत असे वाटते. निदान अपेक्षा तरी अशी आहे, की गाडगेबाबांचा आदर्श ठेउन काम करावे. पण आता अंनिसवाल्यांचा निधर्मीपणा हा धर्म बनतोय. :( त्यामुळे ही तुलना योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments

+१ टू लीमाऊ

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/19/2012 - 22:29 नवीन
+१ टू लीमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कोणी ऐकतच नसतो?

धनंजय
Tue, 06/19/2012 - 22:50 नवीन
कोणी ऐकतच नसतो? हे काही पटत नाही. काही प्रकारचे भावनिक गरजेचे मोठे खर्च बदनाम झाल्यानंतर समाजात कमी प्रमाणात दिसून येतात. उदहरणार्थ नरबळी आजकाल एखाद-दोन दशकांतून एकदा प्रसिद्धीस येतात. पुत्र व्हावा म्हणून कर्ज काढून बोकड बळी देणार्‍या व्यक्तीच्या टाकलेल्या कफल्लक मुलीची कुंटणखान्यातून सुटका माझ्या करभारातून होणार आहे काय? मग त्याच्या भावनिक गरजेची किंमत काही प्रमाणात मला भरावी लागते आहे. समाजाने कितपत पैसे कुठल्या उद्योगात किती प्रमाणात गुंतवावेत याबाबत आपले अर्थकारण-विषयक मत असू शकते. असावेच. प्रार्थना-मध्यस्थी-उद्योगात समाजाचे कितपत उत्पन्न खर्च होते आहे, तितपत उत्पन्न अन्य उद्योगांमध्ये गुंतत नाही. - - - भारतातील घरगुती खर्चांचे सर्वेक्षण कुठे उपलब्ध आहे काय? वेगवेगळ्या दशकांत वेगवेगळ्या स्तरातील लोकांचा प्रार्थना-मध्यस्थी-सेवांवर कितपत खर्च होत असे, याबाबत कुतूहल वाटते आहे. कदाचित हा खर्च कमी होत असेल, याबाबत हा निर्देश मिळू शकतो. पूर्वीच्या काळी जितके टक्के लोक प्रार्थना-मध्यस्थी-सेवा पुरवून उदरनिर्वाह करत होते, त्यापेक्षा आजकाल टक्केवारी कमी असावी. (प्रार्थना-मध्यस्थी-सेवा करणार्‍या जातीतल्या कित्येक कुटुंबांत एकही पुत्र आजकाल या सेवा पुरवत नाहीत, असे मला दिसते. पूर्वी मात्र चुलत-चुलत भावंडात एक तरी मध्यस्थ-उद्योजक सापडे.) म्हणजे काही थोडे मध्यस्थ-सेवादाते प्रचंड उत्पन्न मिळवत असतील, पण एकुणात उलाढाल [उत्पन्नाची टक्केवारी म्हणून] कमीसुद्धा झाली असेल. जर असे असेल, तर "पिणारे दारूबंदीचा संदेश मुळीच ऐकत नाहीत" असे म्हणणे पटत नाही.
  • Log in or register to post comments

न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो !

संजय क्षीरसागर
Wed, 06/20/2012 - 00:14 नवीन
हे विधान सकृद्दर्शनी फार भारी वाटतं पण तसं नाहीये कारण मग वैचारिक आदानप्रदानाला अर्थच उरणार नाही. देव आहे आणि देव नाही असे फक्त दोन गट नाहीयेत, एक फार मोठा समुदाय असाय की जो या दोन्ही मध्ये दोलायमान आहे, ज्याला नक्की काय आहे ते हवय आणि तो गट मोठाय. या विषयावरच्या पहिल्या लेखावर मी म्हटलय की देव ही माणसानं केलेली कल्पना आहे आणि याची वास्तविकता स्वतः पडताळून पाहणं हे आस्तिक आणि नास्तिक दोघांना हितावह आहे. आस्तिक देव मानतो कारण त्याला काही तरी आधार हवा असतो आणि नास्तिक देव मानत नाही कारण आस्तिकाला तो सिद्ध करता येत नाही. देव ही कल्पना आहे हे समजल्यावर आस्तिक त्या कल्पनेवर किती विसंबून रहायच ते ठरवू शकतो आणि नास्तिक आस्तिकाची भावनिक गरज ओळखून सहिष्णू होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

आस्तिक देव मानतो कारण त्याला

५० फक्त
Wed, 06/20/2012 - 07:35 नवीन
आस्तिक देव मानतो कारण त्याला काही तरी आधार हवा असतो आणि नास्तिक देव मानत नाही कारण आस्तिकाला तो सिद्ध करता येत नाही. देव ही कल्पना आहे हे समजल्यावर आस्तिक त्या कल्पनेवर किती विसंबून रहायच ते ठरवू शकतो आणि नास्तिक आस्तिकाची भावनिक गरज ओळखून सहिष्णू होऊ शकतो. +१ , धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अजीबात नाहि !!

अर्धवटराव
Wed, 06/20/2012 - 20:12 नवीन
>>आस्तिक देव मानतो कारण त्याला काही तरी आधार हवा असतो आणि नास्तिक देव मानत नाही कारण आस्तिकाला तो सिद्ध करता येत नाही. -- अजीबात नाहि. सध्या एव्हढेच. बाकी चालु द्या. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पुराण

Nile
Wed, 06/20/2012 - 01:57 नवीन
मला तर हा सगळा प्रकार,अन्निसचे काम, दारूबंदीवर व्याख्यान देण्यासारखा वाटतो, न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो !
हे सगळं लिहताना शरदराव मात्र आपण दुसर्‍याला काहीतरी सांगत आहोत याचं भान विसरले यातच काय ते समजावं. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

मी शेंगा खाल्ल्या नाहीत...

प्रभाकर पेठकर
Wed, 06/20/2012 - 11:09 नवीन
न पिणारा.. त्याला त्याची गरज नाही, पिणारा.. तो तुमचे ऐकतच नसतो ! न पिणारा... तुमचे ऐकत नसतो कारण त्याला गरज नसते आणि (एखादा) पिणाराही ऐकत असतो (कारण त्याला चॉईसच नसतो) पण तो मनावर घेत नाही कारण तो 'तेवढी' पित नसतो. मी शेंगा खाल्ल्या नाहीत त्यामुळे मी टरफलं उचलणार नाही. तसेच, मी जास्त 'घेत' नाही त्यामुळे मी तुमचा उपदेश मनावर घेणार नाही.
  • Log in or register to post comments

हिन्दू धर्म तरी कोठून असणार

अविनाशकुलकर्णी
Wed, 06/20/2012 - 11:13 नवीन
हिन्दू धर्म तरी कोठून असणार ? कायदा व घटना हिन्दु धर्म मानते..जात मानते.. कायदा श्रेश्ठ..बाकि मते मतांतरे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा